Wednesday 24 January 2024

प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा निमित्ताने...

अतिशय मंगलमय व पवित्र वातावरणात रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झाली. भारतासह अनेक देशात या निमित्ताने दिवाळी साजरी करण्यात आली. पाचशे वर्षाच्या संयमित संघर्षानंतर, अगणित रामभक्तांच्या बलिदानानंतर, हिंदुस्थानात हिंदूंच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या प्रभु श्रीरामचंद्रांची प्रतिष्ठापना याची देही याची डोळा अनुभवता आली हि त्याचीच कृपा...

ह. भ. प. सद्गुरु संत श्री सखाराम महाराज यांच्या आज्ञेनुसार दि. २५ डिसेंबर ते २२ जानेवारी (२९ दिवसात) या काळात श्री रामरक्षा स्तोत्राचे १९७ वेळा पठण केले...

याच काळात गोंदवले व सज्जनगड येथे जाण्याचा व रामरक्षा पठणाचा योग आला...

संत गजानन महाराज (शेगाव), दिक्षाभुमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय (नागपूर), एकविरा देवी, सिद्धेश्वर गणपती (धुळे), जोगेश्वरी माता (अंबेजोगाई), तुळजाभवानी (तुळजापूर), पांडुरंग (पंढरपूर), ढोल्या गणपती (सातारा ग्रामदैवत), नरसोबाची वाडी या पवित्र स्थानी देवदर्शन झाले...

अमरावती, नागपूर, नंदुरबार, शिरपूर, पिंपळगाव बसवंत, अंबेजोगाई, पंढरपूर, सातारा, विसापूर व शिरोळ येथे महात्मा गांधींनी मांडलेल्या रामराज्याच्या संकल्पनेच्या अनुषंगाने विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेशी संवाद...

धानोरा जन्मगावी रोटरी क्लब, जळगावच्या माध्यमातून आरोग्य शिबीराचे आयोजन, ६३० मुले, महिला व नागरीकांची विनामूल्य तपासणी, २४० लोकांना विनामूल्य चष्मे, ८० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड...

प्राणप्रतिष्ठा दिनाच्या पूर्वसंध्येला कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या एकादशी व्याख्यानमालेंतर्गत कुटुंबातील राम या विषयावर व्याख्यान...
ह.भ.प. सद्गुरु श्री प्रसाद महाराज यांचे छत्रपती संभाजीनगर येथे दर्शन आशीर्वाद...

माझे आदर्श माजी कुलगुरु अण्णासाहेब डाॅ. के. बी. पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रकाशित आत्मकथनावर व त्यांच्या जीवनावर लेखन व अभिष्टचिंतन सोहळ्यात परिवारजनांसह सहकारी शिक्षक व मित्रांची एका मोठ्या कालखंडानंतर सहवास-भेट...

या सर्वांवरील कळस म्हणजे प्राणप्रतिष्ठा दिनी अनुभवलेली हिंदु धर्माची पवित्रता, सात्विकता, अध्यात्मिकता, संयमितता, उत्सवप्रियता, एकसंघता, भावविभोरता अशा अनेक भावनांची स्पंदने... जळगावकरांचे अयोध्येतील कार्यक्रमात प्रतिनिधित्व करणारे आदरणीय अशोकभाऊंचे जळगावातील स्वागत आनंददायी, उत्साहवर्धक व देशाच्या रामराज्याकडील वाटचालीचे प्रतिक वाटले. 

प्रभु श्रीरामचंद्रांच्या चैतन्यदायी ऊर्जास्रोतामुळे जीवनात एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता अनुभवता आली.

आपण सर्व मिळून माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केलेल्या आवाहनानुसार रामराज्यासाठी मतभेद संपवून एकदिलाने, स्व-अनुशासनाने, देशभक्तीने, एकात्मतेने, वाणी, मन आणि वचनाने एक होऊ या... नवीन समर्थ, संपन्न  व  संपूर्ण जगाला येणाऱ्या संकटातून दिलासा देणारा भारत घडविण्यासाठी वचनबद्ध होऊ या !

सियावर रामचंद्र भगवान की जय ! जय श्रीराम ! जय जय श्रीराम !

गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४

Friday 22 December 2023

आयुष्यातील सुवर्णकाळाची कृतज्ञता : न्यू सिटी हायस्कुल

शाळेचे प्रवेशद्वार...

अल्पानामपि वस्तूनां संहति: कार्यसाधिका। 

तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिन:॥

अनेक छोट्या, क्षुल्लक वस्तुंना योग्य रीतीने एकत्र आणले असता मोठमोठी कार्येही सिद्धीस जाऊ शकतात. जसे की छोट्याछोट्या गवतांना जोडून बनविलेल्या दोरखंडाने शक्तीशाली हत्ती बांधले जाऊ शकतात. आम्हा सारख्या असंख्य विद्यार्थ्यांना एकत्रित बांधून समाजहितैषी समाज निर्माण करण्याचे कार्य करणारी शाळा आणि त्यातील शिक्षक "संहति: कार्यसाधिका!" या युक्तीने कार्यरत आहे. आयुष्यातील सुवर्णकाळ अनुभवण्याची संधी देणाऱ्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेख प्रपंच...

‘हि आवडते मज मनापासुनी शाळा... लाविते लळा ही जसा माऊली बाळा’ प्रल्हाद केशव अत्रे यांची ही बालपणीची कविता आठवली कि एका स्वप्नाच्या दुनियेत सफर करुन येतो. आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे शहरात मात्र शिक्षणाची समृद्धता आम्ही अनुभवली आहे. आजही त्या गोष्टी आठविल्या कि छाती अभिमानाने फुलून येते. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू सिटी हायस्कुलला प्रवेश घेतला तेव्हापासून  सुरु झालेला हा प्रवास दहावीनंतर वेगळ्या वळणावर सुरु झाला मात्र न्यू सिटीने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आजही आयुष्यात लाभच होतांना दिसतो. बालवयात शाळेत जाण्यासाठी त्रास देणारा मी न्यू सिटीत आल्यावर मात्र 'शाळेत हो मी जाणार, पाटी घेऊनी, घेऊनी पुस्तक अभ्यास मी करणार...' असे केव्हा म्हणायला लागलो कळलेच नाही. न्यू सिटी असे नाव आलं तरी आयुष्य समृद्ध करणारा हा चित्रपट डोळ्यासमोरुन झर्रकन पुढे जातो. शाळेचा कधी कंटाळा आला नाही किंवा कधी टाळलीही नाही. अभ्यास, खेळ, वाचन यासह अनेक गोष्टी घडत होत्या आणि आम्ही त्या आनंदाने करीत होतो. मराठी माध्यमाची जरी शाळा असली तरी इंग्रजीची अवास्तव भीती वा न्यूनगंड शाळेने कधीही निर्माण होऊ दिला नाही. 

