Sunday 25 October 2020

आपल्या सवयींचे सीमोल्लंघन...हिच जगण्याची खात्री



सध्याच्या कोविड महामारीच्या काळात माणसाला जगण्याची खात्री हवी आहे. जोपर्यंत त्यावरील उपाय बाजारात येत नाही तो पर्यंत आपल्या सवयींचे सीमोल्लंघन करण्याचा हा काळ आहे. हे सीमोल्लंघनच आपल्या जगण्याची खात्री व यशस्वी वाटचालीची नांदी ठरणार आहे. सवयींचे गुलाम असलेल्या आपल्या सर्वांना गेले सहा-सात महिन्यांच्या काळात आपण स्वतःला बदलण्याची पूर्ण संधी उपलब्ध होती. काही गोष्टींच्या बाबतीत व काही प्रमाणात आपण त्या अंगिकारला मात्र मूलभूत सवयीकडे आपण सपशेल दुर्लक्ष केलेले दिसते. त्यासाठीच हे लेखप्रपंच ! 

अनलॉकच्या या काळात बाहेर जे दिसले आणि रोज जे ऐकतोय त्यामुळे सवयीच्या सीमोल्लंघनाची आवश्यकता लक्षात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी समाज प्रबोधनातून या गोष्टीकडे लक्ष वेधले. "न्यू नॉर्म" अर्थात नवीन जीवनशैली असा उल्लेख मला विशेष भावला. कालपर्यंतच्या आपल्या सवयींना बदलले तर आपण "न्यू नॉर्म" सेट करु शकू व जीवनाचा आनंद घेऊ शकू. गेल्या काही दिवसात गावाकडे गेलो असता कोणाही व्यक्तीच्या तोंडावर मास्क नसल्याचे पाहून आश्चर्य वाटले. समाज माध्यमातून येणाऱ्या सामाजिक कार्यक्रमातील व्यक्तींचे वर्तन, कालही संध्याकाळी जळगावच्या काव्य रत्नावली चौकामधील अनुभवलेले चित्र अतिशय भयावह, बेपर्वाई व बेजबाबदारीचेच होते. थोडे वाचायला कटू वाटले तरी वास्तव मांडलेच पाहिजे. गेल्या काही दिवसात अनेकांशी झालेला संवाद, नातेसंबंधातील साठीच्या उंबरठ्यावरील व्यक्तीच्या दुर्दैवी निधनाची बातमी, उच्च रक्तदाबाचा शिकार झालेला पन्नाशीतील मित्र आणि "काय बोलावं तेच सुचत नाही" म्हणणारी चाळीशीतील गृहिणी हे या लेखामागची प्रेरणा आहे. 

तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे अबोल होत जाणारी तरुणाई, भान हरपलेला समाज, मनातील सर्व प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या जिवाभावाच्या आश्वासक मित्राचा अभाव, आर्थिक असुरक्षिततेमुळे निर्माण झालेली अनिश्चितता, अनाकलनीय परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीची निर्णयक्षमता, आत्ममग्नतेमुळे जीवनातील हरविलेला आनंद, समाजातील नकारात्मक घटनांचा होत असलेला विपरीत परिणाम,  यासह अनेक गोष्टी या लेखाचे व समस्यांचे मूळ आहे. काळ, वेळ व परिस्थितीनुरुप बदल अंगिकारण्याची मानसिकताच आपल्याला उपयोगी ठरणार आहे.  एका बाजूला शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची तयारी व दुसऱ्या बाजूला "स्वओळख" बदलण्याची भीती अशा विमनस्क स्थितीत समाज आहे. आपल्या पश्चात काय ? हा प्रश्न वारंवार अनेक मानसिक गोंधळ निर्माण करीत आहे. आपल्या गरज व आवश्यकता मर्यादित करण्याचे मोठे आवाहन समाजासमोर आहे. यासाठीच वर्तन परिवर्तनाची आत्यंतिक आवश्यकता आहे म्हणूनच लेखाचे शीर्षक आहे सवयींचे सीमोल्लंघन ! 

हे सर्व वाचल्यानंतर स्वाभाविक प्रश्न येतो सवयींचे सीमोल्लंघन कसे करायचे ? 

१. समाजाभिमुख व्हा... व्यक्त व्हा... बोला... काय म्हणायचे ते म्हणा...

२. वास्तव स्वीकारा. जे बदलता येणार नाही व जे बदलणे आपल्या हातात नाही ते सोडून द्या...

३. जीवनात सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत याचा वस्तुपाठ मनाला घालून द्या. 

४. कोण्तायही कामाची लाज न बाळगता आपली नवीन ओळख निर्माण करा. 

५. आनंदी राहा... सकारात्मक राहा.... 

६. आपला स्क्रीन समोरील वेळ कमी करण्याचा निश्चयी प्रयत्न करा. 

७. इतरांना द्यायला शिका. (वेळ, पैसे, मदत जे पण शक्य असेल ते)

८. मानवी जीवनाची इतिकर्तव्यता कशात आहे ते जाणून घ्या. 

९. जगण्यासाठी पैशांपेक्षाही मानसिक बळ अधिक महत्वाचे ठरते हे समजून घ्या. 

१०. ज्या गोष्टी आयुष्यात कधी केल्या नाहीत त्या करण्याची तयारी ठेवा. 

११. गर्दीपासून लांब राहा. योग्य ती काळजी घ्या. 

१२. दूरदर्शनवरील प्रेरणा, उभारी, मानसिक बळ उंचावणाऱ्या व निखळ मनोरंजनाच्या गोष्टीचं पहा. 

१३. कोरोना पासून बचाव करण्यासाठीच्या सर्व सूचना अमलात आणा. 

१४. "काही फरक पडत नाही" व "जे सर्वांचे होईल ते आपले होईल" ही वृत्ती सोडा. 

१५. "हिच आमुची प्रार्थना...", " तू बुद्धी देवा... तू तेज दे" यासारख्या प्रार्थना वारंवर ऐका. 


ही यादी तशी व्यक्ती सापेक्ष असल्याने बरीच मोठी होऊ शकेल मात्र त्यातील सर्वांसाठीच्या काही साधारण गोष्टी येथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पैकी ज्यांना कोणाला या संदर्भात काही बोलायचे असेल, संवाद साधायचा असेल, चर्चा करायची असेल त्यांनी नक्की फोन करा. माझ्यापरीने समाधान करण्याचा निश्चित प्रयत्न करीन. आपल्या सवयींचे सीमोल्लंनघन हेच जगण्याची खात्री देण्याची शक्यता आहे. 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४


5 comments:

  1. चांगला लेख व स्तुत्य उपक्रम !
    शुभेच्छा

    विजय कुळकर्णी

    ReplyDelete
  2. खचलेल्या मनाला उभारी देणारा लेख!! अप्रतिम...

    ReplyDelete
  3. खूप छान प्रेरणादायी लेख👌👌

    ReplyDelete