Monday 24 August 2020

कृतज्ञता आयुष्यातील सुवर्णकाळ देणाऱ्या शाळेप्रतीची !


बालवाडी ते १० वी पर्यंतचे पारंपरिक शिक्षण देणारी शाळा ! खरं तर अतिशय व्यापक अर्थ असलेला शब्द म्हणजे शाळा. आयुष्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व देणारी शाळा. ती केवळ चार भिंतीत कशी ? ती सर्वत्रच.. सुरुवात घरापासून, मग शाळा, महाविद्यालय, समाज, कार्यालय, निसर्ग, संस्था / संघटना. आयुष्याला समृद्ध करणाऱ्या विविधांगी शाळा. येथे कायम सोबत असते ती दप्तराची... लहानपणापासून धरलेले हे दप्तर आयुष्याच्या संध्याकाळी हिशेब मांडतांनाही कामात येत अर्थात त्याचे स्वरुप बदललेले...मात्र निकाल सांगणारेच. त्यासाठीच शाळेप्रतीची कृतज्ञता व्यक्त करतांना श्री. प्रदीप रस्से यांनी त्याचे प्रतिक म्हणून अतिशय समर्पक असे दप्तराचे चित्र काढून दिले आहे. असो. आयुष्याचा भविष्यकाळ समर्थ व सफल करण्यासाठी अत्यावश्यक असलेले सर्व काही देते ती शाळा. म्हणूनच लेखाचे शिर्षकात त्याला सुवर्णकाळ म्हटलं आहे. त्या सुवर्णकाळासाठीच आपण सर्व आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अगदी प्रत्येकजण ! 

आशा फौंडेशन सार्वजनिक गणेशोत्सव २०२० अंतर्गत "कृतज्ञता उत्सव" आपल्या सर्वांच्या सहभागाने साजरा करतोय. त्या बाप्पाला जे जे काही त्याने भरभरुन दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय. मी सर्वांच्या भावनांना एकत्रितपणे सूत्रबद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. आज मात्र मी माझ्या शाळेच्या माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक माणूस हा एका "वल्ली" आहेच पण हे अधोरेखित करण्याचे काम करते ती शाळा ! सर्वांनी मांडलेला सुवर्णकाळ खराच आहे मात्र काही तरी सुटलंय किंवा सोडलंय. लेख थोडा मोठा झाला तरी काही सुटू नये असे पाहू. 

३४ वर्षानंतर महाव्याख्यान कार्यक्रमाचे उदघाटनप्रसंगी श्रीमती हिरा खंदलकर 

माझी प्राथमिक शाळा धुळ्याची लायन्स नूतन विद्या मंदिर (समाधीची शाळा) १ ली ते ४ थी बाई एकच श्रीमती विजया कुळकर्णी आमच्या विजूबाई ! आणि दुसरी महत्वाच्या बाई म्हणजे मोठ्या बाई अर्थात श्रीमती हिरा खंदलकर. विजूबाई साध्या आणि मोठ्या बाई केवळ खतरनाक म्हणजे हातात कायम पट्टी आणि कडक शिस्त. पहिले अर्धे वर्ष तसे बऱ्यापैकी खिडकीत बसून आईची वाट पाहण्यात आणि रडण्यात गेले. पण येथील सर्व जादुई शिक्षकांनी शाळा आणि अभ्यास यांचे गोडी लावायचे काम केले. या शाळेच्या स्नेहसंमेलनात म्हटलेले गाणे आजही आठवते. "शाळेतही मी जाणार, पाटी घेऊनी, घेऊनी पुस्तक, अभ्यास मी करणार " खूप मस्ती केली, मार खाल्ला. मनाचे श्लोक ४० पर्यंत पाठ, पाढे तीस पर्यंत पाठ... आजही झोपेतून उठविले तर सांगेन ! हिच तर खरी गंमत आहे शाळेची. अभ्यास महत्त्वाचाच मात्र इतरही गोष्टी तेव्हढ्याच प्राधान्यक्रमाच्या. जीवनाचे खरे टप्पे टोणपे तेथे मिळाले. तसा घरच्यांना खूप त्रास दिला शाळेत जातांना... पालक शिक्षक युतीचा नेहमीप्रमाणे विजय झाला आणि आम्ही एकदाचे शाळकरी झालो. 

