Saturday 5 December 2020

वॉर अँड पीस



मागील सोमवारी समाजासाठी विशेषतः:समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काही तरी विशेष, भव्य-दिव्य करु इच्छिणाऱ्या, सामाजिक कार्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या आमटे कुटुंबातील शीतलताई आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळली. मन सुन्न झाले. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. इतक्या टोकाचे पाऊल एक महत्वाकांक्षी, संवेदनशील, इतरांसाठी प्रेरणादायी व ध्येयनिष्ठ व्यक्ती कसा घेऊ शकते ? या एका प्रश्नाकरिता मन अस्वस्थ होते. स्व. बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी सोहोळ्याचा (२०१४) साक्षीदार असलेल्या माझ्या सारख्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्याला प्रश्न पडणे स्वाभाविकच ! मात्र याच संवेदनशीलतेमुळे विषयाचे गांभीर्य, आवाका व व्याप्ती लक्षात घेता कुठलीही घाई न करता विचारपूर्वक व जबाबदारीने व्यक्त होण्याचे ठरविले. गेले ६ दिवस या विषयावरील माध्यमातील मते मतांतरे, टीका टिप्पणी, व्हिडीओ पाहतोय. कोण चूक, कोण बरोबर, कोणावर अन्याय, पुढे काय ? हे प्रश्न आहेतच मात्र माझ्यासाठी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आत्महत्याच का ? 



गेली अनेक वर्षे हा प्रश्न अक्षरश: छळतोय. त्यात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात आमच्याच कुटुंबातील सदस्याने केलेल्या आत्महत्येमुळे याबाबत स्वामी विवेकानंद जयंतीला काही ठोस करण्याची योजना आखली होती. दुर्दैवाने महामारीमुळे तो विषय थांबला. महामारीने निर्माण केलेल्या अनेक सामाजिक समस्यांनी अनलॉकच्या काळात अनेकांना हा पर्याय निवडण्यास बाध्य केले. माध्यमातील या बातम्यांनी मन विषण्ण होते. अनेकदा माध्यमे या बातम्या का देतात असा प्रश्नही पडतो कारण या बातम्या मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तीसाठी नकारात्मक प्रेरणा ठरतात असे मला नक्की वाटते. वैयक्तिक भेटीतून स्थानिक संपादकांना सहज बोललो देखील...या बातम्या टाळता येणार नाही का ? सार्वजनिक कार्यक्रमात, प्रशिक्षणात, व्याख्यानातून या विषयावर तरुणांशी आवर्जून बोलतो हे खरे असले तरी बातमीतील त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही आणि त्याला थांबवू शकलो नाही याचे दुःख मनाला बोचणी देत राहते. असो.

शीतलताईंनी आत्महत्येच्या दिवशी ट्विटर हॅण्डलवर एक चित्र सामायिक केले होते आणि त्याला शीर्षक होते " वॉर अँड पीस ". मला हे वाक्य त्यांच्या मनाची तगमग व परिस्थितीची कल्पना देणारे वाटते. जीवनातील अनेक आव्हानांना, संघर्षांना माणूस सामोरे जातच असतो. रोज मरणाची लढाई ती हिच, अशाच पद्धतीने तो जगत असतो. हि लढाई तो लढत असतो कारण त्याला हवी असते शांतता...मानसिक शांती, आत्मिक समाधान... ताईंना हि मानसिक शांती मिळविण्यासाठी आत्महत्या हा पर्याय योग्य वाटला असेलही पण...  मग प्रश्न येथूनच सुरु होतो. अशी कोणती लढाई होती कि ज्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही ? बाह्य जगतातील लढाईबद्दल बरंच बोललं जातंय... कौटुंबिक वाद, सहकाऱ्यांशी वाद अन्य... पण त्यावर हा पर्याय नक्कीच त्या निवडणार नाही. त्यातील काय योग्य अयोग्य याच्या तपशिलात मी जाणार नाही कारण मी त्यासाठी पात्र नाही वा मला त्याबाबत माध्यमातील गोष्टींशिवाय काहीही माहिती नाही आणि त्याची सत्यता (?)...  



माझ्या मते हि लढाई बाहेरच्या जगापेक्षा अंतर्गत जगाची अधिक असावी. एव्हढा मोठा परिवार सांभाळत असतांना लागणारे आर्थिक पाठबळ... ते उभे करण्याचे आव्हान... भविष्यात करावयाच्या गोष्टींसाठी लागणारे पाठबळ, त्यासाठीचे मार्ग... आव्हानांची मालिका... जीवनात कराव्या लागणाऱ्या वैचारिक तडजोडी, जबाबदारी सांभाळत असतांना आपण कुठेतरी कमी पडतो आहोत हि भावना, एका बाजूला ७० वर्षांची विश्वासार्हता आणि दुसऱ्या बाजूला "लोक काय म्हणतील ?" याची बोचणी... त्यातून निर्माण होणारे मानसिक द्वंद्व. संवेदनशील कार्यकर्त्यांसाठी तसे हे नेहमीचेच असते. त्यामुळे एव्हढा टोकाचा निर्णय ? संस्था संचालन करीत असतांना असे मानसिक द्वंद्व नेहमीचेच असते. आमटे परिवारातील सदस्यांसाठी ते अजिबातच नवीन नाही. काम करीत असतांना समोरील आव्हानाचे उत्तर जवळ असतांनाही "करावे कि न करावे ?", "To be or Not to be..." ची परिस्थिती खूप मानसिक गोंधळ निर्माण करते. एका बाजूला व्यवहार आणि दुसऱ्या बाजूला भावना यांचा समतोल साधणे अनेकदा कार्यकर्त्याला कठीण जाते. 

शीतलताई खरं तर याबाबतीत अनेकांच्या आदर्श होत्या. त्यांनी अनेक प्रकल्प, उपक्रम ज्या पद्धतीने साकारले, चालवले त्यावरून त्यांना हे असे अनुभव नवीन नक्कीच नाही. मग असा कोणत्या विषयावरील अंतर्गत मानसिक वा वैचारिक संघर्ष त्यांना या निर्णयाकडे घेऊन गेला असेल ? आपली हरविलेली मानसिक शांती मिळविण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब करावासा का वाटला नसेल ? एका बाजूला आनंदवनात घेतलेले जीवन शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमधून घेतलेले शिक्षण काय कमी पडले ? का या दोहोंच्या ताळमेळातच गडबड झाली. सामाजिक कार्यकर्त्याची हि अशी स्थिती अनेकदा होते. अनेक चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा असूनही करता न येणे ? त्याठिकाणी आपली मूल्ये, तत्वे, धोरण याबाबत आपल्याच मनात शंका निर्माण होणे हे फार कठीण असते. संस्थेचा मूळ आत्मा सांभाळून त्याला तारुण्य बहाल करण्याचे आव्हान स्वीकारण्यात काही अडचणी होत्या का ? त्यातून निराशा, हतबलता, नैराश्य येते. माणूस अनेक अंगाने, मार्गाने त्यावर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. ताईंना यावेळी मात्र तो मार्ग सापडला नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. 

आम्ही एका संवेदनशील, धडाडीच्या, स्वप्नाला कवेत घेणाऱ्या कार्यकर्तीला मुकलो हे नक्की. आमटे परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर देवो हीच प्रार्थना ! 

जाता जाता- लिओ टॉलस्टॉय यांची "वॉर अँड पीस" या विषयावरील एक प्रसिद्ध कादंबरी असल्याचे वाचनात आले. मी ती वाचलेली नाही. मात्र त्या संदर्भातील अधिक माहिती वाचली असता त्याचा संदर्भ ताईंच्या ट्विटशी असावा का असे वाटून गेले ? . 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४


Tuesday 1 December 2020

आपले आयुष्य आपल्या हाती !



सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना आपल्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. खरं तर  आजचीही चिंता आहेच परंतु माणूस नेहमी भविष्याचा जास्त विचार करतो. काही माणसांना काहीतरी मार्ग निघेल असे वाटते, काहींना वाटते जे सर्वांचे होईल ते आपले होईल तर काही जणांना वाटते आता काही खरं नाही संपलं सगळं ! माणसाच्या या विचार करण्याच्या पद्धतीवरुन त्यांचे आचरण ठरते. त्याप्रमाणे त्यांचे प्रकार वा स्वभाव वैशिष्ट्ये ठरतात. कोणी आशावादी, तर कोणी निराशावादी, कोणी हताश तर कोणी बिनधास्त, कोणी गंभीर तर कोणी खुशालचेंडू. मग नक्की माणसाचे भविष्य कसे ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. आपण त्याचा उत्तर शोधण्याचा या लेखातून प्रयत्न करणार आहोत. 

आपल्या भविष्याबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न माणूस वेगवेगळ्या पद्धतीने करीत असतो. काही जणांना ते वर्तमानपत्राच्या राशी भविष्यातून मिळते तर काही आपली कुंडली तपासून पाहतात तर काही हात दाखवूनही शोधतात. यातील शास्त्रावर आधारित गोष्टींबद्दल मला काही म्हणायचे नाही मात्र भंपक व लोकांना फसविणाऱ्या गोष्टींबाबत नागरिकांनी जागरुक होण्याची गरज आहे. मला असे वाटते कि, आपले आयुष्य आपल्या हातात आहे. कसे ते विस्ताराने समजून घेण्याचा प्रयत्न करु. यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने स्वतःला तीन महत्वाचे प्रश्न विचारावे असे मला वाटते. ज्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळाली त्याला त्याच्या भविष्याची दिशा मिळाली असे समजण्यास हरकत नाही. तसे म्हटले तर अतिशय सोपे प्रश्न आहेत हे. भारतीय तत्वज्ञानात या प्रश्नांची उत्तरे आहेत. हे तत्वज्ञान पुस्तकात नसून आपले आई-वडील व कुटुंबीय सहजपणे ते आपल्या मनावर बिंबवत असतात. मात्र समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा त्यावर परिणाम होतांना आपल्याला दिसतो. अर्थात त्याचे मूळ तीन प्रश्नांमध्ये आहे. काय आहेत प्रश्न ? पाहू या ! 


प्रश्न १ - का जगायचं ? 

आपण जन्माला तर आलोय पण आपल्या जीवनाचे नक्की उद्दिष्ट काय. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे.. आनंद, समाधान, सुख, यश ? पुन्हा प्रश्न नक्की आनंद म्हणजे काय ? सुखी माणूस कोण ? समाधान कशात असते ? ते कुठे मिळते ? यश कशाला म्हणतात ? यशाची आपली व्याख्या काय ? आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये या प्रश्नांची उत्तरे बदलत जातात. हि प्रश्न उलगडत जातात. यांची उत्तरे आपल्याला सापडतात. बऱ्याच वेळेस लोक काय म्हणतील म्हणून अनेक गोष्टी आपण आपल्या मनाविरुद्ध करतो आणि तेथेच गाडी आपला मार्ग बदलते.मागे वळून पहिले तर आपण कुठे होतो ? आपल्याला कुठे जायचे होते ? कशाचेही उत्तर मिळत नाही आणि माणसाची अवस्था संभ्रमाची होते. अशा वेळेस माणूस चुकीच्या मार्गाची निवड करतो आणि फसतो.


प्रश्न २- कसे जगायचे ?

जीवनाचे उद्दिष्ट एकदा निश्चित झाले कि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा ? हे ठरविणे अगत्याचे ठरते. याला आपण धोरण असेही म्हणू शकतो. जीवनाचे मूलभूत तत्व शाळेत मूल्य शिक्षणातून शिकविली जातात. मात्र आपण त्याकडे डोळसपणे पाहतो का ? हा खरा प्रश्न आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद साधला तर आपल्याला प्रश्नांची वास्तव व योग्य उत्तरे मिळतात. पण आपला स्वतःचा स्वतःशी संवादच हरवला आहे म्हटल्यानंतर उत्तर सापडणे कठीण जाते. यासाठी आदर्श जीवनपद्धती स्वीकारुन तर काही वेळेस आपली स्वतःची जीवनशैली विकसित करुन जगणारी माणसे आपल्या अवतीभोवती असतात. ती आपल्याला परग्रहावरची वाटतात,  तेथेच आपण चुकतो आणि बहुसंख्यांच्या मार्गावरुन चालतो. जीवनात काय करायचे, काय नाही करायचे हे ठरविणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी आपण आपली स्वतःची काही मूलभूत तत्वे समजून उमजून ठरविली पाहिजे व त्यानुसारच आपले आचरण असले पाहिजे.


प्रश्न ३- आनंदी कसे राहायचे ?

सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हा.जीवनात सर्व काही मिळवायचे असते त्याला कारण असते जीवनाची कृतार्थता ! आपण जे काही करतो त्यातून आनंद मिळविण्यासाठी... पण आपण आनंदी होतो का ? एखादी गोष्ट ठरविली आणि आपण ती मिळविली तर आपण संतुष्ट होतो का ? आपल्याला आनंद होतो का ? मुळात आनंदाची आपली स्वतःची संकल्पना स्पष्ट आहे का ? आनंद देण्यात असतो ना कि मिळविण्यात. पण हे समजण्यासाठी खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागतो. त्याची सवय लावावी लागते. त्यासाठी आवश्यक असणारा संयम व सातत्य अंगी बाणावे लागते. तात्काळच्या (इंस्टंटच्या) या युगात या दोनही गोष्टी माणसापासून दूर जाऊ लागल्या आहेत. त्यावर खूप सारे काम करण्याची गरज आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून माणसाला अपेक्षित असलेला आनंद मिळू शकतो. दुर्दैवाने आपली परिमाणे आपल्या समाधानावर अवलंबून नसतात तर समाजातील इतर घटकांवर व खोट्या प्रतिष्ठेवर अवलंबून असतात. त्यामुळेच आपला मार्ग चुकतो आणि आपल्याला आनंद होण्याऐवजी दुःखच अधिक होते. 

मी ज्या वेळेस आपले भविष्य आपल्या हाती म्हणतो त्यावेळेस वरील संकल्पना आपल्या स्पष्ट आहेत असे गृहीत धरले आहे. तसेच सोबतीला अन्य काही गोष्टींची माहिती व कल्पना आपल्याला आहे असे गृहीत धरलेले आहे. आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी मला माझी स्वतःची ओळख आहे का ? ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य माझ्यामध्ये आहे का ? आपल्याला अपेक्षित असलेले ज्ञान आहे का ? आपण कोण आहोत ? आपल्यामध्ये काय आहे जे इतरांमध्ये दुर्मिळ आहे, हे सांगता येईल का ? वास्तव स्वीकारण्याची व अपयशाला सामोरे जाण्याची जिद्द माझ्यात आहे का ? जीवनात आव्हानांना स्वीकारायची माझी तयारी असते का ? मेहनत करण्याची व स्वतःत बदल करण्याची माझी तयारी आहे का ? जीवनात आवश्यक असणारी जोखीम स्वीकारण्याची माझी तयारी आहे का ? मिळालेल्या अपयशाची जबाबदारी मी घेतो का कि अन्य कोणावर तरी त्याचे खापर फोडून मोकळे होतो  

अतिशय छोट्या वाटणाऱ्या या गोष्टी आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देणाऱ्या आहेत. समाजातील अनेक यशस्वी व कर्तृत्ववान लोकांना आपण आदर्श मानतो मात्र त्यांची एकतरी गोष्ट आपण आपल्या जीवनात अंगिकारतो का ?  कुठे अडचणी येतात, त्यावर मात कशी करतो ? एखाद्या गोष्टीसाठी आवश्यक असणारे बदल करण्यासाठी मी स्वतःहून पुढाकार घेतो का ? सद्यस्थितीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण या प्रश्नांचा विचार करायला सुरुवात करु या ... आणि सिद्ध करु या ! आपले आयुष्य आपल्या हातातच असते. 


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Sunday 25 October 2020

आपल्या सवयींचे सीमोल्लंघन...हिच जगण्याची खात्री



सध्याच्या कोविड महामारीच्या काळात माणसाला जगण्याची खात्री हवी आहे. जोपर्यंत त्यावरील उपाय बाजारात येत नाही तो पर्यंत आपल्या सवयींचे सीमोल्लंघन करण्याचा हा काळ आहे. हे सीमोल्लंघनच आपल्या जगण्याची खात्री व यशस्वी वाटचालीची नांदी ठरणार आहे. सवयींचे गुलाम असलेल्या आपल्या सर्वांना गेले सहा-सात महिन्यांच्या काळात आपण स्वतःला बदलण्याची पूर्ण संधी उपलब्ध होती. काही गोष्टींच्या बाबतीत व काही प्रमाणात आपण त्या अंगिकारला मात्र मूलभूत सवयीकडे आपण सपशेल दुर्लक्ष केलेले दिसते. त्यासाठीच हे लेखप्रपंच ! 

