Tuesday 31 May 2022
सहजीवनाची रौप्य महोत्सवी वाटचाल (भाग २)
Monday 30 May 2022
सहजीवनाची रौप्य महोत्सवी वाटचाल ! (भाग १)
सहजीवनाची सुरुवात ३१ मे १९९७ |
आज जगात भारतीय संस्कृती महान समजली जाते याचे एकमेव कारण म्हणजे कुटुंब व्यवस्था ! हि कुटुंब व्यवस्था निर्माण करण्याचे व विस्तारण्याचे काम विवाह संस्था करीत असते. पत्नी सौ. अदिती सोबतची सहजीवनाची रौप्य महोत्सवी वाटचाल समृद्ध करणारी व आनंददायी आहे. त्या निमित्ताने...
१९९२-९६ कालखंडात धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयातील नोकरी सोडून जळगाव जनता बँकेच्या आर्थिक स्थिरतेच्या नोकरीला लागलो होतो. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची क्षमता प्राप्त झाल्यावर कुटुंबीयांनी विवाह करण्याचे ठरविले. श्री. अनिल व सौ. अंजली तारे यांच्या मध्यस्थीने अहमदनगर येथील श्री रंगनाथ कुलकर्णी यांची कन्या कु. संगीता हिचे स्थळ आले. हे चौथे स्थळ होते. पूर्वीच्या दोन ठिकाणांना माझी नापसंती होती तर एका ठिकाणी नकार मिळाला होता. श्री. तारे यांचेकडे आई-वडील व काका-काकूंसह मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत असल्याचा निरोप लगेच दुसऱ्या दिवशी दिला. त्यांनीही पसंती कळविली. नगरच्या परतीच्या प्रवासात धुळे मार्गे जाऊन मोठे बंधू व वहिनींनी मुलगी पाहिली. नगरला दोन वाहने नातेवाईक घेऊन साखरपुडा झाला. तशी विवाहाची फारशी बोलणी नव्हती कारण हुंडा वा सोने-नाणे याबाबत कुठलीही अपेक्षा नव्हती. दि. ३१ मे विवाहाची तारीख ठरली. कपडा खरेदी वस्त्रांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नगरलाच झाली. त्यावेळी प्रथम मुलीचे घर पाहिले. माळी वाड्यात स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ एका वाड्यात एक खोली होती. मुलीला एक भाऊ व एक बहीण. आईला पक्षाघाताचा झटका येऊन गेलेला.
दुसऱ्या दिवशी गावातल्या मंडळींसाठी धुळ्यातील सुप्रसिद्ध अशा नवग्रही मंगल कार्यालयात स्वागत समारंभ झाला. आयुष्य घडविणारी अनेक मंडळी याप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी आले होते. केमिस्ट्री विषयाचे स्व. प्रा. पी. डी. खैरनार यांनी "तुला हिरा मिळाला आहे" असे बायकोला सांगितले. त्यांचे शब्द आजही जसेच्या तसे कानात घुमतात. ऋतुशांती व अन्य विधी यथासांग पार पडले. मांडव परतणीसाठी एक दिवस नगरला जाऊन आलो. समवयस्क तीन मित्रांचे पंचमढी, जबलपूर, भेडाघाट असे फिरणे (हनिमून) झाले. विवाहासाठी एक महिन्याची सुट्टी काढली होती. तीन आठवड्यानंतरच कामावर हजर झालो. काही दिवस धुळ्यात राहिल्यावर आमचा संसार जळगावच्या इंडिया गॅरेज जवळील नांदेडकर वाड्याच्या दोन खोल्यांमध्ये सुरु झाला. प्रेम, रोमांच व कधी तरी जबाबदारी पार पडू शकू किंवा नाही या दृष्टीने भीतीही वाटत असे. फार वाद-विवाद किंवा भांडणे झालेली फारशी आठवत नाही. आजूबाजूच्या माताभगिनी व गावातील नातेवाईकांमुळे नेहमीच आधार वाटत असे. गाडी व्यवस्थित सुरु होती. संतती निर्मितीच्या अनुषंगाने प्लॅनिंग वगैरे अशी काही भानगड नव्हती. आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत संसारातील जबाबदारी पूर्ण व्हावी या त्यामागील उद्देश होता. (आज तो बहुतांशपणे पूर्णत्वास जातांना दिसत आहे)
Sunday 8 May 2022
मातृदिन !
