Wednesday 2 September 2020

"कृतज्ञता उत्सवा"ची उपलब्धी !


यावर्षीच्या गणेशोत्सवात गणपती बाप्पाकडे काहीही न मागता त्याने आपल्याला जीवनात भरभरुन दिलेल्या गोष्टींबद्दल धन्यवाद देण्यासाठी आशा फाऊंडेशनच्या माध्यमातून  'कृतज्ञता उत्सव' साजरा करावा अशी कल्पना दि. २१ ऑगस्टच्या मध्यरात्री डोक्यात आली व आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सक्रिय सहभागाने यशस्वी झाली. मागे वळून पाहतांना व या उपक्रमाचे सिंहावलोकन करतांना व्यक्तिगत लक्षात आलेल्या काही उपलब्धी व ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन प्रपंच...  आपणही या 'कृतज्ञता उत्सवात' सक्रिय सहभागी होतात. काहींनी लेखन केले, काहींनी वाचन केले. आपण या उपक्रमाकडे कसे पाहता ? आपल्याला काय मिळाले ? आपल्याला या उपक्रमाबद्दल काय वाटते ? आपण या उपक्रमाची यशस्विता कशात पाहता ? मोकळेपणाने जरुर लिहा...

उपक्रमाची उपलब्धी सांगण्यापूर्वी उपक्रम काळातील तीन प्रमुख 'योगायोग' सांगितले पाहिजे. 

१. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सुदैवाने त्या दिवशी ऋषी पंचमी होती. आपल्या तपोबलाने मानवावर अनंत उपकार करणाऱ्या व दिशा दर्शन करणाऱ्या सप्तर्षींबाबत कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा दिवस. 

२. उत्सवाच्या पाचव्या दिवशी आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. दुर्दैवाने त्याच दिवशी सकाळी आमचा जवळचा मित्र (लंगोटी यार) नरेंद्र कुळकर्णी याच्या दुःखद निधनाची बातमी कळली.

३. उत्सवाच्या नवव्या दिवशी निसर्गाप्रतीची कृतज्ञता करण्यात आली. त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून प्रकृती वंदन दिवस साजरा करण्यात आला. ज्यात वृक्षांची पूजा करण्यात येऊन निसर्गाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली व पर्यावरण रक्षणाबाबतचा संदेश देण्यात आला. 

कृतज्ञता उत्सवाची उपलब्धी...

१. कृतज्ञता या सर्वश्रेष्ठ जीवनमूल्याची जाण निर्माण झाली. आपल्यासाठी अनेकांनी अनेक गोष्टी केलेल्या असतात याची जाणीव झाली व त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची भावना निर्माण करता आली. यामुळे परस्पर सदभाव व सकारात्मकता वाढीस लागेल.  

२. सहभागींचा (लेखन, वाचन व प्रसार) दिवसभरातील बहुतेक वेळ भूतकाळातील चांगल्या आठवणींमध्ये गेला. त्यातून लेखन झाले, वाचन झाले, चिंतन झाले, काही जणांशी बोलणे झाले. महत्वाचे 'कोरोना'च्या नकारात्मकतेतून मंडळी काही काळ बाहेर पडली. 

३. समाज माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता त्यात सकारात्मक लिखाण करणाऱ्यांची आवश्यकता आहे. अशी क्षमता असलेल्यांना आत्मविश्वास देता आला. आपल्याला चांगले लिहिता येते, लोक वाचतात हा विश्वास निर्माण झाला. तरुणांचा सहभाग विशेष...

४. एकाच विषयावर किती वैविध्यतेने लिहिता येते. प्रत्येक माणूस किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात, व्यक्त होतात याची जाणीव झाली. लेखन शैली, अनुभव संपन्नता, भाषा समृद्धी झाली. थोडक्यात वैचारिक प्रगल्भता वाढली. 

५. सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने अनेक गावांची व तेथील विशेष गोष्टींची माहिती झाली. शैक्षणिक संस्थांची व तेथील शिक्षकांनी केलेल्या कार्याची माहिती झाली. देशाच्या विविध छटा लक्षात आल्या. काही विशेष व्यक्तींचा परिचय झाला. या सर्वांबद्दलचा अभिमान बळावला. 

६. माणसांचे स्वभाव, त्यांनी इतरांसाठी केलेल्या गोष्टींची व त्याचा किती दूरगामी परिणाम होतो याची जाणीव निर्माण झाली. मानवाचा परस्परातील व्यवहार कळला. अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देतो ते कळले.

