Thursday, 28 April 2022

जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा... प्रशांत मोराणकर !


हि दुनिया एक आगळीवेगळी गोष्ट आहे आणि त्यातील माणसे हे तर अजब रसायन आहे. वीर वामनराव जोशी यांची एक अशीच रचना ज्यात त्यांनी माणसांबद्दल फार मार्मिकतेने लिहिले आहे. प्रत्येकाचे जीवनाचे एक विशिष्ट असे ध्येय आणि त्या ध्येयासाठी वेड्या झालेल्यांचा जगभर पसारा आपल्याला दिसतो. मला या वेड्यांबद्दल नेहमीच कुतुहूल वाटत राहिले आहे. त्यात एकही अपवाद सापडत नाही. प्रत्येक व्यक्तीमधील चांगुलपणाला शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सर्वत्र वेडेच दिसतील अर्थात त्यासाठी प्रथम आपण वेडे असावे लागते. आज हे सर्व लिहिण्यामागचे कारण म्हणजे माझा शालेय जीवनापासूनचा (मागील ४३ वर्षांपासून) मित्र प्रशांत याने काल आपला ५२ वा जन्मदिवस साजरा केला. गेल्या ४-५ वर्षांपासून धुळ्याचा संपर्क कमी झाला आणि प्रशांतच्या भेटीही ! असे असले तरी काल सकाळी सकाळी त्याच्याशी बोललो आणि काल परवा तर भेटलो असेच वाटले. 

प्रशांत जगाच्या वेड्यांच्या पसाऱ्यातील एक ! एकत्र व्यावसायिक कुटुंबात वाढलेल्या व पुढे व्यावहारिक पातळीवर स्वतंत्र झाल्यानंतर अगदी तोच वसा आणि वारसा जपत... त्याला नवीन आयाम व परिमाण  देत अक्षरश: घोडदौड करीत त्याच्या समर्थ पुढाकारात आज तोच व्यवसाय मोठ्या अभिमानी स्थितीत नेतांना आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या अतिशय आव्हानात्मक अशा कालखंडात आपल्या कंपनीचा टर्नओव्हर दुप्पट झाल्याचे तो अतिशय अभिमानाने सांगत होता. आता नाशिक सारख्या महानगरातही कार्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. अतिशय आशादायी स्थितीत संपूर्ण कुटुंबाला सोबत घेत मोराणकर कुटुंबाची अभिमानी पताका उंचावत नेण्याचे वेड कुठेही कमी झालेले नाही. मी खरोखर भाग्यवान आहे माझ्या जीवनात अशी 'वेडी' माणसेच आली. 

बालविश्वात कट्टी असलेला हा मित्र व मी सायकलवर सगळीकडे मात्र सोबत जात असू तेही एकमेकांशी न बोलता ! त्याच्याशी कट्टी असली तरी त्याच्या घरी दिवसातून किमान एक चक्कर कधीही चुकली नाही. नोकरी निमित्ताने जळगावला आल्यानंतर अनेक दिवस धुळ्याला गेलो कि प्रथम प्रशांतच्या घरी नंतर माझ्या घरी. प्रशांतच्या घरून जेवण न करता कधीच आलो नाही. त्यांच्या मोठ्या परिवाराचा एक सदस्य होण्याचे भाग्य मला लाभले. आजही त्यांच्या १०० एक सदस्यांच्या पारिवारिक समूहाचा मी सदस्य आहे त्यातील सर्व तेव्हढ्याच प्रेमाने वागतात. सर्वत्र असतांना त्यात वेगळंपण असणं आणि कुठेही नसतांना दुर्मिळतेने असणं हे या परिवाराचं वैशिष्ट्य आहे. एकमेकांना ज्याची त्याची जागा (space) देत ऋणानुबंधांची जागा कायम राखणाऱ्या या परिवारातील सर्व सदस्यांना याचे श्रेय जाते. 
 

