
आधारवड दादा अर्थात राजाभाऊ याज्ञीक ! आज ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या निरामय आयुष्यासाठी व शतायुषी वाटचालीसाठी आमच्या धानोरकर कुळकर्णी परिवाराच्यावतीने मनापासून शुभेच्छा ! मागील महिन्यात अतिशय भावपूर्ण व हृदयस्पर्शी असा दादांचा सहस्रचंद्र दर्शन सोहोळा त्यांच्या परिवाराने आयोजित केला होता. तेव्हापासून दादांविषयी लिहावे असे सुरु होते. मात्र त्याला आजचा दिवसच सुयोग्य वाटला. दादांबद्दल लिहितांना सहस्रचंद्र दर्शन सोहोळ्यात अनेकांच्या भावना ऐकल्यावर त्यांचा उल्लेख आधारवड म्हणून करावासा वाटला. कारण ज्याप्रमाणे वडाच्या महाकाय वृक्षाच्या आश्रयाला सर्वच पशु-पक्षी येत असतात. त्याच्या छत्रछायेखाली निर्धोकपणे, आश्वस्ततेने व निर्भीडपणे सर्वच जीवजंतू आश्रय घेतांना दिसतात. त्याचप्रमाणे याज्ञीक दादांच्या आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांचाच झाला. भारतीय संस्कृतीत कुटुंबव्यवस्थेचे मोल सर्वाधिकआहे. संयुक्त पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत त्या कुटुंबाचा चालक वयस्क, समजदार, विवेकी, दांडगा अनुभवी, सगळ्यांना आपलंस करणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा, सर्वांची काळजी घेणारा असतो. त्याच्या कर्माने त्याला हि भूमिका प्राप्त होत असे. त्यातून त्याचे आधारवडाचे रूप साकारले जाते. तीर्थरुप राजाभाऊ याज्ञीक अर्थात दादा केवळ याज्ञीक परिवारासाठीच नव्हे तर संपर्कातील सर्वांसाठी आधार ठरलेले अनुभवास येते आणि म्हणून ते एका विस्तारित याज्ञीक परिवाराचे आधारवड आहेत असे मला वाटते.
दादा... या नावात एक जादू आहे. माझ्या आयुष्यावर एक वेगळाच प्रभाव या शब्दाचा कायम राहिला. आम्ही वडिलांना दादा म्हणत असू... त्यांच्या पश्चात आयुष्यात त्यांची जागा आपल्या कर्तृत्वाने मिळविलेले दोन दादा आले. एक म्हणजे डॉ. अविनाश आचार्य आणि दुसरे श्री. राजाभाऊ याज्ञीक... खरोखर या दोघांनी पुत्रवत प्रेम केले. आज श्री राजाभाऊ याज्ञीक ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत... आम्ही सर्व भाग्यवान आहोत आम्हाला त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या निरामय दीर्घायुष्याची परमेश्वराजवळ प्रार्थना करीत असतांना त्यांचा संस्कारित वारसा जपण्याची सुबुद्धी आम्हास देवो हीच प्रार्थना ! वर म्हटल्याप्रमाणे भारतीय संस्कृती कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व सांगते आणि याज्ञीक परिवार त्याचा आदर्श समाजासमोर ठेवतो. आजच्या भौतिक व व्यावहारिक जगात प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जात असतांना याज्ञीक परिवार ती श्रीमंती माणसांमध्ये शोधतांना आपल्याला दिसतो. नातेसंबंधासोबत समाजाचा याज्ञीक परिवाराचा एक गोतावळा आहे आणि तो सांभाळण्याचा व जोपासण्याचा वसा दादांनी आम्हा सर्वांना दिला आहे. प्रयेकाच्या वाढदिवसाच्या दिवशी , दसरा आणि संक्रांतीचा नमस्कार चुकला तर आणि महिन्याभरात भेट झाली नाही तर आठवणीने फोन करणारे दादा कौटुंबिक ऋणानुबंध घट्ट करतात.
