Sunday 30 August 2020

कृतज्ञता गावाविषयीची !

माझे जळगाव १७ मजलीवरुन...

आशा फौंडेशनच्या "कृतज्ञता उत्सवा"च्या निमित्ताने दररोज दोन-तीन जण नवीन सहभागी होतात एखादा थांबतो. यानिमित्ताने एक गोष्ट नक्की जाणवते आहे आपण त्या जगनियंत्याजवळ काही तरी मागत असतांना आपल्याला त्याने किती भरभरुन दिलं आहे आणि त्याचा आपण फारसा विचार करीत नाही आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा विषय दूरच... खरोखर या उत्सवाच्या अंतिम टप्प्यात आलो असतांना असे जाणवते आहे कि आपण अजून खूप साऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आठव्या दिवशी आपण आपल्या जीवनातील हृदयस्थ असलेली गोष्ट म्हणजे आपले गाव... त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. वेळ आणि लेखनाचे बंधन असतांनाही प्रत्येकाने व्यक्त केलेल्या भावना खूप काही सांगणाऱ्या आहेत. शब्द अपुरे पडले असे वाटत असतांनाही वाचणाऱ्याला आपण म्हणतात ते सर्व पोहोचतोय असे मला व्यक्त करणाऱ्या सर्वांना सांगावेसे वाटते. प्रत्येकालाच आपल्या गावाने सर्व काही दिले आहे विशेषतः आपली ओळख ! आपल्या गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतांना मला तीन गावांबद्दल प्रामुख्याने कर्तृज्ञता व्यक्त करावयाची आहे अर्थात या सर्व मंडळींनी जे सांगितले तेच  एकत्रितरित्या मांडणार आहे.

गाव म्हटलं कि येते ती तेथील वस्ती, माणसे, संस्कृती, तेथील अभिमानास्पद वारसा व निर्मित स्थळे... माणूस घराबाहेर असतो तेव्हा त्याला सर्वात जवळची वाटणारी जागा म्हणजे आपले गाव. कारण माणूस हा समूहप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याला कायम माणसे हवी असतात. ती आपल्या परिवारातील असली तर अधिक दिलासा देणारे वाटते. मात्र त्यापासून दूर गेल्यावर असतात ती आपली गावातील माणसे, नंतर राज्य आणि देशातील... कारण ही सर्व आपली माणसे असतात. पाडा, तांडा, वस्ती, गाव, शहर, महानगर ही सारी त्या गावाची रुपे ! हे लिहीत असतांनाच मला जाणवले कि पाड्यापासून महानगरापर्यंत जात असतांना आपलेपणा तीव्रतेपासून सौम्यपणाकडे जात आहे. असे असले तरी व्यक्तिगत कृतज्ञता कुठेही कमी होत नाही कारण त्यात असलेले "आपले"पण मग ते तीव्र असो वा सौम्य. महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतील विविध गावांना भेटी देत असतांना मला हे नेहमीच जाणवत आले आहे. ही त्या त्या गावाची आणि भारतीय संस्कृतीची विशेषताच ! 

गावाची महत्ता सांगणाऱ्या आमच्या गावातील वाडा आणि कुटुंबीय...

माझं जन्म धानोरा, ता. चोपडा, जि. जळगाव येथील... आयुष्याची सुरवात जेथे झाली तेथेच आयुष्याचा अंतिम कालखंड व्यतीत करावा असे मनोमन ठरविले आहे. कारण या गावाने जे दिलं ते जगात कुठेही मिळणार नाही याची खात्री आहे. स्वा. सावरकरांच्या "ने ने मजसी ने परत मातृभूमीला..." या गीताप्रमाणेच. त्यांनी आपल्या मातृभूमीप्रती कवितेतून व्यक्त केलेली आर्तता आपल्या गावाच्या बाबतीत  प्रत्येकाला अनुभवता येईल. "बालपणीचा काळ सुखाचा" असे म्हणून तर म्हटले जात असेल ना ! कायम स्मरणात राहणाऱ्या व गावाबद्दलची ओढ निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी येथे केल्या आहेत आणि या गोष्टींनी आयुष्यभरासाठीचा आनंद आणि समाधान दिले आहे. गावांमधील नकारात्मकतेची चर्चा करीत असतांना सुद्धा ते आपले गाव आहे म्हणूनच ! त्यातूनच सापडणारे उत्तर आणि पुन्हा वृद्धिंगत होणारी आपल्या गावाबद्दलची आपुलकी अशी ही साखळी... उन्हाळ्याच्या दिवसात गावातील शेकोटी, देवबाबांची यात्रा, लग्नाच्या वेळेस रात्री निघणारी मिरवणूक अर्थात फुनकं, रामलीला, थंडीत रात्री शेतात गव्हाला दिलेले पाणी, तेथेच प्यायलेला गुळाचा चहा, शेतात काम करतांना सोबतच्या मंडळींच्या भाकरीचा तुकडा, गुळाची जिलबी, बाजाराच्या दिवशी आजोबांनी आणलेला शेव चिवडा, उन्हाळ्यात आंब्याच्या रसाची रेलचेल, उन्हाळ्यात खळ्यात धान्याची केलेली राखोळी, तीन बैलजोडीच्या साहाय्याने लोखंडी नांगराने केलेली नांगरटी,  रात्री अपरात्री ट्रॅक्टर बसून शेतात केलेली नांगरटी, म्हशीला पाणी पाजायला नेताना तिच्यावर बसणे,  तिच्या शिंगांना अडकवलेल्या टमरेलने ती उधळणे अशा किती तरी गोष्टी या गावाने दिल्यात. वाड्याच्या दारात उभे असतांना रस्त्याने जाणारा येणारा प्रेमाने करणारा "राम राम..." इथलाच. असा माझा गाव जवळच असलेले उनपदेव, मनुदेवी आणि शिरागड ही बैलगाडीवरील सहलीची ठिकाणे. चिंचोलीच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा उत्सव. गावातील व्याख्यानमाला, कीर्तन यासह अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. जीवनाचा अस्सल तत्वज्ञान या गावातच  मिळते. 

वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने व आमचे शिक्षण झाले धुळ्यात ! हे माझे दुसरे गाव.. जीवन घडविणारे हे गाव येथील शाळा, महाविद्यालय, शिक्षक, सामाजिक संस्था यांनीच खरे तर विचारांची दिशा दिली. राजवाडे संशोधन मंडळ, समर्थ वाग्देवता मंदिर, शिवाजी व्यायाम शाळा, नकाणे  तलाव, एकविरा देवी मंदिर, पांझरा नदी, ५वी गल्ली, मनोहर, स्वस्तिक, ज्योती, प्रभाकर, राजकमल टॉकीज, लहान पूल, मोठा पूल, जुने धुळे, देवपूर, भांग्या मारोती, मिरच्या मारोती, पाच कंदील, जवाहर सूत गिरणी, लळींगचा किल्ला, सोनगीर काय नाही या माझ्या गावात... आदिवासी भागात मोडत असले तरी हे शिक्षण आणि खाद्य पदार्थांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर ठरले आहे. ढाबा संस्कृती येथीलच. येथील गल्ली बोळ आजही मला तेथे जाण्यासाठी बाध्य करतो. येथील माणसांचा बोलतांना टोन जरी रफ वाटला तरी ती प्रेमळ आहेत. रा. स्व. संघ, अभाविप, विद्यार्थी प्रबोधिनी या सारख्या संस्थांनी सामाजिक  जडणघडण  केली. अनेक चांगली व मोठी माणसे या शहराने  दिली आणि तिचं आमच्या गावाची  श्रीमंती ! आयुष्यातील तारुण्याच्या काळात विचारांची बैठक तयार करणाऱ्या, आव्हानांना न डगमगता सामोरे जाण्याचा संस्कार देणाऱ्या ,तडजोड कुठे, कशी आणि कोणत्या मर्यादेपर्यंत करावी याची शिकवण देणाऱ्या, अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देणाऱ्या, वैयक्तिक जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा आणि श्रम मूल्य देणाऱ्या या गावाबद्दल आयुष्यात कृतज्ञच राहील. 

अंतिम टप्प्यात सध्या वास्तव्यास असणाऱ्या माझ्या जळगावबद्दल... मला नेहमी आकर्षण वाटणारे येथील ग्रामदैवत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर ! येथील विविध उत्सव कायम आकर्षित करतात. अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या या मंदिराचं सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने असलेले महत्व मोठे आहे. या गावाने वैचारिक प्रगल्भता व अध्यात्मिकतेची ओढ निर्माण केली यासाठी विशेष कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हभप दादा महाराज जोशी व हभप मंगेश महाराज जोशी हे मानसिक स्वास्थ्यासाठीची शक्ती स्थाने वाटतात. डॉ. अविनाश आचार्यांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा सुमारे दोन दशकांचा दीर्घ असा सहवास मिळाला, पद्मश्री भवरलाल जैनांच्या उद्योग समूहाच्या सामाजिक कृतज्ञतेची अनुभूती, ऍड. अच्युतराव अत्रे अर्थात बाबांची कौतुकाची थाप या गोष्टींनी माझ्या मनात गावाबद्दलची नाळ दृढ केली. व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने या गावात आलेल्या गावाने मला येथील आदर्शांनी व व्यवस्थेने सामाजिक कामाची दिशा व प्रेरणा दिली. अनेक सामान्य माणसे सामाजिक कार्यांत कृतज्ञतेनं सहभाग देतात ही आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे. कर्तृत्वाने ओळख निर्माण होते हे जरी खरे असले तरी येथील समाजाने तुम्हाला स्वीकारणे, कार्यात सहभाग देणे, पाठीशी राहणे या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात. प्रसंगी अपेक्षित सहकार्य मिळाले नाही तरी आपल्यातील क्षमतांची जाणीव करुन देण्यासाठी ते आवश्यक ठरते. लौकिक अर्थाने मोठं करणाऱ्या या गावाप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. 

