मदतीचा हात...
Wednesday 24 January 2024
प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा निमित्ताने...
Friday 22 December 2023
आयुष्यातील सुवर्णकाळाची कृतज्ञता : न्यू सिटी हायस्कुल
शाळेचे प्रवेशद्वार... |
अल्पानामपि वस्तूनां संहति: कार्यसाधिका।
तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिन:॥
अनेक छोट्या, क्षुल्लक वस्तुंना योग्य रीतीने एकत्र आणले असता मोठमोठी कार्येही सिद्धीस जाऊ शकतात. जसे की छोट्याछोट्या गवतांना जोडून बनविलेल्या दोरखंडाने शक्तीशाली हत्ती बांधले जाऊ शकतात. आम्हा सारख्या असंख्य विद्यार्थ्यांना एकत्रित बांधून समाजहितैषी समाज निर्माण करण्याचे कार्य करणारी शाळा आणि त्यातील शिक्षक "संहति: कार्यसाधिका!" या युक्तीने कार्यरत आहे. आयुष्यातील सुवर्णकाळ अनुभवण्याची संधी देणाऱ्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेख प्रपंच...
‘हि आवडते मज मनापासुनी शाळा... लाविते लळा ही जसा माऊली बाळा’ प्रल्हाद केशव अत्रे यांची ही बालपणीची कविता आठवली कि एका स्वप्नाच्या दुनियेत सफर करुन येतो. आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे शहरात मात्र शिक्षणाची समृद्धता आम्ही अनुभवली आहे. आजही त्या गोष्टी आठविल्या कि छाती अभिमानाने फुलून येते. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू सिटी हायस्कुलला प्रवेश घेतला तेव्हापासून सुरु झालेला हा प्रवास दहावीनंतर वेगळ्या वळणावर सुरु झाला मात्र न्यू सिटीने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आजही आयुष्यात लाभच होतांना दिसतो. बालवयात शाळेत जाण्यासाठी त्रास देणारा मी न्यू सिटीत आल्यावर मात्र 'शाळेत हो मी जाणार, पाटी घेऊनी, घेऊनी पुस्तक अभ्यास मी करणार...' असे केव्हा म्हणायला लागलो कळलेच नाही. न्यू सिटी असे नाव आलं तरी आयुष्य समृद्ध करणारा हा चित्रपट डोळ्यासमोरुन झर्रकन पुढे जातो. शाळेचा कधी कंटाळा आला नाही किंवा कधी टाळलीही नाही. अभ्यास, खेळ, वाचन यासह अनेक गोष्टी घडत होत्या आणि आम्ही त्या आनंदाने करीत होतो. मराठी माध्यमाची जरी शाळा असली तरी इंग्रजीची अवास्तव भीती वा न्यूनगंड शाळेने कधीही निर्माण होऊ दिला नाही.
शिक्षक वृंदासह अलीकडचा फोटो... |
आदरणीय मु. कृ. पाध्ये सर
मुख्याध्यापक मु. कृ. पाध्ये सर... |
या जोडीला अजून इतर परीक्षा असायच्या त्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी आणि गणिताच्या ४ परीक्षा दरवर्षी एक एक करीत ९ वी पर्यंत बहुतांश मुले द्यायचीच... तर्खडकर इंग्रजी ग्रामर तेथे कळालं. ज्यांना चित्रकलेची आवड त्यांच्यासाठी एलिमेंटरी, इंटरमिजीएट. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गीता पठण, कणकवलीची राज्य बाल्य नाट्य स्पर्धा, मनाचे श्लोक, जोडीला लक्ष लक्ष सूर्य नमस्कारासारखे उपक्रम, एनसीसी कॅम्प... स्पोर्ट मीट / वीक वगैरे भाग नव्हता कारण तो रोजचा भाग होता. सर्वच मुले हुशार आणि प्रत्येकामुळे शाळेला एक वेगळी ओळख. अर्थात हुशार म्हणजे ज्याच्या त्याच्या विषयात म्हणजे अभ्यास, खेळ, वक्तृत्व, वादविवाद, नाटक, गाणे... काही ना काही तर प्रत्येकात आहेच नं ! तेच शोधून त्यावर काम करणे हेच शाळेचे ध्येय.
