Tuesday 30 June 2020

जगद्गुरु संत तुकाराम महाराज !

रामकृष्ण हरि ! 


ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस... वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला तर संत तुकाराम महाराज हे त्याचे कळस आहे असे संत बहेणाबाई यांनी एका अभंगात म्हटले आहे व तशी या संप्रदायाची श्रद्धा आहे. या काळातील सर्वच संतांनी समाज प्रबोधन करतांना मानवाला वैचारिक दिशा देण्याचे काम केलेले आपल्याला दिसून येईल. संत तुकाराम महाराज या सर्वांमध्ये शिरोमणी होते. सतराव्या शतकातील या महानुभावाने त्यापूर्वीच्या संतांच्या विचारधनाचे सामान्यजनांच्या दृष्टीने व सोप्या पद्धतीने सादरीकरण केले असे वाटते. त्यांच्या गाथेतील अभंगांमधून मांडलेले अनुभवसंपन्न दृष्टांत आजही अनेक ठिकाणी वापरले जातात आणि चपखलपणे सार्थ ठरतात. समस्त प्राणिमात्रांवर त्यांनी भाष्य केलेले आपल्या लक्षात येईल. संत तुकाराम महाराजांचे चरित्र अध्यात्ममार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकांना दिशा देणारे आहे. 'आपुलिया बळे नाहीं मी बोलत | बोलविता धनी वाचा त्याची ||' या श्रद्धेतून त्यांनी लिहिलेले अभंग देववाणी मानली जाते. श्री महाराजांच्या सुमारे अडीच हजार अभंगातून भक्तिभाव, व्यवहार, नाममहिमा, संतस्तुती, शरणागती आदी विषय आलेले दिसतात. यावरून त्यांना 'जगद्गुरु' का म्हटले असावे हे ध्यानात येईल. तंत्रज्ञानावर आधारित आजच्या युगातही संत तुकारामांचे विचारधन मार्गदर्शक ठरते. 

संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे संत होत. समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज समाजातील अशा त्यांच्या रचना आहेत. संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. एका सुखवस्तू कुटुंबात व आठ पिढ्यांची वारकरी परंपरा असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पंढरपूरचा विठ्ठल त्यांचे आराध्यदैवत होते. घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना त्यांच्या परिवारावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आईवडील गेले, थोरल्याची बायको गेली, तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाईही गेली. मोठ्या बंधूंनी कुटुंबात लक्ष न दिल्याने समोर आलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याचा प्रसंग तुकोबारायांवर आली. भयंकर पडलेल्या दुष्काळात महाजनकी असलेल्या या कुटुंबाला मानवासह गुराढोरांची व्यवस्था पाहावी लागली. त्यासाठी प्रसंगी सावकाराकडून कर्ज काढून, पत्नीचे सर्व दागिने विकून संत तुकारामांनी केली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. अशा आघातांनी सर्वसामान्य माणसे खचून जातात, तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर-संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात. तुकोबांनी यातील कोणताही पर्याय न निवडता "विठ्ठल विठ्ठल' म्हणत या सर्व प्रसंगांना धीराने व खंबीरपणे सामोरे गेले. यातच आपल्याला त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते. हरिचिंतनात कायम निमग्न असणाऱ्या संत तुकारामांनी आपल्या अनुभवातून विविध अभंग शब्दबद्ध केले. भागवत धर्मची पताका आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. 

संत तुकारामांचे चरित्र व अभंगांचे वाचन करणारा स्तंभित होतो आणि अनेकदा निःशब्दही ! जगरहाटीत अडकलेल्या सामान्य मानवाला त्यांच्या जीवनातून जगण्याचा वेगळा अर्थ प्राप्त होतो. त्यांच्या अभंगातून भाव भक्ती तर जागृत होतेच सोबत व्यवहाराची शिकवणही मिळते. जीवन जगात असतांना येणाऱ्या सुखदुःखाला कसे सामोरे जावे व संसारात असतांनाही परमार्थाचा मार्ग कसा आचरता येतो याचे संत तुकाराम हे आदर्श उदाहरण आहे.  तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व तात्कालिक परिस्थितील अनिष्ट गोष्टींवर प्रहार करणार संत कवी होते. त्यांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे.  वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक सर्वांनाच त्यांच्या या विचारधनात विशेष रुची निर्माण करतात. भागवत धर्माचा कळस होण्याचे भाग्य लाभलेले तुकोबाराय महाराष्ट्राच्या हृदयात आपले अढळ स्थान घेऊन आहेत. त्यांच्या अभंगातील गोडवा व भाषेची रसाळता विशेष आहे.  संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगासोबतच गवळणीही रचल्या. समाजातील दांभिक गोष्टींवर प्रचंड चीड असलेल्या या थोर संताने अनेकदा प्रहार केले आहे. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले. देव धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरा तसेच भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजातील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत.

संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची पवित्र सांस्कृतिक विद्यापीठे म्हटली पाहिजेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. संत तुकारामांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म-कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण त्यांनी जगाला  दिली. सामाजिक परिवर्तनाची एक चळवळ त्यांनी सहजभावाने निर्माण केली. समाजातील जातीभेद नष्ट करण्याचे व गुलामगिरीची चौकट त्यांनी मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला. संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म, भागवत भक्ती, उपदेशाची कास त्यांनी कधीही सोडली नाही.  आपल्या दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आणि त्यासाठीची वचने संत तुकाराम महाराजांच्या अभंगात आढळून येतात. त्यांनी अनेक जीवन व्यवहार सूत्रे आपल्या अभंगातून मांडलेले दिसतात. त्यामुळेच ती सामान्यजनांच्या मुखात सहज बसली आहेत. अनेकदा ती संत तुकारामांची आहेत हे त्यांना माहिती नसते. हि वचने मानवी जीवनाशी एकरुप झालेली दिसतात आणि म्हणूनच ती मानवाच्या विचारपद्धतीची व जीवनशैलीची अविभाज्य अंगे आहेत. 

'आलिया भोगासी असावे सादर'

'आले देवाजीच्या मना, तेथे कुणाचे काही चालेना', 

'ठेविले अनंते तैसेचि राहावे | चित्ती असू द्यावे समाधान ||' हि वचने आपण अनेकदा वापरतो. मानवी मनाची एक चौकटच यातून निर्माण झालेली दिसते आणि त्याचे श्रेय महाराजांकडे जाते. 

'एकमेकां साह्य करू। अवघे धरू सुपंथ'

'शुध्द बीजापोटी। फळे  रसाळ गोमटी' 

'असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे' 

'जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥ तोचि साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा'

'तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे । येरा गबाळाचे काम नोहे '

'नाही निर्मळ जीवन । काय करील साबण' 

'पोट लागले पाठीशी । हिंडविते देशोदेशी '

'तुका म्हणे ऐशा नरा । मोजूनी माराव्या पैजारो'  या प्रकारची वचने जीवनामधील कठोर वास्तविकतेची जाणीव करून देतात. 

'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी '

'तुका म्हणे जिणे । शर्तिविण लाजिरवाणे '

'मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदू ऐसे'

'भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे काठी देऊ माथा' हि वचने एक जीवन विषयक दृष्टिकोन देतात. तुकोबारायांच्या अनेक गोष्टी मराठी मनाने स्वाभाविकपणे आत्मसात केलेल्या आहेत. त्यामुळे जीवन संघर्षात तुकोबांकडून नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. 

दुष्काळ संपुष्टात यावा यासाठी घरापासून दूर जाऊन डोंगरावरच्या एक गुहेत जाऊन त्यांना पांडुरंगाचे आर्त आळवणी केली. मंडळी त्यांचा शोध घेत तेथे पोहोचले. लहान बंधू म्हणाले "दादा, अरे या गुहेत वाघ, लांडगे असतात. त्यांनी तुला खाल्लं असतं तर ?" त्यावर तुकोबा म्हणतात "अरे माझ्यासंगे माझा पांडुरंग होता. माझ्याजवळ माझा पांडुरंग असल्यावर मला रे भय कोणाचं ? आपलं मन शुद्ध निर्भय असेल ना, तर कोणाचाही भय उरात नाही बघ." यावेळचा त्यांचा अभंग आपल्याला खूप काही सांगून जातो. 

जन्ममरणांची कायसी चिंता | तुझ्या शरणागती पंढरीराया ||
वदनीं तुझे नाम अमृतसंजीवनी | असतां चक्रपाणी भय काय (कवणा) ||
हृदयी तुझें रूप बिंबले साकार | तेथें कोण पार (पाड) संसाराचा ||
तुका म्हणे तुझ्या नामाची (चरणांची) पाखर | असतां कळिकाळ पायांतळी ||



फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले. या दिवशी तुकाराम बीज साजरी करण्याची परमपरा आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. जीवनाची इतिकर्तव्यता सांगणारा अभंग आपण कायम हृदयी जपावा या अपेक्षेसह थांबतो. उद्या आपण संत  नामदेव यांना समजून घेऊ या ! 

याजसाठी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||
आतां निश्चितीने पावलों विसांवा | खुंटलिया धांवा तृष्णेचिया ||
कवतुक वाटे जालिया वेंचावे | नांव मंगळाचे तेणें गुणें ||
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी | आतां दिवस चारी खेळीमेळीं ||


फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले. या दिवशी तुकाराम बीज साजरी करण्याची परमपरा आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. जीवनाची इतिकर्तव्यता सांगणारा अभंग आपण कायम हृदयी जपावा या अपेक्षेसह थांबतो. उद्या आपण संत  नामदेव यांना समजून घेऊ या ! 

