Sunday 30 April 2023

सामाजिक व धार्मिक एकतेचे प्रतीक असलेला अमळनेरचा रथोत्सव

प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेली अमळनेर नगरी श्री संत सखाराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन  झाली आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुद्ध एकादशीला अर्थात मोहिनी एकादशीला श्री संत सखाराम महाराजांच्या उत्सवात अमळनेरचा रथोत्सव साजरा केला जातो. श्री संत सखाराम महाराज यांच्या परंपरेतील ११ वे विद्यमान सत्पुरुष संत श्री प्रसाद महाराज यांच्या नेतृत्वाखाली संस्थानची हि परंपरा सुरु आहे. दोनशेहून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा असलेला हा रथोत्सव सामाजिक समरसतेचा व धार्मिक एकतेचा संदेश देतो. सामाजिक सद्भाव व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेला हा रथोत्सव म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. उत्सवाच्या काळात अमळनेरात यात्रोत्सव होत असतो. खान्देशातील हि शेवटची यात्रा असते त्यामुळे तिला विशेष असे महत्व आहे. संपूर्ण उत्सवाच्या कालावधीत सुमारे ३ लाख भाविक सहभागी होतात.  

संत श्री सखाराम महाराज संस्थानचे विद्यमान गादीपती सद्गुरु ह.भ.प.संत श्री प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३६ वर्षे हा उत्सव साजरा केला जातो. यात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा व त्यासाठी घालून देण्यात आलेले नित्यनेम पाळले जातात. वैशाख उत्सवात येणाऱ्या प्रतिष्ठित मंडळींची श्री गुरु महाराज अगत्याने व आस्थेने विचारपूस करतात. संस्थानच्या उत्सवात येथील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. श्री गुरु महाराजांच्या शिष्यगणांसह खान्देशातील अनेक जातिधर्मचे लोक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होऊन श्री गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊन पारमार्थिक आनंद घेतात. 

वैशाख शु. तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला या उत्सवाला सुरुवात होते. या दिवशी बोरी नदीच्या वाळवंटात श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर स्तंभारोहण केले जाते व यात्रेला सुरुवात होते. वैशाख शु ११ या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. सायंकाळी ७ वाजता वाडी मंदिरापासून रथोत्सवास सुरुवात होते. दोन लाकडी घोडे व सारथ्य करणारा अर्जुन यांची लाकडी प्रतिमा असेलेले रथ उत्तम प्रकारे सजविला जातो. भरजरी पोशाखात व सुवर्ण अलंकार घातलेली, हाती चांदीचा धनुष्य धारण केलेली श्री. लालजींची मूर्ती रथात ठेवतात. पुजारी दाम्पत्याकडून रथाची विधिवत पूजा होते. रथाच्या पुढे मान्यवर मंडळी, बेलापूरकर महाराजांची दिंडी तसेच श्री गुरु महाराज व त्यांची दिंडी आल्याशिवाय रथ हालत नाही. रथास ओटी लावण्याचा मान आहे. सर्व धर्मांना व जातींना एकत्र करुन हा श्री पांडुरंगाचा रथोत्सव टाळ मृदंगाच्या गजरात, सनई चौघडे यांच्या वाद्यात मार्गक्रमण करतो. प्रदक्षिणा रस्त्यावर भाविक भक्त आरत्या घेऊन बाहेर थांबतात. रथाच्या पाठीमागे मेणा असतो. त्यामध्ये श्री संत सखाराम महाराज यांच्या पादुका असतात व त्यामागे संत श्री प्रसाद महाराज पायी असतात. हि मिरवणूक मारुती मंदिराच्यापुढे  पुलावर थांबते. त्या ठिकाणी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. नंतर रथ पैलाड मार्गे वाळवंटातून सकाळच्या वेळी पुन्हा वाडी चौकात पोहोचतो. तेथे पांडुरंची आरती होऊन रथोत्सवाची सांगता होते. 

