Tuesday 31 May 2022

सहजीवनाची रौप्य महोत्सवी वाटचाल (भाग २)


मानवी आयुष्य हे अनुभव आणि त्या अनुभवातून शिक्षण घेऊन विकसित होण्याची निरंतर चालणारी प्रक्रिया असते. हे मिळालेले शिक्षण मानवी जीवनात कोणताही अभ्यास न करता पूर्णतः उतरते. थिअरी (पुस्तकी) आणि प्रॅक्टिकल (व्यावहारिक) शिक्षणात ज्या प्रमाणे फरक आढळतो त्याचप्रमाणे वास्तव आणि आभासी व काल्पनिक जगातही आढळतो. विवाहातून निर्माण झालेल्या संबंधांमध्ये याची जाणीव पदोपदी होत असते. विवाहापूर्वीचे जीवन हे नाही म्हटले तरी कल्पना विलासी व बहुतांश वेळेस आभासी असते. विवाहानंतरचे मात्र पूर्णतः वास्तव असते. माझ्या बाबतीतही हे लागू पडते. मात्र व्यावसायिक  आयुष्यातील अनेक प्रशिक्षणांनी, थोरा-मोठ्यांच्या सहवासाने, समविचारी व्यक्तींच्या चर्चेने यातील मेळ घालणे खूप सोपे झाले. एका बाजूला येणारी वैचारिक प्रगल्भता व दुसऱ्या बाजूला संसारातून घ्यावयाची वा येत असलेली निवृत्ती यामुळेही हे काम अधिक सोपे होते. अर्थात यासाठी आपली एक वैचारिक बैठक आपणच तयार करावयाची असते. त्यासाठी अध्यात्मिक गुरु लाभणे अधिक फायद्याचे ठरते. प्रसंगी जीवन जगणे म्हणजे नक्की काय हे शिकणे अगत्याचे ठरते मार्ग ज्याचा त्याच्या सोयीचा असतो. 

लग्नापूर्वी माझ्या आयुष्याच्या जोडीदाराच्या निश्चित अशा काही कल्पना होत्या, त्या कालसुसंगत होत्या. मात्र आजच्या सारख्या खूप स्पष्ट व आग्रही नव्हत्या. "तडजोड" हे यशस्वी वैवाहिक जीवनाचे मूल तत्त्व आहे, हे पक्क माहिती होतं व त्यामुळे तशी मानसिक, भावनिक व शारीरिक पातळीवर तयारीही होती. लग्नापूर्वी जोडीदार एकत्रित कुटुंबात सहज मिळून मिसळून वागणारी असावी, त्यातही आपल्या जातीची व पोट जातीचीही असावी अशी अपेक्षा होती. एका कर्मठ व कर्मकांड करणाऱ्या परंपरावादी ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेला असल्याने त्याचा पगडा नक्की होता त्यामुळे हि अपेक्षा सहजी होती. तसेच जोडीदार शक्यतो विज्ञान शाखेचा पदवीधर असावा अशीही अपेक्षा होती. कारण विज्ञानाचे विद्यार्थी सृजनशील, काळाबरोबर चालणारी असतात असा एक समज होता. वाणिज्य शाखेचे पदवीधर व्यावहारिक असतात तर कला शाखेचे विद्यार्थी इतिहासात रमणारी थोडी वैचारिकदृष्ट्या मागास असा काही तरी समज होता. (कुठून आला सांगता येणार नाही) आज अशा प्रकारचे कोणतेही समज नाही कारण अनुभवातून त्याचे शिक्षण मिळाले. धारणा बदलल्या. माझी पत्नी वाणिज्य शाखेची पदवीधर आहे. (त्यावेळी हि तडजोड होतीच) 

घरात पंजाबी ड्रेस , गाऊन इथपर्यंत पुढारलेली मात्र प्रसंगानुरूप साडीच नेसणारी असावी अशीही अपेक्षा होती आणि आजही आहे. मात्र जीन्स वा तत्सम कपडे कधीही घालू नये असेच वाटते कारण तो आपल्याकडील वातावरणासाठीचा पोशाख नाही व शारीरिक दृष्टीने योग्य नाही अशी धारणा होती व आजही आहे. अर्थात या सर्व बाबतीत मी आज फारसा आग्रही नाही. शेवटी ज्याला त्याला ज्याचे त्याचे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे असे वाटते मात्र माझे मत म्हणून मला विचारले असो वा नसो मी ते मोकळेपणाने सौ. आदितीशी व इतरांशीही बोलतो. गाण्याची आवड असावी हि अपेक्षा होती सौ. गाण्याच्या चार परीक्षा उत्तीर्ण आहे. लग्नापूर्वी सार्वजनिक अपेक्षा एव्हढ्याच होत्या. मात्र मनातून पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेला असल्याने व तेव्हढी वैचारिक प्रगल्भता नसल्याने आपल्याला सहन करणारी, विरुद्ध मत व्यक्त न करणारी, सांगेल तेच ऐकणारी, माझं वर्चस्व मानणारी अशा काही खुळचट वेडसर कल्पनाही होत्या. आज तर तशा त्या अजिबात नाही. "सोनं", साडी, कपडे, गाडी वगैरे भौतिक साधनांबद्दल मला फार कधी आकर्षण वाटले नाही व आजही नाही. मात्र एक स्त्री म्हणून "सोनं" व "साडी" हे पत्नीचे कच्चे दुवे आहेत. मी आयुष्यात अंगावर कधीही सोनं घालणार नाही यावर ठाम मात्र सौ.नी खरेदी करण्यास माझी कधीही ना नाही. साडे तीन मुहूर्ताला व विशेष प्रसंगी एखादा ग्रॅम हा तिचा आग्रह अपवादानेच मोडला असेल. असो.