शिक्षक वृंदासह अलीकडचा फोटो...
न्यू सिटीत ५ वीत प्रवेश झाला. वर्गशिक्षक श्री. बी. एन. जोशी सर, विषय इंग्रजी. शाळेची वेळ दररोज दुपारची मात्र शनिवारी सकाळची. त्या दिवशी आमचे सर धोतर आणि पांढरा सदरा आणि कपाळी मस्त गंध. शाळा केवळ मुलांची त्यामुळे दंगामस्तीला कोणतेही बंधन नाही. (असं विधान धारिष्ट्याने करतोय कारण शाळा शिस्तीचीच होती पण आम्ही ? ) जगण्याला लायक बनविणे, माणूस म्हणून घडविणे म्हणूनच तर म्हणतात ना ! शाळा सुरु व्हायची ती "जयोस्तुते जयोस्तुते..." या गीताने अर्थात त्यापूर्वी अन्यही गाणे लागायची त्यात ऋणानुबंधाच्या... आवर्जून आठवते. राष्ट्रगीत झाले कि दिनक्रम सुरु... साधारण ७ वी नंतर हे जरी सुरुच असले तरी आमची कबड्डी जोरात चालायची. पांढर शर्ट आणि खाकी अर्धी चड्डी हा गणवेश. सकाळी आईने मोठ्या कष्टाने धुतलेला पांढरा शर्ट संध्याकाळी पार वाट लागलेली. बटण तुटलेले, कुठेतरी फाटलेले, हातापायाला कायम मलमपट्टी सौभाग्याचं लेणंच ते ! ९ वी पर्यंत पीटीच्या तासाला शिवाजी व्यायामशाळेच्या मैदानावर सर्वांच्या पुढे... मात्र दहावीत काही तरी कारण सांगून वर्गातच. शनिवारी संपूर्ण शाळेची मास ड्रिल अर्थात एकत्रित पिटी ! हात करतांना काय धाक असायचा शिक्षकांचा... एव्हढ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सरांचे लक्ष कुळकर्णी हात सरळ हात सरळ. 

आदरणीय मु. कृ. पाध्ये सर 

मुख्याध्यापक मु. कृ. पाध्ये सर...
आमच्या शाळेचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे मुख्याध्यापक स्व. मुकुंद कृष्णाजी पाध्ये !  शनिवारी सकाळची शाळा उशिरा येणाऱ्या मुलांना चढ्या क्रमाने शिक्षा... पहिल्यांदा २५ , ५० उठबशा, त्यानंतर आलेल्यांना हातावर वेताच्या छडीचे फटके ३, ५, १० त्यानंतर आल्यावर दोन्ही आणि वरुन कोंबडा करुन उभे राहा ! तास सुरु असतांना मुख्याध्यापकांचा राउंड असायचा खिडकीतून लक्ष आणि पुन्हा लक्ष नाही किंवा काही रिकामे काम करतांना दिसला कि आहेच... १०० मीटर रनिंग, लांब उडी, उंच उडी, खो खो, क्रिकेट... याच्या जोडीला नाटके, गीत गायन, वेगवेगळ्या स्पर्धा ! अभ्यास तो पण होताच कि.... या सगळ्या गोष्टींची तयारी भूतो न भविष्यती ! तुम्हाला कितीही चांगले झाले वाटले तरी गुरुजींचे समाधान कुठे ? परत सुरु... मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा... जीवनात जिद्द, मेहनत, सातत्य, वचनबद्धता, समर्पण, संयम, सातत्य हे सर्व आले येथून अर्थात तेव्हा हे शब्द गावी पण नव्हते. म्हणून तर हा सुवर्णकाळ ! एव्हढे सर्व असल्यावर कोणाला हवी सुट्टी ? जीवावर यायचे सुट्टी असली कि... हेच शाळेचं यश आणि उद्देशही आणि म्हणूनच कृतज्ञता !

या जोडीला अजून इतर परीक्षा असायच्या त्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी आणि गणिताच्या ४ परीक्षा दरवर्षी एक एक करीत ९ वी पर्यंत बहुतांश मुले द्यायचीच... तर्खडकर इंग्रजी ग्रामर तेथे कळालं. ज्यांना चित्रकलेची आवड त्यांच्यासाठी एलिमेंटरी, इंटरमिजीएट. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गीता पठण, कणकवलीची राज्य बाल्य नाट्य स्पर्धा, मनाचे श्लोक, जोडीला लक्ष लक्ष सूर्य नमस्कारासारखे उपक्रम, एनसीसी कॅम्प... स्पोर्ट मीट / वीक वगैरे भाग नव्हता कारण तो रोजचा भाग होता. सर्वच मुले हुशार आणि प्रत्येकामुळे शाळेला एक वेगळी ओळख. अर्थात हुशार म्हणजे ज्याच्या त्याच्या विषयात म्हणजे अभ्यास, खेळ, वक्तृत्व, वादविवाद, नाटक, गाणे... काही ना काही तर प्रत्येकात आहेच नं ! तेच शोधून त्यावर काम करणे हेच शाळेचे ध्येय. 

शाळेची खरी श्रीमंती म्हणजे आमच्या शाळेचा शिक्षकवृंद !

शाळेचा समृद्ध शिक्षकवृंद...
मधल्या सुट्टीतही कबड्डी, क्रिकेटच्या मॅचेस चालू असतील स्कोर पाहायला बाहेर जाणार खास स्कोर लिहिले जायचे परतीला वेळ झाला कि आहेच पुन्हा... बाहेर गाडीवर मिळणाऱ्या गोळ्या, अमुन्या, वाळलेली बोर असो. शाळे शेजारीच स्वस्तिक चित्र मंदिर (थिएटर) काही वेळेस टॉकीजमधील पिक्चरचे डायलॉग गाणे स्पष्ट ऐकू यायचे. मस्ती केली तरी पाय वाकडे पडणार नाही याची काळजी... विचारांची पक्की बैठक अर्थात त्यामागे होती शाळेतील शिक्षकांची मेहनत. शाळा म्हणजे खरे तर शिक्षक ६ वीला श्री. एस. एस. मुसळे सर, ७ वीला श्री. ह. म. भंडारी, ८ वी श्री. आर. एस. जहागीरदार, ९ वीला एन. एन. शाह आणि दहावीला श्री. शा. रा. नाईक प्रत्येकाचे एक वेगळेपण , वैशिष्ट्य... असेच गणिताचे श्री. व्ही. वाय. दाबके, इतिहासाचे श्री. मदनलाल मिश्रा, संगीत कलाचे श्री. रत्नाकर रानडे, चित्रकलेचे श्री. पंचभाई व श्री. उपासनी, हस्तकलेचे श्री. एम. डी. धारणे, आणि एनसीसीचे श्री. आर. एस. पाटील. सर्व नररत्नांची खाणच... नाही याच्यापुढे त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी शब्दच नाहीत. माणूस घडणं, माणूस उभा राहणं इतकी सोपी गोष्ट नाही मात्र ते करु शकते ती समाजजीवनातील शाळा नावाची व्यवस्था ! अशा शाळा आणि अशी व्यवस्था भारतीय संस्कृतीची धरोहर आहे. त्यातूनच निर्माण होणारा वसा आणि वारसाही ! त्यासाठीच शाळेप्रती कृतज्ञता... तमाम विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची हि कृतज्ञता अशीच कायम संक्रमित होत राहो ज्यामुळे संस्कृती व राष्ट्र चिरकाल टिकेल... 

