Tuesday 28 December 2021

माणूस व्हायचंय मला !

 माणूस व्हायचंय मला ! 

भडगाव येथील केशवसुत ज्ञानप्रबोधिनीच्यावतीने रविवार दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी केशवसुत व्याख्यानमालेंतर्गत "माणूस व्हायचंय मला !" या विषयावर व्याख्यान देण्याची संधी मिळाली. अनेकांनी या व्याख्यानाच्या रेकॉर्डिंगबाबत विचारणा केली. मात्र रेकॉर्डिंग केलेले नसल्याने व्याख्यानाच्या नोटसच्या रूपाने केलेले लिखाण येथे देत आहे. 

कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुत. आधुनिक मराठी काव्याचे जनक यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! भडगावच्या पवित्र भूमीत अध्यापनाची चार वर्षे केशवसुत यांनी कार्य केले. त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना जपत गेली २५ वर्षे ज्यांनी त्यांच्या नावाने हि व्याख्यानमाला अखंडपणे सुरु ठेवली त्या केशवसुत ज्ञानप्रबोधिनीला व त्यांच्या समस्त कार्यकारिणीला व भडगावकरांनाही मनापासून अभिवादन ! 

यावर्षीच्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प ज्यांच्या स्मरणार्थ होत आहे त्या मातोश्री स्व. साधनाताई प्रतापराव पाटील यांनाही अभिवादन ! ताईसाहेब सौ. पूनम प्रशांत पाटील यांचे अभिनंदन ! कविवर्य ना. धो. महानोरदादांची यानिमित्ताने विशेष आठवण कारण त्यांच्या सूचनेनुसार हि व्याख्यानमाला सुरु आहे. 

मित्रहो आजच्या व्याख्यानाचा विषय आहे "माणूस व्हायचंय मला !" खरं तर आपण सर्वच इतकी चांगली माणसे आहोत मग असा विषय का ? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर आपण सर्व प्रवासी आहोत... चांगला माणूस बनण्याचा आपला सर्वांचा हा प्रवास अखंडपणे सुरु आहे आणि सुरु राहणार आहे अंतिम श्वासापर्यंत . अधिक चांगला, अधिक चांगला, संवेदनशील माणूस बनण्याचा हा प्रवास. त्यासाठी आपली सर्वांची खटपट अव्याहतपणे सुरु असते. जशी तुमची तशी माझीही... त्यामुळे आज मी जो विषय आपल्यासमोर मांडणार आहे ते एक प्रकारचे स्वगत आहे. माझेच... माझ्याशी ! 

विषयाची तयारी करीत असतांना वारंवार एक कविता समोर येत होती. खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता 

मानूस मानूस मतलबी रे मानसा,

तुले फार हाव 

तुझी हाकाकेल आशा 

मानसा मानसा,.. 

शेवटी त्या म्हणतात 


कधीं व्हशीन मानूस 

लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस ! त्याचबरोबर दलाई लामा यांचीही अशीच एक कविता आठवते 



आपल्या काळात इमारतींची उंची वाढली पण 

माणुसकीची कमी झाली..का ?

रस्ते रुंद झाले; पण दृष्टी अरुंद झाली.. का ?

खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली

घरं मोठी पण कुटुंबं छोटी....

सुखसोयी पुष्कळ, पण वेळ दुर्मिळ झाला.

पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग

माहितीचे डोंगर जमले, पण नेमकेपणाचे झरे आटले.

तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या

औषधं भरपूर, पण आरोग्य कमी झालं.

मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी

आपण बोलतो फार....प्रेम क्वचित करतो....

आणि तिरस्कार सहज करतो....

राहणीमान उंचावल; पण जगणं दळभद्री झालं.

आपल्या जगण्यात वर्षाची भर पडली; पण आपल्या वर्षामध्ये जगण्याची नाही

आपण भले चंद्रावर गेलो-आलो; पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणे काही होत नाही.

बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत, पण आतल्या हरण्याचं काय

हवा शुध्द करण्यासाठी आटापिटा; पण आत्माच्या गुदमरण्यांच काय?

आपली आवक वाढली; पण नीयत कमी झाली

संख्या वाढली-गुणवत्ता घसरली.

हा काळ उंच माणसांचा; पण खुज्या व्यक्तीमत्वांचा

उदंड फायद्यांचा पण उथळ नात्यांचा.

