Friday 22 December 2023

आयुष्यातील सुवर्णकाळाची कृतज्ञता : न्यू सिटी हायस्कुल

शाळेचे प्रवेशद्वार...

अल्पानामपि वस्तूनां संहति: कार्यसाधिका। 

तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिन:॥

अनेक छोट्या, क्षुल्लक वस्तुंना योग्य रीतीने एकत्र आणले असता मोठमोठी कार्येही सिद्धीस जाऊ शकतात. जसे की छोट्याछोट्या गवतांना जोडून बनविलेल्या दोरखंडाने शक्तीशाली हत्ती बांधले जाऊ शकतात. आम्हा सारख्या असंख्य विद्यार्थ्यांना एकत्रित बांधून समाजहितैषी समाज निर्माण करण्याचे कार्य करणारी शाळा आणि त्यातील शिक्षक "संहति: कार्यसाधिका!" या युक्तीने कार्यरत आहे. आयुष्यातील सुवर्णकाळ अनुभवण्याची संधी देणाऱ्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेख प्रपंच...

‘हि आवडते मज मनापासुनी शाळा... लाविते लळा ही जसा माऊली बाळा’ प्रल्हाद केशव अत्रे यांची ही बालपणीची कविता आठवली कि एका स्वप्नाच्या दुनियेत सफर करुन येतो. आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे शहरात मात्र शिक्षणाची समृद्धता आम्ही अनुभवली आहे. आजही त्या गोष्टी आठविल्या कि छाती अभिमानाने फुलून येते. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू सिटी हायस्कुलला प्रवेश घेतला तेव्हापासून  सुरु झालेला हा प्रवास दहावीनंतर वेगळ्या वळणावर सुरु झाला मात्र न्यू सिटीने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आजही आयुष्यात लाभच होतांना दिसतो. बालवयात शाळेत जाण्यासाठी त्रास देणारा मी न्यू सिटीत आल्यावर मात्र 'शाळेत हो मी जाणार, पाटी घेऊनी, घेऊनी पुस्तक अभ्यास मी करणार...' असे केव्हा म्हणायला लागलो कळलेच नाही. न्यू सिटी असे नाव आलं तरी आयुष्य समृद्ध करणारा हा चित्रपट डोळ्यासमोरुन झर्रकन पुढे जातो. शाळेचा कधी कंटाळा आला नाही किंवा कधी टाळलीही नाही. अभ्यास, खेळ, वाचन यासह अनेक गोष्टी घडत होत्या आणि आम्ही त्या आनंदाने करीत होतो. मराठी माध्यमाची जरी शाळा असली तरी इंग्रजीची अवास्तव भीती वा न्यूनगंड शाळेने कधीही निर्माण होऊ दिला नाही. 

शिक्षक वृंदासह अलीकडचा फोटो...
न्यू सिटीत ५ वीत प्रवेश झाला. वर्गशिक्षक श्री. बी. एन. जोशी सर, विषय इंग्रजी. शाळेची वेळ दररोज दुपारची मात्र शनिवारी सकाळची. त्या दिवशी आमचे सर धोतर आणि पांढरा सदरा आणि कपाळी मस्त गंध. शाळा केवळ मुलांची त्यामुळे दंगामस्तीला कोणतेही बंधन नाही. (असं विधान धारिष्ट्याने करतोय कारण शाळा शिस्तीचीच होती पण आम्ही ? ) जगण्याला लायक बनविणे, माणूस म्हणून घडविणे म्हणूनच तर म्हणतात ना ! शाळा सुरु व्हायची ती "जयोस्तुते जयोस्तुते..." या गीताने अर्थात त्यापूर्वी अन्यही गाणे लागायची त्यात ऋणानुबंधाच्या... आवर्जून आठवते. राष्ट्रगीत झाले कि दिनक्रम सुरु... साधारण ७ वी नंतर हे जरी सुरुच असले तरी आमची कबड्डी जोरात चालायची. पांढर शर्ट आणि खाकी अर्धी चड्डी हा गणवेश. सकाळी आईने मोठ्या कष्टाने धुतलेला पांढरा शर्ट संध्याकाळी पार वाट लागलेली. बटण तुटलेले, कुठेतरी फाटलेले, हातापायाला कायम मलमपट्टी सौभाग्याचं लेणंच ते ! ९ वी पर्यंत पीटीच्या तासाला शिवाजी व्यायामशाळेच्या मैदानावर सर्वांच्या पुढे... मात्र दहावीत काही तरी कारण सांगून वर्गातच. शनिवारी संपूर्ण शाळेची मास ड्रिल अर्थात एकत्रित पिटी ! हात करतांना काय धाक असायचा शिक्षकांचा... एव्हढ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सरांचे लक्ष कुळकर्णी हात सरळ हात सरळ. 

आदरणीय मु. कृ. पाध्ये सर 

मुख्याध्यापक मु. कृ. पाध्ये सर...
आमच्या शाळेचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे मुख्याध्यापक स्व. मुकुंद कृष्णाजी पाध्ये !  शनिवारी सकाळची शाळा उशिरा येणाऱ्या मुलांना चढ्या क्रमाने शिक्षा... पहिल्यांदा २५ , ५० उठबशा, त्यानंतर आलेल्यांना हातावर वेताच्या छडीचे फटके ३, ५, १० त्यानंतर आल्यावर दोन्ही आणि वरुन कोंबडा करुन उभे राहा ! तास सुरु असतांना मुख्याध्यापकांचा राउंड असायचा खिडकीतून लक्ष आणि पुन्हा लक्ष नाही किंवा काही रिकामे काम करतांना दिसला कि आहेच... १०० मीटर रनिंग, लांब उडी, उंच उडी, खो खो, क्रिकेट... याच्या जोडीला नाटके, गीत गायन, वेगवेगळ्या स्पर्धा ! अभ्यास तो पण होताच कि.... या सगळ्या गोष्टींची तयारी भूतो न भविष्यती ! तुम्हाला कितीही चांगले झाले वाटले तरी गुरुजींचे समाधान कुठे ? परत सुरु... मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा... जीवनात जिद्द, मेहनत, सातत्य, वचनबद्धता, समर्पण, संयम, सातत्य हे सर्व आले येथून अर्थात तेव्हा हे शब्द गावी पण नव्हते. म्हणून तर हा सुवर्णकाळ ! एव्हढे सर्व असल्यावर कोणाला हवी सुट्टी ? जीवावर यायचे सुट्टी असली कि... हेच शाळेचं यश आणि उद्देशही आणि म्हणूनच कृतज्ञता !

या जोडीला अजून इतर परीक्षा असायच्या त्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी आणि गणिताच्या ४ परीक्षा दरवर्षी एक एक करीत ९ वी पर्यंत बहुतांश मुले द्यायचीच... तर्खडकर इंग्रजी ग्रामर तेथे कळालं. ज्यांना चित्रकलेची आवड त्यांच्यासाठी एलिमेंटरी, इंटरमिजीएट. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गीता पठण, कणकवलीची राज्य बाल्य नाट्य स्पर्धा, मनाचे श्लोक, जोडीला लक्ष लक्ष सूर्य नमस्कारासारखे उपक्रम, एनसीसी कॅम्प... स्पोर्ट मीट / वीक वगैरे भाग नव्हता कारण तो रोजचा भाग होता. सर्वच मुले हुशार आणि प्रत्येकामुळे शाळेला एक वेगळी ओळख. अर्थात हुशार म्हणजे ज्याच्या त्याच्या विषयात म्हणजे अभ्यास, खेळ, वक्तृत्व, वादविवाद, नाटक, गाणे... काही ना काही तर प्रत्येकात आहेच नं ! तेच शोधून त्यावर काम करणे हेच शाळेचे ध्येय. 

शाळेची खरी श्रीमंती म्हणजे आमच्या शाळेचा शिक्षकवृंद !

शाळेचा समृद्ध शिक्षकवृंद...
मधल्या सुट्टीतही कबड्डी, क्रिकेटच्या मॅचेस चालू असतील स्कोर पाहायला बाहेर जाणार खास स्कोर लिहिले जायचे परतीला वेळ झाला कि आहेच पुन्हा... बाहेर गाडीवर मिळणाऱ्या गोळ्या, अमुन्या, वाळलेली बोर असो. शाळे शेजारीच स्वस्तिक चित्र मंदिर (थिएटर) काही वेळेस टॉकीजमधील पिक्चरचे डायलॉग गाणे स्पष्ट ऐकू यायचे. मस्ती केली तरी पाय वाकडे पडणार नाही याची काळजी... विचारांची पक्की बैठक अर्थात त्यामागे होती शाळेतील शिक्षकांची मेहनत. शाळा म्हणजे खरे तर शिक्षक ६ वीला श्री. एस. एस. मुसळे सर, ७ वीला श्री. ह. म. भंडारी, ८ वी श्री. आर. एस. जहागीरदार, ९ वीला एन. एन. शाह आणि दहावीला श्री. शा. रा. नाईक प्रत्येकाचे एक वेगळेपण , वैशिष्ट्य... असेच गणिताचे श्री. व्ही. वाय. दाबके, इतिहासाचे श्री. मदनलाल मिश्रा, संगीत कलाचे श्री. रत्नाकर रानडे, चित्रकलेचे श्री. पंचभाई व श्री. उपासनी, हस्तकलेचे श्री. एम. डी. धारणे, आणि एनसीसीचे श्री. आर. एस. पाटील. सर्व नररत्नांची खाणच... नाही याच्यापुढे त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी शब्दच नाहीत. माणूस घडणं, माणूस उभा राहणं इतकी सोपी गोष्ट नाही मात्र ते करु शकते ती समाजजीवनातील शाळा नावाची व्यवस्था ! अशा शाळा आणि अशी व्यवस्था भारतीय संस्कृतीची धरोहर आहे. त्यातूनच निर्माण होणारा वसा आणि वारसाही ! त्यासाठीच शाळेप्रती कृतज्ञता... तमाम विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची हि कृतज्ञता अशीच कायम संक्रमित होत राहो ज्यामुळे संस्कृती व राष्ट्र चिरकाल टिकेल... 

