Monday 29 August 2022

छंद कलाकार सहकारी मित्र अनिल पाटील

जळगाव जनता सहकारी बँकेच्या कारकिर्दीत ज्याचे अनमोल असे सहकार्य लाभले अशा माझ्या सहकारी मित्राची एक वेगळी ओळख अलीकडेच झाली. केवळ ओळखच नाही तर या छंद कलाकाराने साकारलेल्या स्केचेसचे जळगावातील मे. पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या कलादालनात १६ ऑगस्टपासून प्रदर्शन लावण्यात आले आहे. हि गोष्ट कळल्यावर ऊर अभिमानाने भरुन आला होता. त्याच्याबद्दल लिहायला घेतले अर्धे लिहून पण झाले आणि आजारी पडलो. तब्येत व्यवस्थित झाल्याबरोबर प्रदर्शनाला दोन दिवस राहिले असले तरी आवर्जून लिहितोय कारण अपेक्षा आहे कि माझ्या ह्या मित्राबद्दल वाचल्यावर आपण वेळ काढून आपल्या कुटुंबियांसह आवर्जून भेट द्याल. प्रदर्शन पाहून झाल्यावर आपला प्रतिसाद लेखी स्वरुपात देण्यास विसरु नका.  

मुक्ताईनगर जवळील चिखली या गावातुन आलेला एका सामान्य कुटुंबातून आलेला हा सहकारी जळगाव जनता सहकारी बँकेत प्रथम भेटला. कामाशी प्रामाणिक, प्रत्येक कामासाठी तयार असे. बऱ्याच गोष्टी आपण सांगायच्या अगोदर पूर्ण केलेल्या असत. कारण कामाची गरज व मिळालेल्या नोकरीची  जाणीव ! जनसंपर्क विभागात सुयोग्य असलेल्या या सहकाऱ्याने आपल्या कामाला कायमच न्याय दिला. सुंदर अक्षर, उत्कृष्ट लेखनशैली, कामातील व्यवस्थितपणा, उत्साही असलेला सहकारी लाभणे हे खरोखर भाग्यच ! एम. कॉम.पर्यंत शिक्षण झालेल्या अनिल पाटील यांनी वृत्तपत्रविद्या प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेला होता. त्यांना जनशक्ति, जळगाव टाइम्स, जनसेवक या दैनिकातील उपसंपादक काम करण्याचा अनुभव होता. १९९६ साली साधारण दोन महिन्यांच्या अंतरांनी आम्ही वेगवेगळ्या पदावर जळगाव जनता बँकेत रुजू झालो होतो. २००८ मध्ये मी वेगळी वाट निवडली तरी अनिल पाटील आजही उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. 

अनिल पाटलांच्या स्केचेस रेखाटण्याचा छंदाची त्याकाळात कधी बोलणे झालेले आठवत नाही. मात्र रंगीत पेन्सिलींद्वारे स्केचेस रेखाटण्याचा छंद महाविद्यालयीन जीवनापासूनच असला तरी नोकरीच्या बरीच वर्षे त्यात खंड पडला. कोरोना टाळेबंदीच्या काळात पुण्यात असलेली धाकटी कन्या घरी आली होती. तिला चित्रकलेची आवड असल्याने अभ्यासाबरोबरच फावल्या वेळात ती चित्रं रेखाटत असे. तिला पाहून आमच्या या सहकारी मित्राला आपला जुना छंद जोपाण्यासाठीचे निमित्त मिळाले. अन हा मित्र आपल्या छंदासाठी वेडा झाला असेच म्हटले पाहिजे. स्केचेस काढण्याच्या कामातील सातत्य कायम राखत त्यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील ४० ते ४५ मान्यवरांचे स्केचेस त्यांचे वाढदिवस, जयंती वा पुण्यतिथीनिमित्त रेखाटलेले आहेत. या स्केचेसला जळगावातील स्थानिक वर्तमानपत्रांनी प्रसंगानुरुप दाखल घेत वेळोवेळी यथोचित प्रसिद्धी दिली आहे. त्यात जळगाव तरुण भारत, सकाळ, दिव्य मराठी आणि लोकमत या दैनिकांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. 