रामकृष्ण हरि ! 

Monday 29 June 2020

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली


रामकृष्ण हरि ! 

भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी, तत्वज्ञ, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानविषयक विचार मराठीतीनाही व्यक्त करता येतात असा विश्वास आपल्या ग्रंथ कर्तृत्वातून निर्माण करणारे संत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, हरिपाठाचे व इतर अभंगातून समाज प्रबोधन करणारे संतश्रेष्ठ. त्यांच्या लोभस व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने अठरापगड जातीतील संतमेला त्यांच्याभोवती जमा झाला. अठरापगड जातीतील सर्वसामान्य जनांना पांडुरंगाच्या भक्तीचे सोपे साधन उपलब्ध करुन देणाऱ्या संताला समाज 'माऊली' म्हणतो. माणसाला सर्वात जवळचे नाते आईचे. आपले दुःख, गाऱ्हाणे आईजवळ सांगायला कोणालाही संकोच वाटत नाही. भागवत संप्रदायाच्या लाखो अनुयायांचे म्हणणे ऐकण्याचे सामर्थ्य कोमल हृदयी ज्ञानेश्वरांमध्येच होते हे ओळखून भक्तांनी त्यांना 'माऊली' या उपाधीने गौरविले. स्त्रीच्या महन्मंगल स्वरूपाच्या नात्याने पुरुषाला संबोधण्याचे जगातील हे एकमेवाद्वितीय  उदाहरण आहे. 

संत ज्ञानेश्वर नाथपंथी, हटयोगी, अद्वैतवादी, निर्गुणोपासक होते. वारकरी (भागावर) संप्रदायाचा पाया रचण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांचे आणि त्यांच्या कार्याचा सर्वच संतांनी केला आहे. ज्ञानेश्वरीबद्दल संत नामदेव म्हणतात 

नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी | एक तरी ओवी अनुभवावी || 

माऊलींचा गौरव करतांना संत एकनाथ म्हणतात 

कैवल्याचा पुतळा | चैतन्याचा जिव्हाळा | ज्ञानोबा माझा || 

संत तुकाराम महाराजांच्या अनुग्रहित शिष्या 'संत बहेणाबाई' यांनी वारकरी संप्रदाय अर्थात भागवत धर्म म्हणजे एक इमारत आहे अशी कल्पना करुन तिची रचना व उभारणी करण्यासाठी योगदान दिलेल्या संतांचा गौरव करणारा अभंग लिहिला आहे. त्या म्हणतात 

संतकृपा जाली | ईमारत फळा आली || 
ज्ञानदेवे घातला पाया | उभारिले देवालया || 
नामा तयाचा किंकर | तेणे रचिले यावर || 
जनार्दन एकनाथ | खांब दिल्हा भागवत || 
तुका जालासे कळस | भजन करा सावकास || 
बहेणी फडकती ध्वजा | निरोपण केले वोजा || 

संत सेना महाराज म्हणतात 

श्री ज्ञानराजे केला उपकार | मार्ग हा दाखविला ||
विटेवरी उभा वैकुंठनायक | आणि पुंडलिक चंद्रभागा ||

तर संत एकनाथ म्हणतात 

कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर | तया नमस्कार वारंवार ||
न पाहे यातीकुळाचा विचार | भक्त करुणाकर ज्ञानाबाई ||

अनेक संतांनी ज्ञानदेवांवर गुणगौरवपर  अभंग रचना केलेल्या आढळतात. त्यांच्या गौरवपर जेवढ्या  रचना आहेत तेवढ्या इतर संतांच्या संदर्भात नाहीत. यावरून माऊलींचे संतमेळ्यातील स्थान, श्रेष्ठत्व व आदरभाव आपल्या लक्षात येईल. 

पुरोगामी विचारधारा असलेल्या विज्ञानयुगातील आजच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात वारकरी संप्रदायाबाबत आदराची भावना आहे. सहज सोपी आचरण तत्वे यामुळे हा संप्रदाय लोकप्रिय आहे. या संप्रदायाची मूळ बैठक घडविण्यात संत ज्ञानेश्वरांचे मोलाचे योगदान आहे. कापली गोपीचंदनाचा टिळा व बुक्का, गळ्यात तुळशीची माळ, नियमित पंढरीची वारी आणि एकादशी व्रत अशी सहजसाध्य आचारसंहिता या संप्रदायात पाळली जाते. समाजमनात माऊलींचे स्थान मिळालेल्या व 'महाराव' उपाधीने गौरविलेले समन्वयवादी विचारांचे धनी असलेल्या या ज्ञानी, विद्वान व मराठी भाषेवर अतोनात प्रेम करणाऱ्या माऊलींचा समाजाने छळ केला असला तरी त्याबाबत आपल्या साहित्यातून तक्रारीचा एक शब्दही न लिहिता सकल विश्वाच्या कल्याणाचे दान विश्वात्मक देवाकडे मागणारे कोमल हृदयी तत्वज्ञ, कवी म्हणजेच संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर ! 

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने अवघ्या जगाला ललामभूत ठरावी अशी ग्रंथरचना केली आहे. विपुल अभंग रचनाही केल्या आहेत. त्यांचे वाङ्मय, विचारधन, समाजप्रबोधन, साक्षात्कार अवस्थेतील अनुभूती, त्यांचे समाधान यातच त्यांचे श्रेष्ठत्व आहे. 'ज्ञानेश्वरी' रुपी वाग्यज्ञ पूर्णत्वास गेल्यानंतर त्यांनी जे प्रसादरुपी दान अर्थात 'पसायदान' मागितले आहे ते थेट विश्वात्मक देवाला मागितले आहे. त्यात स्वतःसाठी काहीही न मागता सकल मानव जातीच्या कल्याणासाठी मागितले आहे. दुष्टांचा दुष्टपणा जावा व त्यांच्या अंगी सत्कर्मवृत्ती वाढीस लागावी, जगातून पापाचा नायनाट व्हावा व ज्याला जे हवे ते मिळावे, सर्वत्र सज्जनांचा संचार असावा हि त्यांची मागणी आहे. भूतलावरील मानव जातीच्या कल्याणासाठी मागितलेले व 'जो जे वांछील तो ते लाहो' अशी मागणी करणारे हे दान एकमेवाद्वितीयच. एवढ्या महान ग्रंथाची रचना केल्यानंतर स्वतःसाठी काहीही न मागता इतरांसाठी मागणे हे फक्त ज्ञानेश्वरांसारखे महापुरुषच करु शकतात. ज्ञानेश्वरांची दृष्टी तर्कशुद्ध आणि अंधश्रद्धेला ठार न देणारी होती. त्यांच्या एका ओवीत म्हटल्याप्रमाणे 

जरी मंत्रेंची वैरी मरे | तरी वाया का बांधिली कट्यारे ||
रोग जाय दूधसाखरे | तरी निंब का पियावा ||

अर्थात मंत्र सामर्थ्याने जर शत्रूचा नाश होत असले तर कमरेला कट्यार बांधण्याची आवश्यकता पडली नसती. तसेच दूध किंवा साखरेच्या सेवनाने रोग समूळ नाश होत असेल तर कडुनिंबाचा रस प्यावा लागला नसता.  

पांडुरंगाची प्राप्ती व आपल्या हृदयस्थित श्रीहरिशी एकरूपता कशाने साधता येते ? या प्रश्नाचे उत्तर ज्ञानदेवांच्या हरिपाठात मिळते. हरिपाठ म्हणजे हरीच्या नामाचे पठाण होय. अभंग म्हणजे उत्कट भक्तीचा व मनातील भावनांचा आर्त अविष्कार !हरिपाठाचे अभंग म्हणजे सामान्य जणांच्या हरिप्राप्तीसाठी दाखविलेला सोपा मार्ग. व्रत, वैकल्ये, जप तप, कर्मकांड, तीर्थाटने न करता मुक्ती मिळविण्याचे ते साधन आहे. संत हे खऱ्या अर्थाने सामान्यजनांना मार्ग दाखविणारे वाटाडे असतात. प्रपंचात माणसे कळत नकळत वाट चुकतात. वाईट मार्गाने जातात. त्यांना परमेश्वराचे विस्मरण होते. अशावेळी संतांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. मनुष्य देहाचा उपयोग परमेश्वर प्राप्तीसाठी न करणे हे मूर्खाचेच काम आहे. मेल्यानंतर मोक्ष मिळतो असे समजणाऱ्या भक्तांना माऊली उपदेश करतात 

मोक्ष मेल्यापाठी आम्हांसी होईल | ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख ||
दीप गेल्यावर कैचा जी प्रकाश | झाक झाकी त्यास कासयाची  ||
जंववरी देह आहे तववरी साधना | करुनिया ज्ञान सिद्ध करी ||

सर्वच संतांचे विचार इतक्या तोकड्या लेखात लिहिता येणार नाही. श्रोत्यांची भूक अपूर्ण ठेवल्याबद्दल क्षमायाचना करुन पसायदानच्या अर्थाने हा भाग पूर्ण करतो. उद्याच्या लेखात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांवर लिहिल. 
पसायदानाचा अर्थ 

आता विश्वात्मक देवाने, या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान ( प्रसाद ) द्यावे. दुष्टांचे दुष्टपणा नाहीसा होवो, त्यांना सत्कर्मे करण्याची बुध्दी होवो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो. पापी लोकांचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरुपी सूर्याचा उदय होवो. प्राणिमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणिमात्रांना भेटत जावोत. जे (संत) कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत, चेतनारुपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत, अमृताचे बोलणारे समुद्रच आहे. जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत, तापहीन सूर्यच आहेत असे संतसज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र होवोत. तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परीपूर्ण होऊन अखंडीतपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी. हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे, त्यांनी या जगातील दृष्य आणि अदृष्य भोगांवर विजयी व्हावे. यावर विश्वेश्वर गुरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले. 

