Tuesday, 13 April 2021
वर्षारंभ आणि नवीन कार्याची दिशा !
Saturday, 13 March 2021
महिला दिन का ? कशासाठी ?
नेहमीच चाकोरी बाहेरील उपक्रम राबविणाऱ्या आशा फाऊंडेशनने यावर्षी महिला दिनानिमित्त महिला दिन साजरा करण्याबद्दल समाजमनाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. समाज प्रबोधन व जनजागृतीसाठी अशा प्रकारचे दिन साजरे करण्याची परंपरा सर्वत्र आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी, त्यांचे हक्क, अधिकार याबद्दल जागरुकता करण्यासाठी, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत असतांना योग्य सन्मान केला पाहिजे यासाठी समाजमन तयार करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. महिला दिनाचा हा उद्देश सफल होत नसला तरी तो साजरा केला पाहिजे अशी भावना संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून लक्षात येते. महिलांना केवळ महिला दिनी सन्मान न देता त्यांच्याप्रती वर्षभर कृतज्ञता व्यक्त करण्याची व योग्य सन्मान देण्याची अपेक्षा सर्वांनीच व्यक्त केलेली आहे.
आशा फाऊंडेशनच्या या सर्वेक्षणात जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, मुंबई, लातूर, सोलापूर, अकोला. अमरावती येथील स्त्री-पुरुषांनी सहभाग नोंदवला. सर्वेक्षणात महिलांपेक्षा पुरुषांचा सहभाग अधिक होता तर ऑनलाईन कार्यक्रमात ९० टक्के महिलांचा सहभाग होता. ८४ टक्के मंडळींना महिला दिन साजरा करावा असे वाटते तर ४२ टक्के लोकांनी महिला दिनाचा मुख्य उद्देश सफल होत नसल्याचे म्हटले आहे. यातही महिला पुरुष असा विचार केला तर ३३ टक्के पुरुषांनी व ६७ टक्के महिलांनी महिला दिनाचा उद्देश साध्य होत नसून तो साजरा केला पाहिजे असे म्हटले आहे.
महिला दिनाचा उद्देश साध्य करण्यासाठी तुम्हाला भावलेला उपक्रम सांगा या प्रश्नाला उत्तर देतांना अनेकांनी समाजातील कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा समाजासमोर आणून त्यांचा गौरव, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त नीलिमा मिश्रांसारख्यांनी उभारलेल्या कार्याला प्रत्यक्ष भेट, कुटुंबासाठी व समाजासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांना समाजासमोर आणणे, दुर्गम भागातील महिलांचे प्रबोधन, आरोग्याच्यादृष्टीने त्यांच्यासाठी सामूहिक योगा, त्यांची आरोग्य तपासणी, रक्तदान, महिलांसाठीच्या कायद्यांबाबत प्रबोधन, बचतगटाद्वारे महिला सबलीकरण आदी उपक्रमांचा उल्लेख अनेकांनी केला आहे.
कर्तृत्ववान व प्रभावी महिलांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सुधा मूर्ती, प्रतिभाताई पाटील, पी. व्ही. संधू, इंदिरा गांधी, इंद्रा नुयी, कल्पना चावला,अरुणिमा सिन्हा, अनिमा पाटील-साबळे, किरण बेदी, कविता राऊत, गुंजन सक्सेना, स्वाती मोहन, अनुराधा टोके यासह विविध क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या महिलांची नावे समोर आली. अनेकांनी नाव न सांगता सर्वच क्षेत्रात महिलांची कामगिरी अलौकिक आहे. त्यातही मोनोरेल, बस, रिक्षा चालविणाऱ्या महिला, संरक्षण दलातील सहभाग, पायलट, मेकॅनिक आदी चाकोरीबाहेरच्या क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा आवर्जून उल्लेख केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाची महिला दिनासासाठीची यावर्षीची संकल्पना #choosetochallenge केवळ २० टक्के लोकांनाच सांगता आली.
![]() |
| असाही महिला दिन... पेट्रोल पंपावरील भगिनींना भेटवस्तू ! |
महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, महिलांचे शोषण, महिला सुरक्षा या सारखे विषय आजही समाज जीवनात आढळतात यावर काम करण्याची आवश्यकता अनेकांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली. या समस्या संपुष्टात येण्यासाठी केवळ कायदे करुन चालणार नाही तर त्यासाठी घरातूनच योग्य संस्कार होण्याची व समाजमन तयार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. समारोपात पुणे येथील स्मिता वळसंगकर यांनी महिला दिनाला "इव्हेन्ट"चे स्वरुप दिले गेले आहे. महिलांचे समाजातील स्थान व मान देण्यासाठी कोणत्याही निकषांची गरज नाही. तो तिला सहजभावाने व नैसर्गिकरित्या दिला पाहिजे असे म्हटले. "कन्यादान ", "मुलगी दिली" वा "मुलगी बघायला येणार आहेत" यासारखे शब्दप्रयोग करतांना विचार केला पाहिजे कारण मुलगी हि वस्तू नाही. महिलांचे वस्तूकरण थांबले पाहिजे. "पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून" वा "पुरुषांच्या बरोबरीने" तसेच "बांगड्यांचा आहेर" वा "बायल्यासारखा काय करतो" यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजे कारण यातून महिलांना कनिष्ठ दर्जाची भावना निर्माण होते, असे आवाहनही त्यांनी केले. .
ऑनलाईन कार्यक्रमात शशिकला खाडीलकर, डॉ. मधुबाला जोशी-चिंचाळकर, डॉ. नयना कासखेडीकर, सुलभा कुळकर्णी, अपर्णा महाशब्दे-पाटील, सविता भोळे, विंदा नाईक, प्रणाली महाशब्दे, वैदेही नाखरे, स्वाती ढाके, संगिता पाटील, सुवर्णा चव्हाण, रुपाली पाटील, पयोष्णी कुळकर्णी, यामिनी सुतार, गायत्री सोनार यांचेसह पंकज कुंटे व पत्रकार दिलीप तिवारी यांनी सहभाग घेतला व आपली मते मांडली.