शाळेची खरी श्रीमंती म्हणजे आमच्या शाळेचा शिक्षकवृंद !
शाळेचा समृद्ध शिक्षकवृंद... |
शाळेचे अंतरंग... |
विषय शिक्षणाबरोबरच जीवन विषयक दृष्टिकोन देणारे, व्यावहारिक जगाची ओळख करुन देणारे, आपल्यातील कला कौशल्याला विकसित करीत सर्वांगीण विकास साधणाऱ्या न्यू सिटीच्या शिक्षकांनी आयुष्यभराची जी शिदोरी दिली आहे त्याबद्दल कायम कृतज्ञ राहू. अर्थात हि कोणत्याही शिक्षकाची मागणी नव्हे तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या हृदयात आपल्या कृतीने निर्माण केलेली ती जागा आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे मिळविलेला तो सन्मान आहे.
इ. ७ वीत असतांनाच वर्गाचा फोटो... |
ज्या वर्गात शिकलो त्यात पुन्हा एकदा... |
अशा कितीतरी आठवणी आहेत पण तेवढ्या वेळ व शब्द मर्यादेमुळे लिहिणं शक्यही नाही. पण शाळेविषयी आणि शाळेतील आठवणींविषयी एवढंच सांगावसं वाटतं...
माझी शाळा जीवनाचा सुवर्णकाळ
निरागस, निष्पाप जीवांचा सुकाळ ॥
तेथेच झाली नांदी गमभनची
अन समृद्ध संस्कारित जीवनाची ॥
दंगा आणि मस्तीसाठी होते सखे-सोबती
त्यातूनच निर्मिली परमेश्वररुपी नाती ॥
त्याला नव्हत्या जाती-पातीच्या भिंती
जळती अखंड संस्काराच्या वाती
उजळती समृद्ध जीवनाच्या ज्योती ॥
स्वओळख आणि प्रगतीचा पाया
देई आत्मविश्वास ठाया ॥
ज्ञानमंदिरातील पूज्यनीय व्यक्ती
यशोमंदिरे उभविती ॥
अशी आमची शाळा होती....
अशी आमची शाळा होती... आहे... ॥
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Tuesday 21 November 2023
प्रत्येक दिवस असाच असावा !
Sunday 15 October 2023
गांधीतीर्थवरील दोन वर्षे : आनंद, अभिमान व प्रगल्भतेची !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Tuesday 10 October 2023
मानसिक आरोग्याचा मंत्र : आनंदी जगणं !
टीव्ही व समाज माध्यमही मानसिक गोंधळातच भर घालतांना दिसत आहे. सावधानता बाळगणे व संयमित राहणे या दोन गोष्टी आपल्याला काही बंधने घालण्यासाठी प्रवृत्त करु शकतात अर्थात त्यासाठी आपणच आपल्या जीवनाकडे डोळसपणे पाहणे अगत्याचे ठरते. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हि या निमित्ताने एक संधी आहे. आपण आनंदी असणे हे कुटुंबीय, सहकारी व मित्रपरिवार यासाठी आवश्यक आहे. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. कोवळ्या वयातील मुलांच्या आत्महत्या असो वा इस्रायल मधील युद्ध, कार्यालयातील कामाचा ताण असो वा कुटुंबातील आव्हाने असोत या सर्वांचा परिणाम आपल्यावर होतो व स्वाभाविकपणे तो आपल्या परिघातील प्रत्येकावर जाणते-अजाणतेपणी होत असतो. आपण कितपत आनंदी आहोत हे जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न स्वतःला विचारुन पहा.
Courtsey: Swapneela Sethia |
१. आपल्याला आपले आयुष्य हे बक्षीस आहे असे वाटते का ?