शाळेचे अंतरंग...
माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो मग शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण ठरतेच आणि ती देखील आयुष्यभरासाठी... म्हणूनच आपण त्यांच्याप्रती कायम कृतज्ञ असणे हेच खऱ्या अर्थाने माणूसपणाचे लक्षण आहे. पहिले गुरु माता-पिता, तदनंतर शालेय शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षण, व्यावसायिक शिक्षण देणारे वरिष्ठ सहकारी, आध्यात्मिक जीवनाची दिशा दर्शन करणारे अशा एका व्यक्ती सोबतच आपला जीवनप्रवास सुरु असतो. हा प्रवास जेव्हढा समृद्ध तेव्हढा माणूस अधिक प्रगल्भ ! हि प्रगल्भताच माणसाला एक संवेदनशील व जागरुक नागरिक बनवितो. 

विषय शिक्षणाबरोबरच जीवन विषयक दृष्टिकोन देणारे, व्यावहारिक जगाची ओळख करुन देणारे, आपल्यातील कला कौशल्याला विकसित करीत सर्वांगीण विकास साधणाऱ्या न्यू सिटीच्या शिक्षकांनी आयुष्यभराची जी शिदोरी दिली आहे त्याबद्दल कायम कृतज्ञ राहू. अर्थात हि कोणत्याही शिक्षकाची मागणी नव्हे तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या हृदयात आपल्या कृतीने निर्माण केलेली ती जागा आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे मिळविलेला तो सन्मान आहे. 

इ. ७ वीत असतांनाच वर्गाचा फोटो...
मुळात शाळा या विषयाची भीती घालविणारे शिक्षक, विषयांची व खेळाची गोडी लावणारे शिक्षक, आपल्यातील उपजत गुणांना ओळखून त्याद्वारे व्यावसायिक जगतात आपली जागा निर्माण करणारे शिक्षक या सर्वांचेच जीवनात एक वेगळे स्थान आहे. चांगले वळण लावण्यासोबतच प्रेरणा, जिद्द, नवीन काहीतरी करण्याचे बळ, कर्तव्याची जाणीव, दातृत्व व नैतिकता देणारे हे सारे शिक्षक. कधी कौतुक करुन तर कधी रागावून सारासार विवेकाने जीवन जगण्याची गुरुकिल्ली देणारे शिक्षक. आपुलकी व आत्मीयतेने शिस्त, क्षमा व करुणा उत्पन्न करणारे शिक्षक. कर्तव्यापलीकडे व चाकोरीबाहेर जाऊन एक माणूस घडविण्यासाठी, राष्ट्रप्रेमी नागरिक घडविण्यासाठी चाललेली हि धडपड अविरत, अविश्रांत आणि निश्चयाने चालू होती.  

ज्या वर्गात शिकलो त्यात पुन्हा एकदा...
कुणाला मातीच्या गोळ्याला दिलेला आकार तर कोणाला सुरवंटाचे फुलपाखरातील परिवर्तन वाटते. एका बाजूला नव्या जगाची ओळख करुन देणारे तर दुसऱ्या बाजूला त्याला सामोरे जाण्यासाठीची सिद्धता करणारे हे शिक्षक. वयाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर तटस्थपणाने सिंहावलोकन केले तर त्यांच्यातील या सर्वांमध्ये एक सामान धागा दिसतो तो म्हणजे आपला विद्यार्थी घडविण्यासाठी त्याच्यातील गुणग्राहकता शोधण्याचे सर्वात अवघड काम... विद्यार्थ्याने आपल्या यशाचे दिलेले संपूर्ण श्रेय हिच त्याची कर्तव्य परायणता ! शिक्षकाला विद्यार्थ्यांची आई तर आईला बाळाची शिक्षिका होता आले पाहिजे असे म्हणत असतांनाच शिक्षकाला विद्यार्थ्यांतील शिक्षक जागा करता आला पाहिले तर वसा आणि वारसाची हि संस्कृती चिरकाल टिकून राहील आणि त्याप्रतीची कृतज्ञताही ! शिक्षक हेच राष्ट्रजीवनाचे बलस्थान असून विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता अशीच संक्रमित होत राहो हिच परमेश्वरचरणी विनम्र प्रार्थना !  

अशा कितीतरी आठवणी आहेत पण तेवढ्या वेळ व शब्द मर्यादेमुळे लिहिणं शक्यही नाही. पण शाळेविषयी आणि शाळेतील आठवणींविषयी एवढंच सांगावसं वाटतं...

माझी शाळा जीवनाचा सुवर्णकाळ 

निरागस, निष्पाप जीवांचा सुकाळ ॥  

तेथेच झाली नांदी गमभनची 

अन समृद्ध संस्कारित जीवनाची ॥

दंगा आणि मस्तीसाठी होते सखे-सोबती 

त्यातूनच निर्मिली परमेश्वररुपी नाती ॥

त्याला नव्हत्या जाती-पातीच्या भिंती 

जळती अखंड संस्काराच्या वाती 

उजळती समृद्ध जीवनाच्या ज्योती ॥ 

स्वओळख आणि प्रगतीचा पाया 

देई आत्मविश्वास ठाया ॥

ज्ञानमंदिरातील पूज्यनीय व्यक्ती

यशोमंदिरे उभविती ॥

अशी आमची शाळा होती....

अशी आमची शाळा होती... आहे... ॥


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४

Tuesday 21 November 2023

प्रत्येक दिवस असाच असावा !

१८ नोव्हेंबर रोजी मातोश्री श्रीमती सुनंदा विष्णू कुळकर्णी हिच्या आशीर्वादाने, ह.भ.प. सद्गुरु श्री. प्रसाद महाराज अमळनेरकर (११ वे गादीपती, संत श्री सखाराम महाराज संस्थान अमळनेर-पंढरपूर), ह.भ.प. श्री. दादा महाराज जोशी (चिमुकले राम मंदिर), ह.भ.प. श्री. मंगेश महाराज जोशी (५ वे गादीपती, श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव) यांच्या कृपाशिर्वादाने, ज्येष्ठांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी ५५ व्या वर्षात पदार्पण केले. यावर्षी हा दिवस आगळावेगळा ठरला आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते आयुष्यातील प्रत्येक दिवस असाच असावा.