आणखी एक गोष्ट एका चाकोरीबद्ध कुटुंबात वाढलेले आम्ही दोघेही असलो व कुटुंब हेच प्राधान्य मानणाऱ्या कुटुंबातून आलेलो असलो तरी त्याच पद्धतीने जगावे असे मला कधी वाटले नाही. मात्र सौंची ति कायम अपेक्षा असते. त्यामुळे तुम्ही लग्न का केले ? त्या ऐवजी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे ब्रह्मचारी राहिला असतात अशा शेरा अनेकदा ऐकायला मिळतो. बँकेत नोकरी करणारा नवरा म्हणजे संध्याकाळी ६ वाजता घरी... टीव्ही, एक चक्कर, कुटुंबातील अनावश्यक गोष्टींवर चर्चा, एक मध्यमवर्गीय जगणे मला फारसे न मानवणारे ! खरं यातील काही आवश्यक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे होते असे मला आज वाटते मात्र त्यामुळे फारसे नुकसान झाले असे मला वाटत नाही. एक जबाबदार पती व पिता यासाठी न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असला तरी कधी तरी त्यात कमी राहिली हे स्वीकारले पाहिजे त्यासाठीच स्व-मूल्यांकनात स्वतःला १०० पैकी ७० गुण देतो. स्वतः स्वाभिमानी असल्याने आपलं म्हणणं बरोबर आहे त्यासाठीचा तिचा अट्टाहास आणि समोरच्याने झोपेचं सोंग घेतलेलं असल्याने फारसा भानगडीत न पडता तू मोठ्या बापाचा असं मानणारा मी !  

लग्नापूर्वी पत्रिका जुळली पाहिजे अशी अपेक्षा होती त्यामुळे पत्रिका पाहिली आणि सौ. आदितीचे व माझे ३६ गुण पत्रिकेत जुळले मात्र रौप्य महोत्सवी वर्षाचे सिंहावलोकन करतांना आयुष्यात वास्तवात फारसे जुळत नाहीत असे लक्षात येऊ शकेल. माझ्यादृष्टीने एकाच बाबतीत आमचे ३६ गुण जुळतात आणि ती गोष्ट म्हणजे माझ्याशिवाय ती आणि तिच्याशिवाय मी पूर्ण होऊ शकत नाही. तसे हे चांगले आहेत व तशी हि पण चांगलीच आहे. त्यामुळेच रौप्य महोत्सवी प्रवासात आम्ही केवळ समाधानी नव्हे तर आनंदी  आहोत. अनेकदा वैचारिक मतभेदांमुळे वाद-विवाद होतात मात्र आता एक दुजे के लिए असल्याने ते विषय बाजूला ठेवणे मी पसंत करतो मात्र सौ त्यांचे म्हणणे ठासून खरे ठरविण्याचा नेहमी प्रयत्न करतात. आपल्याकडे इतरांपेक्षा भरपूर असल्याने आपण न्यून असलेल्यांसाठी काही केले पाहिजे मात्र त्यात वाहवत न जाता व्यावहारिक विचार करुन आपलंही पाहिले पाहिजे हि सौ. अदितीची माफक अपेक्षा असते. मी माणसे ओळखू शकतो असे जरी मला वाटत असले तरी लोकं माझा वापर करुन घेतात हे तिला लवकर समजते, ती त्याची जाणीवही करुन देते मात्र पुरुषी अहंकारी मनुष्यस्वभावानुसार मला अनुभवातून ते कळते. अर्थात त्याबाबतीतही मी जरा बेफिकीरच आहे. 

