देश, राज्य व जळगावातील सद्यस्थितीवर भाष्य करतांना मला या काव्यपंक्तींची विशेष आठवण होते. कोणाला व्यक्तिगत दोष देण्यापूर्वी समस्त जनतेला जागे होण्याची हि वेळ आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कोरोना महामारीने प्रत्येकासमोर एक आव्हान उभे केलेले असतांना समाज घटकांची कृती विपरीत ठरताना दिसत आहे. परिस्थितीचे योग्य आकलन करुन विवेकी वृत्तीने प्रतिसाद देण्याची हि वेळ आहे. देश, राज्य व स्थानिक पातळीवर अपेक्षित असलेला परस्परांवरील विश्वास हरविलेला दिसतो आहे. त्याची परिणीती आजच्या परिस्थितीत भरलेली व भारलेली दिसत आहे. सर्वच पातळीवरील नेतृत्वाला हा विश्वास सार्थ ठरविण्यात अपयश येतांना दिसत आहे. आपण सर्वच एका संक्रमण अवस्थेतून जात असतांना तटस्थ व त्रयस्थपणे गांभीर्याने वर्तन घडणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्यानंतरचा ७ दशकांहून अधिक काळ लोटला असतांना स्थित्यंतराच्या एका मोठ्या लाटेवर आपण सर्व स्वार आहोत. त्यामुळे अपेक्षित असलेला आंतर्बाह्य वैचारिक संघर्ष होणे स्वाभाविक आहे. मात्र तो स्वीकारण्यासाठीची वैचारिक प्रगल्भता नेतृत्वासह जनतेने दाखविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच लेखाचे शीर्षक दिले आहे समाज पुरुषा होई जागृत !
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशातील चार प्रमुख स्तंभांच्या भूमिका, जबाबदारी, त्यामधील एकतानता, परस्पर विश्वासार्हता हरवलेली दिसत आहे. त्याला मुख्य कारण आहे ते म्हणजे आपल्या हातात असलेले तंत्रज्ञान ! तंत्रज्ञानाचे फायदे नक्कीच आहे मात्र ते वापरण्यासाठीची सिद्धता नसली तर निर्माण होणार गोंधळ आपण अनुभवत आहोत. १९४८ मध्ये आईन्स्टाईन या जगद्विख्यात शास्त्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे जीवनातील तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे व नैराश्यामुळे मानवी जीवनमूल्यांची घसरण होईल असा मला विश्वास आहे. त्याचा विपर्यास असाही करण्यात आला कि मला भीती वाटते कि ज्या दिवशी तंत्रज्ञान मानवी सुसंवादाला ओलांडेल त्या दिवशी या जगात मूर्खांची पिढी असेल. जरी हा आईन्स्टाईन यांच्या वाक्याचा विपर्यास असला तरी आज ते वाक्य परिस्थितीची वास्तविकता मांडणारे आहे असे म्हणता येईल. मोबाईलच्या माध्यमातून लोकांच्या हातातले बाहुले झालेला मीडिया मानवतेवर कसा उलटत आहे त्याचे उदाहरण आपण रोज अनुभवत आहोत. याची काही उदाहरणे पाहू या !
देशातील जळगावसारख्या एका छोट्या शहरात अलीकडे घडलेल्या केवळ दोन-तीन घटनांचा उल्लेख येथे करणार आहे. शितावरून भाताची परीक्षा या उक्तीनुसार जगात आणि देशात अशा घटनांच्या सुळसुळाटामुळे किती गोंधळ मजला आहे याची कल्पना येईल.
पहिली घटना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत जळगावात चालविण्यात येणाऱ्या शासकीय आशादीप महिला वसतिगृहात न घडलेल्या कथित घटनेने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. असे होण्याचे कारण काय तर आपण काय करीत आहोत हे करणाऱ्याला समजत नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. सामान्य माणसाच्या हातातील "सोशल मीडिया" या खेळण्याने ईर्षा, स्पर्धा, मत्सर किती टोकाला नेली आहे याचाच तर हा परिणाम म्हणता येईल अशी स्थिती आहे. कोणीतरी आपला स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या कृतीचा अर्थ समजून न घेता केवळ "कॉपी पेस्ट" या वृत्तीने हे झाले असे ठामपणे म्हणता येईल. त्यात भर म्हणून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया, समाज धुरीण, राजकारणी यातील कोणीही विषयाचे गांभीर्य समजून न घेता केवळ आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी केलेली हि अविचारी कृती म्हणता येईल.
दुसरी घटना एका सुपरशॉपमध्ये मानसिक संतुलन गमावलेल्या महिलेच्या कथित चोरीबद्दलच्या समाज माध्यमातील व्हिडीओचे आहे. घडलेल्या घटनेला हाताळायचे कसे याचे शिक्षण नसलेल्या उथळ व उतावीळ लोकांनी आपण काय करीत आहोत याचे भानच ठेवले नाही. अशा प्रकारचा व्हिडीओ समाज माध्यमात पसरवून आपण नक्की काय साध्य केले याचा विचार कोणीही केला नाही. एका समूहात हे व्हिडीओ आल्यावर हा फेक आहे असे सांगितल्यावरही पुन्हा दोनदा पाठविण्यात आला याला काय म्हणायचे ?
तिसरी घटना हि आत्महत्येसंदर्भातील आहे. घटना एक नसून दररोज घडणाऱ्या किमान दोन घटना आहे. सध्याच्या सर्वच प्रकारचे (आर्थिक, सामाजिक, मानसिक इ.) संतुलन बिघडलेल्या स्थितीत वय वर्षे १३ पासून ते पन्नाशीच्या पुढील व्यक्ती अप्रिय गोष्टी करतांना दिसतात. सर्वच प्रकारच्या माध्यमांमध्ये या घटनांचे उद्दात्तीकरण होतांना दिसते आहे. घटना घडली हे वास्तव मी नाकारत नाही मात्र त्याला महत्व किती द्यावे ? याचा विचार करणार कि नाही ? पुन्हा यातून साध्य होणार तरी काय ? आणखी आत्महत्या दुसरे काय ? आपल्याला हे अपेक्षित आहे काय ?
देवा, त्यांना माफ कर, ते काय करताहेत हे त्यांना समजत नाही असे म्हणायचे दिवस संपलेत. वरील सर्व घटनांच्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार ? त्याने समाज मनात कलुषितता निर्माण झालेल्या संस्थेचे काय ? शहराची अब्रू वेशीला टांगली जातेय याची जबाबदारी कोणाची ? समाज मनात परस्परांबद्दल संशयीवृत्ती बळावण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांना शिक्षा कोण, केव्हा व काय करणार ? असे पुन्हा घडू नये यासाठीची आचारसंहिता निर्माण होणार कि नाही ? केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार होत असतांना समाज हतबलतेने पाहत राहणार ? काहीही दोष नसतांना त्याची फळे भोगत राहणार ? वसतिगृहातील अधिकाऱ्यांसह तेथील महिला ज्या ताणतणावात आहेत त्यांच्या मानसिकतेचे काय ? समाजातील संवेदनशील नागरिकांचे काय ? वाढत्या आत्महत्या थांबवायच्या कशा ? असे एक ना अनेक प्रश्न अस्वस्थ करीत आहेत. याचे प्रामाणिकपणे उत्तर शोधण्याचा प्रयत्न एक संवेदनशील माणूस म्हणून करीत आहे. मिळालेले उत्तर आहे समाज पुरुषा होई जागृत !
प्रजासत्ताक देशात आपण स्वीकारलेली घटना त्याद्वारे आपल्याला मिळालेले अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदारी याचे भान कायम ठेवणे आवश्यक आहे असे वाटते. संसद, कार्यपालिका, न्यायपालिका व सर्व प्रकारची माध्यमे यांचेसाठी आदर्श आचारसंहिता कायद्याच्या स्वरुपात स्थित आहे. मात्र सामान्यजनांच्या हातातील खेळण्याचे(!) गांभीर्य, त्याला हाताळण्याचे कौशल्य व जबाबदारी याबाबत सजग होण्याची नक्कीच आवश्यकता आहे. "कॉपी - पेस्ट" वा "फॉरवर्ड" या आजारापासून स्वतःला रोखले पाहिजे. समाज मनातील सकारात्मकता वाढीस लागावी यासाठी त्याचा योग्य वापर करण्याचे धोरण प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे. कविवर्य ग. दि. माडगूळकरांच्या यंत्र युगातील ऋचा समाजाला त्याची शक्ती जाणवून देणाऱ्या व जागृत करणाऱ्या आहेत...
तुझ्या कृपेचे जे भस्मासूर
सिद्ध जाहले तुज जाळाया
तूच निर्मुनी नव मोहिनी
जाळ तयांच्या कृतांत काया ||
सहस्त्रशीर्षा, सहस्रपादा
तूच वार या तुझ्या आपदा
उपभोगाया आण पदाशी
तूच निर्मिली तुझी संपदा ||
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
गिरीशराव नेमकेपणाने लिहिले आहे.