देशभक्ती व राष्ट्रप्रेमाचे संचित लाभलेल्या प्रशांतने सामाजिकतेचा मार्ग ठरवून अवलंबिला. आपली मानवी संवेदना कायम ठेवण्याची वृत्ती, निःस्वार्थ शब्दाला पर्यायी शब्द म्हणजे प्रशांत  ! आव्हानात्मक परिस्थितीत कुठेही न डगमगता, वास्तवाचे भान ठेवत व्यवहारी निर्णय घेण्याची हातोटी व त्याप्रमाणे अंमल हि प्रशांतची स्वभाव वैशिष्ट्य ! शून्यातून निर्माण केलेल्या विश्वाची जाणीव पुढच्या पिढीला देत सोबतच्यांसाठी आवश्यक ठिकाणी लागणारी कठोरता अंगीकारत भावनेच्या आहारी न जाता, आहे त्या परिस्थितीला काळ हेच उत्तर या बाण्याने पुढे जाण्याची वृत्ती कधीतरी कुणाला तरी अहंकारी वाटत असली तरी त्याचा लवलेश माझ्या या मित्रात नाही हे ठामपणे सांगू शकतो. व्यावहारिक तडजोड स्वीकारली तरी तात्त्विकतेच्या बाबतीत प्रशांत कधीही तडजोड करीत नाही. प्रसंगी दोन पावले मागे जाण्याची तयारी असते. "कर्म" हि पूजा नित्यनियमाने चौकटीतून करायची असते हे बाळकडू सात्विक व पवित्र वृत्तीच्या आपल्या वडिलांकडून त्याला मिळाली आहे. अप्रिय गोष्टींना मौनाने जिंकता येतं अशी अनेक उदाहरणे त्याच्या जीवनात स्वतः अनुभवली आहेत. 

महाविद्यालयीन जीवनात व त्यानंतरही अनेकदा आम्ही दोघे धुळ्याच्या गणपती मंदिराच्या पुलावर अनेक रात्री उशिरापर्यंत घालविल्या आहेत. खूपदा अविरत न थांबता गप्पा मारत, बडबड करीत तर कधीतरी अंतर्मुख होऊन प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी केवळ सोबत बसून एकही शब्द न बोलता !  दोन व्यक्तींना आपल्या मनातील विचारांचा न बोलताही संवाद साधता येऊ शकतो ज्याला दूरसंवेदना, परचित्तज्ञान वा मनसंवाद म्हणता येईल असे बोलणे सुरु असते. आमच्या संवादाला कधी कोणत्याही कृत्रिम माध्यमाची, गिफ्टची वा अन्य कसलीही कधीही गरज भासली नाही. कधीही फोनवर बोलल्यानंतर अरे बरेचदा मनात आला फोन करावा, बोलावं, काय चालू आहे विचारावं पण गडबडीत राहिलं असे म्हटले तरी त्याचा मला कधी राग आला नाही कारण तो म्हणतो त्यावर माझा १०० टक्के विश्वास आहे. आमच्या मैत्रीला कसलेच बंधन नाही. हि मैत्री केवळ परस्परविश्वासावर टिकून आहे व राहील.  

पुढच्या पिढीतील सर्वांनाच व्यवसायाचे पाईक होण्याचा प्रशस्त मार्ग प्रशांतने निर्माण केलेला आहे. तेही तेव्हढयाच समर्थपणे प्रशांतचा विश्वास सार्थ ठरवत मार्गक्रमण करीत आहेत. मुलगी गौरी येत्या जून महिन्यात मुबई येथील NIIMS या सुप्रसिद्ध संस्थेतून फॅमिली ओन बिझिनेस व उद्योजकता या विषयात  एमबीए करणार आहे. पुतण्या अनुराग आपल्या आत्मविश्वासावर व धाडसाने समर्थ साथ देत आहे. भाऊ विवेक आपल्या मर्यादांवर मात करीत आपली भूमिका पहिल्या दिवसापासून बजावत आहे. दुसरा पुतण्या अद्वैत आता अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मुरड घालणे, वास्तव स्वीकारणे, सर्वांच्या आनंदासाठी वैयक्तिक गोष्टींना बाजूला ठेवणे यासारख्या गोष्टी प्रत्येकाने केल्या आहेत. या कुटुंबातील मातृशक्ती आपली अगत्यशीलता , उदारता व सात्विकतेने प्रत्येकाला कुटुंबाशी जोडून ठेवण्याचे काम करीत आहे. परमेश्वररूपी मात्या-पित्यांचा आशीर्वाद या सगळ्यांसाठी लागणारं बळ भरभरून देत आहे. एक माणूस एका आयुष्यात किती गोष्टी करू शकतो हे माझ्या मित्राकडून शिकले पाहिजे. त्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा देत असतांना सकाळी साधलेला संवाद लवकर भेट घडवून आणणारा ठरेल. मित्रा, तुझे कार्य असेच सुरु राहू देत... पवित्र अंतःस्थ हेतू कायम तुला माणूस म्हणून मोठं करेल या शुभेच्छांसह थांबतो.... माझ्या या मित्राबद्दल, त्याच्या परिवाराबद्दल व परिवारातील सदस्यांबद्दल खूप काही लिहिण्यासारखं व बोलण्यासारखं आहे पुन्हा कधीतरी... 

