Monday 28 February 2022

आव्हान नैसर्गिकतेचा वारसा देण्याचे !

तुम्ही आम्ही पालक - मार्च २०२२ 
माणूस हा भूतलावरील इतर प्राण्यांप्रमाणेच एक सजीव प्राणी आहे. माणसाव्यतिरिक्त अन्य सजीव प्राण्यांची जीवनपद्धती बहुतांश सारखीच आहे. उदरनिर्वाह वा जगण्यासाठी खाणे आणि स्वसंरक्षण करणे हि प्रत्येक सजीवाची प्राथमिकता आहे. यासाठी लागणारी कौशल्ये त्या-त्या सजीवांमध्ये उपजत असतात. काही उन्नत सजीवांमध्ये स्वतःसाठी निवारा बनविण्याचे कौशल्यही उपजत दिसून येते. माणसामध्येही हि कौशल्ये उपजत आढळतात. मात्र माणूस हा आपल्या बुद्धी कौशल्याच्या आधारे इतरांपेक्षाही अधिक विकसित होतांना दिसतो. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या मूलभूत गरजांमध्ये वाढच झालेली आपल्याला दिसते. माणसाच्या गरजा जेव्हढ्या जास्त तेव्हढे त्याचे जीवन आधुनिक व उच्च मानले जाते. मात्र ज्या व्यक्तीच्या मूलभूत गरजा कमी त्या व्यक्तीचे जीवन अधिक साधे व नैसर्गिक असते.  

माणसाच्या मूलभूत गरजांमधील वाढ अनुकरणप्रियतेतून आणि नित्य नूतनतेच्या ध्यासातून झालेली दिसते. स्वप्नांच्या दुनियेत रमणाऱ्या माणसाला जिज्ञासा, कल्पकता याचे वरदान बुद्धीद्वारे प्राप्त झाले आहे. माणसाच्या वैयक्तिक जीवनातील अमर्याद भौतिक गरजांच्या पाठलागांमुळे जागतिक पातळीवर अनेक व्यापक परिवर्तने अनुभवास येतात. भौतिक गरजांसोबतच माणसाला अभौतिक गरजांची कायम आस राहिली आहे. यात प्रेम, आधार, सोबत  यांचा समावेश करता येईल. मानवी मनाची भावनिक तृप्ती करण्यासाठी तो अनेक मार्गाने प्रेम, भीतीच्या चिंतेतून मुक्त होण्यासाठी आधार व जीवनविषयक समस्या सोडविण्यासाठी सोबत याच्या मागे आजन्म धावत राहतो. याला स्वातंत्र्य, समता आणि सहकार्य यांचीही जोड मिळाली.

तुम्ही आम्ही पालक - मार्च २०२२ 
व्यापारी  बाजारपेठांनी मानवी स्वप्नांना व त्याच्या मूलभूत गरजांची धडपड ओळखून आपल्या नाविन्यपूर्ण मार्केटिंगच्या आधारावर त्याला अधिकाधिक भोगवादी बनविण्यास बाध्य केले आहे. आपल्या भोवताली अशा स्वप्नांच्या मार्केटिंगचा सध्या सुकाळ दिसतो. माणसाच्या या भोगवादाने माणसाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेले दिसते. त्यामुळेच या अंकासाठी हा विषय निवडला असावा असे मला वाटते. आगामी काळात माणसाला मिळालेल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करुन हि पृथ्वी येणाऱ्या पिढ्यांना व अन्य सजीवांना जगण्यासाठी उपयुक्त राहील यासाठीच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच मानवाने आपल्या गरजा मर्यादित ठेवत नैसर्गिक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा वारसा पुढे देण्याचे मोठे आव्हान आजच्या सामाजिक स्थितीवरुन लक्षात येते,

सध्याच्या काळातही सुशिक्षित महिलेच्या सोन्याच्या बांगड्यांना पॉलिश करुन चाकाकण्याचे आमिष दाखवून लुटले अशा बातम्या वाचनात येतात. जास्तीचे व्याज मिळण्याच्या आशेने केलेल्या गुंतवणुकीची मूळ रक्कमही मिळत नाही. भांडवली बाजारात केलेल्या गुंतवणुकीने देशोधडीला लागलेली अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. नोकरी लावून देण्याचे सांगत अनेकांना गंडा यासारख्या अनेक घटना आपल्या दैनंदिन जीवनात घडत असतात. असे घडते असे माहित असूनही लोकं तो मार्ग का स्वीकारतात ? हा माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो. माणसाला मिळालेल्या बुद्धी या दैवी देणगीचा वापर करतो का ? असाही प्रश्न मनात येतो.