दादा हे खरोखर एक अजब रसायन आहे. अशी माणसे अपवादाने घडतात. त्यात कुटुंबाचे संस्कार, समाज व्यवस्थेचे भान याचा प्रभाव असतोच मात्र त्यापलीकडे जाऊन विचार करण्याची, प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांची तयारी त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख ठरते. आज दादानाच्या संपर्कातील व्यक्ती ज्या पद्धतीने भरभरून आपलेपणाने बोलतात त्याचे मूळ दादांनी केलेल्या बीजारोपणात सापडतात. मी, माझं या पलीकडे जाऊन आपलं म्हणून सतत कार्यरत राहण्याची किमया सर्वांना साधतेच असे नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या परिवार सदस्यांची साथ तेव्हढीच महत्वाची ठरते. माणसाने आपला भूतकाळ कधीही विसरू नये असे म्हणतात याचा अर्थ आपले दिवस, तात्कालिक परिस्थितीची जाण विसरू नये. माणसाची संवेदनशीलता जागरूक ठेवण्याचे काम हा भूतकाळ करीत असतो. या संवेदनशीलतेचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता करत येणं याला माणुसकी असे म्हणतात. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी, कौटुंबिक व सामाजिक काम करीत असतांना या मानवतेची अनुभूती देण्याची संधी प्रत्येकालाच लाभत असते. दादांनी वेळोवेळी हि संधी घेतल्याचे लक्षात येते. त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाला झळाळी आल्याचे दिसते.

अशा एका विलक्षण व्यक्तिमत्वाच्या परिवाराचा एकदा का आपल्याला स्पर्श झाला कि तुम्ही त्या परिवाराचे होऊन जातात. याज्ञीकांच्या संगे तुम्ही बिघडला , तुम्ही बिघडला याज्ञीकमय झाला... याची आपल्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. हे बिघडणं कुटुंबातील आनंद, समाधान, परस्परातील संवाद, निःस्वार्थ सेवा, निर्व्याज प्रेम याच प्रतीक आहे. कुणाच्याही सुखदुःखात सहभागी होणारे दादा, अन्नपूर्णेचा प्रसाद देण्यात कायम सर्वांच्या पुढे असतात. भावना आणि व्यवहार यातील समन्वय दादांनी फार छान साधलाय. स्व. सौ. अपेक्षा या आपल्या सहधर्मचारीणीची भूमिका त्यांच्या पश्चात दादा समर्थपणे सांभाळत आहेत. सहजपणाने जीवन जगात असतांना परहितदक्षतेला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सात्विकता अधिक असते. दादांच्या जीवनातील असे अनेक प्रसंग मला माहिती आहे जे याची प्रचिती देतात. भारतीय संस्कृतीत सांगितलेल्या चार आश्रमाचे पालन दादांच्या जीवनात दिसते. भावना आणि व्यवहार यातील समतोल साधत आपल्या पुढच्या पिढीला जबाबदारी देत निर्णय क्षमता विकसित करण्याचे काम दादांनी सहज केल्याचे लक्षात येते.
याज्ञीक परिवाराने ति. दादांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहोळ्याचे आयोजन त्यांच्याप्रतीची आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक संस्कार आहे आणि त्यात आम्हाला सहभागी करून घेतले याचा विशेष आनंद आहे. दादांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल मला नेहमीच आदर वाटला आहे. त्यांची एकूणच जीवनी अंतर्मुख करणारी असून मनात काही प्रश्न निर्माण करते. या प्रश्नाच्या माध्यमातूनच आपल्यासमोर दादांचे स्वभाव वैशिष्ट्ये आपल्यासमोर मांडणार आहे.
पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे दादांसारखी माणसे आजच्या जगात कशी घडतात ? मला या प्रश्नाचे उत्तर तुकाराम महाराजांच्या एका अभंगात मिळते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी... तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे शुद्ध बीजापासून चांगल्या आणि रसाळ फळांची उत्पत्ती होते तसेच संसारात जे शुद्ध व पवित्र अशी मंडळी आहेत त्यांच्या पासून चांगल्या आणि उच्च दर्जाच्या संततीची निर्मिती होते. ते पुढे म्हणतात अशा लोकांची वाणी ही मधुर असून अमृतासमान असते आणि हे लोक स्वतःचा देह देवाची अखंड सेवा करण्यात खर्ची घालवतात. अशी माणसे सर्वांगाने निर्मळ असून त्यांचे मन गंगेप्रमाणे निर्मळ आणि पवित्र असते. तुकोबाराय म्हणतात अशा ह्या लोकांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा लोकांचे त्रिविध ताप जाऊन त्यांच्या मनाला तात्काळ विश्रांती मिळते. आपण सर्वजण या मताशी सहमत व्हाल कि दादांच्या पालकांचा संस्कार आणि तोच संस्कार संक्रमित करून त्यांची पुढची पिढी दादांनी घडविली आहे.

तुमच्या पैकी किती जणांची ६० वर्षांची मैत्री आहे ? जाऊ देत आपल्या वयाच्या किमान निम्म्या वयाची मैत्री किती जणांची आहे ? याज्ञीक दादांची मैत्री आहे आणि ती पण दोन-चार जणांशी नाही. मला चांगले आठवते आणि मी त्याचा साक्षीदारही आहे. दादांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यातील मैत्रीदिन दादांच्या पुढाकारातून साजरा करण्यात आला होता आणि त्यासाठी दादांच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. बालपणापासूनचे अर्थात १९५४ पासूनचे गल्लीतील, शाळेतील, बाहेरचे, नोकरीच्या ठिकाणचे, सामाजिक कामातील असे सुमारे ६०-६५ मित्र एकत्र आले होते. आजही हि मैत्री टिकून आहे.

