Saturday 5 December 2020

वॉर अँड पीस



मागील सोमवारी समाजासाठी विशेषतः:समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काही तरी विशेष, भव्य-दिव्य करु इच्छिणाऱ्या, सामाजिक कार्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या आमटे कुटुंबातील शीतलताई आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळली. मन सुन्न झाले. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. इतक्या टोकाचे पाऊल एक महत्वाकांक्षी, संवेदनशील, इतरांसाठी प्रेरणादायी व ध्येयनिष्ठ व्यक्ती कसा घेऊ शकते ? या एका प्रश्नाकरिता मन अस्वस्थ होते. स्व. बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी सोहोळ्याचा (२०१४) साक्षीदार असलेल्या माझ्या सारख्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्याला प्रश्न पडणे स्वाभाविकच ! मात्र याच संवेदनशीलतेमुळे विषयाचे गांभीर्य, आवाका व व्याप्ती लक्षात घेता कुठलीही घाई न करता विचारपूर्वक व जबाबदारीने व्यक्त होण्याचे ठरविले. गेले ६ दिवस या विषयावरील माध्यमातील मते मतांतरे, टीका टिप्पणी, व्हिडीओ पाहतोय. कोण चूक, कोण बरोबर, कोणावर अन्याय, पुढे काय ? हे प्रश्न आहेतच मात्र माझ्यासाठी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आत्महत्याच का ? 



गेली अनेक वर्षे हा प्रश्न अक्षरश: छळतोय. त्यात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात आमच्याच कुटुंबातील सदस्याने केलेल्या आत्महत्येमुळे याबाबत स्वामी विवेकानंद जयंतीला काही ठोस करण्याची योजना आखली होती. दुर्दैवाने महामारीमुळे तो विषय थांबला. महामारीने निर्माण केलेल्या अनेक सामाजिक समस्यांनी अनलॉकच्या काळात अनेकांना हा पर्याय निवडण्यास बाध्य केले. माध्यमातील या बातम्यांनी मन विषण्ण होते. अनेकदा माध्यमे या बातम्या का देतात असा प्रश्नही पडतो कारण या बातम्या मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तीसाठी नकारात्मक प्रेरणा ठरतात असे मला नक्की वाटते. वैयक्तिक भेटीतून स्थानिक संपादकांना सहज बोललो देखील...या बातम्या टाळता येणार नाही का ? सार्वजनिक कार्यक्रमात, प्रशिक्षणात, व्याख्यानातून या विषयावर तरुणांशी आवर्जून बोलतो हे खरे असले तरी बातमीतील त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही आणि त्याला थांबवू शकलो नाही याचे दुःख मनाला बोचणी देत राहते. असो.

शीतलताईंनी आत्महत्येच्या दिवशी ट्विटर हॅण्डलवर एक चित्र सामायिक केले होते आणि त्याला शीर्षक होते " वॉर अँड पीस ". मला हे वाक्य त्यांच्या मनाची तगमग व परिस्थितीची कल्पना देणारे वाटते. जीवनातील अनेक आव्हानांना, संघर्षांना माणूस सामोरे जातच असतो. रोज मरणाची लढाई ती हिच, अशाच पद्धतीने तो जगत असतो. हि लढाई तो लढत असतो कारण त्याला हवी असते शांतता...मानसिक शांती, आत्मिक समाधान... ताईंना हि मानसिक शांती मिळविण्यासाठी आत्महत्या हा पर्याय योग्य वाटला असेलही पण...  मग प्रश्न येथूनच सुरु होतो. अशी कोणती लढाई होती कि ज्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही ? बाह्य जगतातील लढाईबद्दल बरंच बोललं जातंय... कौटुंबिक वाद, सहकाऱ्यांशी वाद अन्य... पण त्यावर हा पर्याय नक्कीच त्या निवडणार नाही. त्यातील काय योग्य अयोग्य याच्या तपशिलात मी जाणार नाही कारण मी त्यासाठी पात्र नाही वा मला त्याबाबत माध्यमातील गोष्टींशिवाय काहीही माहिती नाही आणि त्याची सत्यता (?)...  