मुलांचे शिक्षण, काही तरी करुन पैसे कमविण्याची इच्छा, कुटुंबातील नातेवाईकांची वास्तपुस्त, देवाणघेवाण यासारख्या गोष्टी मी फारशा पाहत नाही मला त्यात फारसा रस वा स्वारस्य नाही. त्याबाबतीत सौ. आदितीला १०० पैकी १०० गुण दिले पाहिजे. व्यावहारिक जगात या गोष्टींना महत्व असले तरी ऋणानुबंध परस्पर सहकार्यावर व विशेषतः आपण थोडी तोशिष पत्करून इतरांसाठी काही केले पाहिजे हि माझी मनोभूमिका ! जीवनातील अनेक प्रसंगामध्ये आम्ही आमच्या ठिकाणी बरोबरच असतो असे मला वाटते. त्यामुळे "हम नही सुधरेंगे !" या उक्तीप्रमाणे आम्ही एक दुसऱ्याला स्वीकारले आहे असे मला वाटते. प्रसंगांची शृंखला खूप वाढविता येईल कारण २५ वर्षांचा कालावधी सोबत घालविला आहे.   वैवाहिक व खाजगी जीवनातील असे अनेक प्रसंग मला याठिकाणी सांगावेसे वाटतात याचे एकमेव कारण नवीन पिढीने हे आयुष्य आहे हे समजून घेतले पाहिजे. जीवनाचा आनंद घेता व देता आला पाहिजे. त्यासाठी पैसे लागत नाही तर वृत्ती लागते. हि वृत्ती व संसारीक जीवन जगण्याची कला याबाबतीत प्रकाश टाकण्यासाठी आणखी एक भाग लिहीन. पहिला भाग अनेकांनी वाचून त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया नक्कीच उत्साहवर्धक होत्या त्यामुळेच लिहिण्याचे धारिष्ट्य केले. आजचा दुसरा भाग वाचून त्यावर आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहे. येणाऱ्या पिढ्यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी किमान असेही असते हे समजण्यासाठी तरी आपण लिहावे, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे, त्यांचे विचार जाणून घ्यावे आपण समृद्ध व्हावे व त्यांनाही समृद्ध करावे हीच अपेक्षा ! 



Monday 30 May 2022

सहजीवनाची रौप्य महोत्सवी वाटचाल ! (भाग १)

सहजीवनाची सुरुवात ३१ मे १९९७ 

आज जगात भारतीय संस्कृती महान समजली जाते याचे एकमेव कारण म्हणजे कुटुंब व्यवस्था ! हि कुटुंब व्यवस्था निर्माण करण्याचे व विस्तारण्याचे काम विवाह संस्था करीत असते. पत्नी सौ. अदिती सोबतची सहजीवनाची रौप्य महोत्सवी वाटचाल समृद्ध करणारी व आनंददायी आहे. त्या निमित्ताने...

भारतीय संस्कृतीतील वेदांमध्ये मानवी जीवन चार आश्रमात मांडले आहे. आश्रम व्यवस्थेत मानवाच्या कर्माची जाणीव करून दिलेली असून ऋणमुक्तीची ती व्यवस्था आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ आणि देवऋण, ऋषिऋण व पितृऋण ही त्रिविध ऋणे यांचे आश्रमव्यवस्थेस अधिष्ठान आहे.  त्यातील गृहस्थाश्रम ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मानला जातो. जो माणूस मोक्ष आणि संसारातील सुखाची अभिलाषा करतो त्यानेच या आश्रमात प्रवेश करावा असेही म्हटले जाते. गृहस्थाश्रम हि एक तपश्चर्या मानली जाते. जीवनातील दुःख, हानी, पराजय, अपमान इ. सामोरे जाण्याने माणसाच्या तपश्चर्येची प्रचिती येते. गृहस्थाश्रमामुळेच नातेसंबंध निर्माण होत असतात. आई-वडील, आजी-आजोबा, सासू - सासरे यामुळे हि सर्व नाती मानवाला प्राप्त होत असतात. मानवी जीवनातील उत्तम व्यवहारांची प्राप्ती येथे होते. नैतिकतेचे प्रशिक्षण केंद्र म्हणजे गृहस्थाश्रम म्हणता येईल. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार यासारख्या मानवी विकारांची परीक्षा या आश्रमात होत असते. या आश्रमात वात्सल्याची पूर्ती होत असते. माता-पिता आपल्या मुलांप्रती प्रेम भावना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मानवाला शारीरिकतेकडून आत्मिकतेकडे नेणारा हा आश्रम आहे. हि पूर्वपीठिका समजून घेतली तर आपल्याकडील विवाह संस्था, तिची उद्दिष्ट्ये सफल होतील असे मला वाटते. असो. आमच्या विवाहाच्या रौप्य महोत्सवीपूर्तीच्या निमित्ताने मला आपल्याला काही सांगायचे आहे. खास करून जे उपवर-वधू आहेत किंवा ज्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला असून खऱ्या अर्थाने संसाराला लागले आहेत त्यांनाही...

१९९२-९६ कालखंडात धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयातील नोकरी सोडून जळगाव जनता बँकेच्या आर्थिक स्थिरतेच्या नोकरीला लागलो होतो. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची क्षमता प्राप्त झाल्यावर कुटुंबीयांनी विवाह करण्याचे ठरविले. श्री. अनिल व सौ. अंजली तारे यांच्या मध्यस्थीने अहमदनगर येथील श्री रंगनाथ कुलकर्णी यांची कन्या कु. संगीता हिचे स्थळ आले. हे चौथे स्थळ होते. पूर्वीच्या दोन ठिकाणांना माझी नापसंती होती तर एका ठिकाणी नकार मिळाला होता. श्री. तारे यांचेकडे आई-वडील व काका-काकूंसह मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत असल्याचा निरोप लगेच दुसऱ्या दिवशी दिला. त्यांनीही पसंती कळविली. नगरच्या परतीच्या प्रवासात धुळे मार्गे जाऊन मोठे बंधू व वहिनींनी मुलगी पाहिली. नगरला दोन वाहने नातेवाईक घेऊन साखरपुडा झाला. तशी विवाहाची फारशी बोलणी नव्हती कारण हुंडा वा सोने-नाणे याबाबत कुठलीही अपेक्षा नव्हती. दि. ३१ मे विवाहाची तारीख ठरली. कपडा खरेदी वस्त्रांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नगरलाच झाली. त्यावेळी प्रथम मुलीचे घर पाहिले. माळी वाड्यात स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ एका वाड्यात एक खोली होती. मुलीला एक भाऊ व एक बहीण. आईला पक्षाघाताचा झटका येऊन गेलेला. 

कापड खरेदी नंतर एका आईस्क्रीमच्या दुकानात लस्सी घेतली आणि तेथून निघतांना होणाऱ्या बायकोचा हात प्रथम हातात घेतला. मनात भीती होतीच. दोन-चार वाक्यांपलीकडे फार काही बोलणे झाले नाही मात्र नजरेने खूप काही समजले होते. लग्न नेहमीप्रमाणे एका सामान्य कुटुंबातील विवाहासारखे झाले. कुठे तरी रुसवे-फुगवेही... कुलस्वामिनी कृपेने व थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने, सर्व नातेवाईक व मित्र परिवाराच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला. दोन्ही कुटुंबातील पहिलाच विवाह असल्याने नातेवाईकांची चांगली उपस्थिती होती. विवाहाच्या वेळेस माझ्या आई-वडिलांनी पूर्व अनुभवानुसार त्यांच्या शिस्तीत विवाहाची संपूर्ण आखणी केली होती. आमची बाजू सांभाळून घेण्यासाठी स्व. मोरु काळे व स्व. अंजूवहिनी (माझा मावसभाऊ व त्याची पत्नी) आवर्जून खास अकोल्याहून आले होते. लग्नातील संपूर्ण चार्म त्यांनी टिकवून ठेवला होता. श्री. सुनीलराव गोरकर (सौ.च्या आत्येबहीणींचे यजमान) यांनी मुलीकडच्या विवाहाची धुरा सांभाळली होती. त्यांच्याच घराजवळील एका घरात साखरपुडा झाला होता. सौ. क्षमा कुलकर्णी (सौं.च्या काकू) यांनी महिला आघाडी सांभाळली होती. सीमंती पूजन, वरात सर्व सोपस्कार आटोपून मंगलाष्टक सुरु झाले. "कुर्यात सदा मंगलम !" म्हणत माळ जेव्हा घातली तेव्हा आयुष्यात प्रथमच वेगळी जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. त्यानंतरचे सर्व विधी आटोपून धुळ्याचा परतीचा प्रवास सुरु झाला. 

दुसऱ्या दिवशी गावातल्या मंडळींसाठी धुळ्यातील सुप्रसिद्ध अशा नवग्रही मंगल कार्यालयात स्वागत समारंभ झाला. आयुष्य घडविणारी अनेक मंडळी याप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी आले होते. केमिस्ट्री विषयाचे स्व. प्रा. पी. डी. खैरनार यांनी "तुला हिरा मिळाला आहे" असे बायकोला सांगितले. त्यांचे शब्द आजही जसेच्या तसे कानात घुमतात. ऋतुशांती व अन्य विधी यथासांग पार पडले. मांडव परतणीसाठी एक दिवस नगरला जाऊन आलो. समवयस्क तीन मित्रांचे पंचमढी, जबलपूर, भेडाघाट असे फिरणे (हनिमून) झाले. विवाहासाठी एक महिन्याची सुट्टी काढली होती. तीन आठवड्यानंतरच कामावर हजर झालो. काही दिवस धुळ्यात राहिल्यावर आमचा संसार जळगावच्या इंडिया गॅरेज जवळील नांदेडकर वाड्याच्या दोन खोल्यांमध्ये सुरु झाला. प्रेम, रोमांच व कधी तरी जबाबदारी पार पडू शकू किंवा नाही या दृष्टीने भीतीही वाटत असे. फार वाद-विवाद किंवा भांडणे झालेली फारशी आठवत नाही. आजूबाजूच्या माताभगिनी व गावातील नातेवाईकांमुळे नेहमीच आधार वाटत असे. गाडी व्यवस्थित सुरु होती. संतती निर्मितीच्या अनुषंगाने प्लॅनिंग वगैरे अशी काही भानगड नव्हती. आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत संसारातील जबाबदारी पूर्ण व्हावी या त्यामागील उद्देश होता. (आज तो बहुतांशपणे पूर्णत्वास जातांना दिसत आहे) 