अनलॉकच्या या काळात बाहेर जे दिसले आणि रोज जे ऐकतोय त्यामुळे सवयीच्या सीमोल्लंघनाची आवश्यकता लक्षात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी समाज प्रबोधनातून या गोष्टीकडे लक्ष वेधले. "न्यू नॉर्म" अर्थात नवीन जीवनशैली असा उल्लेख मला विशेष भावला. कालपर्यंतच्या आपल्या सवयींना बदलले तर आपण "न्यू नॉर्म" सेट करु शकू व जीवनाचा आनंद घेऊ शकू. गेल्या काही दिवसात गावाकडे गेलो असता कोणाही व्यक्तीच्या तोंडावर मास्क नसल्याचे पाहून आश्चर्य वाटले. समाज माध्यमातून येणाऱ्या सामाजिक कार्यक्रमातील व्यक्तींचे वर्तन, कालही संध्याकाळी जळगावच्या काव्य रत्नावली चौकामधील अनुभवलेले चित्र अतिशय भयावह, बेपर्वाई व बेजबाबदारीचेच होते. थोडे वाचायला कटू वाटले तरी वास्तव मांडलेच पाहिजे. गेल्या काही दिवसात अनेकांशी झालेला संवाद, नातेसंबंधातील साठीच्या उंबरठ्यावरील व्यक्तीच्या दुर्दैवी निधनाची बातमी, उच्च रक्तदाबाचा शिकार झालेला पन्नाशीतील मित्र आणि "काय बोलावं तेच सुचत नाही" म्हणणारी चाळीशीतील गृहिणी हे या लेखामागची प्रेरणा आहे. 

तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे अबोल होत जाणारी तरुणाई, भान हरपलेला समाज, मनातील सर्व प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या जिवाभावाच्या आश्वासक मित्राचा अभाव, आर्थिक असुरक्षिततेमुळे निर्माण झालेली अनिश्चितता, अनाकलनीय परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीची निर्णयक्षमता, आत्ममग्नतेमुळे जीवनातील हरविलेला आनंद, समाजातील नकारात्मक घटनांचा होत असलेला विपरीत परिणाम,  यासह अनेक गोष्टी या लेखाचे व समस्यांचे मूळ आहे. काळ, वेळ व परिस्थितीनुरुप बदल अंगिकारण्याची मानसिकताच आपल्याला उपयोगी ठरणार आहे.  एका बाजूला शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची तयारी व दुसऱ्या बाजूला "स्वओळख" बदलण्याची भीती अशा विमनस्क स्थितीत समाज आहे. आपल्या पश्चात काय ? हा प्रश्न वारंवार अनेक मानसिक गोंधळ निर्माण करीत आहे. आपल्या गरज व आवश्यकता मर्यादित करण्याचे मोठे आवाहन समाजासमोर आहे. यासाठीच वर्तन परिवर्तनाची आत्यंतिक आवश्यकता आहे म्हणूनच लेखाचे शीर्षक आहे सवयींचे सीमोल्लंघन ! 

हे सर्व वाचल्यानंतर स्वाभाविक प्रश्न येतो सवयींचे सीमोल्लंघन कसे करायचे ? 

१. समाजाभिमुख व्हा... व्यक्त व्हा... बोला... काय म्हणायचे ते म्हणा...

२. वास्तव स्वीकारा. जे बदलता येणार नाही व जे बदलणे आपल्या हातात नाही ते सोडून द्या...

३. जीवनात सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत याचा वस्तुपाठ मनाला घालून द्या. 

४. कोण्तायही कामाची लाज न बाळगता आपली नवीन ओळख निर्माण करा. 

५. आनंदी राहा... सकारात्मक राहा.... 

६. आपला स्क्रीन समोरील वेळ कमी करण्याचा निश्चयी प्रयत्न करा. 

७. इतरांना द्यायला शिका. (वेळ, पैसे, मदत जे पण शक्य असेल ते)

८. मानवी जीवनाची इतिकर्तव्यता कशात आहे ते जाणून घ्या. 

९. जगण्यासाठी पैशांपेक्षाही मानसिक बळ अधिक महत्वाचे ठरते हे समजून घ्या. 

१०. ज्या गोष्टी आयुष्यात कधी केल्या नाहीत त्या करण्याची तयारी ठेवा. 

११. गर्दीपासून लांब राहा. योग्य ती काळजी घ्या. 

१२. दूरदर्शनवरील प्रेरणा, उभारी, मानसिक बळ उंचावणाऱ्या व निखळ मनोरंजनाच्या गोष्टीचं पहा. 

१३. कोरोना पासून बचाव करण्यासाठीच्या सर्व सूचना अमलात आणा. 

१४. "काही फरक पडत नाही" व "जे सर्वांचे होईल ते आपले होईल" ही वृत्ती सोडा. 

१५. "हिच आमुची प्रार्थना...", " तू बुद्धी देवा... तू तेज दे" यासारख्या प्रार्थना वारंवर ऐका. 


ही यादी तशी व्यक्ती सापेक्ष असल्याने बरीच मोठी होऊ शकेल मात्र त्यातील सर्वांसाठीच्या काही साधारण गोष्टी येथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पैकी ज्यांना कोणाला या संदर्भात काही बोलायचे असेल, संवाद साधायचा असेल, चर्चा करायची असेल त्यांनी नक्की फोन करा. माझ्यापरीने समाधान करण्याचा निश्चित प्रयत्न करीन. आपल्या सवयींचे सीमोल्लंनघन हेच जगण्याची खात्री देण्याची शक्यता आहे. 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४


Wednesday 2 September 2020

"कृतज्ञता उत्सवा"ची उपलब्धी !


यावर्षीच्या गणेशोत्सवात गणपती बाप्पाकडे काहीही न मागता त्याने आपल्याला जीवनात भरभरुन दिलेल्या गोष्टींबद्दल धन्यवाद देण्यासाठी आशा फाऊंडेशनच्या माध्यमातून  'कृतज्ञता उत्सव' साजरा करावा अशी कल्पना दि. २१ ऑगस्टच्या मध्यरात्री डोक्यात आली व आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सक्रिय सहभागाने यशस्वी झाली. मागे वळून पाहतांना व या उपक्रमाचे सिंहावलोकन करतांना व्यक्तिगत लक्षात आलेल्या काही उपलब्धी व ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन प्रपंच...  आपणही या 'कृतज्ञता उत्सवात' सक्रिय सहभागी होतात. काहींनी लेखन केले, काहींनी वाचन केले. आपण या उपक्रमाकडे कसे पाहता ? आपल्याला काय मिळाले ? आपल्याला या उपक्रमाबद्दल काय वाटते ? आपण या उपक्रमाची यशस्विता कशात पाहता ? मोकळेपणाने जरुर लिहा...

उपक्रमाची उपलब्धी सांगण्यापूर्वी उपक्रम काळातील तीन प्रमुख 'योगायोग' सांगितले पाहिजे. 

१. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सुदैवाने त्या दिवशी ऋषी पंचमी होती. आपल्या तपोबलाने मानवावर अनंत उपकार करणाऱ्या व दिशा दर्शन करणाऱ्या सप्तर्षींबाबत कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा दिवस. 

२. उत्सवाच्या पाचव्या दिवशी आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. दुर्दैवाने त्याच दिवशी सकाळी आमचा जवळचा मित्र (लंगोटी यार) नरेंद्र कुळकर्णी याच्या दुःखद निधनाची बातमी कळली.

३. उत्सवाच्या नवव्या दिवशी निसर्गाप्रतीची कृतज्ञता करण्यात आली. त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून प्रकृती वंदन दिवस साजरा करण्यात आला. ज्यात वृक्षांची पूजा करण्यात येऊन निसर्गाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली व पर्यावरण रक्षणाबाबतचा संदेश देण्यात आला. 

कृतज्ञता उत्सवाची उपलब्धी...

१. कृतज्ञता या सर्वश्रेष्ठ जीवनमूल्याची जाण निर्माण झाली. आपल्यासाठी अनेकांनी अनेक गोष्टी केलेल्या असतात याची जाणीव झाली व त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची भावना निर्माण करता आली. यामुळे परस्पर सदभाव व सकारात्मकता वाढीस लागेल.  

२. सहभागींचा (लेखन, वाचन व प्रसार) दिवसभरातील बहुतेक वेळ भूतकाळातील चांगल्या आठवणींमध्ये गेला. त्यातून लेखन झाले, वाचन झाले, चिंतन झाले, काही जणांशी बोलणे झाले. महत्वाचे 'कोरोना'च्या नकारात्मकतेतून मंडळी काही काळ बाहेर पडली. 

३. समाज माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता त्यात सकारात्मक लिखाण करणाऱ्यांची आवश्यकता आहे. अशी क्षमता असलेल्यांना आत्मविश्वास देता आला. आपल्याला चांगले लिहिता येते, लोक वाचतात हा विश्वास निर्माण झाला. तरुणांचा सहभाग विशेष...

४. एकाच विषयावर किती वैविध्यतेने लिहिता येते. प्रत्येक माणूस किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात, व्यक्त होतात याची जाणीव झाली. लेखन शैली, अनुभव संपन्नता, भाषा समृद्धी झाली. थोडक्यात वैचारिक प्रगल्भता वाढली. 

५. सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने अनेक गावांची व तेथील विशेष गोष्टींची माहिती झाली. शैक्षणिक संस्थांची व तेथील शिक्षकांनी केलेल्या कार्याची माहिती झाली. देशाच्या विविध छटा लक्षात आल्या. काही विशेष व्यक्तींचा परिचय झाला. या सर्वांबद्दलचा अभिमान बळावला. 

६. माणसांचे स्वभाव, त्यांनी इतरांसाठी केलेल्या गोष्टींची व त्याचा किती दूरगामी परिणाम होतो याची जाणीव निर्माण झाली. मानवाचा परस्परातील व्यवहार कळला. अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देतो ते कळले.

७. गणेशोत्सव अशा पद्धतीने साजरा करता येतो व त्यातून अपेक्षित समाज प्रबोधन साध्य करता येते हे शिकलो.

८. संस्थेशी नवीन मंडळी जोडली गेली. त्यांची परस्परात मैत्री झाली. 

जाहीर कृतज्ञता व दिलगिरी 

'कृतज्ञता उत्सव' या सार्वजनिक उपक्रमात समाजाचा सहभाग महत्वाचा. सर्वप्रथम या उपक्रमात सहभागी सर्व समाज बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांनी व्यक्त केलेल्या भावना दुसऱ्या दिवशी इ-स्वरूपात संकलित करुन प्रकाशित केल्या जात होत्या. यासाठी पूजा ग्राफिक्सचे श्री. निलेश कोळी यांचे अनमोल असे सहकार्य लाभले. कोणत्या प्रकारच्या आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता हे काम त्यांनी पूर्ण केले  शेवटच्या दिवशीच्या प्रतिक्रिया रात्री उशिरापर्यंत काम करुन आकर्षक पद्धतीने त्याची मांडणी. एका पानापासून सुरु झालेला हा प्रवास शेवटच्या दिवशी १२ पानांपर्यंत पोहोचला. दररोज ठरलेल्या वेळी त्याचे काम पूर्ण करुन दिले याबद्दल निलेशचे मनापासून धन्यवाद व जाहीर आभार. दररोज आपल्या भावना लिहून पाठविणारे मित्रवर्य व ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, धरणगाव येथील प्रा. बी. एन. चौधरी, सौ. विंदाताई नाईक, जळगावची विद्यार्थिनी कु. मानसी कुळकर्णी, चोपड्याची कु. अर्चना अग्निहोत्री, चाळीसगावचा अक्षय पाटे, श्रीमती सुनंदा कुळकर्णी, माझ्या सहकारी सुजाता बोरकर यांचेही कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो. तसेच श्रीमती शशिकला खाडिलकर, वास्तवातील संध्याकिशोर, रेवती ठिपसे, डॉ. उषा शर्मा, सोलापूर येथील हरिप्रसाद बंडी, पुणे येथील नागेश पाटील, सौ. अपर्णा पाटील-महाशब्दे, सौ. मेधा इनामदार,  चिंचवड (पुणे) येथील सौ. प्रणाली महाशब्दे, मुंबई येथील डॉ. मधुबाला जोशी, सौ. नीलिमा देशपांडे, सौ. वासंती काळे, सौ. गायत्री कुळकर्णी, भुसावळ येथील वैशाली पाटील, सौ, रेवती शेंदुर्णीकर, वैदेही नाखरे, वृषाली कुळकर्णी, सौ. शैला नेवे, जितेंद्र ढाके, अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात याबाबद्दल त्यांचेही मनापासून आभार. समारोपाच्या दिवशी देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या जळगाव नगरीच्या प्रथम नागरिक सौ. भारतीताई सोनवणे , जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. अशोकभाऊ जैन, विश्वस्त व माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील, माजी कुलगुरु डॉ. आर. एस. माळी, ग्रामदैवत श्रीराम महाराज संस्थांचे विद्यमान गादीपती  हभप मंगेश महाराज जोशी, प्र-कुलगुरु डॉ. पी. पी. माहुलीकर, प्राचार्य अनिल राव, दिलीपदादा पाटील, सौ. स्नेहल लोंढे, प्रभात चौधरी, अनिल अभ्यंकर, कप्तान मोहन कुळकर्णी, नाशिक येथील दीपक करंजीकर, मुंबई येथील विसुभाऊ बापट, अनंत भोळे, प्रा. डॉ. राजेंद्र खडायते, प्रा. नितीन बारी, पुणे येथील. ऍड. हेमंत मेंडकी, गिरीप्रेमी उमेश झिरपे,  बंगलोर येथील विजय कुळकर्णी, यजुर्वेंद्र महाजन, डॉ. अपर्णा भट-कासार, अपूर्वा वाणी, धुळे येथील मेधा उज्जैनकर, मनीष कासोदेकर, अकोल्याच्या सौ. मोहिनी मोडक, मंजुषा भिडे, अपूर्वा चौधरी, किरण बोरसे, जालना येथील लताताई देशपांडे युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे चिन्मय संत, वैभवी कुळकर्णी, कीर्ती शर्मा, कल्याणी कुळकर्णी, ऐश्वर्या परशुरामे  यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या सहकारी सुजाता बोरकर यांनी प्रकृती अस्वास्थ्य असतांनाही दररोज या नाकाचे मुद्रितशोधनाचे काम केले, त्यांचेही विशेष धन्यवाद ! ज्यांनी मातीतून, रांगोळीतून, चित्रकलेतून, पानाफुलातून विविध रूपातील श्रगणेश साकारले त्यांचेही मनापासून धन्यवाद ! ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी हा उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. 

दिलगिरी 

श्री. प्रदीप रस्से यांनी खास लेखाचे सादरीकरण उत्कृष्ट होण्यासाठी दिलेले छायाचित्र तसेच अक्षय पाटे, वास्तवातील संध्याकिशोर व माझी आई श्रीमती सुनंदा कुळकर्णी यांच्या एका दिवसाच्या कृतज्ञता भावना   माझ्या चुकीमुळे प्रकाशित करण्याचे राहिले मी त्यांची जाहीर माफी मागतो. वरील श्रेयनामावलीत कोणाचा चुकून उल्लेख राहिला असेल त्यांचीही दिलगिरी व्यक्त करतो. 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Tuesday 1 September 2020

मी कृतज्ञ पुण्यभू भारत मातेचा !


आशा फौंडेशनच्या गणेशोत्सवांतर्गत "कृतज्ञता उत्सवा"चा आजचा शेवटचा दिवस ! आम्हास सांगतांना विशेष आनंद होतो कि आपल्या परम पवित्र भारत मातेबद्दल सुमारे ६० जणांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. जळगावच्या प्रथम नागरिकापासून ७ हजार कोटींचा उद्योग समूहाच्या प्रमुखापर्यंत, कुलगुरुंपासून शिक्षण तज्ज्ञांपर्यंत, बंगलोरपासून चोपड्यापर्यंत, ज्येष्ठांपासून ते अलीकडच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांपर्यंत, संस्कृतपासून इंग्रजीपर्यंत म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या या पुण्यभू भारतमातेच्या विविधतेचा परिचय देणाऱ्या सुपुत्रांचा यात सहभाग आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, विचारांनी व आचरणाने या पवित्र देशाचे मांगल्य सांगितले आहे. सोबत तीचे उतराई होण्यासाठी काय करत आहे आणि काय केला पाहिजे याचा सुंदर उहापोह केला आहे. धर्म, जाती, पंथ, संप्रदाय, भाषा, प्रांत या विविधतेची आपणास अनुभूती होईल. देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराबद्दल येथील इतिहासाबद्दल, क्रांतिकारकांबद्दल, लोकशाहीबद्दल, स्वातंत्र्याबद्दल, ऋषी मुनी, योगा, आयुर्वेद, थोर विचारवंत, उद्योजक, समाज सुधारक आदींबद्दल आपल्या मर्यादेत सर्वांनी व्यक्त होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या देशबांधवांच्या मनोभूमिका साकारणाऱ्या या परमपवित्र भारत मातेला कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. 