वर्तमानपत्रांसह विविध समाज माध्यमातून हि चित्रे जनसामान्यांपर्यंत पोहोचली. अनेकांनी त्यांच्या स्केचेसचे भरभरुन कौतुक केले. पं.भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रेखाटलेल्या स्केचेससंदर्भात त्यांचे सुपुत्र श्रीयुत जयंतजी जोशी, पं. भीमसेन जोशी यांच्या देश-विदेशातील मैफिलीनिमित्त कायम त्यांच्यासोबत असणारे पुण्यातील प्रख्यात छायाचित्रकार श्रीयुत सतीशजी पाकणीकर, पंडितजींशी कौटुंबिक संबंध असलेले निवृत्त प्राचार्य, साहित्यिक, संग्राहक श्रीयुत प्रकाश महाजन सर, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक-गायक सचिन पिळगावकर, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि कलारसिक श्रीयुत अशोकभाऊ जैन, श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी आदींनी कौतुक केल्याचे ते अभिमानाने सांगतात, चित्रकलेविषयी कोणताही अभ्यासक्रम  वा कोर्स त्यांनी केलेला नाही. दिवंगत कलाध्यापक असलेल्या आपल्या वडिलांकडून हा अनुवंशिक वारसा त्यांना मिळालेला आहे. अनिल पाटील ८ वर्षांचे असतांना दूर्दैवाने त्यांच्या वडिलांच्या निधनामुळे त्यांना वडिलांकडून फारसे मार्गदर्शन मिळू शकले नाही. 

चित्र प्रदर्शन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कालखंडात होत असल्याने देशातील ४८ भारतरत्नांमधील सर्वाधिक ९ भारतरत्नांसह इतर ६ अशा १५ सन्मानार्थीचा समावेश करण्याचा निर्णय अनिल पाटील यांनी घेतला. एकत्रित ४० ते ४५ स्केचेसचं 'हा छंद जिवाला लावी पिसे...' हे अनिल पाटील यांच्यासारख्या सहकारी मित्राचे, एका छंद कलाकाराचं (हॉबी आर्टिस्टचं) पहिलं वहिलं चित्रप्रदर्शन सध्या मे. पु. ना. गाडगीळ यांच्या कलादालनात (बहिणाबाई उद्यानाजवळ) सुरु आहे. सकाळी ११ ते सायं. ७ या वेळात (बुधवार वगळून) सर्व चित्रकलारसिकांनी पाल्यांसह तसेच शालेय विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या या मित्राला खूप साऱ्या शुभेच्छा देतो ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday 16 August 2022

भारतीय स्वतंत्रता कि गाथा !


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभरात एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शासकीय, सामाजिक, संस्थात्मक व वैयक्तिक पातळीवर हा महोत्सव अनुभवताना अनेकदा अंगावर रोमांच उठत होते. स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती मनात अभिमान जगात असतांना त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना जाणवत होती. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्याचा जागर केला व समाजानेही त्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याचे लक्षात आले. शासकीय पातळीवर "घर घर तिरंगा, हर घर तिरंगा" मोहीम राबविण्यात आली. अमृत दौड, तिरंगा यात्रा यासारखे उपक्रमही राबविण्यात आले. संस्थात्मक पातळीवर विविध स्पर्धा, एक शाम देश के नाम, शोभायात्रा,  विभाजन विभीषीका, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, रस्त्यावरील खड्डे बुजवणे इ. गोष्टींचा समावेश होता. 