महाराष्ट्रात थोर संत परंपरेचा पाया रचणाऱ्या संत सखाराम महाराजांचा रथोत्सव म्हणजे सामाजिक समरसता व सद्भावाचे प्रतीक आहे. रथोत्सवात सर्व जाती बांधवांचा समावेश असतो. गेल्या २००  वर्षांपासून अखंडपणे साजऱ्या होणाऱ्या या रथोत्सवात एकतेचे दर्शन घडत असते. गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश रथोत्सवातून दिला जातो.  या रथोत्सवाच्या निमित्ताने सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात. वर्षानुवर्षे परंपरेप्रमाणे प्रत्येक समाजातील व्यक्ती आपापली जबाबदारी पार पाडतो.  त्यामुळेचं हा सोहोळा सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवतो. हा सोहळा पार पाडण्यासाठी शहरातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अक्षय्यतृतीयेला स्तंभ व ध्वजारोहण आणि सभामंडप उभारण्यासाठी लाकडी खांबाची आवश्यकता असते. ते वाडीतून बोरी नदीच्या वाळवंटातील श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर आणून टाकण्याची जबाबदारी महाजन-माळी समाजावर आहे. 

हे साहित्य आणल्यावर मांडव उभारण्याचे काम पाटील समाजाकडे आहे. मांडव उभारल्यावर त्यावर गोणपाट टाकण्याचे काम वाणी समाजाकडे, तर कनात लावण्याचे काम शिंपी समाजाकडे आहे.  रथ सजावटीचे काम धनगर बांधव, तसेच भालदार-चोपदार करीत असतात. रथावर देव ठेवण्याची व देव पूजेची जबाबदारी देव घराण्याकडे आहे. रथावर दक्षिणा घेण्याची जबाबदारी ब्राह्मण बंगाली समाजाकडे आहे, रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लीम समाजाला दिला जातो. त्यानंतर शहरातून मार्गस्थ होत असलेल्या रथाला ठिकठिकाणी दिशा देण्याचे काम धनगर समाज बांधव करीत असतात. वाटेतच रथाला आक लागला, रस्त्यात रथाचे चाक अडकले तर ते घणाद्वारे यशस्वीपणे काढण्याची जबाबदारी बेलदार समाज पार पाडतो. रथोत्सवाचा मार्ग मशालीद्वारे प्रकाशमान करण्याची जबाबदारी न्हावी बांधवांची असते. लहान रथाची सेवा भोई समाजाकडे आहे. अशा रीतीने सर्व जातीधर्माचा सहभाग असलेला हा सोहळा मोठय़ा हर्षोल्हासात पार पाडला जातो. बारा बलुतेदारांच्या सहभागामुळे सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकोपा वृद्धिंगत होत असतो. हा उत्सव सर्वसमावेशक असल्याने दरवर्षी मोठय़ा उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 

रथोत्सवातील रथ अतिशय उंच असून, तो मलबार सागाच्या लाकडापासून बनविलेला आहे. संस्थानचे दुसरे गादी पुरुष संत श्री गोविंद महाराज यांनी १८१९ मध्ये रथोत्सवाची परंपरा सुरू केली. त्यावेळी पहिला रथ तयार करण्यात आला होता. त्यानंतर वाडी संस्थानचे गादी पुरुष संत श्री बाळकृष्ण महाराज यांनी नवीन रथ तयार केला. हा रथ मलबार सागाच्या लाकडापासून तयार केलेला आहे. दोन चाकांच्या मधील आख अंजनाच्या लाकडापासून बनविलेले आहे. रथावर श्री गणेश, मारुती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. रथ निघण्याच्या काही दिवस अगोदरच रथाची दुरुस्ती केली जाते. हे काम दरवर्षी होत असते.  या रथाला पूर्वीपासूनच नाड्याने ओढण्याची परंपरा आहे.  गेल्या दोनशे वर्षात रथाच्या  मार्गात एकदाही बदल झालेला नाही. रस्त्यावर दुतर्फा भाविकांना श्रीफळ, केळी, खडीसाखरेचा प्रसाद देण्यात येतो. रस्त्यावर ठिकठिकाणी गुरु श्री प्रसाद महाराजांवर व रथावर पुष्पवृष्टी करण्यात येते. ठिकठिकाणी आरत्याही होतात. वाडी संस्थानातून निघणारा रथ सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशीपूल पैलाडमार्गे वाडीत येतो. पूर्वी पहाटे अडीच-तीन वाजताच रथ वाडीत यायचा. मात्र आता आरत्या वाढल्याने, रथ संस्थानात पोहचण्यास सकाळ उजाडत असते.

जय हरी ! रामकृष्ण हरि !!

No comments:

Post a Comment