रामकृष्ण हरि ! 

Sunday 28 June 2020

अर्थपूर्ण जगण्याचा साधा, सोपा व सरळ मार्ग सांगणारे संत...

रामकृष्ण  हरि ! 

मानवी जीवन अनेकविध गोष्टीने भारलेले आहे. त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद , मत्सर हे मनाचे विकार आहे. यातूनच अहंकार, ममता, चिंता, आसक्ती, असहिष्णुता, असंयम, आळस, हिंसा, चोरी यासारखी मानसिक दोष निर्माण होण्याचा धोका असतो. यामुळे माणूस दुःखी, कष्टी होतो. जीवनातील आनंदाला, सुखाला पारखा होतो. आपल्या धर्म ग्रंथात म्हटल्याप्रमाणे धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्तीसाठी या विकारांना व मानसिक दोषांचा त्याग करता आला पाहिजे. यासाठी आत्मबोध होण्याची आवश्यकता असते. मानवाने यावर नियंत्रण मिळविले आणि त्या निर्गुण, निराकार परमेश्वराशी एकरुप झाले कि जीवन सफल होते. यासाठीच मानवाचा अट्टाहास सुरु असतो. जीवनाचं हे सार सांगणारे संत या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेले. आषाढी एकादशी व तत्पश्चात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या अल्पमतीप्रमाणे काही संत, त्यांचे साहित्य याबद्दल काही लिहिण्याचा हा प्रयत्न...

महाराष्ट्रामध्ये भागवत धर्माची ध्वजा सांभाळणाऱ्या संतांनी समाजात भक्तिभाव रुजवला. संस्कृत भाषेत असलेले ज्ञान प्राकृतात मांडले व सामन्यांच्या आकलनयोग्य झाले. परमेश्वराच्या भक्तीचा सर्वात सोपा मार्ग सांगतांना नामस्मरणाचे महत्व समजावून सांगितले. नामस्मरणानेच परमेश्वर प्राप्ती होईल व मुक्तीचा मार्गही सापडेल. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास, संत नरहरी सोनार, संत सावता माळी, संतसेना महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई आदी संतांनी सामान्य माणसाला अर्थपूर्ण जगण्याचा साधा, सोपा व सुखद मार्ग दाखवून दिला. त्यासाठीच्या मार्गावर चालण्यासाठी मानसिक बाळ देणारे साहित्य निर्माण केले. त्यांच्या स्वानुभवातून निर्माण झालेले अभंग, ओव्या, श्लोक मराठी माणसाच्या हृदयात जाऊन बसतात इतकी अवीट गोडी त्यात आहे. आजही त्यात कुठे कमतरता जाणवत नाही. सध्याच्या काळात माणसाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी, मनाला सावरण्यासाठी, जीवनातील प्रश्नांनाचे उत्तर शोधण्यासाठी हे साहित्य उपयोगी ठरते. समाजभान जपत 'सामाजिक क्रांती' या संतांचे महाराष्ट्राच्या भूमीवर अनंत उपकार आहेत. 

या सर्व संतांनी ईश्वरप्राप्ती व त्यांच्या भजनात विशेष आवड होती. त्यांनी समता, बंधुता, भूतदया, औदार्य
आदींचा पुरस्कारच केला आहे. त्यांनी दाखविलेल्या अध्यात्मिक मार्गाने लोक जागृत झाले. जनतेमध्ये अशा प्रकारची चेतना निर्माण करण्याची गरज जशी त्याकाळी होती तशी ती आजही जाणवते. समाजातील अशांती, संघर्ष, निसर्गाचे शोषण, पर्यावरणाचे होत असलेले नुकसान, अविश्वास, मानसिक तणाव यावर संत साहित्य हेच उत्तर आहे. मर्यादित गरज, नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर, परस्परांवरील प्रेम व विश्वास वाढीची गरज संतांनाही आपल्या प्रेरणादायी विचार व कार्यातून दाखवून दिले आहे. संत समाजात राहून सामाजिक भान राखत समाजासाठी कार्य करतात. आपल्याला त्रास देणाऱ्यांचा प्रतिकार न करता त्यांनी आपले कार्य सुरु ठेवलेले आपल्याला अनेक उदाहरणातून लक्षात येईल. 

अखिल विश्वाच्या कल्याणाचीच प्रार्थना त्यांनी केलेली दिसते. संतांनी समाजात ज्ञानप्रसाराचे कार्य केले. त्यांनी आपली काळजी न करता कृपाळूपणाने समाजाचे दुःख दूर करण्याचा व त्यांना सुख देण्याचाच प्रयत्न करतांना दिसतात. संतांनी समाजातील अनेक दुष्ट व अनिष्ट परंपरांवर कोरडे ओढलेले दिसतात. त्यांनी अध्यात्मिक व पारमार्थिक कार्यासोबत सर्वव्यापी व सर्वसमावेशक समाज कार्य केलेले दिसते. संतांनी आपल्या वाणीने, लेखणीने, कर्तृत्वाने वैदिक धर्माचे, गीता धर्माचे पुनरुज्जीवन केले. आपली कर्मे करत राहणे हीच खरी भक्ती आहे. सर्वांमध्ये परमेश्वर असल्याने त्यांचे दुःख दूर करणे हीच भक्तीची संकल्पना संतांनी मंडळी आहे. संत तुकोरायांनी म्हटल्याप्रमाणे "जे का रंजले गाजली त्यासी म्हणे जो आपलुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा."  माणूस उभा राहिला तरच देश उभा राहील याभावनेने त्यांनी समाज जागृतीचे काम केले आहे. 

प्रस्तावनेचा हा लेख तेव्हढा उत्साहवर्धक वाटला नाही तरी पुढील भागात नक्की वाटेल कारण यापुढे आपण संत आणि त्यांचे साहित्य यावर विशेष प्रकाश टाकणार आहोत. आजही घराघरात संतांचे अभंग म्हटले जातात. ऐकले जातात. त्यावेळेस आपण सर्वचजण त्यात रमून जातो. नामाचा गजर करतांना आणि भजन , कीर्तन सुरु असतांना माणूस त्यात तल्लीन होतो. एकरुप होणे, तादात्म्य पावणे, ब्रह्मानंदी टाळी लागणे, देहभान विसरणे यासारख्या गोष्टींची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. रामकृष्ण हरि, पुंडलिका वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम हा गजर माणसात चैतन्य निर्माण करतो. अनेक असाध्य गोष्टी करण्याचे धाडस या चैतन्यातून मिळते. दर दिवशी २५ किलोमीटरचा सलग ५५ दिवस पायी प्रवास करीत आपल्या त्या पांडुरंगाला भेटण्याची आस घेऊन तो ते सहज पार करतो. प्रत्येकात परमेश्वर पाहण्याचा संदेश संत देतात. वारी मध्ये त्याची प्रचिती हमखास येते. प्रत्येकजण एक दुसरीला माऊली म्हणतो आणि विनम्रतेने अभिवादन करतो. हम सब एक है !  अशी घोषणा देण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. हि सर्व त्या पांडुरंगाचाच लेकरे आहेत या भावनेने या गोष्टी घडत असतात. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस ! असे म्हणत असतांना जो जे वांच्छिल तो ते लाहो अशी आर्त प्रार्थना पसायदानातून केलेली दिसते. चला तर मग पुढील भागात संत ज्ञानेश्वर यांच्या अभन्गातून शिकवण घेत जीवनाचे काय सार मिळते ते पाहू या  ! 

रामकृष्ण हरि ! 

Thursday 25 June 2020

स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्या अक्षयची यशोगाथा !

असू अम्ही सुखाने पत्थर पायातील : आशा फौंडेशन


परिस्थिती चांगली नसतांनाही आपण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करु शकतो. वाटेत चांगल्या संस्था आणि माणसे भेटत जातात. धुळे येथील शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व नुकताच आईसर (IISER) भोपाळ येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या धुळे येथील अक्षय भडागे या युवकाची हि यशोगाथा आहे. आशा फौंडेशन व संस्थापक श्री. संजीव दहिवदकर यांच्या आर्थिक पाठबळामुळे माझ्या लक्ष्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करु शकलो असे तो कृतज्ञतेने सांगतो. अक्षयच्या पाच वर्षाच्या BS-MS या अभ्यासक्रमाच्या सात सत्रांची फी व त्याच्या फ्रांस येथे संशोधनासाठी लागणारा सर्व खर्च संस्थेने केला आहे. सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतूनच संजीव दहिवदकरांनी आशा फौंडेशनचे बीजारोपण केले आणि आज ह्या विशाल वृक्षाला अक्षयरुपी सुंदर फळ लागले आहे. अक्षयसारख्या अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने संस्था सहाय्य्यभुत ठरली आहे व त्याचे आत्मिक समाधान संस्थाचालकांसह तिच्या देणगीदार व हितचिंतकांना आहे. संस्थेच्या या कार्याची मूळ प्रेरणा एका पद्याच्या दोन ओळीत आहे...

असू अम्ही सुखाने पत्थर पायातील  
मंदिर उभविणे हेच आमुचे शील ॥


एक समाजोपयोगी सुंदर सामाजिक संस्था निर्माण करायची हे सर्वच कार्यकर्त्यांचं ध्येय असतं. ध्येय ही भान राखून योजना करण्याची व बेभान होऊन त्यासाठी काम करण्याची गोष्ट असते. ती संस्थेच्या कार्यकर्त्यांसाठी एक प्रकारची बेधुंद करणारी नशा (अर्थातच उदात्त अर्थाने) असते. आपल्या  ध्येयपथावर स्वत:ला झोकून देऊन निरंतर मार्गक्रमण करत राहणं हीच त्यासाठीची अपरिहार्यता ! अक्षयच्या यशोगाथेमागे आशा फौंडेशनची हीच भूमिका होती. जाणून घेऊ या अक्षयची यशोगाथा... 

बालपणी टीव्हीवर एका कार्यक्रमात शास्त्रज्ञ होणं हे एक आव्हानात्मक पण आदराचं स्थान देणारं प्रोफेशन असल्याचे बघितलं होतं आणि तेव्हापासूनच मनात शास्त्रज्ञ होण्याचा विचार रुजला असावा. वडिलांची धुळ्यातच भेळची गाडी होती. कमी वयात कुटुंबाची जबाबदारी घेतल्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण न करु शकलेले अक्षयचे पप्पा कै. सुनील, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मात्र धडपडत होते, प्रामाणिक प्रयत्न करीत होते. लग्न झाल्यावर पत्नी श्रीमती कवितालाही शिक्षणाचा आग्रह करुन एम. ए. बी. एड. केलं. अक्षय नववीत असतांना जुन-२०११ मध्ये वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. अक्षय व त्याची बहीण सोनल यांची जबाबदारी आईवर आली. सुदैवाने त्या धुळ्याच्या नामांकित अशा जयहिंद महाविद्यालयात मराठी विभागात विना-अनुदानित तत्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या मात्र पगार मात्र आजच्या काळात तुटपुंजा असाच होता. अशा विपरीत परिस्थिती भडागे परिवाराचा संघर्ष सुरु झाला.  अक्षयचं शालेय शिक्षण धुळ्यात जयहिंद शाळेत सुरु होतं. हुशार असलेल्या अक्षय चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा व नववीत NMMS ची परीक्षा उत्तीर्ण झाला. परिस्थितीची जाणीव ठेवत दहावीत ९४.१८% तर बारावीत ८६% गुण मिळवले. इकडे आर्थिक गरज भागविण्यासाठी आईने एमपीएससी , पीएसआय व इतर स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घ्यायला सुरवात केली. त्यांचे अनेक विद्यार्थी आज शासनाच्या सेवेत चांगल्या पदांवर कार्यरत असून अनेक जण पीएसआय देखील झाले आहेत. २०१५ ला अक्षय आईसर (Indian Institute of Science Education and Research) ची प्रवेश परीक्षा पास झाला आणि आईसर भोपाळ येथे प्रवेश मिळाला. आईसर हि शास्त्रज्ञ घडविण्यासाठी सरकारने सुरु केलेली एक अत्यावश्यक व उच्च दर्जाची शैक्षणिक संस्था ! फिजिक्स, केमिस्ट्री, गणित, बायोलॉजी, अर्थ सायन्स यासारख्या विज्ञानातील मूलभूत शाखांमध्ये विविध विषयांवर संशोधन कसे करावे हे या आईसर संस्थेत शिकवलं जाते. 

आईसर जरी शिक्षणासाठी उत्तम जागा असली तरीही तिथे मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत फी व तसेच इतर खर्च भागवणे फार कठीण जात होते. पहिले तीन सत्र आईने हि तारेवरची कसरत आपल्या सहकारी व संबंधितांकडून केली. मात्र प्रत्येक वेळी पैसे मागतांना त्यांना ओशाळल्यासारखे व्हायचे. महाविद्यालयातील सहकारी सौ. अस्मिता कापसे आणि प्रा. गिरीश देसले सरांना परिस्थिती सांगितली. त्यांनी आशा फौंडेशन व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संजीव दहिवदकरांबद्दल सांगितले. संस्थेच्या जळगाव कार्यालयाच्या माध्यमातून संजीव दहिवदकरांशी संपर्क झाला आणि उर्वरित पूर्ण शिक्षणाची जबाबदारी संस्था घेईल असे तात्काळ सांगितले आणि तशी व्यवस्थाही केली. आर्थिक अडचणी कमी झाल्यामुळे अक्षय अभ्यासात चांगल्याप्रकारे लक्ष देऊ लागला. दुसऱ्या वर्षानंतर अक्षय कोलकाता मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिकस येथे क्वांटम इन्फॉर्मेशन थेअरी (Quantum Information Theory ) या विषयात इंटर्नशिप केली. यात भविष्यातील क्वांटम कॉम्प्युटर्स (Quantum Computers) बद्दल अभ्यास केला. 


प्रोफेसर कार्लो रोवेली ह्या जगद्विख्यात नामांकित शास्त्रज्ञाबरोबर
 आईसरला तिसऱ्या वर्षी अक्षयने फिजिक्स   हा  विषय निवडला. ग्रहाताऱ्यांबद्दल त्याला   अगदी लहापणापासून कुतूहल होते आणि   आता ते प्रत्यक्षपणे त्याला शिकायला मिळत   होते. फिजिक्समधील एक फार सुप्रसिद्ध प्रश्न   आहे.तो म्हणजे आइन्स्टाईनच्या गुरुत्वाकर्षण  थियरीला क्वांटम थेअरी जोडणे. ह्याचा एक   उपाय म्हणजेच लूप क्वांटम ग्रॅव्हिटी (Loop   Quantum Gravity) फ्रान्समधील प्रा. कार्लो   रोवेल्ली ह्यांनी  प्रा. ली स्मोलीन यांच्यासोबत   स्वतः ही थियरी शोधून काढली आहे. पुढे   चौथ्या वर्षी अक्षयला प्रोफेसर कार्लो रोवेली   ह्या जगद्विख्यात नामांकित शास्त्रज्ञाबरोबर   संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यासाठी   मे २०१९ ते जुलै २०१९ मध्ये फ्रान्सला गेला   होता. तेथे University of Aix-Marseille येथे Loop Quantum Gravity चा अभ्यास केला. ह्यावेळी सुद्धा आशा फौंडेशनने अक्षयचा संपूर्ण खर्च केला. पुढे पाचव्या वर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ब्लॅक होलवर संशोधन केले. ब्लॅक होल थर्मोडायनॅमिक्स (Black Hole Thermodynamics) (MS Thesis) मध्ये विविध प्रकारच्या ब्लॅक होल्सचा त्याने सखोल अभ्यास केला. त्यात फिजिक्सच्या एंट्रोपी (एंट्रोपी) नावाच्या एका कॉन्सेप्टचा अभ्यास केला. एका विशिष्ट ब्लॅक होलसाठी त्याने एंट्रोपी कॅल्क्युलेशन्स केले जे ह्यापूर्वी कोणीही केलेले नव्हते. त्याच्या या थेसिसला "A" ग्रेड मिळाली आहे. त्यानंतर जून २०२० ला अक्षयने BS-MS हा ५ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उत्तमरित्या पूर्ण केला. शेवटच्या सेमिस्टरचा त्याचा पॉईंटर ९.६४ / १० आहे तर अभ्यासक्रमाचा एकत्रित पॉईंटर ८.२१ / १० आहे. यापुढे अक्षयने सैद्धांतिक भौतिकशास्त्रात  (Theoretical Physics) मध्ये पीएच. डी. करण्याचा निश्चय केला असून सध्या प्रगत भौतिकशास्त्रासाठी (Advanced Physics) एक ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म तयार करीत आहे.

अक्षयला लहानपणापासून पुस्तकांची खूप आवड आहे. पैसे जमवून पुस्तक घेण्यात त्याला आजही मजा वाटते. चित्रकलेचीही त्याला आवड आहे. अक्षय एखाद्या व्यक्तीचे, गोष्टीचे हुबेहूब चित्र काढू शकतो. क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ तसेच Clash Royale ह्या ऑनलाईन गेम्स खेळतो. लहान बहीण सोनल सध्या नाशिक येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयात  बी. एससी. करीत आहे.  तिला देखील विज्ञानाची गोडी आहे. वनस्पती जीवशास्त्र (Plant Biology) ह्या विषयात संशोधन करण्याचे ध्येय तिने नक्की केले आहे. आई प्रा. कविता भडागे मागील १४ वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर जयहिंद शैक्षणिक संस्थेत मराठी विषयाची प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. अक्षयच्या शिक्षणाचा मार्ग पूर्णतः वेगळा आहे. अभियांत्रिकी वा वैद्यकीय क्षेत्राकडे न जात मूलभूत विज्ञानाचा मार्ग त्याने निवडला आहे. कुटुंबाची परिस्थिती अशी असतांनाही "नोकरी कर" असा अट्टाहास न करता आईने माझी आवड जपायला सांगितली आहे. नातेवाईक, शेजारी-पाजारी व समाज यांचं न ऐकता माझे कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे याचा मला अभिमान आहे, असे अक्षय म्हणतो. आपल्या या शैक्षणिक वाटचालीत आशा फौंडेशनच्या आर्थिक पाठबळाबद्दल अक्षय संजीव दहिवदकर, सुजाता बोरकर, सौ. वसुधा सराफ व संपूर्ण टीमचे मनापासून ऋण व्यक्त करतो. भविष्यात आशा फौंडेशनच्या वाटचालीत माझा सर्वात मोठा वाटा राहील असे कृतज्ञतेने सांगतो. अक्षयच्या उत्तुंग यशाबद्दल अभिनंदन व त्याच्या उज्ज्वल भावी वाटचालीसाठी माझ्या व आशा फौंडेशन परिवाराच्या मनापासून शुभेच्छा ! 