Sunday, 3 April 2022

पुस्तक परिचय - राजबंदिनी

ब्रह्मदेशाच्या स्वातंत्र्याचा, लोकशाही प्रस्थापनेसाठीचा लढा व त्यात ऑंग सान स्यू ची व तिचे वडील ऑंग सान यांच्या योगदानाची माहिती असलेले हे ऐतिहासिक पुस्तक प्रेरणादायी ठरणारे आहे. २८६ पानांच्या या पुस्तकात सन १८२३ पासून ते २०१० पर्यंत ब्रह्मदेशातील अंतर्गत घडामोडी वाचावयास मिळतात. एकूण २५ प्रकरणातून हा इतिहास व विशेषतः ऑंग सान स्यू ची च्या अहिंसक लढाईचा परामर्श लेखिकेने उत्तमरीत्या घेतला आहे. ज्याला इतिहास विषयाची आवड आहे, ज्याला प्रेरणादायी पुस्तके वाचनाची आवड आहे, ज्यांना हुकूमशहा व त्यांची कार्यपद्धती, लोकशाहीचे फायदे व हुकूमशाहीच्या मर्यादा  समजून घ्यावयाची इच्छा आहे, अशा सर्वांसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणारे आहे.

शतकांपासून हिसेंचीच परंपरा असलेल्या ब्रह्मदेशात राजांनी, सत्ताधाऱ्यांनी, हुकूमशहांनी सर्व संभाव्य शत्रूंचा अतिशय निर्दयपणे नायनाट केला आहे असे आपल्या लक्ष येईल.  २ एप्रिल १९८८ रोजी आपल्या आईच्या खिन चीच्या आजारपणात सेवा सुश्रुषेनिमित्ताने मायदेशी अर्थात ब्रह्मदेशात परत आलेल्या स्यू चीला देशातील परिस्थिती आपल्या पित्याप्रमाणे देशसेवेसाठी सक्रिय करणारी ठरली. ने विन या हुकूमशहाच्या अन्याय, अत्याचार व नरसंहाराच्या कुकर्मांच्या कथा मानवतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. २६ वर्षे अनन्वित अत्याचाराची बळी ठरलेल्या जनतेसाठी आपण राजकारणात सक्रिय झाले पाहिजे असे ते इच्छा नसतानाही ठरविते. देशातील हिंसाचाराला ऑंग सान स्यू चीला एकच मार्ग व एकच उत्तर दिसत होते. तो म्हणजे भारतात महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढयासाठी अनुसरलेला अहिंसेचा मार्ग. त्यांची निर्भयता, सत्याग्रह आणि अहिंसा हि तत्त्वे तिला मायदेशातील स्वातंत्र्यलढा लढायला नैतिक, आत्मिक आणि आध्यात्मिक बळ देईल असा विश्वास होता. अहिंसा हेच हिसेंवरचं उत्तर असून त्याद्वारेच आपण जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवू शकू असा तिला विश्वास होता.