२. आपण स्वतःमधील व इतरांमधील चांगुलपणा शोधण्यासाठी सक्षम आहोत का ?
३. आपण आपल्या भविष्याबद्दल आशादायी आहात का ?
४. आपण आपल्या रोजच्या कामातून आनंद मिळवतो का ?
५. आपणास पदोपदी व क्षणोक्षणी आनंद वाटतो का ?
६. आपणास आपल्या जीवनात काहीतरी उद्देश व अर्थ आहे असे वाटते का ?
७. आपण कायम उत्साही असतात का ?
८. आपण इतरांना काही देतो त्यावेळेस आनंद मिळतो का ?
९. विपरीत परिस्थितीतही मी चांगले शोधू शकतो का ?
१०. दिवसभरातील भावनांचा स्वीकार व स्वागत करतो का ?
११. कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या नियमित संपर्कात असतो का ?
१२. जेव्हा परिस्थिती गंभीर असते त्यावेळेस पुढाकार घेऊन सहाय्य्यभुत होतो का ?
१३. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटते का ?
१४. भूतकाळातील निराशा व दुःख विसरु शकतो का ?
पहा... विचार करा... बदल करा... आपल्या निरामय दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Friday 14 July 2023
...तेथे कर माझे जुळती !
काही व्यक्ती पद, प्रतिष्ठा, अनुभव यासर्वांनी सिद्ध असूनही साधी असतात. त्यांच्या जगावेगळ्या कार्यकर्तृत्वाने ती प्रेरणादायी ठरतात. या माणसांची असामान्य चिकाटी, मेहनत, धडाडी आणि प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या वटवृक्षाप्रमाणे कडक उन्हात निश्चल उभे राहून दुसऱ्यांना मात्र सावली देण्याची उदार वृत्ती बाळगून असतात. या व्यक्ती पाहिल्या, अनुभवल्या आणि आठवल्या तरी कविवर्य बा. भ. बोरकरांच्या कवितेतील या काव्यपंक्ती सहज मनी येतात.
यज्ञी ज्यानी देउनि निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर, नाही चिरा नाही पणती ॥
हे सर्व आठविण्याचे कारण म्हणजे जीवनात अनुभवलेले आदरणीय डॉ. प्रताप जाधव ! मागच्या शुक्रवारी (दि. ७ जुलै) पंढरपूर येथे असतांना रात्री उशिरा त्यांचे निधन झाल्याचे कळले. अस्वस्थ झालो. सकाळी उठल्यापासून सोबतच्या सहकाऱ्याजवळ त्यांच्या आठवणी जागवतच दिवस घालवला. मागील ८ दिवसात एक दिवस असा गेला नाही कि डॉक्टर साहेबांची आठवण आली नाही. 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' म्हणजे काय आणि कसे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टरसाहेब. या देव माणसाशी चांगला संपर्क होता. कधीही भेट झाली कि परिवारातील एक सदस्य या नात्याने सहज भावाने बोलत. बोलणंही अघळपघळ असायचे. त्यात विषय वा अन्य कसलेही बंधन नसायचे. कायम हसतमुख. पेशंट कितीही तणावात असला तरी त्याचा ताण सहज दूर करायचे. मागील २५ वर्षात किमान १० वेळा तरी मी हा अनुभव घेतला आहे. कधी वैयक्तिक उपचारासाठी तर कधी नातेवाईकांसाठी. एका बाजूला उपचार, ऑपरेशन सुरु तर दुसऱ्या बाजूला हसतहसत बोलणे... एक शब्द सहज यायचा होईल ना ! बघू... काही विचारलं कि हा शब्द ठरलेला.
पूर्वीच्या दवाखान्यात वा आत्ताच्या दवाखान्यातील एक पाटी मला प्रचंड आवडायची. उक्ती ला कृतीची जोड दिल्यावर माणसाची प्रतिमा उजळून निघते. ती पाटी होती... 'खोटी बिले मागून सरकारी तिजोरी लुटू नये.' समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल चीड होती व त्यावर प्रखर, सडेतोड प्रतिक्रिया द्यायचे. स्पष्टवक्ता तर होतेच पण त्याला कृतिशीलतेची जोडही होती. यात कुठल्याही प्रकारचा 'अहं' भाव नसायचा. डॉक्टरांचा व्यवहार निर्व्याज होता. 'देगा उसका भी भला न देगा उसका भी भला' अशी वृत्ती होती. मानवी जीवनाचे नीतिनियम व व्यवहार इतक्या सहजपणे पाळत अर्थात त्यामागे त्यांची तपस्या होती. सकाळी एकदा दवाखान्यात आल्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत ओपीडी व ऑपरेशन्स चालत. मी कधीही त्यांना थकलेले पाहिले नाही. रात्री १०.३० वाजता पण तोच उत्साह असायचा. आपल्या आजाराबद्दल वा दुखण्याबद्दल कधीही बोलत नसत. विषय काढला तरी टाळत. आईच्या 'नी' रिप्लेसमेंट्च्या वेळी व काकूंच्या हिप जॉईन्टच्या वेळी या शस्त्रक्रिया आपण लवकरच सुरु करीत आहोत असे म्हणालेत. मात्र त्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही.
कविवर्य बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे परी जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती... आणि म्हणून मला म्हणावे वाटते ...तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Friday 19 May 2023
आपण सर्व 'जीवरक्षक' !
एखाद्या आपत्कालीन परिस्थितीचा शिकार झालेल्या व्यक्तीला पुनर्जीवन मिळवून देणारे हे तंत्र असल्याने त्याला बेसिक लाईफ सपोर्ट असेही म्हणतात. एखादा व्यक्तीची जर श्वसन क्रिया आणि हृदयक्रिया बंद पडून तो बेशुद्ध झाला असेल तर त्याला देण्यात येणारा अतिमहत्वाचा प्राथमिक उपचार म्हणजेच बेसिक लाईफ सपोर्ट... यालाच CPR किंवा जीवन संजीवनी क्रिया असे म्हणतात. रामायणात हनुमानाने संजीवनी वनस्पती आणून लक्ष्मणाला जीवनदान दिले होते. तशाच प्रकारची आपत्कालीन परिस्थितील व्यक्तीला जीवनदान देणारे हे तंत्र आहे. १० पैकी ३ व्यक्तींना त्याचा फायदा होतो अर्थात त्यांना जीवनदान मिळते.
CPR कोणीही करू शकतो. त्याला फारशा कौशल्याची आवश्यकता नसते. कोणीही जाणकार अर्थात CPR कसे द्यायचे हे माहित असलेला व्यक्ती छातीवर दाब व कृत्रिम श्वास देऊ शकतो. पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्या व्यक्तीची भूमिका महत्वपूर्ण ठरते. CPR केव्हा करावे ? याचे सोपे उत्तर आहे एखादी व्यक्ती बेशुद्ध आहे, तिची हृदयक्रिया व श्वसन क्रिया बंद आहे. अशा व्यक्तीला CPR करावे. जेव्हा परिस्थिती फारशी सुरक्षित न वाटल्यास किंवा माणूस प्रतिसाद देत असल्यास व शरीर थंड व कडक झाले असल्यास CPR करू नये. आपण CPR आहे त्याच जागी सुरक्षितता लक्षात घेऊन देण्यास सुरुवात करावी. जीवन संजीवनी क्रिया अर्थात CPR हि माणसाला जिवंत ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रियांची शृंखला आहे. आठ वर्षावरील स्त्री-पुरुष यांच्यासाठी आपण हि क्रिया करू शकतो.