आशा फौंडेशन मागील १२ वर्षांपासून जळगाव येथील इंडीया (INDEEA) या शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यरत आहे. आतापर्यंत ७ लाखांहून अधिक विद्यार्थी, पालक, उद्योजक, व्यावसायिक यांच्या जीवनात बदल घडविण्यात माध्यम ठरला आहे. संस्था प्रशिक्षण, कार्यशाळा, व्याख्याने, समुपदेशन, शिबिरे, अनौपचारिक शिक्षण, विविध प्रकल्प व उपक्रमांद्वारे आपले कार्य करीत आहे. (अधिक माहितीसाठी www.indiaasha.org या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या) आशा फौंडेशनचे हे कार्य पद्यातील पहिल्या कडव्यानुसार चालूच राहील या विश्वासासह थांबतो. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ आम्हाला अपेक्षित आहे. 

आम्हास नको मुळी मान मरातब काही
कीर्तीची आम्हा हाव मुळीही नाहि
सर्वस्व अर्पिले मातृभूमिचे ठायी
हे दैवत अमुचे ध्येयमंदिरातील ॥


गिरीश कुळकर्णी
कार्यकारी संचालक  
आशा फौंडेशन इंडीया 

(यानिमित्ताने आशा फौंडेशनच्या लाभार्थींना विनंती आहे त्यांनी त्यांचा अनुभव येथे 
जरुर सांगावा किंवा माझेशी (९८२३३३४०८४) या क्रमांकावर संपर्क करावा)


Tuesday 23 June 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग १५

डॉ. निलेश व डॉ. सौ. पल्लवी पाटील यांची यशोगाथा... 

नैसर्गिक जीवनशैली व भारतीय संस्कृती हेच कोरोनाला उत्तर ! 


समर्थ भारताच्या उभारणीसाठी या लेखमालेतील एक महत्वाचा विषय आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे. आजचा हा भाग "कोरोना" सारख्या आजारांना आज आणि भविष्यातही सामोरे जाण्याच्या अनुषंगाने लिहीत आहे. एका मोठ्या विश्रांतीनंतर लिहीत आहे कारण भडगाव येथील डॉ. निलेश पाटील व डॉ. पल्लवी पाटील या दाम्पत्याने चार कोरोना रुग्णांना कोणत्याही प्रकारचे औषधोपचार न करता बरे केले आहे. त्याच्या मुळाशी आहे ते म्हणजे नैसर्गिक जीवनशैली जी आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितली आहे. या डॉक्टर दाम्पत्याचे, त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळींचे व त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांचे मनापासून अभिनंदन करतो. डॉ. निलेश पाटील यांचेशी वैयक्तिक बोलून त्यांच्याशी झालेला संवाद लेख स्वरुपात मांडत आहे. हा लेख वाचणाऱ्या सर्वांना आवर्जून सांगावेसे वाटते आपण नैसर्गिक जीवनशैलीचा स्विकार करावा व आनंदी जीवनाचा लाभ घ्यावा.

सर्वात महत्वाचे डॉ. निलेश पाटील यांना "कोरोना" असा आजार आहे हे मान्य नाही, त्यावर विश्वासही नाही. निसर्गात असलेल्या अनेक विषाणूंसारखा हा एक विषाणू आहे त्याला घाबरुन जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. मग जगभरात होणारे मृत्यू कसले ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. डॉ. पाटील यांचे म्हणणे आहे हे मृत्यू एक तर त्यांनी घेतलेल्या धास्तीने वा भीतीने अधिक आहेत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू त्याच्या आजारानेही होत असेल त्याचे प्रमुख कारण आजार असते ना कि कोरोना. कोरोना हा विषयच नाही असे डॉ. पाटील ठामपणे सांगतात. हा एक मानसिक खेळ आहे. कोरोनाबाबत माणसांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कोरोना आहे आणि कोरोना नाही. जे म्हणतात कोरोना नाही त्यांना भीती वा अडचण नाही आणि जे म्हणतात आहे, त्यांच्या मनावर त्याचा नकारात्मक परिणाम अधिक असतो. ते त्याचा बाऊ करतात. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली कि, बहुतांश रुग्ण केवळ भीतीमुळे त्याचे बळी ठरतात.

डॉक्टर साहेब व त्यांच्या पत्नी गेले अनेक दिवस कोरोना पॅझिटिव्ह रुग्णांमध्ये जात आहेत. तेथे सामान्य माणसासारखे त्यांचे रुग्णांसोबतचे वर्तन असते. रुग्ण आणि ते यात वेगळे असे काही वाटले नाही. त्यामुळे रुग्णांना एक विश्वास आला आणि त्यामुळे अनेक जण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिसाद देऊन बरे झाले आहे. सुरवातीला संबंधित अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन चार रुग्णांवर कोणतेही औषधोपचार न करता त्यांना बरे करण्यात डॉक्टर दाम्पत्याला यश आले आहे. काय केले या दाम्पत्याने ? रोज सकाळी दोन तास योगासन, प्राणायाम व आपल्याला काही झालेलं नाही हा विश्वास देण्यासाठीचा संवाद तर सायंकाळी दोन तास विविध प्रकारचे खेळ... चार रुग्णांसह पाचोरा व भडगाव साठीच्या कोविड सेंटरमधील सर्व ५२ रुग्णांसाठी या थेरपीचा वापर केला. यासर्व गोष्टी या दाम्पत्याने त्यांच्यामध्ये जाऊन केल्यात. रूग्णांमध्ये याव्दारे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास झाला.  शिवाय त्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी हे फायदेशीर ठरतांना दिसत आहे. रुग्णही योगा आणि विविध खेळात रमल्यामुळे त्यांच्यात सकारात्मकता वाढीस मदत झाली. एक आठवण सांगतांना ते एका पॉझिटिव्ह रुग्णाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी दिलेले पेढेही या दाम्पत्याने खाल्ले आणि तेथेच रुग्णांचा विश्वास वाढला कि आपल्याला काहीही झालेले नाही. 

मागील ५ वर्षात नैसर्गिक उपचार पद्धतीचे अभ्यासक्रम डॉ. पल्लवी पाटील यांनी केलेले आहेत. या सर्व उपचारांचा त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केला. गेल्या दोन महिन्यात त्यांनी शिजवलेले अन्न खाल्लेले नाही. आपल्या रुग्णांवर औषधोपचारापेक्षा या नैसर्गिक पद्धतीचा ते अवलंब करीत आहेत. डॉ. पाटील यांचे घरी त्यांचे ८० वर्षांचे वडील आहेत ते आजही प्रॅक्टिस करतात. त्यांची लहान मुलेही त्यांच्या सोबत योग करतात. कोविडच्या रुग्णांसाठीही आहारात त्यांनी नैसर्गिक आहाराचा अवलंब केला. यात विशेषत्वाने विविध फळांचा रस जसे मोसंबी, संत्री, आंबा, लिंबू व शहाळे (नारळाचे पाणी) यांचा वापर केला. यामुळे शरीरात विषाणूंचा प्रतिकार करण्यासाठीची आवश्यक की जीवनसत्वे मिळाली आणि तीनच दिवसात रुग्ण कोरोना निगेटिव्ह झाले. इतर रुग्णही कोरोनमुक्त झाले यात ९४ वर्षांच्या आजींचाही समावेश होता. रुग्णांचे मनोबल वाढविणे, हा आजाराचं नाही अशी मानसिकता तयार करणे, आपण इतरांसारखेच आहेत असा विश्वास देण्यासाठी हे दाम्पत्य विशेष प्रयत्न करतात.

डॉ. पाटील अतिशय आत्मविश्वासाने सर्व गोष्टी सांगत होते. नैसर्गिक जीवनशैलीने मुक्त झालेले रुग्ण आम्हाला आयुष्यात कधीही विसरणार नाहीत असे ते अभिमानाने सांगतात. तसेच टीव्ही या माध्यमांपासून सर्वांनी दूर राहावे असे ते कळकळीने आवाहन करतात.. त्यामुळे माणसाची विचारशक्ती संपून जाते. त्याच त्याच बातम्या पाहून मनात "कोरोना" बाबत नकारात्मक भाव निर्माण होतो. आम्ह गेल्या ५ वर्षांपासून टीव्हीचं पाहत नाही असे ते अभिमानाने सांगतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्यांना त्याचा परिणाम जाणवतो असेही ते सांगतात. कोरोना सदृश विषाणूंचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने आपली प्रतिकार शक्ती वाढवावी, त्यासाठी योग्य तो नैसर्गिक आहार घ्यावा व आपले मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असेही ते सांगतात. भारतीय संस्कृतीत नैसर्गिक जीवनशैलीला महत्व दिले आहे ते जाणूनच प्रत्येकाने सिद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले. 