सकाळी लवकर उठून भाऊंच्या उद्यानात फिरायला गेलो. तेथे नेहमीप्रमाणे व्यायाम करुन घरी आलो. स्नान, आन्हिक, जप व सकाळचा नाश्ता करुन वेळेवर कार्यालयात पोहोचलो. सकाळी ९ ते ९॥ दररोजची प्रार्थना व सूत कताई केली. पहिला आशीर्वादाचा फोन नेहमीप्रमाणे आईचा व दोन मिनिटांच्या अंतराने श्री. उदय महाजन यांचा आला. त्यानंतर सर्व माध्यमातून शुभेच्छांचा दिवसभर वर्षाव सुरु होता. सकाळी १० ते १२॥ कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या पदविका अभ्यासक्रमात पहिले प्रशिक्षण सत्र घेतले. वर्षभरात असे आठ सत्र घ्यावयाचे आहेत. व्यक्तीमत्व विकास फोकस असला तरी प्रशिक्षणार्थींच्या व्यवसाय वृद्धीवरील शंकासमाधानाने त्याचे महत्त्व अधोरेखित केले. काही नाविन्यपूर्ण मार्ग सुचविल्याने त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान एक वेगळाच आनंद देऊन गेला. 

भोजनोत्तर सत्रात गांधीतीर्थला भेट देण्यासाठी आलेल्या हेमंत क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी २० मिनिटे प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम कस्तुरबा सभागृहात घेतला. आपला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत नेत असताना एक वेगळे समाधान होते. सलग ३ प्रश्नांना उत्तरे देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या जीवनावरील पुस्तके भेट देण्यात आली. संचालक हेमंत पाटील व हा उपक्रम घडवून आणणारे सहकारी ॲड. दुर्वास नलगे यांच्या उपस्थितीत व उत्साहपूर्ण वातावरणात प्रश्नमंजुषा झाली.

यानंतर लगेचच फैजपूर येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई या संस्थेच्या ६२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी विचार संस्कार परीक्षा व गांधीतीर्थ संग्रहालयास सहल भेट करावी या संदर्भात माहिती देण्यासाठी सहकारी चंद्रशेखर पाटील यांचेसह सायंकाळी ४ वाजता पोहोचलो. दहा मिनिटात उपस्थितांना माहिती दिली. तसेच संस्थेचे माहितीपत्रक वितरित करुन रात्री ७.३० वाजता घरी पोहोचलो.
 
घरी आल्यावर फ्रेश होऊन श्रीराम मंदिर संस्थानच्या रथोत्सवातील सरस्वती वहनाचे दर्शन व हभप श्री मंगेश महाराजांच्या दर्शनासाठी जुने जळगावातील मंदिरात पोहोचलो. आशीर्वाद घेऊन हभप श्री दादा महाराज जोशी यांच्या आशीर्वादासाठी चिमुकले राम मंदिरात पोहोचलो. दोन्ही ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचे आशीर्वादपर प्रसाद मिळाला.

घरी मुलांनी वाढदिवस साजरा करण्याची तयारी केली होती. खरंतर यावर्षीची दिवाळी भाऊबीजेच्या दुसर्‍या दिवशी सुरु झाली कारण दिवाळीत मुलीला सुट्टीच नव्हती. त्यामुळेच वाढदिवसाच्या दिवशीच दिवाळीचे औक्षणही करण्यात आले. असा अतिशय व्यस्त, केलेल्या कामाचे आनंद व समाधान देणारा असा होता. या वर्षात प्रत्येक दिवस असाच यावा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना... रामकृष्ण हरि !


Ⓒगिरीश कुळकर्णी
९८२३३ ३४०८४

Sunday 15 October 2023

गांधीतीर्थवरील दोन वर्षे : आनंद, अभिमान व प्रगल्भतेची !

२०२१ च्या घटस्थापनेच्या दिवशी सद्गुरु हभप प्रसाद महाराज यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शक आदरणीय अशोकभाऊ व मित्र अनिल जोशी, विरेश्वरप्रसाद भट यांच्या विशेष सहकार्याने जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून व्यावसायिक जीवनाचा एक नवा अध्याय सुरु झाला. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी विचार संस्कार परीक्षा विभागाचा प्रमुख म्हणून प्राथमिक जबाबदारी मिळाली. दोन वर्षाचा हा प्रवास मागे वळून पाहतांना आनंद, अभिमान व प्रगल्भतेचा वाटतो. अनेकांना माझ्या विचारसरणीमुळे व एकूणच व्यक्तिमत्वामुळे प्रश्नचिन्ह होते. माझ्यावरील प्रेमापोटी अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केला मी मात्र 'सर्व काही व्यवस्थित होईल' या विचाराने कार्यरत राहिलो. वेळप्रसंगी अनिल जोशी व दिलीप तिवारी हे पाठीशी होते त्यामुळे अडचण आली नाही. नाही म्हटले तरी मलाही तशी थोडी शंका होतीच परंतु आईवडिलांचे संस्कार, २९ वर्षांचा अनुभव, परिस्थिती व माणसांशी जुळवून घेण्याची वृत्ती, प्रसंगी दोन पाऊले मागे जाण्याची तयारी यामुळेच हे शक्य झाले असे मला प्रामाणिकपणे वाटते.

पहिले वर्ष थोडा चाचपडतच चालत होतो. सुरुवातीचे तीन महिने फारसे जबाबदारीचे काम नव्हते. काम होते ते येथील व्यवस्था, कार्यपद्धती व धोरण समजण्याचे ! ज्येष्ठ सहकारी श्री उदय महाजन यांच्याकडे डोळसपणे पहात अनेक गोष्टी शिकत होतो. सहकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला तीन महिन्यांचा टप्पा मला व सर्व सहकाऱ्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरला. पदव्युत्तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणातील भाग सुरु होता. परीक्षा विभागातही सहकाऱ्यांकडून अनेक गोष्टी समजून घेतल्या. राज्याच्या विविध भागातील शैक्षणिक संस्था, संस्थाचालक यांच्या भेटीसाठी प्रवास सुरु झाला-होता-आहे. हळूहळू कामाचा आवाका लक्षात येऊ लागला. त्याप्रमाणे स्वतःहून वेगवेगळया गोष्टी सुचवू लागलो. जबाबदारी येऊ लागली. वर्ष पूर्ण झाल्यानंतर संस्थेच्या १३ दिवसांच्या सायकल यात्रेची जबाबदारी मिळाली. ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व विकास शिबिरे, विविध स्पर्धा, नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प, How Gandhi Comes Alive ! सारख्या कार्यशाळेतील सहभाग, अनुभूती शाळेच्या प्रवेश प्रक्रियेतील सहभाग, गांधी जयंती निमित्ताने काढण्यात येणारी सद्भावना शांती यात्रा इ. मधील सहभाग वाढू लागला. आणि आता मी या सर्व गोष्टींचा एक भाग झालो याचा मला आनंद व समाधान आहे. 