एक वर्षाच्या आत म्हणजे ११ एप्रिल ९८ (हनुमान जयंतीच्या दिवशी) प्रथमेशचा जन्म झाला. एक आनंदाची लहर या संपूर्ण काळात अनुभवत होतो. दुर्दैवाने १४ ऑगस्ट ९८ ला वडील गमावले आणि मुलांनी आपले आजोबा ! जीवनातील एका अवघड प्रसंगातून संपूर्ण कुटुंब जात होते. अर्थात श्री. विजय कुळकर्णी (काका) यानंतरच्या संपूर्ण कालखंडात व आजही सोबत आहेत याचा आनंद व अभिमान आहे. साधारण ५ वर्षानंतर १३ फेब्रुवारी २००३ रोजी मृण्मयीचा जन्म झाला आणि कुटुंबाचा चौकोन पूर्ण झाला. तिचा जन्म ति. आईसह सर्वांसाठी एक शुभशकुन ठरला. आज प्रथमेश त्याचे शिक्षण पूर्ण करुन नोकरीला लागला आहे, मृण्मयी तिच्या आवडीच्या क्षेत्रात (कथक नृत्य) शिक्षण घेत आहे. अनेक चढ-उत्तर, सुख-दुःखाचे प्रसंग जीवनात आले. सौ. आदितीची संपूर्ण साथ असते. माझ्यासारख्या एका वेगळ्या धाटणीतल्या (भावनिक, वाहवत जाणारा, भौतिक गोष्टींची फारशी अभिलाषा नसलेला, अल्पसंतुष्ट, आपल्या मस्तीत जगणारा, कुटुंब, व्यवसाय व सामाजिक काम यात कुठेही मेळ नसणारा, अव्यवहारी ) माणसाशी जुळवून घेत असतांना अनेकदा तिची कुचंबणा होते अर्थात ति माझीही होतेच. महिलांच्या वर्तनातून , बोलण्यातून त्याची जाणीव होते पुरुष ते खुलेपणाने दाखवीत नाही एव्हढेच... आमच्या सहजीवनातील माझ्या भूमिकेला गुण द्यायचे ठरल्यास १०० पैकी ७० तर सौ. आदितीच्या भूमिकेला १०० पैकी ७० गुण देईल ! हे अशा प्रकारचे मूल्यांकन कशासाठी याचे उत्तर जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा....

Sunday 8 May 2022

मातृदिन !

दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत पिठोरी अमावस्या अर्थात पोळा हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. उत्सवप्रिय समाजाला नेहमीच काही ना काही निमित्त पाहिजे असतं. त्यानिमित्ताने एकत्र येणं, कृतज्ञता व्यक्त करणं, सौहार्द वृद्धिंगत होणं, समाज माध्यमातून लेख वा कविता रूपाने आपल्या भावना व्यक्त करणे यासारख्या सकारात्मक गोष्टी नक्कीच घडतात. असो...

"निर्मिती"ची दैवी देणगी प्राप्त असलेली भूतलावरील एकमेव व्यक्ती जिला आपण आई, माय, माता, जननी, जन्मदात्री, माऊली, मातोश्री, मा, माडी (ग्रामीण भागात)  म्हणतो. अलीकडे मॉम आणि मम्मी म्हणायचे एक फॅड निघाले आहे. जन्म देणाऱ्या माते सोबतच आपण कुलस्वामिनीलाही आई म्हणतो, ज्या भागात आपण जन्माला आलो त्या भूमीलाही मातृभूमी वा भूमाता म्हणतो. ज्या देशात जन्माला आलो त्या देशाला भारत माता किंवा मा भारती म्हणतो. आजच्या या लेखाद्वारे समाजातील मातेच्या महतीची जाणीव समृद्ध करु या ! 

सध्या अनुभूती शाळेच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे, सुदैवाने "आई"ला समजून घेण्याची ती एक संधी आहे. समाजातील उपेक्षित, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे चांगले  शिक्षण मिळावे या हेतूने श्रद्धेय मोठ्या भाऊंच्या अर्थात पद्मश्री भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून हि शाळा सुरु करण्यात आली आहे. मागील आठवड्यात सुमारे १६० विद्यार्थ्यांच्या माता-पित्यांशी बोलण्याची संधी मिळाली आणि आजच्या मातृदिनाच्या निमित्ताने त्यातील एकल मातांबद्दल (Single Mother) काही...

मुलाखती घेतलेल्या बालकांमधील सुमारे १० टक्के माता एकल माता होत्या. विधवा, घटस्फोटित वा विभक्त राहणाऱ्या या माता ! हृदय पिळवटणारी व डोळ्यात सहज आसवे आणणारी प्रत्येकीची कहाणी... मात्र आपल्या लेकराला घेऊन जगण्याची दुर्दम्य अशी इच्छाशक्ती... नियती इतकी क्रूर असली आणि भोग मरणयातना देणारे असले तरी या मातांमध्ये जगण्याचे बळ कुठून येत असेल असा प्रश्न पडतो. समाजात स्त्रीच्या मनात पुरुषांबद्दल तिटकारा, किळस वा घृणा उत्पन्न होईल अशी माणसे आहेत हे वास्तव दुर्दैवाने स्वीकारावे लागेल आणि त्यावर मोठे काम करण्याची आवश्यकता वाटते. या माऊलींना त्यांचे बांधव म्हणून समज कशी काढावी हा सर्वात मोठा प्रश्न पडतो. 