७. गणेशोत्सव अशा पद्धतीने साजरा करता येतो व त्यातून अपेक्षित समाज प्रबोधन साध्य करता येते हे शिकलो.

८. संस्थेशी नवीन मंडळी जोडली गेली. त्यांची परस्परात मैत्री झाली. 

जाहीर कृतज्ञता व दिलगिरी 

'कृतज्ञता उत्सव' या सार्वजनिक उपक्रमात समाजाचा सहभाग महत्वाचा. सर्वप्रथम या उपक्रमात सहभागी सर्व समाज बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांनी व्यक्त केलेल्या भावना दुसऱ्या दिवशी इ-स्वरूपात संकलित करुन प्रकाशित केल्या जात होत्या. यासाठी पूजा ग्राफिक्सचे श्री. निलेश कोळी यांचे अनमोल असे सहकार्य लाभले. कोणत्या प्रकारच्या आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता हे काम त्यांनी पूर्ण केले  शेवटच्या दिवशीच्या प्रतिक्रिया रात्री उशिरापर्यंत काम करुन आकर्षक पद्धतीने त्याची मांडणी. एका पानापासून सुरु झालेला हा प्रवास शेवटच्या दिवशी १२ पानांपर्यंत पोहोचला. दररोज ठरलेल्या वेळी त्याचे काम पूर्ण करुन दिले याबद्दल निलेशचे मनापासून धन्यवाद व जाहीर आभार. दररोज आपल्या भावना लिहून पाठविणारे मित्रवर्य व ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, धरणगाव येथील प्रा. बी. एन. चौधरी, सौ. विंदाताई नाईक, जळगावची विद्यार्थिनी कु. मानसी कुळकर्णी, चोपड्याची कु. अर्चना अग्निहोत्री, चाळीसगावचा अक्षय पाटे, श्रीमती सुनंदा कुळकर्णी, माझ्या सहकारी सुजाता बोरकर यांचेही कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो. तसेच श्रीमती शशिकला खाडिलकर, वास्तवातील संध्याकिशोर, रेवती ठिपसे, डॉ. उषा शर्मा, सोलापूर येथील हरिप्रसाद बंडी, पुणे येथील नागेश पाटील, सौ. अपर्णा पाटील-महाशब्दे, सौ. मेधा इनामदार,  चिंचवड (पुणे) येथील सौ. प्रणाली महाशब्दे, मुंबई येथील डॉ. मधुबाला जोशी, सौ. नीलिमा देशपांडे, सौ. वासंती काळे, सौ. गायत्री कुळकर्णी, भुसावळ येथील वैशाली पाटील, सौ, रेवती शेंदुर्णीकर, वैदेही नाखरे, वृषाली कुळकर्णी, सौ. शैला नेवे, जितेंद्र ढाके, अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात याबाबद्दल त्यांचेही मनापासून आभार. समारोपाच्या दिवशी देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या जळगाव नगरीच्या प्रथम नागरिक सौ. भारतीताई सोनवणे , जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. अशोकभाऊ जैन, विश्वस्त व माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील, माजी कुलगुरु डॉ. आर. एस. माळी, ग्रामदैवत श्रीराम महाराज संस्थांचे विद्यमान गादीपती  हभप मंगेश महाराज जोशी, प्र-कुलगुरु डॉ. पी. पी. माहुलीकर, प्राचार्य अनिल राव, दिलीपदादा पाटील, सौ. स्नेहल लोंढे, प्रभात चौधरी, अनिल अभ्यंकर, कप्तान मोहन कुळकर्णी, नाशिक येथील दीपक करंजीकर, मुंबई येथील विसुभाऊ बापट, अनंत भोळे, प्रा. डॉ. राजेंद्र खडायते, प्रा. नितीन बारी, पुणे येथील. ऍड. हेमंत मेंडकी, गिरीप्रेमी उमेश झिरपे,  बंगलोर येथील विजय कुळकर्णी, यजुर्वेंद्र महाजन, डॉ. अपर्णा भट-कासार, अपूर्वा वाणी, धुळे येथील मेधा उज्जैनकर, मनीष कासोदेकर, अकोल्याच्या सौ. मोहिनी मोडक, मंजुषा भिडे, अपूर्वा चौधरी, किरण बोरसे, जालना येथील लताताई देशपांडे युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे चिन्मय संत, वैभवी कुळकर्णी, कीर्ती शर्मा, कल्याणी कुळकर्णी, ऐश्वर्या परशुरामे  यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या सहकारी सुजाता बोरकर यांनी प्रकृती अस्वास्थ्य असतांनाही दररोज या नाकाचे मुद्रितशोधनाचे काम केले, त्यांचेही विशेष धन्यवाद ! ज्यांनी मातीतून, रांगोळीतून, चित्रकलेतून, पानाफुलातून विविध रूपातील श्रगणेश साकारले त्यांचेही मनापासून धन्यवाद ! ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी हा उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. 