ReplyDeleteलेखाचे शीर्षक अतिशय समर्पक . उल्लेखीत घटनांचा तपशील माहीत नाही . तरीही तुम्ही केलेले विश्लेषण बरोबर वाटते .
ReplyDeleteनीतीमूल्यांचा र्हास , स्वातंत्र्य व स्वैराचार यातील फरक दुर्लक्षित करण्याची मानसिकता व चांगल्या लोकांचा अलिप्ततपणा ही कारणे असू शकतात .
समाजानेच जाग्रुत होणे हाच तरणोपाय आहे .
योग्य विवेचन .
विजय कुळकर्णी . पुणे
गिरीष जी, लोकशाही खरंच प्रगल्भ झाली आहे का? असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. काही विशिष्ट शब्दांनी हेटाळणी करणारे देखील सापडतात. त्यात पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तींची देखील सुटका नाही!
ReplyDeleteफारच मार्मिक. लेखाचे शीर्षक पासून मजकूर अतिशय आशय, अर्थ पूर्ण 👍👍🙏
ReplyDeleteजागृत नागरिकाचे वस्तुस्थिती दर्शक विचार .प्रवाह विरोधी भूमिका मांडल्या बद्दल अभिनंदन !!!
ReplyDeleteहृदयस्पर्शी लेख...
ReplyDeleteखुपच छान 🙏🙏🙏🙏
ReplyDeleteगिरीश भाऊ नेहमीप्रमाणेच तुम्ही खूप छान पद्धतीने विषय मांडला
ReplyDeleteसौ ढाके
शहानिशा न करता पोस्ट फॉरवर्ड केल्यानंतर तिच्या संभाव्य परिणामांचा विचार न करता उथळ लोक आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करत असतात. आपल्याकडील मिडिया अत्यंत बेजबादार आणि अपरिपक्व आहे, किमान व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेत त्यांना 'सर्वात आधी आमच्या चॅनेलवर' दाखवण्याचा आटापिटा करावा लागतो. परंतु सर्वसामान्य लोक अज्ञाना पोटी अनावश्यक, माथी भडकावणाऱ्या पोस्ट मोठ्या उत्साहाने कॉपी पेस्ट किंवा फॉरवर्ड करत असतात. यासाठी गिरिशजी यांनी मांडलेला संतुलित आणि विश्लेशणात्मक विचार उथळ लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
ReplyDeleteसमाजातील ढासळत चाललेल्या वैचारिक पातळीचे नेमके वर्णन केलंय!
ReplyDelete- विवेक घाटे, चाळीसगाव
श्री.गिरीश जी
ReplyDeleteजळगाव मधील अलीकडच्या काही घटनां बाबत आपण व्यक्त केलेल्या भावना व त्यानिमित्त समाज माध्यमाकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा केवळ रास्तच नसून समयोचित आहे. मी तुमच्या मतांशी सहमत असून मानवीय कर्तव्य व संवेदनशील ते ची जाणीव जागृती करण्याची गरज आहे...
सुरेश उज्जैनवाल
गिरिशभाऊ,
ReplyDeleteनेहमी प्रमाणेच आशय सम्पन्न.
समाज जागृतीच्या आपल्या सतत्यपूर्ण प्रयत्नांना सलाम.
नमस्कार. जळगावातील आशादिप वसतीगृह प्रकरणावर गेले दोन दिवस काही मंडळी खूप आक्रस्ताळेपणाने लिखाण करताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण संयमीत भाषेत, वस्तुनिष्ठ विवेचन करून समाजाला अंतर्मुख होण्यासाठी प्रवृत्त केले आहे.धन्यवाद. उदय भालेराव.
ReplyDeleteखरोखरच रास्त भूमिका आपण व्यक्त केली आहे गिरीशजी,सवंग लोकप्रियता टी आर पी च्या नादात कितीतरी अवास्तव घटनांना अवाजवी प्रसिद्धी देण्याचे काम माध्यमांद्वारे होत आहे हे नाकारता येत नाही परंतु यात आपण स्वतः च्या शहराची बदनामी ओढवून घेत आहोत याचे जराही भान संबधित ठेवत नाहीत याचा खेद वाटतो परंतु सर्वसमावेशक प्रयत्नातून यावर मार्ग काढता येईल त्यासाठी इच्छाशक्ती ची निश्चितच गरज आहे.
ReplyDelete