मला आपल्या देशाचा अभिमान आहे. कारण हा माझा देश आहे. हि माझी जन्मभूमी आहे. मी तिला माता मानतो. तीचे पावित्र्य आणि महत्व जाणतो. मला ती सजीव वाटते व वंदनीय वाटते. मोठ्या अभिमानाने मला माझ्या या मातेला वंदन करतांना वंदे मातरम ! म्हणायला आवडते. आपल्या देशाचा जो इतिहास आहे. तो वाचतांना, ऐकतांना व जाणून घेतांना माझ्या अंगावर रोमांच उठतात. हा इतिहास मला आपला वाटतो. येथील संस्कृती मला माझी संस्कृती वाटते. येथील थोर माहात्म्यांना मी माझे आदर्श मानतो. येथील चांगल्या गोष्टींचा मला अभिमान वाटतो. यासाठीच हि कृतज्ञता ! 

शालेय जीवनात दररोज भारत मातेचे महन्मंगल स्तोत्र ऐकले. कालांतराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषद यांच्या तत्त्वज्ञानाने राष्ट्राबद्दलचे प्रेम, भक्ती शिकलो. सामाजिक जीवनातील आपले आचरण त्याअनुरुप करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून या साऱ्या गोष्टी करता येतात याचा अनुभव घेतो. प्रामाणिकपणाला कष्टाची जोड देत आपल्यामुळे कोणालाही आपली मान खाली घालावी लागणार नाही याची काळजी घेतो. आज पर्यंत या उत्सवात त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली त्या सर्वांच्या संस्कारातून देशाचा एक चांगला नागरिक म्हणून आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडीत आहे. याची रुजुवात मात्र "जयोस्तुते.." या स्तोत्रातूनच झाली. "तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण" हे कायमस्वरुपी हृदयात कोरलं गेलं. ९० च्या दशकाच्या सुरवातीला संगणकशास्त्र विषयाची पदवी घेऊन सुद्धा आपल्या देशाबाहेर जायचे नाही हे ठरविले. ऐन उमेदीच्या काळात कायमस्वरुपाची बँकेतील नोकरी सोडून सामाजिक कामाची एक वेगळी वाट चोखाळू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याद्वारे या देशाची, देशातील जनतेची सेवा करु शकतोय याचा मला विशेष आनंद आहे. अनैतिक गोष्टी कधीही करायच्या नाही असे ठरविले आणि त्यासाठी कटिबद्ध आहे. 

हुंडा व भ्रष्टाचारासारख्या अनिष्ट रुढी थांबविण्यासाठी स्वतःपासून सुरवात केली. आपण सारे या भारत मातेची लेकरे असल्याने प्रत्येकाला कायम मदतीचा हात देतो. माझ्या सर्व बांधवांमध्ये असलेल्या सद्गुणांकडे पाहतो. त्याच्या प्रगतीत आपला सहभाग असावा यासाठी प्रयत्न करतो. प्रकृती, विकृती व संस्कृतीचा अर्थ समजून घेत त्या प्रमाणे आचरण ठेवतो. "Life is for one generation but Good Name is forever " या उक्तीनुसार आपल्या देशासाठी जे जे काही चांगलं करता येईल याचाच कायम विचार करतो. मला या देशाने जे भारतीय तत्वज्ञान दिलं आहे त्याचा अभ्यास करतो. जीवनात भारतीय जीवनशैली अंगिकारण्याचा प्रयत्न करतो. 

मला समज आल्यापासून कधीही १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे झेंडावंदन चुकविलेले नाही. सकाळ थोडी गडबडीची, कुठे भारत माता पूजन, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम कधीतरी मित्र परिवारासह सहल असा काहीसा दिवस जात असे, वर्तमानपत्रात जाहिरातदारांनी या दिवसाला कसे महत्व दिले वा वृत्तपत्रांनी काय वेगळे वाचकांना दिले हे पाहणे हि एक आवडीची गोष्ट असे. सायंकाळी देशाच्या पंतप्रधानांनी देशाला कोणत्या मार्गावर नेण्याचे ठरविले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे. कधी तरी आपल्या तिरंग्याचा सन्मान वाढावा यासाठी प्लास्टिक वा अन्य स्वरुपातील प्रतीकात्मक झेंड्याच्या विक्रीवर बंदीची मागणी, कधी तरी लोकांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या बाजूला, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अगदी गटारीत पडलेले झेंडे गोळा करुन ते प्रशासनाला नेऊन देणे यासारखे उपद्व्यापही केले. विद्यार्थी दशेत न चुकता स्वातंत्र्य दिवस १४ ऑगस्टच्या रात्री मशाल यात्रा काढून १२ वाजता राष्ट्रगीत म्हणून साजरा केला आहे. 

भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित ठेवणारा, आपणास स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनामवीरांना , क्रांतीकारकांना आणि ते अबाधित ठेवणाऱ्या भारतीय सशस्त्रदलांच्या जवानांना, आपल्या देशाच्या तिरंग्याला अभिमानाने अभिवादन करतांना मला प्रचंड अभिमान आणि आनंद होतो. आपल्या देशाची महान संस्कृती व येथील अस्मितांबद्दल स्वाभिमान बाळगण्याचा प्रयत्न करतो. देशातील बलाढ्य लोकशाही असलेल्या या देशाचा कारभार पाहून सर्व जग अनेकदा स्तंभित व अचंबित होते हेच माझ्या भारत मातेचे वैशिष्ट्य आहे. "हे विश्वची माझे घर !" आणि "जो जे वांछील तो ते लाहो !" अशी संकसृती असलेल्या देशाला परमवैभवाला नेण्यासाठी कटिबद्ध होऊ या ! भारतीय चिंतनातून विश्वकल्याण होऊ हिच त्या बा गणरायाचरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Monday 31 August 2020

कृतज्ञता निसर्गाची !


आशा फौंडेशनच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित "कृतज्ञता उत्सवा"ने आपल्या सर्वांना भावना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या जीवनात अनेक गोष्टी सहज मिळालेल्या असतात जसे पहा न , निसर्ग किती भरभरुन देतो निरपेक्षपणे आणि निरागसतेने ! आज सर्वांनी आपल्या भावना व्यक्त करीत असतांना आपण कसा नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिरेकी वापर करुन त्याचा ऱ्हास करुन घेत आहोत याविषयीची खंत व्यक्त केली आह. सोबत त्याची किती मोठी किमंत अनेकदा मोजावी लागली आहे त्याचेही उदाहरण दिले आहे. आसूच जास्त आणि हसू कमी यामागची कारणमीमांसा अतिशय छान पद्धतीने केली आहे. "कोरोना" आणि " त्सुनामी" यासारख्या नैसर्गिक आघातांचा उल्लेख अनेकांच्या भावनांमध्ये आला आहे. निसर्गाचा सकारात्मक व नकारात्मक आविष्काराची अनेक उदाहरणेही दिली आहेत. अनेकांनी आपल्या भावनांना व्यक्त करतांना काव्यपंक्तींचा चपखलपणाने केलेला वापर त्यांचा व्यक्त होण्याचा परीघ रुंदावतात. सर्वांनीच निसर्गाची महती सांगितली आहे व ती जाणीव जागृतीची पावती आहे. मला व्यक्तिगत निसर्ग फार भावतो आणि त्याचा मनमुराद आनंद घ्यायला आवडते अर्थात त्याला कुठल्याही प्रकारची इजा न करता. आपल्या सर्वांच्या विचारांचा मागोवा घेत माझी निसर्गाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करीत आहे. 

लहानपणापासून "साधी राहणी व उच्च विचारसरणी" ही उक्ती ऐकत आलो आहे आणि त्याचा सर्वात निकटचा संबंध नैसर्गिक जीवनशैलीशीच आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा जन्मच मुळी देण्यासाठी झालेला आपण पाहतो. सावली देणारे झाड त्याचा उपभोग घेणारा तोडतो. त्याच्या विविध घटकांचा फायदा त्यालाच होत असते. पाणी प्रदूषण करणाऱ्यालाच नदी स्वच्छ, चांगले व मुबलक पाणी देते. निसर्गातून ऑक्सिजन घेणाराच त्याचे प्रदूषण करतो. या सर्व गोष्टींमुळेच मानवी जीवनासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे याचे कारणच दातृत्वाचा वसा घेतलेल्या या निसर्गाप्रती आपण कायम कृतज्ञ असले पाहिजे. निसर्गातील जैव विविधता हे त्या निसर्ग  साखळीचे घटक आहेत. जंगल, जमीन आणि पाणी हे मूलभूत घटकावरच निसर्गातील जीवसृष्टी अवलंबून आहे. यात झालेले कोणतेही असंतुलन जीवसृष्टीच्या मुळावर उठणारे व आपल्या अस्तित्वाचा प्रसन्न निर्माण करणारे आहे एव्हढेच लक्षात घेतले तर आपली वृत्ती व कृतीत बदल होऊन ती निसर्गानुकूल होण्याची शक्यता वाढणार आहे. गरज, हव्यास आणि लोभ यांचे अर्थ समजून घेतले तर अपेक्षित कृती अधिक जाणीवपूर्वक होईल. बालकाच्या जीवनातील निरागसता समजून घेतली तर आपण आपल्या या निसर्गाला निश्चितच जपू शकू त्यासाठीच वैयक्तिक जीवनात प्रयत्न करीत असतो. 

मुळात भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टींचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून न घेतल्याने आपण तिला नावे ठेवू लागलो किंवा दुर्दैवाने ते प्रतिष्ठेचे ठरताना दिसते आहे. ग्रामीण भागात शेती आधारित कुटुंबात जन्म झालेला असल्याने निसर्गाची कायम ओढ असते. निसर्ग आपल्याला अनेक गोष्टींची पूर्वसूचना देत असतो. निसर्गाची ही भाषा आपण ऐकायला व समजून घ्यायला शिकले पाहिजे. निसर्गाशी संवाद साधायला शिकले पाहिजे. कोणत्या ऋतू व हवामानात कोणती पिके येतात, कोणते पक्षी स्थलांतरित होतात, कोणते खाद्य पदार्थ खाल्ले पाहिजे यासह अनेक गोष्टी आपल्याला निसर्गतः माहिती असतात नव्हे त्या आपल्याला त्या ज्ञात करुन दिल्या जातात. चातुर्मासात वातड पदार्थ वर्ज्य असतात, अपचन झालं तर लंघन करावे यासारख्या अनेक गोष्टी घरातील ज्येष्ठ आपल्याला सांगत असतात. आपण डोळसपणाने त्याचा अंमल आपल्या जीवनात केला पाहिजे.  

या सर्व गोष्टींचा आधार मला भगवद्गीतेत सापडतो. भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे, गीतेच्या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष आचार सृष्टीत दिसतो तो मानवाने शिकून घेतला पाहिजे. "मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः" याचा अर्थ सर्व मानवांनी ईश्वराच्या मार्गाचे अनुसरण करावे. या मार्गाचे दर्शन आपणास प्रत्यक्ष सृष्टीत दिसते. सूर्य उगवतो, त्यामुळे कमळे उमलतात, लोक आपापल्या कार्याला लागत. सृष्टी जागी होऊन कार्यरत होते, या सर्व सृष्टिकार्याची ऊर्जा सूर्यापासून मिळते. सूर्य उगवला नाही तर ही कार्ये थंडावलेले असतील. एवढी कार्ये करतो मात्र त्याचा अहंकार नाही. सूर्यापासून मिळालेल्या ऊर्जेचे कोणी काय करावे हे तो ठरवीत नाही. तो ऊर्जा देण्याचे त्याचे काम करतो, त्या बदल्यात काही प्राप्त व्हावे अशी अपेक्षा नाही. 

वृक्ष वाढतात, त्याला फळे, फुले येतात. पक्षी त्यावर घरटी बांधतात. सावलीत जीव विश्रांती घेतात. काही मुले दगड मारतात तर काही त्याला झोपला बांधतात. याचा वृक्षाला अहंकार नाही. यासाठीच भगवान कृष्ण सृष्टीकडून जीवनाचे धडे घ्या असे म्हणतात. सृष्टीमध्ये एक सहज जीवन व्यवहार दिसतो. मानवाखेरीज सारी सृष्टी एकात्मतेवर उभी आहे. सृष्टीतील प्रत्येक व्यवहार एक दुसर्याशी जोडलेला व पूरक आहे. घरामधील सर्वांचा व्यवहार यावर आधारित असल्याने कुटुंबातच त्याचे बाळकडू मिळाले आणि ते दीर्घकाळ आचरणात राहील असेच आहे. आपण सर्वांनीही हेच तत्व आपल्या कृतज्ञतेच्या भावनेतून व्यक्त केलेले दिसते. जीवनात निसर्गानुकूल जीवनशैलीचा पुरस्कर्ता राहिलो आणि त्यासाठी आमच्या कार्यातून कायम त्यासाठी प्रयत्नशील आहे. यावर्षीची आशा फौंडेशनची मध्यवर्ती संकल्पना ही "रुप पालटू वसुंधरेचे... नैसर्गिक जीवनशैलीने" त्यासाठीच आहे. 

निसर्गातील पंच तत्वांनी निर्माण झालेल्या व त्याच पंच तत्वात विलीन होणाऱ्या मानवाचे निसर्गाशी अतूट असे नाते आहे. जगण्यासाठीचा सर्व गोष्टी देणाऱ्या या निसर्गाप्रती आपण कृतज्ञ आहोत. निसर्ग जतन व संवर्धन करण्याचा वसा आणि वारसा अधिक जोमाने पुढे नेऊ या ! गुरु, सखा व सोबती असलेल्या निसर्गाचे वैभव टिकविण्यासाठीचे सामर्थ्य आम्हास दे... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Sunday 30 August 2020

कृतज्ञता गावाविषयीची !

माझे जळगाव १७ मजलीवरुन...

आशा फौंडेशनच्या "कृतज्ञता उत्सवा"च्या निमित्ताने दररोज दोन-तीन जण नवीन सहभागी होतात एखादा थांबतो. यानिमित्ताने एक गोष्ट नक्की जाणवते आहे आपण त्या जगनियंत्याजवळ काही तरी मागत असतांना आपल्याला त्याने किती भरभरुन दिलं आहे आणि त्याचा आपण फारसा विचार करीत नाही आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा विषय दूरच... खरोखर या उत्सवाच्या अंतिम टप्प्यात आलो असतांना असे जाणवते आहे कि आपण अजून खूप साऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आठव्या दिवशी आपण आपल्या जीवनातील हृदयस्थ असलेली गोष्ट म्हणजे आपले गाव... त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. वेळ आणि लेखनाचे बंधन असतांनाही प्रत्येकाने व्यक्त केलेल्या भावना खूप काही सांगणाऱ्या आहेत. शब्द अपुरे पडले असे वाटत असतांनाही वाचणाऱ्याला आपण म्हणतात ते सर्व पोहोचतोय असे मला व्यक्त करणाऱ्या सर्वांना सांगावेसे वाटते. प्रत्येकालाच आपल्या गावाने सर्व काही दिले आहे विशेषतः आपली ओळख ! आपल्या गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतांना मला तीन गावांबद्दल प्रामुख्याने कर्तृज्ञता व्यक्त करावयाची आहे अर्थात या सर्व मंडळींनी जे सांगितले तेच  एकत्रितरित्या मांडणार आहे.

गाव म्हटलं कि येते ती तेथील वस्ती, माणसे, संस्कृती, तेथील अभिमानास्पद वारसा व निर्मित स्थळे... माणूस घराबाहेर असतो तेव्हा त्याला सर्वात जवळची वाटणारी जागा म्हणजे आपले गाव. कारण माणूस हा समूहप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याला कायम माणसे हवी असतात. ती आपल्या परिवारातील असली तर अधिक दिलासा देणारे वाटते. मात्र त्यापासून दूर गेल्यावर असतात ती आपली गावातील माणसे, नंतर राज्य आणि देशातील... कारण ही सर्व आपली माणसे असतात. पाडा, तांडा, वस्ती, गाव, शहर, महानगर ही सारी त्या गावाची रुपे ! हे लिहीत असतांनाच मला जाणवले कि पाड्यापासून महानगरापर्यंत जात असतांना आपलेपणा तीव्रतेपासून सौम्यपणाकडे जात आहे. असे असले तरी व्यक्तिगत कृतज्ञता कुठेही कमी होत नाही कारण त्यात असलेले "आपले"पण मग ते तीव्र असो वा सौम्य. महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतील विविध गावांना भेटी देत असतांना मला हे नेहमीच जाणवत आले आहे. ही त्या त्या गावाची आणि भारतीय संस्कृतीची विशेषताच ! 