अगोदर झालेले लग्न लपवून दुसरे लग्न करून अपत्य झाल्यावर सोडून देणारे महाभाग आणि माहेरी वडील, भाऊ यांचे व्यसन व नेहमी मिळणारे शिव्याशाप खात लेकरासाठी जगणारी  माता, केवळ मुलगी झाली म्हणून तिचं तोंडही न पाहणारा बाप व त्यामुळे पत्नीला घरी न घेऊन जाणारा पती माणूस म्हणण्याच्या योग्यतेचा आहे का ? दुर्धर आजाराने मृत्यू झालेल्या वा आत्महत्या केलेल्या पतीच्या पश्चात दोन-दोन लेकरांना सांभाळणारी माता यांना समाज स्वीकारणार कि नाही ? समाजातील अशी नकारात्मक उदाहरणे आमच्यातील माणुसकीला आव्हान देणार कि नाही ?

मुलाचा जन्म आणि पतीचा मृत्यू एकाच दिवशी पाहणारी माता दुर्दैवी म्हणता येईल मात्र तिच्या सासरच्या मंडळींनी स्वीकारुन उभं करण्यासाठी दिलेले पाठबळ दुर्लक्षून चालणार नाही. तीन मुली आणि एक मुलगा असलेल्या मातेला सोडून देणारे महाभाग आणि त्यांच्याबद्दल अजिबात दुःख व्यक्त न करता मुलांसाठी जगण्याचं बळ हसत हसत एकवटणारी माता व तिच्या माहेरची मंडळी यांना वंदन करण्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नाही. यासारखी दुर्मिळ उदाहरणे हीच खरी समाजाची आशा आहे.

"आई" हे खरोखर एक अजब रसायन आहे. "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी !" असे उगाच म्हटलेले नाही. भौतिकतेच्या आजच्या युगात आईला समजून घेणं, तिच्यामुळे हे जग पाहायला मिळालं याबद्दलची कृतज्ञ जाणं असणं, तिला तिचा सन्मान देणं, प्रत्यक्ष जन्माला येण्यापूर्वी पासून तिने आनंदाने सोसलेला त्रास, नऊ महिने पोटात घेऊन दिलेली सुदृढता, जन्माच्या वेळी लागलेल्या कळा या सर्वांची परतफेड कशी करणार याचा विचार करण्याची संधी मातृदिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने घेतली पाहिजे असे वाटते. शेवटी नैतिकता, संवेदनशीलतेचा परिपाठ देणारी व वात्सल्यमूर्ती असलेली माझी आई श्रीमती सुनंदा विष्णू कुळकर्णी हिने आज मातृदिनानिमित्ताने तिच्या आईसाठी लिहिलेली कविता...

आईची आठवण

आई, तूं जग सोडून गेलीस,

तेव्हा मी लहान होते 

मोठेपणाचं ओझं पेलत,

समजुतीने वागत होते || || 

खुप आठवण यायची तुझी, 

पण काहीच सुचत नव्हतं

मृत्युनंतर माणूस दिसत नाही, 

एवढं मात्र कळत होतं || ||

तूं पुन्हा दिसणार नाहीस, 

मन तयार नव्हतं मानायला

भिरभिरणारी नजर माझी, 

आसुसलेली तुला पहायला || ||

धडे मिळाले तुझ्याकडून, 

समाजात कसं वागायचं

तुझ्या वागण्यातुन समजलं, 

समर्थपणे कसं जगायचं || ||

तूच जवळ नव्हतीस, 

जेव्हा जगायला सुरुवात झाली

पाठीशीच आहेस समजुन, 

जगण्यासाठी हिंमत आली || ||

सुखाचा गुणाकारदु:खाचा भागाकार 

करता करता पुर्ण  जगुन झालं

कर्तव्याची बेरीज आणि स्वतःच वजा 

होत खुप काही अनुभवाला आलं || ||

तुझे आकाश पेलता, पेलता 

माझीही उलटली सत्तरी

एकच प्रार्थना प्रभुचरणाशी

(पुनर्जन्म असलाच तर)

पुढचा जन्म तुझ्याच उदरी || ||

आई, आई... तुला असंख्य नमस्कार !

Monday 2 May 2022

खान्देशाची आखाजी : एक समृद्ध परंपरा !

भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांची परंपरा आहे. या सर्व सण-उत्सवांचे महत्व हे मानवी संबंध दृढ करणारे असून त्यामागे कुटुंब व्यवस्था बळकट करणे हा मुख्य उद्देश आहे. हे सण केवळ उत्सव नव्हे तर त्यात जीवन समृद्ध करणाऱ्या प्रत्येकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची धारणा आहे. समाजातील प्रत्येक घटकाची हे सण उत्सव गाव, भाषा, प्रांतानुसार साजरे करण्याची आगळीवेगळी परंपरा आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही या गोष्टींचे महत्व अबाधित आहे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. हळव्या व संवेदनशील मनाच्या मातृशक्तीसाठी मानसिक व भावनिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा अक्षय्य तृतीया अर्थात खान्देशातील आखाजी या सणाबद्दल जाणून घेऊ या ! 

आखाजीचा आखाजीचा 
मोलाचा सन देखा जी 
निंबावरी निंबावरी
बांधला छान झोका जी ।

खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या या गीतांमधून खान्देशातील आखाजी या सणाची महती सहजपणाने मांडली आहे. खान्देशची बोली, सण, उत्सव, चालीरीती या बाबी आपले स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्टय़ जपून आहे असे आपल्या या सणावरून नक्कीच लक्षात येईल. वैशाख शु. तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. अंगाची काहिली व जीवाची लाही लाही होत असणाऱ्या या कालखंडात हा सण स्त्रिया मोठ्या उत्साहानं साजरा करतात. खान्देशात हा सण आखाजी या नावाने विशेषत्वाने साजरा केला जातो. सासरी गेलेल्या स्त्रीया या सणाच्या निमित्ताने आपल्या माहेराला येत असतात. माहेरवाशिणीचं गाव शिवारातील प्रत्येक कुटुंबाला विशेष कौतुक असतं. पारिवारिक संबंधातील नातेवाईकांसह तिच्या शालेय जीवनातील सख्या यानिमित्ताने भेटत असतात. मानवाला आपल्या भूतकाळातील जीवनाबद्दल कायम ओढ असते. भूतकाळातील जीवन समृद्ध करणाऱ्या आठवणींमध्ये रमायला त्याला आवडते. जीवनाची आशा कायम जिवंत ठेवणाऱ्या या आठवणी असतात. बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे या सणाच्या निमित्ताने शेतात वा शिवारातील निंबाच्या झाडाला झोके बांधलेले असतात. स्त्रीच्या भावनिक आंदोलनाचे प्रतीक असलेल्या झोक्याच्या माध्यमातून बहिणाबाईंनी हा सण कसा साजरा केला जातो याचे चित्र उभे केले आहे. 
खान्देशातील ग्रामीण भागात साजरा केला जाणारा हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून समजला जातो. दूर देशी गेलेल्या मुलं-मुली आपल्या संपूर्ण परिवारासह आवर्जून या दिवशी गावाकडे येत असतात. बहुतांश वेळेस मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागलेली असल्याने सर्वच जण या सणाची मजा लुटण्यासाठी आलेले असतात. शहरी व ग्रामीण भागाची नाळ कायम जुळवून ठेवण्याची ताकद या सणांमध्ये आपल्याला दिसते. तसेच आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी "आगारी" (घास) टाकण्याची प्रथा आहे. या सणाच्या दिवशी शंकर व गौराईचे पूजन केले जाते. साधारणपणे मराठी कुटुंबामध्ये चैत्र गौरीची एक वेगळी परंपरा आहे. सुवासिनींचा असलेला हा सण आहे. ग्रामीण भागात अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने या गौरीची मांडणी केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी कोणतेही शुभ कार्य सुरु करता येते. त्याला स्वतंत्र मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. अशा या पवित्र दिवशी केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, देवांच्या आणि पितरांच्या नावाने केलेले कोणतेही कर्म अक्षय किंवा अविनाशी होते, असे मानले जाते.

आखाजीला खान्देशात घरोघरी घागर भरली जाते. एका मोठ्या माठात (केशरी रंगाची घागर) पाणी भरून त्यावर छोटेसं मातीचे (लोटा) भांडं ठेवले जाते. त्यावर खरबुज, सांजोऱ्या, दोन आंबे ठेवतात. सण झाल्यानंतर नवीन माठ घरामध्ये वापरला जातो. पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी केला जातो. पुर्वजांचं स्मरण करुन एकेकाचे नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी त्यांना घास टाकला जातो याला आगारी टाकणे असेही म्हटले जाते. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई याचा नैवेद्य दाखविला जातो तसेच पित्तर म्हणून एका व्यक्तीला जेवणासाठी आमंत्रित केले जाते त्यांच्या जेवणानंतर घरातील सर्वं लोग जेवण करतात. पितरांना आखाजीच्या दिवशी आमरसाचा नैवेद्य दिल्यानंतरच बऱ्याच परिवारामध्ये आंबे खायला सुरूवात करतात आजही अशी अनेक परिवारांमध्ये ही पद्धत सुरू आहे.  

