सत्य, अहिंसा, शांततापूर्ण सह-अस्तित्व, संवर्धन आणि श्रमिकांप्रती प्रेम या गांधीजींनी जपलेल्या आणि आचरणात आणलेल्या मूल्यांवर आधारित आधुनिक जगाची स्थापना करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याच्या उद्देशाने व गांधीजींच्या जीवनाचा, विचारांचा आणि कार्याचा अद्भुत वारसा पुढच्या पिढीसाठी संक्रमित करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री भवरलाल जैन अर्थात मोठ्या भाऊंनी जगप्रसिद्ध अशा गांधीतीर्थची निर्मिती केली. दि. २५ मार्च २०१२ रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या हस्ते या भव्य अशा दूरदर्शी प्रकल्पाचा लोकार्पण सोहोळा करण्यात आला. आज या घटनेला १० वर्षे पूर्ण होत आहे. गांधीतीर्थच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने हा खास लेख आपल्यासाठी...
गांधीतीर्थची खास वैशिष्ट्ये -
१. जोधपूर येथील दगडापासून शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली ८१००० चौरस फुटांची हि शाश्वत रचना, हरित धोरणानुसार साकारण्यात आले आहे. गांधीतीर्थची वास्तू अतिशय सुंदर, रमणीय बाग, विस्तीर्ण हिरवळ (लॉन) आणि आंब्याच्या बागांच्या मध्यभागी आहे.
२. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या संग्रहालयात गांधीजींच्या जीवनातील घटना इंटरएक्टिव्ह टच स्क्रीन, बायोस्कोप, डिजिटल बुक्स, 3-डी मॅपिंग, म्युरल्स आणि अॅनिमेशनद्वारे सादर करण्यात येतात.
३. सध्या संग्रहालयातील माहिती इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित केली जाते.
४. वाजवी किमतीची पुस्तके, खादीचे कपडे (पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठी), आरोग्य आणि स्वच्छता उत्पादने, हस्तकला आणि विविध प्रकारच्या भेटवस्तूंची विक्री करणारे स्मरणिका दुकान (Souvenir Shop) येथे आहे.
५. २००० चौरस फूट व्हॉल्टसह अत्याधुनिक सुविधेसह ग्रंथालय आहे.६. कागदपत्रांच्या जतनासाठी अत्याधुनिक डिजिटायझेशन लॅब येथे आहे.
८. अतिथींसाठी खोल्या आणि उत्तम शाकाहारी जेवणाची सोय आहे.
गांधी रिसर्च फाउंडेशन (GRF) ची स्थापना आदरणीय मोठ्या भाऊंनी २००७ मध्ये केली. गांधीजींच्या अहिंसा (अहिंसा), अपरिग्रह (अपार्जनशीलता) आणि अनेकांतवाद (अनिरपेक्षता/बहुपक्षीयता) या मूलभूत तत्त्वांचा त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकार केला होता. या शाश्वत मूल्यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांनी या गांधीवादी मूल्यांच्या महत्त्वाच्या प्रासंगिकतेवर भर दिला, विशेषत: सध्याच्या काळातील हिंसाचार, राजकीय हुकूमशाही, भौतिकवाद आणि अनैतिकता, अध्यात्माचा अभाव यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला गांधीजींची मूल्ये हेच उत्तर आहे असा त्यांना विश्वास होता.
GRF मध्ये, गांधीजींच्या जीवनाला आदर्श मानून गांधी तत्त्वज्ञानाचा शक्य तितक्या साध्या आणि प्रभावी पद्धतीनेप्रसार केला जातो. आजच्या पिढीला प्रेरणा देण्याचे आणि व्यक्तींच्या जीवनावर गांधी विचारांचा प्रभाव टाकण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील बांधवांचे जीवन सशक्त व आत्मनिर्भर करण्यातही संस्था कार्यरत आहे.
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या मोठ्या भाऊंनी जल व्यवस्थापन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. एक अनुकरणीय सामाजिक उद्योजक म्हणून, अहिंसा आणि सत्याच्या मूल्यांनी प्रेरित होऊन, त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी ट्रस्टीशिपमध्ये आपला व्यवसाय चालवला. ते एक परोपकारी व सामाजिक संवेदनांचे प्रतीक होते. त्यांनी जळगाव शहरात शाळा, नेत्र रुग्णालय, क्रीडा संघटना आणि धर्मादाय गृहांची निर्मिती केली. शहराबाहेरील भागात त्यांनी सार्वजनिक वापरासाठी सिंचन धरण बांधले. त्यांच्या अफाट सामाजिक योगदानामुळे, भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात पद्मश्री पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले होते.
गांधीजींच्या उदाहरणावरून प्रेरणा घेऊन जीवन व्यतीत करणारे न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी गांधीतीर्थचे प्रथम अध्यक्ष म्हणून लाभले व या प्रकल्पाला वास्तवात आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मोठ्या भाऊंची प्रामाणिक विनंती मान्य केली हि सर्वात मोठी उपलब्धी म्हणता येईल. एखाद्या श्रीमंताने आपली संपत्ती समाजासाठी ट्रस्टीशिपमध्ये ठेवली तर संपत्ती मिळवणे हे समाजसेवा करण्यासारखे आहे. या गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन गांधीतीर्थ बांधण्यात आले आहे.
आपला महत्वाकांक्षी प्रकल्प मोठ्या भाऊंनी "गांधीजी" या असामान्य माणसाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. अतिशय सुंदर, रमणीय आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल अशा वातावरणातील गांधीतीर्थ उच्च क्षमतेच्या विद्वानांना, तरुण जिज्ञासू मनांना व गांधी अभ्यासकांना येथील वाचनालय, संग्रहालय आणि प्रदर्शनाला भेट देण्यास आकर्षित करीत आहे. केवळ या व्यक्तींच्या जीवनातच नव्हे तर जागतिक परिस्थिती सुधारण्यातही या जगप्रसिद्ध अशा वास्तूचे मोठे योगदान अधोरेखित होत आहे. गेल्या दहा वर्षात ६२ राष्ट्रांमधील सुमारे ५ लाख लोकांनी गांधीतीर्थला भेट दिली आहे. सर्व वाचकांना विनंती आहे कि, गांधीजींच्या मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रेरित झालेल्या या उदात्त प्रयत्नात यावे आणि आपणही सहभागी व्हावे.
आपण गांधी विरोधक असालही मात्र आपण गांधीजींच्या एकादश व्रताचे वाहक आहात असे मला वाटते कारण त्यातच माणसाच्या माणुसकीची, संवेदनशीलतेची खरी ओळख आहे. कोरोना सारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर गांधीजींच्या एकादशव्रताची कालातीतता दिसून येते. जीवनातील आव्हानांना, मानवनिर्मित संकटांना गांधी विचारांशिवाय तरणोपाय नाही असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते. आपण सर्वांनी सहकुटुंब, मित्र परिवारासह एकदा अवश्य भेट द्यावी. असामान्य, अविश्वसनीय कार्यकर्तृत्वाचा धनी असलेल्या महात्म्याला एक व्यक्ती म्हणून प्रामाणिकपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा हे दशकपूर्तीच्या निमित्ताने विनम्र जाहीर आवाहन...
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्याची अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण www.gandhifoundation.net या वेबसाईटवर अवश्य भेट द्या...
गिरीश कुळकर्णी