राष्ट्रपिता म्हणून ब्रह्मी लोकांच्या मनात अतिशय आदराचे स्थान मिळविलेल्या तिच्या वडिलांनाही काही काळ अहिंसेच्या मार्गाचं आकर्षण वाटलं होत. याच मार्गाने स्वातंत्र्यलढा नेण्याची त्यांची इच्छा होती. मात्र प्रत्यक्षात त्याने साया सानच्याच सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरलेला होता. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांती करून, दोन युद्ध लढूनच त्याने देशाचं स्वातंत्र्य मिळविलं होतं. सशस्त्र क्रांतीतून किंवा हिंसाचारातून झटपट मिळणाऱ्या यशाचं तरुणांना आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे मात्र हे यश चिरंतन नाही, हिंसाचारातून हिंसाचाराचाच जन्म होतो. देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचाराला अहिंसेनं जिंकता येतं आणि अहिंसेने मिळणारं यश शाश्वत असतं, हा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा व त्यांना अहिंसेच्या मार्गानेच हा लढा लढायला उद्युक्त करायचं हे आपले नियत कार्य स्यू चीनं ठरवलं. त्याप्रमाणे कार्यरत राहिली.

स्यु चीचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. उणीपुरी ३२ वर्षे वय लाभलेल्या तिच्या वडिलांनी २० व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला आणि वयाच्या ३२ व्या वर्षी ब्रह्मदेशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदी विराजमान असतांना तिच्या वडिलांची १९४७ साली हत्त्या झाली. त्यावेळी स्यू ची अवघ्या दोन वर्षांची होती. आपल्या वडिलांचा फारसा सहवास न लाभलेल्या स्यू चीने मात्र त्यांचा देशभक्तीचा वारसा समर्थपणे चालवला त्यासाठी मध्यंतरीचा जवळपास ४० वर्षांचा कालखंड जावा लागला. त्यानंतर १९४८ मध्ये देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला. स्वतंत्र ब्रह्मदेशाचे पहिले पंतप्रधान नू नं आपला मित्र व सहकारी असलेल्या 'बोज्योक' (सरसेनापती) ऑंग सानला कधीही विसरला नाही. त्याच्या कुटुंबियांना योग्य आदरसन्मान दिला. त्याची पत्नी खिन चीला १९६० मध्ये भारतात राजदूत म्हणून नियुक्ती दिली. त्यामुळे स्यू ची चे दोन वर्षाचे शालेय व त्यानंतरचे पदवीपर्यंतचे शिक्षण दिल्लीत झाले. भारतीय संस्कृती, महात्मा गांधी व अन्य महानुभावांची ओळख तिला तेव्हाच झाली.

त्यानंतर शिक्षण घेण्यासाठी ती इंग्लंडमध्ये गेली. तेथील स्थानिक पालकांचा व मित्र मंडळींचा अतिशय अगत्यपूर्ण उल्लेख भावणारा आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असतांना तेथील संस्कृती व तरुणाईला आकर्षित करणाऱ्या अन्य गोष्टींचा स्यू चीवर प्रभाव पडला नाही. त्याउलट  तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल तिच्यासोबतच्या अनेकांना आकर्षण होते. इतरांना मदत करण्याची तिची संवेदनशील वृत्ती आईने दिलेला संस्कार याचा खूप मोठा पगडा तिच्या आयुष्यात दिसतो. ब्रह्मदेशातील जनता आपल्या मुलांकडे राष्ट्रपित्यांची मुलं म्हणून पाहणार याची आईला जाणीव होती. पित्याच्या गौरवाला साजेशी कामगिरी मुलं करून दाखवतील अशा रीतीनं तिने मुलांना वाढविले. शिक्षण दिले, संस्कार  केलेत. राष्ट्रपित्याच्या मुलांना वाढवण्याची जबाबदारी पार पाडणं हे त्यांच्या आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट होतं.