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Thursday, 4 March 2021
समाजपुरुषा होई जागृत !
देश, राज्य व जळगावातील सद्यस्थितीवर भाष्य करतांना मला या काव्यपंक्तींची विशेष आठवण होते. कोणाला व्यक्तिगत दोष देण्यापूर्वी समस्त जनतेला जागे होण्याची हि वेळ आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कोरोना महामारीने प्रत्येकासमोर एक आव्हान उभे केलेले असतांना समाज घटकांची कृती विपरीत ठरताना दिसत आहे. परिस्थितीचे योग्य आकलन करुन विवेकी वृत्तीने प्रतिसाद देण्याची हि वेळ आहे. देश, राज्य व स्थानिक पातळीवर अपेक्षित असलेला परस्परांवरील विश्वास हरविलेला दिसतो आहे. त्याची परिणीती आजच्या परिस्थितीत भरलेली व भारलेली दिसत आहे. सर्वच पातळीवरील नेतृत्वाला हा विश्वास सार्थ ठरविण्यात अपयश येतांना दिसत आहे. आपण सर्वच एका संक्रमण अवस्थेतून जात असतांना तटस्थ व त्रयस्थपणे गांभीर्याने वर्तन घडणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्यानंतरचा ७ दशकांहून अधिक काळ लोटला असतांना स्थित्यंतराच्या एका मोठ्या लाटेवर आपण सर्व स्वार आहोत. त्यामुळे अपेक्षित असलेला आंतर्बाह्य वैचारिक संघर्ष होणे स्वाभाविक आहे. मात्र तो स्वीकारण्यासाठीची वैचारिक प्रगल्भता नेतृत्वासह जनतेने दाखविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच लेखाचे शीर्षक दिले आहे समाज पुरुषा होई जागृत !
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशातील चार प्रमुख स्तंभांच्या भूमिका, जबाबदारी, त्यामधील एकतानता, परस्पर विश्वासार्हता हरवलेली दिसत आहे. त्याला मुख्य कारण आहे ते म्हणजे आपल्या हातात असलेले तंत्रज्ञान ! तंत्रज्ञानाचे फायदे नक्कीच आहे मात्र ते वापरण्यासाठीची सिद्धता नसली तर निर्माण होणार गोंधळ आपण अनुभवत आहोत. १९४८ मध्ये आईन्स्टाईन या जगद्विख्यात शास्त्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे जीवनातील तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे व नैराश्यामुळे मानवी जीवनमूल्यांची घसरण होईल असा मला विश्वास आहे. त्याचा विपर्यास असाही करण्यात आला कि मला भीती वाटते कि ज्या दिवशी तंत्रज्ञान मानवी सुसंवादाला ओलांडेल त्या दिवशी या जगात मूर्खांची पिढी असेल. जरी हा आईन्स्टाईन यांच्या वाक्याचा विपर्यास असला तरी आज ते वाक्य परिस्थितीची वास्तविकता मांडणारे आहे असे म्हणता येईल. मोबाईलच्या माध्यमातून लोकांच्या हातातले बाहुले झालेला मीडिया मानवतेवर कसा उलटत आहे त्याचे उदाहरण आपण रोज अनुभवत आहोत. याची काही उदाहरणे पाहू या !
देशातील जळगावसारख्या एका छोट्या शहरात अलीकडे घडलेल्या केवळ दोन-तीन घटनांचा उल्लेख येथे करणार आहे. शितावरून भाताची परीक्षा या उक्तीनुसार जगात आणि देशात अशा घटनांच्या सुळसुळाटामुळे किती गोंधळ मजला आहे याची कल्पना येईल.
पहिली घटना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत जळगावात चालविण्यात येणाऱ्या शासकीय आशादीप महिला वसतिगृहात न घडलेल्या कथित घटनेने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. असे होण्याचे कारण काय तर आपण काय करीत आहोत हे करणाऱ्याला समजत नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. सामान्य माणसाच्या हातातील "सोशल मीडिया" या खेळण्याने ईर्षा, स्पर्धा, मत्सर किती टोकाला नेली आहे याचाच तर हा परिणाम म्हणता येईल अशी स्थिती आहे. कोणीतरी आपला स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या कृतीचा अर्थ समजून न घेता केवळ "कॉपी पेस्ट" या वृत्तीने हे झाले असे ठामपणे म्हणता येईल. त्यात भर म्हणून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया, समाज धुरीण, राजकारणी यातील कोणीही विषयाचे गांभीर्य समजून न घेता केवळ आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी केलेली हि अविचारी कृती म्हणता येईल.
दुसरी घटना एका सुपरशॉपमध्ये मानसिक संतुलन गमावलेल्या महिलेच्या कथित चोरीबद्दलच्या समाज माध्यमातील व्हिडीओचे आहे. घडलेल्या घटनेला हाताळायचे कसे याचे शिक्षण नसलेल्या उथळ व उतावीळ लोकांनी आपण काय करीत आहोत याचे भानच ठेवले नाही. अशा प्रकारचा व्हिडीओ समाज माध्यमात पसरवून आपण नक्की काय साध्य केले याचा विचार कोणीही केला नाही. एका समूहात हे व्हिडीओ आल्यावर हा फेक आहे असे सांगितल्यावरही पुन्हा दोनदा पाठविण्यात आला याला काय म्हणायचे ?
