Sunday 15 October 2023

गांधीतीर्थवरील दोन वर्षे : आनंद, अभिमान व प्रगल्भतेची !

२०२१ च्या घटस्थापनेच्या दिवशी सद्गुरु हभप प्रसाद महाराज यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शक आदरणीय अशोकभाऊ व मित्र अनिल जोशी, विरेश्वरप्रसाद भट यांच्या विशेष सहकार्याने जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून व्यावसायिक जीवनाचा एक नवा अध्याय सुरु झाला. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी विचार संस्कार परीक्षा विभागाचा प्रमुख म्हणून प्राथमिक जबाबदारी मिळाली. दोन वर्षाचा हा प्रवास मागे वळून पाहतांना आनंद, अभिमान व प्रगल्भतेचा वाटतो. अनेकांना माझ्या विचारसरणीमुळे व एकूणच व्यक्तिमत्वामुळे प्रश्नचिन्ह होते. माझ्यावरील प्रेमापोटी अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केला मी मात्र 'सर्व काही व्यवस्थित होईल' या विचाराने कार्यरत राहिलो. वेळप्रसंगी अनिल जोशी व दिलीप तिवारी हे पाठीशी होते त्यामुळे अडचण आली नाही. नाही म्हटले तरी मलाही तशी थोडी शंका होतीच परंतु आईवडिलांचे संस्कार, २९ वर्षांचा अनुभव, परिस्थिती व माणसांशी जुळवून घेण्याची वृत्ती, प्रसंगी दोन पाऊले मागे जाण्याची तयारी यामुळेच हे शक्य झाले असे मला प्रामाणिकपणे वाटते.

पहिले वर्ष थोडा चाचपडतच चालत होतो. सुरुवातीचे तीन महिने फारसे जबाबदारीचे काम नव्हते. काम होते ते येथील व्यवस्था, कार्यपद्धती व धोरण समजण्याचे ! ज्येष्ठ सहकारी श्री उदय महाजन यांच्याकडे डोळसपणे पहात अनेक गोष्टी शिकत होतो. सहकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला तीन महिन्यांचा टप्पा मला व सर्व सहकाऱ्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरला. पदव्युत्तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणातील भाग सुरु होता. परीक्षा विभागातही सहकाऱ्यांकडून अनेक गोष्टी समजून घेतल्या. राज्याच्या विविध भागातील शैक्षणिक संस्था, संस्थाचालक यांच्या भेटीसाठी प्रवास सुरु झाला-होता-आहे. हळूहळू कामाचा आवाका लक्षात येऊ लागला. त्याप्रमाणे स्वतःहून वेगवेगळया गोष्टी सुचवू लागलो. जबाबदारी येऊ लागली. वर्ष पूर्ण झाल्यानंतर संस्थेच्या १३ दिवसांच्या सायकल यात्रेची जबाबदारी मिळाली. ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व विकास शिबिरे, विविध स्पर्धा, नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प, How Gandhi Comes Alive ! सारख्या कार्यशाळेतील सहभाग, अनुभूती शाळेच्या प्रवेश प्रक्रियेतील सहभाग, गांधी जयंती निमित्ताने काढण्यात येणारी सद्भावना शांती यात्रा इ. मधील सहभाग वाढू लागला. आणि आता मी या सर्व गोष्टींचा एक भाग झालो याचा मला आनंद व समाधान आहे. 

व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असतांना आपल्या क्षमतांना व बलस्थानांना संधी मिळते, वाव मिळतो याचा एक वेगळा आनंद असतो. अनुभवी माणसाला अहंगंड वा न्यूनगंड दोघांपैकी काहीही असले तरी अडचणी येतात व आदरणीय अशोकभाऊंच्या भाषेत 'स्टोऱ्या' बनतात. मागील दोन वर्षात आपली एकही स्टोरी बनली नाही याचा आनंद आहे. GVSP (गांधी विचार संस्कार परीक्षा) साठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती तयार करण्यात येऊन त्यांची एक परिषद गांधीतीर्थवर आयोजित करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेचे आयोजन जैन हिल्सवर करण्यात आले. गांधीतीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता, ग्राम संवाद सायकल यात्रा कार्यान्वित करण्यात प्रमुख भूमिका म्हणून संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. संस्थेचा दशकपूर्तीचा कार्यक्रम, देशभक्तीपर समूहगीत गायन, अनेक गांधीयन कार्यकर्त्यांचा सहवास-संवाद या गोष्टी आनंद द्विगुणित करणाऱ्या ठरल्या.