गावाची महत्ता सांगणाऱ्या आमच्या गावातील वाडा आणि कुटुंबीय...

माझं जन्म धानोरा, ता. चोपडा, जि. जळगाव येथील... आयुष्याची सुरवात जेथे झाली तेथेच आयुष्याचा अंतिम कालखंड व्यतीत करावा असे मनोमन ठरविले आहे. कारण या गावाने जे दिलं ते जगात कुठेही मिळणार नाही याची खात्री आहे. स्वा. सावरकरांच्या "ने ने मजसी ने परत मातृभूमीला..." या गीताप्रमाणेच. त्यांनी आपल्या मातृभूमीप्रती कवितेतून व्यक्त केलेली आर्तता आपल्या गावाच्या बाबतीत  प्रत्येकाला अनुभवता येईल. "बालपणीचा काळ सुखाचा" असे म्हणून तर म्हटले जात असेल ना ! कायम स्मरणात राहणाऱ्या व गावाबद्दलची ओढ निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी येथे केल्या आहेत आणि या गोष्टींनी आयुष्यभरासाठीचा आनंद आणि समाधान दिले आहे. गावांमधील नकारात्मकतेची चर्चा करीत असतांना सुद्धा ते आपले गाव आहे म्हणूनच ! त्यातूनच सापडणारे उत्तर आणि पुन्हा वृद्धिंगत होणारी आपल्या गावाबद्दलची आपुलकी अशी ही साखळी... उन्हाळ्याच्या दिवसात गावातील शेकोटी, देवबाबांची यात्रा, लग्नाच्या वेळेस रात्री निघणारी मिरवणूक अर्थात फुनकं, रामलीला, थंडीत रात्री शेतात गव्हाला दिलेले पाणी, तेथेच प्यायलेला गुळाचा चहा, शेतात काम करतांना सोबतच्या मंडळींच्या भाकरीचा तुकडा, गुळाची जिलबी, बाजाराच्या दिवशी आजोबांनी आणलेला शेव चिवडा, उन्हाळ्यात आंब्याच्या रसाची रेलचेल, उन्हाळ्यात खळ्यात धान्याची केलेली राखोळी, तीन बैलजोडीच्या साहाय्याने लोखंडी नांगराने केलेली नांगरटी,  रात्री अपरात्री ट्रॅक्टर बसून शेतात केलेली नांगरटी, म्हशीला पाणी पाजायला नेताना तिच्यावर बसणे,  तिच्या शिंगांना अडकवलेल्या टमरेलने ती उधळणे अशा किती तरी गोष्टी या गावाने दिल्यात. वाड्याच्या दारात उभे असतांना रस्त्याने जाणारा येणारा प्रेमाने करणारा "राम राम..." इथलाच. असा माझा गाव जवळच असलेले उनपदेव, मनुदेवी आणि शिरागड ही बैलगाडीवरील सहलीची ठिकाणे. चिंचोलीच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा उत्सव. गावातील व्याख्यानमाला, कीर्तन यासह अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. जीवनाचा अस्सल तत्वज्ञान या गावातच  मिळते. 

वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने व आमचे शिक्षण झाले धुळ्यात ! हे माझे दुसरे गाव.. जीवन घडविणारे हे गाव येथील शाळा, महाविद्यालय, शिक्षक, सामाजिक संस्था यांनीच खरे तर विचारांची दिशा दिली. राजवाडे संशोधन मंडळ, समर्थ वाग्देवता मंदिर, शिवाजी व्यायाम शाळा, नकाणे  तलाव, एकविरा देवी मंदिर, पांझरा नदी, ५वी गल्ली, मनोहर, स्वस्तिक, ज्योती, प्रभाकर, राजकमल टॉकीज, लहान पूल, मोठा पूल, जुने धुळे, देवपूर, भांग्या मारोती, मिरच्या मारोती, पाच कंदील, जवाहर सूत गिरणी, लळींगचा किल्ला, सोनगीर काय नाही या माझ्या गावात... आदिवासी भागात मोडत असले तरी हे शिक्षण आणि खाद्य पदार्थांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर ठरले आहे. ढाबा संस्कृती येथीलच. येथील गल्ली बोळ आजही मला तेथे जाण्यासाठी बाध्य करतो. येथील माणसांचा बोलतांना टोन जरी रफ वाटला तरी ती प्रेमळ आहेत. रा. स्व. संघ, अभाविप, विद्यार्थी प्रबोधिनी या सारख्या संस्थांनी सामाजिक  जडणघडण  केली. अनेक चांगली व मोठी माणसे या शहराने  दिली आणि तिचं आमच्या गावाची  श्रीमंती ! आयुष्यातील तारुण्याच्या काळात विचारांची बैठक तयार करणाऱ्या, आव्हानांना न डगमगता सामोरे जाण्याचा संस्कार देणाऱ्या ,तडजोड कुठे, कशी आणि कोणत्या मर्यादेपर्यंत करावी याची शिकवण देणाऱ्या, अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देणाऱ्या, वैयक्तिक जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा आणि श्रम मूल्य देणाऱ्या या गावाबद्दल आयुष्यात कृतज्ञच राहील. 

अंतिम टप्प्यात सध्या वास्तव्यास असणाऱ्या माझ्या जळगावबद्दल... मला नेहमी आकर्षण वाटणारे येथील ग्रामदैवत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर ! येथील विविध उत्सव कायम आकर्षित करतात. अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या या मंदिराचं सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने असलेले महत्व मोठे आहे. या गावाने वैचारिक प्रगल्भता व अध्यात्मिकतेची ओढ निर्माण केली यासाठी विशेष कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हभप दादा महाराज जोशी व हभप मंगेश महाराज जोशी हे मानसिक स्वास्थ्यासाठीची शक्ती स्थाने वाटतात. डॉ. अविनाश आचार्यांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा सुमारे दोन दशकांचा दीर्घ असा सहवास मिळाला, पद्मश्री भवरलाल जैनांच्या उद्योग समूहाच्या सामाजिक कृतज्ञतेची अनुभूती, ऍड. अच्युतराव अत्रे अर्थात बाबांची कौतुकाची थाप या गोष्टींनी माझ्या मनात गावाबद्दलची नाळ दृढ केली. व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने या गावात आलेल्या गावाने मला येथील आदर्शांनी व व्यवस्थेने सामाजिक कामाची दिशा व प्रेरणा दिली. अनेक सामान्य माणसे सामाजिक कार्यांत कृतज्ञतेनं सहभाग देतात ही आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे. कर्तृत्वाने ओळख निर्माण होते हे जरी खरे असले तरी येथील समाजाने तुम्हाला स्वीकारणे, कार्यात सहभाग देणे, पाठीशी राहणे या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात. प्रसंगी अपेक्षित सहकार्य मिळाले नाही तरी आपल्यातील क्षमतांची जाणीव करुन देण्यासाठी ते आवश्यक ठरते. लौकिक अर्थाने मोठं करणाऱ्या या गावाप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. 

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जळगावातील सर्व गावांमध्ये माझा प्रवास झाला. कालांतराने प्रशिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये गेलो, तेथे राहिलो, त्यांनी मला जे आयुष्यभरासाठीचे अनुभव दिले त्या सर्व गावांप्रती कृतज्ञ आहे. आमची कुलस्वामिनी माहूरगडावरची श्री रेणुका माता ! अध्यात्मिक दृष्टिकोनातून सद्गुरु संत श्री सखाराम महाराजांची भूमी असलेले अमळनेर, पंढरपूर, संत गजानन महाराजांची भूमी असलेले शेगाव या गावांनी जीवनातील आवश्यक असलेली शांती दिली. अहमदनगरने मला आयुष्याची साथ देणारी जोडीदार व डॉ. गिरीश कुलकर्णींसारखे मित्र दिले. या गावांचाही मी ऋणी आहे. अन्य काही गावांचा मला विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. यात सामाजिक जाणीव प्रगल्भ करणारे बारीपाडा, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, कोल्हापूर, हेमलकसा, अकोला, सर्वात जास्त शहीद झालेल्या जवानांचे गाव असलेलं गडहिंग्लज, प्रशिक्षणाच्या दृष्टीने समृद्ध करणारे धडगाव, , अचलपूर,  चिखलदरा, मेळघाट, तोरणमाळ, गारगोटी, माथेरान, पाट पारोळे, अक्कलकुवा, मोलगी, तळोदा, पाटण, मेढा, सातारा, चांदुर बाजार आपल्या गावाचे महत्व अधोरेखित करणारी व अनेक विचार प्रवृत्त करणारी मंडळी देणारे पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर ही महानगरे... यासर्वांप्रती विनम्रतापूर्वक कृतज्ञता ! 

जीवनाच्या समृद्ध वाटचालीत कुटुंब या एककाचा देशाशी ऋणानुबंध जोडणाऱ्या गावाचे महत्व नदीवर बांधलेल्या पुलासारखेच आहे. भूमीबद्दलच्या अभिमानाची बीजे रोवणाऱ्या गाव संस्कृतीला मनाचा मुजरा !  या गावाचे ग्रामस्थ म्हणून गावाच्या संस्कृती व परंपरांचा समृद्ध वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी सामाजिक कृतज्ञतेने आपण कार्यरत राहू या ! जागतिकीकरणाच्या युगातही "आपुलकी" आणि "माणुसकी" ही बलस्थाने असलेली गावसंस्कृती अबाधित राहो... हिच त्या बा गणरायाचरणी मनापासून प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Saturday 29 August 2020

कृतज्ञता शेजाऱ्यांविषयीची !

कन्येच्या वाढदिवसाला शेजारची मंडळी...


आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० " कृतज्ञता उत्सव " अंतर्गत सातव्या दिवशी आपण आपल्या जीवनात सर्वात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या आपल्या शेजाऱ्यांविषयी व्यक्त करीत आहोत. आज व्यक्त झालेल्या मनोगतांमध्ये प्रत्येकाने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या शेजारांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केले तेथील शेजाऱ्यांची आठवण सांगितली आहे. अनेकांनी आपल्या सर्वात जवळचे नातेवाईक असा उल्लेख केला आहे. परस्परांवरील विश्वास, एकमेकांना केलेली मदत, कार्यक्रमांमधला सहभाग या सर्वांबद्दलची कृतज्ञता ! चाळ वा वाडा संस्कृतीपासून अलीकडच्या फ्लॅट संस्कृतीतील शेजारी या सर्वांचा उल्लेख यात आलेला आहे. हा उल्लेख करीत असतांना काळानुरुप अनुभवलेला बदल प्रत्येकाने अधोरेखित केला आहे. अपवादात्मक स्थितीत नकारात्मकतेची झालरही दिसून येते. निमित्ताने आमच्या शेजाऱ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. 

रुढ अर्थाने "शेजारी" म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला राहणारी मंडळी असली तरी आपले जेथे जेथ अस्तित्व असते आणि तेथे आपल्या आजूबाजूला जो असतो तो शेजारी ! म्हणजे शाळेत आपला बेंच पार्टनर, कार्यालयात आपल्या सोबत व शेजारी बसणारा सहकारी, कुठेतरी प्रवासाला निघाल्या नंतर आपला सहप्रवासी, एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या बाजूला बसलेला शेजारी, अगदी पंगतीत जेवायला बसल्या नंतर आपल्या बाजूला बसलेला शेजारी, चित्रपटगृहात आपल्या बाजूला बसलेला शेजारी हि यादी आपल्याला आणखी मोठी करता येईल. माझा उद्देश या सर्व शेजाऱ्यांची भूमिका बहुतांश वेळेस लाभदायक ठरलेली असते आणि ती लक्षातही राहते त्यामुळेच आजपर्यंत जीवनात ज्यांनी शेजाऱ्याची भूमिका पार पाडली त्या सर्व शेजाऱ्यांविषयीची हि कृतज्ञता ! काही आठवतील काही नाही पण... काही अनुभव चांगले असतील वा काही अनपेक्षितपण... अशा सर्व ! 

लहान असतांना आम्ही धुळ्याच्या पंचवटी भागात चाळीसारख्या ठिकाणी राहायचो अर्थात इतरांप्रमाणे माझेही ते एक विस्तारित कुटुंबच होते. येथे कुणीही कोणाच्या घरात सहज जाऊ शकायचे, ज्येष्ठ मंडळी कोणाला रागावू शकत होते प्रसंगी एखादा धपाटाही देऊ शकत होते. एकमेकांकडे जेवण तर सामान्य गोष्ट होती. या सर्वांमुळे आजच्यासारखी कोणाचीही प्रायव्हसी डिस्टर्ब् होत नसे. आमचे शुक्ल/कुळकर्णी म्हणून शेजारी होते. तसे चार घर सोडून राहणारे चंद्रात्रे व पाठकही शेजारीच होते. यातूनच मानलेले भाऊ, बहीण, मामा, काका, मावशी असे नाते दृढ होत गेले जे आजही तसेच आहे.  मी जवळपास ७ वर्षांचा होईपर्यंत शेजारच्या कुळकर्ण्यांकडे जेवणखाण करीत असे. आईला कुठेही बाहेर जायचे असल्यास ती आम्हा मुलांना शेजारच्यांवर सोपवून जात असे. घर उघडेच असे. एकमेकांच्या मदतीला, कार्याला सर्वजण आपल्या घरचा कार्यक्रम समजून काम करीत असत. 

नंतर आम्ही काही काल नेहरुनगरमध्ये व त्यानंतर आमच्या स्वतःच्या वास्तूत राहायला गेलो. येथेही आम्हाला खूप शेजारी मिळाले. त्यातील अमृत देशपांडे हे आमच्या वडिलांचे जिगरी दोस्त होते. नवरात्रात सोबत एकविरा देवीला जायचे. रोज संध्याकाळी आमच्या घरी यायचे आणि दोन दोन तास अंगणात आराम खुर्ची टाकून बसत असत. वडील गेल्यानंतरही त्यांनी त्याचा हा शिरस्ता कधीही सोडला नाही. त्यांची पत्नी म्हणजे आमच्या देशपांडे काकू ह्या आईच्या मोठ्या जाऊबाईच होत्या. त्या काही वेळेस  आईला अगदी हक्काने रागवायच्याही आणि त्यात कोणी बोलण्याचे कारण नसे. आजही या परिवाराशी आमचे ऋणानुबंध आहे. इतरही अनेक शेजारी होते. हरतालिका, गणेशोत्सव, संक्रांत, होळी, रंगपंचमी  आदी कार्यक्रम सर्वजण एकत्रित साजरे करीत असू. मला आठवते कोजागिरी पौर्णिमेला आम्ही सर्व मुले एकमेकांच्या घरी जात असू आणि तेथे ज्येष्ठ अपत्य पूजन अर्थात औक्षणाचा कार्यक्रम होत असे. सुट्टयांमध्ये तर धमाल असायची. खेळ, गमतीजमती, भांडणे हे होत असे तेव्हढ्यापुरतेच.


नोकरीच्या निमित्ताने जळगावला आलो. प्रथम नांदेडकर वाड्यात राहत असू.येथे शिवाजी पाटील, विजय लोढा, नंदलाल काबरा, हेमंत अलोने, किरण काळे, येवले, कुळकर्णी परिवार असे अनेकजण लाभले. येथेही आम्ही अनेक गोष्टी एकत्र करीत असू. स्वतः नांदेडकर परिवार सर्वांना घेऊन चालणार होता. या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील भाडेकरु स्वतःच्या घरातच राहायला गेले. सध्या आदर्श नगरमध्ये राहत असतांना अजय गुरव, सुहास कोल्हे, ऍड. हेमंत मेंडकी, अनिल चौधरी, लखोटिया ऑंटी, हेमंत पाटील.  प्रा. मोहरीर, जहागीरदार, विजयकुमार कोसोदे आदी राहतात. या सर्वांशी अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. मी अनेक वेळा बाहेरगावी असल्याने या सर्व शेजाऱ्यांचा नक्कीच आम्हाला आधार वाटतो. असे हे सर्व शेजारी म्हणजे आमचे विस्तारित कुटुंबच ! परिवाराच्या सुखदुःखात समरस होणारा शेजार मिळणे हि महत्वाची गोष्ट आहे आणि त्याबाबतीत आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. जीवनाच्या वाटचालीत शेजाऱ्यांचे स्थान महत्वपूर्ण आहे. परस्पर सहकार्य व सौहार्दाचा हा वसा आणि वारसा पुढील पिढीकडे संक्रमित करणे हि आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. या सर्व कायम व तात्कालिक शेजाऱ्यांच्या प्रेमाबद्दल, सहकार्याबद्दल जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करतांना आनंद व समाधान होत आहे. परस्पर सहकार्याची हि शृंखला अखंडपणे विस्तारित होत राहो व भारतीय संस्कृतीचा मूलाधार असलेली कुटूंब व्यवस्था अधिकाधिक बळकट होत राहो... हिच त्या बा  गणरायाचरणी मनापासून प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Thursday 27 August 2020

कृतज्ञता जीवनादर्शांप्रतीची !