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४ 

Monday 22 June 2020

सामाजिक संवेदनांची सतरा मजली उभी राहणार का ?


परवा काही मित्रांसोबत जळगावची शान असलेल्या "सतरा मजली" इमारतीच्या छतावरुन जळगाव शहराचे सुंदर रुप पाहता आले. सर्वत्र सिमेंटचे जंगल दिसत असले तरी त्यात अपेक्षित असलेली हिरवाई दुर्लक्षून चालणार नाही. अनेक इमारती वा छतांवरील सोलर पॅनल नागरिकांमधील अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचे महत्व समजून घेतल्याचे जाणवले. जी. एस. ग्राउंड व क्रीडा संकुल तरुणाईला खुणावतांना दिसले. रस्ते, बाजारपेठ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, निवासी संकुले व घरे यांचा नेटकेपणा समजला. खरं तर निसर्गाने इतकं भरभरून दिलेले असतांना आपण कायम साशंक, तणावात, विवंचनेत का असतो ? लॉक डाऊन व तत्पश्चात निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्वच जण हतबल झालेले का दिसतात ? हे प्रश्न मात्र सतावत होते. 

"समाजावर आईसारखे निःस्वार्थ प्रेम करु या !" असा संस्कार देणाऱ्या डॉ. अविनाश आचार्य व "सार्थक करु या जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे" अशी शिकवण देणाऱ्या पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या जळगाव शहराचे आपण वारसदार आहोत. त्यांच्या पश्चात अनेकविध सामाजिक संस्था फार मोठे काम करीत आहेत. या गावाने येथील सामाजिक कार्याने निश्चितच आपली एक ओळख निर्माण केली आहे. लॉक डाऊनच्या या काळात सामाजिक संस्थांनी ज्यापद्धतीने आपले योगदान दिले आहे ते नक्कीच आदर्श व तमाम जळगावकरांसाठी अभिमानास्पद असेच आहे. ते गरजूंना अन्नदान असो, रक्तदान असो, किराणा सामानाची व्यवस्था करुन देणं असो, मास्क वितरण करणे असो, आयुर्वेदिक काढा वा आर्सेनिकच्या गोळ्यांचे वितरण असो, स्थलांतरित होत असलेल्या लोकांच्या भोजनाची / पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो खूप मोठे काम जळगावात झाले आपण त्याचे साक्षीदार आहोत. वंचितांना / उपेक्षितांना आवश्यक ते सहकार्य, सामाजिक समस्यांना उत्तर शोधून त्यावर काम करणारी मंडळी हि जळगावची जमेची बाजू म्हटली पाहिजे, मात्र समाजातील सामाजिक संवेदनांची सतरा मजली अजून उभी राहायची आहे असे मला वाटते. 



येथील सामाजिक संस्थांच्या कार्याबद्दल व कार्यकर्त्यांबद्दल परस्पर विश्वासाची गरज आहे असे नेहमीच जाणवते. त्यासाठीच्या आवश्यक असलेल्या संवादाची मर्यादा अनेकदा अधोरेखित होते. एकाच वेळी अनेक कार्यक्रमाची योजना हे त्याचे एक उदाहरण म्हणता येईल. त्यामुळेच असे काम करणाऱ्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांबद्दल "चमकोगिरी" असा केलेला उल्लेख मला वेदनादायी वाटतो. प्रत्यक्ष काम करणाऱ्या सामाजिक संस्था व कागदावरील सामाजिक संस्था यामुळेच संभ्रम आढळतो. कधीही नाव न ऐकलेल्या अनेक सामाजिक संस्था येथे आढळतात आणि काम करणाऱ्या सामाजिक संस्थांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करतात. सातत्याने काम करणाऱ्या अनेक संस्था असल्या तरी येथील सामाजिक प्रश्न मात्र अजूनही प्राथमिक अवस्थेतच दिसतात. याचाच अर्थ असा कि सामाजिक संस्थांच्या कार्याची व्याप्ती अधिकाधिक वाढविण्याची गरज आहे. 

हात मजुरी करुन पोट भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालविणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.  त्यांच्यासोबतच येथील उद्योग व व्यापार जगतातील महत्वाचा कणा असलेल्या नोकरदार मंडळींची संख्या या दोघांच्या बेरजे इतकी आहे. या सर्वांच्याच अस्तित्वाचा प्रश्न महामारीच्या संकटामुळे निर्माण झाला आहे. अलीकडच्या काळात दिसून येणारी वाढती गुन्हेगारी व तरुणांच्या आत्महत्या हे त्याचेच प्रतीक आहे. आगामी काळात सामाजिक संस्थांसाठी या प्रश्नाचे उत्तर शोधणे हे एक मोठे आव्हान ठरणार आहेत.

महामारीच्या या लॉक डाऊनच्या कालखंडात कणखर, खंबीर व दूरदर्शी सामाजिक नेतृत्वाची उणीव शहराला प्रकर्षाने जाणवली नव्हे ती आजही जाणवत आहे. अजूनही शहरातील वाढती रुग्ण संख्या समाजाच्या सक्रियतेची वाट पाहत आहे. समाजाला एकसंघतेने बांधून ठेवून, त्यांच्याकडून कोरोनावर मात करण्याच्या प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य मिळवून देण्यात जळगावकर अपयशी ठरले असे दुर्दैवाने  म्हणावे लागेल. एका बाजूला सामाजिक सौहार्द निर्माण केले पाहिजे तर दुसऱ्या बाजूला समाजाला सामाजिक संवेदनांची जाणीव करुन देत त्यांची सामाजिक प्रगल्भता विकसित होणे अत्यावश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग वाढला पाहिजे. सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे येथील समस्यांचे चिंतन करुन परस्पर सहकार्यातून त्यावर उत्तर शोधले पाहिजे. यातच सामाजिक संवेदनांची सतरा मजली उभी राहणार का ? या प्रश्नाचे उत्तर आहे. "आपण सर्व जळगावकर मिळून लवकरच ती उभारु या !" या विश्वासासह थांबतो. धन्यवाद ! 

Sunday 14 June 2020

"मला कोणी सांगेल का ?"



माणसाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा प्रश्न ! कोणीही मोकळेपणाने हा प्रश्न वयाने मोठ्या वा अनुभवी व्यक्तीला विचारला तर त्याचे उत्तर मिळू शकते. मुळात आपल्याकडे लहानपणापासून असा प्रश्न विचारण्याची वृत्ती वाढविण्याची प्रचंड आवश्यकता आहे. उत्तर मिळालं तर माणूस प्रगल्भ होतो, त्याची काही समस्या असल्यास ती सुटू शकते, त्याला मार्ग सापडतो, तो त्या विषयात मोठी प्रगती करू शकतो, त्याची जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते. लहान वयात खरं तर मुलं प्रश्न विचारतात मात्र त्यांना अपेक्षित उत्तर मिळत नाही किंवा सरळ तुला मोठ्या झाल्यावर समजेल असं सांगून त्याची बोळवण केली जाते. मोठा झाल्यावर त्याला प्रश्न विचारण्यास कमीपणा वाटतो आणि प्रश्न तसंच राहतो.

आशा फौंडेशनने या वर्षी उन्हाळ्यात ऑनलाईन शिबिरे घेतलीत. त्याचं शीर्षकच हा प्रश्न होता. इ. ७वी ते १० वीचे विद्यार्थी प्राधान्याने होती. अतिशय चांगला प्रतिसाद लाभला. एक चांगला माणूस घडविणे हे संस्थेचे ध्येय असल्याने नेहमी असे चाकोरीबाहेरचे वा विद्यार्थ्यांना भावतील असे उपक्रम संस्था राबवित असते. यावर्षीचे शिबीर वरील प्रश्नाला धरुन आयोजित केले होते. एकूण तीन शिबिरे झालीत त्यातील तिसऱ्या शिबिराबद्दल काही सांगू इच्छितो. खरं तर आम्ही विद्यार्थ्यांमध्येच काम करीत असल्याने, त्याबाबत काही अभ्यास असल्याने मुलांच्या मनातील प्रश्न आम्हीच ठरविले. ४५ मिनिटे साधन व्यक्ती त्या विषयावर बोलायची आणि पुढील ४५ मिनिटे प्रशोत्तरे असे स्वरूप होते. सर्वच सत्रे सुमारे दोन तास चाललीत. विद्यार्थ्यांना वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा हा प्रयत्न. संबंधित विषया संदर्भातील त्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे हि अपेक्षा होती.

दि. ११ ते १३ जून दरम्यान हे शिबीर झाले. थोडे विचार करण्यासाठी प्रवृत्त ठरणारे आणि सामान्य पालकांना उत्तरे देण्यासाठी कठीण असलेले विषय आम्ही निवडले होते.  त्यातील विषय होते जगणे, मी कोण ?, पैसा, तंत्रज्ञान, आनंद आणि प्रेम. का ? कशासाठी ? व कसा ? यादृष्टीने साधन व्यक्तीला विषय मांडायचा होता. मी पहिला विषय मांडला तर अन्य विषयांसाठी पुणे येथील महेश लोहार, जयप्रकाश काबरा, मुंबई,  डॉ. रविंद्र वैद्य, पुणे सौ. स्मिता वळसंगकर, पुणे व डॉ. विवेक काटदरे यांनी संवाद साधला. मित्रवर्य सुशील नवाल यांनी उदघाटन केले तर संस्थेच्या मार्गदर्शक डॉ. प्रीती अग्रवाल यांनी समारोप केला. विजय कुळकर्णी यांनी निरीक्षकाची भूमिका सांभाळली. संस्थेने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या शिबिराची परंपरा कायम राखत समाजाप्रती आपली वचनबद्धता लॉक डाऊनच्या काळातही पूर्ण केली.