शाळेचे अंतरंग...
माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो मग शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण ठरतेच आणि ती देखील आयुष्यभरासाठी... म्हणूनच आपण त्यांच्याप्रती कायम कृतज्ञ असणे हेच खऱ्या अर्थाने माणूसपणाचे लक्षण आहे. पहिले गुरु माता-पिता, तदनंतर शालेय शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षण, व्यावसायिक शिक्षण देणारे वरिष्ठ सहकारी, आध्यात्मिक जीवनाची दिशा दर्शन करणारे अशा एका व्यक्ती सोबतच आपला जीवनप्रवास सुरु असतो. हा प्रवास जेव्हढा समृद्ध तेव्हढा माणूस अधिक प्रगल्भ ! हि प्रगल्भताच माणसाला एक संवेदनशील व जागरुक नागरिक बनवितो. 

विषय शिक्षणाबरोबरच जीवन विषयक दृष्टिकोन देणारे, व्यावहारिक जगाची ओळख करुन देणारे, आपल्यातील कला कौशल्याला विकसित करीत सर्वांगीण विकास साधणाऱ्या न्यू सिटीच्या शिक्षकांनी आयुष्यभराची जी शिदोरी दिली आहे त्याबद्दल कायम कृतज्ञ राहू. अर्थात हि कोणत्याही शिक्षकाची मागणी नव्हे तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या हृदयात आपल्या कृतीने निर्माण केलेली ती जागा आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे मिळविलेला तो सन्मान आहे. 

इ. ७ वीत असतांनाच वर्गाचा फोटो...
मुळात शाळा या विषयाची भीती घालविणारे शिक्षक, विषयांची व खेळाची गोडी लावणारे शिक्षक, आपल्यातील उपजत गुणांना ओळखून त्याद्वारे व्यावसायिक जगतात आपली जागा निर्माण करणारे शिक्षक या सर्वांचेच जीवनात एक वेगळे स्थान आहे. चांगले वळण लावण्यासोबतच प्रेरणा, जिद्द, नवीन काहीतरी करण्याचे बळ, कर्तव्याची जाणीव, दातृत्व व नैतिकता देणारे हे सारे शिक्षक. कधी कौतुक करुन तर कधी रागावून सारासार विवेकाने जीवन जगण्याची गुरुकिल्ली देणारे शिक्षक. आपुलकी व आत्मीयतेने शिस्त, क्षमा व करुणा उत्पन्न करणारे शिक्षक. कर्तव्यापलीकडे व चाकोरीबाहेर जाऊन एक माणूस घडविण्यासाठी, राष्ट्रप्रेमी नागरिक घडविण्यासाठी चाललेली हि धडपड अविरत, अविश्रांत आणि निश्चयाने चालू होती.  

ज्या वर्गात शिकलो त्यात पुन्हा एकदा...
कुणाला मातीच्या गोळ्याला दिलेला आकार तर कोणाला सुरवंटाचे फुलपाखरातील परिवर्तन वाटते. एका बाजूला नव्या जगाची ओळख करुन देणारे तर दुसऱ्या बाजूला त्याला सामोरे जाण्यासाठीची सिद्धता करणारे हे शिक्षक. वयाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर तटस्थपणाने सिंहावलोकन केले तर त्यांच्यातील या सर्वांमध्ये एक सामान धागा दिसतो तो म्हणजे आपला विद्यार्थी घडविण्यासाठी त्याच्यातील गुणग्राहकता शोधण्याचे सर्वात अवघड काम... विद्यार्थ्याने आपल्या यशाचे दिलेले संपूर्ण श्रेय हिच त्याची कर्तव्य परायणता ! शिक्षकाला विद्यार्थ्यांची आई तर आईला बाळाची शिक्षिका होता आले पाहिजे असे म्हणत असतांनाच शिक्षकाला विद्यार्थ्यांतील शिक्षक जागा करता आला पाहिले तर वसा आणि वारसाची हि संस्कृती चिरकाल टिकून राहील आणि त्याप्रतीची कृतज्ञताही ! शिक्षक हेच राष्ट्रजीवनाचे बलस्थान असून विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता अशीच संक्रमित होत राहो हिच परमेश्वरचरणी विनम्र प्रार्थना !  

अशा कितीतरी आठवणी आहेत पण तेवढ्या वेळ व शब्द मर्यादेमुळे लिहिणं शक्यही नाही. पण शाळेविषयी आणि शाळेतील आठवणींविषयी एवढंच सांगावसं वाटतं...

माझी शाळा जीवनाचा सुवर्णकाळ 

निरागस, निष्पाप जीवांचा सुकाळ ॥  

तेथेच झाली नांदी गमभनची 

अन समृद्ध संस्कारित जीवनाची ॥

दंगा आणि मस्तीसाठी होते सखे-सोबती 

त्यातूनच निर्मिली परमेश्वररुपी नाती ॥

त्याला नव्हत्या जाती-पातीच्या भिंती 

जळती अखंड संस्काराच्या वाती 

उजळती समृद्ध जीवनाच्या ज्योती ॥ 

स्वओळख आणि प्रगतीचा पाया 

देई आत्मविश्वास ठाया ॥

ज्ञानमंदिरातील पूज्यनीय व्यक्ती

यशोमंदिरे उभविती ॥

अशी आमची शाळा होती....

अशी आमची शाळा होती... आहे... ॥


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४

Tuesday 21 November 2023

प्रत्येक दिवस असाच असावा !

१८ नोव्हेंबर रोजी मातोश्री श्रीमती सुनंदा विष्णू कुळकर्णी हिच्या आशीर्वादाने, ह.भ.प. सद्गुरु श्री. प्रसाद महाराज अमळनेरकर (११ वे गादीपती, संत श्री सखाराम महाराज संस्थान अमळनेर-पंढरपूर), ह.भ.प. श्री. दादा महाराज जोशी (चिमुकले राम मंदिर), ह.भ.प. श्री. मंगेश महाराज जोशी (५ वे गादीपती, श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव) यांच्या कृपाशिर्वादाने, ज्येष्ठांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी ५५ व्या वर्षात पदार्पण केले. यावर्षी हा दिवस आगळावेगळा ठरला आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते आयुष्यातील प्रत्येक दिवस असाच असावा.

सकाळी लवकर उठून भाऊंच्या उद्यानात फिरायला गेलो. तेथे नेहमीप्रमाणे व्यायाम करुन घरी आलो. स्नान, आन्हिक, जप व सकाळचा नाश्ता करुन वेळेवर कार्यालयात पोहोचलो. सकाळी ९ ते ९॥ दररोजची प्रार्थना व सूत कताई केली. पहिला आशीर्वादाचा फोन नेहमीप्रमाणे आईचा व दोन मिनिटांच्या अंतराने श्री. उदय महाजन यांचा आला. त्यानंतर सर्व माध्यमातून शुभेच्छांचा दिवसभर वर्षाव सुरु होता. सकाळी १० ते १२॥ कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या पदविका अभ्यासक्रमात पहिले प्रशिक्षण सत्र घेतले. वर्षभरात असे आठ सत्र घ्यावयाचे आहेत. व्यक्तीमत्व विकास फोकस असला तरी प्रशिक्षणार्थींच्या व्यवसाय वृद्धीवरील शंकासमाधानाने त्याचे महत्त्व अधोरेखित केले. काही नाविन्यपूर्ण मार्ग सुचविल्याने त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान एक वेगळाच आनंद देऊन गेला. 

भोजनोत्तर सत्रात गांधीतीर्थला भेट देण्यासाठी आलेल्या हेमंत क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी २० मिनिटे प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम कस्तुरबा सभागृहात घेतला. आपला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत नेत असताना एक वेगळे समाधान होते. सलग ३ प्रश्नांना उत्तरे देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या जीवनावरील पुस्तके भेट देण्यात आली. संचालक हेमंत पाटील व हा उपक्रम घडवून आणणारे सहकारी ॲड. दुर्वास नलगे यांच्या उपस्थितीत व उत्साहपूर्ण वातावरणात प्रश्नमंजुषा झाली.

यानंतर लगेचच फैजपूर येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई या संस्थेच्या ६२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी विचार संस्कार परीक्षा व गांधीतीर्थ संग्रहालयास सहल भेट करावी या संदर्भात माहिती देण्यासाठी सहकारी चंद्रशेखर पाटील यांचेसह सायंकाळी ४ वाजता पोहोचलो. दहा मिनिटात उपस्थितांना माहिती दिली. तसेच संस्थेचे माहितीपत्रक वितरित करुन रात्री ७.३० वाजता घरी पोहोचलो.
 
घरी आल्यावर फ्रेश होऊन श्रीराम मंदिर संस्थानच्या रथोत्सवातील सरस्वती वहनाचे दर्शन व हभप श्री मंगेश महाराजांच्या दर्शनासाठी जुने जळगावातील मंदिरात पोहोचलो. आशीर्वाद घेऊन हभप श्री दादा महाराज जोशी यांच्या आशीर्वादासाठी चिमुकले राम मंदिरात पोहोचलो. दोन्ही ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचे आशीर्वादपर प्रसाद मिळाला.

