Sunday 19 March 2023

आनंदाचे डोही आनंद तरंग...

निमित्त जागतिक आनंदी दिवसाचे ! 



२० मार्च हा दिवस जागतिक आनंदी दिवस अर्थात International Day of Happiness म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब जळगावच्या साप्ताहिक सभेत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांनी "आनंदाचे डोही आनंद तरंग..." या विषयाची मांडणी केली. सारांश स्वरुपात भाषणाचा गोषवारा आपल्या सर्वांसाठी देत आहे.

आनंदाचे डोही आनंद तरंग । 

आनंदची अंग आनंदाचें ॥१॥

काय सांगो जाले काहीचियाबाही । 

पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । 

तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । 

अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥

संत तुकारामांचा हा अभंग अवीट अशा आनंदाचा अनुभूती सांगणारा आहे. हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही आणि केला तरी ज्याला अनुभवाची जाण नाही त्याला समजणारही नाही. आता आयुष्यात यापुढे मिळवायचे काहीही उरले नाही. तुकाराम महाराज यांनी अशी स्थिती गाठली आहे कि ज्या करिता योगी अनेक आयुष्ये तप करीत आले आहेत. अनेक ज्ञानी अथक प्रयत्न करून थकले आहेत.  त्यामुळे त्यांना झालेला आनंद हा परमानंद आहे. 

आनंद म्हणजे काय असा आपण विचार केला तर मानसशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट क्षणी चांगली गोष्ट घडल्यावर होतो तो किंवा अधिक व्यापकपणे विचार केल्यास एखाद्याच्या जीवनाचे किंवा कर्तृत्वाचे सकारात्मक मूल्यमापन करून जे मिळते ते म्हणजे आनंद. अर्थात हा आनंद व्यक्ती सापेक्ष असतो. तो कधी बक्षिसाने होतो तर कधी आवडीचा पदार्थ मिळाल्याने होतो तर कधी शारीरिक भूक भागविल्याने होतो. आनंदाचा मानवी मनाशी व मेंदूशी संबंध आहे. मुळात हि एक भावना आहे.  मास्लो या शास्त्रज्ञाने मांडलेल्या पिरॅमिडनुसार हि मानवी मनाची मूलभूत गरज आहे. भौतिक प्रगतीनुसार हा आनंद अधिक उच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न करीत असतो. 

माणूस जेव्हा आनंदी होतो तेव्हा त्याच्या मेंदूचा फ्रंटल लॉबीची डावी बाजू ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असे म्हणतात तो अधिक सक्रिय होतो. मानवी जीवनात घडणाऱ्या चांगल्या - वाईट घटनेमुळे वा परिस्थितीमुळे त्याचा मुड प्रभावित होत असतो. हा मुड मेंदूमध्ये घडणाऱ्या विविध रासायनिक क्रियांचे प्रतिबिंब असतो. मेंदूला आपण काय अनुभवत आहोत याची जाणीव करून देण्याचे व त्या प्रमाणे प्रतिसाद देण्याचे काम शरीरातील रसायने करीत असतात. (न्यूरोट्रान्समीटर आणि हार्मोन्स) या हार्मोन्सची काही विशिष्ट कार्ये असतात, ती विशिष्ट प्रकारे सक्रिय केली जातात, ते विशिष्ट भावनांचे संकेत देतात व मेंदूच्या काही भागांना उत्तेजीतही करतात. जेव्हा आपण आनंदाचा विचार करतो त्यावेळी प्रामुख्याने ज्या रसायनांचा समावेश असतो ती म्हणजे एंडोर्फिन, डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन. आनंदी मनुष्य निरोगी व दीर्घायुषी असतो. 

संत तुकाराम महाराजांनी अभंगातून मांडलेला आनंद कसा झाला असेल ? त्यांच्या आयुष्यात अनेक विपरीत व आव्हानात्मक घटना पाहावयास मिळतात. दुकानाचे दिवाळे निघालेले, बायकोचा स्वभाव, समाजाकडून त्रास इ. शहीद भगतसिंग आनंदाने व हसत हसत देशासाठी शहीद झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या कोठडीत सहन केलेले अत्याचार यासर्व गोष्टींमध्ये त्यांना आनंद कसा झाला असेल याचा आपण विचार केल्यास काही गोष्टी आपल्या लक्षात येतील. आपल्याला आवडणारी गोष्ट करणे, आपण करीत असलेल्या कामात आपल्याला रस असणे आणि त्यासाठी इतरांशी संपर्कात राहणे, आपण जे करतो त्याद्वारे आपल्याला ओळख मिळणे, आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होणे.  

