Thursday 11 May 2023

"ती" आणि एका लग्नाची पुढची गोष्ट !

पुणे येथील सोहन वाचन कट्टाने मध्यंतरी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका वाचन कट्ट्याचे आयोजन केले होते. अर्थात महिलांच्या जीवनात आलेल्या "ती" चे महत्व वाचन कट्ट्यात अपेक्षित होते. आपल्या जीवनातील तिचे स्थान, तिचे महत्व सांगावयाचे वा त्याबद्दल वाचवायचे होते. जीवनावर प्रभाव पडणारी "ती" कोण हे ज्याने त्याने ठरवायचे होते. माझी पत्नी सौ. आदितीने या वाचन कट्ट्यात तिच्या आयुष्यातील "ती"चे वाचन केले. तिच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या "ती" बद्दल तिनेच लिहिले होते. अर्थात "ती" कोणी व्यक्ती नसून ती होती स्त्री जीवनातील "मासिक पाळी" ! वयाच्या चाळिशीनंतर "ती" हळूहळू त्यांच्या जीवनातून संपते, बाहेर पडते, जाते. मला हे समाजापर्यंत पोहोचवायचे होते मात्र त्यासाठी वेळ शोधात होतो. आज ते लिहिण्यामागचे कारण म्हणजे प्रशांत दामले यांचे एका लग्नाची पुढची गोष्ट ! हे नाटक. हे नाटकही "ती" वरच आधारित आहे त्याबद्दल पुढे लिहिले आहे. मात्र प्रथम सौ. आदितीने जे लिहिले/वाचले ते देत आहे. आपण ते वाचा, समजून घ्या... आपला अभिप्राय आपण सौ. आदितीस तिच्या ७५८८४०६१९५ या मोबाईलवर देऊ शकता.... 

सोहन वाचन कट्टा ( मंगळवार १४ - ३ -२०२३) विषय - माझ्या आयुष्यातील "ती"


माझी "ती" मैत्रिण माझ्या आयुष्यात अगदी अचानक आली आणि सायकल रेग्युलर सुरू झाली. तो काळ बदलाचा होता. आधीच्या पिढीतील सगळ्या बाजुला बसत असत, आम्हाला मात्र अपवादात्मक परिस्थितीत तो अनुभव आला. पण मोठ्या सगळ्याच बाजुला बसत असल्याने फार ऑकवर्ड झाले नाही. दर महिन्याला मग तारीख बघायची, तेव्हा काही सणवार असले की फार वैताग यायचा. आतासारखे या विषयावर कोणीच मोकळेपणाने बोलत नसत. घरातील भावाशी सुध्दा नाही. पण सासरी  मोकळे वातावरण होते. दोन्ही मुलांच्या वेळेस ९ - ९ महिने तिने ब्रेकअप केलं. पण आता आतापर्यंत "ती"ने खुप छान साथ दिली. सुरूवातीला "ती"च्याशी जुळवून घेण्याचा त्रास सोडला तर नंतरचे "ती"च्याबरोबरचे संबंध खुपच सलोख्याचे होते. दर महिन्याला रेग्युलर असल्याने कोणताही कार्यक्रम, समारंभ, ट्रीप सगळे "ती"ला विचारात घेऊनच करावे/आखावे लागत, इतकं "ती"च महत्त्व अनन्यसाधारण झालं. पण एकदाही "ती"ला मागेपुढे करण्यासाठी औषधं घेतली नाही, इतकी रेग्युलर होती "ती". त्यामुळे "ती"च्या विचाराने सगळे करता आले. "ती"नेपण इमानेइतबारे माझे हार्मोन्स, कॅल्शियम, आयर्न, त्वचा काय न काय व्यवस्थित ठेवले. पण संसारीक गडबडीत माझेच "ती"च्याकडे जरा दुर्लक्ष झाले. मग मला "ती"चा थोडा त्रास होऊ लागला. "ती" तिचं काम व्यवस्थित करत होती, पण माझ्याकडूनच "ती" आली असता आराम झाला नाही. मग "ती" आली की कंपलसरी आराम करावाच लागायचा. काय चुकलं याचा विचार करता त्या चार दिवसांत आराम न केल्याचा परिणाम असाच निष्कर्ष येतो. आता आयुष्यातील असा टप्प्या होता की "ती" आली तशी अचानक निघून गेली आणी मला एकदम रिकामं रिकामं वाटायला लागलं.