व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असतांना आपल्या क्षमतांना व बलस्थानांना संधी मिळते, वाव मिळतो याचा एक वेगळा आनंद असतो. अनुभवी माणसाला अहंगंड वा न्यूनगंड दोघांपैकी काहीही असले तरी अडचणी येतात व आदरणीय अशोकभाऊंच्या भाषेत 'स्टोऱ्या' बनतात. मागील दोन वर्षात आपली एकही स्टोरी बनली नाही याचा आनंद आहे. GVSP (गांधी विचार संस्कार परीक्षा) साठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती तयार करण्यात येऊन त्यांची एक परिषद गांधीतीर्थवर आयोजित करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेचे आयोजन जैन हिल्सवर करण्यात आले. गांधीतीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता, ग्राम संवाद सायकल यात्रा कार्यान्वित करण्यात प्रमुख भूमिका म्हणून संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. संस्थेचा दशकपूर्तीचा कार्यक्रम, देशभक्तीपर समूहगीत गायन, अनेक गांधीयन कार्यकर्त्यांचा सहवास-संवाद या गोष्टी आनंद द्विगुणित करणाऱ्या ठरल्या.

जैन उद्योग समुहासारख्या जागतिक व कार्पोरेट ब्रॅण्डसोबत काम करण्याची संधी मिळणे, त्याला उंचीवर नेण्यासाठी आवश्यक असणारे नेतृत्व देणारे जैन परिवारातील आदरणीय अशोकभाऊ, अनिलभाऊ, अजितभाऊ, अतुलभाऊ, सौ. निशाभाभी, सौ. अंबिका भाभी या व्यक्तींसोबत काम करणे हि अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांशीच नियमित संबंध येतो असे नाही मात्र व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असतांना त्याचा अनुभव येतोच येतो. या सर्व कर्तृत्ववान मंडळींचा सहकाऱ्यांसोबतचा व्यवहार, त्यांची कार्यपद्धती, कामाप्रतीची निष्ठा आपसूकच खालपर्यंत पोहोचल्याचा अनुभव येतो त्यामुळे अभिमानाची गोडी अधिक वाढते. बाहेरच्या जगतातील जळगावकर नागरिकांची कंपनीवरील टीका-टिपण्णी आणि प्रत्यक्षातील स्थिती यात तफावत जाणवते मात्र या परिवाराची उदार अंतःकरणाने आपली समाजप्रतीची व गावाप्रतीची कटिबद्धता पाहिल्यानंतर खरोखरच अभिमान वाटतो. गावातील अनुभूती शाळेतील उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेली व्यवस्था तसेच भाऊंचे उद्यान व गांधी उद्यान हि त्याची उदाहरणे होत. 

हि दोन वर्षे प्रगल्भतेचीही ठरली. गांधींच्या नावाने चालणाऱ्या संस्थेतील आपला व्यवहार कसा असावा याची मनाच्या एका कोपऱ्यात कायम जाण राहते. माझ्यासारखा प्रतिक्रियावादी माणूस या दोन वर्षाच्या कालखंडात प्रतिसादवादी झाल्याचा मी अनुभव घेत आहे. समाजमाध्यमातून येणारी माहिती तपासून त्याची चिकित्सा करण्याची वृत्ती वाढीस लागत असल्याचे मला माझेच जाणवते. संघाच्या शाखेत, राष्ट्रीय परिषदांमध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून आजपर्यंत मी कधीही महात्मा गांधींबद्दलची अनादरयुक्त टिपण्णी ऐकलेली नाही मात्र गांधीवादी मंडळी मात्र संघाबद्दलची एक अढी मनात ठेवूनच बोलतो असे मला जाणवते. त्यासाठीही संयमितपणे परस्पर विचारांचा आदर करुन किमान चांगल्या कामांसाठी मैत्री निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. हे एक वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण आहे असे मला वाटते. वैचारिक मतभेदांच्या विषयावर Healthy Discussion वादविवाद करुन ते शक्य नसल्यास वादाचे मुद्दे बाजूला ठेवून एकमेकांमधील चांगल्या गोष्टींचा अभ्यास करीत सर्व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे निर्माण झाले पाहिजे असे मला वाटते. काल्पनिक, गृहीतके व वास्तव याचा विवेकी विचार करण्याची शिकवण दोन वर्षात सहजपणाने मिळाली. 

आनंद, अभिमान व प्रगल्भता वाढीसाठी आगामी काळात अधिक कार्य करण्याची प्रेरणा या दोन वर्षांनी नक्कीच दिली. संख्यात्मक व गुणात्मक विकासाच्या दृष्टीने अजून योगदान दिले पाहिजे असे वाटते. प्रशिक्षण, समुपदेशन गरज लक्षात घेऊन यावर ठळकपणे काम करण्याची मला संधी आहे असे जाणवते. हा प्रवास असाच बहरत राहो व त्यासाठी आपल्या सर्वांच्या सदिच्छा लाभो हीच अपेक्षा ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday 10 October 2023

मानसिक आरोग्याचा मंत्र : आनंदी जगणं !

दि. १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. आपले मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी अतिशय साध्या साध्या व छोट्या छोट्या गोष्टीतूनही हे शक्य आहे. वास्तव स्वीकारुन व कोणाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जीवन जगणे यासाठी लाभदायक ठरु शकते. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले मात्र सोबत अनेक गोष्टींचा ताण सोबत घेऊन आले. तंत्रज्ञान व जीवन यात योग्य समतोल राखणे आजच्या काळात कठीण होत चालले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर कालांतराने मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण करतो. लॉकडाऊनच्या काळात मोबाईलच्या आहारी गेलेला समाज अजूनही स्वतःला सावरु शकत नाही हे वास्तव नाकारता येणार नाही. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम झाला आहे. 