माणसाला आनंद ३ प्रकारे होतो. १. मेंदूतील रसायनांमुळे २. मेंदूतील प्रीफ्रंटल कोर्टेक्समुळे - यात लहानपणापासूनच्या शिकवणीचा समावेश असतो. तसेच भावनिक जाण व अनुभवही महत्त्वाचा ठरतो. ३. सामाजिक वातावरण - आपण ज्यांच्या सोबत राहतो त्या माणसांची सकारात्मक व आनंदी वृत्ती मनाला आनंद राहण्यासाठी सहाय्य्यभुत ठरते. 

आज जगातील सर्वात आनंदी देश फिनलँड मानला जातो. सलग ५ वर्षे या देशाला आनंदी देश होण्याचा बहुमान मिळाला आहे. वर्षातील ४ महिने प्रचंड थंडी असूनही हा देश आनंदी असतो याची आकाराने आपण नक्कीच जाणून घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील निसर्ग समृद्ध आहे. त्यामुळे पर्यावरणाची गुणवत्ता अधिक आहे. कौटुंबिक व व्यावसायिक कामाचा योग्य समतोल सांभाळला गेला आहे, सामाजिक सौहार्द, निवडीचे व निर्णयाचे स्वातंत्र्य आहे, समाज कल्याणकारी पद्धती विकसित आहेत, स्वातंत्र्यासोबतच येथे समानता आहे, नागरी सेवा विनामूल्य उपलब्ध आहेत मात्र येथील करही सर्वात जास्त आहे. सामाजिक स्तरावर असलेले परस्पर सहकार्य व पाठबळ हि या देशाची जमेची बाजू म्हणता येईल. 

समारोपाकडे जात असतांना डॉ. प्रदीप जोशी यांनी २ धक्कादायक गोष्टी सांगितल्या. त्यातील एक म्हणजे आज जगातील ३० कोटी लोक नैराश्यग्रस्त वा वैफल्यग्रस्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशात हि संख्या सुमारे ९ कोटी आहे. या मागील कारणे अनेक आहेत. आपण या समस्यचे बाली ठरू नये व आनंदी राहावे यासाठी खालील गोष्टी कराव्यात.

- नातेसंबंध समृद्ध करा 

- काहीतरी स्वप्न ठेवा , उद्दिष्ट ठेवा

- इतरांना केलेले सहाय्य तुम्हाला सर्वात जास्त आनंद देतील. 

- शरीर प्रकृती उत्तम ठेवा.

- योग्य आर्थिक नियोजन करा.

- कुटुंबात आनंद ठेवा व मित्रांचा जास्तीत जास्त सहवास ठेवा.

- कामाचा आनंद घ्या

या गोष्टी करीत असतांना जीवनातील ताणतणावांचे नियंत्रण करा. त्याकडेही लक्ष असू द्या. त्यासाठी हसा, खेळ खेळ, योग्य व्यायाम व आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. व्यसनांपासून दूर राहा. निसर्गाचा आनंद घ्या. योगा, प्राणायाम करा. सुटीचा आनंद घ्या. त्यादिवशी आराम करा. प्राणी पाळा. ताण ओळख व त्यावर नियंत्रण मिळावा. रात्री  झोपायला जाण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या ३ चांगल्या गोष्टी आठवा. 

आईन्स्टाईन यांनी सांगितल्याप्रमाणे जीवन २ प्रकारे जगा

१. जणू काही चमत्कार नाही (as though nothing is miracle)

२. सर्व काही चमत्कार आहे (as though everything is miracle)


यावर्षीच्या जागतिक आनंदी दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे Be mindful (सजग राहा), Be grateful (कृतज्ञ राहा) Be kind (दया करा)

समारोप करतांना आनंदी राहण्यासाठी 

Sing like no one listening कोणी ऐकत नाही असे समजून गा 

Love like you've never been hurt आपल्याला कोणी दुखावले नाही असे समजून प्रेम करा 

Dance like nobody is watching आपल्याला कोणी पाहात नाही असे समजून नाचा 

Live like its heaven on earth पृथ्वीला स्वर्ग समजून जगा 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

No comments:

Post a Comment