Tuesday 16 August 2022

भारतीय स्वतंत्रता कि गाथा !


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभरात एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शासकीय, सामाजिक, संस्थात्मक व वैयक्तिक पातळीवर हा महोत्सव अनुभवताना अनेकदा अंगावर रोमांच उठत होते. स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती मनात अभिमान जगात असतांना त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना जाणवत होती. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्याचा जागर केला व समाजानेही त्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याचे लक्षात आले. शासकीय पातळीवर "घर घर तिरंगा, हर घर तिरंगा" मोहीम राबविण्यात आली. अमृत दौड, तिरंगा यात्रा यासारखे उपक्रमही राबविण्यात आले. संस्थात्मक पातळीवर विविध स्पर्धा, एक शाम देश के नाम, शोभायात्रा,  विभाजन विभीषीका, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, रस्त्यावरील खड्डे बुजवणे इ. गोष्टींचा समावेश होता. 

गांधी रिसर्च फाऊंडेशनने "भारतीय स्वतंत्रता कि गाथा" असा विषय घेऊन एक प्रदर्शनी तयार केली व त्याचे प्रदर्शन जळगावच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा गांधी उद्यानात लावण्यात आले. स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यांचा संक्षिप्त रुपात घेतलेला आढावा व त्याचे सादरीकरण खरोखरच कौतुकास्पद आहे. सोन्याचा धूर निघणारा भारत ब्रिटिशांच्या राज्यात पारतंत्र्यात गेला. १८५७ च्या उठावाने सुरु झालेली स्वातंत्र्याची लढाई वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या पद्धतीने लढली गेली. त्याचे नेतृत्व अनेकांनी केले. भारतीय काँग्रेसची स्थापना, बंगालचे विभाजन, होमरूल चळवळीचे लोकमान्य टिळकांनी केलेले नेतृत्व, १९१७ मध्ये महात्मा गांधीजींच्या पर्वाचा प्रारंभ, चंपारण सत्याग्रह, १९१९ मंधील जालियनवाला बाग हत्याकांड, १९२० चे असहकार आंदोलन, १९२२ चौरीचारा हत्याकांड,  क्रांतिकारी दलाची स्थापना, सविनय कायदेभंगाची चळवळ, आझाद हिंद सेनेची स्थापना, चले जाव आंदोलन, विभाजन, भारतीय स्वातंत्र्य. दि. १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या होते ध्वजारोहण व केलेले भाषण. त्यानंतरची संविधानाची निर्मिती, अखंड भारतासाठी संस्थानांचे विलीनीकरण यासारख्या गोष्टी आपल्याला पाहावयास मिळेल. भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास अतिशय समर्थपणे मांडण्यात आला आहे. भारतीय ध्वजाचा प्रवास चित्ररूपाने मांडण्यात आला आहे.















जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. अशोकभाऊ जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, योगेश संदानशिवे, विजय जैन परिश्रमपूर्वक हि प्रदर्शनी अतिशय कमी कालावधीत तयार केली आहे. अशोक चौधरी, चंद्रशेखर पाटील, निवृत्ती वाघ आदींनी प्रदर्शनाच्या उभारणीत आपले योगदान दिले आहे. प्रदर्शनात वापरलेली त्या त्या काळातील छायाचित्रे प्रदर्शनाची गुणवत्ता वाढवतात. मजकुरापेक्षा प्रदर्शनातील छायाचित्रे अधिक बोलकी वाटतात, मोठ्यांसाठी शालेय जीवनात शिक्षकांच्या माध्यमातून समजून घेतलेल्या इतिहासाची उजळणी, विद्यार्थी व तरुणांसाठी अधिकृत माहितीस्रोत, इतरांसाठी विस्मृतीत गेलेल्या घटना पुन्हा ताज्या करणारी हि प्रदर्शनी प्रत्येक जळगावकरांनी पाहिली पाहिजे. आपल्या मुलांना , विद्यार्थ्यांना दाखविली पाहिजे. त्यासाठी आपण संस्थेशी संपर्क करू शकता. बाहेरगावातील माझ्या मित्रांना हि प्रदर्शनी आपल्या गावात / शाळा - महाविद्यालयात लावायची असल्यासही आपण माझ्याशी संपर्क करू शकता... प्रदर्शन पाहिल्यानंतर आपला अभिप्राय नोंदविण्यास विसरू नका ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 


No comments:

Post a Comment