रब्बी पिकाचा हंगाम शेतकऱ्यांच्या घरात आलेला असतो. खरिपाच्या पेरणीच्या दृष्टीने शेतं तयार करण्याची लगबग लगेचच सुरु होणार असल्याने त्याची पूर्व तयारी करण्याचा हा दिवस असतो. शेत जमीनाचा पोत चांगला रहावा म्हणून नांगरणी केलेली असते कारण उन्हामुळे जमिन चांगलीच भाजलेली असते त्यातील काडी कचरा वेचून जाळला जातो, शेतांची बांध-बंदिस्ती केली जाते. थोडक्यात शेतीची मशागतीची कामे लवकरच सुरु होणार असतात. वर्षभर घरच्या दूध-दुभत्यांसह, जनावरे व शेती कामांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सालदारांचा हिशोब या दिवशी केला जातो व नवीन वर्षासाठीच्या आगाऊ सालदाराची निश्चितीही याच दिवशी केली जाते. त्याला नवीन कपडे दिले जातात. नवीन वर्षासाठी काही आगाऊ रक्कमही दिली जाते. एक प्रकारे शेतमजुरांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणता येईल. सालदाराने आपल्या पूर्वीच्या मालकाकडे काम सुरु ठेवायचे का अन्य कोणाकडे जायचे याचे स्वातंत्र्य त्याला असते. त्यांचा वर्षभर द्यावयाचा मेहनतांना अन्य गोष्टी या दिवशीच ठरविल्या जातात. रोख रकमेसह शेतीतून येणाऱ्या शेतमालाचा काही वाटा त्याला देण्याचे यात निश्चित होत असते.या दिवशी शेतीची कामे बंद असली तरी आगामी काळातील शेती कामाच्या नियोजनाची तयारी सुरु असते. अलीकडच्या काळात खेड्यांमध्ये पत्ते व जुगार खेळण्याचे प्रमाणही वाढलेले आपल्याला दिसते. 

सण म्हटल्यानंतर खानपानाची एक विशेष रेलचेल आपल्याला अनुभवास येते. आखाजीच्या सणाच्या निमित्ताने माहेरवाशीण व पै-पाहुणे घरी येणार असल्याने दिवाळीप्रमाणेच फराळाचे पदार्थ बनविले जातात. त्यामुळे काही ठिकाणी आखाजीला खान्देशातील दिवाळी असेही म्हटले जाते. खापरावरची पुरणपोळी, सांजोरी, करंजी, आंब्याचा रस, कुरडया, पापड यांचा विशेष बेत केला जातो. सहभोजनाचा व ग्रामीण पद्धतीने घरातीलच महिला वर्गाने बनविलेल्या या पदार्थांची चव खासच असते. 

झाडाला बांधलेल्या झोक्यांसह विविध पारंपरिक खेळ आणि गाण्यांच्या माध्यमातून माहेरवाशिणी आपलं मन रिझवत असतात. प्रत्येक विवाहित स्त्री या दिवशी सणानिमित्ताने माहेरी आलेली असल्याने ती झोके खेळायला, गाणी गायला, झिम्मा-फुगडी खेळायला पूर्ण मुक्त असतात. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरु असतो. खान्देशी लहेजामध्ये विशेष गाणी गायली जातात. त्यांना विशेष असा गोडवा असतो. त्या नरम विनोद असतो, मार्मिक टिपण्णी असते. सासरचे सुखदुःख, आलेले अनुभव व पारंपारीक गाण्यांचा यात समावेश असतो. अलीकडच्या काळात या सणातील काही अनिष्ट रूढी व परंपरा बंद झालेल्या आपण पाहू शकतो. विशेषतः गौराई विसर्जनासाठी आलेल्या माता भगिनी नदीच्या पलीकडच्या तीरावरील महिलांना दगड मारतात किंवा शिव्या देतात या गोष्टी आता फारशा कुठे दिसत नाहीत. शिक्षण, यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण, संगणक, दूरदर्शन, मोबाइल यामुळे मानवी जीवन पार बदलून गेले आहे. त्यात बाराही महिने खाण्याचे सर्व पदार्थ रेडिमेड मिळत असल्याने या सर्व पदार्थांचे आकर्षण आता कमी होऊ लागले आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला आखाजी या सणात दिसून येतो मात्र अजूनही काही घरांमध्ये (विशेषत: खेडे गावात) हि परंपरा अखंडित सुरु आहे हे महत्त्वाचेच !

आनंद व उत्साहाचा हा सण झाल्यानंतर माहेरवाशिणींना सासरी जावे लागते. त्यावेळी त्यांच्या मनाची घालमेल होत असते. मात्र पुढच्या वर्षीच्या आखाजीची आताशा (प्रतिक्षा) बाळगून ती जड अंतःकरणाने सासरी जायला निघते. कवयित्री बहिणाबाई हा प्रसंग आपल्या कवितेतून फार सुंदर पद्धतीने मांडतात. 

चार दिस चार दिस
इसावल्या घरात जी
आहे पुढे आहे पुढे
शेतीची मशागत जी ।
सण सरे आस उरे
आखजी गेली व्हय जी
सांग सई सांग सई
आखजी आता कही जी?

सर्व वाचकांना आखाजीच्या (अक्षय्य तृतीये) मनापासून शुभेच्छा !

गिरीश कुळकर्णी, जळगाव 
९८२३३३४०८४