तरुण वयात महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना प्रेमाचे विशेष आकर्षण असते. इंग्लंड मध्ये शिकत असतांना आधुनिक इतिहासाचा अभ्यासक मायकेलला स्यू ची आवडली होती व तो तिच्या प्रेमात पडला होता. मात्र स्यू चीने प्रेमास नकार देत आपली चांगली मैत्री कायमसाठी राहील असे सांगितले. कालांतराने तिच्या नकाराचं होकारात मत परिवर्तन होण्यासाठी तीन वर्षांचा कालखंड जावा लागला. मायकल या ब्रिटीश माणसाशी लग्न करण्यात पुष्कळ अडचणी होत्या. ज्या ब्रिटीश सत्तेविरूद्ध आपले वडील लढले, त्याच्या नागरिकाशी लग्न केलं आईला काय वाटेल ? लोक काय म्हणतील ? ते मला व माझ्या जोडीदाराला स्वीकारतील का ? या विवाहामुळे माझे स्वदेशी परतण्याचे दरवाजे तर कायमचे बंद होणार नाही ना ? अन देशाला तिची गरज कधी लागली तर? तिच्या वडिलांचा देशकार्याचा वारसा असा तिला सोडून देता येणार नव्हता. तीन वर्षांच्या या वैचारिक संघर्षानंतर आईचा विरोध पत्करून मायकेलशी लग्न केलं आणि ती संसारात रमली. त्यानेही स्यू चीला उत्तम अशी साथ देत तिला दिलेले वचन आयुष्यभर पाळले.

पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने न्यूयॉर्कला जावयाचे ठरविले. साहित्य विषयात विशेष रुची असली तरी  आपल्या आईच्या आग्रहाखातर राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी हे विषय तिने अभ्यासासाठी निवडले.  तेथे शारीरिक मर्यादांमुळे बसचा प्रवास झेपेनासा झाला. त्यासाठी तिने संयुक्त राष्ट्रसंघात सहाय्यक सचिवाची नोकरी मिळविली. विवाहानंतर आपल्या दोन मुलांचे संगोपन करीत असतांना आपले वडील ऑंग सान यांचे संक्षिप्त चरित्र तिने लिहिले. आपल्या वडिलांचा तिच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव पडला. त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने तिला समजून घेता आले. त्यासाठी खूप खोलवर जाऊन तिने अभ्यास केला. आपल्या देशाचा इतिहास, ब्रिटिश राजवट, देशवासीयांच्या स्वातंत्र्य लढा या सर्वच गोष्टींचे आकलन तिला झाले. इंग्रजांच्या "फोडा आणि झोडा" या नीतीचा दूरगामी परिणाम देश स्वातंत्र्योत्तर काळातही भोगत होता. स्वातंत्र्या नंतरही तिच्या मातृभूमीला यादवीने ग्रासले होते. तेथील लष्कराने हर प्रकारे प्रयत्न करूनही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

४ जानेवारी १९४८ ला स्वतंत्र झालेल्या ब्रह्मदेशात १९५८ साली लष्करी राजवट सुरु झाली. त्यानंतर १९६० ते ६२ या दोन वर्षाच्या कालखंडात लोकनियुक्त सरकार आले मात्र पुन्हा एकदा लष्कराने देशाची सूत्रे आपल्या हाती घेतली ती अलीकडच्या कालखंडापर्यंत. "ने विन" या लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील लष्करी राजवटीने प्रदीर्घ काळ आपल्याच स्वकीयांवर अत्त्याचार केले. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी यांना अक्षरश: गोळ्या घालून ठार केले. या लष्करी राजवटीची सामान्यजनांवर इतकी प्रचंड दहशत होती ते परस्परांशी संवादही करू शकत नव्हते. देश आर्थिक दिवाळखोरीत निघाला होता. अन्नधान्याचा तुटवडा, बेरोजगारी या सारखे प्रश्न हाताळणे त्यांना शक्य होतं नव्हते. मात्र सतत उपभोगायचा उद्देशाने लोकशाही मार्गाचा अवलंब न करण्याचे धोरण कायम ठेवले. ऑंग सान व तात्कालिक जनतेने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी घेतलेल्या कष्टांची त्यांना जाणीव नव्हती. आपल्या वडिलांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य न मिळाल्याने ती उद्विग्न झाली.