माध्यमिक शाळा त्याहून भारी धुळे एज्युकेशन सोसायटीची न्यू सिटी हायस्कुल ! ५ वीत प्रवेश झाला. वर्गशिक्षक श्री. बी. एन. जोशी सर, विषय इंग्रजी. शाळेची वेळ दररोज दुपारची मात्र शनिवारी सकाळची. त्या दिवशी आमचे सर धोतर आणि पांढरा सदरा आणि कापली मस्त गंध. शाळा केवळ मुलांची त्यामुळे दंगामस्तीला कोणतेही बंधन नाही. (असं विधान धारिष्ट्याने करतोय कारण शाळा शिस्तीचीच होती पण आम्ही ? ) जगण्याला लायक बनविणे, माणूस म्हणून घडविणे म्हणूनच तर म्हणतात ना ! शाळा सुरु व्हायची ती "जयोस्तुते जयोस्तुते..." या गीताने अर्थात त्यापूर्वी अन्यही गाणे लागायची. त्यात ऋणानुबंधाच्या आवर्जून आठवते. राष्ट्रगीत झाले कि दिनक्रम सुरु... साधारण ७ वी नंतर हे जरी सुरुच असले तरी आमची कबड्डी जोरात चालायची. पांढर शर्ट आणि खाकी अर्धी चड्डी हा गणवेश. सकाळी आईने मोठ्या कष्टाने धुतलेला पांढरा शर्ट संध्याकाळी पार वाट लागलेली. बटण तुटलेले, कुठेतरी फाटलेले, हातापायाला कायम मलमपट्टी सौभाग्याचं लेणंच ते ! ९ वी पर्यंत पीटीच्या तासाला शिवाजी व्यायामशाळेच्या मैदानावर सर्वांच्या पुढे... मात्र दहावीत काही तरी कारण सांगून वर्गातच. शनिवारी संपूर्ण शाळेची मास ड्रिल अर्थात एकत्रित पिटी ! हात करतांना काय धाक असायचा शिक्षकांचा... एव्हढ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सरांचे लक्ष कुळकर्णी हात सरळ हात सरळ. 

आदरणीय मु. कृ. पाध्ये सर 
आमच्या शाळेचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे मुख्याध्यापक मुकुंद कृष्णाजी पाध्ये ! (नुकतेच त्यांचे निधन झाले) शनिवारी सकाळची शाळा उशिरा येणाऱ्या मुलांना चढ्या क्रमाने शिक्षक... पहिल्यांदा २५ , ५० उठबशा, त्यानंतर आलेल्यांना हातावर वेताच्या छडीचे फटके ३, ५, १० त्यानंतर आल्यावर दोन्ही आणि वरुन कोंबडा करुन उभे राहा ! तास सुरु असतांना मुख्याध्यापकांचा राउंड असायचा खिडकीतून लक्ष आणि पुन्हा लक्ष नाही किंवा काही रिकामे काम करतांना दिसला कि आहेच... १०० मीटर रनिंग, लांब उडी, उंच उडी, खो खो, क्रिकेट... याच्या जोडीला नाटके, गीत गायन, वेगवेगळ्या स्पर्धा ! अभ्यास तो पण होताच कि.... या सगळ्या गोष्टींची तयारी भूतो न भविष्यती ! तुम्हाला कितीही चांगले झाले वाटले तरी गुरुजींचे समाधान कुठे ? परत सुरु... मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा... जीवनात जिद्द, मेहनत, सातत्य, वचनबद्धता, समर्पण, संयम, सातत्य हे सर्व आले येथून अर्थात तेव्हा हे शब्द गावी पण नव्हते. म्हणून तर हा सुवर्णकाळ ! एव्हढे सर्व असल्यावर कोणाला हवी सुट्टी ? जीवावर यायचे सुट्टी असली कि... हेच शाळेचं यश आणि उद्देशही आणि म्हणूनच हि दीर्घ कृतज्ञता ! 