पुढचा प्रश्न आहे सामाजिक जबाबदारी पार पाडतांना तुम्हाला परत मिळणारे प्रतिष्ठेचे अध्यक्षपद तुम्ही तुमच्या सहकाऱ्याला द्याल ? नाही ना... दादांनी ती किमया साधली आहे. मुळात एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या व सरकारी नोकरीत असलेल्या चाकोरीबद्ध जीवन असलेल्या व्यक्तीला समाजाशी फारसे घेणे-देणे नसते. ति. दादा मात्र याला अपवाद ठरले व ठरतात. समाजमान्यतेने समाजातील ब्राहमण सभेसारख्या एका नावाजलेल्या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात अध्यक्षपद सर्वानुमते मिळणे हि त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची पावती ठरते. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने दादांनी ब्राह्मण सभेची अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. मात्र परत पुढच्या वेळी तीच संधी मिळत असतांना त्यांनी ती आपल्या सहकाऱ्याला देत एक आदर्श वस्तुपाठ समाजासमोर ठेवला आहे, समाजाचे नेतृत्व करण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि ती योग्य वेळी मिळाली तर तिला न्याय देता येतो यासाठीच तर त्यांनी हे पाऊल उचलले नसेल ? याचप्रमाणे कर्मचारी संघटनेच्या कामातील त्यांचा पुढाकार व सहभाग अनेकांच्या जीवनासाठी उपकारकच ठरला आहे आणि त्याची जाणीव या बांधवांना आहे.
आणखी एक प्रश्न तुमच्याकडे संपर्कातील किती लोकांचे फोन नंबर आहेत ? त्यातील किती जणांच्या जन्मदिनाच्या वा व्यवसायाच्या वर्धापनदिनाच्या तारखा तुम्हाला माहिती आहेत ? आणि त्यातील किती जणांना तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी फोन करता ? दादा हे असे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे त्यांच्या संपर्कातील हजारो लोकांचे फोन नंबर व जन्म तारीख आहे. प्रत्येकाला न चुकता ते फोन करतात. हा फोन कधीही उपचार नसतो कारण त्यात शुभेच्छांसोबत इतर गोष्टींची, कुटुंब सदस्यांची चौकशी असते. संबंधित व्यक्तीच्या जीवनाशी गोष्टींवर चर्चाही असते. त्यातील किती जण आठवणीने त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी फोन करत असतील ? तरी दादा त्यांचे हे माणसे जोडण्याचे व्रत अव्याहतपणे सुरु ठेवतात. आत्मीयता व आपलेपणा कसा जोपासावा याचे दादा एक उदाहरण आहे. मला यातील निरलस, निरपेक्ष, निःस्वार्थ व निरागस भाव अधिक महत्त्वाचा असतो.
तसे खूप सारे प्रश्न आहेत पण एक शेवटचा प्रश्न... तुम्ही तुमच्या संपर्कातील कोणाकडे दुःखद घटना घडली तर पूर्ण १३ दिवसांची काळजी घेतात ? ति. दादा हि जबाबदारी समर्थपणे पाळत आलेत. अलीकडच्या काळात त्यांची पुढची पिढी तितक्याच तन्मयतेने, आपलेपणाने हे कार्य करतांना दिसतात. केवळ दुःखद प्रसंगी नव्हे तर सुखाच्या वेळी, अडीअडचणीला कोणी बोलावेल, सांगेल अशी वाट न पाहता आपण केले पाहिजे या कर्तव्यबुद्धीने याज्ञीक परिवार हे कार्य करतांना दिसतात. जीवनाचं वास्तव स्वीकारत आनंदी व समाधानी जीवनाचे धनी असलेल्या दादांना परमेश्वर कायम आनंदी व समाधानी ठेवो हि सद्गुरू सखाराम महाराजांच्याचरणी प्रार्थना !
आपण ति. राजाभाऊ याज्ञीकांचे अर्थात दादांचे अभिष्टचिंतन करू शकता त्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक देत आहे. ९४२१०८३६२२
(या लेखाच्या निर्मितीत मित्रवर्य मिलिंद पुराणिक यांच्याशी दादांबाबत केलेल्या संवादाचा मोठा हात आहे.)
गिरीश कुळकर्णी