टीव्ही व समाज माध्यमही मानसिक गोंधळातच भर घालतांना दिसत आहे. सावधानता बाळगणे व संयमित राहणे या दोन गोष्टी आपल्याला काही बंधने घालण्यासाठी प्रवृत्त करु शकतात अर्थात त्यासाठी आपणच आपल्या जीवनाकडे डोळसपणे पाहणे अगत्याचे ठरते. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हि या निमित्ताने एक संधी आहे. आपण आनंदी असणे हे कुटुंबीय, सहकारी व मित्रपरिवार यासाठी आवश्यक आहे. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. कोवळ्या वयातील मुलांच्या आत्महत्या असो वा इस्रायल मधील युद्ध, कार्यालयातील कामाचा ताण असो वा कुटुंबातील आव्हाने असोत या सर्वांचा परिणाम आपल्यावर होतो व स्वाभाविकपणे तो आपल्या परिघातील प्रत्येकावर जाणते-अजाणतेपणी होत असतो. आपण कितपत आनंदी आहोत हे जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न स्वतःला विचारुन पहा. 


Courtsey: Swapneela Sethia


१. आपल्याला आपले आयुष्य हे बक्षीस आहे असे वाटते का ?

२. आपण स्वतःमधील व इतरांमधील चांगुलपणा शोधण्यासाठी सक्षम आहोत का ?

३. आपण आपल्या भविष्याबद्दल आशादायी आहात का ?

४. आपण आपल्या रोजच्या कामातून आनंद मिळवतो का ?

५. आपणास पदोपदी व क्षणोक्षणी आनंद वाटतो का ?

६. आपणास आपल्या जीवनात काहीतरी उद्देश व अर्थ आहे असे वाटते का ?

७. आपण कायम उत्साही असतात का ?

८. आपण इतरांना काही देतो त्यावेळेस आनंद मिळतो का ?

९. विपरीत परिस्थितीतही मी चांगले शोधू शकतो का ?

१०. दिवसभरातील भावनांचा स्वीकार व स्वागत करतो का ?

११. कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या नियमित संपर्कात असतो का ? 

१२. जेव्हा परिस्थिती गंभीर असते त्यावेळेस पुढाकार घेऊन सहाय्य्यभुत होतो का ?

१३. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटते का ?

१४. भूतकाळातील निराशा व दुःख विसरु शकतो का ?


आनंदी जीवन हे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे व त्यादृष्टीने वरील काही प्रश्न आहेत. असे मानवी भावनांच्या बाबतीत आपल्याला पडणाऱ्या प्रश्नाचा विचार केल्यास आपल्याला मार्ग सापडू शकतात व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त जीवन जगता येऊ शकते. जेव्हा आपल्याला आपल्याच प्रश्नांची उत्तरे सापडत नाही तेव्हा स्नेहीजनांची मदत घ्या. आपले मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे असे लक्षात आल्यास समुपदेशकाची मदत घ्या. मोकळा संवाद अनेक प्रश्नांची सहज उकल करतो. त्यासाठी एक जिवाभावाचा सखा असावा. निसर्गाच्या जितके जवळ जाल तेव्हढे प्रश्न लवकर निकालात निघतील. शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्या. त्यासाठी आपल्या सोईनुसार व आवडीनुसार व्यायाम करा. ताजे, पौष्टिक व सकस अन्न हे शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यासाठीचे मूळ आहे. प्राणिमात्रांवर व भोवतालच्या जगावर प्रेम करा. गरजूंना मदत करा. आपल्याकडे जे आहे ते उदारहस्ते मुक्तपणाने देत रहा. 

पहा... विचार करा... बदल करा... आपल्या निरामय दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा ! 


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Friday 14 July 2023

...तेथे कर माझे जुळती !

मानवी जीवनात अनेक माणसे येतात. काही माणसे नाते संबंधाने आपली असतात, काही ऋणानुबंधाने आपली होतात तर काही त्यांच्या विचित्रपणाने विसरली जात नाहीत तर काही येतात आणि जातात. या प्रत्येकाचे एक स्वभाववैशिष्ट्य असते. समसमान विचारांची माणसे अधिक जवळ येतात आणि जीवलग होतात. अर्थात या सर्वांचेच जीवनात एक वेगळे स्थान आणि महत्त्व असते. मानवी जीवन माणसांनी अधिक समृद्ध होते. त्यातही सामाजिक जाणिवेचे व प्रतिभेचे धनी असलेली माणसे जवळ आली कि जीवनाला अर्थ मिळवून देणे आणि जीवनाची इतिकर्तव्यता समजणे सोपे जाते. 

काही व्यक्ती पद, प्रतिष्ठा, अनुभव यासर्वांनी सिद्ध असूनही साधी असतात. त्यांच्या जगावेगळ्या कार्यकर्तृत्वाने ती प्रेरणादायी ठरतात. या माणसांची असामान्य चिकाटी, मेहनत, धडाडी आणि प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या वटवृक्षाप्रमाणे कडक उन्हात निश्चल उभे राहून दुसऱ्यांना मात्र सावली देण्याची उदार वृत्ती बाळगून असतात. या व्यक्ती पाहिल्या, अनुभवल्या आणि आठवल्या तरी कविवर्य बा. भ. बोरकरांच्या कवितेतील या काव्यपंक्ती सहज मनी येतात.

यज्ञी ज्यानी देउनि निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर

परी जयांच्या दहनभूमिवर, नाही चिरा नाही पणती ॥

 

हे सर्व आठविण्याचे कारण म्हणजे जीवनात अनुभवलेले आदरणीय डॉ. प्रताप जाधव ! मागच्या शुक्रवारी (दि. ७ जुलै) पंढरपूर येथे असतांना रात्री उशिरा त्यांचे निधन झाल्याचे कळले. अस्वस्थ झालो. सकाळी उठल्यापासून सोबतच्या सहकाऱ्याजवळ त्यांच्या आठवणी जागवतच दिवस घालवला. मागील ८ दिवसात एक दिवस असा गेला नाही कि डॉक्टर साहेबांची आठवण आली नाही.  'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' म्हणजे काय आणि कसे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टरसाहेब. या देव माणसाशी चांगला संपर्क होता. कधीही भेट झाली कि परिवारातील एक सदस्य या नात्याने सहज भावाने बोलत. बोलणंही अघळपघळ असायचे. त्यात विषय वा अन्य कसलेही बंधन नसायचे. कायम हसतमुख. पेशंट कितीही तणावात असला तरी त्याचा ताण सहज दूर करायचे. मागील २५ वर्षात किमान १० वेळा तरी मी हा अनुभव घेतला आहे. कधी वैयक्तिक उपचारासाठी तर कधी नातेवाईकांसाठी. एका बाजूला उपचार, ऑपरेशन सुरु तर दुसऱ्या बाजूला हसतहसत बोलणे... एक शब्द सहज यायचा होईल ना ! बघू... काही विचारलं कि हा शब्द ठरलेला. 