 जीवन मूल्यांची रुजुवात योग्य वयात व्हावी यासाठी संस्था दरवर्षी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करीत असते. यावर्षी कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शिबीर होईल कि नाही अशी शंका होती. मात्र नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत ऑनलाईन पद्धतीने हे शिबीर घेण्यात आले. तिसऱ्या शिबिराचा कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व रायसोनी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, संस्थेचे मार्गदर्शक डॉ. विवेक काटदरे व निरीक्षक विजय कुळकर्णी यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. 

सर्वच वक्त्यांनी विषयाची मांडणी खूप छान केली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची  संबंधितांनी समर्पक उत्तरे दिली. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांनी न लाजता, इतर जण हसतील का ? असा कोणताही विचार मनात येऊ देता मोकळेपणाने प्रश्न विचारलीत. प्रत्येक सत्रानंतर व समारोपातही अनेकांनी आपला अभिप्राय नोंदवला. विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक व आम्हास प्रोत्साहन देणारा आहे. आयोजक म्हणून मागील शिबिरांप्रमाणेच या शिबीराने उद्देश सफल झाला असे वाटते अर्थात मुलांना जीवन कौशल्ये दिलीत, विचार दिला, संकल्पना दिली, 

विषय १ - जगायचं का ? कशासाठी ? आणि कसं ? - गिरीश कुळकर्णी 

१. आपण जगायचं कशावर ?
२. आपलं ध्येय कसं ठरवायचं ? 
३. कोणत्या जगात जगायचे ? 
४. जगात कसं जगावं हे कसं ठरवावं ?
५. ब्रह्मचर्याश्रम म्हणजे काय ?
६. संन्यासाश्रम आजच्या युगात कसा ?
७. जग कसं जिंकावं ?

मी कोण ? - श्री. महेश लोहार, पुणे 

१. मन स्थिर करणे याचा अर्थ काय ?
२. कधी कधी कळतं पण वळत नाही, असं का होत ?
३. आपला मेंदू कसा नियंत्रित करावा ?
४. "सेन्सरी इंटिग्रेशन ' म्हणजे काय ?
५. 'मी कोण आहे" आपल्याला स्वतःला कसं कळणार ?
६. 'मो कोण आहे ?' असं ठरवतांना जर आपल्याला योग्य वातावरण नाही मिळालं तर काय करायचं ?
७. मी माझ्यामधील चांगल्या क्वालिटीज कशा ओळखू ?
८. स्वतःच ऍनालिसिस कसे करावे ?
९. मला जर्नालिस्ट व्हायचे आहे, मी स्वतःमध्ये कोणते इंटेलिजन्स डेव्हलप करु ?
१०. ब्रेन चांगला करायला काय करावं ?
११. डोक्यातील नकारात्मक विचार कसे घालवावे ?
१२. डोक्यात चांगले विचार आणण्यासाठी काय करावे ?
१३. एक गोष्ट पूर्ण झाली नाही आणि दुसरी गोष्ट करायला घेतली तर त्यात मन का लागत नाही ?
१४. डिस्ट्रॅक्शन असावे कि नसावे ?

पैसा का ? कशासाठी ? कसा ? व किती ? - श्री. जयप्रकाश काबरा 

१. पैसा कोणत्या वयापर्यंत कमवावा ?
२. पैसा कमवायची मर्यादा असते का ?
३. श्रीमंत मानाने असावे कि पैशाने ?
४. पैसे कुठे वाया जातात ?
५. पैसे वाया घालवावे का?
६. पैसा लहानपणापासून साठवून ठेवावा का ?
७. एखाद्या माणसाला मदत केली आणि त्याला नेहमीच त्याची सवय झाली तर ?
८. शालेय जीवनापासून मेहनतीचा पैसा कसा कमवावा ?
९. स्किल आधारित शिक्षण म्हणजे काय ?
१०. पैसा आला कि माणसाला गर्व येतो. हा गर्व कसा दूर करावा ?
११. पैसा कोणता असावा ?
१२. श्रीमंतांना पैशांची किंमत का नसते आणि गरिबांना पैशांची किंमत का असते ?
१३. पैसा कसा साठवून ठेवावा ?

तंत्रज्ञान का ? कशासाठी ? कोणते ? - डॉ. रविंद्र वैद्य 

१. तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय ?
२. साध्य तंत्रज्ञानात हॅकिंगचा वापर जास्त होत आहे. त्यापासून आपण कसे सुरक्षित राहावे ?
३. भविष्यात कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ शकते ?
४. मोबाईल फोन किती वर्षानंतर वापरावा ?
५. तंत्रज्ञान शाप आहे कि वरदान ?
६. तंत्रज्ञान कोणत्या प्रकारचे माध्यम आहे ?
७. तंत्रज्ञानातील स्पर्धा चांगली कि वाईट ?
८. तंत्रज्ञान कशासाठी वापरावं ?
९. तंत्रज्ञानाचा गैरवापर कसा थांबवावा ?
१०. रोबोट माणसांवर राज्य करेल असे घडू शकते का ?
११. तंत्रज्ञानाचा अति वापर केल्याने डोळे व मनावर काय परिणाम होतो ?
१२. गेमिंग इंडस्ट्रीबद्दल आपले मत काय ?
१३. कोणत्या वयापासून सोशल मीडिया वापरावा ?

आनंद का ? कशासाठी ? व कसा ? - सौ. स्मिता वळसंगकर 

१. आपलं दुःख कसं दूर करावं ?
२. राग येऊ नये यासाठी काय करावे ?
३. आपल्याला झालेला आनंद टिकवून ठेवला पाहिजे यासाठी काय करावे ?
४. आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ती गोष्ट सारखी सारखी केली कि कंटाळा येतो , असं का ?
५. नकारात्मकता कशी दूर करावी ?
६. आजास्त आनंद झाला पाहिजे कि जास्त राग यायला पाहिजे ?
७. आपण कधी विचार करतो कि मला एखादी गोष्ट येत नाही; ती नकारात्मकता असते का ?
८. सुखात आणि आनंदात काय फरक आहे ?
९. समाधान आणि आनंद यात फरक काय ?
१०. आनंद कसा कंट्रोल करावा ?
११. आपला आनंद इतरांना पाहवत नसेल तर काय करावे ?
१२. राग कसा कंट्रोल करावा ?
१३. कोणी पडलं तर आपण हसतो, ते कसं कंट्रोल करावं ?

प्रेम का ? कशासाठी ? कसं ? आणि कोणावर ? - डॉ. विवेक काटदरे 

१. प्रेम डेव्हलप करायला काय करावं ? 
२. प्रेम हि गोष्ट मनाने केली पाहिजे का ?
३. मला झाडे लावायला फार आवडते, त्यांना इजा झाली तर दुःख होतं तर ते प्रेम आहे का ?
४. प्रेम निर्व्याज असणे म्हणजे काय ?
५. प्रेम हा आनंदच भाग आहे का ? असेल तर कसा ?
६. प्रेमाची फ्रिक्वेन्सी ५२८ असते म्हणजे काय ?
७. प्रेमाचा अर्थ कसा समजावा ?
८. मन कुठे असते ?
९. समोरच्या व्यक्तीला प्रेम कसं पटवून द्यायचं ?
१०. लव इज मॅटर ऑफ बॅलन्स अँड ऑर्डर म्हणजे काय ?

हे सर्व प्रश्न आपल्या घरातील आपली मुले कसा विचार करतात ? त्यांच्या मनात कोणते प्रश्न असतात ? हे लक्षात येण्यासाठी दिले आहेत. आपण वरील प्रश्न आपल्या मुलांना विचारु शकतात ? व त्यांची योग्य उत्तरे सांगून त्यांची वैचारिक बैठक तयार करु शकतात. आपण शिबीर करु शकला नाही तरी याचा उपयोग आपणास होईल. आपण मुलांना त्यांचे प्रश्न काय हे विचारु शकतात. असे प्रश्न आमच्यासोबत शेअर करावे एव्हढीच अपेक्षा !

गिरीश कुळकर्णी 
कार्यकारी संचालक 
आशा फौंडेशन.

Friday 5 June 2020

हिंदू साम्राज्य दिन आणि आक्रमकांच्या स्मृती संपविणारी अमेरिका


गुरुवार, दि. ४ जून रोजी संपूर्ण भारत वर्षात हिंदू साम्राज्य दिन (शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार)  साजरा केला जात असतांना तिकडे अमेरिकेत आक्रमकांच्या स्मृती संपविण्यासाठी पहिले पाऊल टाकले गेले. "हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा" या ध्यासाने अखंड जीवन समर्पित करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही समस्त भारतीयांसाठी अभिमानाची घटना आहे. आजही हा दिवस हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहास आठवून त्यांना मानाचा मुजरा केला जातो. महाराजांच्या काळात समाजाला एका खंबीर नेतृत्वाची गरज होती. त्या काळात परकीय सत्तांची जुलमी राजवट होती, येथील उन्मत्त मुघल जनतेचे हाल करीत होते. संपूर्ण हिंदुस्थानात हाहाकार माजला होता. अत्याचारी मुघल शासकांमुळे सर्वत्र अराजकता माजली होती. आपसात भांडणे लावून सत्ता उपभोगण्याचे धोरण सर्व परकीय सत्तांनी अवलंबिली. येथील जनतेवर अनन्वित अत्याचार करुन त्यांना गुलाम केले होते. त्यानंतरच्या ब्रिटिश राजवटीतही हेच घडले. 