जीवन संजीवनी क्रियेत ३ महत्वाच्या पायऱ्या आहेत. त्याला CAB म्हणतात. म्हणजे Circulation (रक्ताभिसरण), Airway (श्वसनमार्ग) आणि Breathing (श्वासोच्छवास). रक्ताभिसरणासाठी छातीवर दाब द्यावा. यासाठी व्यक्ती जमिनीवर असावी किंवा एखाद्या कडक – सपाट पृष्ठभागावर असावी. रक्ताभिसरण अखंडीत सुरु राहण्यासाठी छातीवर दाब देणे आवश्यक आहे. छातीच्या (बरगडीच्या) सर्वात खालच्या हाडाच्या दोन बोटे वरती हा दान देणे आवश्यक आहे. हाताची दोन्ही बोटे एकात एक गुंफून, कोपर सरळ ठेवून दोन्ही खांदे दाब द्यावयाच्या व्यक्तीच्या छातीवर असावेत. साधारणपणे एका मिनिटात १००-१२० वेळा दाब दिला पाहिजे. प्रत्येक ३० दाबानंतर छोटा पॉझ घेऊन CPR सुरु ठेवणे. साधारणपणे २ मिनिटात १५० वेळा दाब दिला गेला पाहिजे. छातीवरील दाबाचा भाग ५ सेंटीमीटर दाबला गेला पाहिजे. दाब सोडल्यानंतर छाती पूर्ववत झाली पाहिजे. दाब देण्याची क्रिया व्यक्ती शुद्धीवर येई पर्यंत वा तसा प्रतिसाद देईपर्यंत सुरु ठेवणे अपेक्षित आहे अन्यथा अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता कमी असते. दाब देत असतांना तो मोजला पाहिजे. आपण काही वेळात आपण थकणार असल्याने आजूबाजूच्या कोणा व्यक्तीला CPR देण्यासाठी तयार करणे. संबंधित व्यक्तीचा कोणताही प्रतिसाद मिळाल्यास त्याला एका कुशीवर करावे.
साधारणपणे CPR केव्हा दिला जातो त्याची उदाहरणे -
१. एखाद्या व्यक्तीला जर विजेचा शॉक लागत असेल तर त्याचा श्वास अडकतो. तेव्हा CPR देऊन आपण त्या व्यक्तीला कदाचित वाचवू शकतो.
२. जेवताना कधी कधी अन्न अडकल्यानंतर CPR देता येतो.
३. गोळ्यांचा आकार मोठा असेल तर ते देखील अडकण्याची शक्यता असते. तेव्हा CPR देता येतो.
४. विषबाधा झाल्यानंतर ते विष बाहेर काढण्यासाठी CPR देतात.
५. पाण्यात जर कोणी बुडत असेल तर त्याला वर काढल्यानंतर छातीवर दाब देऊन पाणी बाहेर काढल्यानंतर तोंडातून श्वास देऊन CPR दिला जातो.
६. अपघातात जास्त रक्त वाहून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.
७. एखाद्याच्या डोक्याला मार लागून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.
८. चक्कर येऊन पडल्यास CPR देता येतो.
यासह अनेक परिस्थतीत वरील तीनही लक्षणे आढळून आल्यास CPR देत येतो.
रोटरी क्लब सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, के. डी. पाटील मल्टीस्पेशॅलिटीच्या डॉ. लीना पाटील, पार्ष क्लिनिकचे डॉ. कल्पेश गांधी व भूलतज्ज्ञ डॉ. धीरज चौधरी यांनी प्रत्यक्षिकाद्वारे संपूर्ण प्रक्रिया , तसेच वेगवेगळया परिस्थितीत घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच अनेकांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. एका खेळाडूला सलग ६ तास CPR देऊन त्याला जीवनदान देण्यात आले. तसेच काश्मीरमध्ये झालेल्या एका अपघातातील ४ व्यक्तींना CPR देऊन जीवदान देण्यात आळायचे अनुभव उपस्थित डॉक्टरांनी कथन केले. चला तर मग आपणही आपल्या परिसरातील डॉक्टरांकडून माहिती घेऊन जीवनरक्षक होऊ या व इतरांना त्यासाठी प्रेरित करू या !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४