पूर्वीच्या दवाखान्यात वा आत्ताच्या दवाखान्यातील एक पाटी मला प्रचंड आवडायची. उक्ती ला कृतीची जोड दिल्यावर माणसाची प्रतिमा उजळून निघते. ती पाटी होती... 'खोटी बिले मागून सरकारी तिजोरी लुटू नये.' समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल चीड होती व त्यावर प्रखर, सडेतोड प्रतिक्रिया द्यायचे. स्पष्टवक्ता तर होतेच पण त्याला कृतिशीलतेची जोडही होती. यात कुठल्याही प्रकारचा 'अहं' भाव नसायचा. डॉक्टरांचा व्यवहार निर्व्याज होता. 'देगा उसका भी भला न देगा उसका भी भला' अशी वृत्ती होती. मानवी जीवनाचे नीतिनियम व व्यवहार इतक्या सहजपणे पाळत अर्थात त्यामागे त्यांची तपस्या होती. सकाळी एकदा दवाखान्यात आल्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत ओपीडी व ऑपरेशन्स चालत. मी कधीही त्यांना थकलेले पाहिले नाही. रात्री १०.३० वाजता पण तोच उत्साह असायचा. आपल्या आजाराबद्दल वा दुखण्याबद्दल कधीही बोलत नसत. विषय काढला तरी टाळत. आईच्या 'नी' रिप्लेसमेंट्च्या वेळी व काकूंच्या हिप जॉईन्टच्या वेळी या शस्त्रक्रिया आपण लवकरच सुरु करीत आहोत असे म्हणालेत. मात्र त्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही.


जळगाव जनता बँकेचे संचालक झाल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीला येणे शक्य होत नसे. त्यावेळी दादा अर्थात डॉ. आचार्य नेहमी म्हणायचे त्यांना फोन करु नका. त्यांना त्यांचे काम सोडून बैठकीला बोलावणे हा सामाजिक अपराध आहे. 'सेवा परमो धर्म:' हे कार्यकर्त्याला आपल्या आचरणातून त्यांनी दाखवून दिले. जळगावकरांची त्यांनी निस्सीम सेवा केली. कधी कोणी त्यांना मसीहा म्हटले तर कधी देवदूत... वेळ, काळ याचे त्यांनी कधीही भान बाळगले नाही. केवळ सेवा हाच त्यांचा जीवनमंत्र होता. काळाने त्यांना फार लवकर बोलावले. समाजाचा संसार केला परंतु आपल्या पाखरांचा संसार मात्र राहिला. डॉक्टर तुम्ही आम्हाला हवे होतात ! 'सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले' या उक्तीनुसार डॉक्टर साहेबांनी आपले बलिदान दिले. जळगावकरांना हा 'देव' माणूस कायम लक्षात राहील मात्र त्यांच्या नावाने स्थायी स्वरुपात काही कार्य उभारल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे वाटते. डॉक्टर साहेबांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभेलच, परंतु परमेश्वराने वहिनी व परिवारास हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. आम्हा सर्वांना डॉक्टरांच्या प्रेरणेने समाजसेवेची सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना ! 

कविवर्य बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे परी जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती... आणि म्हणून मला म्हणावे वाटते ...तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती !  


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Friday 19 May 2023

आपण सर्व 'जीवरक्षक' !

रोटरी क्लब जळगावच्या कालच्या साप्ताहिक सभेत एका आगळ्यावेगळ्या विषयावर मार्गदर्शन / प्रशिक्षण देण्यात आले. दैनंदिन जीवनात येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो यासाठी हे प्रशिक्षण होते. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुपरिचित व अलीकडच्या काळात सामान्य माणसासाठी परवलीचा शब्द म्हणजे CPR अर्थात Cardiopulmonary resuscitation कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन ! हा शब्द अर्थात हे तंत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि प्रत्येकाने आपल्या जीवनात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीत या तंत्राचा आत्मविश्वासाने वापर करावा यासाठी हा लेख... आपण वाचा व इतरांनाही वाचण्यासाठी पाठवा !

एखाद्या आपत्कालीन परिस्थितीचा शिकार झालेल्या व्यक्तीला पुनर्जीवन मिळवून देणारे हे तंत्र असल्याने त्याला बेसिक लाईफ सपोर्ट असेही म्हणतात. एखादा व्यक्तीची जर श्वसन क्रिया आणि हृदयक्रिया बंद पडून तो बेशुद्ध झाला असेल तर त्याला देण्यात येणारा अतिमहत्वाचा प्राथमिक उपचार म्हणजेच बेसिक लाईफ सपोर्ट... यालाच CPR किंवा जीवन संजीवनी क्रिया असे म्हणतात. रामायणात हनुमानाने संजीवनी वनस्पती आणून लक्ष्मणाला जीवनदान दिले होते. तशाच प्रकारची आपत्कालीन परिस्थितील व्यक्तीला जीवनदान देणारे हे तंत्र आहे. १० पैकी ३ व्यक्तींना त्याचा फायदा होतो अर्थात त्यांना जीवनदान मिळते. 

एखादी घटना अनपेक्षितपणे घडल्यास माणसाला बऱ्याचदा काही सुचत नाही. मन शांत ठवून आपण काही प्राथमिक गोष्टी करू शकल्यास आपण त्या माणसाचा जीव वाचवू शकतो. बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा दवाखान्यात पोहचेपर्यंत, आहे त्याच ठिकाणी सामान्य नागरिकांनी मदत करणे अति आवश्यक आहे. या उपचाराने आपण त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. हृदय बंद पडलेल्या व्यक्तीमध्ये, ह्रदयातून मेंदू व इतर अवयवांकडे होणारा रक्तपुरवठा जर का ४ मिनिटात प्रस्थापित झाला नाही तर मेंदू कायमचा निष्क्रीय होतो. या अवघ्या ४ मिनिटात  बंद पडलेले हृदय किंवां त्याची स्पंदने कृत्रिमरीत्या का होईना सुरु ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी CPR सुरु ठेवणे गरजेचे आहे. 

CPR कोणीही करू शकतो. त्याला फारशा कौशल्याची आवश्यकता नसते. कोणीही जाणकार अर्थात CPR कसे द्यायचे हे माहित असलेला व्यक्ती छातीवर दाब व कृत्रिम श्वास देऊ शकतो. पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्या व्यक्तीची भूमिका महत्वपूर्ण ठरते. CPR केव्हा करावे ? याचे सोपे उत्तर आहे एखादी व्यक्ती बेशुद्ध आहे, तिची हृदयक्रिया व श्वसन क्रिया बंद आहे. अशा व्यक्तीला CPR करावे. जेव्हा परिस्थिती फारशी सुरक्षित न वाटल्यास किंवा माणूस प्रतिसाद देत असल्यास व शरीर थंड व कडक झाले असल्यास CPR करू नये. आपण CPR आहे त्याच जागी सुरक्षितता लक्षात घेऊन देण्यास सुरुवात करावी. जीवन संजीवनी क्रिया अर्थात CPR हि माणसाला जिवंत ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रियांची शृंखला आहे. आठ वर्षावरील स्त्री-पुरुष यांच्यासाठी आपण हि क्रिया करू शकतो. 