दिलगिरी 

श्री. प्रदीप रस्से यांनी खास लेखाचे सादरीकरण उत्कृष्ट होण्यासाठी दिलेले छायाचित्र तसेच अक्षय पाटे, वास्तवातील संध्याकिशोर व माझी आई श्रीमती सुनंदा कुळकर्णी यांच्या एका दिवसाच्या कृतज्ञता भावना   माझ्या चुकीमुळे प्रकाशित करण्याचे राहिले मी त्यांची जाहीर माफी मागतो. वरील श्रेयनामावलीत कोणाचा चुकून उल्लेख राहिला असेल त्यांचीही दिलगिरी व्यक्त करतो. 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Tuesday 1 September 2020

मी कृतज्ञ पुण्यभू भारत मातेचा !


आशा फौंडेशनच्या गणेशोत्सवांतर्गत "कृतज्ञता उत्सवा"चा आजचा शेवटचा दिवस ! आम्हास सांगतांना विशेष आनंद होतो कि आपल्या परम पवित्र भारत मातेबद्दल सुमारे ६० जणांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. जळगावच्या प्रथम नागरिकापासून ७ हजार कोटींचा उद्योग समूहाच्या प्रमुखापर्यंत, कुलगुरुंपासून शिक्षण तज्ज्ञांपर्यंत, बंगलोरपासून चोपड्यापर्यंत, ज्येष्ठांपासून ते अलीकडच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांपर्यंत, संस्कृतपासून इंग्रजीपर्यंत म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या या पुण्यभू भारतमातेच्या विविधतेचा परिचय देणाऱ्या सुपुत्रांचा यात सहभाग आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, विचारांनी व आचरणाने या पवित्र देशाचे मांगल्य सांगितले आहे. सोबत तीचे उतराई होण्यासाठी काय करत आहे आणि काय केला पाहिजे याचा सुंदर उहापोह केला आहे. धर्म, जाती, पंथ, संप्रदाय, भाषा, प्रांत या विविधतेची आपणास अनुभूती होईल. देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराबद्दल येथील इतिहासाबद्दल, क्रांतिकारकांबद्दल, लोकशाहीबद्दल, स्वातंत्र्याबद्दल, ऋषी मुनी, योगा, आयुर्वेद, थोर विचारवंत, उद्योजक, समाज सुधारक आदींबद्दल आपल्या मर्यादेत सर्वांनी व्यक्त होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या देशबांधवांच्या मनोभूमिका साकारणाऱ्या या परमपवित्र भारत मातेला कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. 

मला आपल्या देशाचा अभिमान आहे. कारण हा माझा देश आहे. हि माझी जन्मभूमी आहे. मी तिला माता मानतो. तीचे पावित्र्य आणि महत्व जाणतो. मला ती सजीव वाटते व वंदनीय वाटते. मोठ्या अभिमानाने मला माझ्या या मातेला वंदन करतांना वंदे मातरम ! म्हणायला आवडते. आपल्या देशाचा जो इतिहास आहे. तो वाचतांना, ऐकतांना व जाणून घेतांना माझ्या अंगावर रोमांच उठतात. हा इतिहास मला आपला वाटतो. येथील संस्कृती मला माझी संस्कृती वाटते. येथील थोर माहात्म्यांना मी माझे आदर्श मानतो. येथील चांगल्या गोष्टींचा मला अभिमान वाटतो. यासाठीच हि कृतज्ञता ! 