समाजाला एकत्रित करुन या आक्रमकांच्या विरोधात लढण्यासाठी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या साक्षीने रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याचे तोरण बांधण्याची शपथ बाल शिवबाने घेतली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी अभेद्य असा तोरणा किल्ला जिंकून भगवा फडकावला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वाढत्या वयासोबत त्यांनी आपल्या पराक्रमाची शिकस्त करीत, जिवाभावाच्या मावळ्यांच्या मदतीने सह्याद्रीच्या कुशीतील अनेक गड-किल्ले स्वराज्यात सामील केले.  त्यांच्या पराक्रमाची कीर्ती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. अखंड पराक्रम गाजवित शत्रूंवर तुटून पडत त्यांनी आपली विजयी घोडदौड अखंडपणे सुरु ठेवली. त्यांचा हा पराक्रम पाहून जनतेने भक्कम साथ दिली आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले गेले. सार्वभौमत्वाचा साक्षात्कार व्हावा व रयतेचा राजा म्हणून मान्यता मिळावी यासाठी राज्याभिषेक झालाच पाहिजे. राज्याभिषेक संस्काराखेरीज तुमच्या बहुमोल कार्यास मान्यता नाही हे धर्मशास्त्रातील विद्वान अधिकारी व प्रख्यात पंडित गागाभट्ट यांनी समजावून सांगितल्यावर काशिविश्वेश्वराची धर्माज्ञा महाराजांनी मान्य केली. राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजेच हिंदू साम्राज्य दिवस ! छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे स्मरण या हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने दरवर्षी होत असते. राष्ट्रकार्य व स्वधर्म पालनाची प्रेरणा समाज जागृतीसाठी आवश्यक ठरते. भारताचा अतिशय गौरवशाली इतिहास आजच्या युवापिढीला कळणे आवश्यक आहे. 

दुसऱ्या बाजूला हिंदू साम्राज्य दिनी, अमेरिकेतील व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम (डी) यांनी कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. ली यांचा पुतळा काढण्याची योजना जाहीर केली. ५० फुटांचा पाया असलेला व त्यावर १४ फूट उंचीच्या या पुतळ्याचे १८९० मध्ये अनावरण करण्यात आले होते आणि तेव्हापासून तो रिचमंडच्या वांशिक विभाजनाचे उत्कट चिन्ह म्हणून भावनिक केंद्र आहे. अमेरिकेत सुरु असलेल्या आफ्रिकी अमेरिकन लोकांवरील पाशवी क्रौर्याचा निषेध करण्यासाठी व जातीय न्यायासाठी आंदोलकांनी या स्मारकाचा आधार घेतला आहे. सलग सहाव्या दिवशी हजारोंच्या संख्येने निषेध कर्ते येथे जमले होते. 

कोण होता कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. ली ? त्याचा पुतळा हटविण्याची योजना का ? हे समजण्यासाठी प्रथम आपल्याला थोडा इतिहास विशेषतः १८६१ ते १८६५ दरम्यान अमेरिकेत झालेल्या सिव्हिल वॉर  (गृहयुद्ध) बद्दल जाणून घ्यावे लागेल. हे युद्ध उत्तर अमेरिकेतील (युनियनशी निष्ठावंत) आणि दक्षिणी युनायटेड स्टेट्स (जे युनियनमधून बाहेर पडून स्थापित झालेले होते) यांच्यात झाले. मुख्यतः काळ्या लोकांच्या गुलामगिरीच्या दीर्घकालीन वादाचा परिणाम या गृहयुद्धात झाला होता. एप्रिल १८६१ मध्ये अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या काही काळानंतर अलगाववादी सैन्याने दक्षिण कॅरोलिनामधील फोर्ट सम्टरवर हल्ला केला आणि युद्धाची ठिणगी पडली. उत्तरेकडील युनियनच्या निष्ठावंतांनी, ज्यात काही पश्चिमी व दक्षिणी राज्यांचा समावेश होता त्यांना दक्षिणेतील कॉन्फेडरेट स्टेट्सच्या अलगाववाद्यांचा सामना करावा लागला ज्यांनी गुलामी पाळण्याच्या राज्यांच्या अधिकाराची बाजू मांडली होती. 


फेब्रुवारी १८६१ मध्ये अमेरिकेच्या ३४ राज्यांपैकी दक्षिणेतील ७ गुलामधारक राज्यांच्या सरकारांनी देशाबाहेर गेल्याचे जाहीर केले. कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिका यांनी घटनात्मक सरकारविरुद्ध बंडखोरी केली. कन्फेडरसीने जवळपास ११ राज्यांमधील बहुसंख्य प्रदेशावर ताबा मिळविला होता. केंटकी व मिसूरी या अतिरिक्त राज्यांचाही त्यांनी दावा केला होता आणि त्यांना संपूर्ण गृहयुद्धात कॉन्फेडरेट कॉंग्रेसमध्ये पूर्ण प्रतिनिधित्व देण्यात आले होते. या राज्यांना युनायटेड स्टेट्स सरकारने राजनैतिकदृष्ट्या मान्यता दिली नव्हती. अमेरिकेशी निष्ठावंत असलेली राज्ये संघ (युनियन) म्हणून ओळखली जात. संघ आणि कन्फेडरसीने चार वर्षे दक्षिणेत चाललेल्या या युद्धासाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक व सैन्य भरती केली. या घनघोर युद्धात ६,२०,००० व ७,५०,००० लोक मारली गेली. हे गृहयुद्ध अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्राणघातक लष्करी संघर्ष आहे. ९ एप्रिल १८६५ रोजी कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. ली ने अप्पॉमॅटोक्स कोर्ट हाऊसच्या युद्धालयात युनियन जनरल युलिसिस एस. ग्रांट यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आणि युद्धाचा शेवट झाला. कॉन्फेडरेट जनरलांनी आत्मसमर्पणाचा पाठपुरावा करत २३ जून रोजी दक्षिणेकडील राज्यांमधील शेवटचे आत्मसमर्पण झाले. दक्षिणेच्या बहुतेक पायाभूत सुविधांची विशेषतः रेल्वे मार्गाची खूप मोठी हानी झाली होती. कन्फेडरसी कोलमडली आणि दक्षिणेतील गुलामगिरी संपली. चार दशलक्ष काळे गुलाम मुक्त झाले. 



आता आपल्याला प्रश्न पडला असेल या दोन घटनांचा संबंध काय ? त्यासाठीच हा लेख प्रपंच आहे. मित्रानो, हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्याचे मुख्य प्रयोजन हेच आहे. आपल्या परम पवित्र भारत मातेचा वैभवशाली इतिहास जाणून घेतला पाहिजे. भारतीय परंपरा व संस्कृतीचा केवळ अभिमान बाळगून चालणार नाही तर ती समजून घेतली पाहिजे व तिचा प्रसार समस्त जगतात केला पाहिजे. आत्म विस्मृतीचे षडयंत्र ओळखून आत्मभान जागे केले पाहिजे. तुष्टीकरणातून होत असलेले आपल्या इतिहासाचे विकृतीकरण थांबले पाहिजे त्यासाठीच आपल्या गौरवशाली इतिहास, परंपरा व संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे. राष्ट्रीय महापुरुष व आक्रमक शत्रू यातील भेद समजून घेतला पाहिजे. भारतीय मानबिंदूंच्या बाबतीतही होत असलेली तडजोड हाणून पाडली पाहिजे. यासाठीच अमेरिकेतील घटना आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करते. आपणही यापासून बोध घेऊ या ! आक्रमकांच्या काळ्याकुट्ट इतिहासाच्या स्मृती जागविणाऱ्या गोष्टी संपविण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. आजही आपल्या देशातील अनेक शहरे, गावे, रस्ते ही आक्रमकांच्या नावाने ओळखली जातात त्यांच्या या खुणा संपविल्या पाहिजेत. लेखाच्या शेवटी हिंदू धर्माची पताका जगात घेऊन जाणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या एका अमृत वाचनाने करीत आहे...





आपले पहिले कार्य हे आहे कि, आपली उपनिषदे, आपली पुराणे व आपली अन्य शास्त्रे यांच्यामध्ये पडून राहिलेली आश्चर्यकारक सत्ये या ग्रंथांतून बाहेर काढून, मठांमधून, अरण्यांमधून, विशिष्ट संप्रदायांमधून बाहेर काढून सर्व देशभर पसरली पाहिजेत; मगच ती एखाद्या वणव्याप्रमाणे देशाच्या चारही दिशांना पसरतील; हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत व सिंधूपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत अखिल देश भरुन टाकतील. पाश्चात्य देशात जाण्यापूर्वी मी भारतावर प्रेम करीत असे. आता तर भारतातील धूळही मला पवित्र वाटते, तेथील हवा देखील मला पवित्र वाटते. भारत आता मला परमपवित्र धाम वाटतो, तो माझ्यासाठी आता तीर्थस्थान आहे. उठा, या भारतमातेला जागे करा आणि नवजागृतीच्या  संजीवनीने तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करुन भक्तिभावाने तिची तिच्या चिरंतन सिंहासनावर स्थापना करा. 

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४ 
दि. ६ जून २०२०