या जोडीला अजून इतर परीक्षा असायच्या त्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी आणि गणिताच्या ४ परीक्षा दरवर्षी एक एक करीत ९ वी पर्यंत बहुतांश मुले द्यायचीच... तरखडकर इंग्रजी ग्रामर तेथे कळालं. ज्यांना चित्रकलेची आवड त्यांच्यासाठी एलिमेंटरी, इंटरमिजीएट. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गीता पठण, कणकवलीची राज्य बाल्य नाट्य स्पर्धा, मनाचे श्लोक, जोडीला लक्ष लक्ष सूर्य नमस्कारासारखे उपक्रम, एनसीसी कॅम्प... स्पोर्ट मीट / वीक वगैरे भाग नव्हता कारण तो रोजचा भाग होता. सर्वच मुले हुशार आणि प्रत्येकामुळे शाळेला एक वेगळी ओळख. अर्थात हुशार म्हणजे ज्याच्या त्याच्या विषयात म्हणजे अभ्यास, खेळ, वक्तृत्व, वादविवाद, नाटक, गाणे... काही ना काही तर प्रत्येकात आहेच नं ! तेच शोधून त्यावर काम करणे हेच शाळेचे ध्येय. 

शाळेचा शिक्षकवृंद !
मधल्या सुट्टीतही कबड्डी, क्रिकेटच्या मॅचेस चालू असतील स्कोर पाहायला बाहेर जाणार खास स्कोर लिहिले जायचे परतीला वेळ झाला कि आहेच पुन्हा... बाहेर गाडीवर मिळणाऱ्या गोळ्या, अमुन्या, वाळलेली बोर असो. शाळे शेजारीच स्वस्तिक चित्र मंदिर (थिएटर) काही वेळेस टॉकीजमधील पिक्चरचे डायलॉग गाणे स्पष्ट ऐकू यायचे. मस्ती केली तरी पाय वाकडे पडणार नाही याची काळजी... विचारांची पक्की बैठक अर्थात त्यामागे होती शाळेतील शिक्षकांची मेहनत. शाळा म्हणजे खरे तर शिक्षक ६ वीला श्री. एस. एस. मुसळे सर, ७ वीला श्री. ह. म. भंडारी, ८ वी श्री. आर. एस. जहागीरदार, ९ वीला एन. एन. शाह आणि दहावीला श्री. शा. रा. नाईक प्रत्येकाचे एक वेगळेपण , वैशिष्ट्य... असेच गणिताचे श्री. व्ही. वाय. दाबके, इतिहासाचे श्री. मदनलाल मिश्रा, संगीत कलाचे श्री. रत्नाकर रानडे आणि एनसीसीचे श्री. आर. एस. पाटील. सर्व नररत्नांची खाणच... नाही याच्यापुढे लिहिता येणार. माणूस घडणं, माणूस उभा राहणं इतकी सोपी गोष्ट नाही मात्र ते करु शकते ती समाजजीवनातील शाळा नावाची व्यवस्था ! अशा शाळा आणि अशी व्यवस्था भारतीय संस्कृतीची धरोहर आहे. त्यातूनच निर्माण होणारा वसा आणि वारसाही ! त्यासाठीच शाळेप्रतीची कृतज्ञता... विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची हि कृतज्ञता अशीच कायम संक्रमित होत राहो ज्यामुळे संस्कृती व राष्ट्र चिरकाल टिकेल... हिच बा गणराया चरणी मनापासून प्रार्थना  ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

4 comments:

  1. छान लेख !

    विजय कुळकर्णी .

    ReplyDelete
  2. बिनभिंतीची उघडी शाळा
    लाखो इथले गुरू
    झाडे-वेली-पशु-पाखरे
    यांसी दोस्ती करू...
    किंवा दत्तात्रेयांचे २४ गुरू हे जरी खरे असलं तरी कोणापासून काय बोध घ्यावा..
    हे शिकण्यासाठी प्राथमिक - माध्यमिक शाळेचं महत्व अबाधित..

    ReplyDelete
  3. गिरीषजी खूप छान व्यक्त झालात.
    स्मृतींना छायाचित्रांनी जिवंत केलं.
    खरंय, ज्या शाळेत शाळा सुटू नये असं वाटतं, तिच खरी शाळा.

    ReplyDelete
  4. खूप छान अभिव्यक्ती सर,खरच सर,आपण आयुष्यात शाळा आणि शाळेतील शिक्षक कधीच विसरू शकत नाही.

    ReplyDelete