जैन उद्योग समुहासारख्या जागतिक व कार्पोरेट ब्रॅण्डसोबत काम करण्याची संधी मिळणे, त्याला उंचीवर नेण्यासाठी आवश्यक असणारे नेतृत्व देणारे जैन परिवारातील आदरणीय अशोकभाऊ, अनिलभाऊ, अजितभाऊ, अतुलभाऊ, सौ. निशाभाभी, सौ. अंबिका भाभी या व्यक्तींसोबत काम करणे हि अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांशीच नियमित संबंध येतो असे नाही मात्र व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असतांना त्याचा अनुभव येतोच येतो. या सर्व कर्तृत्ववान मंडळींचा सहकाऱ्यांसोबतचा व्यवहार, त्यांची कार्यपद्धती, कामाप्रतीची निष्ठा आपसूकच खालपर्यंत पोहोचल्याचा अनुभव येतो त्यामुळे अभिमानाची गोडी अधिक वाढते. बाहेरच्या जगतातील जळगावकर नागरिकांची कंपनीवरील टीका-टिपण्णी आणि प्रत्यक्षातील स्थिती यात तफावत जाणवते मात्र या परिवाराची उदार अंतःकरणाने आपली समाजप्रतीची व गावाप्रतीची कटिबद्धता पाहिल्यानंतर खरोखरच अभिमान वाटतो. गावातील अनुभूती शाळेतील उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेली व्यवस्था तसेच भाऊंचे उद्यान व गांधी उद्यान हि त्याची उदाहरणे होत. 

हि दोन वर्षे प्रगल्भतेचीही ठरली. गांधींच्या नावाने चालणाऱ्या संस्थेतील आपला व्यवहार कसा असावा याची मनाच्या एका कोपऱ्यात कायम जाण राहते. माझ्यासारखा प्रतिक्रियावादी माणूस या दोन वर्षाच्या कालखंडात प्रतिसादवादी झाल्याचा मी अनुभव घेत आहे. समाजमाध्यमातून येणारी माहिती तपासून त्याची चिकित्सा करण्याची वृत्ती वाढीस लागत असल्याचे मला माझेच जाणवते. संघाच्या शाखेत, राष्ट्रीय परिषदांमध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून आजपर्यंत मी कधीही महात्मा गांधींबद्दलची अनादरयुक्त टिपण्णी ऐकलेली नाही मात्र गांधीवादी मंडळी मात्र संघाबद्दलची एक अढी मनात ठेवूनच बोलतो असे मला जाणवते. त्यासाठीही संयमितपणे परस्पर विचारांचा आदर करुन किमान चांगल्या कामांसाठी मैत्री निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. हे एक वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण आहे असे मला वाटते. वैचारिक मतभेदांच्या विषयावर Healthy Discussion वादविवाद करुन ते शक्य नसल्यास वादाचे मुद्दे बाजूला ठेवून एकमेकांमधील चांगल्या गोष्टींचा अभ्यास करीत सर्व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे निर्माण झाले पाहिजे असे मला वाटते. काल्पनिक, गृहीतके व वास्तव याचा विवेकी विचार करण्याची शिकवण दोन वर्षात सहजपणाने मिळाली. 

आनंद, अभिमान व प्रगल्भता वाढीसाठी आगामी काळात अधिक कार्य करण्याची प्रेरणा या दोन वर्षांनी नक्कीच दिली. संख्यात्मक व गुणात्मक विकासाच्या दृष्टीने अजून योगदान दिले पाहिजे असे वाटते. प्रशिक्षण, समुपदेशन गरज लक्षात घेऊन यावर ठळकपणे काम करण्याची मला संधी आहे असे जाणवते. हा प्रवास असाच बहरत राहो व त्यासाठी आपल्या सर्वांच्या सदिच्छा लाभो हीच अपेक्षा ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

No comments:

Post a Comment