घरी मुलांनी वाढदिवस साजरा करण्याची तयारी केली होती. खरंतर यावर्षीची दिवाळी भाऊबीजेच्या दुसर्‍या दिवशी सुरु झाली कारण दिवाळीत मुलीला सुट्टीच नव्हती. त्यामुळेच वाढदिवसाच्या दिवशीच दिवाळीचे औक्षणही करण्यात आले. असा अतिशय व्यस्त, केलेल्या कामाचे आनंद व समाधान देणारा असा होता. या वर्षात प्रत्येक दिवस असाच यावा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना... रामकृष्ण हरि !


Ⓒगिरीश कुळकर्णी
९८२३३ ३४०८४

Sunday 15 October 2023

गांधीतीर्थवरील दोन वर्षे : आनंद, अभिमान व प्रगल्भतेची !

२०२१ च्या घटस्थापनेच्या दिवशी सद्गुरु हभप प्रसाद महाराज यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शक आदरणीय अशोकभाऊ व मित्र अनिल जोशी, विरेश्वरप्रसाद भट यांच्या विशेष सहकार्याने जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून व्यावसायिक जीवनाचा एक नवा अध्याय सुरु झाला. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी विचार संस्कार परीक्षा विभागाचा प्रमुख म्हणून प्राथमिक जबाबदारी मिळाली. दोन वर्षाचा हा प्रवास मागे वळून पाहतांना आनंद, अभिमान व प्रगल्भतेचा वाटतो. अनेकांना माझ्या विचारसरणीमुळे व एकूणच व्यक्तिमत्वामुळे प्रश्नचिन्ह होते. माझ्यावरील प्रेमापोटी अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केला मी मात्र 'सर्व काही व्यवस्थित होईल' या विचाराने कार्यरत राहिलो. वेळप्रसंगी अनिल जोशी व दिलीप तिवारी हे पाठीशी होते त्यामुळे अडचण आली नाही. नाही म्हटले तरी मलाही तशी थोडी शंका होतीच परंतु आईवडिलांचे संस्कार, २९ वर्षांचा अनुभव, परिस्थिती व माणसांशी जुळवून घेण्याची वृत्ती, प्रसंगी दोन पाऊले मागे जाण्याची तयारी यामुळेच हे शक्य झाले असे मला प्रामाणिकपणे वाटते.

पहिले वर्ष थोडा चाचपडतच चालत होतो. सुरुवातीचे तीन महिने फारसे जबाबदारीचे काम नव्हते. काम होते ते येथील व्यवस्था, कार्यपद्धती व धोरण समजण्याचे ! ज्येष्ठ सहकारी श्री उदय महाजन यांच्याकडे डोळसपणे पहात अनेक गोष्टी शिकत होतो. सहकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला तीन महिन्यांचा टप्पा मला व सर्व सहकाऱ्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरला. पदव्युत्तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणातील भाग सुरु होता. परीक्षा विभागातही सहकाऱ्यांकडून अनेक गोष्टी समजून घेतल्या. राज्याच्या विविध भागातील शैक्षणिक संस्था, संस्थाचालक यांच्या भेटीसाठी प्रवास सुरु झाला-होता-आहे. हळूहळू कामाचा आवाका लक्षात येऊ लागला. त्याप्रमाणे स्वतःहून वेगवेगळया गोष्टी सुचवू लागलो. जबाबदारी येऊ लागली. वर्ष पूर्ण झाल्यानंतर संस्थेच्या १३ दिवसांच्या सायकल यात्रेची जबाबदारी मिळाली. ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व विकास शिबिरे, विविध स्पर्धा, नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प, How Gandhi Comes Alive ! सारख्या कार्यशाळेतील सहभाग, अनुभूती शाळेच्या प्रवेश प्रक्रियेतील सहभाग, गांधी जयंती निमित्ताने काढण्यात येणारी सद्भावना शांती यात्रा इ. मधील सहभाग वाढू लागला. आणि आता मी या सर्व गोष्टींचा एक भाग झालो याचा मला आनंद व समाधान आहे. 

व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असतांना आपल्या क्षमतांना व बलस्थानांना संधी मिळते, वाव मिळतो याचा एक वेगळा आनंद असतो. अनुभवी माणसाला अहंगंड वा न्यूनगंड दोघांपैकी काहीही असले तरी अडचणी येतात व आदरणीय अशोकभाऊंच्या भाषेत 'स्टोऱ्या' बनतात. मागील दोन वर्षात आपली एकही स्टोरी बनली नाही याचा आनंद आहे. GVSP (गांधी विचार संस्कार परीक्षा) साठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती तयार करण्यात येऊन त्यांची एक परिषद गांधीतीर्थवर आयोजित करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेचे आयोजन जैन हिल्सवर करण्यात आले. गांधीतीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता, ग्राम संवाद सायकल यात्रा कार्यान्वित करण्यात प्रमुख भूमिका म्हणून संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. संस्थेचा दशकपूर्तीचा कार्यक्रम, देशभक्तीपर समूहगीत गायन, अनेक गांधीयन कार्यकर्त्यांचा सहवास-संवाद या गोष्टी आनंद द्विगुणित करणाऱ्या ठरल्या.

जैन उद्योग समुहासारख्या जागतिक व कार्पोरेट ब्रॅण्डसोबत काम करण्याची संधी मिळणे, त्याला उंचीवर नेण्यासाठी आवश्यक असणारे नेतृत्व देणारे जैन परिवारातील आदरणीय अशोकभाऊ, अनिलभाऊ, अजितभाऊ, अतुलभाऊ, सौ. निशाभाभी, सौ. अंबिका भाभी या व्यक्तींसोबत काम करणे हि अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांशीच नियमित संबंध येतो असे नाही मात्र व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असतांना त्याचा अनुभव येतोच येतो. या सर्व कर्तृत्ववान मंडळींचा सहकाऱ्यांसोबतचा व्यवहार, त्यांची कार्यपद्धती, कामाप्रतीची निष्ठा आपसूकच खालपर्यंत पोहोचल्याचा अनुभव येतो त्यामुळे अभिमानाची गोडी अधिक वाढते. बाहेरच्या जगतातील जळगावकर नागरिकांची कंपनीवरील टीका-टिपण्णी आणि प्रत्यक्षातील स्थिती यात तफावत जाणवते मात्र या परिवाराची उदार अंतःकरणाने आपली समाजप्रतीची व गावाप्रतीची कटिबद्धता पाहिल्यानंतर खरोखरच अभिमान वाटतो. गावातील अनुभूती शाळेतील उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेली व्यवस्था तसेच भाऊंचे उद्यान व गांधी उद्यान हि त्याची उदाहरणे होत. 

हि दोन वर्षे प्रगल्भतेचीही ठरली. गांधींच्या नावाने चालणाऱ्या संस्थेतील आपला व्यवहार कसा असावा याची मनाच्या एका कोपऱ्यात कायम जाण राहते. माझ्यासारखा प्रतिक्रियावादी माणूस या दोन वर्षाच्या कालखंडात प्रतिसादवादी झाल्याचा मी अनुभव घेत आहे. समाजमाध्यमातून येणारी माहिती तपासून त्याची चिकित्सा करण्याची वृत्ती वाढीस लागत असल्याचे मला माझेच जाणवते. संघाच्या शाखेत, राष्ट्रीय परिषदांमध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून आजपर्यंत मी कधीही महात्मा गांधींबद्दलची अनादरयुक्त टिपण्णी ऐकलेली नाही मात्र गांधीवादी मंडळी मात्र संघाबद्दलची एक अढी मनात ठेवूनच बोलतो असे मला जाणवते. त्यासाठीही संयमितपणे परस्पर विचारांचा आदर करुन किमान चांगल्या कामांसाठी मैत्री निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. हे एक वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण आहे असे मला वाटते. वैचारिक मतभेदांच्या विषयावर Healthy Discussion वादविवाद करुन ते शक्य नसल्यास वादाचे मुद्दे बाजूला ठेवून एकमेकांमधील चांगल्या गोष्टींचा अभ्यास करीत सर्व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे निर्माण झाले पाहिजे असे मला वाटते. काल्पनिक, गृहीतके व वास्तव याचा विवेकी विचार करण्याची शिकवण दोन वर्षात सहजपणाने मिळाली. 

आनंद, अभिमान व प्रगल्भता वाढीसाठी आगामी काळात अधिक कार्य करण्याची प्रेरणा या दोन वर्षांनी नक्कीच दिली. संख्यात्मक व गुणात्मक विकासाच्या दृष्टीने अजून योगदान दिले पाहिजे असे वाटते. प्रशिक्षण, समुपदेशन गरज लक्षात घेऊन यावर ठळकपणे काम करण्याची मला संधी आहे असे जाणवते. हा प्रवास असाच बहरत राहो व त्यासाठी आपल्या सर्वांच्या सदिच्छा लाभो हीच अपेक्षा ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday 10 October 2023

मानसिक आरोग्याचा मंत्र : आनंदी जगणं !

दि. १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. आपले मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी अतिशय साध्या साध्या व छोट्या छोट्या गोष्टीतूनही हे शक्य आहे. वास्तव स्वीकारुन व कोणाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जीवन जगणे यासाठी लाभदायक ठरु शकते. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले मात्र सोबत अनेक गोष्टींचा ताण सोबत घेऊन आले. तंत्रज्ञान व जीवन यात योग्य समतोल राखणे आजच्या काळात कठीण होत चालले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर कालांतराने मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण करतो. लॉकडाऊनच्या काळात मोबाईलच्या आहारी गेलेला समाज अजूनही स्वतःला सावरु शकत नाही हे वास्तव नाकारता येणार नाही. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम झाला आहे. 