आदर्शांचा आदर्श राम !

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० " कृतज्ञता उत्सव " अंतर्गत सहाव्या दिवशी आपण आपल्या जीवनातील आदर्शांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आज व्यक्त झालेल्या मनोगतांमध्ये प्रत्येकाने अनेक आदर्शांचा उल्लेख केला आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्विता मिळवायची असेल तर त्या त्या क्षेत्रातील आदर्शांचा विचार करावा लागेल. आपण ज्याच्याकडून काही तरी शिकतो त्याला आदर्श म्हणू शकतो मात्र म्हटलेच पाहिजे असे बंधन नाही. त्यामुळे चांगलं कुणाकडूनही घ्यावे त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे मात्र तो आदर्श आहे असे नाही. कारण आजच्या युगात प्रभू रामचंद्रांप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम दिसत नाही. जीवन जगात असतांना समाजातील व्यक्तींना अपेक्षित असलेली उक्तीप्रमाणे कृती तसेच आचार, विचार आणि कृती यात योग्य मेळ दिसून येतं नाही. आई-वडील हेच सामान्यपणे प्रत्येकाचे आदर्श असल्याचे लक्षात येते. असो... माझ्या आदर्शांबद्दल यानिमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो. 

आपल्या विचारांबाबत ठाम मात्र इतरांच्या विचारांबाबत व भावनांचा आदर, काम करतांना अपेक्षित सर्वसमावेशकता, दूरदृष्टी, आधी केले मग सांगितले हि वृत्ती, द्रष्टेपणा, निःस्वार्थ भावनेने केलेली सेवा, वेळेचे भान, कामाचा दर्जा आदी गोष्टींबाबत आग्रही  हे आदर्शांचे परिमाण ठरु शकतात. अजूनही वाढविता येतील. या सर्व गुणांचा एकत्रित मिलाप जेथे सापडेल ती व्यक्ती आदर्श ठरु शकते. तरीही त्या व्यक्तीच्या स्वभावातील दोषांकडे आपल्याला दुर्लक्ष करावे लागेल. आपण प्रभू रामचंद्रांना आदर्शांचा आदर्श असे म्हणत असलो तरी त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो हे लक्षात घ्यावे लागेल. ज्या व्यक्तीच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल, कार्याबद्दल, जीवनातील समर्पित वृत्तीबद्दल अभिमान वाटतो अशा व्यक्ती आदर्श ठरतात. त्यांचे अनुसरण करणारे अनेक व्यक्ती असतात. अशा आदर्शांचा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वावर व जीवनावर प्रभाव दिसून येतो आणि त्याबाबत ते जाहीरपणे सांगतात. 

माझ्या जीवनावर अशा अनेक लोकांचा प्रभाव असल्याचे मला जाणवते. यात अग्रक्रमाने माझे वडीलच आहेत. पोस्टासारख्या विभागात व्यावसायिक जीवनाची वर्षे व्यतीत करतांना प्रामाणिकपणे कष्ट हि गोष्ट माझ्यावर प्रभाव करुन जाते व मी त्याचे अनुसरण करतो. जीवनाचे तत्व घेऊन जगणारे माझे वडील त्यादृष्टीने मला आदर्श वाटतात. आपल्या दाराशी कोणी माणूस त्याचे पैसे मागायला आला नाही पाहिजे. (याचाच अर्थ आपले अंथरुण पाहून पाय पसरवावे) दुसऱ्यामुळे आपल्याला त्रास झाला तरी चालेल मात्र आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको, कष्टाने माणूस मरत नाही, मर्यादित उत्पन्नातही चांगले, आनंदी व समाधानी आयुष्य जगता येते. आईनेही अशाच प्रकारे जीवनावश्यक काही मूलभूत तत्वज्ञान आपल्या जीवनातून सांगितले. घरात कायम चांगलेच बोलावे कारण वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो. स्वयंपाक करतांना प्रसन्न व आनंदी असावे कारण बनविणाऱ्याची वृत्ती त्या अन्नात येते आणि नंतर खाणाऱ्यातही ! साधे बाळबोध वाटत असले तरी तेच शाश्वत विचार आहे, असे मला वाटते. यासर्व गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. ज्या मला आदर्श वाटतात. या माझ्या आदर्शांबद्दल कृतज्ञता ! 


व्यावसायिक, शैक्षणिक व सामाजिक जीवनात अनेकांचा प्रभाव मला जाणवला. तो जीवनात आणण्याचा कायम प्रयत्न असतो. आमचे प्राचार्य प्रा. एन. के. पाटील, प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, डॉ. अविनाश आचार्य, पद्मश्री भवरलाल जैन, ऍड. अच्युतराव अत्रे, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुळकर्णी, संजीव दहिवदकर, श्री. लक्ष्मणराव जोशी हि त्यातील काही नावे. या सर्वांसोबत संपर्क संवाद होता, आहे. जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असतांना या सर्वांच्या जीवनाचा, त्यांच्या विचारांचा, साधनशुचितेचा प्रभाव कायम राहिला. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, चाणक्य, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम , महाराष्ट्रातील विविध संत, क्रांतिकारक, परमवीरचक्र विजेते जवान यांच्या जीवनातून कायम प्रेरणा मिळते. या सर्वांप्रती आज कृतज्ञता व्यक्त करतांना मला विशेष आनंद होत आहे. माणसाच्या जीवनात आचार, विचार व कृतीचे दिशा दर्शन व मार्गदर्शन करणाऱ्या प्रेरणादायी आदर्शांचे महत्व आहे. कृतिशील विचारांचा वसा आणि वारसा अनेक पिढ्या घडवितात. त्यासाठीच हि जीवनादर्शांची कृतज्ञता ! पुण्यभूमी भारतमातेला परमवैभवाला नेणाऱ्या आदर्शांची हि शृखंला अखंडपणे सुरु राहो... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! गणपती बाप्पा मोरया ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Wednesday 26 August 2020

श्रीमंतीचा अनुभव देणाऱ्या मित्रांप्रतीची कृतज्ञता !

लंगोटी यार 

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० अंतर्गत "कृतज्ञता उत्सवात" सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत एकाच गोष्टीकडे आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने, अर्थाने  पाहू शकतो याची जाणीव करुन देणारी आहे. प्रत्येक बाबतीत भरभरुन लिहायचे असते असे लक्षात येते. आपल्याला त्या नात्यातलं वेगळपण टिपण्यासाठी ओळींची मर्यादा घातली आहे. हा कृतज्ञता उत्सव रुजतो आहे. मंडळी लिहिते होत आहे आणि वैविध्यता गावते आहे, तीच या उपक्रमाची उपलब्धता. मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना सर्वात जास्त विशेषणे व आदर्श उदाहरणाचे संदर्भ मिळाले. जीवनातील मित्रांचे महत्व अधोरेखित करणारे सर्वांचे अनुभव होते. या सर्वांमध्ये जीवन समृद्ध आणि आयुष्याची श्रीमंती मला दिसली. अगदी मोजकेच वा भरपूर मित्र असले तरी त्यामुळे मिळणारी श्रीमंती मात्र सारखीच ! मंडळींनी व्यक्त केलेल्या भावना माझ्या मित्रांच्या नात्यातून मांडणार आहे. 

लहानपणी अधिक वेळ सोबत असणारा एव्हढा एकमेव निकष असतो. पुढे जाऊन हि मैत्री विचारांनी होते, सामान धाग्यांनी होते. वयाचा, विचारांचा, सोबतीचा कोणताही असो,  तो मित्र अशी एक भावना तयार होते. माणूस प्रगल्भ होत जातो आणि या सर्व गोष्टी पलीकडे जाऊन मैत्री अनुभवता येते. मग कौटुंबिक नात्यांमध्येही आपल्याला मैत्री सापडते. समाज माध्यमाच्या युगात तर एकमेकांना न पाहिलेले मित्र अनुभवतात. त्याला जोड असते निर्व्याज व निरपेक्षपणाची... मला खूप मित्र आहे आणि त्यात वादच होत आहे. या सर्वांबद्दल लिहायला मला आवडते. सहजतेतून आणि स्वभावातून झालेली हि मैत्री कायम हृदयात घर करते याचा आपल्या सर्वांप्रमाणे माझाही अनुभव आहे. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

माझा लहानपणापासूनचा मित्र म्हणजे प्रशांत मोराणकर ! हि मैत्री अशी आहे कि, कट्टी ने अबोला असला तरी मैत्री कायम होती. म्हणजे एखाद्या गोष्टीवरुन बिनसले असले तरी आम्ही सायकलवरच सोबत जाणार मात्र एकमेकांशी न बोलता कारण कट्टी आहे नं ! मग परत बोलायला कसे लागायचो ते आठवत नाही. पावसाळ्याच्या दिवसात ढग भरुन आले वातावरण मस्त असले आणि दोघांनी ठरवले कि आम्ही सायकलवरुन रोकडोबा हनुमान, नकाणे तलाव, डेडरगाव अशा ठिकाणी जायचो. डेडरगावला त्यांची शेती आहे.  तेथेच मुक्काम आणि मग दुसऱ्या दिवशी घरी. अनेकदा धुळ्याच्या गणपती रोडवरील पुलावर उशिरापर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत गप्पा मारत असू. दिवसातला बहुतांश वेळ सोबतच. अनेकदा जेवण त्याच्याच घरी. खेळ, उत्सव, कार्यक्रम सर्व सोबतीने. हा आमचा मित्र लग्न झाल्यानंतर फिरायला गेला नाही. तीन वर्षानंतर आमचा एक मित्र चंद्रशेखर जोशी व माझे लग्न झाल्यानंतर आम्ही तिघे सोबत फिरायला गेलो अशी हि मैत्री जी आजही अबाधित आहे. आमच्या या मैत्रीत टेलीपथीचा (इंद्रियांच्या साहाय्यावाचून एकाच्या मनातील विचार त्याचवेळी दूरवर असलेल्या दुसर्‍या व्यक्तीच्याही मनात उमटणे) अनेकदा आम्ही अनुभव घेतो. 

धुळ्यात खूप सारे मित्र होते. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील, महाविद्यालयातील, गल्लीतील असे सर्व. आम्ही महाविद्यालयात असतांना आमच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित होती ३० ! त्यामुळे या सर्वांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे भावबंध होते यात मैत्रिणीसुद्धा होत्या. सविता बागल हि त्यातील एक. सोबत शिकलो आणि सोबत ४ वर्षे कामही केले. नाटकं, खेळ, गॅदरिंग, सहली, अभ्यास अतिशय समृद्ध करणारा हा मित्रांचा गोतावळा. यासर्वांशी आजही संपर्क आहे. काय योगायोग असतो पहा, आजच्या दिवशीच सकाळी एक दुःखद घटना कानी पडली. आमचा एक मित्र आम्हास सोडून गेला. नरेंद्र कुळकर्णी ! फार लवकर एक्झिट झाली. दिवसभर अस्वस्थ होतो. आठवणी होत्या. एका मित्राने फोन करुन तो अक्षरश: फोनवरती रडला कारण अनपेक्षित व अनाकलनीय जाणे. आमचा महाविद्यालयीन जीवनापासूनचा मित्र नरेंद्र ऊर्फ जया ऊर्फ गुंड्याभाऊ ऊर्फ एनव्हीके सर आज आम्हाला सोडून गेला आणि सर्व कसं कालच घडलं असं आठवलं. खरं तर मी आणि प्रशांत यांनी त्याला भेटीला जायचं ठरवलं होत. लॉक डाऊनमुळे राहून गेलं... भेट होणे नाही हे वास्तव स्वीकारणे तसे जडच... ११ वीपासून आम्ही धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयात शिक्षणामुळे संपर्कात आलो. पुढे कॉलेज, अभ्यास आणि काही काळ सोबत नोकरीच्या निमित्ताने मैत्रीचे नाते वृद्धिंगत होत गेले. याचे आईवडील दोन्हीही शिक्षक होते. आम्ही एकत्रित अभ्यास करत असू तो नरेंद्रकडे ! दररोज संध्याकाळी सर्वजण नरेंद्रकडे एकत्र जमणार गप्पाटप्पा तेथून पुढे काय करायचे ते... मग जेवण करायला म्हणा किंवा अन्य काहीही. आजही आम्ही कधीतरी एकटे तर कधी कुटुंबियांसह फिरायला जातो. नरेंद्रच्या घरी रंगपंचमी साजरी करीत असू.  आमच्या मित्राच्या कुटुंबाशीही अतिशय सर्वांचेच जिव्हाळ्याचे संबंध होते. मुल-मुली रात्री उशिरापर्यंत नाटकांची प्रॅक्टिस करत असू सोबत. अनेकदा व्हीसीआर भाड्याने आणून चित्रपट सोबत पाहिलेत. सुवर्णकाळच तो ! असो 

नोकरीच्या निमित्ताने जळगावात आलो आणि येथेही अनेक मित्र झालेत. त्यांचे नियमित एकत्रीकरण होतात. कधी भिशीचे निमित्त तर कधी अथर्वशीर्ष आवर्तनाचे. नितीन चौधरी हा कार्यालयातील सर्वात जवळचा मित्र. सामाजिक कामात असल्याने अनेक मित्र. धागा एक परस्पर प्रेमाचा. व्यावसायिक जीवनात वेगळी वाट निवडल्यावर मला अनेक मित्र जोडता आले. संस्थेची उभारणी करत असतांना अनेकदा आपल्याला विचारांचे आदानप्रदान करण्याची गरज असते प्रदीप रस्से, चंद्रशेखर संत, शेखर नांदेडकर, बाळासाहेब पाटील कितीतरी नावे सांगता येतील. क्रिएटिव्ह ग्रुप हि संस्थाच वेगवेगळ्या क्षेत्रात  काम करणारे मात्र समविचारी व समवयस्क मित्रांनी एकत्र येऊन सुरु केलेली संस्था. विद्यार्थी परिषदेचे काम करीत असल्याने तेथेही अनेक मित्र मिळाले. माध्यम जगतानेही अनेक मित्र दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातूनही अनेक मैत्र जोडले गेले. विचारांपलीकडची व वयापलीकडच्या मैत्रीचा समृद्ध काळ सध्या अनुभवत आहे. अंतिम टप्प्यात नियमित संपर्कात असलेल्या मित्रांविषयी...

मैत्र जीवांचे... एका कार्यक्रमानंतर...


अनिल जोशी, दिलीप तिवारी, सुशील नवाल, सुनील याज्ञीक या चार मित्रांशी व त्यांच्या परिवाराशी नियमित संपर्क, संवाद असतो. अनेक गोष्टींवर चर्चा होते. प्रत्येकाचे विचार स्पष्ट आणि ते बोलण्यात येणार विरोधी असले तरी मागे भावना योग्य सल्ला आणि मित्राचं भले अन्य काहीही नाही. अनेकदा पलीकडे जाऊन काळजी घेणारी हि मैत्री. अनेक मित्रांचा उल्लेख मी टाळला आहे. कारण इतरांची मला नाराजी ओढून घ्यावयाची नाही. ज्यांचा उल्लेख केला आहे त्यांची जिवलगता सर्व जगाला माहिती आहे. माणसाने जीवनात उभे राहावे यासाठीची एकमेव अपरिहार्यता म्हणजे मित्र ! मैत्रीचा हा वसा आणि वारसा पुढील पिढीत संक्रमित होत आहे याचा विशेष आनंद आहे. त्यासाठीच हि मित्रांप्रतीची कृतज्ञता ... वसुधैव कुटुंबकमची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या विस्तारित कुटुंबाचा मैत्रीचा हा धागा अधिकाधिक विस्तारित जावो... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! गणपती बाप्पा मोरया ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday 25 August 2020

कृतज्ञता "आपलं"पण रुजविणाऱ्या घराप्रतीची !