माझ्या मते हि लढाई बाहेरच्या जगापेक्षा अंतर्गत जगाची अधिक असावी. एव्हढा मोठा परिवार सांभाळत असतांना लागणारे आर्थिक पाठबळ... ते उभे करण्याचे आव्हान... भविष्यात करावयाच्या गोष्टींसाठी लागणारे पाठबळ, त्यासाठीचे मार्ग... आव्हानांची मालिका... जीवनात कराव्या लागणाऱ्या वैचारिक तडजोडी, जबाबदारी सांभाळत असतांना आपण कुठेतरी कमी पडतो आहोत हि भावना, एका बाजूला ७० वर्षांची विश्वासार्हता आणि दुसऱ्या बाजूला "लोक काय म्हणतील ?" याची बोचणी... त्यातून निर्माण होणारे मानसिक द्वंद्व. संवेदनशील कार्यकर्त्यांसाठी तसे हे नेहमीचेच असते. त्यामुळे एव्हढा टोकाचा निर्णय ? संस्था संचालन करीत असतांना असे मानसिक द्वंद्व नेहमीचेच असते. आमटे परिवारातील सदस्यांसाठी ते अजिबातच नवीन नाही. काम करीत असतांना समोरील आव्हानाचे उत्तर जवळ असतांनाही "करावे कि न करावे ?", "To be or Not to be..." ची परिस्थिती खूप मानसिक गोंधळ निर्माण करते. एका बाजूला व्यवहार आणि दुसऱ्या बाजूला भावना यांचा समतोल साधणे अनेकदा कार्यकर्त्याला कठीण जाते. 

शीतलताई खरं तर याबाबतीत अनेकांच्या आदर्श होत्या. त्यांनी अनेक प्रकल्प, उपक्रम ज्या पद्धतीने साकारले, चालवले त्यावरून त्यांना हे असे अनुभव नवीन नक्कीच नाही. मग असा कोणत्या विषयावरील अंतर्गत मानसिक वा वैचारिक संघर्ष त्यांना या निर्णयाकडे घेऊन गेला असेल ? आपली हरविलेली मानसिक शांती मिळविण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब करावासा का वाटला नसेल ? एका बाजूला आनंदवनात घेतलेले जीवन शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमधून घेतलेले शिक्षण काय कमी पडले ? का या दोहोंच्या ताळमेळातच गडबड झाली. सामाजिक कार्यकर्त्याची हि अशी स्थिती अनेकदा होते. अनेक चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा असूनही करता न येणे ? त्याठिकाणी आपली मूल्ये, तत्वे, धोरण याबाबत आपल्याच मनात शंका निर्माण होणे हे फार कठीण असते. संस्थेचा मूळ आत्मा सांभाळून त्याला तारुण्य बहाल करण्याचे आव्हान स्वीकारण्यात काही अडचणी होत्या का ? त्यातून निराशा, हतबलता, नैराश्य येते. माणूस अनेक अंगाने, मार्गाने त्यावर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. ताईंना यावेळी मात्र तो मार्ग सापडला नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. 

आम्ही एका संवेदनशील, धडाडीच्या, स्वप्नाला कवेत घेणाऱ्या कार्यकर्तीला मुकलो हे नक्की. आमटे परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर देवो हीच प्रार्थना ! 

जाता जाता- लिओ टॉलस्टॉय यांची "वॉर अँड पीस" या विषयावरील एक प्रसिद्ध कादंबरी असल्याचे वाचनात आले. मी ती वाचलेली नाही. मात्र त्या संदर्भातील अधिक माहिती वाचली असता त्याचा संदर्भ ताईंच्या ट्विटशी असावा का असे वाटून गेले ? . 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४


1 comment:

  1. बाबांनी ज्या खडतर प्रयत्ना तुन व विपरीत परिस्थितीत आनंदवनाची निर्मिती केली व त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र भर अनेक प्रकाशाची बेट निर्माण झाली त्यांचा वारसा चालवणाऱ्या शीतल ताईंनी हा मार्ग निवडायला नको होता ,त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना set back बसण्याची शक्यता आहे .

    ReplyDelete