टीव्ही व समाज माध्यमही मानसिक गोंधळातच भर घालतांना दिसत आहे. सावधानता बाळगणे व संयमित राहणे या दोन गोष्टी आपल्याला काही बंधने घालण्यासाठी प्रवृत्त करु शकतात अर्थात त्यासाठी आपणच आपल्या जीवनाकडे डोळसपणे पाहणे अगत्याचे ठरते. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हि या निमित्ताने एक संधी आहे. आपण आनंदी असणे हे कुटुंबीय, सहकारी व मित्रपरिवार यासाठी आवश्यक आहे. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. कोवळ्या वयातील मुलांच्या आत्महत्या असो वा इस्रायल मधील युद्ध, कार्यालयातील कामाचा ताण असो वा कुटुंबातील आव्हाने असोत या सर्वांचा परिणाम आपल्यावर होतो व स्वाभाविकपणे तो आपल्या परिघातील प्रत्येकावर जाणते-अजाणतेपणी होत असतो. आपण कितपत आनंदी आहोत हे जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न स्वतःला विचारुन पहा. 


Courtsey: Swapneela Sethia


१. आपल्याला आपले आयुष्य हे बक्षीस आहे असे वाटते का ?

२. आपण स्वतःमधील व इतरांमधील चांगुलपणा शोधण्यासाठी सक्षम आहोत का ?

३. आपण आपल्या भविष्याबद्दल आशादायी आहात का ?

४. आपण आपल्या रोजच्या कामातून आनंद मिळवतो का ?

५. आपणास पदोपदी व क्षणोक्षणी आनंद वाटतो का ?

६. आपणास आपल्या जीवनात काहीतरी उद्देश व अर्थ आहे असे वाटते का ?

७. आपण कायम उत्साही असतात का ?

८. आपण इतरांना काही देतो त्यावेळेस आनंद मिळतो का ?

९. विपरीत परिस्थितीतही मी चांगले शोधू शकतो का ?

१०. दिवसभरातील भावनांचा स्वीकार व स्वागत करतो का ?

११. कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या नियमित संपर्कात असतो का ? 

१२. जेव्हा परिस्थिती गंभीर असते त्यावेळेस पुढाकार घेऊन सहाय्य्यभुत होतो का ?

१३. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटते का ?

१४. भूतकाळातील निराशा व दुःख विसरु शकतो का ?


आनंदी जीवन हे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे व त्यादृष्टीने वरील काही प्रश्न आहेत. असे मानवी भावनांच्या बाबतीत आपल्याला पडणाऱ्या प्रश्नाचा विचार केल्यास आपल्याला मार्ग सापडू शकतात व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त जीवन जगता येऊ शकते. जेव्हा आपल्याला आपल्याच प्रश्नांची उत्तरे सापडत नाही तेव्हा स्नेहीजनांची मदत घ्या. आपले मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे असे लक्षात आल्यास समुपदेशकाची मदत घ्या. मोकळा संवाद अनेक प्रश्नांची सहज उकल करतो. त्यासाठी एक जिवाभावाचा सखा असावा. निसर्गाच्या जितके जवळ जाल तेव्हढे प्रश्न लवकर निकालात निघतील. शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्या. त्यासाठी आपल्या सोईनुसार व आवडीनुसार व्यायाम करा. ताजे, पौष्टिक व सकस अन्न हे शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यासाठीचे मूळ आहे. प्राणिमात्रांवर व भोवतालच्या जगावर प्रेम करा. गरजूंना मदत करा. आपल्याकडे जे आहे ते उदारहस्ते मुक्तपणाने देत रहा. 

पहा... विचार करा... बदल करा... आपल्या निरामय दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा ! 


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Friday 14 July 2023

...तेथे कर माझे जुळती !

मानवी जीवनात अनेक माणसे येतात. काही माणसे नाते संबंधाने आपली असतात, काही ऋणानुबंधाने आपली होतात तर काही त्यांच्या विचित्रपणाने विसरली जात नाहीत तर काही येतात आणि जातात. या प्रत्येकाचे एक स्वभाववैशिष्ट्य असते. समसमान विचारांची माणसे अधिक जवळ येतात आणि जीवलग होतात. अर्थात या सर्वांचेच जीवनात एक वेगळे स्थान आणि महत्त्व असते. मानवी जीवन माणसांनी अधिक समृद्ध होते. त्यातही सामाजिक जाणिवेचे व प्रतिभेचे धनी असलेली माणसे जवळ आली कि जीवनाला अर्थ मिळवून देणे आणि जीवनाची इतिकर्तव्यता समजणे सोपे जाते. 

काही व्यक्ती पद, प्रतिष्ठा, अनुभव यासर्वांनी सिद्ध असूनही साधी असतात. त्यांच्या जगावेगळ्या कार्यकर्तृत्वाने ती प्रेरणादायी ठरतात. या माणसांची असामान्य चिकाटी, मेहनत, धडाडी आणि प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या वटवृक्षाप्रमाणे कडक उन्हात निश्चल उभे राहून दुसऱ्यांना मात्र सावली देण्याची उदार वृत्ती बाळगून असतात. या व्यक्ती पाहिल्या, अनुभवल्या आणि आठवल्या तरी कविवर्य बा. भ. बोरकरांच्या कवितेतील या काव्यपंक्ती सहज मनी येतात.

यज्ञी ज्यानी देउनि निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर

परी जयांच्या दहनभूमिवर, नाही चिरा नाही पणती ॥

 

हे सर्व आठविण्याचे कारण म्हणजे जीवनात अनुभवलेले आदरणीय डॉ. प्रताप जाधव ! मागच्या शुक्रवारी (दि. ७ जुलै) पंढरपूर येथे असतांना रात्री उशिरा त्यांचे निधन झाल्याचे कळले. अस्वस्थ झालो. सकाळी उठल्यापासून सोबतच्या सहकाऱ्याजवळ त्यांच्या आठवणी जागवतच दिवस घालवला. मागील ८ दिवसात एक दिवस असा गेला नाही कि डॉक्टर साहेबांची आठवण आली नाही.  'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' म्हणजे काय आणि कसे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टरसाहेब. या देव माणसाशी चांगला संपर्क होता. कधीही भेट झाली कि परिवारातील एक सदस्य या नात्याने सहज भावाने बोलत. बोलणंही अघळपघळ असायचे. त्यात विषय वा अन्य कसलेही बंधन नसायचे. कायम हसतमुख. पेशंट कितीही तणावात असला तरी त्याचा ताण सहज दूर करायचे. मागील २५ वर्षात किमान १० वेळा तरी मी हा अनुभव घेतला आहे. कधी वैयक्तिक उपचारासाठी तर कधी नातेवाईकांसाठी. एका बाजूला उपचार, ऑपरेशन सुरु तर दुसऱ्या बाजूला हसतहसत बोलणे... एक शब्द सहज यायचा होईल ना ! बघू... काही विचारलं कि हा शब्द ठरलेला. 

पूर्वीच्या दवाखान्यात वा आत्ताच्या दवाखान्यातील एक पाटी मला प्रचंड आवडायची. उक्ती ला कृतीची जोड दिल्यावर माणसाची प्रतिमा उजळून निघते. ती पाटी होती... 'खोटी बिले मागून सरकारी तिजोरी लुटू नये.' समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल चीड होती व त्यावर प्रखर, सडेतोड प्रतिक्रिया द्यायचे. स्पष्टवक्ता तर होतेच पण त्याला कृतिशीलतेची जोडही होती. यात कुठल्याही प्रकारचा 'अहं' भाव नसायचा. डॉक्टरांचा व्यवहार निर्व्याज होता. 'देगा उसका भी भला न देगा उसका भी भला' अशी वृत्ती होती. मानवी जीवनाचे नीतिनियम व व्यवहार इतक्या सहजपणे पाळत अर्थात त्यामागे त्यांची तपस्या होती. सकाळी एकदा दवाखान्यात आल्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत ओपीडी व ऑपरेशन्स चालत. मी कधीही त्यांना थकलेले पाहिले नाही. रात्री १०.३० वाजता पण तोच उत्साह असायचा. आपल्या आजाराबद्दल वा दुखण्याबद्दल कधीही बोलत नसत. विषय काढला तरी टाळत. आईच्या 'नी' रिप्लेसमेंट्च्या वेळी व काकूंच्या हिप जॉईन्टच्या वेळी या शस्त्रक्रिया आपण लवकरच सुरु करीत आहोत असे म्हणालेत. मात्र त्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही.


जळगाव जनता बँकेचे संचालक झाल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीला येणे शक्य होत नसे. त्यावेळी दादा अर्थात डॉ. आचार्य नेहमी म्हणायचे त्यांना फोन करु नका. त्यांना त्यांचे काम सोडून बैठकीला बोलावणे हा सामाजिक अपराध आहे. 'सेवा परमो धर्म:' हे कार्यकर्त्याला आपल्या आचरणातून त्यांनी दाखवून दिले. जळगावकरांची त्यांनी निस्सीम सेवा केली. कधी कोणी त्यांना मसीहा म्हटले तर कधी देवदूत... वेळ, काळ याचे त्यांनी कधीही भान बाळगले नाही. केवळ सेवा हाच त्यांचा जीवनमंत्र होता. काळाने त्यांना फार लवकर बोलावले. समाजाचा संसार केला परंतु आपल्या पाखरांचा संसार मात्र राहिला. डॉक्टर तुम्ही आम्हाला हवे होतात ! 'सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले' या उक्तीनुसार डॉक्टर साहेबांनी आपले बलिदान दिले. जळगावकरांना हा 'देव' माणूस कायम लक्षात राहील मात्र त्यांच्या नावाने स्थायी स्वरुपात काही कार्य उभारल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे वाटते. डॉक्टर साहेबांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभेलच, परंतु परमेश्वराने वहिनी व परिवारास हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. आम्हा सर्वांना डॉक्टरांच्या प्रेरणेने समाजसेवेची सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना ! 

कविवर्य बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे परी जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती... आणि म्हणून मला म्हणावे वाटते ...तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती !  


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Friday 19 May 2023

आपण सर्व 'जीवरक्षक' !

रोटरी क्लब जळगावच्या कालच्या साप्ताहिक सभेत एका आगळ्यावेगळ्या विषयावर मार्गदर्शन / प्रशिक्षण देण्यात आले. दैनंदिन जीवनात येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो यासाठी हे प्रशिक्षण होते. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुपरिचित व अलीकडच्या काळात सामान्य माणसासाठी परवलीचा शब्द म्हणजे CPR अर्थात Cardiopulmonary resuscitation कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन ! हा शब्द अर्थात हे तंत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि प्रत्येकाने आपल्या जीवनात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीत या तंत्राचा आत्मविश्वासाने वापर करावा यासाठी हा लेख... आपण वाचा व इतरांनाही वाचण्यासाठी पाठवा !

एखाद्या आपत्कालीन परिस्थितीचा शिकार झालेल्या व्यक्तीला पुनर्जीवन मिळवून देणारे हे तंत्र असल्याने त्याला बेसिक लाईफ सपोर्ट असेही म्हणतात. एखादा व्यक्तीची जर श्वसन क्रिया आणि हृदयक्रिया बंद पडून तो बेशुद्ध झाला असेल तर त्याला देण्यात येणारा अतिमहत्वाचा प्राथमिक उपचार म्हणजेच बेसिक लाईफ सपोर्ट... यालाच CPR किंवा जीवन संजीवनी क्रिया असे म्हणतात. रामायणात हनुमानाने संजीवनी वनस्पती आणून लक्ष्मणाला जीवनदान दिले होते. तशाच प्रकारची आपत्कालीन परिस्थितील व्यक्तीला जीवनदान देणारे हे तंत्र आहे. १० पैकी ३ व्यक्तींना त्याचा फायदा होतो अर्थात त्यांना जीवनदान मिळते. 

एखादी घटना अनपेक्षितपणे घडल्यास माणसाला बऱ्याचदा काही सुचत नाही. मन शांत ठवून आपण काही प्राथमिक गोष्टी करू शकल्यास आपण त्या माणसाचा जीव वाचवू शकतो. बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा दवाखान्यात पोहचेपर्यंत, आहे त्याच ठिकाणी सामान्य नागरिकांनी मदत करणे अति आवश्यक आहे. या उपचाराने आपण त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. हृदय बंद पडलेल्या व्यक्तीमध्ये, ह्रदयातून मेंदू व इतर अवयवांकडे होणारा रक्तपुरवठा जर का ४ मिनिटात प्रस्थापित झाला नाही तर मेंदू कायमचा निष्क्रीय होतो. या अवघ्या ४ मिनिटात  बंद पडलेले हृदय किंवां त्याची स्पंदने कृत्रिमरीत्या का होईना सुरु ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी CPR सुरु ठेवणे गरजेचे आहे. 

CPR कोणीही करू शकतो. त्याला फारशा कौशल्याची आवश्यकता नसते. कोणीही जाणकार अर्थात CPR कसे द्यायचे हे माहित असलेला व्यक्ती छातीवर दाब व कृत्रिम श्वास देऊ शकतो. पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्या व्यक्तीची भूमिका महत्वपूर्ण ठरते. CPR केव्हा करावे ? याचे सोपे उत्तर आहे एखादी व्यक्ती बेशुद्ध आहे, तिची हृदयक्रिया व श्वसन क्रिया बंद आहे. अशा व्यक्तीला CPR करावे. जेव्हा परिस्थिती फारशी सुरक्षित न वाटल्यास किंवा माणूस प्रतिसाद देत असल्यास व शरीर थंड व कडक झाले असल्यास CPR करू नये. आपण CPR आहे त्याच जागी सुरक्षितता लक्षात घेऊन देण्यास सुरुवात करावी. जीवन संजीवनी क्रिया अर्थात CPR हि माणसाला जिवंत ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रियांची शृंखला आहे. आठ वर्षावरील स्त्री-पुरुष यांच्यासाठी आपण हि क्रिया करू शकतो. 


CPR सुरु करण्यापूर्वी तो माणूस मूर्च्छित (बेशुद्ध) आहे का जागा (Cautious) आहे याची खात्री करा. सदर व्यक्ती श्वास घेते आहे किंवा नाही हे जाणून घ्या व तिसरी गोष्ट नाडीची ठोके किंवा हृदयाची धडधड सुरु आहे का याची खात्री करून घ्या. मगच CPR चा निर्णय घ्यावा. पिडीत व्यक्ती निश्चल आहे वा प्रतिक्रिया देऊ शकते का ते पहा. त्यासाठी त्याला खांदा हलवून आवाज द्या. “काका डोळे उघडा”.  प्रतिक्रिया नसल्यास, श्वास नसल्यास, हृदयाची स्पंदनं चालू नसल्यास सी पी आर सुरू करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या. नाडी बघण्यासाठी, मानेजवळ श्वासनलिकेच्या बाजूला कॅरोटीड (carotid) या धमनीला (रक्तवाहिनीला) हात लावून नाडी बघायला हवी... मदतीसाठी आवाज द्या. संबंधित व्यक्तीला जवळच्या हॉस्पिटलला किंवा १०८ ला फोन करण्यास सांगा. जवळपास कोणी डॉक्टर असल्यास त्यांना बोलवा.  

जीवन संजीवनी क्रियेत ३ महत्वाच्या पायऱ्या आहेत. त्याला CAB म्हणतात. म्हणजे Circulation  (रक्ताभिसरण), Airway (श्वसनमार्ग) आणि Breathing (श्वासोच्छवास). रक्ताभिसरणासाठी छातीवर दाब द्यावा. यासाठी व्यक्ती जमिनीवर असावी किंवा एखाद्या कडक – सपाट पृष्ठभागावर असावी. रक्ताभिसरण अखंडीत सुरु राहण्यासाठी छातीवर दाब देणे आवश्यक आहे. छातीच्या (बरगडीच्या) सर्वात खालच्या हाडाच्या दोन बोटे वरती हा दान देणे आवश्यक आहे. हाताची दोन्ही बोटे एकात एक गुंफून, कोपर सरळ ठेवून दोन्ही खांदे दाब द्यावयाच्या व्यक्तीच्या छातीवर असावेत. साधारणपणे एका मिनिटात १००-१२० वेळा दाब दिला पाहिजे. प्रत्येक ३० दाबानंतर छोटा पॉझ घेऊन CPR सुरु ठेवणे. साधारणपणे २  मिनिटात १५० वेळा दाब दिला गेला पाहिजे. छातीवरील दाबाचा भाग ५ सेंटीमीटर दाबला गेला पाहिजे. दाब सोडल्यानंतर छाती पूर्ववत झाली पाहिजे. दाब देण्याची क्रिया व्यक्ती शुद्धीवर येई पर्यंत वा तसा प्रतिसाद देईपर्यंत सुरु ठेवणे अपेक्षित आहे अन्यथा अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता कमी असते. दाब देत असतांना तो मोजला पाहिजे. आपण काही वेळात आपण थकणार असल्याने आजूबाजूच्या कोणा व्यक्तीला CPR देण्यासाठी तयार करणे. संबंधित व्यक्तीचा कोणताही प्रतिसाद मिळाल्यास त्याला एका कुशीवर करावे.

श्वसनमार्ग मोकळा करणे - श्वसनमार्ग किंवा श्वासनलिकेमध्ये अडथळा निर्माण झाला तर पुरेसा श्वास घेता येत नाही.  बरेचदा व्यक्ती बेशुद्ध पडल्याने जीभ सैल होऊन मागे पडते व श्वसन मार्गाला अडथळा निर्माण करते. यासाठी डोक्याला कपाळावर हलकासा जोर द्या. मान सरळ करा. हनुवटी वर करा.  कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी पिडीत व्यक्तीच्या तोंडावर रुमाल टाकणे. नाक चिमटीत घेऊन बंद करणे. स्वत: नेहमीप्रमाणे श्वास घेणे. ओठ पिडीत व्यक्तीच्या तोंडावर ठेवून आपला उच्छवास त्याच्या छातीत भरणे. हे करत असताना छाती फुगते त्याकडे लक्ष द्यावे. 

साधारणपणे CPR केव्हा दिला जातो त्याची उदाहरणे -

१. एखाद्या व्यक्तीला जर विजेचा शॉक लागत असेल तर त्याचा श्वास अडकतो. तेव्हा CPR देऊन आपण त्या व्यक्तीला कदाचित वाचवू शकतो.

२. जेवताना कधी कधी अन्न अडकल्यानंतर CPR देता येतो.

३. गोळ्यांचा आकार मोठा असेल तर ते देखील अडकण्याची शक्यता असते. तेव्हा CPR देता येतो.

४. विषबाधा झाल्यानंतर ते विष बाहेर काढण्यासाठी CPR देतात.

५. पाण्यात जर कोणी बुडत असेल तर त्याला वर काढल्यानंतर छातीवर दाब देऊन पाणी बाहेर काढल्यानंतर तोंडातून श्वास देऊन CPR दिला जातो.

६. अपघातात जास्त रक्त वाहून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.

७. एखाद्याच्या डोक्याला मार लागून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.

८. चक्कर येऊन पडल्यास CPR देता येतो. 