शालेय जीवनात दररोज भारत मातेचे महन्मंगल स्तोत्र ऐकले. कालांतराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषद यांच्या तत्त्वज्ञानाने राष्ट्राबद्दलचे प्रेम, भक्ती शिकलो. सामाजिक जीवनातील आपले आचरण त्याअनुरुप करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून या साऱ्या गोष्टी करता येतात याचा अनुभव घेतो. प्रामाणिकपणाला कष्टाची जोड देत आपल्यामुळे कोणालाही आपली मान खाली घालावी लागणार नाही याची काळजी घेतो. आज पर्यंत या उत्सवात त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली त्या सर्वांच्या संस्कारातून देशाचा एक चांगला नागरिक म्हणून आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडीत आहे. याची रुजुवात मात्र "जयोस्तुते.." या स्तोत्रातूनच झाली. "तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण" हे कायमस्वरुपी हृदयात कोरलं गेलं. ९० च्या दशकाच्या सुरवातीला संगणकशास्त्र विषयाची पदवी घेऊन सुद्धा आपल्या देशाबाहेर जायचे नाही हे ठरविले. ऐन उमेदीच्या काळात कायमस्वरुपाची बँकेतील नोकरी सोडून सामाजिक कामाची एक वेगळी वाट चोखाळू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याद्वारे या देशाची, देशातील जनतेची सेवा करु शकतोय याचा मला विशेष आनंद आहे. अनैतिक गोष्टी कधीही करायच्या नाही असे ठरविले आणि त्यासाठी कटिबद्ध आहे. 

हुंडा व भ्रष्टाचारासारख्या अनिष्ट रुढी थांबविण्यासाठी स्वतःपासून सुरवात केली. आपण सारे या भारत मातेची लेकरे असल्याने प्रत्येकाला कायम मदतीचा हात देतो. माझ्या सर्व बांधवांमध्ये असलेल्या सद्गुणांकडे पाहतो. त्याच्या प्रगतीत आपला सहभाग असावा यासाठी प्रयत्न करतो. प्रकृती, विकृती व संस्कृतीचा अर्थ समजून घेत त्या प्रमाणे आचरण ठेवतो. "Life is for one generation but Good Name is forever " या उक्तीनुसार आपल्या देशासाठी जे जे काही चांगलं करता येईल याचाच कायम विचार करतो. मला या देशाने जे भारतीय तत्वज्ञान दिलं आहे त्याचा अभ्यास करतो. जीवनात भारतीय जीवनशैली अंगिकारण्याचा प्रयत्न करतो. 

मला समज आल्यापासून कधीही १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे झेंडावंदन चुकविलेले नाही. सकाळ थोडी गडबडीची, कुठे भारत माता पूजन, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम कधीतरी मित्र परिवारासह सहल असा काहीसा दिवस जात असे, वर्तमानपत्रात जाहिरातदारांनी या दिवसाला कसे महत्व दिले वा वृत्तपत्रांनी काय वेगळे वाचकांना दिले हे पाहणे हि एक आवडीची गोष्ट असे. सायंकाळी देशाच्या पंतप्रधानांनी देशाला कोणत्या मार्गावर नेण्याचे ठरविले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे. कधी तरी आपल्या तिरंग्याचा सन्मान वाढावा यासाठी प्लास्टिक वा अन्य स्वरुपातील प्रतीकात्मक झेंड्याच्या विक्रीवर बंदीची मागणी, कधी तरी लोकांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या बाजूला, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अगदी गटारीत पडलेले झेंडे गोळा करुन ते प्रशासनाला नेऊन देणे यासारखे उपद्व्यापही केले. विद्यार्थी दशेत न चुकता स्वातंत्र्य दिवस १४ ऑगस्टच्या रात्री मशाल यात्रा काढून १२ वाजता राष्ट्रगीत म्हणून साजरा केला आहे. 

भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित ठेवणारा, आपणास स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनामवीरांना , क्रांतीकारकांना आणि ते अबाधित ठेवणाऱ्या भारतीय सशस्त्रदलांच्या जवानांना, आपल्या देशाच्या तिरंग्याला अभिमानाने अभिवादन करतांना मला प्रचंड अभिमान आणि आनंद होतो. आपल्या देशाची महान संस्कृती व येथील अस्मितांबद्दल स्वाभिमान बाळगण्याचा प्रयत्न करतो. देशातील बलाढ्य लोकशाही असलेल्या या देशाचा कारभार पाहून सर्व जग अनेकदा स्तंभित व अचंबित होते हेच माझ्या भारत मातेचे वैशिष्ट्य आहे. "हे विश्वची माझे घर !" आणि "जो जे वांछील तो ते लाहो !" अशी संकसृती असलेल्या देशाला परमवैभवाला नेण्यासाठी कटिबद्ध होऊ या ! भारतीय चिंतनातून विश्वकल्याण होऊ हिच त्या बा गणरायाचरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४