CPR सुरु करण्यापूर्वी तो माणूस मूर्च्छित (बेशुद्ध) आहे का जागा (Cautious) आहे याची खात्री करा. सदर व्यक्ती श्वास घेते आहे किंवा नाही हे जाणून घ्या व तिसरी गोष्ट नाडीची ठोके किंवा हृदयाची धडधड सुरु आहे का याची खात्री करून घ्या. मगच CPR चा निर्णय घ्यावा. पिडीत व्यक्ती निश्चल आहे वा प्रतिक्रिया देऊ शकते का ते पहा. त्यासाठी त्याला खांदा हलवून आवाज द्या. “काका डोळे उघडा”.  प्रतिक्रिया नसल्यास, श्वास नसल्यास, हृदयाची स्पंदनं चालू नसल्यास सी पी आर सुरू करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या. नाडी बघण्यासाठी, मानेजवळ श्वासनलिकेच्या बाजूला कॅरोटीड (carotid) या धमनीला (रक्तवाहिनीला) हात लावून नाडी बघायला हवी... मदतीसाठी आवाज द्या. संबंधित व्यक्तीला जवळच्या हॉस्पिटलला किंवा १०८ ला फोन करण्यास सांगा. जवळपास कोणी डॉक्टर असल्यास त्यांना बोलवा.  

जीवन संजीवनी क्रियेत ३ महत्वाच्या पायऱ्या आहेत. त्याला CAB म्हणतात. म्हणजे Circulation  (रक्ताभिसरण), Airway (श्वसनमार्ग) आणि Breathing (श्वासोच्छवास). रक्ताभिसरणासाठी छातीवर दाब द्यावा. यासाठी व्यक्ती जमिनीवर असावी किंवा एखाद्या कडक – सपाट पृष्ठभागावर असावी. रक्ताभिसरण अखंडीत सुरु राहण्यासाठी छातीवर दाब देणे आवश्यक आहे. छातीच्या (बरगडीच्या) सर्वात खालच्या हाडाच्या दोन बोटे वरती हा दान देणे आवश्यक आहे. हाताची दोन्ही बोटे एकात एक गुंफून, कोपर सरळ ठेवून दोन्ही खांदे दाब द्यावयाच्या व्यक्तीच्या छातीवर असावेत. साधारणपणे एका मिनिटात १००-१२० वेळा दाब दिला पाहिजे. प्रत्येक ३० दाबानंतर छोटा पॉझ घेऊन CPR सुरु ठेवणे. साधारणपणे २  मिनिटात १५० वेळा दाब दिला गेला पाहिजे. छातीवरील दाबाचा भाग ५ सेंटीमीटर दाबला गेला पाहिजे. दाब सोडल्यानंतर छाती पूर्ववत झाली पाहिजे. दाब देण्याची क्रिया व्यक्ती शुद्धीवर येई पर्यंत वा तसा प्रतिसाद देईपर्यंत सुरु ठेवणे अपेक्षित आहे अन्यथा अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता कमी असते. दाब देत असतांना तो मोजला पाहिजे. आपण काही वेळात आपण थकणार असल्याने आजूबाजूच्या कोणा व्यक्तीला CPR देण्यासाठी तयार करणे. संबंधित व्यक्तीचा कोणताही प्रतिसाद मिळाल्यास त्याला एका कुशीवर करावे.

श्वसनमार्ग मोकळा करणे - श्वसनमार्ग किंवा श्वासनलिकेमध्ये अडथळा निर्माण झाला तर पुरेसा श्वास घेता येत नाही.  बरेचदा व्यक्ती बेशुद्ध पडल्याने जीभ सैल होऊन मागे पडते व श्वसन मार्गाला अडथळा निर्माण करते. यासाठी डोक्याला कपाळावर हलकासा जोर द्या. मान सरळ करा. हनुवटी वर करा.  कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी पिडीत व्यक्तीच्या तोंडावर रुमाल टाकणे. नाक चिमटीत घेऊन बंद करणे. स्वत: नेहमीप्रमाणे श्वास घेणे. ओठ पिडीत व्यक्तीच्या तोंडावर ठेवून आपला उच्छवास त्याच्या छातीत भरणे. हे करत असताना छाती फुगते त्याकडे लक्ष द्यावे. 

साधारणपणे CPR केव्हा दिला जातो त्याची उदाहरणे -

१. एखाद्या व्यक्तीला जर विजेचा शॉक लागत असेल तर त्याचा श्वास अडकतो. तेव्हा CPR देऊन आपण त्या व्यक्तीला कदाचित वाचवू शकतो.

२. जेवताना कधी कधी अन्न अडकल्यानंतर CPR देता येतो.

३. गोळ्यांचा आकार मोठा असेल तर ते देखील अडकण्याची शक्यता असते. तेव्हा CPR देता येतो.

४. विषबाधा झाल्यानंतर ते विष बाहेर काढण्यासाठी CPR देतात.

५. पाण्यात जर कोणी बुडत असेल तर त्याला वर काढल्यानंतर छातीवर दाब देऊन पाणी बाहेर काढल्यानंतर तोंडातून श्वास देऊन CPR दिला जातो.

६. अपघातात जास्त रक्त वाहून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.

७. एखाद्याच्या डोक्याला मार लागून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.

८. चक्कर येऊन पडल्यास CPR देता येतो. 

यासह अनेक परिस्थतीत वरील तीनही लक्षणे आढळून आल्यास CPR देत येतो. 

रोटरी क्लब सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, के. डी. पाटील मल्टीस्पेशॅलिटीच्या डॉ. लीना पाटील, पार्ष क्लिनिकचे डॉ. कल्पेश गांधी व भूलतज्ज्ञ डॉ. धीरज चौधरी यांनी प्रत्यक्षिकाद्वारे संपूर्ण प्रक्रिया , तसेच वेगवेगळया परिस्थितीत घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच अनेकांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. एका खेळाडूला सलग ६ तास CPR देऊन त्याला जीवनदान देण्यात आले. तसेच काश्मीरमध्ये झालेल्या एका अपघातातील ४ व्यक्तींना CPR देऊन जीवदान देण्यात आळायचे अनुभव उपस्थित डॉक्टरांनी कथन केले. चला तर मग आपणही आपल्या परिसरातील डॉक्टरांकडून माहिती घेऊन जीवनरक्षक होऊ या व इतरांना त्यासाठी प्रेरित करू या ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४