यासह अनेक परिस्थतीत वरील तीनही लक्षणे आढळून आल्यास CPR देत येतो. 

रोटरी क्लब सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, के. डी. पाटील मल्टीस्पेशॅलिटीच्या डॉ. लीना पाटील, पार्ष क्लिनिकचे डॉ. कल्पेश गांधी व भूलतज्ज्ञ डॉ. धीरज चौधरी यांनी प्रत्यक्षिकाद्वारे संपूर्ण प्रक्रिया , तसेच वेगवेगळया परिस्थितीत घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच अनेकांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. एका खेळाडूला सलग ६ तास CPR देऊन त्याला जीवनदान देण्यात आले. तसेच काश्मीरमध्ये झालेल्या एका अपघातातील ४ व्यक्तींना CPR देऊन जीवदान देण्यात आळायचे अनुभव उपस्थित डॉक्टरांनी कथन केले. चला तर मग आपणही आपल्या परिसरातील डॉक्टरांकडून माहिती घेऊन जीवनरक्षक होऊ या व इतरांना त्यासाठी प्रेरित करू या ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Saturday 13 May 2023

रत्नांच्या खाणीचा निर्माता : 'रत्नाकर' !

शालेय जीवनातील एका शिक्षकाचं जाणं परिवारातील एका सदस्याच्या जाण्यासारखं भावनिक असतं याचा अनुभव रात्रभर घेतोय. पुस्तकी ज्ञानापेक्षाही विद्यार्थ्याला संवेदनशील माणूस म्हणून घडविणाऱ्या, धुळे शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या आमच्या रत्नाकर गोविंद रानडे अर्थात र. गो. रानडे सरांचे दुःखद निधन झाल्याची बातमी रात्री उशिराने कळाली. अन एक चित्रपट डोळ्यासमोरून गेला अर्थात त्याला जोड समाज माध्यमाची होती. आपल्या जीवनात मिळालेल्या आठ दशके आयुष्य लाभलेल्या सरांनी धुळे शहरात एक आगळावेगळा ठसा उमटवीत आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन दिला आणि कसं जगावं याचा कृतीरुप वस्तुपाठ आपल्या जीवनातून दिला. बा. भ. बोरकरांच्या 'असे देखणे होऊ या !' या कवितेतील देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे या उक्ती सारखेच सरांचे जीवन उजळून निघाले होते. याच कवितेतील देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती | वाळवंटातूनी स्वस्तिपद्मे रेखिती || असे त्यांचे जीवन होते. आपल्या शिक्षकी पेशात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांनी आपल्या नावाप्रमाणेच रत्नांच्या खाणीचा समुद्र निर्माण केला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 

आमची शाळा - न्यू सिटी हायस्कुल, धुळे

जुन १९७९ मध्ये धुळ्याच्या न्यू सिटी हायस्कुलमध्ये इ. ५ वीला प्रवेश घेतला. धुळे एज्युकेशन सोसायटी या ध्येयवेड्या संस्थेच्या शाळेत शिकायला मिळणं हे मागच्या जन्मीचे पुण्य असे आज म्हणता येईल.   सहा वर्षाच्या कालखंडात या शाळेने एका समृद्ध करणाऱ्या जीवनाची बीजे रोवली गेली. ५ वीला बी. एन. जोशी, ६ वीला एस. एस. मुसळे, ७ वीला ह. म. भंडारी, ८ वीला नं. ना. शहा, ९ वीला आर. एस. जहागीरदार आणि १० वीला शा. रा. नाईक या वर्गशिक्षकांच्या तालमीत त्यांना सहकार्य करणाऱ्या रत्नाकर रानडे, व्ही. वाय. दाबके, आर. एस. पाटील, ग. स. पाठक, सु. र. राव, सौ. पाठक-शुक्ल बाई, यु. आर. कुळकर्णी, एस. आर. धामणे आदी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना माणूस  म्हणून घडविण्याचे प्रामाणिक काम केले. या सर्वांचे नेतृत्व करणारे शाळेचे मुख्याध्यापक होते मुकुंद कृष्णाजी पाध्ये सर...

आमच्या शाळेचे वैभव - गुरुजनवर्ग


श्री. रानडे सरांच्या निधनाची बातमी कळली आणि मन भर्र्कन त्या सुवर्ण काळात गेले. सर्व कसे कालच घडले इतके ते आजही ताजे वाटते. जीवन घडविण्यात आई-वडील व शिक्षकांची भूमिका नक्कीच महत्वपूर्ण असते. संस्कार देणारी आई आणि शिस्त लावणारे वडील याप्रमाणेच शिक्षकांचेही होते. काही शिक्षक मातृहृदयी तर काही पितृहृदयी होते. आदरणीय रानडे सर तसे कोमल हृदयाचे... कलेचा उपासक असलेला माणूस संवेदनशील असतोच मात्र साधनेच्या बाबतीत तडजोड कुठेही चालत नाही. समूहगान स्पर्धेत शाळेचा सहभाग आणि त्यातील 'मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा...' हे महाराष्ट्र गीताची तयारी करुन घेणारे रानडे सर डोळ्यासमोरुन हालत नाही. गाण्यातील लय, सूर आणि ताल सांभाळत असतांना एका विद्यार्थ्यांची चूक त्यांच्या सहज लक्षात येत असे. शिस्त हा शाळेचाच स्वभाव असल्याने खेळ, अभ्यास, गाणं, नाटक सर्व ठिकाणी त्याला विशेष महत्व होते. 

विक्षिप्तपूरची चित्तरसेना नाटकातील कलाकार 


विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अशा शिक्षकांचे असणे किती महत्वाचे असते हे आजच्या शैक्षणिक जीवनाकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते. अशा या महत्वाच्या वर्षांतील सुवर्ण काळाची नेहमीच अलीकडच्या काळाशी स्वाभाविकपणे तुलना होते. मी ती करणार नाही पण रानडे सरांसारख्या गुरुजनांनी अनेक पिढ्या आपल्या कर्तव्य कठोरतेने घडविल्या असे नक्की म्हणता येईल. कधी शिक्षाही केली असेल मात्र तक्रार नाही कारण त्या काळातील शाळेचा विद्यार्थी आज जो काही आहे त्यामागे या सर्व गुरुजनांचा वाटा महत्वाचा आहे. शाळेच्या प्रत्येक घटकावर त्यांचे  नेहमीच नियंत्रण होते. शाळेतील विद्यार्थ्याला आपल्या पोटाच्या मुलांप्रमाणे वाढविणारी हि पिढी होती आणि म्हणूनच त्यांनी शिक्षा केली तरी पालकांची कधीही तक्रार नव्हती. आम्ही सर्व भाग्यवान आहोत, आम्ही न्यू सिटीचे विद्यार्थी आहोत, अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभिमान असणे हीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची पावती म्हटली पाहिजे.

आमची १९८५ ची बॅच

सेवानिवृत्ती नंतरही सर कार्यरत होते. संस्थेचे काही काळ सचिव म्हणून त्यांनी दायित्व सांभाळले. संस्कार भारतीसारख्या कलासाधकांच्या संस्थेचे ते प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते. नाट्य लेखन, दिग्दर्शन हे त्यांचे विशेष आवडीचे विषय होते. इ. ८ वी मध्ये असतांना श्री. रानडे सर, नित्सुरे सर व यु. आर. कुलकर्णी सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे नाटक बसविले. कोकणासारख्या दूरवर प्रदेशात बाल नाट्य स्पर्धेत शाळेचा सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक पटकविण्याची कामगिरी सरांनी केलेली आजही आठवते. गीता पठाण स्पर्धा, मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा यासारख्या उपक्रमातही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी ते प्रोत्साहन देत असत. वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन स्वतःचा वैयक्तिक वेळ देऊन सर्व शिक्षक मंडळी करीत असत त्यात श्री. रानडे सरांचा वाटा मोलाचा होता. विद्यार्थ्यांकडून मेहनत करुन घेत असतांना वेळ आणि पदरचे पैसे खर्च करतांना हे शिक्षक कधीही मागेपुढे पाहत नसत.

अलीकडे धुळ्याचा संपर्क कमी झाला असला तरी अधूनमधून सरांची भेट होत असे. एकदा तर सरांच्या घराजवळच भेट झालेली आठवते. शिष्य फाउंडेशनच्या माध्यमातून २०११ मध्ये झालेल्या स्नेहमेळाव्याप्रसंगी सर्व शिक्षकांची झालेली भेट आजही स्मरणात आहे. श्री. दाबके सरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमातही रानडे सरांची भेट झाली होती. अजिबात थकलेले वाटले नाही. तीच शरीर यष्टी, चेहऱ्यावरील तेज, जिवंतपणा बोलण्यातील सहज मिश्कीलता. सरांकडे पाहिल्यावर ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजींची आठवण येत असे. शिक्षकांमधील परस्पर संवाद - संबंध व विद्यार्थ्यांची त्याच्या प्रति असलेली निष्ठा कृतार्थतेचा आनंद देणारे होते. अशा संस्थेच्या व तेथील शिक्षक वृंदांच्या ऋणातून उतराई होणे केवळ अशक्य मात्र त्यांना जीवन जगण्याचे धडे आत्मसात करुन त्याप्रमाणे जगणे हीच त्या महानुभावांनी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे मला वाटते.

र. गो. रानडे सरांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभेलच व त्यांच्या परिवाराला त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो. ॐ शांती शांती शांती !!


Thursday 11 May 2023

"ती" आणि एका लग्नाची पुढची गोष्ट !