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० अंतर्गत साजरा करण्यात येणाऱ्या "कृतज्ञता उत्सवात" आज सर्वांनी आपल्या घराप्रतीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रत्येकानेच आपापल्या घराबद्दल जे लिहिलं आहे ते माझ्या घराबद्दलच लिहिलं आहे असं वाटत राहील. कधी अभिमान वाटलं, कधी भावुक झालो अगदी डोळ्यात पाणी देखील आलं. मी या सर्वांचे मनापासून कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो. आणखी जास्तीत जास्त मंडळींनी लिहीत व्हावं आणि जीवनाचा खरा आनंद घ्यावा हि अपेक्षा ! 

माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात कायम माझ्यासोबत आहे ते म्हणजे माझे घर ! माझ्या सर्व भावना समजून घेत कायम माझ्यासोबत असलेली एकमेव गोष्ट म्हणजे ती "वास्तू"... जीवनातील स्थित्यंतरांमध्ये सोबत देणारी वास्तू... भारतीय संस्कृतीची ओळख आणि त्याची कायम प्रचिती देणारं मंदिर... हक्क, जाणीव व कर्तव्याची जागा ! " हे विश्वची माझे घर " या उक्तीप्रमाणे घर आणि विश्व यातील सर्व भेद सोडून एकत्वाची प्रचिती म्हणजे माझे घर, माझे विश्व. म्हणून मला जन्मापासून आज पर्यंत रोज रात्री मी जेथे विसावलो ती माझी जागा म्हणजे मला माझे घर वाटते. कधी चार भिंतीत तर कधी खुल्या आकाशातही... कधी एखाद्या हॉटेलमधील रुम तर कधी खळंसुद्धा... जेथे जेथे राहिलो तो माझे, आपले घर आणि म्हणूनच लेखाच्या शिर्षकात "आपलं" पण रुजविणार म्हणतोय. नजरेसमोरुन पटापट इतक्या वास्तू जात आहेत आणि खरोखर मी त्या सर्व वास्तूंबद्दल / घरांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. 

 जन्मगावाकडंच घर, नियमित राहतो ते घर, मित्राचं घर, शेजाऱ्यांचे घर हे सर्व मला माझी वाटतात मी त्याचा अनुभव घेतलाय कारण या सर्व घरांशी भावनेने जुळलो आहे. स्वरुप कसंही असलं तरी ते माझं आहे आणि तेथील माणसे, वस्तू आणि तेथील वास्तुपुरुषाच्या वास्तव्याने ते पवित्र झालं आहे. ती एक खोली असू दे, वाडा असू दे, फ्लॅट असू दे, बंगला असू दे, इमला असू दे... त्याला नाव असू दे वा नसू दे, रंग असू दे वा नसू दे, त्यात सुख सुविधा असू दे वा नसू दे... तेथे सुख आहे, आनंद आहे, आशा आहे, विश्वास आहे, सुरक्षा आहे, शांतता आहे, प्रेम आहे, नातं आहे, ऋणानुबंध आहे म्हणून त्याची ओढ आहे. माझ्या आयुष्यातील काही घरांचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. आमच्या धानोऱ्याचे घर, वाडा... पूर्वी या वाड्यातच सर्वांची निवासाची सोय होती म्हणजे माणसं, प्राणी, अन्नधान्य आणि चक्क देवांचीही ! विहीर, गोठा, दत्ताची माडी, बंगला, स्वयंपाक घर, मधलं घर, ओटा, मोरी, धुण्याची माडी... सर्वच मातीच त्यामुळे त्याला शेणाने सारवण आलंच... कायम माणसांचा राबता त्यामुळे जिवंतपणा ! उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीत सर्वात पहिले येथे जाण्याचा आनंद... एकत्र कुटुंबामुळे येथे किमान ८-१० माणसे आणि सुट्ट्यामध्ये, सणावाराला हि संख्या ३५-४० आजही असते. या घराने मला माझी हक्काची माणसं दिली त्यामुळे सर्वच दिल त्याचे आजन्म ऋण आहे. 

 धुळ्याला लहान असतांना राहिलेलो चाळीतली एक खोली. या चाळीतली सर्व खोल्या मालकीची नव्हे पण प्रेमाने माझे घर होते. झोपायला आमच्या खोली बाकी वेळ सर्व इतर खोल्यात माझं गावासारखं विस्तारित कुटुंबाबातील माणसं ! सध्या आम्ही धुळ्याला जेथे राहतो ते घर... वडील आणि काकांनी जीवापाड मेहनत करुन आपल्या आयुष्यातील उमेदीचा काळ याला उभारण्यासाठी दिला. मोराणकरांचे घर... माझा मित्र प्रशांत मोराणकर यांचे घर मला कायम माझे घर वाटते. या घराने मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकारले. आजही धुळ्यात गेलो कि त्यांच्याकडे गेलो आणि बिना जेवणाचे आलो असे कधी झाले नाही आपल्या घरात जे मिळतं ते सर्व या घराने मला दिले. व्यवसायाच्या निमित्ताने जळगावात आलो आणि सुरवातीचे सात वर्षे नांदेडकरांच्या वाड्यात राहिलो. नुकतंच लग्न झालेले आणि दोन खोल्या चिमणा - चिमणीने सुरु केलेला संसार आणि त्याला जोडलेली प्रत्येक कृती. येथील प्रत्येक कुटुंब विशेषतः घरमालक आणि त्यांचा परिवार सर्वच प्रकारची काळजी घ्यायचे कारण ती आपली माणसं आणि त्यामुळे ते घर आपलेच. 

 सध्या माझ्या कुटुंबासह राहतो ते घर... स्वकमाईतून घेतलेलं... सद्गुरुंच्या आशिर्वादाने आणि वास्तव्याने पुनीत झालेलं... सामूहिक श्री गणेश अथर्वशीर्षाच्या आवर्तनांच्या स्पंदनांनी भारलेलं... अनेकांनी मन आणि पोट यांना तृप्तीचे ढेकर दिलेलं... सर्वार्थाने चढती कमान दिलेलं... गृहलक्ष्मीच्या अस्तित्वाची कायम जाणीव करुन देणारं... जीवनातील या सर्व घरांबद्दल मी कृतज्ञ आहे त्याने मला माझं सर्वस्व दिले जाता जाता आणखी एका घराचं उल्लेख केला पाहिजे ते आमचे मोठं घर अर्थात मोठ्या काकांचे घर ! जळगावातील या घराचेही मी आभार मानेल कारण तेथे बनलेलं काहीही विशेष कायम माझ्यासाठी येतं आजही माझे काका-काकू या जगात नसतांनाही...माझे पालक डॉ. किशन काबरा यांनी म्हटलंय "स्वर्ग हवाय कुणाला ?" कारण तो येथेच अनुभवतोय... तीच माझी मनस्थिती या सर्व घरांबाबत आहे आणि म्हणूनच हि कृतज्ञता ! माणसातील माणूसपण, नाते, ऋणानुबंध याद्वारे कुटुंब व परिवार व्यवस्थेचा अबाधितपणा टिकविणारा "घर" नावाची व्यवस्था ! भारतीय संस्कृतीला जगात मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या "घर" नावाच्या संकल्पनेचा वसा आणि वारसा पुढे नेऊ या ! त्यासाठीच घराप्रतीची कृतज्ञता... प्रत्येकाच्या मनातील घराबद्दलची हि कृतज्ञता विश्वबंधुत्वाची कल्पना टिकवून ठेवो ज्यामुळे हि संस्कृती व राष्ट्र परमवैभवाला जावो... हिच बा गणराया चरणी मनापासून प्रार्थना ! 

 गिरीश कुळकर्णी 
 ९८२३३३४०८४

Monday 24 August 2020

कृतज्ञता आयुष्यातील सुवर्णकाळ देणाऱ्या शाळेप्रतीची !


बालवाडी ते १० वी पर्यंतचे पारंपरिक शिक्षण देणारी शाळा ! खरं तर अतिशय व्यापक अर्थ असलेला शब्द म्हणजे शाळा. आयुष्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व देणारी शाळा. ती केवळ चार भिंतीत कशी ? ती सर्वत्रच.. सुरुवात घरापासून, मग शाळा, महाविद्यालय, समाज, कार्यालय, निसर्ग, संस्था / संघटना. आयुष्याला समृद्ध करणाऱ्या विविधांगी शाळा. येथे कायम सोबत असते ती दप्तराची... लहानपणापासून धरलेले हे दप्तर आयुष्याच्या संध्याकाळी हिशेब मांडतांनाही कामात येत अर्थात त्याचे स्वरुप बदललेले...मात्र निकाल सांगणारेच. त्यासाठीच शाळेप्रतीची कृतज्ञता व्यक्त करतांना श्री. प्रदीप रस्से यांनी त्याचे प्रतिक म्हणून अतिशय समर्पक असे दप्तराचे चित्र काढून दिले आहे. असो. आयुष्याचा भविष्यकाळ समर्थ व सफल करण्यासाठी अत्यावश्यक असलेले सर्व काही देते ती शाळा. म्हणूनच लेखाचे शिर्षकात त्याला सुवर्णकाळ म्हटलं आहे. त्या सुवर्णकाळासाठीच आपण सर्व आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अगदी प्रत्येकजण ! 

आशा फौंडेशन सार्वजनिक गणेशोत्सव २०२० अंतर्गत "कृतज्ञता उत्सव" आपल्या सर्वांच्या सहभागाने साजरा करतोय. त्या बाप्पाला जे जे काही त्याने भरभरुन दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय. मी सर्वांच्या भावनांना एकत्रितपणे सूत्रबद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. आज मात्र मी माझ्या शाळेच्या माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक माणूस हा एका "वल्ली" आहेच पण हे अधोरेखित करण्याचे काम करते ती शाळा ! सर्वांनी मांडलेला सुवर्णकाळ खराच आहे मात्र काही तरी सुटलंय किंवा सोडलंय. लेख थोडा मोठा झाला तरी काही सुटू नये असे पाहू. 

३४ वर्षानंतर महाव्याख्यान कार्यक्रमाचे उदघाटनप्रसंगी श्रीमती हिरा खंदलकर 

माझी प्राथमिक शाळा धुळ्याची लायन्स नूतन विद्या मंदिर (समाधीची शाळा) १ ली ते ४ थी बाई एकच श्रीमती विजया कुळकर्णी आमच्या विजूबाई ! आणि दुसरी महत्वाच्या बाई म्हणजे मोठ्या बाई अर्थात श्रीमती हिरा खंदलकर. विजूबाई साध्या आणि मोठ्या बाई केवळ खतरनाक म्हणजे हातात कायम पट्टी आणि कडक शिस्त. पहिले अर्धे वर्ष तसे बऱ्यापैकी खिडकीत बसून आईची वाट पाहण्यात आणि रडण्यात गेले. पण येथील सर्व जादुई शिक्षकांनी शाळा आणि अभ्यास यांचे गोडी लावायचे काम केले. या शाळेच्या स्नेहसंमेलनात म्हटलेले गाणे आजही आठवते. "शाळेतही मी जाणार, पाटी घेऊनी, घेऊनी पुस्तक, अभ्यास मी करणार " खूप मस्ती केली, मार खाल्ला. मनाचे श्लोक ४० पर्यंत पाठ, पाढे तीस पर्यंत पाठ... आजही झोपेतून उठविले तर सांगेन ! हिच तर खरी गंमत आहे शाळेची. अभ्यास महत्त्वाचाच मात्र इतरही गोष्टी तेव्हढ्याच प्राधान्यक्रमाच्या. जीवनाचे खरे टप्पे टोणपे तेथे मिळाले. तसा घरच्यांना खूप त्रास दिला शाळेत जातांना... पालक शिक्षक युतीचा नेहमीप्रमाणे विजय झाला आणि आम्ही एकदाचे शाळकरी झालो. 

माध्यमिक शाळा त्याहून भारी धुळे एज्युकेशन सोसायटीची न्यू सिटी हायस्कुल ! ५ वीत प्रवेश झाला. वर्गशिक्षक श्री. बी. एन. जोशी सर, विषय इंग्रजी. शाळेची वेळ दररोज दुपारची मात्र शनिवारी सकाळची. त्या दिवशी आमचे सर धोतर आणि पांढरा सदरा आणि कापली मस्त गंध. शाळा केवळ मुलांची त्यामुळे दंगामस्तीला कोणतेही बंधन नाही. (असं विधान धारिष्ट्याने करतोय कारण शाळा शिस्तीचीच होती पण आम्ही ? ) जगण्याला लायक बनविणे, माणूस म्हणून घडविणे म्हणूनच तर म्हणतात ना ! शाळा सुरु व्हायची ती "जयोस्तुते जयोस्तुते..." या गीताने अर्थात त्यापूर्वी अन्यही गाणे लागायची. त्यात ऋणानुबंधाच्या आवर्जून आठवते. राष्ट्रगीत झाले कि दिनक्रम सुरु... साधारण ७ वी नंतर हे जरी सुरुच असले तरी आमची कबड्डी जोरात चालायची. पांढर शर्ट आणि खाकी अर्धी चड्डी हा गणवेश. सकाळी आईने मोठ्या कष्टाने धुतलेला पांढरा शर्ट संध्याकाळी पार वाट लागलेली. बटण तुटलेले, कुठेतरी फाटलेले, हातापायाला कायम मलमपट्टी सौभाग्याचं लेणंच ते ! ९ वी पर्यंत पीटीच्या तासाला शिवाजी व्यायामशाळेच्या मैदानावर सर्वांच्या पुढे... मात्र दहावीत काही तरी कारण सांगून वर्गातच. शनिवारी संपूर्ण शाळेची मास ड्रिल अर्थात एकत्रित पिटी ! हात करतांना काय धाक असायचा शिक्षकांचा... एव्हढ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सरांचे लक्ष कुळकर्णी हात सरळ हात सरळ. 

आदरणीय मु. कृ. पाध्ये सर 
आमच्या शाळेचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे मुख्याध्यापक मुकुंद कृष्णाजी पाध्ये ! (नुकतेच त्यांचे निधन झाले) शनिवारी सकाळची शाळा उशिरा येणाऱ्या मुलांना चढ्या क्रमाने शिक्षक... पहिल्यांदा २५ , ५० उठबशा, त्यानंतर आलेल्यांना हातावर वेताच्या छडीचे फटके ३, ५, १० त्यानंतर आल्यावर दोन्ही आणि वरुन कोंबडा करुन उभे राहा ! तास सुरु असतांना मुख्याध्यापकांचा राउंड असायचा खिडकीतून लक्ष आणि पुन्हा लक्ष नाही किंवा काही रिकामे काम करतांना दिसला कि आहेच... १०० मीटर रनिंग, लांब उडी, उंच उडी, खो खो, क्रिकेट... याच्या जोडीला नाटके, गीत गायन, वेगवेगळ्या स्पर्धा ! अभ्यास तो पण होताच कि.... या सगळ्या गोष्टींची तयारी भूतो न भविष्यती ! तुम्हाला कितीही चांगले झाले वाटले तरी गुरुजींचे समाधान कुठे ? परत सुरु... मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा... जीवनात जिद्द, मेहनत, सातत्य, वचनबद्धता, समर्पण, संयम, सातत्य हे सर्व आले येथून अर्थात तेव्हा हे शब्द गावी पण नव्हते. म्हणून तर हा सुवर्णकाळ ! एव्हढे सर्व असल्यावर कोणाला हवी सुट्टी ? जीवावर यायचे सुट्टी असली कि... हेच शाळेचं यश आणि उद्देशही आणि म्हणूनच हि दीर्घ कृतज्ञता ! 

या जोडीला अजून इतर परीक्षा असायच्या त्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी आणि गणिताच्या ४ परीक्षा दरवर्षी एक एक करीत ९ वी पर्यंत बहुतांश मुले द्यायचीच... तरखडकर इंग्रजी ग्रामर तेथे कळालं. ज्यांना चित्रकलेची आवड त्यांच्यासाठी एलिमेंटरी, इंटरमिजीएट. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गीता पठण, कणकवलीची राज्य बाल्य नाट्य स्पर्धा, मनाचे श्लोक, जोडीला लक्ष लक्ष सूर्य नमस्कारासारखे उपक्रम, एनसीसी कॅम्प... स्पोर्ट मीट / वीक वगैरे भाग नव्हता कारण तो रोजचा भाग होता. सर्वच मुले हुशार आणि प्रत्येकामुळे शाळेला एक वेगळी ओळख. अर्थात हुशार म्हणजे ज्याच्या त्याच्या विषयात म्हणजे अभ्यास, खेळ, वक्तृत्व, वादविवाद, नाटक, गाणे... काही ना काही तर प्रत्येकात आहेच नं ! तेच शोधून त्यावर काम करणे हेच शाळेचे ध्येय. 