तिसरी घटना हि आत्महत्येसंदर्भातील आहे. घटना एक नसून दररोज घडणाऱ्या किमान दोन घटना आहे. सध्याच्या सर्वच प्रकारचे (आर्थिक, सामाजिक, मानसिक इ.) संतुलन बिघडलेल्या स्थितीत वय वर्षे १३ पासून ते पन्नाशीच्या पुढील व्यक्ती अप्रिय गोष्टी करतांना दिसतात. सर्वच प्रकारच्या माध्यमांमध्ये या घटनांचे उद्दात्तीकरण होतांना दिसते आहे. घटना घडली हे वास्तव मी नाकारत नाही मात्र त्याला महत्व किती द्यावे ? याचा विचार करणार कि नाही ? पुन्हा यातून साध्य होणार तरी काय ? आणखी आत्महत्या दुसरे काय ? आपल्याला हे अपेक्षित आहे काय ?
देवा, त्यांना माफ कर, ते काय करताहेत हे त्यांना समजत नाही असे म्हणायचे दिवस संपलेत. वरील सर्व घटनांच्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार ? त्याने समाज मनात कलुषितता निर्माण झालेल्या संस्थेचे काय ? शहराची अब्रू वेशीला टांगली जातेय याची जबाबदारी कोणाची ? समाज मनात परस्परांबद्दल संशयीवृत्ती बळावण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांना शिक्षा कोण, केव्हा व काय करणार ? असे पुन्हा घडू नये यासाठीची आचारसंहिता निर्माण होणार कि नाही ? केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार होत असतांना समाज हतबलतेने पाहत राहणार ? काहीही दोष नसतांना त्याची फळे भोगत राहणार ? वसतिगृहातील अधिकाऱ्यांसह तेथील महिला ज्या ताणतणावात आहेत त्यांच्या मानसिकतेचे काय ? समाजातील संवेदनशील नागरिकांचे काय ? वाढत्या आत्महत्या थांबवायच्या कशा ? असे एक ना अनेक प्रश्न अस्वस्थ करीत आहेत. याचे प्रामाणिकपणे उत्तर शोधण्याचा प्रयत्न एक संवेदनशील माणूस म्हणून करीत आहे. मिळालेले उत्तर आहे समाज पुरुषा होई जागृत !
प्रजासत्ताक देशात आपण स्वीकारलेली घटना त्याद्वारे आपल्याला मिळालेले अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदारी याचे भान कायम ठेवणे आवश्यक आहे असे वाटते. संसद, कार्यपालिका, न्यायपालिका व सर्व प्रकारची माध्यमे यांचेसाठी आदर्श आचारसंहिता कायद्याच्या स्वरुपात स्थित आहे. मात्र सामान्यजनांच्या हातातील खेळण्याचे(!) गांभीर्य, त्याला हाताळण्याचे कौशल्य व जबाबदारी याबाबत सजग होण्याची नक्कीच आवश्यकता आहे. "कॉपी - पेस्ट" वा "फॉरवर्ड" या आजारापासून स्वतःला रोखले पाहिजे. समाज मनातील सकारात्मकता वाढीस लागावी यासाठी त्याचा योग्य वापर करण्याचे धोरण प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे. कविवर्य ग. दि. माडगूळकरांच्या यंत्र युगातील ऋचा समाजाला त्याची शक्ती जाणवून देणाऱ्या व जागृत करणाऱ्या आहेत...
तुझ्या कृपेचे जे भस्मासूर
सिद्ध जाहले तुज जाळाया
तूच निर्मुनी नव मोहिनी
जाळ तयांच्या कृतांत काया ||
सहस्त्रशीर्षा, सहस्रपादा
तूच वार या तुझ्या आपदा
उपभोगाया आण पदाशी
तूच निर्मिली तुझी संपदा ||
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Friday, 5 February 2021
परेड कमांडरचा प्रवास "वर्दी"वर प्रेम निर्माण करणारा : समृद्धी संत
एनसीसीची कॅडेट ते प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून मिळालेली संधी हा प्रवास "वर्दी"बद्दल विशेष प्रेम व आयुष्यात सैन्यदलात वेगळं काही तरी करुन दाखविण्याची जिद्द निर्माण करणारा ठरला, असे समृद्धी अतिशय अभिमानाने सांगत होती. २६ जानेवारी २०२१च्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात एनसीसीच्या मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून महाराष्ट्राला प्रथमच संधी मिळवून देणारी जळगावची सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी संत हिचेशी संवाद साधला असता ती बोलत होती. आरडी परेडमध्ये सहभागी होण्याचे माझे स्वप्न जरी पूर्ण झाले असले तरी आता मला आर्मीत कमिशन होण्याची इच्छा आहे. त्यासाठी मला एनसीसीमधील हा प्रवास खूप उपयुक्त ठरणार आहे.
महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर एनसीसी घेऊन सलग दोन वर्षे प्रचंड मेहनत घेऊन समृद्धीने आपले स्वप्न साकारले आहे. मागील वर्षीही तिला हि संधी होती मात्र तिची निवड झाली नाही. त्यामुळे थोडीशी नाराज झाली तरी आणखी एक वर्ष आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपल्यातील कमींवर विशेषतः "ड्रिल"वर फोकस केला. त्यासाठी सकाळी लवकर व रात्री उशिरापर्यंत सराव केला. प्रत्येक वर्षी "बेस्ट कॅडेट"ला आरडी परेडसाठी संधी मिळते. तशी ती समृद्धीलाही मिळाली. प्रथम अमरावती, नंतर पुणे येथे निवड चाचणी होऊन त्यानंतर पुन्हा दिल्ली येथे निवड केली जाते. दिल्लीसाठी निवड झालेल्या सर्वांनाच आरडी परेडची संधी मिळत नाही. काहींना दि. २८ जानेवारी रोजी होणाऱ्या पीएम रॅलीत संधी मिळते. यावर्षी महाराष्ट्रातून एकूण २६ कॅडेटची (१६ मुले व १० मुली) निवड झाली होती. संपूर्ण भारतातून आलेल्या सर्व कॅडेटचा कसून सराव करुन घेतला जातो. 'ड्रिल' व 'कमांड' पाहून परेड कमांडर म्हणून निवड करण्यात आलेल्या तीन कॅडेटमध्ये समृद्धीचा समावेश होता. आपले स्वप्न साकार होत असतांना मुलींच्या पथकाचे नेतृत्वाची संधी तिला ऊर्जा देणारी ठरली. त्यातही तिने बेस्ट देऊन आपला निवडीचा मार्ग मोकळा केला. दि. २३ जानेवारीला तिला सांगण्यात आले तसे सांगण्यात आले. दि. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाच्या राष्ट्रपती व पंतप्रधानांना दिल्लीच्या राजपथावर मानवंदना देतांना आपला हा प्रवास सर्र्कन डोळ्यासमोर आला हे सांगतांना समृद्धी रोमांचित होते आणि तोच या सर्व प्रवासातला आनंदाचा क्षण सांगण्यास ती विसरत नाही.
