Tuesday 13 April 2021

वर्षारंभ आणि नवीन कार्याची दिशा !

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा ! वर्षारंभाचा दिवस हा नवीन कार्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा दिवस... आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सहभागाने सामाजिक जीवनात एका नवीन कार्याचा आरंभ करीत आहे. आपणा सर्वांना नवीन कार्याची दिशा स्पष्ट करणारा...त्याअनुषंगाने विचारप्रवृत्त करणारा आहे. प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त ठरणारा हा लेख आपल्या विशेष पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे... प्रत्येक वाचकाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा राहील... 

माणूस जन्माला आल्यानंतर तो ज्या कुटुंबात, समाजात, परिस्थितीत आणि वातावरणात वाढतो त्या प्रमाणे त्याची जीवनविषयक धारणा तयार होत असते आणि कालांतराने जगण्याचा मार्गही...! यालाच आपण विश्वास (बिलीफ) म्हणतो दुर्दैवाने स्थळ, काळ, वेळ आणि परिस्थिती बदलते मात्र वरील मर्यादांवर आधारित धारणा बदलल्या नाहीत तर मोठा गोंधळ होण्याची शक्यता असते. प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने असे मर्यादांवर आधारित धारणा बदलण्याची मानसिकता तयार झाली आणि प्रवास सुखकर झाला. या प्रवासाने एक सूत्र नक्की गवसले आणि ते म्हणजे "Developing belief..." हेच आगामी काळातील मिशन असणार आहे. 

२०१५ मध्ये एनएलपी विषयावरील चार दिवसांच्या कार्यशाळेत सहभागी झालो होतो आणि अलीकडे डॉ. विवेक काटदरे सरांच्या "सिक्रेट ऑफ सक्सेस" या विषयावरील कार्यशाळांनी मानवाच्या जीवनविषयक धारणांचे महत्व जाणवले. आपले संपूर्ण जीवन आपण काही मर्यादित धारणांवर (Limiting belief) जगत असतो, त्यामुळेच जीवनातील अनेक चांगल्या सुखद अनुभवांना मुकत असतो आणि "हे शक्य नाही..." किंवा " मला जमणार नाही..." या नकारात्मक भावनांमध्ये अडकून पडतो. व्यावसायिक जीवनाचा सुमारे तीन दशकांचा कालखंड अशा अनेक मर्यादित धारणांना मोडून काढण्यात आणि नवीन धारणा विकसित करण्यात गेला. व्यावसायिक जीवनासोबतच जीवनातील विविध क्षेत्रातील धारणा बदलण्याची वा चिरंतन व शाश्वत धारणा विकसित करण्याची आवश्यकता वाटते. आगामी काळात त्यादृष्टीने कार्य करण्याचे निश्चित करीत आहे. 

आपल्या जीवनाबद्दल सतर्क असणं आणि त्यासंदर्भांतील जाणिवा प्रगल्भ करणे म्हणजेच स्वतःबद्दल जागरुक होणे होय. आपल्या आंतरीक उर्मीने, नाविन्याचा ध्यास घेऊन स्वतःच्या कौशल्याने बदल स्वीकारणे, बदल घडविणे म्हणजे खऱ्या अर्थाने सजग होणे होय. जीवनातील अनेक गोष्टी करीत असतांना जाणीवपूर्वक बुद्धी, मन व चित्त स्थिर ठेवून सावधपणाने कृती करणं माणसाला शहाणपण बहाल करतं. वास्तविकतेची कास धरत, उपलब्ध साधनांची जाणीव ठेवत आपल्या कामाचे सुयोग्य नियोजन करणे यासाठी अत्यावश्यक आहे. आपल्या आचार, विचार व कृतीला, संयम आणि सातत्याने तटस्थपणे जोखत (तपासात) राहणे साक्षात्कारी ठरते आणि त्यातूनच आत्मज्ञान होत नवीन धारणा विकसित होतात असे मला वाटते. 

 यशस्वी जीवनासाठी आपल्या मर्यादित धारणांविषयीचा अनाठायी आग्रह सोडण्याची गरज आहे. "लोक काय म्हणतील ?" या समस्येवर मात केली पाहिजे. त्यासाठी मी जे पण करेल ते योग्यच अशा विश्वासाने व उत्साहाने कार्यरत राहणे म्हणजेच धारणा विकसित करणे होय. कामाच्या सुरवातीचा आपला उत्साह कायम टिकवून ठेवणे हि यशस्वीतेसाठीची पूर्वअट आहे. यासाठी आपण करीत असलेल्या प्रत्येक कार्यात आपली भावनिक गुंतवणूक असली पाहिजे. केवळ भावनिक गुंतवणूक पुरेशी नसून त्यासाठी कार्याप्रतीची आपली बांधिलकी तेव्हढीच महत्वाची आहे. उत्साह टिकून राहण्यासाठी केवळ बांधिलकी पुरेशी नसून आपण करीत असलेल्या कार्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. कार्यावरची निष्ठा, अनुभवातून आलेले शहाणपण व स्वीकारलेली जीवनावश्यक मूल्ये यावरच श्रद्धा जोपासली जाते. काम कोणतेही असो छोटे वा मोठे, कंटाळवाणे वा आनंददायी, अंतिम लक्ष्य ठरलेले असलं तर आपण करीत असलेली कार्ये अर्थपूर्ण वाटतात. त्यातूनच मोठे उद्दिष्ट साकारले जाते. उद्दिष्ट साकारणाऱ्या व्यक्तीच लौकिक अर्थाने यशस्वी ठरतात. 

 जीवनाला अर्थ प्राप्त करुन देण्याच्या क्षेत्रात यापुढे कार्य करायचे आहे. अर्थात आम्ही फक्त साधन राहणार आहोत. ज्याला त्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागते, आणि ती तो लढत असतोच. हि लढाई लढत असतांना अनेक अडचणी येतात. या अडचणीच आपल्या वाटचालीतील अडथळे असतात ते दूर करण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची आवश्यकता असते, त्यासाठीच हि धडपड नव्याने सुरु करावयाची आहे. आपण सोबत आहेत या खात्रीसह थांबतो... 

आपणा सर्वांना प्लव नाम संवत्सराचा मनापासून शुभेच्छा व निरामय दीर्घायुष्यासाठी कामना ! 

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४

3 comments:

  1. आपल्या नविन उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.
    उदय भालेराव.

    ReplyDelete
  2. मोठं कार्य हाती घेतले आहे. खुप खुप शुभेच्छा!
    विवेक घाटे

    ReplyDelete
  3. खुप खुप शुभेच्छा सर 💐आम्ही तुमच्या सोबत आहोत 👍🏼😃🙏🏼

    ReplyDelete