खरं तर जीवनात सुखी व आनंदी व्हावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते. अर्थात जो श्रीमंत (पैशाने) असून ज्याच्या घरात भौतिकतेच्या सर्व वस्तू आहेत, घरातील सदस्याने केलेली मागणी पूर्ण करण्याची,  पाल्यांना उत्कृष्ट शाळा (जास्त फी घेणारी), चांगला क्लास, चांगले कपडे, चांगले शैक्षणिक साहित्य, चांगले वाहन, चांगला व आधुनिक मोबाईल यासर्व गोष्टी देण्याची आर्थिक क्षमता कुटुंब प्रमुखाकडे असावी त्यासाठी लागणारा पैसा निर्माण केला पाहिजे किंवा असलेला पैसा यासाठी खर्च केला पाहिजे अशी आपल्याकडील माणसांची धारणा आहे. त्यासाठी कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त पैसे मिळविण्याच्या शोधात तो असतो. त्या आशेनेच तो अनेकदा अनेक गोष्टींना बळी पडलेला आपल्याला दिसतो. प्रसंगी स्वतःचा जीव गमावून बसतो.

शेजारच्या घरात आलेली प्रत्येक गोष्ट माझ्या घरात असली पाहिजे अशी स्पर्धा सर्वत्र निर्माण झालेली दिसते. या स्पर्धेतूनच इप्सित सध्या करण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची वा तडजोड करण्याची आजच्या माणसाची दिसून येते. समाजात रूढ व प्रस्थापित असलेल्या अनेक चुकीच्या गोष्टींना, धारणांना तसेच स्वतःच्या गृहीतकांना चिकटून राहण्याची वृत्ती माणसाला भोगवादासाठी प्रवृत्त करते. त्यात समाजाच्या प्रतिष्ठेसंदर्भातील संकल्पना भर घालतांना दिसतात. माणसाची सारासार विचार करण्याची पद्धत व विवेकवादी दृष्टिकोन कुठेतरी हरविलेला दिसतो.

समाज जीवनातील सर्वच क्षेत्रे मार्केटिंगच्या भुलभुलैयांनी ढवळून निघाली आहेत. मानवतेच्या नात्याने सुरु करण्यात आलेल्या सामाजिक संस्थांनाही याची लागण मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते अन  त्यामुळेच सामाजिक संस्थांची व त्यातील कार्यरत कार्यकर्त्यांबद्दलच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसते. पर्यायाने या क्षेत्रातील शुद्ध, सात्विक व अस्सल कार्यकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असलेले आपणास दिसते.

व्यापारी बाजारपेठेला माणसाच्या या अपरिहार्यतेची व मानवी स्वभावाची जाण असल्याने त्यांच्या भाव-भावनांना हात घालत आपले उद्दिष्ट साध्य करण्याची कोणतीही संधी घालविली जात नाही. त्यातही गरीब-श्रीमंतामधील वाढती दरी अर्थात आर्थिक विषमता या सर्व गोष्टींना खतपाणी घालण्याचे काम इमाने इतबारे करीत असते. माणसाला स्वत्वाची ओळख होणे यानिमित्ताने अगत्याचे वाटते. तसेच आपल्या जीवनविषयक संकल्पना स्पष्ट होण्याची आवश्यकता वाटते. पालकांनी आपला भूतकाळ न विसरता त्यातील योग्य वस्तुनिष्ठ गोष्टींचा, तत्वांचा, मूल्यांचा वारसा पुढील पिढीकडे संक्रमित करण्याची आवश्यकता आहे. योग्य ठिकाणी "नाही" म्हणण्याची सवय केली पाहिजे व पाल्यांना नकार पचविण्याचीही ! बाजारपेठेतील स्वप्नांच्या मार्केटिंगचा कितीही सुकाळ झाला तरी आपल्या भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या मूलभूत तत्वांचा अवलंब करीत भौतिक गरजा मर्यादित ठेवून नैसर्गिक जीवनशैलीचा स्वीकार करीत पुढील पिढीला कृतिशील संदेश या प्रश्नाचे उत्तर ठरेल असे वाटते.

गिरीश कुळकर्णी
9823334084

3 comments:

  1. स्नेही गिरीश जी,
    अत्यंत संवेदनात्मक रूप से आपने इस विषय की गहराई को रखा है। आवश्यकता से अधिक रखना यह एक तरह से सार्वत्रिक प्रश्न बन गया है। हम मानते हैं कि अधिक सामग्री से हमारी सुविधा बढ़ रही है किंतु असल में हमारी दुविधा बढ़ रही है। उपभोग की सीमा की अपनी एक मर्यादा है उसे लांघना एक तरह से लक्ष्मण रेखा को लांघने जैसा है, जिसमें हम अपना ही अस्तित्व को खतम करते हैं।
    हालांकि अधिक खरीदी करने की आदत होनी चाहिए किंतु वह अच्छा साहित्य व किताबें खरीदने में होनी चाहिए, तथापि यह आदत उसमें बहुत कम दिखाई देती हैं। इसलिए कई प्रकाशन मंदिर बंद होते जा रहे हैं और शोपिंग मॉल खुल रहे हैं। यह एक तरह से वैचारिक गिरावट का चिह्न है।

    आपका यह लेख हर एक व्यक्ति के लिए स्व-मूल्यांकन यानी की एक तरह से व्यक्तिगत ऑडिट करने का कार्य करेगा।

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लेख...

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर लेख......

    ReplyDelete