समृद्धी आणि तिचे पालक तिच्या बटालियनचे CO. कर्नल प्रवीण धीमन,सुभेदार मेजर कोमलसिंह, महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर लेफ्ट. वाय. एस बोरसे, CTO ज्योती मोरे व PI staff, पुणे येथील ब्रिगेडियर सुनील लिमये , कर्नल अनुराग सुद, काँटिंजन्ट कमांडर कर्नल प्रशांत नायर, नायक सुभेदार किरण माने, मेजर अरुषा शेटे, लेफ्ट. विवेक बाले यांच्याप्रती वारंवार कृतज्ञता व्यक्त करतात. समृद्धीचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी असून देशाच्या सैन्यदलात प्रवेश करुन देशाची सेवा करण्याची इच्छा पूर्ण होवो यासाठी मनापासून शुभेच्छा ! आशा फाऊंडेशनच्या ६ ते १२ मे २०१३च्या क्षमता शोधन व कौशल्य विकसन या उद्देशाने आयोजित आशा बाल विकास उन्हाळी शिबिराची शिबिरार्थी असलेल्या समृद्धीने मिळविलेले यश आम्हा सर्वांसाठी आनंददायी आहे. गत १३ वर्षात संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमातील विद्यार्थी आज आपल्या व्यक्तिगत जीवनात काहीतरी वेगळं करुन दाखविण्याची जिद्द बाळगून आहेत यातच आमचे समाधान आहे. समृद्धी, तिचे पालक व तिच्या या प्रवासाचे सर्व शिल्पकार यांचे मनापासून अभिनंदन !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Saturday, 2 January 2021
समस्या सरत्या वर्षाची का मानवाची ?
थांबा, विचार करा, कृती करा आणि आढावा घ्या ! मानवी जीवनाचे, व्यवसायाच्या प्रगतीचे हे साधे सोपे सूत्र. वर्ष इंग्रजी असो वा भारतीय, आर्थिक असो वा शैक्षणिक. साधारणपणे मागील वर्षातील घटनांचा आढावा आपण शेवटच्या महिन्यात घेतो. त्यात काय मिळविले आणि काय गमावले याचाच हिशेब प्राधान्याने मांडतो. यात जे मिळाले त्याचा आनंद कमी आणि गमावले त्याबद्दलचे दुःख अधिक दिसते. त्यामुळे पुन्हा नवीन उभारीने नव्या वर्षात मिळवायची यादी वाढते. पुन्हा संकल्प, पुन्हा ते संकल्प सिद्धीस जाण्यासाठीची धडपड, तगमग आणि तडफड... हे जीवनाचे अव्याहत सुरु असणारे चक्र ! काही वेळेस सकारात्मक विचार करतांना अनुभवातून आलेले शहाणपण वा शिकवण हे समाधान.
२०२० ! अकल्पित आलेली कोरोना महामारी, त्यातील मृत्यू, निर्माण होणारी अनामिक भीती, लॉकडाऊन, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टनसिंग, बेरोजगारी, उपासमारीची वेळ, जेवणाचे वांधे, उदरनिर्वाहाचा प्रश्न, जगण्याची आस, स्थलांतराचे जत्थे, मानसिक ताणतणाव, नैराश्य, वाढलेला स्क्रीन टाइम, त्यातून निर्माण झालेले डोळ्यांचे विकार, पाठदुखी, मानदुखी, लठ्ठपणा, मूळव्याध, घरगुती हिंसाचार, महिला व बालकांचे शोषण, माणसांचा परस्परांमधील संशय किती समस्या अन प्रश्न ?
अर्थात सर्वच प्रश्न आणि समस्याच नव्हे तर संवेदना, माणुसकी, कृतज्ञता, संधी, जगण्याचे मार्ग, स्वच्छतेचे महत्व, आव्हानाला सामोरे जाण्यासाठी लागणारी एकता, निर्णय क्षमता, स्वतःसाठी व कुटुंबासाठी दिलेला वेळ, घरातील पुरुषांनी बनविलेली नवनवीन व्यंजने, दीर्घ काळापासून राहिलेली कामे पूर्ण, मिळालेली जगण्याची नवीन परिभाषा, स्वतःत घडविलेला आवश्यक बदल, स्वीकारलेली जीवनशैली, वास्तवाचे भान, तंत्रज्ञानाचा वापर, शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्व, योगा व प्राणायाम, अहोरात्र कार्यरत असलेली शासकीय, वैद्यकीय व प्रशासकीय यंत्रणा या जमेच्या बाजू आहेतच.