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जळगावातील सर्व गावांमध्ये माझा प्रवास झाला. कालांतराने प्रशिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये गेलो, तेथे राहिलो, त्यांनी मला जे आयुष्यभरासाठीचे अनुभव दिले त्या सर्व गावांप्रती कृतज्ञ आहे. आमची कुलस्वामिनी माहूरगडावरची श्री रेणुका माता ! अध्यात्मिक दृष्टिकोनातून सद्गुरु संत श्री सखाराम महाराजांची भूमी असलेले अमळनेर, पंढरपूर, संत गजानन महाराजांची भूमी असलेले शेगाव या गावांनी जीवनातील आवश्यक असलेली शांती दिली. अहमदनगरने मला आयुष्याची साथ देणारी जोडीदार व डॉ. गिरीश कुलकर्णींसारखे मित्र दिले. या गावांचाही मी ऋणी आहे. अन्य काही गावांचा मला विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. यात सामाजिक जाणीव प्रगल्भ करणारे बारीपाडा, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, कोल्हापूर, हेमलकसा, अकोला, सर्वात जास्त शहीद झालेल्या जवानांचे गाव असलेलं गडहिंग्लज, प्रशिक्षणाच्या दृष्टीने समृद्ध करणारे धडगाव, , अचलपूर,  चिखलदरा, मेळघाट, तोरणमाळ, गारगोटी, माथेरान, पाट पारोळे, अक्कलकुवा, मोलगी, तळोदा, पाटण, मेढा, सातारा, चांदुर बाजार आपल्या गावाचे महत्व अधोरेखित करणारी व अनेक विचार प्रवृत्त करणारी मंडळी देणारे पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर ही महानगरे... यासर्वांप्रती विनम्रतापूर्वक कृतज्ञता ! 

जीवनाच्या समृद्ध वाटचालीत कुटुंब या एककाचा देशाशी ऋणानुबंध जोडणाऱ्या गावाचे महत्व नदीवर बांधलेल्या पुलासारखेच आहे. भूमीबद्दलच्या अभिमानाची बीजे रोवणाऱ्या गाव संस्कृतीला मनाचा मुजरा !  या गावाचे ग्रामस्थ म्हणून गावाच्या संस्कृती व परंपरांचा समृद्ध वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी सामाजिक कृतज्ञतेने आपण कार्यरत राहू या ! जागतिकीकरणाच्या युगातही "आपुलकी" आणि "माणुसकी" ही बलस्थाने असलेली गावसंस्कृती अबाधित राहो... हिच त्या बा गणरायाचरणी मनापासून प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

4 comments:

  1. गिरीषजी.....
    खरंय, कुटुंब आणि देश यांना जोडणारा पूल म्हणजेच गांव. खूप सुंदर कल्पना मांडली आपण. पूल हा जोडण्याचं काम करतो. त्या अर्थाने त्याचं मोल अगणीतच आहे. म्हणूनच त्याचे ऋण मान्य करणे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी गावासाठी काही तरी करणे आवश्यकच ठरते. आयुष्याची संध्याकाळ आपल्या गावाकडेच व्हावी ही तुमची अपेक्षा माझ्या अपेक्षेसी तंतोतंत जुळते. आम्ही सर्व लिहिणारे काय लिहतो त्याचा सारांश मांडणे आणि स्वतःची भूमिका स्वतंत्र आपल्या शैलीत मांडणे ही भूमिका तुम्ही छान निभावत आहात. ही संधी आपण दिल्याने मनाला विविध दिशांना विविध अंगांनी स्वैर भटकंती करता येत आहे. त्याबद्दल आपलेही आभारच मानायला हवेत. अभिनंदन आणि धन्यवाद !

    ReplyDelete
  2. सुंदर लेख !

    विजय कुळकर्णी

    ReplyDelete
  3. माझ्या हृदयस्थानी असलेलं माझं आजोळ हेच माझं गाव अर्थातच रणथम(चिखली).-अनिल रामभाऊ पाटील

    ReplyDelete
  4. खुपच सुंदर

    ReplyDelete