जागतिक शांतीच्या गप्पांचा पण घरातल्या युध्दांचा

मोकळा वेळ हाताशी पण त्यातली गंमत गलेली.

विविध खाद्यप्रकार पण त्यात सत्व काही नाही

दोन मिळवती माणसं पण त्यांचे घटस्फोट वाढलेले.

घरं नटली पण घरकुल दुभंगली

दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेल पण कोठीची खोली रिकामीच.

या दोनही कवितांनी माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आणि त्यासाठीच मी ठरवलंय मला माणूस व्हायचंय ! गेली पावणे दोन वर्षे आपण कोरोना महामारीच्या आव्हानाला सामोरे जात आहोत. या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे 'करेल कोण आणि भरेल कोण' आवश्यक काळजी न घेणाऱ्या एखाद्या तरुणामुळे व्याधिग्रस्त ज्येष्ठांना संसर्ग झाला तर त्याला जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. मित्रानो सद्यस्थितीत आपण अनेक गोष्टी करीत आहोत आणि भविष्यात त्याचा त्रास येणाऱ्या पिढयांना होणार आहे आणि त्यासाठीच आपण माणूस होण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता भासते. काही उदाहरणे पाहू या ! 

- पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढत आहे आणि २०५० पर्यंत माणसाच्या अस्तित्वालाच आव्हान निर्माण होण्याचा धोका आहे. 

- काही दिवसांपूर्वी दक्षिणेतील एका गावात काही लोकांनी एका गरोदर हत्तीणीला फटाके असलेले अननस खायला दिले. दुर्दैवाने तिने तिचे बाळ तर गमावलेच पण तीन दिवसांनी स्वतःचाही जीव गमावला.

- मागील ८-१५ दिवसात आपल्या बहिणीचा प्रेमविवाह मान्य नसलेल्या भावाने आपल्या बहिणीचे शीर धडापासून वेगळे केले आणि मुंडक्यासोबत सेल्फी काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. 

- टीईटी परीक्षेचा घोटाळा  आणि त्यातील सहभागी आरोपी सध्या आपण त्यांच्याबद्दल ऐकतो आहोत. 

- शेतीमध्ये आवश्यक असलेल्या पाण्यासाठी ७०० फूट बोअर केले जात आहेत. 

- परवा आमच्या गल्लीत घराच्या भिंतीवरील धूळ घालविण्यासाठी भिंती धुणाऱ्या ताईंना म्हटले 'अहो, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि आपण चक्क भिंती धूत आहात ?' त्यांचे उत्तर होते 'आम्ही नगरपालिकेचे नाही तर आमच्या बोअरचे पाणी वापरत आहोत, तुम्हाला काय अडचण आहे ?'

आपण सजगपणे डोळे उघडे ठेऊन आपल्या आजूबाजूला पहिले तर अशा कितीतरी गोष्टी, घटना आपल्याला अंतर्मुख करतील व तिथेच माणूस होण्याची प्रेरणा आहे. सध्या गांधी रिसर्च फाउंडेशनमध्ये कार्यरत आहे. माझ्या ५२ वर्षाच्या कालखंडात जेव्हढे गांधी बद्दल वाचले होते त्याच्या अनेक पॅट मागील अडीच महिन्यात वाचले. त्यांनी सांगितलेल्या एकादश व्रताच्या अक्षरश: प्रेमात पडलो. मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या व्रतांचा अंगीकार करणं म्हणजे माणूस होण्याकडे वाटचाल सुरु करणे असे मला वाटते. सध्याच्या भौतिकतावादी जगात नीतिमूल्यांचा झपाट्याने होणार ऱ्हास आपणास काय सांगतो. आपण या पृथ्वीवर उपरे आहोत, पाहुणे आहोत हे आपणास कधी समजेल ? आपण पाहुण्यासारखेच राहिले पाहिजे. संवेदनशील माणसासारखीच आपली वागणूक असली पाहिजे. 

