दादा... या नावात एक जादू आहे. माझ्या आयुष्यावर एक वेगळाच प्रभाव या शब्दाचा कायम राहिला. आम्ही वडिलांना दादा म्हणत असू... त्यांच्या पश्चात आयुष्यात त्यांची जागा आपल्या कर्तृत्वाने मिळविलेले दोन दादा आले. एक म्हणजे डॉ. अविनाश आचार्य आणि दुसरे श्री. राजाभाऊ याज्ञीक... खरोखर या दोघांनी पुत्रवत प्रेम केले. आज श्री राजाभाऊ याज्ञीक ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत... आम्ही सर्व भाग्यवान आहोत आम्हाला त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या निरामय दीर्घायुष्याची परमेश्वराजवळ प्रार्थना करीत असतांना त्यांचा संस्कारित वारसा जपण्याची सुबुद्धी आम्हास देवो हीच प्रार्थना ! वर म्हटल्याप्रमाणे भारतीय संस्कृती कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व सांगते आणि याज्ञीक परिवार त्याचा आदर्श समाजासमोर ठेवतो. आजच्या भौतिक व व्यावहारिक जगात प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जात असतांना याज्ञीक परिवार ती श्रीमंती माणसांमध्ये शोधतांना आपल्याला दिसतो. नातेसंबंधासोबत समाजाचा याज्ञीक परिवाराचा एक गोतावळा आहे आणि तो सांभाळण्याचा व जोपासण्याचा वसा दादांनी आम्हा सर्वांना दिला आहे. प्रयेकाच्या वाढदिवसाच्या दिवशी , दसरा आणि संक्रांतीचा नमस्कार चुकला तर आणि महिन्याभरात भेट झाली नाही तर आठवणीने फोन करणारे दादा कौटुंबिक ऋणानुबंध घट्ट करतात.
दादा हे खरोखर एक अजब रसायन आहे. अशी माणसे अपवादाने घडतात. त्यात कुटुंबाचे संस्कार, समाज व्यवस्थेचे भान याचा प्रभाव असतोच मात्र त्यापलीकडे जाऊन विचार करण्याची, प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांची तयारी त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख ठरते. आज दादानाच्या संपर्कातील व्यक्ती ज्या पद्धतीने भरभरून आपलेपणाने बोलतात त्याचे मूळ दादांनी केलेल्या बीजारोपणात सापडतात. मी, माझं या पलीकडे जाऊन आपलं म्हणून सतत कार्यरत राहण्याची किमया सर्वांना साधतेच असे नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या परिवार सदस्यांची साथ तेव्हढीच महत्वाची ठरते. माणसाने आपला भूतकाळ कधीही विसरू नये असे म्हणतात याचा अर्थ आपले दिवस, तात्कालिक परिस्थितीची जाण विसरू नये. माणसाची संवेदनशीलता जागरूक ठेवण्याचे काम हा भूतकाळ करीत असतो. या संवेदनशीलतेचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता करत येणं याला माणुसकी असे म्हणतात. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी, कौटुंबिक व सामाजिक काम करीत असतांना या मानवतेची अनुभूती देण्याची संधी प्रत्येकालाच लाभत असते. दादांनी वेळोवेळी हि संधी घेतल्याचे लक्षात येते. त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाला झळाळी आल्याचे दिसते.
याज्ञीक परिवाराने ति. दादांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहोळ्याचे आयोजन त्यांच्याप्रतीची आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक संस्कार आहे आणि त्यात आम्हाला सहभागी करून घेतले याचा विशेष आनंद आहे. दादांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल मला नेहमीच आदर वाटला आहे. त्यांची एकूणच जीवनी अंतर्मुख करणारी असून मनात काही प्रश्न निर्माण करते. या प्रश्नाच्या माध्यमातूनच आपल्यासमोर दादांचे स्वभाव वैशिष्ट्ये आपल्यासमोर मांडणार आहे.
पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे दादांसारखी माणसे आजच्या जगात कशी घडतात ? मला या प्रश्नाचे उत्तर तुकाराम महाराजांच्या एका अभंगात मिळते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी... तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे शुद्ध बीजापासून चांगल्या आणि रसाळ फळांची उत्पत्ती होते तसेच संसारात जे शुद्ध व पवित्र अशी मंडळी आहेत त्यांच्या पासून चांगल्या आणि उच्च दर्जाच्या संततीची निर्मिती होते. ते पुढे म्हणतात अशा लोकांची वाणी ही मधुर असून अमृतासमान असते आणि हे लोक स्वतःचा देह देवाची अखंड सेवा करण्यात खर्ची घालवतात. अशी माणसे सर्वांगाने निर्मळ असून त्यांचे मन गंगेप्रमाणे निर्मळ आणि पवित्र असते. तुकोबाराय म्हणतात अशा ह्या लोकांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा लोकांचे त्रिविध ताप जाऊन त्यांच्या मनाला तात्काळ विश्रांती मिळते. आपण सर्वजण या मताशी सहमत व्हाल कि दादांच्या पालकांचा संस्कार आणि तोच संस्कार संक्रमित करून त्यांची पुढची पिढी दादांनी घडविली आहे.
तुमच्या पैकी किती जणांची ६० वर्षांची मैत्री आहे ? जाऊ देत आपल्या वयाच्या किमान निम्म्या वयाची मैत्री किती जणांची आहे ? याज्ञीक दादांची मैत्री आहे आणि ती पण दोन-चार जणांशी नाही. मला चांगले आठवते आणि मी त्याचा साक्षीदारही आहे. दादांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यातील मैत्रीदिन दादांच्या पुढाकारातून साजरा करण्यात आला होता आणि त्यासाठी दादांच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. बालपणापासूनचे अर्थात १९५४ पासूनचे गल्लीतील, शाळेतील, बाहेरचे, नोकरीच्या ठिकाणचे, सामाजिक कामातील असे सुमारे ६०-६५ मित्र एकत्र आले होते. आजही हि मैत्री टिकून आहे.आणखी एक प्रश्न तुमच्याकडे संपर्कातील किती लोकांचे फोन नंबर आहेत ? त्यातील किती जणांच्या जन्मदिनाच्या वा व्यवसायाच्या वर्धापनदिनाच्या तारखा तुम्हाला माहिती आहेत ? आणि त्यातील किती जणांना तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी फोन करता ? दादा हे असे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे त्यांच्या संपर्कातील हजारो लोकांचे फोन नंबर व जन्म तारीख आहे. प्रत्येकाला न चुकता ते फोन करतात. हा फोन कधीही उपचार नसतो कारण त्यात शुभेच्छांसोबत इतर गोष्टींची, कुटुंब सदस्यांची चौकशी असते. संबंधित व्यक्तीच्या जीवनाशी गोष्टींवर चर्चाही असते. त्यातील किती जण आठवणीने त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी फोन करत असतील ? तरी दादा त्यांचे हे माणसे जोडण्याचे व्रत अव्याहतपणे सुरु ठेवतात. आत्मीयता व आपलेपणा कसा जोपासावा याचे दादा एक उदाहरण आहे. मला यातील निरलस, निरपेक्ष, निःस्वार्थ व निरागस भाव अधिक महत्त्वाचा असतो.
आपण ति. राजाभाऊ याज्ञीकांचे अर्थात दादांचे अभिष्टचिंतन करू शकता त्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक देत आहे. ९४२१०८३६२२
(या लेखाच्या निर्मितीत मित्रवर्य मिलिंद पुराणिक यांच्याशी दादांबाबत केलेल्या संवादाचा मोठा हात आहे.)
गिरीश कुळकर्णी
गिरीश जी, खूप छान लिहिले आहे याज्ञिक काकांबध्दल .
ReplyDeleteदादांचा छान परिचय करून दिला !
ReplyDeleteविजय कुळकर्णी