लेखात मांडलेला हा जमाखर्च वा हिशेब सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित व त्याच्यावर परिणाम करणारा आहे. राज्यात, देशात व जगात या सोबतच अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत होत्या. आपणा सर्वांचा लॉक डाऊनचा बहुतांश वेळ समाज माध्यमातील त्यावरील चर्चांवर गेला आहे. कोरोनाच्या या आव्हानासमोर त्या सर्व गोष्टी कुठेतरी झाकोळल्या गेल्या म्हणून त्याचा आढावा येथे घेतलेला नाही. तसे प्रस्तुत लेखाशी त्याचा तसा फारसा संबंधही नाही. तरी नवे शैक्षणिक धोरण, राम जन्मभूमीचा निकाल, सुशांतसिंग व समाजसेवी डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या यांचा वानगीदाखल उल्लेख करता येईल. असो.
वाचकांना नेमकेपणाने असा प्रश्न विचारायचा आहे कि, २०२० वर्षातील किती समस्या व प्रश्न निसर्गनिर्मित होते ? या समस्या त्या वर्षाच्या होत्या का मानवाच्या ? अनेकांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना मागील वर्ष अतिशय वाईट होते. माझ्या आयुष्यात असे वर्षच आले नाही असे म्हटले. मुळात जीवनात चढ-उतार, ऊन-सावली, आनंद-दुःख आहेच असे आपण नेहमी म्हणतो. तेच तर खरे जीवन ! मागील वर्षातील समस्यांची तीव्रता अधिक होती, काही हृदयस्थ व्यक्तींना आपण गमावले हे नाकारता येणार नाही. मात्र या अशा आव्हानांपासून वा संकटांपासून आपण वाचलो काय कारण असेल ?
चर्चासत्रांमधून अधोरेखित झालेली गोष्ट म्हणजे भारतीय कुटुंबव्यवस्था, संस्कृती व अध्यात्म यांचा अंगीकार करणाऱ्या व्यक्तींना व कुटुंबांना याची झळ पोहोचली नाही किंवा त्यांना त्याला सामोरे जातांना सुसह्य झाले. या वर्षाने आपण स्वीकारलेल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करावा असा संदेश दिला आहे असे मला वाटते. भारतीय तत्वज्ञानात या गोष्टींचा अंतर्भाव आहे. आर्थिक उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाचा स्वीकार करीत असतांना नकळतपणे आपण आपल्या भारतीय मूळ विचारधारेपासून दूर जाऊ लागलो होतो. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे खेडी समृद्ध होण्याऐवजी शहरीकरणाला प्राधान्य अधिक मिळाले. सुखाची कल्पना ही केवळ शारीरिक सुखाचा विचार करणारी झाली. त्यामुळे एक गरज पूर्ण झाल्यावर दुसरी उत्पन्न झाली. त्याचा हव्यास वाढला त्यातून गळेकापू व खिसेकापू स्पर्धा निर्माण झाली. पैसा आला तरी आनंदाबरोबर मानसिक ताणाची एक किनारही सोबत आली. या सर्वांचा परिणाम म्हणून सर्वत्र भोगवाद पसरला. त्यामुळे शोषण वाढले, निसर्गाचे ओरबाडणे वाढले आणि " सर्वे भवन्तु सुखिनः " चा आम्हाला विसर पडला. स्वार्थी व आत्मकेंद्रित समाज निर्माण झाला. त्यामुळे कोणीही सुखी समाधानी होऊ शकले नाही.
![]() |
| दै. देशदूत शब्दगंध पुरवणी. दि. ३ जानेवारी २०२१ |
ज्या स्वदेशीचा अंगीकार करीत आम्ही स्वातंत्र्य मिळविले, खुल्या अर्थव्यवस्थेमुळे आम्ही स्वतःहून त्या स्वदेशीला दूर लोटले. उत्पादनाचा दर्जा आणि किंमत याचा अधिक विचार न करता आम्ही चिनी वस्तूंकडे, ऑनलाईन शॉपिंग, मॉल यासारख्या गोष्टीकडे अधिक आकर्षित झालो. पैसे कमविणे, संपत्ती निर्माण करण्यासाठीच्या साधनांचा शोध लावणे, निर्माण केलेल्या साधनांचे संरक्षण करण्यासाठी सत्ता मिळविणे यात वावगे असे काहीही नाही. मात्र त्याचा अतिरेक झाला कि सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचा धोका निर्माण होतो. अमर्याद संपत्ती निर्मिती, तिचा उपभोग व त्यातून निर्माण झालेली सत्ता शोषितच असते. त्यामुळे सोबत असणाऱ्या समाज बांधवांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतातच. भांडवलदारांना पूरक वर्तनाने आम्हीच पं. दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलेल्या एकात्म मानववादाला हरताळ फासला.
योगी अरविंदानी म्हटल्याप्रमाणे समाजातील प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे सुख मिळावे, त्याच्या कामाचा आनंद मिळावा, मिळविले ते उपभोगण्यासाठी फुरसतीचा वेळ मिळावा आणि साधे, सोपे , समृद्ध व सुंदर जीवन जगता यावे हे उद्दिष्ट आहे. भारतीय विचारात भौतिक सुख आवश्यक मानतांनाच ते अपुरे आहे हे अधोरेखित केले आहे. त्यातच अडकून पडणे म्हणजे संपूर्ण सुखापासून वंचित राहणे आहे. सुख वस्तुनिष्ठ नसून त्याचा माणसाच्या भावभावनांशी जवळचा संबंध आहे. माणसाच्या शरीराबरोबरच मन, बुद्धी व आत्मा याचीही भूक असते. या सर्वांच्या एकत्रित सुखातूनच माणूस विकसित होतो. "आहार निद्रा भय मैथुनं च, सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् । धर्मो हि तेषामधिको विशेष:, धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥ " अर्थात आहार, निद्रा, मैथुन आदींमुळे जी सुखानुभूती होते ती मनुष्यप्राणी व पशुपक्षी या दोहोंमध्ये सारखीच असते. मानवी जीवनातील विशेषतः आहे ती म्हणजे धर्म. धर्माशिवाय वागणारी व्यक्ती पशुसमान असते. माणूस आणि प्राणी यांच्यात मूलभूत फरक आहे तो म्हणजे माणसासमोर काही ना काही ध्येय असते. ते ध्येय साकारणे हे माणसाचे मनुष्यत्व होय.
जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही व वास्तव स्वीकारणे एव्हढेच आपल्या हातात आहे याची खूणगाठ मनाशी पक्की केली कि अशा परिस्थितीतून पुढे जाणे अधिक सुखकर होते. मर्यादीत साधनांमध्ये जगणे सहज शक्य असतांना हव्यास, भोग त्यातून होत असलेला अतिरेक यामुळे मागील वर्षातील समस्यांची तीव्रता आपल्या सर्वांना अधिक जाणवली असे मला वाटते. आपण सर्वांनी समस्यांचे मूळ काळात नसून मानवात आहे हे समजून घेतले तर येणारी सर्व वर्षे अधिक चांगली जातील असा मला विश्वास आहे.
"सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत् ॥"
सर्वजण सुखी होवोत, सर्वजण निरोगी राहो, सर्वजण मंगल व आनंददायी घटनांचे साक्षीदार होवोत आणि कोणालाही कोणतेही दुःख लाभू नये हिच नवीन वर्षासाठी शुभेच्छा !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४ .
Saturday, 5 December 2020
वॉर अँड पीस
मागील सोमवारी समाजासाठी विशेषतः:समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काही तरी विशेष, भव्य-दिव्य करु इच्छिणाऱ्या, सामाजिक कार्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या आमटे कुटुंबातील शीतलताई आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळली. मन सुन्न झाले. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. इतक्या टोकाचे पाऊल एक महत्वाकांक्षी, संवेदनशील, इतरांसाठी प्रेरणादायी व ध्येयनिष्ठ व्यक्ती कसा घेऊ शकते ? या एका प्रश्नाकरिता मन अस्वस्थ होते. स्व. बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी सोहोळ्याचा (२०१४) साक्षीदार असलेल्या माझ्या सारख्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्याला प्रश्न पडणे स्वाभाविकच ! मात्र याच संवेदनशीलतेमुळे विषयाचे गांभीर्य, आवाका व व्याप्ती लक्षात घेता कुठलीही घाई न करता विचारपूर्वक व जबाबदारीने व्यक्त होण्याचे ठरविले. गेले ६ दिवस या विषयावरील माध्यमातील मते मतांतरे, टीका टिप्पणी, व्हिडीओ पाहतोय. कोण चूक, कोण बरोबर, कोणावर अन्याय, पुढे काय ? हे प्रश्न आहेतच मात्र माझ्यासाठी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आत्महत्याच का ?
गेली अनेक वर्षे हा प्रश्न अक्षरश: छळतोय. त्यात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात आमच्याच कुटुंबातील सदस्याने केलेल्या आत्महत्येमुळे याबाबत स्वामी विवेकानंद जयंतीला काही ठोस करण्याची योजना आखली होती. दुर्दैवाने महामारीमुळे तो विषय थांबला. महामारीने निर्माण केलेल्या अनेक सामाजिक समस्यांनी अनलॉकच्या काळात अनेकांना हा पर्याय निवडण्यास बाध्य केले. माध्यमातील या बातम्यांनी मन विषण्ण होते. अनेकदा माध्यमे या बातम्या का देतात असा प्रश्नही पडतो कारण या बातम्या मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तीसाठी नकारात्मक प्रेरणा ठरतात असे मला नक्की वाटते. वैयक्तिक भेटीतून स्थानिक संपादकांना सहज बोललो देखील...या बातम्या टाळता येणार नाही का ? सार्वजनिक कार्यक्रमात, प्रशिक्षणात, व्याख्यानातून या विषयावर तरुणांशी आवर्जून बोलतो हे खरे असले तरी बातमीतील त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही आणि त्याला थांबवू शकलो नाही याचे दुःख मनाला बोचणी देत राहते. असो.
शीतलताईंनी आत्महत्येच्या दिवशी ट्विटर हॅण्डलवर एक चित्र सामायिक केले होते आणि त्याला शीर्षक होते " वॉर अँड पीस ". मला हे वाक्य त्यांच्या मनाची तगमग व परिस्थितीची कल्पना देणारे वाटते. जीवनातील अनेक आव्हानांना, संघर्षांना माणूस सामोरे जातच असतो. रोज मरणाची लढाई ती हिच, अशाच पद्धतीने तो जगत असतो. हि लढाई तो लढत असतो कारण त्याला हवी असते शांतता...मानसिक शांती, आत्मिक समाधान... ताईंना हि मानसिक शांती मिळविण्यासाठी आत्महत्या हा पर्याय योग्य वाटला असेलही पण... मग प्रश्न येथूनच सुरु होतो. अशी कोणती लढाई होती कि ज्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही ? बाह्य जगतातील लढाईबद्दल बरंच बोललं जातंय... कौटुंबिक वाद, सहकाऱ्यांशी वाद अन्य... पण त्यावर हा पर्याय नक्कीच त्या निवडणार नाही. त्यातील काय योग्य अयोग्य याच्या तपशिलात मी जाणार नाही कारण मी त्यासाठी पात्र नाही वा मला त्याबाबत माध्यमातील गोष्टींशिवाय काहीही माहिती नाही आणि त्याची सत्यता (?)...