"निर्मिती"ची दैवी देणगी प्राप्त असलेली भूतलावरील एकमेव व्यक्ती जिला आपण आई, माय, माता, जननी, जन्मदात्री, माऊली, मातोश्री, मा, माडी (ग्रामीण भागात) म्हणतो. अलीकडे मॉम आणि मम्मी म्हणायचे एक फॅड निघाले आहे. जन्म देणाऱ्या माते सोबतच आपण कुलस्वामिनीलाही आई म्हणतो, ज्या भागात आपण जन्माला आलो त्या भूमीलाही मातृभूमी वा भूमाता म्हणतो. ज्या देशात जन्माला आलो त्या देशाला भारत माता किंवा मा भारती म्हणतो. आजच्या या लेखाद्वारे समाजातील मातेच्या महतीची जाणीव समृद्ध करु या !
सध्या अनुभूती शाळेच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे, सुदैवाने "आई"ला समजून घेण्याची ती एक संधी आहे. समाजातील उपेक्षित, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे चांगले शिक्षण मिळावे या हेतूने श्रद्धेय मोठ्या भाऊंच्या अर्थात पद्मश्री भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून हि शाळा सुरु करण्यात आली आहे. मागील आठवड्यात सुमारे १६० विद्यार्थ्यांच्या माता-पित्यांशी बोलण्याची संधी मिळाली आणि आजच्या मातृदिनाच्या निमित्ताने त्यातील एकल मातांबद्दल (Single Mother) काही...
मुलाखती घेतलेल्या बालकांमधील सुमारे १० टक्के माता एकल माता होत्या. विधवा, घटस्फोटित वा विभक्त राहणाऱ्या या माता ! हृदय पिळवटणारी व डोळ्यात सहज आसवे आणणारी प्रत्येकीची कहाणी... मात्र आपल्या लेकराला घेऊन जगण्याची दुर्दम्य अशी इच्छाशक्ती... नियती इतकी क्रूर असली आणि भोग मरणयातना देणारे असले तरी या मातांमध्ये जगण्याचे बळ कुठून येत असेल असा प्रश्न पडतो. समाजात स्त्रीच्या मनात पुरुषांबद्दल तिटकारा, किळस वा घृणा उत्पन्न होईल अशी माणसे आहेत हे वास्तव दुर्दैवाने स्वीकारावे लागेल आणि त्यावर मोठे काम करण्याची आवश्यकता वाटते. या माऊलींना त्यांचे बांधव म्हणून समज कशी काढावी हा सर्वात मोठा प्रश्न पडतो.
मुलाचा जन्म आणि पतीचा मृत्यू एकाच दिवशी पाहणारी माता दुर्दैवी म्हणता येईल मात्र तिच्या सासरच्या मंडळींनी स्वीकारुन उभं करण्यासाठी दिलेले पाठबळ दुर्लक्षून चालणार नाही. तीन मुली आणि एक मुलगा असलेल्या मातेला सोडून देणारे महाभाग आणि त्यांच्याबद्दल अजिबात दुःख व्यक्त न करता मुलांसाठी जगण्याचं बळ हसत हसत एकवटणारी माता व तिच्या माहेरची मंडळी यांना वंदन करण्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नाही. यासारखी दुर्मिळ उदाहरणे हीच खरी समाजाची आशा आहे.
आईची आठवण
आई, तूं जग सोडून गेलीस,
तेव्हा मी लहान होते
मोठेपणाचं ओझं पेलत,
समजुतीने वागत होते || १ ||
खुप आठवण यायची तुझी,
पण काहीच सुचत नव्हतं
मृत्युनंतर माणूस दिसत नाही,
एवढं मात्र कळत होतं || २ ||
तूं पुन्हा दिसणार नाहीस,
मन तयार नव्हतं मानायला
भिरभिरणारी नजर माझी,
आसुसलेली तुला पहायला || ३ ||
धडे मिळाले तुझ्याकडून,
समाजात कसं वागायचं
तुझ्या वागण्यातुन समजलं,
समर्थपणे कसं जगायचं || ४ ||
तूच जवळ नव्हतीस,
जेव्हा जगायला सुरुवात झाली
पाठीशीच आहेस समजुन,
जगण्यासाठी हिंमत आली || ५ ||
सुखाचा गुणाकार, दु:खाचा भागाकार
करता करता पुर्ण जगुन झालं
कर्तव्याची बेरीज आणि स्वतःच वजा
होत खुप काही अनुभवाला आलं || ६ ||
तुझे आकाश पेलता, पेलता
माझीही उलटली सत्तरी
एकच प्रार्थना प्रभुचरणाशी,
(पुनर्जन्म असलाच तर)
पुढचा जन्म तुझ्याच
उदरी || ७ ||
आई, आई... तुला असंख्य नमस्कार !
Monday 2 May 2022
खान्देशाची आखाजी : एक समृद्ध परंपरा !
इसावल्या घरात जी
आहे पुढे आहे पुढे
शेतीची मशागत जी ।
सण सरे आस उरे
आखजी गेली व्हय जी
सांग सई सांग सई
आखजी आता कही जी?
९८२३३३४०८४