शाळेचा शिक्षकवृंद !
मधल्या सुट्टीतही कबड्डी, क्रिकेटच्या मॅचेस चालू असतील स्कोर पाहायला बाहेर जाणार खास स्कोर लिहिले जायचे परतीला वेळ झाला कि आहेच पुन्हा... बाहेर गाडीवर मिळणाऱ्या गोळ्या, अमुन्या, वाळलेली बोर असो. शाळे शेजारीच स्वस्तिक चित्र मंदिर (थिएटर) काही वेळेस टॉकीजमधील पिक्चरचे डायलॉग गाणे स्पष्ट ऐकू यायचे. मस्ती केली तरी पाय वाकडे पडणार नाही याची काळजी... विचारांची पक्की बैठक अर्थात त्यामागे होती शाळेतील शिक्षकांची मेहनत. शाळा म्हणजे खरे तर शिक्षक ६ वीला श्री. एस. एस. मुसळे सर, ७ वीला श्री. ह. म. भंडारी, ८ वी श्री. आर. एस. जहागीरदार, ९ वीला एन. एन. शाह आणि दहावीला श्री. शा. रा. नाईक प्रत्येकाचे एक वेगळेपण , वैशिष्ट्य... असेच गणिताचे श्री. व्ही. वाय. दाबके, इतिहासाचे श्री. मदनलाल मिश्रा, संगीत कलाचे श्री. रत्नाकर रानडे आणि एनसीसीचे श्री. आर. एस. पाटील. सर्व नररत्नांची खाणच... नाही याच्यापुढे लिहिता येणार. माणूस घडणं, माणूस उभा राहणं इतकी सोपी गोष्ट नाही मात्र ते करु शकते ती समाजजीवनातील शाळा नावाची व्यवस्था ! अशा शाळा आणि अशी व्यवस्था भारतीय संस्कृतीची धरोहर आहे. त्यातूनच निर्माण होणारा वसा आणि वारसाही ! त्यासाठीच शाळेप्रतीची कृतज्ञता... विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची हि कृतज्ञता अशीच कायम संक्रमित होत राहो ज्यामुळे संस्कृती व राष्ट्र चिरकाल टिकेल... हिच बा गणराया चरणी मनापासून प्रार्थना  ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Sunday 23 August 2020

कृतज्ञता शिक्षकांप्रतीची...!


माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो मग शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण ठरतेच आणि ती देखील आयुष्यभरासाठी... म्हणूनच आपण त्यांच्याप्रती कायम कृतज्ञ असणे हेच खऱ्या अर्थाने माणूसपणाचे लक्षण आहे. पहिले गुरु माता-पिता, तदनंतर शालेय शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षण, व्यावसायिक शिक्षण देणारे वरिष्ठ सहकारी, आध्यात्मिक जीवनाची दिशा दर्शन करणारे अशा एका व्यक्ती सोबतच आपला जीवनप्रवास सुरु असतो. हा प्रवास जेव्हढा समृद्ध तेव्हढा माणूस अधिक प्रगल्भ ! हि प्रगल्भताच माणसाला एक संवेदनशील व जागरुक नागरिक बनवितो. माणसाची हि जडणघडण करणाऱ्या शिक्षकांप्रती आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० च्या कृतज्ञता उत्सवात आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. 

विषय शिक्षणाबरोबरच जीवन विषयक दृष्टिकोन देणारे, व्यावहारिक जगाची ओळख करुन देणारे, आपल्यातील कला कौशल्याला विकसित करीत सर्वांगीण विकास साधणाऱ्या शिक्षकांनी आयुष्यभराची जी शिदोरी दिली आहे त्याबद्दल हि कृतज्ञता ! केवळ व्यक्तीच नव्हे तर अनुभव हाही शिक्षकच. व्यावहारिक शिक्षणाबरोबरच समाज जीवन समृद्ध करणारे समाजशिक्षकही या कृतज्ञतेचे हक्कदार ठरतात. अर्थात हि कोणत्याही शिक्षकाची मागणी नव्हे तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या हृदयात आपल्या कृतीने निर्माण केलेली ती जागा आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे मिळविलेला तो सन्मान आहे. 

मुळात शाळा या विषयाची भीती घालविणारे प्राथमिक शाळेतील शिक्षक, विषयांची व खेळाची गोडी लावणारे शिक्षक, आपल्यातील उपजत गुणांना ओळखून त्याद्वारे व्यावसायिक जगतात आपली जागा निर्माण करणारे महाविद्यालयीन शिक्षक या सर्वांचेच जीवनात एक वेगळे स्थान आहे. चांगले वळण लावण्यासोबतच प्रेरणा, जिद्द, नवीन काहीतरी करण्याचे बळ, कर्तव्याची जाणीव, दातृत्व व नैतिकता देणारे हे सारे शिक्षक. कधिक कौतुक करुन तर कधी रागावून सारासार विवेकाने जीवन जगण्याची गुरुकिल्ली देणारे शिक्षक. आपुलकी व आत्मीयतेने शिस्त, क्षमा व करुणा उत्पन्न करणारे शिक्षक. कर्तव्य पलीकडे व चाकोरीबाहेर जाऊन एक माणूस घडविण्यासाठी, राष्ट्रप्रेमी नागरिक घडविण्यासाठी  चाललेली हि धडपड अविरत, अविश्रांत आणि निश्चयाने ! 

कुणाला मातीच्या गोळ्याला दिलेला आकार तर कोणाला सुरवंटाचे फुलपाखरातील परिवर्तन वाटते. एका बाजूला नव्या जगाची ओळख करुन देणारे तर दुसऱ्या बाजूला त्याला सामोरे जाण्यासाठीची सिद्धता करणारे हे शिक्षक. वयाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर तटस्थपणाने सिंहावलोकन केले तर त्यांच्यातील या सर्वांमध्ये एक सामान धागा दिसतो तो म्हणजे आपला विद्यार्थी घडविण्यासाठी त्याच्यातील गुणग्राहकता शोधण्याचे सर्वात अवघड काम... विद्यार्थ्याने आपल्या यशाचे दिलेले संपूर्ण श्रेय हिच त्याची कर्तव्य परायणता ! शिक्षकाला विद्यार्थ्यांची आई तर आईला बाळाची शिक्षिका होता आले पाहिजे असे म्हणत असतांनाच शिक्षकाला विद्यार्थ्यांतील शिक्षक जागा करता आला पाहिले तर वसा आणि वारसाची हि संस्कृती चिरकाल टिकून राहील आणि त्याप्रतीची कृतज्ञताही ! शिक्षक हेच राष्ट्रजीवनाचे बलस्थान असून विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता अशीच संक्रमित होत राहो हिच त्या बा गणराया चरणी विनम्र प्रार्थना  ! गणपती बाप्पा मोरया ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 


Saturday 22 August 2020

कृतज्ञता पालकांप्रतीची...!

कृतज्ञता पालकांप्रतीची...! 


बा गणराया ! आजच्या पहिल्या दिवशी आम्ही तुझे आभार मानत आहोत तू आम्हास हे सुंदर जग दाखविणारे, आम्हास घडविणारे, आमचे पालनपोषण करणारे. आम्हाला माणूस बनविणारे पालक दिलेत. ते आज आमच्यात आहेत किंवा नाहीत... पण ते आमच्या हृदयात आहेत. आम्ही त्यांच्यारुपाने आहोत. आमच्यात त्यांना शोधतो आहोत. त्यांचा आनंद आणि समाधान हिच आमची श्रीमंती अन त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यताही ! आम्ही कृतज्ञ आहोत त्या सर्व पालकांचे कारण आम्हीच त्यांचे आधुनिक काळातील रुपे आहोत...

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० च्या कृतज्ञता उत्सवाच्या निमित्ताने आज पालकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करतांना आनंद होत आहे. जन्मदात्या आई-वडिलांसह आपल्याला घडविणाऱ्या इतरही पालकांसाठी हि कृतज्ञता आहे. आजच्या या पहिल्या भागात ऐंशीच्या घरात असलेल्या श्रीमती शशिकला खाडिलकर यांचेसह सौ. वैदेही नाखरे, ऍड. प्रदीप कुळकर्णी, श्री. अतुल तांदळीकर, श्री. दिलीप तिवारी, रेवती ठिपसे,, सुजाता बोरकर, संध्या किशोर व प्रा. बी. एन. चौधरी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्री. प्रदीप रस्से यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी यासाठी दररोज सुंदर असे समर्पक चित्र काढून द्यायचे मान्य केले आहे. आपल्या सर्वांच्याच भावना या मंडळींनी व्यक्त केल्या आहेत. आशा फौंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल या सर्वांचा शतश:ऋणी  आहे. 

पालक शिक्षित असो वा अशिक्षित आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे हिच त्यांची इच्छा आणि त्यासाठीच त्यांची धडपड व कष्ट ! जन्मदात्या पित्याला जन्मदात्या मातेचीही तेव्हढीच सक्षम साथ... संस्कार देण्याचे काम आईचे तर मूल्ये रुजविण्याचे काम पित्याचे ! सर्वतोपरी सहकार्य करणे हे काम नैतिक जबाबदारी स्वीकारलेल्या पालकांचे... पाढे, श्लोक, स्तोत्र पाठांतरापासून, अभ्यास, गोष्टी सांगणे, चांगल्या गोष्टींची सवय लावण्यापर्यंत पालकत्वाचे बाह्य रुप. मात्र घरादारापासून व्यवसायापर्यंतच्या त्यांच्या कृतीतून आदर्शांचा वस्तुपाठ मुलांना होणे हा त्यांच्या अंतरिक स्वभावाचा बाह्य परिणाम ! चांगल्या - वाईटाची प्रचिती येतांना ठामपणे योग्य निर्णय घेण्याची ताकद पालकांच्या शिकवणीतूनच  मिळते. उच्च ध्येय, त्याला कर्तव्य कठोरपणाची जोड, परिस्थितीशी दोन हात करण्याची सिद्धता यांचे बाळकडू घरातूनच आणि पालकांकडूनच मिळते. कष्ट, प्रामाणिकपणा, स्वाभिमान हि पित्याची देन तर सोशिकता, काटकसर, समाधानी व आनंदी वृत्ती हि आईची... सहजीवन, परस्परपूरकता, प्रथम जे काही ते मुलांसाठी व नंतर स्वतःसाठी हि दोघांची ! 

संवेदनशीलता, माणुसकी, परोपकारी वृत्ती, भावना आणि व्यवहार यातील समतोल, सामाजिक जाण व कर्तव्याची नीव रचणारे पालक आपल्या पाल्याच्या कृतीतून एक वेगळा अविष्कार ज्यावेळेस अनुभवतात त्यावेळेस त्यांना "पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा !" या युक्तीची सार्थकता वाटते. शिक्षित, समंजस व प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या आपल्या पाल्यांकडे पाहिल्यावर त्यांना होणारे आत्मिक समाधान लाख मोलाचे ठरते. पिढीमधील अंतर कितीही मोठे असले तरी वैचारिक समानता पालक-पाल्य नात्याला मैत्रीचे कोंदण देते. भारतीय संस्कृतीत वसा आणि वारसा यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. पालकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करतांना त्यांनी दिलेला वसा आणि वारसा आपले जीवन समृद्ध करणारा ठरतो. पालक हे कुटुंबव्यवस्थेची बलस्थाने असून वसुधैव कुटुंबकम समाजात हि भूमिका निभावणारे अनेक आहेत. आधुनिक पालकांनी आपल्या पालकांप्रतीची व्यक्त केलेली कृतज्ञता पुढे संक्रमित होत राहो हिच बा गणराया चरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

9823334084 

Tuesday 18 August 2020

पोळा : मना मनातला...!


कर्माने नसलो तरी जन्माने शेतकरी आहे... हाडाचा असलो तरी सध्या बांधावरचा शेतकरी आहे... त्यामुळे शेती, शेतकरी, सालदार, शेतमजूर, गाई-म्हशी, गुरे-ढोरे, बैलजोडी, बैलगाडी, नांगर, वखर, पास, पांभर, दुस्सर, मुक्षे , रुम्हणे, उडीद, मूग, कपाशी, ज्वारी, मका, केळी, गहू, पयखाटी, तुरखाटी, टोचणी, निंदणी, सरा, कापणी, काढणी, मळणी, सरकी, ढेप, दान या सर्व गोष्टी विशेष आवडीच्या ! लहानपणी दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे राहिलेलो असल्याने आणि सर्व कामे मनापासून व आनंदाने केल्याने या सर्वांबद्दल विशेष प्रेम वाटते. निसर्ग आणि परमेश्वराचे नाते तेथेच उमगले. गाव, गावातील माणसे, त्यांचे ऋणानुबंध, चालीरीती, अहिराणीतील खास संवाद, नातेसंबंध, माणुसकी यामुळं गावाचे आजही आकर्षण वाटते. गोठा, जनावरे, चारा, शेण, सडा सारवण या गोष्टींची कधी किळस वाटली नाही. व्यायलेल्या म्हशीला पाणी पाजायला नेणे, तिला धुणे, चारा घालणे या गोष्टी आपलेपणाने करीत असे. चोपडा तालुक्यातील धानोरा हे आमचे गाव ! आज पुन्हा एकदा हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आजचा खास दिवस बैलपोळ्याचा ! यावर्षी गावाकडे जाता आले नाही याची खंत आहे मात्र मनातला पोळा आजही जिवंत आहे.   


दिनेश चव्हाण यांनी जलरंगात साकारलेली दोनही चित्रे
गेल्या पाच महिन्याचा कालखंड आठवला कि वरील सर्व गोष्टींबद्दल आपण किती कृतज्ञ असावे हे लक्षात येते. तंत्रज्ञानाने कितीही विकास केला तरी माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्नधान्य पिकविणारा तो शेतकरी आणि त्याचे सर्व सोबती यांचे महत्व अधोरेखित होते. कृषिप्रधान असलेल्या भारत देशात सर्वात जास्त वाताहत झालेला, दुर्लक्षित असलेला व उपेक्षित घटक म्हणजे शेती, शेतकरी, शेतीमाल  आणि जनावरे ! माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी जागतिक महासत्ता होण्यासाठी शेती या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन करुनही आज त्याची अवस्था फारशी चांगली नाही. तरीही परिस्थितीशी दोन हात करीत त्याचे लढणे अव्याहतपणे सुरु आहे. त्याच्या करिता ना वेतन आयोग ना त्याच्या मालाला हमी भाव ! कॉर्पोरेट जगतात प्रोजेक्ट कॉस्ट ठरविताना त्यावर खर्च केलेला मिनिटांचा हिशेब मांडणारा माणूस मात्र प्रामाणिकपणे अंगमेहनतीचे, कष्टाची परिसीमा गाठणाऱ्या शेतकऱ्याच्या कामाचे दाम देत नाही हे वास्तव नाकारता येत नाही. त्यांची ना युनियन, ना असोसिएशन... जमले तर त्याला नाडणारे आणि नागवणारेच अधिक ! कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, कधी लाल्या तर कधी करपा, कधी लोड शेडींग तर कधी मालाला मातीमोल भाव... तरी तो लढतोय, जगतोय आणि जगवतोयही... स्वतःला, कुटुंबाला, त्याच्या जनावरांना आणि समस्त प्राणिमात्राला ! त्याच्यासोबत त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच राबणारा त्याचा सखा म्हणजे सर्जा - राजाची जोडी... त्यांच्या सणाच्या निमित्ताने हा लेख...

आज सकाळपासूनच समाज माध्यमांमध्ये याबद्दलच्या अतिशय संवेदनशील अनेक पोस्ट वाचण्यात आल्या. त्यांचा सारांश थोडक्यात वरच्या परिच्छेदात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी ते मांडणारे व लिहिणारे मूळ या काळ्या आईची लेकरचं ! जरी गावाकडे जाता आले नाही तरी त्यांच्या सर्वांच्या सोबतीने हा मना मनातला पोळा अनुभवला... त्याचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा हाच यामागील खरा उद्देश...खान्देशातील पोळा म्हटला कि कवयित्री बहिणाबाई चौधरींची कविता आलीच पाहिजे... 

