Monday 31 August 2020

कृतज्ञता निसर्गाची !


आशा फौंडेशनच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित "कृतज्ञता उत्सवा"ने आपल्या सर्वांना भावना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या जीवनात अनेक गोष्टी सहज मिळालेल्या असतात जसे पहा न , निसर्ग किती भरभरुन देतो निरपेक्षपणे आणि निरागसतेने ! आज सर्वांनी आपल्या भावना व्यक्त करीत असतांना आपण कसा नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिरेकी वापर करुन त्याचा ऱ्हास करुन घेत आहोत याविषयीची खंत व्यक्त केली आह. सोबत त्याची किती मोठी किमंत अनेकदा मोजावी लागली आहे त्याचेही उदाहरण दिले आहे. आसूच जास्त आणि हसू कमी यामागची कारणमीमांसा अतिशय छान पद्धतीने केली आहे. "कोरोना" आणि " त्सुनामी" यासारख्या नैसर्गिक आघातांचा उल्लेख अनेकांच्या भावनांमध्ये आला आहे. निसर्गाचा सकारात्मक व नकारात्मक आविष्काराची अनेक उदाहरणेही दिली आहेत. अनेकांनी आपल्या भावनांना व्यक्त करतांना काव्यपंक्तींचा चपखलपणाने केलेला वापर त्यांचा व्यक्त होण्याचा परीघ रुंदावतात. सर्वांनीच निसर्गाची महती सांगितली आहे व ती जाणीव जागृतीची पावती आहे. मला व्यक्तिगत निसर्ग फार भावतो आणि त्याचा मनमुराद आनंद घ्यायला आवडते अर्थात त्याला कुठल्याही प्रकारची इजा न करता. आपल्या सर्वांच्या विचारांचा मागोवा घेत माझी निसर्गाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करीत आहे. 

लहानपणापासून "साधी राहणी व उच्च विचारसरणी" ही उक्ती ऐकत आलो आहे आणि त्याचा सर्वात निकटचा संबंध नैसर्गिक जीवनशैलीशीच आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा जन्मच मुळी देण्यासाठी झालेला आपण पाहतो. सावली देणारे झाड त्याचा उपभोग घेणारा तोडतो. त्याच्या विविध घटकांचा फायदा त्यालाच होत असते. पाणी प्रदूषण करणाऱ्यालाच नदी स्वच्छ, चांगले व मुबलक पाणी देते. निसर्गातून ऑक्सिजन घेणाराच त्याचे प्रदूषण करतो. या सर्व गोष्टींमुळेच मानवी जीवनासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे याचे कारणच दातृत्वाचा वसा घेतलेल्या या निसर्गाप्रती आपण कायम कृतज्ञ असले पाहिजे. निसर्गातील जैव विविधता हे त्या निसर्ग  साखळीचे घटक आहेत. जंगल, जमीन आणि पाणी हे मूलभूत घटकावरच निसर्गातील जीवसृष्टी अवलंबून आहे. यात झालेले कोणतेही असंतुलन जीवसृष्टीच्या मुळावर उठणारे व आपल्या अस्तित्वाचा प्रसन्न निर्माण करणारे आहे एव्हढेच लक्षात घेतले तर आपली वृत्ती व कृतीत बदल होऊन ती निसर्गानुकूल होण्याची शक्यता वाढणार आहे. गरज, हव्यास आणि लोभ यांचे अर्थ समजून घेतले तर अपेक्षित कृती अधिक जाणीवपूर्वक होईल. बालकाच्या जीवनातील निरागसता समजून घेतली तर आपण आपल्या या निसर्गाला निश्चितच जपू शकू त्यासाठीच वैयक्तिक जीवनात प्रयत्न करीत असतो. 

मुळात भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टींचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून न घेतल्याने आपण तिला नावे ठेवू लागलो किंवा दुर्दैवाने ते प्रतिष्ठेचे ठरताना दिसते आहे. ग्रामीण भागात शेती आधारित कुटुंबात जन्म झालेला असल्याने निसर्गाची कायम ओढ असते. निसर्ग आपल्याला अनेक गोष्टींची पूर्वसूचना देत असतो. निसर्गाची ही भाषा आपण ऐकायला व समजून घ्यायला शिकले पाहिजे. निसर्गाशी संवाद साधायला शिकले पाहिजे. कोणत्या ऋतू व हवामानात कोणती पिके येतात, कोणते पक्षी स्थलांतरित होतात, कोणते खाद्य पदार्थ खाल्ले पाहिजे यासह अनेक गोष्टी आपल्याला निसर्गतः माहिती असतात नव्हे त्या आपल्याला त्या ज्ञात करुन दिल्या जातात. चातुर्मासात वातड पदार्थ वर्ज्य असतात, अपचन झालं तर लंघन करावे यासारख्या अनेक गोष्टी घरातील ज्येष्ठ आपल्याला सांगत असतात. आपण डोळसपणाने त्याचा अंमल आपल्या जीवनात केला पाहिजे.  

या सर्व गोष्टींचा आधार मला भगवद्गीतेत सापडतो. भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे, गीतेच्या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष आचार सृष्टीत दिसतो तो मानवाने शिकून घेतला पाहिजे. "मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः" याचा अर्थ सर्व मानवांनी ईश्वराच्या मार्गाचे अनुसरण करावे. या मार्गाचे दर्शन आपणास प्रत्यक्ष सृष्टीत दिसते. सूर्य उगवतो, त्यामुळे कमळे उमलतात, लोक आपापल्या कार्याला लागत. सृष्टी जागी होऊन कार्यरत होते, या सर्व सृष्टिकार्याची ऊर्जा सूर्यापासून मिळते. सूर्य उगवला नाही तर ही कार्ये थंडावलेले असतील. एवढी कार्ये करतो मात्र त्याचा अहंकार नाही. सूर्यापासून मिळालेल्या ऊर्जेचे कोणी काय करावे हे तो ठरवीत नाही. तो ऊर्जा देण्याचे त्याचे काम करतो, त्या बदल्यात काही प्राप्त व्हावे अशी अपेक्षा नाही. 

वृक्ष वाढतात, त्याला फळे, फुले येतात. पक्षी त्यावर घरटी बांधतात. सावलीत जीव विश्रांती घेतात. काही मुले दगड मारतात तर काही त्याला झोपला बांधतात. याचा वृक्षाला अहंकार नाही. यासाठीच भगवान कृष्ण सृष्टीकडून जीवनाचे धडे घ्या असे म्हणतात. सृष्टीमध्ये एक सहज जीवन व्यवहार दिसतो. मानवाखेरीज सारी सृष्टी एकात्मतेवर उभी आहे. सृष्टीतील प्रत्येक व्यवहार एक दुसर्याशी जोडलेला व पूरक आहे. घरामधील सर्वांचा व्यवहार यावर आधारित असल्याने कुटुंबातच त्याचे बाळकडू मिळाले आणि ते दीर्घकाळ आचरणात राहील असेच आहे. आपण सर्वांनीही हेच तत्व आपल्या कृतज्ञतेच्या भावनेतून व्यक्त केलेले दिसते. जीवनात निसर्गानुकूल जीवनशैलीचा पुरस्कर्ता राहिलो आणि त्यासाठी आमच्या कार्यातून कायम त्यासाठी प्रयत्नशील आहे. यावर्षीची आशा फौंडेशनची मध्यवर्ती संकल्पना ही "रुप पालटू वसुंधरेचे... नैसर्गिक जीवनशैलीने" त्यासाठीच आहे. 

निसर्गातील पंच तत्वांनी निर्माण झालेल्या व त्याच पंच तत्वात विलीन होणाऱ्या मानवाचे निसर्गाशी अतूट असे नाते आहे. जगण्यासाठीचा सर्व गोष्टी देणाऱ्या या निसर्गाप्रती आपण कृतज्ञ आहोत. निसर्ग जतन व संवर्धन करण्याचा वसा आणि वारसा अधिक जोमाने पुढे नेऊ या ! गुरु, सखा व सोबती असलेल्या निसर्गाचे वैभव टिकविण्यासाठीचे सामर्थ्य आम्हास दे... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

2 comments:

  1. गिरीषजी....
    साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच जीवनाचं तत्वज्ञान मानलं तर निसर्गाची हानी होणार नाही ही आपण व्यक्त केलेले मत योग्यच आहे. निसर्गाचे आपणावर अगणित उपकार आहेत आणि तायाचं कदापी फिटणार नाही. जे आपल्याकडे आ ए त्याचं आपल्याला मोल नसतं. आपल्या या उपक्रमाने मला निसिर्गाचं ऋणाईत होता आलं हेच माझे समाधान !
    धन्यवाद.

    ReplyDelete
  2. 'रुप पालटू वसुंधरेचे...नैसर्गिक जीवनशैलीने'ही आशा फाउंडेशनची अभिनव संकल्पना साकार होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छाही!
    -अनिल रामभाऊ पाटील

    ReplyDelete