माझ्या मते हि लढाई बाहेरच्या जगापेक्षा अंतर्गत जगाची अधिक असावी. एव्हढा मोठा परिवार सांभाळत असतांना लागणारे आर्थिक पाठबळ... ते उभे करण्याचे आव्हान... भविष्यात करावयाच्या गोष्टींसाठी लागणारे पाठबळ, त्यासाठीचे मार्ग... आव्हानांची मालिका... जीवनात कराव्या लागणाऱ्या वैचारिक तडजोडी, जबाबदारी सांभाळत असतांना आपण कुठेतरी कमी पडतो आहोत हि भावना, एका बाजूला ७० वर्षांची विश्वासार्हता आणि दुसऱ्या बाजूला "लोक काय म्हणतील ?" याची बोचणी... त्यातून निर्माण होणारे मानसिक द्वंद्व. संवेदनशील कार्यकर्त्यांसाठी तसे हे नेहमीचेच असते. त्यामुळे एव्हढा टोकाचा निर्णय ? संस्था संचालन करीत असतांना असे मानसिक द्वंद्व नेहमीचेच असते. आमटे परिवारातील सदस्यांसाठी ते अजिबातच नवीन नाही. काम करीत असतांना समोरील आव्हानाचे उत्तर जवळ असतांनाही "करावे कि न करावे ?", "To be or Not to be..." ची परिस्थिती खूप मानसिक गोंधळ निर्माण करते. एका बाजूला व्यवहार आणि दुसऱ्या बाजूला भावना यांचा समतोल साधणे अनेकदा कार्यकर्त्याला कठीण जाते.
शीतलताई खरं तर याबाबतीत अनेकांच्या आदर्श होत्या. त्यांनी अनेक प्रकल्प, उपक्रम ज्या पद्धतीने साकारले, चालवले त्यावरून त्यांना हे असे अनुभव नवीन नक्कीच नाही. मग असा कोणत्या विषयावरील अंतर्गत मानसिक वा वैचारिक संघर्ष त्यांना या निर्णयाकडे घेऊन गेला असेल ? आपली हरविलेली मानसिक शांती मिळविण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब करावासा का वाटला नसेल ? एका बाजूला आनंदवनात घेतलेले जीवन शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमधून घेतलेले शिक्षण काय कमी पडले ? का या दोहोंच्या ताळमेळातच गडबड झाली. सामाजिक कार्यकर्त्याची हि अशी स्थिती अनेकदा होते. अनेक चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा असूनही करता न येणे ? त्याठिकाणी आपली मूल्ये, तत्वे, धोरण याबाबत आपल्याच मनात शंका निर्माण होणे हे फार कठीण असते. संस्थेचा मूळ आत्मा सांभाळून त्याला तारुण्य बहाल करण्याचे आव्हान स्वीकारण्यात काही अडचणी होत्या का ? त्यातून निराशा, हतबलता, नैराश्य येते. माणूस अनेक अंगाने, मार्गाने त्यावर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. ताईंना यावेळी मात्र तो मार्ग सापडला नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
आम्ही एका संवेदनशील, धडाडीच्या, स्वप्नाला कवेत घेणाऱ्या कार्यकर्तीला मुकलो हे नक्की. आमटे परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर देवो हीच प्रार्थना !
जाता जाता- लिओ टॉलस्टॉय यांची "वॉर अँड पीस" या विषयावरील एक प्रसिद्ध कादंबरी असल्याचे वाचनात आले. मी ती वाचलेली नाही. मात्र त्या संदर्भातील अधिक माहिती वाचली असता त्याचा संदर्भ ताईंच्या ट्विटशी असावा का असे वाटून गेले ? .
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Tuesday, 1 December 2020
आपले आयुष्य आपल्या हाती !
सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना आपल्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. खरं तर आजचीही चिंता आहेच परंतु माणूस नेहमी भविष्याचा जास्त विचार करतो. काही माणसांना काहीतरी मार्ग निघेल असे वाटते, काहींना वाटते जे सर्वांचे होईल ते आपले होईल तर काही जणांना वाटते आता काही खरं नाही संपलं सगळं ! माणसाच्या या विचार करण्याच्या पद्धतीवरुन त्यांचे आचरण ठरते. त्याप्रमाणे त्यांचे प्रकार वा स्वभाव वैशिष्ट्ये ठरतात. कोणी आशावादी, तर कोणी निराशावादी, कोणी हताश तर कोणी बिनधास्त, कोणी गंभीर तर कोणी खुशालचेंडू. मग नक्की माणसाचे भविष्य कसे ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. आपण त्याचा उत्तर शोधण्याचा या लेखातून प्रयत्न करणार आहोत.
आपल्या भविष्याबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न माणूस वेगवेगळ्या पद्धतीने करीत असतो. काही जणांना ते वर्तमानपत्राच्या राशी भविष्यातून मिळते तर काही आपली कुंडली तपासून पाहतात तर काही हात दाखवूनही शोधतात. यातील शास्त्रावर आधारित गोष्टींबद्दल मला काही म्हणायचे नाही मात्र भंपक व लोकांना फसविणाऱ्या गोष्टींबाबत नागरिकांनी जागरुक होण्याची गरज आहे. मला असे वाटते कि, आपले आयुष्य आपल्या हातात आहे. कसे ते विस्ताराने समजून घेण्याचा प्रयत्न करु. यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने स्वतःला तीन महत्वाचे प्रश्न विचारावे असे मला वाटते. ज्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळाली त्याला त्याच्या भविष्याची दिशा मिळाली असे समजण्यास हरकत नाही. तसे म्हटले तर अतिशय सोपे प्रश्न आहेत हे. भारतीय तत्वज्ञानात या प्रश्नांची उत्तरे आहेत. हे तत्वज्ञान पुस्तकात नसून आपले आई-वडील व कुटुंबीय सहजपणे ते आपल्या मनावर बिंबवत असतात. मात्र समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा त्यावर परिणाम होतांना आपल्याला दिसतो. अर्थात त्याचे मूळ तीन प्रश्नांमध्ये आहे. काय आहेत प्रश्न ? पाहू या !
प्रश्न १ - का जगायचं ?