पोया (पोळा)

आला आला शेतकर्‍या, पोयाचा रे सन मोठा

हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा

आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार

करा आंघोयी बैलाच्या, लावा शिंगाले शेंदुर

लावा शेंदूर शिंगाले, शेंव्या घुंगराच्या लावा

गयामधीं बांधा जीला, घंट्या घुंगरू मिरवा

बांधा कवड्याचा गेठा, आंगावर्‍हे झूल छान

माथां रेसमाचे गोंडे, चारी पायांत पैंजन

उठा उठा बह्यनाई,, चुल्हे पेटवा पेटवा

आज बैलाले नीवद, पुरनाच्या पोया ठेवा

वढे नागर वखर, नहीं कष्टाले गनती

पीक शेतकर्‍या हातीं, याच्या जीवावर शेतीं

उभे कामाचे ढिगारे, बैल कामदार बंदा

याले कहीनाथे झूल, दानचार्‍याचाज मिंधा

चुल्हा पेटवा पेटवा, उठा उठा आयाबाया

आज बैलाले खुराक, रांधा पुरनाच्या पोया

खाऊं द्या रे पोटभरी, होऊं द्यारे मगदूल

बशीसनी यायभरी, आज करूं या बागूल

आतां ऐक मनांतलं, माझं येळीचं सांगन

आज पोयाच्या सनाले, माझं येवढं मांगन

कसे बैल कुदाळता, आदाबादीची आवड

वझं शिंगाले बांधतां, बाशिंगाचं डोईजड

नका हेंडालूं बैलाले, माझं ऐका रे जरासं

व्हते आपली हाऊस, आन बैलाले तरास

आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं

बैला, खरा तुझा सन, शेतकर्‍या तुझं रीन !

कवयित्री बहिणाबाई चौधरी

बळीराजाच्या या साथीदाराच्या सणाची तयारी कशी करावी हे सांगतांना, हौशी उत्साही मंडळींना आपल्या हौसेसाठी बैलांना त्रास देऊ नका असंही अक्षिशित कवयित्री बहिणाबाई सांगतात... दिवसाची सुरुवात श्री. मनोहर पाटील यांच्या शब्द प्रवासाने झाला. कष्टाशिवाय मातीला आणि बैला शिवाय शेतीला पर्याय नाही... प्रा. डॉ. किसन पाटील यांनी त्यांची २०१७ मध्ये लिहिलेली व आकर्षक पद्धतीने सजविलेली कविता पाठविली. सौ. विशाखा देशमुख यांनी मातृदिनासोबतच बैलपोळ्याच्या आठवणी सांगितल्या. मो. का. भामरे यांनी बळीचे राज्य कुठे आहे ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला आहे. चाळीसगाव येथील कवी मनोहर आंधळे आपल्या कवितेत ढवळ्या-पवळ्याच्या जोडीला जिवलग सखे म्हणतात...


जिवलग सखे||

अन्न-धान्याच्या या राशी

ढवळ्या-पवळ्या वाहती

उन्हा पावसात नित्य

शेती मातीत राबती

                                 शिंग बाकदार उंच

                                 रंग पांढरा दुधाळ

                                 हंबरता कानी येई

                                 नाद मधाळ,मधाळ

घरादाराला सदैव

त्यांच्या घुंगरांचा लळा

माझ्या उंबऱ्याला कधी

नाही आली अवकळा

                                 करती वैरण चर्वण

                                 औत पांभर ओढती...

                                 माझ्या शेता-मळ्यामध्ये

                                 कित्ती केल्या मशागती!

शेता शिवाराला माझ्या

त्यांचा सार्थ अभिमान

हाक देता साथ देती

जगा शिकवी इमान

                                  त्यांच्या श्रमानं घामानं

                                  मी होतो  कृतकृत्त्य....

                                  ढवळ्या-पवळ्यामुळे

                                  सुखी-समाधानी चित्त..!

येवो यंत्र तंत्र युग

सारे वाटे मला फिके

ढवळ्या-पवळ्याच माझे

खरे जिवलग सखे!

                                  सण वर्षातून एक....   

                                  लोकं म्हणती बैलपोळा

                                  शेतकरी मैतराचा...

                                  हाच सन्मान सोहळा!

              मनोहर ना.आंधळे,  चाळीसगाव-९४२१५१२५७०.


बैल पोळा

बैलजोडी एक मनातील स्वप्न असते

मनात बसते तीच शेतकरी विकत घेतो

घरी आणली की लक्ष्मी पुजा करते

घरात आई बाबा सर्व जण तीच चर्चा

दुसऱ्या दिवशी चांगली केवढी महाग

कामात पाहिजे अशी चर्चा सुरू होते

शेतकामात मालक जुंपतो कामे करतो

बैलांचे चारापाणी ढेप,दाळ खाऊ घालतो

मुलांना सारखं सर्जा राजावर लक्ष ठेवतो

मुलीकडे गावाला जावून मुक्काम नाही

बैलजोडीला चारापाणी नाही केले तर 

मुलां मुलींना बोलतो,कधी मारतो पण...

बैलजोडीचा पोळा सण हौसीने करतो

तो आपला अन्न दाता म्हणजे शेतकरी असतो..

@. गोविंद पाटील सर, पाथरी जळगाव.


नंदी पुजावा पोळ्याला....... 

लागे सोन्याचं कणीस 

काळ्या मातीच्या गोळ्याला  ! 

खरा रानाचा मैतर , 

नंदी पूजावा पोळ्याला ....!! 

त्याच्या घामानेच येते

दाण्या, दाण्याला चकाकी  ! 

त्याच्या पुरणपोळीची, 

आज चूकवारे बाकी ...!! 

नांगरतो,,वखरतो,,

देतो वावर पेरून   ! 

नाही फिटणार कधी ,

त्याच्या राबण्याचं रूण  !! 

बैला शिवाय शेताचं 

रूप म्हसनासमान, ! 

सजवून मिरवावा

बैल पोळ्याला डौलानं  !! 

नंदी राजाला सजवा 

हिंगोळीने शिंग चोळा, ! 

अरे वर्षाकाठी येतो

एकदाच बैलपोळा    !! 

करा करा त्याची सेवा

त्याला चढवा रे साज  ! 

गोडधोड खाऊ घाला 

पण जूंपु  नका आज   !! 

-- गो.शि.म्हसकर, नगरदेवळा जिल्हा जळगाव


ढवळ्या-पवळ्या

हिरवी श्यामल 

माय धरित्री 

उचंबळोनी आली..

मातीमधले 

तृप्त शहारे 

मिरवत आहे गाली..

कलून गेली 

मावळतीला 

एकल तेजल ज्योती..

क्षितिजावरती 

साय पसरली 

सावल्यांतुनी वरती..

सांजकोवळ्या 

मधु किरणांचा 

सडा शिंपला भवती..

आणिक आहे 

ओसरलेली 

पाण्यामधली भरती..

ढवळ्या पवळ्या 

चला घराला 

उद्या नांगरू शेती..

सांज वितळली 

पाण्यामध्ये 

लहरी झोका देती

अशोक बागवे 


गेल्या परक्या गावाला...

कोण आपलं परकं

नाती उरली नावाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला

दुःख उतू आल्यावर

कसं झेलावं मनाला

सावलीनं द्यावा आता

थोडा विसावा उन्हाला

जत्रा स्वप्नांची भरे

गर्दी उसनी शिवाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला...

गोठा सोडून निघाल्या

गाई चुकल्या रानात

खोटया मातीच्या बैलाला

माय पूजते सणात

माझं माझं म्हणताना

द्यावा रक्ताचा हवाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला...

कळा सोसल्या मातीनं

झळा उन्हाच्या सोसून

किती गिरवावे तरी

पाढे जातात पुसून

कवितेच्या ओळीतला

थोडा गारवा जीवाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला...

-विष्णू थोरे,चांदवड.


माटीचे बैल

 मीनं पुसलं बोयले

   पोया तं बैलांचा सन

 मंग माटीच्या बैलांले

   काब्र पुजतो आपन ?ll

  धुरकरीबी माटीचा

    नही रंग दोन्हींलेबी 

  बैलांपह्यले निवद

     मान मिये दोन्हींलेबी ll

  बोय सांगे मंग माले

     बैलाकन व्हये शेती

  शेतमजूर रंघत

     गाये ,पीक येये हाती ll

  शेतमजूर नं बैल

     दोन्ही माटीत राबता

  आटीयीसन रंघत

      माटीमधी माटी व्हता ll

   सालदार नं मजूर

      घाम शेतात गायती

   त्याच घामाच्या थेंबांनं

      वलावते शेतमाटी ll

   माटीमधी माटी व्हयी

      माटीमधी जो मियला

   त्याच माटीतून बैल

      आनं धुरकरी बनवला ll

   अंग त्यांचे त्या माटीचे

       रंग माटीचाच त्यांचा

    मिये माटीत म्हनून

        मान माटीच्या बैलांचा ll

    बैलांसंग बैल झाले

        बैलासंग माटी झाले

    माटीच्या मजुरालेबी

        मान पोयाच्या सनाले ll

     पुरनपोयी बैलांले

         ढोरक्यांलेबी जेवन

     झूल बैलांले ,मजूर

         नया सद्र्यात मिरनं ll

 प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे,जळगाव,  ९७३०२२११५५


पोया

सन वर्साचा आला आला रे आज पोया

पोरंसोरं पहा सर्वी झाली रे आज गोया

धव्व्यापव्वया जोडीले तू खावाडं रे पुरनपोया

जोडी राबते रे तुही सालभर वावरात

हिरवं सोनं पिकोयते तुह्यासंग शिवारात

एक दिस पोयाले रे त्याची दृष्ट काढ तू दारात

न्हाऊमाखू त्याह्यले घालं टाक पाठीवर झुलां

शिंग रंगवून गयातं बांध घुंगरायच्या माला

काढ ढोल वाजवत मिरनूक घालूनिया पुष्पमाला

सखा सोबती जीवाचा तुह्या जल्माचा मैतर

फोड नारय पायाशी अन् वाट तू साखर

वर मांगा आबादानीचा मंग सारं घरदारं

झाला शांत नंदी आता गो-हा होता जो अवखड

नको जुपू आज गाडी नको घालू रे जोखड

एक दिस हा मानाचा त्याले फिरवं निखड

खिर,वडा,पुरनपोयीच त्याले वाहाड रे पान

घरोघरी निवदाचा त्याले घिऊ दे रे मान

मंग सालभरी कष्टुनिया तो तुही वाढविन शान

आला आला बैल पोया जमल्या सर्व्या बाया

पुजा नंदीची करून त्या सांगती माऊल्या

नंदीदेवा आम्हावरी ठेवा कृपेच्या सावल्या

प्रा.संध्या महाजन


कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा .!

आमच्यासाठी ज्यानं बनवलाय हा पोळा 

त्याच्याच आयुष्याचा झालाय चोळामोळा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा 


शिंगांना रंग आहे पाठीवरती झुल आहे 

साजरा करतोय सण कसाबसा 

सगळं सगळं कबूल आहे 

तरी वाटत नाही पाहिजे तसा पुर्वीसारखा सोहळा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा 


महागाईनं आभाळ पेटलं, अवघं जग जागेवरच गोठलं 

काम नाही धंदा नाही खिशात रुपया बंधा नाही 

घालून ठेवलाय सर्वत्र कोरोनानं वेढा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा 


वैर्याची ही वेळ आहे नियतीचा हा खेळ आहे 

कुणीच कुणाचं राहिलं नाही 

लेकरानंही मरताना मायचं तोंड पाहिलं नाही 

परस्पर दफन केला जातोय एकुलता एक पोटचा गोळा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा..?

रत्नाकर खंडू कोळी मु पो खामखेडा ता शिरपूर, जि धुळे ह मु जळगाव मो ८३२९६४६५०५


बैल....आणि बाजार

बाजार भरला आहे

खचाखच....

व्यापाऱ्याची गर्दीच गर्दी

विकणारे उभे आहेत

जशी भर बाजारात 

काढलेली हक्काची वर्दी 

विक्रीच्या बैलांच्या डोळ्यात

मात्र,काळाच्या लाटाच लाटा

जंगली, पाळीव,घरसदस्य,अन

मालकाचा दोस्त होत

गेलेल्या वाटा...

मालक.. हतबल उभा..

दुबार,तिबार पेरणी करून

अकाली करपलेल्या धांड्यासारखा..

बैल.. डोळ्यात कणव घेऊन

ऐन युद्धसमई गोळ्या लागून

धारातीर्थी पडणाऱ्या जवानासारखा....

गिऱ्हाईक मात्र उभे आहेत

व्यापाऱ्याच्या वेशात...

लचके तोडायला...

मालकाच्या अन बैलांच्या जीवाचे

हिशोब काढायला...

मालक आणि बैल

मूकपणे बोलताहेत

राज्या.. धन्या....!

कधीतरी पुन्हा एकत्र येऊ

अन ही धरणी पुन्हा

सुपीक उत्कर्षाला नेऊ...

बाजार संपला...

दोघेही रिकामे रिकामे....

डॉ विशाल इंगोले, लोणार(*सरोवर), ९९२२२८४०५५ 


बैल

बैल श्रमाचे गा देव

बैल सुगीची आरती

बैल शेतीचा जिव्हाळा 

बैल गुंतलेली नाती !

बैल मृगाचा संदेश

बैल पावशाचे बोल

बैल आषाढ लाडका

बैल ढगांचेही ढोल !

बैल पीक मोतीयांचे

बैल पिकांचा सोहळा 

बैल तरारले रान

बैल शिवाराचा डोळा.

बैल धन्याची पुण्याई

बैल मातीचेच पुण्य

बैल उभा वनवास

बैल दुःखाचे अरण्य !

बैल शोषीत-पीडीत 

बैल मौनातला शब्द

बैल जन्माचा उन्हाळा

बैल फाटके प्रारब्ध !

बैल शिवाराची वाट

बैल परतीचा रस्ता

बैल कनवाळू मित्र

बैल श्रमाचा शिरस्ता.

बैल पायासाठी जोडा

बैल वाघाची हिंमत 

बैल जगणेच न्यारे

बैल मृत्यूची किंमत.

बैल रुसले आयुष्य

बैल चूकलेला ताळा

बैल एक प्रथापूजा

बैल कधीमधी पोळा !

रवींद्र जवादे


मागील वर्षी सातारा- सांगली -कोल्हापूर येथे पुराच्या पाण्याने मृत झालेल्या बैलांचा आक्रोश.. पोळ्याच्या पूर्वसंध्येला ..

काळजाचा पोळा.. 

मालक ..

तुम्हीं काळजाचा कासरा

करा जरा सैल..

पोरांप्रमाणे जीव लावला

जरी होतो आम्ही बैल..

आपल्या घरादाराच्या

सुखासाठी दिवसरात्र चालत

होतो मैलोनमैल..

पुराच्या पाण्यात आमचा

जीव गेला पण.. 

तोडून गेलो नाही दावण

अन सोडूनही गेलो नाही अंगण..

फक्त मालक तुमच्यासाठी.

तुम्ही आम्हांला कधीच समजले

नाही जनावर..

आज पोळा आहे म्हणून 

आमची खूप आठवण येईल

तेव्हा अश्रू होईल अनावर..

मालक स्वतःला अन घरातल्या

सर्वांना सावरा..

पडलेलं घर, गोठा हळूहळू आवरा..

मालक ,आज फक्त एकच मागणं आहे..

जेव्हा तुम्ही सर्व मातीच्या घरातून

सिमेंटच्या घरात जाल ना

तेव्हा फक्त आमची आठवण 

म्हणून जमलंच तर आपल्या तिघांचा मागच्या पोळ्याला काढलेला फोटो

फ्रेम करून भिंतीवर टांगा..

अन पुराच्या पाण्यात माझ्या सर्जा- राजाचा जीव गेला असं येणाऱ्या जाणाऱ्याला सांगा..

आता आम्ही खूप दूर निघून आलोय..

देवाला सोडून ..देवाच्या घरी..

तेवढी फक्त आमची आठवण ठेवा..

तुमच्या सिमेंटच्या किंवा काळजाच्या भिंतीवर सदैव टांगून..

बस्स एवढंच ...जमलं तर करा मालक...

 ©संदीप विकास गुजराथी, चांदवड जि. नासिक,  ९६० ४५० २७१५

वरील सर्वच कवितांमध्ये मांडलेले वास्तव, त्यातून कवीच्या मनातील आर्तता त्यांच्या मना मनातील पोळा आपल्याला सांगतोय. शेवटच्या कवितेत पुरात वाहून गेलेल्या व दोन जिवलगांमधील ताटातूट झालेल्या एकाने आपले मनोगत दुसऱ्याला अतिशय चपखल पद्धतीने सांगितले आहे. ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात या लाखच्या पोशिंद्याबद्दल आणि त्याला तेव्हढीच तोलामोलाची साथ देणाऱ्या त्याच्या सर्वांबद्दल कृतज्ञतेचा भाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. साहित्यातून साजरा करण्यात आलेला हा पोळा या साहित्यिकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या कलाकृतीला मनापासून अभिवादन करतो व आजचा पोळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे भाग्य मला दिले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. 

गिरीश कुळकर्णी