मानवाशी संबंधित प्रकृती, विकृती व संस्कृतीशी आपण सुपरिचित आहोत. 'अति तिथे माती' हे पण आपण


लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आपले पालक, कुटुंबीय, समाज, देश आपल्याला समृद्ध अशा जीवनाचा संस्कार देतात. ज्या महाराष्ट्रात आपण राहतो. ती संतांची भूमी आहे. सर्व धर्मांचा मूळ पाया असलेली माणुसकी आणि भूतदयेचा अंगीकार करून ते समाजात रुजविण्याचे अखंड प्रयत्न त्यांनी केले. "ज्ञानेश्वर माऊलींपासून ते निळोबारायांपर्यंत" या भूमीत अठरापगड जातीची मांदियाळी उदयास आली. या सर्व संतांनी सत्य, अहिंसा, संत, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव आणि विश्वबंधुत्व या नीतिमूल्यांना विठ्ठल भक्तीची जोड देत माणसाला माणूस बनविण्याचं, समाज घडविण्याचंअमूल्य कार्य त्यांनी केले. जीवनातील संघर्ष, समाज परिवर्तनास लावलेला हातभार, प्रस्थापित चौकटीला केलेले आव्हान... हे करीत असतांना समाज व्यवस्थेची घडी जातीय वा धार्मिक विद्वेषाने विस्कळीत होऊ नये यासाठीही संतांनी केलेले प्रयत्न समाजासमोर आहेत. अलीकडच्या काळात आपण त्यापासून दूर जात आहोत का ? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. त्यासाठीच आपण माणूस होण्याची आवश्यकता आहे. 

संतांबरोबरच आदर्श जीवनपद्धती ठरवून जगणारे अनेक आदर्श आपल्यासमोर आहेत. जे आपणास माणूस म्हणून कसं जगता येतं याचा वस्तुपाठ आपल्या जीवनातून देतात. हि आदर्श मंडळी तुमच्या माझ्यासारखी हाडामासाचीच माणसे आहेत वा होती. ज्यांची जीवने आजही आम्हाला कसं जगावं हे सांगतात. उणेपुरे चार दशकांचे आयुष्य लाभलेले कवी केशवसुत असो वा स्वामी विवेकानंद. संत ज्ञानेश्वर असो वा संत रामदास, डॉ. राधाकृष्णन असो वा डॉ. एपीजे कलाम असो, साने गुरुजी असो वा विनोबा भावे, महात्मा गांधी असो वा डॉ. आंबेडकर, भगतसिंग असो वा शिरीषकुमार, डॉ. आचार्य असो वा पद्मश्री डॉ. भवरलाल जैन असो, स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी असो वा समतोलचे विजय जाधव, , कुडाळचे दिलीप कुलकर्णी असो वा कोल्हापूरच्या नसीमाताई, स्व, बाबा आमटे असो वा महर्षी कर्वे... खूप मोठी यादी आहे हि.. संपता संपणार नाही. आपण तसे होणे म्हणजेच माणूस होणे नाही का ? जे त्यांना शक्य झाले ते आम्हाला का जमणार नाही ? परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि आपण त्याचे एक घटक आहोत. माणूस होणे म्हणजे माणुसकीने जगणे. भारतासारख्या संस्कृतीयुक्त देशात आपल्या आईवडिलांना मुलांनी सांभाळले पाहिजे यासाठी कायदा करावा लागतो, हे नक्कीच दुर्दैवी नाही का ? 

'माणूस व्हायचंय मला !' या विषयाचे गांभीर्य आपल्या लक्षात आले असेल. नैसर्गिक साधन संपत्ती, मिळालेले आयुष्य किती गांभीर्याने व सजगतेने जगले पाहिजे. अगदी छोट्या छोट्या व दैनंदिन गोष्टीतून आपण आपलं माणूसपण जपू शकतो. एक कागद तयार करण्यासाठी करावी लागणारी वृक्षतोड नजरेआड करून चालणार नाही. गरज आणि चैन यातील फरक नक्कीच ध्यानात घेण्यासारखा आहे. गरज किती मर्यादित ठेवल्या पाहिजे आणि मर्यादित साधनांमध्येही माणूस कसा सुखी, समाधानी जगू शकतो हे शिकणे म्हणजे माणूस होणे होय. कोरोनाने आपल्याला हे शिकविलं, दुर्दैवाने आपण त्यापासून काही शिकलोच नाही. विजेचा वापर, वाहनांचा वापर,, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वा गॅजेटसचा अतिरेकी वापर याकडेही जाणीवपूर्वक लक्ष देण्याची हि वेळ आहे. आपला आनंद शोधता आला पाहिजे. मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो मिळण्यापेक्षा देण्यात अधिक आनंद आहे. द्यायला शिका...