पुणे येथील सोहन वाचन कट्टाने मध्यंतरी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका वाचन कट्ट्याचे आयोजन केले होते. अर्थात महिलांच्या जीवनात आलेल्या "ती" चे महत्व वाचन कट्ट्यात अपेक्षित होते. आपल्या जीवनातील तिचे स्थान, तिचे महत्व सांगावयाचे वा त्याबद्दल वाचवायचे होते. जीवनावर प्रभाव पडणारी "ती" कोण हे ज्याने त्याने ठरवायचे होते. माझी पत्नी सौ. आदितीने या वाचन कट्ट्यात तिच्या आयुष्यातील "ती"चे वाचन केले. तिच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या "ती" बद्दल तिनेच लिहिले होते. अर्थात "ती" कोणी व्यक्ती नसून ती होती स्त्री जीवनातील "मासिक पाळी" ! वयाच्या चाळिशीनंतर "ती" हळूहळू त्यांच्या जीवनातून संपते, बाहेर पडते, जाते. मला हे समाजापर्यंत पोहोचवायचे होते मात्र त्यासाठी वेळ शोधात होतो. आज ते लिहिण्यामागचे कारण म्हणजे प्रशांत दामले यांचे एका लग्नाची पुढची गोष्ट ! हे नाटक. हे नाटकही "ती" वरच आधारित आहे त्याबद्दल पुढे लिहिले आहे. मात्र प्रथम सौ. आदितीने जे लिहिले/वाचले ते देत आहे. आपण ते वाचा, समजून घ्या... आपला अभिप्राय आपण सौ. आदितीस तिच्या ७५८८४०६१९५ या मोबाईलवर देऊ शकता.... 

सोहन वाचन कट्टा ( मंगळवार १४ - ३ -२०२३) विषय - माझ्या आयुष्यातील "ती"


माझी "ती" मैत्रिण माझ्या आयुष्यात अगदी अचानक आली आणि सायकल रेग्युलर सुरू झाली. तो काळ बदलाचा होता. आधीच्या पिढीतील सगळ्या बाजुला बसत असत, आम्हाला मात्र अपवादात्मक परिस्थितीत तो अनुभव आला. पण मोठ्या सगळ्याच बाजुला बसत असल्याने फार ऑकवर्ड झाले नाही. दर महिन्याला मग तारीख बघायची, तेव्हा काही सणवार असले की फार वैताग यायचा. आतासारखे या विषयावर कोणीच मोकळेपणाने बोलत नसत. घरातील भावाशी सुध्दा नाही. पण सासरी  मोकळे वातावरण होते. दोन्ही मुलांच्या वेळेस ९ - ९ महिने तिने ब्रेकअप केलं. पण आता आतापर्यंत "ती"ने खुप छान साथ दिली. सुरूवातीला "ती"च्याशी जुळवून घेण्याचा त्रास सोडला तर नंतरचे "ती"च्याबरोबरचे संबंध खुपच सलोख्याचे होते. दर महिन्याला रेग्युलर असल्याने कोणताही कार्यक्रम, समारंभ, ट्रीप सगळे "ती"ला विचारात घेऊनच करावे/आखावे लागत, इतकं "ती"च महत्त्व अनन्यसाधारण झालं. पण एकदाही "ती"ला मागेपुढे करण्यासाठी औषधं घेतली नाही, इतकी रेग्युलर होती "ती". त्यामुळे "ती"च्या विचाराने सगळे करता आले. "ती"नेपण इमानेइतबारे माझे हार्मोन्स, कॅल्शियम, आयर्न, त्वचा काय न काय व्यवस्थित ठेवले. पण संसारीक गडबडीत माझेच "ती"च्याकडे जरा दुर्लक्ष झाले. मग मला "ती"चा थोडा त्रास होऊ लागला. "ती" तिचं काम व्यवस्थित करत होती, पण माझ्याकडूनच "ती" आली असता आराम झाला नाही. मग "ती" आली की कंपलसरी आराम करावाच लागायचा. काय चुकलं याचा विचार करता त्या चार दिवसांत आराम न केल्याचा परिणाम असाच निष्कर्ष येतो. आता आयुष्यातील असा टप्प्या होता की "ती" आली तशी अचानक निघून गेली आणी मला एकदम रिकामं रिकामं वाटायला लागलं.

वय वर्ष १५ ते ४५ या माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या काळात "ती" माझ्या आयुष्यात होती. याच काळात तारुण्य, करिअर, लग्न, मुलं, संसार असतो. आयुष्यातील अजुन अनेक महत्त्वाच्या सुखदुःखाच्या गोष्टी याच काळात घडतात. खुपच धावपळ व धकाधकीचा हा काळ असतो. पण माझ्या अनुभवावरून मला असे वाटते की प्रत्येकीने त्या चार दिवसात जसा जमेल तसा आराम नक्कीच केला पाहिजे. कारण आधीच्या पिढीतील स्रियांना सक्तीची विश्रांती मिळत होती. आपले पुर्वज खरोखरच खुप हुशार होते. त्यांना शास्र, आरोग्य या सगळ्यांचा सखोल अभ्यास होता असे मला वाटते. आधीच्या पिढीच्या तुलनेत आम्ही या मैत्रिणीचे महत्त्व कमी केले असे वाटतेय. त्यामुळे आम्हाला व आमच्या पुढील पिढीला "ती"चा थोडा त्रास होतोय. पण खरे तर "ती"च्याभोवतीच स्रिचे आरोग्य बांधले गेलंय. तब्येत चांगली असेल तर "ती"चे येणे नियमीत होते. आपले मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम असेल तर "ती"चे येणे कधीच वेदनादायी होत नाही. आयुर्वेदात खुप बारकाईने हिचा विचार व अभ्यास केलाय, तो पण आपण विचारात घेतला पाहिजे. पुर्वीच्या काळात आरोग्यासह इतर सर्वच गोष्टींसाठी देवधर्माच्या भीतीचा आधार घेतला जायचा पण आताच्या काळात आपल्या मुलांना सर्व सायंटिफिक गोष्टींचा पुरावा द्यावा लागतो. आपण पण सगळ्या गोष्टींमागचे शास्र स्वतः समजुन घेऊन त्यांना सांगितले पाहिजे असे मला वाटते. तरच सगळ्याचा प्रवास सुखकर व आनंददायी होईल. "ती" सगळ्याच सखींची सखी आहे फक्त तिला थोडं अटेन्शन देण्याची गरज आहे. आपण सर्वजणी ते करूया. खरंच "ती" माझ्या आयुष्यात नसती तर खुप गोष्टी मला मिळाल्या नसत्या असे मला वाटते. त्यामुळे "ती" च्या बद्दल खुप खुप कृतज्ञता व्यक्त करते.

प्रशांत दामले, कविता लाड आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट सादरीकरणाद्वारे साकारलेले नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट पाहण्याचा योग आला. वैवाहिक जीवनातील पत्नीच्या चाळीशीचा (मेनोपॉज) काळ, शरीरात होणारे हार्मोन बदल, त्यामुळे होणारी चिडचिड, संबंधात येणारी नीरसता या विषयाला अतिशय समर्थपणे या नाटकाने हाताळले आहे. सर्वांनी नाटक प्रवाही ठेवले आहे. संपूर्ण नाटक हलके - फुलके असले तरी त्यात हाताळलेला विषय अतिशय गंभीर आहे आणि त्याची गंभीरता पोहोचविण्यात नाटक यशस्वी झाले आहे.

अलीकडच्या काळात या विषयावर मोकळेपणाने बोललं जातंय हि अतिशय सुखावह गोष्ट आहे. त्यामुळे या विषयाबाबतची जागरुकता वाढत आहे. पती-पत्नी नात्यात निर्माण होणारे ताण-तणाव यामुळे सुटण्यास नक्कीच मदत होते. नाटकाच्या सुरुवातीला आयुष्यातील सर्वच प्रश्नांना गुगल उत्तर देऊ शकत नाही आणि त्यांच्या आयुष्यात शोधलेले उत्तर प्रत्येकाच्याच आयुष्यात कामी येईल असे नाही. त्यासंबंधातील धोका मोकळेपणाने सांगितला आहे. वैवाहिक जीवनातील आनंद हिरावलेल्या नवऱ्याला त्या आनंदाकडे नेण्यासाठी बायको मुलाच्या सांगण्यावरुन मानसशास्त्रावरील गिल्ट थिअरीवर आधारित नाटक घडवून आणते आणि तिला त्यात अपेक्षित परिणाम मिळतो. या रचित नाटकात कार्यालयातील एका मुलीला आपल्या बॉसची गर्लफ्रेंड बनविले जाते. त्यातील वेगवेगळे टप्पे गाठत गोष्ट 'डेट' पर्यंत जाते. मात्र सामान्य कुटुंबातील नवऱ्याला आपण काहीतरी चूक करीत आहोत असे नेहमी वाटत राहते. त्या मुलीशी केलेल्या नकली प्रेमातून त्याला आपल्या असली प्रेमाची आठवण होते. मेमरी फुल झाली आणि त्यात आणखी काही नवीन भर घालायची असल्यास जुन्या आठवणी डिलीट मारणारा (विसरणारा) हा नवरा मात्र आपल्या आयुष्यातील त्या नाजूक क्षणांना विसरू शकत नाही आणि त्याला आपली चूक उमगते आणि आनंद पुन्हा मिळतो अशी साधारण कथा आहे. 