वय वर्ष १५ ते ४५ या माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या काळात "ती" माझ्या आयुष्यात होती. याच काळात तारुण्य, करिअर, लग्न, मुलं, संसार असतो. आयुष्यातील अजुन अनेक महत्त्वाच्या सुखदुःखाच्या गोष्टी याच काळात घडतात. खुपच धावपळ व धकाधकीचा हा काळ असतो. पण माझ्या अनुभवावरून मला असे वाटते की प्रत्येकीने त्या चार दिवसात जसा जमेल तसा आराम नक्कीच केला पाहिजे. कारण आधीच्या पिढीतील स्रियांना सक्तीची विश्रांती मिळत होती. आपले पुर्वज खरोखरच खुप हुशार होते. त्यांना शास्र, आरोग्य या सगळ्यांचा सखोल अभ्यास होता असे मला वाटते. आधीच्या पिढीच्या तुलनेत आम्ही या मैत्रिणीचे महत्त्व कमी केले असे वाटतेय. त्यामुळे आम्हाला व आमच्या पुढील पिढीला "ती"चा थोडा त्रास होतोय. पण खरे तर "ती"च्याभोवतीच स्रिचे आरोग्य बांधले गेलंय. तब्येत चांगली असेल तर "ती"चे येणे नियमीत होते. आपले मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम असेल तर "ती"चे येणे कधीच वेदनादायी होत नाही. आयुर्वेदात खुप बारकाईने हिचा विचार व अभ्यास केलाय, तो पण आपण विचारात घेतला पाहिजे. पुर्वीच्या काळात आरोग्यासह इतर सर्वच गोष्टींसाठी देवधर्माच्या भीतीचा आधार घेतला जायचा पण आताच्या काळात आपल्या मुलांना सर्व सायंटिफिक गोष्टींचा पुरावा द्यावा लागतो. आपण पण सगळ्या गोष्टींमागचे शास्र स्वतः समजुन घेऊन त्यांना सांगितले पाहिजे असे मला वाटते. तरच सगळ्याचा प्रवास सुखकर व आनंददायी होईल. "ती" सगळ्याच सखींची सखी आहे फक्त तिला थोडं अटेन्शन देण्याची गरज आहे. आपण सर्वजणी ते करूया. खरंच "ती" माझ्या आयुष्यात नसती तर खुप गोष्टी मला मिळाल्या नसत्या असे मला वाटते. त्यामुळे "ती" च्या बद्दल खुप खुप कृतज्ञता व्यक्त करते.

प्रशांत दामले, कविता लाड आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट सादरीकरणाद्वारे साकारलेले नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट पाहण्याचा योग आला. वैवाहिक जीवनातील पत्नीच्या चाळीशीचा (मेनोपॉज) काळ, शरीरात होणारे हार्मोन बदल, त्यामुळे होणारी चिडचिड, संबंधात येणारी नीरसता या विषयाला अतिशय समर्थपणे या नाटकाने हाताळले आहे. सर्वांनी नाटक प्रवाही ठेवले आहे. संपूर्ण नाटक हलके - फुलके असले तरी त्यात हाताळलेला विषय अतिशय गंभीर आहे आणि त्याची गंभीरता पोहोचविण्यात नाटक यशस्वी झाले आहे.

अलीकडच्या काळात या विषयावर मोकळेपणाने बोललं जातंय हि अतिशय सुखावह गोष्ट आहे. त्यामुळे या विषयाबाबतची जागरुकता वाढत आहे. पती-पत्नी नात्यात निर्माण होणारे ताण-तणाव यामुळे सुटण्यास नक्कीच मदत होते. नाटकाच्या सुरुवातीला आयुष्यातील सर्वच प्रश्नांना गुगल उत्तर देऊ शकत नाही आणि त्यांच्या आयुष्यात शोधलेले उत्तर प्रत्येकाच्याच आयुष्यात कामी येईल असे नाही. त्यासंबंधातील धोका मोकळेपणाने सांगितला आहे. वैवाहिक जीवनातील आनंद हिरावलेल्या नवऱ्याला त्या आनंदाकडे नेण्यासाठी बायको मुलाच्या सांगण्यावरुन मानसशास्त्रावरील गिल्ट थिअरीवर आधारित नाटक घडवून आणते आणि तिला त्यात अपेक्षित परिणाम मिळतो. या रचित नाटकात कार्यालयातील एका मुलीला आपल्या बॉसची गर्लफ्रेंड बनविले जाते. त्यातील वेगवेगळे टप्पे गाठत गोष्ट 'डेट' पर्यंत जाते. मात्र सामान्य कुटुंबातील नवऱ्याला आपण काहीतरी चूक करीत आहोत असे नेहमी वाटत राहते. त्या मुलीशी केलेल्या नकली प्रेमातून त्याला आपल्या असली प्रेमाची आठवण होते. मेमरी फुल झाली आणि त्यात आणखी काही नवीन भर घालायची असल्यास जुन्या आठवणी डिलीट मारणारा (विसरणारा) हा नवरा मात्र आपल्या आयुष्यातील त्या नाजूक क्षणांना विसरू शकत नाही आणि त्याला आपली चूक उमगते आणि आनंद पुन्हा मिळतो अशी साधारण कथा आहे. 

नाही म्हणायला नवऱ्यावर बायकोने दाखविलेल्या अविश्वासाने त्याचा अहंकार दुखावतो मात्र त्यामागची भूमिका समजून घेतल्यावर ते नाते अधिक दृढ झालेले पाहावयास मिळते. नाटक प्रवाही असल्याने पुढे काय घडते हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते. अंतिम चरणात मात्र धक्क्यावर धक्के बसत राहतात जरी बायको आपल्याला पडद्यामागचे भूमिका सांगत असली तरीही... नेहमीच आपल्या नाटकातून मानवी आयुष्यातील विषय हाताळत त्यावर काही तरी संदेश देण्याचा प्रयत्न प्रशांत दामलेंच्या नाटकातून अनुभवास येतो. एक संवेदनशील माणसाचे ते प्रतीक आहे. मराठी नाट्य सृष्टीत १२६१६ वा नाट्यप्रयोग व एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा ५९४ वा प्रयोग प्रशांत दामले यांनी जळगावच्या संभाजीराजे नाट्यगृहात साकारला. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे सादरीकरण तेव्हढेच सहज आणि त्यामुळे परिणामकारक वाटते. जळगावात नव्याने सुरु करण्यात आलेला एसडी - इव्हेन्ट चा प्रयोग यशस्वी होतोय कारण नाटक हाऊसफुल झाले. मित्रवर्य दिनेश थोरात व टीमचे मनापासून अभिनंदन ! जळगावला सांस्कृतिक वातावरणाचे पुनर्वैभव देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा !  

गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४ 

No comments:

Post a Comment