१९८८ मध्ये आईच्या आजारपणामुळे ती मायदेशात परतली. लष्कराच्या विरोधात चालू असलेल्या जनतेच्या लढाईत तिने सामील व्हावे अशी स्थानिक जनतेची व वडिलांसोबतच्या सहकाऱ्यांची अपेक्षा होती. विचारांती तिने ते आपलं कर्तव्य म्हणून स्वीकारलं. अहिंसक मार्गाने लोकशाही प्रस्थापित करण्याचे कार्य तिने सुरु केले. नवा इतिहास निर्माण करीत असतांना तिच्या नेतृत्वाखाली एक नवीन पर्व सुरु झाले. त्यासाठीच ती कधीही मायदेशाबाहेर गेली नाही. कारण त्यानंतर लष्करी राजवटीने तिला देशात येण्यास बंदी घालण्याचा धोका ती जाणून होती. आपला पती मायकल मृत्युशय्येवर झुंजत असतांनाही त्याच्या भेटीसाठी स्यू चीने आपला देश सोडला नाही. अन्याय-अत्याचाराच्या भयानक संकटात असलेल्या आपल्या देशाचा विध्वंस तिला टाळायचा होता. १९९०च्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होण्यासाठी तिच्या नेतृत्वात राजकीय पक्षाची स्थापना केली. तिच्या पक्षाला ८० टक्के मते मिळूनही हुकूमशाही सत्तेवरून खाली उतरलीच नाही. अटकसत्र, गोळीबार, जाळपोळ, लुटालूट व स्थानबद्धता हि हुकूमशाहीची अस्त्रे होती. तिच्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सुमारे १४ वर्षे स्थानबद्धतेत (गृहकैदेत) काढली. अर्थात ती राजबंदी होती आणि त्यामुळे राजबंदिनी हे लेखिकेने दिलेले नाव चपखल वाटते.

एका मोठ्या अग्निदिव्यातून जाणाऱ्या या देशातील जनतेच्या पाठीशी ती मोठ्या हिमतीने उभी राहिली. जागतिक समुदायाच्या "लोकशाही पुनर्स्थापनेच्या" आवाहनाकडे लष्कर राजवटीने कायम दुर्लक्षच केले. तिच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत १९९१ चा नोबेल पुरस्कार तिला मिळाला आणि जगाला तिच्या देशातील जनतेच्या हालअपेष्टांची माहिती मिळाली. माझ्या नावावर हा पुरस्कार असला तरी यावर खरा हक्क या लढ्यात बळी गेलेल्या, हालअपेष्टा, छळ सोसणाऱ्या ब्रह्मी जनतेचा आहे, माझा नाही. नोबेल पुरस्कारामुळेच आमचा हा लढा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला याचा आनंद व समाधान असल्याचा तिने म्हटले. त्यानंतर तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मात्र ती स्थानबद्धतेतच होती. 

प्रभा नवांगुळ यांच्या ‘राजबंदिनी’ या स्यू चीच्या चरित्रामुळे आपल्या शेजारी असलेल्या, सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमुळे माहिती असलेल्या ब्रह्मदेशाची, तेथील राजकारणाची माहिती मिळाली. ब्रह्मदेशात आजही सर्वाधिक काळाची लष्करी राजवट चालू आहे. स्थानिकांचा तिथे लोकशाही यावी यासाठीचा लढा आजही सुरूच आहे. लष्करी राजवट किती निर्दयी व क्रूर असते आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात राहतो याचा नक्कीच अभिमान वाटतो. एखादा बदल, परिवर्तन व क्रांती घडवून आणण्यासाठी आयुष्येची आयुष्य खर्च होतात. राष्ट्रप्रेमाने वेडी  झालेली माणसेच इतिहास घडवितात आणि त्यांचाच इतिहास लिहिला जातो असे या पुस्तकावरून नक्की म्हणता येईल. एखाद्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारणं आणि त्यासाठी आपलं सर्वस्व बहाल कारण खरोखर अवघड आहे. वर्षानुवर्षांची स्थानबद्धता, पती व मुलांची ताटातूट, पतीचं आजारपण व त्याच अंत्यदर्शन यातील एकही गोष्ट तिला तिच्या लोकशाहीसाठीच्या लढ्यापासून दूर नेऊ शकलं नाही. ऑंग सान स्यू ची हिचं राजबंदिनी हे चरित्र आपण सर्वांनी नक्की वाचावे असेच आहे.

पुस्तकाचे नाव : राजबंदिनी ऑंग सान स्यू ची हिचं चरित्र

लेखिकेचे नाव : प्रभा नवांगुळ

प्रकाशकाचे नाव : राजहंस प्रकाशन प्रा. लि