नाही म्हणायला नवऱ्यावर बायकोने दाखविलेल्या अविश्वासाने त्याचा अहंकार दुखावतो मात्र त्यामागची भूमिका समजून घेतल्यावर ते नाते अधिक दृढ झालेले पाहावयास मिळते. नाटक प्रवाही असल्याने पुढे काय घडते हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते. अंतिम चरणात मात्र धक्क्यावर धक्के बसत राहतात जरी बायको आपल्याला पडद्यामागचे भूमिका सांगत असली तरीही... नेहमीच आपल्या नाटकातून मानवी आयुष्यातील विषय हाताळत त्यावर काही तरी संदेश देण्याचा प्रयत्न प्रशांत दामलेंच्या नाटकातून अनुभवास येतो. एक संवेदनशील माणसाचे ते प्रतीक आहे. मराठी नाट्य सृष्टीत १२६१६ वा नाट्यप्रयोग व एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा ५९४ वा प्रयोग प्रशांत दामले यांनी जळगावच्या संभाजीराजे नाट्यगृहात साकारला. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे सादरीकरण तेव्हढेच सहज आणि त्यामुळे परिणामकारक वाटते. जळगावात नव्याने सुरु करण्यात आलेला एसडी - इव्हेन्ट चा प्रयोग यशस्वी होतोय कारण नाटक हाऊसफुल झाले. मित्रवर्य दिनेश थोरात व टीमचे मनापासून अभिनंदन ! जळगावला सांस्कृतिक वातावरणाचे पुनर्वैभव देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा !  

गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४ 

Sunday 30 April 2023

सामाजिक व धार्मिक एकतेचे प्रतीक असलेला अमळनेरचा रथोत्सव

प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेली अमळनेर नगरी श्री संत सखाराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन  झाली आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुद्ध एकादशीला अर्थात मोहिनी एकादशीला श्री संत सखाराम महाराजांच्या उत्सवात अमळनेरचा रथोत्सव साजरा केला जातो. श्री संत सखाराम महाराज यांच्या परंपरेतील ११ वे विद्यमान सत्पुरुष संत श्री प्रसाद महाराज यांच्या नेतृत्वाखाली संस्थानची हि परंपरा सुरु आहे. दोनशेहून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा असलेला हा रथोत्सव सामाजिक समरसतेचा व धार्मिक एकतेचा संदेश देतो. सामाजिक सद्भाव व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेला हा रथोत्सव म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. उत्सवाच्या काळात अमळनेरात यात्रोत्सव होत असतो. खान्देशातील हि शेवटची यात्रा असते त्यामुळे तिला विशेष असे महत्व आहे. संपूर्ण उत्सवाच्या कालावधीत सुमारे ३ लाख भाविक सहभागी होतात.  

संत श्री सखाराम महाराज संस्थानचे विद्यमान गादीपती सद्गुरु ह.भ.प.संत श्री प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३६ वर्षे हा उत्सव साजरा केला जातो. यात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा व त्यासाठी घालून देण्यात आलेले नित्यनेम पाळले जातात. वैशाख उत्सवात येणाऱ्या प्रतिष्ठित मंडळींची श्री गुरु महाराज अगत्याने व आस्थेने विचारपूस करतात. संस्थानच्या उत्सवात येथील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. श्री गुरु महाराजांच्या शिष्यगणांसह खान्देशातील अनेक जातिधर्मचे लोक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होऊन श्री गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊन पारमार्थिक आनंद घेतात. 

वैशाख शु. तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला या उत्सवाला सुरुवात होते. या दिवशी बोरी नदीच्या वाळवंटात श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर स्तंभारोहण केले जाते व यात्रेला सुरुवात होते. वैशाख शु ११ या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. सायंकाळी ७ वाजता वाडी मंदिरापासून रथोत्सवास सुरुवात होते. दोन लाकडी घोडे व सारथ्य करणारा अर्जुन यांची लाकडी प्रतिमा असेलेले रथ उत्तम प्रकारे सजविला जातो. भरजरी पोशाखात व सुवर्ण अलंकार घातलेली, हाती चांदीचा धनुष्य धारण केलेली श्री. लालजींची मूर्ती रथात ठेवतात. पुजारी दाम्पत्याकडून रथाची विधिवत पूजा होते. रथाच्या पुढे मान्यवर मंडळी, बेलापूरकर महाराजांची दिंडी तसेच श्री गुरु महाराज व त्यांची दिंडी आल्याशिवाय रथ हालत नाही. रथास ओटी लावण्याचा मान आहे. सर्व धर्मांना व जातींना एकत्र करुन हा श्री पांडुरंगाचा रथोत्सव टाळ मृदंगाच्या गजरात, सनई चौघडे यांच्या वाद्यात मार्गक्रमण करतो. प्रदक्षिणा रस्त्यावर भाविक भक्त आरत्या घेऊन बाहेर थांबतात. रथाच्या पाठीमागे मेणा असतो. त्यामध्ये श्री संत सखाराम महाराज यांच्या पादुका असतात व त्यामागे संत श्री प्रसाद महाराज पायी असतात. हि मिरवणूक मारुती मंदिराच्यापुढे  पुलावर थांबते. त्या ठिकाणी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. नंतर रथ पैलाड मार्गे वाळवंटातून सकाळच्या वेळी पुन्हा वाडी चौकात पोहोचतो. तेथे पांडुरंची आरती होऊन रथोत्सवाची सांगता होते. 

महाराष्ट्रात थोर संत परंपरेचा पाया रचणाऱ्या संत सखाराम महाराजांचा रथोत्सव म्हणजे सामाजिक समरसता व सद्भावाचे प्रतीक आहे. रथोत्सवात सर्व जाती बांधवांचा समावेश असतो. गेल्या २००  वर्षांपासून अखंडपणे साजऱ्या होणाऱ्या या रथोत्सवात एकतेचे दर्शन घडत असते. गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश रथोत्सवातून दिला जातो.  या रथोत्सवाच्या निमित्ताने सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात. वर्षानुवर्षे परंपरेप्रमाणे प्रत्येक समाजातील व्यक्ती आपापली जबाबदारी पार पाडतो.  त्यामुळेचं हा सोहोळा सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवतो. हा सोहळा पार पाडण्यासाठी शहरातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अक्षय्यतृतीयेला स्तंभ व ध्वजारोहण आणि सभामंडप उभारण्यासाठी लाकडी खांबाची आवश्यकता असते. ते वाडीतून बोरी नदीच्या वाळवंटातील श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर आणून टाकण्याची जबाबदारी महाजन-माळी समाजावर आहे. 

हे साहित्य आणल्यावर मांडव उभारण्याचे काम पाटील समाजाकडे आहे. मांडव उभारल्यावर त्यावर गोणपाट टाकण्याचे काम वाणी समाजाकडे, तर कनात लावण्याचे काम शिंपी समाजाकडे आहे.  रथ सजावटीचे काम धनगर बांधव, तसेच भालदार-चोपदार करीत असतात. रथावर देव ठेवण्याची व देव पूजेची जबाबदारी देव घराण्याकडे आहे. रथावर दक्षिणा घेण्याची जबाबदारी ब्राह्मण बंगाली समाजाकडे आहे, रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लीम समाजाला दिला जातो. त्यानंतर शहरातून मार्गस्थ होत असलेल्या रथाला ठिकठिकाणी दिशा देण्याचे काम धनगर समाज बांधव करीत असतात. वाटेतच रथाला आक लागला, रस्त्यात रथाचे चाक अडकले तर ते घणाद्वारे यशस्वीपणे काढण्याची जबाबदारी बेलदार समाज पार पाडतो. रथोत्सवाचा मार्ग मशालीद्वारे प्रकाशमान करण्याची जबाबदारी न्हावी बांधवांची असते. लहान रथाची सेवा भोई समाजाकडे आहे. अशा रीतीने सर्व जातीधर्माचा सहभाग असलेला हा सोहळा मोठय़ा हर्षोल्हासात पार पाडला जातो. बारा बलुतेदारांच्या सहभागामुळे सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकोपा वृद्धिंगत होत असतो. हा उत्सव सर्वसमावेशक असल्याने दरवर्षी मोठय़ा उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 

रथोत्सवातील रथ अतिशय उंच असून, तो मलबार सागाच्या लाकडापासून बनविलेला आहे. संस्थानचे दुसरे गादी पुरुष संत श्री गोविंद महाराज यांनी १८१९ मध्ये रथोत्सवाची परंपरा सुरू केली. त्यावेळी पहिला रथ तयार करण्यात आला होता. त्यानंतर वाडी संस्थानचे गादी पुरुष संत श्री बाळकृष्ण महाराज यांनी नवीन रथ तयार केला. हा रथ मलबार सागाच्या लाकडापासून तयार केलेला आहे. दोन चाकांच्या मधील आख अंजनाच्या लाकडापासून बनविलेले आहे. रथावर श्री गणेश, मारुती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. रथ निघण्याच्या काही दिवस अगोदरच रथाची दुरुस्ती केली जाते. हे काम दरवर्षी होत असते.  या रथाला पूर्वीपासूनच नाड्याने ओढण्याची परंपरा आहे.  गेल्या दोनशे वर्षात रथाच्या  मार्गात एकदाही बदल झालेला नाही. रस्त्यावर दुतर्फा भाविकांना श्रीफळ, केळी, खडीसाखरेचा प्रसाद देण्यात येतो. रस्त्यावर ठिकठिकाणी गुरु श्री प्रसाद महाराजांवर व रथावर पुष्पवृष्टी करण्यात येते. ठिकठिकाणी आरत्याही होतात. वाडी संस्थानातून निघणारा रथ सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशीपूल पैलाडमार्गे वाडीत येतो. पूर्वी पहाटे अडीच-तीन वाजताच रथ वाडीत यायचा. मात्र आता आरत्या वाढल्याने, रथ संस्थानात पोहचण्यास सकाळ उजाडत असते.

जय हरी ! रामकृष्ण हरि !!