गांधी रिसर्च फाऊंडेशनने "भारतीय स्वतंत्रता कि गाथा" असा विषय घेऊन एक प्रदर्शनी तयार केली व त्याचे प्रदर्शन जळगावच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा गांधी उद्यानात लावण्यात आले. स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यांचा संक्षिप्त रुपात घेतलेला आढावा व त्याचे सादरीकरण खरोखरच कौतुकास्पद आहे. सोन्याचा धूर निघणारा भारत ब्रिटिशांच्या राज्यात पारतंत्र्यात गेला. १८५७ च्या उठावाने सुरु झालेली स्वातंत्र्याची लढाई वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या पद्धतीने लढली गेली. त्याचे नेतृत्व अनेकांनी केले. भारतीय काँग्रेसची स्थापना, बंगालचे विभाजन, होमरूल चळवळीचे लोकमान्य टिळकांनी केलेले नेतृत्व, १९१७ मध्ये महात्मा गांधीजींच्या पर्वाचा प्रारंभ, चंपारण सत्याग्रह, १९१९ मंधील जालियनवाला बाग हत्याकांड, १९२० चे असहकार आंदोलन, १९२२ चौरीचारा हत्याकांड,  क्रांतिकारी दलाची स्थापना, सविनय कायदेभंगाची चळवळ, आझाद हिंद सेनेची स्थापना, चले जाव आंदोलन, विभाजन, भारतीय स्वातंत्र्य. दि. १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या होते ध्वजारोहण व केलेले भाषण. त्यानंतरची संविधानाची निर्मिती, अखंड भारतासाठी संस्थानांचे विलीनीकरण यासारख्या गोष्टी आपल्याला पाहावयास मिळेल. भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास अतिशय समर्थपणे मांडण्यात आला आहे. भारतीय ध्वजाचा प्रवास चित्ररूपाने मांडण्यात आला आहे.















जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. अशोकभाऊ जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, योगेश संदानशिवे, विजय जैन परिश्रमपूर्वक हि प्रदर्शनी अतिशय कमी कालावधीत तयार केली आहे. अशोक चौधरी, चंद्रशेखर पाटील, निवृत्ती वाघ आदींनी प्रदर्शनाच्या उभारणीत आपले योगदान दिले आहे. प्रदर्शनात वापरलेली त्या त्या काळातील छायाचित्रे प्रदर्शनाची गुणवत्ता वाढवतात. मजकुरापेक्षा प्रदर्शनातील छायाचित्रे अधिक बोलकी वाटतात, मोठ्यांसाठी शालेय जीवनात शिक्षकांच्या माध्यमातून समजून घेतलेल्या इतिहासाची उजळणी, विद्यार्थी व तरुणांसाठी अधिकृत माहितीस्रोत, इतरांसाठी विस्मृतीत गेलेल्या घटना पुन्हा ताज्या करणारी हि प्रदर्शनी प्रत्येक जळगावकरांनी पाहिली पाहिजे. आपल्या मुलांना , विद्यार्थ्यांना दाखविली पाहिजे. त्यासाठी आपण संस्थेशी संपर्क करू शकता. बाहेरगावातील माझ्या मित्रांना हि प्रदर्शनी आपल्या गावात / शाळा - महाविद्यालयात लावायची असल्यासही आपण माझ्याशी संपर्क करू शकता... प्रदर्शन पाहिल्यानंतर आपला अभिप्राय नोंदविण्यास विसरू नका ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 


Wednesday 10 August 2022

प्रवास मेहनतीचा... आव्हानांचा... यशाचा... आनंदाचा... !

लाडकी लेक मृण्मयी ! मेहनती, सृजनशील, एकाच वेळेस अनेक गोष्टी करण्यासाठी धडपडणारी, उत्साही जोडीला हट्टी, मनाप्रमाणे करणारी, स्वतःचा निर्णय स्वतः घेणारी. कथक विषयासाठी कोणतीही तडजोड म्हणजे अगदी घरचं लग्न सोडणारीही. कथक विशारद पूर्ण झाली. काल तिचा गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेचा निकाल कळला आणि ती प्रथम श्रेणीत कथक विशारद पूर्ण झाली. अनेकांचा शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. आम्हाला मात्र तिचा तो प्रवास डोळ्यासमोर दिसतोय. 