संत सेना महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात 'जाता पंढरीसी सुख वाटे जीव, आनंदे केशवा भेटताची... आम्हाला चार पाऊले चालतांना त्रास होतो मात्र पंढरीची आस लागलेले हजारो वारकरी शेकडो किमीचे अंतर सहज पार करतात. मित्रांनो 'उठा ! जागे व्हा !.. आणि ध्येयसिद्धीशिवाय थांबू नका.' या धरतीचा स्वर्ग बनविण्याचा संकल्प करा. परिस्थिती बदलण्याची क्षमता तुमच्या माझ्यात आहे. कविवर्य केशवसुतांची ';"तुतारी'' कविता हेच तर सांगते... 


एक तुतारी द्या मज आणुनी !

फुंकीन मी जी प्राणपणाने, 

भेदून टाकीन सगळी गगने , 

दीर्घ तिच्या त्या किंकाळीने,

अशी तुतारी द्या मज लागुनी !

पुढे याच कवितेत कवी म्हणतात 

प्राप्तकाल हा विशाल भूधर

सुंदर लेणी तयात खोदा

नावे आपुली त्यावर नोंदा, 

बसुनी का वाढविता मेदा ?

विक्रम काही करा, चला तर...!  

आपल्या विषयाशी संबंधित आणखी एक कडवे आहे. 

पडली छाया मनुजाची जर, 

विटाळ होतो तर मनुजाला 

व्हावे स्नानची सचैल त्याला,

काय म्हणावे या मुर्खाला ?

नरेच केला हीन किती नर ! 

शेवटचं वाक्य माणसानेच माणसाला किती खालच्या पातळीवर आणून ठेवले तर... एका बाजूला परिस्थितीची चीड व्यक्त करणारे केशवसुत. सतारीचे बोल या कवितेत आश्वासक वाटतात. 

स्कंधीं माझ्या हात ठेवुनी

आश्वासी मज गमले कोणी 

म्हणे - "खेद इतुका" का करिसी ?

जीवास कां ब असा त्रासासी ?

धीर धरी रे धीरापोटी

असती मोठी फळे गोमटी !

ऐक मनीच्या हरित गदा

ध्वनी हे दिड दा, दिड दा...  दिड दा !

काय प्रतिभा आणि ताकद आहे शब्दांची... सतारीचे बोल जीवनाकडे पाहण्याची कशी दृष्टी देतात. स्वर्ग, पृथ्वी आणि मनुष्य या कवितेत कल्पित कथेद्वारे स्वर्ग आणि पृथ्वी या दोघांच्या प्रेमाची आणि ताटातुटीची कहाणी वर्णिली आहे. त्या ताटातुटीला पृथ्वीपुत्र मानवाची कृतघ्नता कारणीभूत झाली असे म्हणून मानवाच्यावतीने केशवसुतांनी पृथ्वी आणि स्वर्ग यांची क्षमा मागितली आहे. आपण सर्व जागरूक व संवेदनशील माणूस म्हणून आपला प्रवास सुरु करू या !  


गिरीश कुलकर्णी

९८२३३३४०८४ 

9 comments:

  1. या पुढे रेकॉर्डिंग करण्याची सोय करून घेतल्यास YouTube वर स्वतंत्र आपल्या भाषणांचा विभाग सुरू करता येईल. आपले वक्तृत्व सदाबहार आहे.

    ReplyDelete
  2. वा गिरीश विषय आणि तुझे लेखन पण छान

    ReplyDelete
  3. चांगले विचार सुंदर पध्दतीने मांडले . सुबुद्ध माणसांना तसेच तरूणांना विचारप्रव्रुत्त व कार्यप्रव्रुत्त करणारे व्याख्यान .
    हार्दिक अभिनंदन !!!

    ReplyDelete
  4. मुद्देसूद, संदर्भासहित मांडणी, खूप छान सर, माणसा माणसा कधी होशील माणूस !

    ReplyDelete
  5. सर आपका व्याख्यान प्रेरणा देनेवाला होता हे। आपके व्याख्यान के विचार अती सुंदर।

    ReplyDelete
  6. सर खुप छान प्रेरणादायी !

    ReplyDelete