आपण जन्माला तर आलोय पण आपल्या जीवनाचे नक्की उद्दिष्ट काय. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे.. आनंद, समाधान, सुख, यश ? पुन्हा प्रश्न नक्की आनंद म्हणजे काय ? सुखी माणूस कोण ? समाधान कशात असते ? ते कुठे मिळते ? यश कशाला म्हणतात ? यशाची आपली व्याख्या काय ? आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये या प्रश्नांची उत्तरे बदलत जातात. हि प्रश्न उलगडत जातात. यांची उत्तरे आपल्याला सापडतात. बऱ्याच वेळेस लोक काय म्हणतील म्हणून अनेक गोष्टी आपण आपल्या मनाविरुद्ध करतो आणि तेथेच गाडी आपला मार्ग बदलते.मागे वळून पहिले तर आपण कुठे होतो ? आपल्याला कुठे जायचे होते ? कशाचेही उत्तर मिळत नाही आणि माणसाची अवस्था संभ्रमाची होते. अशा वेळेस माणूस चुकीच्या मार्गाची निवड करतो आणि फसतो.
प्रश्न २- कसे जगायचे ?
जीवनाचे उद्दिष्ट एकदा निश्चित झाले कि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा ? हे ठरविणे अगत्याचे ठरते. याला आपण धोरण असेही म्हणू शकतो. जीवनाचे मूलभूत तत्व शाळेत मूल्य शिक्षणातून शिकविली जातात. मात्र आपण त्याकडे डोळसपणे पाहतो का ? हा खरा प्रश्न आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद साधला तर आपल्याला प्रश्नांची वास्तव व योग्य उत्तरे मिळतात. पण आपला स्वतःचा स्वतःशी संवादच हरवला आहे म्हटल्यानंतर उत्तर सापडणे कठीण जाते. यासाठी आदर्श जीवनपद्धती स्वीकारुन तर काही वेळेस आपली स्वतःची जीवनशैली विकसित करुन जगणारी माणसे आपल्या अवतीभोवती असतात. ती आपल्याला परग्रहावरची वाटतात, तेथेच आपण चुकतो आणि बहुसंख्यांच्या मार्गावरुन चालतो. जीवनात काय करायचे, काय नाही करायचे हे ठरविणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी आपण आपली स्वतःची काही मूलभूत तत्वे समजून उमजून ठरविली पाहिजे व त्यानुसारच आपले आचरण असले पाहिजे.
प्रश्न ३- आनंदी कसे राहायचे ?
सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हा.जीवनात सर्व काही मिळवायचे असते त्याला कारण असते जीवनाची कृतार्थता ! आपण जे काही करतो त्यातून आनंद मिळविण्यासाठी... पण आपण आनंदी होतो का ? एखादी गोष्ट ठरविली आणि आपण ती मिळविली तर आपण संतुष्ट होतो का ? आपल्याला आनंद होतो का ? मुळात आनंदाची आपली स्वतःची संकल्पना स्पष्ट आहे का ? आनंद देण्यात असतो ना कि मिळविण्यात. पण हे समजण्यासाठी खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागतो. त्याची सवय लावावी लागते. त्यासाठी आवश्यक असणारा संयम व सातत्य अंगी बाणावे लागते. तात्काळच्या (इंस्टंटच्या) या युगात या दोनही गोष्टी माणसापासून दूर जाऊ लागल्या आहेत. त्यावर खूप सारे काम करण्याची गरज आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून माणसाला अपेक्षित असलेला आनंद मिळू शकतो. दुर्दैवाने आपली परिमाणे आपल्या समाधानावर अवलंबून नसतात तर समाजातील इतर घटकांवर व खोट्या प्रतिष्ठेवर अवलंबून असतात. त्यामुळेच आपला मार्ग चुकतो आणि आपल्याला आनंद होण्याऐवजी दुःखच अधिक होते.
मी ज्या वेळेस आपले भविष्य आपल्या हाती म्हणतो त्यावेळेस वरील संकल्पना आपल्या स्पष्ट आहेत असे गृहीत धरले आहे. तसेच सोबतीला अन्य काही गोष्टींची माहिती व कल्पना आपल्याला आहे असे गृहीत धरलेले आहे. आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी मला माझी स्वतःची ओळख आहे का ? ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य माझ्यामध्ये आहे का ? आपल्याला अपेक्षित असलेले ज्ञान आहे का ? आपण कोण आहोत ? आपल्यामध्ये काय आहे जे इतरांमध्ये दुर्मिळ आहे, हे सांगता येईल का ? वास्तव स्वीकारण्याची व अपयशाला सामोरे जाण्याची जिद्द माझ्यात आहे का ? जीवनात आव्हानांना स्वीकारायची माझी तयारी असते का ? मेहनत करण्याची व स्वतःत बदल करण्याची माझी तयारी आहे का ? जीवनात आवश्यक असणारी जोखीम स्वीकारण्याची माझी तयारी आहे का ? मिळालेल्या अपयशाची जबाबदारी मी घेतो का कि अन्य कोणावर तरी त्याचे खापर फोडून मोकळे होतो
अतिशय छोट्या वाटणाऱ्या या गोष्टी आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देणाऱ्या आहेत. समाजातील अनेक यशस्वी व कर्तृत्ववान लोकांना आपण आदर्श मानतो मात्र त्यांची एकतरी गोष्ट आपण आपल्या जीवनात अंगिकारतो का ? कुठे अडचणी येतात, त्यावर मात कशी करतो ? एखाद्या गोष्टीसाठी आवश्यक असणारे बदल करण्यासाठी मी स्वतःहून पुढाकार घेतो का ? सद्यस्थितीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण या प्रश्नांचा विचार करायला सुरुवात करु या ... आणि सिद्ध करु या ! आपले आयुष्य आपल्या हातातच असते.
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४