यशाचा आनंद तर आहेच पण हा प्रवास तितका सहज घडलेला नाही. तिच्या यशाच्या सर्वात मोठ्या हक्कदार सर्व काही करून घेणाऱ्या तिच्या गुरु डॉ. अपर्णा भट-कासार आहेत. त्यानंतर ती स्वतः आणि तिची आई आहे. माझाही वाटा आहेच मात्र फारच मर्यादीत. कथक विषयाची कुठलीही


कौटुंबिक पार्श्वभूमी नसतांना तिने मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. सुरवातीच्या तीन परीक्षा उत्तीर्ण होतांना कुठलाही ताण न येता नव्या नवलाईने सर्वांनाच सोप्प गेलं. हळूहळू साधना / सराव काय असतो ते कळायला लागलं. शाळा, ट्युशन याचा मेळ घालणे कठीण होऊ लागलं. वेळेची कसरत करतांना सर्वांनाच अडचणी येऊ लागल्या. काळावर सोडल्यावर मार्ग निघाला, काही वेळेस बोलणंही खाल्लीत. दहावीत तर फारच तारांबळ उडत होती. भंबेरी काय म्हणतात ते. शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत माझे मत सांगत असे. हव्याहव्याशा वाटणाऱ्या अनेक गोष्टी सोडून द्याव्या लागल्या. "तडजोड' हा विषय तिच्या गुरुंजवळ अपवादात्मकच चालला. 

कुठलाही क्लास मिस झाला तर बोलणे ठरलेले. त्यातही कथक मध्ये तासनतास करावी लागणारी मेहनत, त्यात चूक झाली तर ऐकावे लागणारे कठोर बोल या सर्व गोष्टी डोळ्यासमोर आहेत. प्रचंड  थकवा आणि पुन्हा सकाळी उठल्यावर सुरु... त्याचाच परिपाक आज आनंदात झालेला दिसतो. गुरु-शिष्य नात्यात आम्ही दोघे कधी फारसे पडलो नाही कारण  प्रश्न आणि उत्तरे दोघेही अपर्णा दीदींकडेच मिळणार हे माहिती असे. मृण्मयीच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल जाणीव करून देत असत. तुम्ही गुरूंवर विश्वास ठेवला कि खूप गोष्टी साध्य होतात मात्र त्यात हस्तक्षेप केला कि उद्देशापासून दूर जाणे आलेच. समोरच्याच्या भूमिकेत गेलं कि प्रश्न सुटले म्हणून समजा. अनेक विद्यार्थी व पालक अभ्यास का कथक यात प्राधान्यक्रम ठरवितांना गडबडतात आणि तेथेच अशा प्रकारच्या परीक्षांमधील प्रवास थांबतो. मुलांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करुन त्याला निर्णय घेण्यासाठी साहाय्यभूत होऊन कायम सोबत असणं महत्वाचं. वर्षभरातून एकदा होणारा जाहीर कार्यक्रम खूप छान व्हायचा मात्र त्यासाठी संबंधित सर्वांची मेहनत याला तोड नाही. 

या प्रवासात वर्षभरात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधील सहभाग कथकसाठी अतिरिक्त वेळ

देणारा असे. कधीतरी अतिरिक्त ज्ञान, माहिती मिळविण्यासाठी बाहेरगावी जाण्याची संधी घेतल्याने त्या क्षेत्रातील प्रगल्भता येते. डॉ. अपर्णा दीदी यासाठी विशेष प्रयत्न करतात. दीदींचे या क्षेत्रासाठीचे समर्पण प्रेरणादायी आणि त्यामुळेच इतक्या साऱ्या शिष्या विशारद होऊ शकल्या. यावर्षीही ४ मुली प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन विशारद झाल्या. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये मिळणारे यश ज्याप्रमाणे अनमोल तर असतेच पण तो प्रवास थक्क करणारा व म्हणून प्रेरणादायी ठरतो. तसेच काहीसे मृण्मयीच्या कथक विशारद प्रवासाबाबत म्हणता येईल. मृण्मयीने तटस्थपणे या प्रवासाकडे पहावे. तात्कालिक परिस्थितीत प्रत्येकाने मांडलेले विचार तपासावे. तिचे हे यश सर्वांच्या एकत्रित परिणामांचाच परिपाक असल्याचे लक्षात येईल. तिच्या गुरुंबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतांना मृण्मयीचे व तिच्या आईचे सौ अदितीचे विशेष  अभिनंदन ! मृण्मयी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कथक विषयात एमएचे शिक्षण घेत आहे. तेथेही तिला शमाताई भाटेंसारख्या गुरु लाभल्या आहेत. तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !