Tuesday 10 October 2023

मानसिक आरोग्याचा मंत्र : आनंदी जगणं !

दि. १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. आपले मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी अतिशय साध्या साध्या व छोट्या छोट्या गोष्टीतूनही हे शक्य आहे. वास्तव स्वीकारुन व कोणाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जीवन जगणे यासाठी लाभदायक ठरु शकते. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले मात्र सोबत अनेक गोष्टींचा ताण सोबत घेऊन आले. तंत्रज्ञान व जीवन यात योग्य समतोल राखणे आजच्या काळात कठीण होत चालले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर कालांतराने मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण करतो. लॉकडाऊनच्या काळात मोबाईलच्या आहारी गेलेला समाज अजूनही स्वतःला सावरु शकत नाही हे वास्तव नाकारता येणार नाही. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम झाला आहे. 

टीव्ही व समाज माध्यमही मानसिक गोंधळातच भर घालतांना दिसत आहे. सावधानता बाळगणे व संयमित राहणे या दोन गोष्टी आपल्याला काही बंधने घालण्यासाठी प्रवृत्त करु शकतात अर्थात त्यासाठी आपणच आपल्या जीवनाकडे डोळसपणे पाहणे अगत्याचे ठरते. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हि या निमित्ताने एक संधी आहे. आपण आनंदी असणे हे कुटुंबीय, सहकारी व मित्रपरिवार यासाठी आवश्यक आहे. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. कोवळ्या वयातील मुलांच्या आत्महत्या असो वा इस्रायल मधील युद्ध, कार्यालयातील कामाचा ताण असो वा कुटुंबातील आव्हाने असोत या सर्वांचा परिणाम आपल्यावर होतो व स्वाभाविकपणे तो आपल्या परिघातील प्रत्येकावर जाणते-अजाणतेपणी होत असतो. आपण कितपत आनंदी आहोत हे जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न स्वतःला विचारुन पहा. 


Courtsey: Swapneela Sethia


१. आपल्याला आपले आयुष्य हे बक्षीस आहे असे वाटते का ?

२. आपण स्वतःमधील व इतरांमधील चांगुलपणा शोधण्यासाठी सक्षम आहोत का ?

३. आपण आपल्या भविष्याबद्दल आशादायी आहात का ?

४. आपण आपल्या रोजच्या कामातून आनंद मिळवतो का ?

५. आपणास पदोपदी व क्षणोक्षणी आनंद वाटतो का ?

६. आपणास आपल्या जीवनात काहीतरी उद्देश व अर्थ आहे असे वाटते का ?

७. आपण कायम उत्साही असतात का ?

८. आपण इतरांना काही देतो त्यावेळेस आनंद मिळतो का ?

९. विपरीत परिस्थितीतही मी चांगले शोधू शकतो का ?

१०. दिवसभरातील भावनांचा स्वीकार व स्वागत करतो का ?

११. कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या नियमित संपर्कात असतो का ? 

१२. जेव्हा परिस्थिती गंभीर असते त्यावेळेस पुढाकार घेऊन सहाय्य्यभुत होतो का ?

१३. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटते का ?

१४. भूतकाळातील निराशा व दुःख विसरु शकतो का ?


आनंदी जीवन हे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे व त्यादृष्टीने वरील काही प्रश्न आहेत. असे मानवी भावनांच्या बाबतीत आपल्याला पडणाऱ्या प्रश्नाचा विचार केल्यास आपल्याला मार्ग सापडू शकतात व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त जीवन जगता येऊ शकते. जेव्हा आपल्याला आपल्याच प्रश्नांची उत्तरे सापडत नाही तेव्हा स्नेहीजनांची मदत घ्या. आपले मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे असे लक्षात आल्यास समुपदेशकाची मदत घ्या. मोकळा संवाद अनेक प्रश्नांची सहज उकल करतो. त्यासाठी एक जिवाभावाचा सखा असावा. निसर्गाच्या जितके जवळ जाल तेव्हढे प्रश्न लवकर निकालात निघतील. शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्या. त्यासाठी आपल्या सोईनुसार व आवडीनुसार व्यायाम करा. ताजे, पौष्टिक व सकस अन्न हे शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यासाठीचे मूळ आहे. प्राणिमात्रांवर व भोवतालच्या जगावर प्रेम करा. गरजूंना मदत करा. आपल्याकडे जे आहे ते उदारहस्ते मुक्तपणाने देत रहा. 

पहा... विचार करा... बदल करा... आपल्या निरामय दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा ! 


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

1 comment: