इसावल्या घरात जी
आहे पुढे आहे पुढे
शेतीची मशागत जी ।
सण सरे आस उरे
आखजी गेली व्हय जी
सांग सई सांग सई
आखजी आता कही जी?
९८२३३३४०८४
शतकांपासून हिसेंचीच परंपरा असलेल्या ब्रह्मदेशात राजांनी, सत्ताधाऱ्यांनी, हुकूमशहांनी सर्व संभाव्य शत्रूंचा अतिशय निर्दयपणे नायनाट केला आहे असे आपल्या लक्ष येईल. २ एप्रिल १९८८ रोजी आपल्या आईच्या खिन चीच्या आजारपणात सेवा सुश्रुषेनिमित्ताने मायदेशी अर्थात ब्रह्मदेशात परत आलेल्या स्यू चीला देशातील परिस्थिती आपल्या पित्याप्रमाणे देशसेवेसाठी सक्रिय करणारी ठरली. ने विन या हुकूमशहाच्या अन्याय, अत्याचार व नरसंहाराच्या कुकर्मांच्या कथा मानवतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. २६ वर्षे अनन्वित अत्याचाराची बळी ठरलेल्या जनतेसाठी आपण राजकारणात सक्रिय झाले पाहिजे असे ते इच्छा नसतानाही ठरविते. देशातील हिंसाचाराला ऑंग सान स्यू चीला एकच मार्ग व एकच उत्तर दिसत होते. तो म्हणजे भारतात महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढयासाठी अनुसरलेला अहिंसेचा मार्ग. त्यांची निर्भयता, सत्याग्रह आणि अहिंसा हि तत्त्वे तिला मायदेशातील स्वातंत्र्यलढा लढायला नैतिक, आत्मिक आणि आध्यात्मिक बळ देईल असा विश्वास होता. अहिंसा हेच हिसेंवरचं उत्तर असून त्याद्वारेच आपण जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवू शकू असा तिला विश्वास होता.
स्यु चीचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. उणीपुरी ३२ वर्षे वय लाभलेल्या तिच्या वडिलांनी २० व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला आणि वयाच्या ३२ व्या वर्षी ब्रह्मदेशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदी विराजमान असतांना तिच्या वडिलांची १९४७ साली हत्त्या झाली. त्यावेळी स्यू ची अवघ्या दोन वर्षांची होती. आपल्या वडिलांचा फारसा सहवास न लाभलेल्या स्यू चीने मात्र त्यांचा देशभक्तीचा वारसा समर्थपणे चालवला त्यासाठी मध्यंतरीचा जवळपास ४० वर्षांचा कालखंड जावा लागला. त्यानंतर १९४८ मध्ये देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला. स्वतंत्र ब्रह्मदेशाचे पहिले पंतप्रधान नू नं आपला मित्र व सहकारी असलेल्या 'बोज्योक' (सरसेनापती) ऑंग सानला कधीही विसरला नाही. त्याच्या कुटुंबियांना योग्य आदरसन्मान दिला. त्याची पत्नी खिन चीला १९६० मध्ये भारतात राजदूत म्हणून नियुक्ती दिली. त्यामुळे स्यू ची चे दोन वर्षाचे शालेय व त्यानंतरचे पदवीपर्यंतचे शिक्षण दिल्लीत झाले. भारतीय संस्कृती, महात्मा गांधी व अन्य महानुभावांची ओळख तिला तेव्हाच झाली.
तरुण वयात महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना प्रेमाचे विशेष आकर्षण असते. इंग्लंड मध्ये शिकत असतांना आधुनिक इतिहासाचा अभ्यासक मायकेलला स्यू ची आवडली होती व तो तिच्या प्रेमात पडला होता. मात्र स्यू चीने प्रेमास नकार देत आपली चांगली मैत्री कायमसाठी राहील असे सांगितले. कालांतराने तिच्या नकाराचं होकारात मत परिवर्तन होण्यासाठी तीन वर्षांचा कालखंड जावा लागला. मायकल या ब्रिटीश माणसाशी लग्न करण्यात पुष्कळ अडचणी होत्या. ज्या ब्रिटीश सत्तेविरूद्ध आपले वडील लढले, त्याच्या नागरिकाशी लग्न केलं आईला काय वाटेल ? लोक काय म्हणतील ? ते मला व माझ्या जोडीदाराला स्वीकारतील का ? या विवाहामुळे माझे स्वदेशी परतण्याचे दरवाजे तर कायमचे बंद होणार नाही ना ? अन देशाला तिची गरज कधी लागली तर? तिच्या वडिलांचा देशकार्याचा वारसा असा तिला सोडून देता येणार नव्हता. तीन वर्षांच्या या वैचारिक संघर्षानंतर आईचा विरोध पत्करून मायकेलशी लग्न केलं आणि ती संसारात रमली. त्यानेही स्यू चीला उत्तम अशी साथ देत तिला दिलेले वचन आयुष्यभर पाळले.
४ जानेवारी १९४८ ला स्वतंत्र झालेल्या ब्रह्मदेशात १९५८ साली लष्करी राजवट सुरु झाली. त्यानंतर १९६० ते ६२ या दोन वर्षाच्या कालखंडात लोकनियुक्त सरकार आले मात्र पुन्हा एकदा लष्कराने देशाची सूत्रे आपल्या हाती घेतली ती अलीकडच्या कालखंडापर्यंत. "ने विन" या लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील लष्करी राजवटीने प्रदीर्घ काळ आपल्याच स्वकीयांवर अत्त्याचार केले. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी यांना अक्षरश: गोळ्या घालून ठार केले. या लष्करी राजवटीची सामान्यजनांवर इतकी प्रचंड दहशत होती ते परस्परांशी संवादही करू शकत नव्हते. देश आर्थिक दिवाळखोरीत निघाला होता. अन्नधान्याचा तुटवडा, बेरोजगारी या सारखे प्रश्न हाताळणे त्यांना शक्य होतं नव्हते. मात्र सतत उपभोगायचा उद्देशाने लोकशाही मार्गाचा अवलंब न करण्याचे धोरण कायम ठेवले. ऑंग सान व तात्कालिक जनतेने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी घेतलेल्या कष्टांची त्यांना जाणीव नव्हती. आपल्या वडिलांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य न मिळाल्याने ती उद्विग्न झाली.
एका मोठ्या अग्निदिव्यातून जाणाऱ्या या देशातील जनतेच्या पाठीशी ती मोठ्या हिमतीने उभी राहिली. जागतिक समुदायाच्या "लोकशाही पुनर्स्थापनेच्या" आवाहनाकडे लष्कर राजवटीने कायम दुर्लक्षच केले. तिच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत १९९१ चा नोबेल पुरस्कार तिला मिळाला आणि जगाला तिच्या देशातील जनतेच्या हालअपेष्टांची माहिती मिळाली. माझ्या नावावर हा पुरस्कार असला तरी यावर खरा हक्क या लढ्यात बळी गेलेल्या, हालअपेष्टा, छळ सोसणाऱ्या ब्रह्मी जनतेचा आहे, माझा नाही. नोबेल पुरस्कारामुळेच आमचा हा लढा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला याचा आनंद व समाधान असल्याचा तिने म्हटले. त्यानंतर तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मात्र ती स्थानबद्धतेतच होती.
पुस्तकाचे नाव : राजबंदिनी ऑंग सान स्यू ची हिचं चरित्र
लेखिकेचे नाव : प्रभा नवांगुळ
प्रकाशकाचे नाव : राजहंस प्रकाशन प्रा. लि
सत्य, अहिंसा, शांततापूर्ण सह-अस्तित्व, संवर्धन आणि श्रमिकांप्रती प्रेम या गांधीजींनी जपलेल्या आणि आचरणात आणलेल्या मूल्यांवर आधारित आधुनिक जगाची स्थापना करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याच्या उद्देशाने व गांधीजींच्या जीवनाचा, विचारांचा आणि कार्याचा अद्भुत वारसा पुढच्या पिढीसाठी संक्रमित करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री भवरलाल जैन अर्थात मोठ्या भाऊंनी जगप्रसिद्ध अशा गांधीतीर्थची निर्मिती केली. दि. २५ मार्च २०१२ रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या हस्ते या भव्य अशा दूरदर्शी प्रकल्पाचा लोकार्पण सोहोळा करण्यात आला. आज या घटनेला १० वर्षे पूर्ण होत आहे. गांधीतीर्थच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने हा खास लेख आपल्यासाठी...
गांधीतीर्थची खास वैशिष्ट्ये -
१. जोधपूर येथील दगडापासून शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली ८१००० चौरस फुटांची हि शाश्वत रचना, हरित धोरणानुसार साकारण्यात आले आहे. गांधीतीर्थची वास्तू अतिशय सुंदर, रमणीय बाग, विस्तीर्ण हिरवळ (लॉन) आणि आंब्याच्या बागांच्या मध्यभागी आहे.
२. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या संग्रहालयात गांधीजींच्या जीवनातील घटना इंटरएक्टिव्ह टच स्क्रीन, बायोस्कोप, डिजिटल बुक्स, 3-डी मॅपिंग, म्युरल्स आणि अॅनिमेशनद्वारे सादर करण्यात येतात.
३. सध्या संग्रहालयातील माहिती इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित केली जाते.
४. वाजवी किमतीची पुस्तके, खादीचे कपडे (पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठी), आरोग्य आणि स्वच्छता उत्पादने, हस्तकला आणि विविध प्रकारच्या भेटवस्तूंची विक्री करणारे स्मरणिका दुकान (Souvenir Shop) येथे आहे.
५. २००० चौरस फूट व्हॉल्टसह अत्याधुनिक सुविधेसह ग्रंथालय आहे.६. कागदपत्रांच्या जतनासाठी अत्याधुनिक डिजिटायझेशन लॅब येथे आहे.
८. अतिथींसाठी खोल्या आणि उत्तम शाकाहारी जेवणाची सोय आहे.
गांधी रिसर्च फाउंडेशन (GRF) ची स्थापना आदरणीय मोठ्या भाऊंनी २००७ मध्ये केली. गांधीजींच्या अहिंसा (अहिंसा), अपरिग्रह (अपार्जनशीलता) आणि अनेकांतवाद (अनिरपेक्षता/बहुपक्षीयता) या मूलभूत तत्त्वांचा त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकार केला होता. या शाश्वत मूल्यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांनी या गांधीवादी मूल्यांच्या महत्त्वाच्या प्रासंगिकतेवर भर दिला, विशेषत: सध्याच्या काळातील हिंसाचार, राजकीय हुकूमशाही, भौतिकवाद आणि अनैतिकता, अध्यात्माचा अभाव यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला गांधीजींची मूल्ये हेच उत्तर आहे असा त्यांना विश्वास होता.
GRF मध्ये, गांधीजींच्या जीवनाला आदर्श मानून गांधी तत्त्वज्ञानाचा शक्य तितक्या साध्या आणि प्रभावी पद्धतीनेप्रसार केला जातो. आजच्या पिढीला प्रेरणा देण्याचे आणि व्यक्तींच्या जीवनावर गांधी विचारांचा प्रभाव टाकण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील बांधवांचे जीवन सशक्त व आत्मनिर्भर करण्यातही संस्था कार्यरत आहे.
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या मोठ्या भाऊंनी जल व्यवस्थापन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. एक अनुकरणीय सामाजिक उद्योजक म्हणून, अहिंसा आणि सत्याच्या मूल्यांनी प्रेरित होऊन, त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी ट्रस्टीशिपमध्ये आपला व्यवसाय चालवला. ते एक परोपकारी व सामाजिक संवेदनांचे प्रतीक होते. त्यांनी जळगाव शहरात शाळा, नेत्र रुग्णालय, क्रीडा संघटना आणि धर्मादाय गृहांची निर्मिती केली. शहराबाहेरील भागात त्यांनी सार्वजनिक वापरासाठी सिंचन धरण बांधले. त्यांच्या अफाट सामाजिक योगदानामुळे, भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात पद्मश्री पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले होते.
गांधीजींच्या उदाहरणावरून प्रेरणा घेऊन जीवन व्यतीत करणारे न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी गांधीतीर्थचे प्रथम अध्यक्ष म्हणून लाभले व या प्रकल्पाला वास्तवात आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मोठ्या भाऊंची प्रामाणिक विनंती मान्य केली हि सर्वात मोठी उपलब्धी म्हणता येईल. एखाद्या श्रीमंताने आपली संपत्ती समाजासाठी ट्रस्टीशिपमध्ये ठेवली तर संपत्ती मिळवणे हे समाजसेवा करण्यासारखे आहे. या गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन गांधीतीर्थ बांधण्यात आले आहे.
आपला महत्वाकांक्षी प्रकल्प मोठ्या भाऊंनी "गांधीजी" या असामान्य माणसाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. अतिशय सुंदर, रमणीय आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल अशा वातावरणातील गांधीतीर्थ उच्च क्षमतेच्या विद्वानांना, तरुण जिज्ञासू मनांना व गांधी अभ्यासकांना येथील वाचनालय, संग्रहालय आणि प्रदर्शनाला भेट देण्यास आकर्षित करीत आहे. केवळ या व्यक्तींच्या जीवनातच नव्हे तर जागतिक परिस्थिती सुधारण्यातही या जगप्रसिद्ध अशा वास्तूचे मोठे योगदान अधोरेखित होत आहे. गेल्या दहा वर्षात ६२ राष्ट्रांमधील सुमारे ५ लाख लोकांनी गांधीतीर्थला भेट दिली आहे. सर्व वाचकांना विनंती आहे कि, गांधीजींच्या मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रेरित झालेल्या या उदात्त प्रयत्नात यावे आणि आपणही सहभागी व्हावे.
आपण गांधी विरोधक असालही मात्र आपण गांधीजींच्या एकादश व्रताचे वाहक आहात असे मला वाटते कारण त्यातच माणसाच्या माणुसकीची, संवेदनशीलतेची खरी ओळख आहे. कोरोना सारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर गांधीजींच्या एकादशव्रताची कालातीतता दिसून येते. जीवनातील आव्हानांना, मानवनिर्मित संकटांना गांधी विचारांशिवाय तरणोपाय नाही असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते. आपण सर्वांनी सहकुटुंब, मित्र परिवारासह एकदा अवश्य भेट द्यावी. असामान्य, अविश्वसनीय कार्यकर्तृत्वाचा धनी असलेल्या महात्म्याला एक व्यक्ती म्हणून प्रामाणिकपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा हे दशकपूर्तीच्या निमित्ताने विनम्र जाहीर आवाहन...
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्याची अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण www.gandhifoundation.net या वेबसाईटवर अवश्य भेट द्या...
गिरीश कुळकर्णी
आज २२ मार्च ! जागतिक जल दिन... जीव सृष्टीच्या अस्तित्वासाठीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. अलीकडच्या वेगवेगळ्या सर्वेक्षणातून व संशोधनातून लक्षात आलेल्या काही गोष्टी खास आपल्या माहितीसाठी येथे देत आहे.
केंद्रीय जल आयोगानुसार, भारताची वार्षिक पाण्याची गरज 3,000 अब्ज घनमीटर आहे, तर दरवर्षी सरासरी 4,000 अब्ज घनमीटर पाऊस पडतो. समस्या अशी आहे की 1.3 अब्ज लोकांचा देश आकाशातून मिळणाऱ्या तीन चतुर्थांश पाण्याचा वापर करू शकत नाही.
बदलत्या हवामान पद्धती आणि वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे भारतावर पाण्याचा ताण आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या (2017) आकडेवारीनुसार, 700 पैकी 256 जिल्ह्यांनी भूजल पातळी 'गंभीर' किंवा 'अति शोषित' नोंदवली आहे.
1.38 अब्ज लोकसंख्येसह भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. या लोकसंख्येपैकी 6% पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित पाणी मिळत नाही आणि भारतातील सुमारे 15% लोक उघड्यावर शौच करतात.
भारतातील जलसंकट हे अनेकदा सरकारी नियोजनाचा अभाव, वाढलेले खाजगीकरण, औद्योगिक आणि मानवी कचरा, सरकारी भ्रष्टाचार यातून निर्माण झालेले आहे. याशिवाय, भारतातील पाण्याची टंचाई आणखी तीव्र होण्याची अपेक्षा आहे कारण 2050 पर्यंत एकूण लोकसंख्या 1.6 अब्जपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
२०३० पर्यंत भारतीय लोकसंख्येपैकी किमान ४०% लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही, असे नमूद करून NITI आयोगाच्या अहवालात पाण्याची चिंता अधिक स्पष्ट केली आहे.
जागतिक पर्जन्यमानाच्या जवळपास 4 टक्के पाऊस भारतात पडतो आणि प्रति व्यक्ती प्रति वर्ष पाण्याच्या उपलब्धतेच्या बाबतीत जगात 133 वा क्रमांक लागतो.
वनस्पती आणि पिकांच्या वाढीसाठी पाणी आवश्यक असल्याने कृषी क्षेत्रात पाण्याचे संवर्धन आवश्यक आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे कमी होत जाणारे पाण्याचे प्रमाण आणि क्षारतेचे प्रमाण वाढल्याने ही बाब गंभीर बनली आहे.
गंगा-ब्रह्मपुत्रा आणि सिंधू सर्वात मोठी जल स्रोत आहेत कारण ते जवळजवळ निम्म्या देशाचा निचरा करतात आणि 40% पेक्षा जास्त उपयुक्त पृष्ठभागाचे पाणी हिमालयाच्या पाणलोटातून महासागरात वाहून नेतात. भारतातील 70% पेक्षा जास्त नद्या बंगालच्या उपसागरात वाहून जातात, मुख्यतः गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांचा भाग म्हणून.
वरील सर्व गोष्टी वाचल्यानंतर आपण प्रत्येकाने पाण्याबाबत जागृत होण्याची आवश्यकता आहे. या गोष्टी केवळ आपल्या पुरत्या मर्यादित न ठेवता आपल्या शेजारी-पाजारी व्यक्तींनाही याबाबत जागरूक करणे आपल्या सर्वांचे काम आहे. पाण्याचा सुयोग्य वापरासह अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत ज्यामुळे पाण्याची बचतही होईल आणि त्याचे संरक्षणही !
पाणी या क्षेत्रात चाकोरीबाहेर जाऊन आपल्या जीवनाचे ध्येय समजून काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. आपणही य सर्व मंडळींकडून प्रेरणा घेणे अत्यावश्यक आहे. प्रचंड जलप्रदूषण, प्रदीर्घ दुष्काळाचा प्रकोप, पाण्याची पातळी, पाण्यापासून होणारे रोग आणि बरेच काही - भारतातील पाणीटंचाईवर चर्चा करताना आपण सतत ऐकतो अशा अनेक समस्यांपैकी या काही आहेत. देशाच्या ग्रामीण भागात राहणारे लोक आहेत जे दररोज प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत सुरक्षित पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी मैलो न मैल चालत जातात. असे अनेक शहरी रहिवासी आहेत जे मर्यादित पाणीपुरवठा आणि पिण्याच्या पाण्याच्या निकृष्ट दर्जात अडकले आहेत. अहवालानुसार, भारतातील 21% संसर्गजन्य रोग असुरक्षित पाण्याशी संबंधित आहेत आणि देशातील 75% नद्या आणि तलाव इतके प्रदूषित आहेत की त्यांचा वापर पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी केला जाऊ नये.
असे असले तरी, संपूर्ण देश पाणीटंचाईशी झुंजत असताना, देशभरात असे अनेक आहेत जे जलसंवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ते विहिरी बांधत आहेत, जलसंधारणाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करत आहेत, चेक डॅम बांधत आहेत आणि पिण्याचे शुद्ध पाणी गरजूंपर्यंत पोहोचेल याची खात्री करत आहेत. ज्या काळात 69 कोटी भारतीयांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही, अशा वेळी देशाला अशा अनेक जल योद्ध्यांची देशाच्या प्रत्येक भागात गरज आहे.
१) अमला रुईया या मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्तीने पारंपारिक पाणी साठवण तंत्राचा वापर करून आणि चेक डॅम बांधून राजस्थानमधील १०० हून अधिक गावांमध्ये अनेकांचे जीवन बदलले आहे. राजस्थानच्या दुष्काळग्रस्त भागात पाणी वाचवण्यासाठी शाश्वत आणि कायमस्वरूपी उपाय तयार करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आकार चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आत्तापर्यंत, ट्रस्टने राजस्थानमधील १०० गावांमध्ये २०० चेकडॅम बांधण्यात मदत केली आहे आणि 2 लाखांहून अधिक लोकांना प्रभावित केले आहे.
२) आबिद सुरती ड्रॉप डेड फाऊंडेशन नावाची स्वयंसेवी संस्था चालवतात, जी मुंबईतील घरांमध्ये पाण्याची नासाडी करणाऱ्या गळतीसारख्या प्लंबिंगच्या समस्यांची काळजी घेऊन लाखो टन पाण्याची बचत करत आहे. ८० वर्षांचे आबिद एक स्वयंसेवक आणि प्लंबरच्या टीमसह हे सर्व विनामूल्य काम विनामूल्य करतात. २००७ मध्ये, फाऊंडेशनच्या अस्तित्वाच्या पहिल्या वर्षी, आबिदने मीरा रोडवरील १६६६ घरांना भेटी दिल्या, ४१४ गळतीचे नळ मोफत दुरुस्त केले आणि सुमारे ४.१४ लाख लिटर पाण्याची बचत केली. त्यांच्या कार्याने आता देशभरातील इतर लोकांना त्यांचे उदाहरण त्यांच्या शहरांमध्ये पाणी वाचविण्यात मदत करण्यास प्रेरित करीत आहे.
३) अयप्पा मसागी यांनी हजारो लोकांचे जीवन पावसाच्या पाण्याचे संचयन आणि जलसंधारणाचा सराव करून बदलले आहे. या कर्नाटकातील रहिवासी असलेल्या अय्यप्पांनी गदग, कोरड्या प्रदेशातील एका गावात सहा एकर जमीन खरेदी केली, जिथे त्यांनी रबर आणि कॉफीची लागवड सुरू केली, हे सिद्ध करण्यासाठी की कितीही पाऊस पडला तरीही ही पिके घेता येतात. तथापि, अनेक वेळा अयशस्वी झाल्यानंतर आणि अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, त्यांना आढळले की बोअरवेल पुनर्भरण करणे आणि बिगर सिंचन पद्धतींचा सराव करणे अधिक मदत करू शकते. या पद्धतींचा वापर करून, त्यानंतरच्या दोन वर्षांत त्याने चांगले पीक घेतले आणि नंतर शेजारच्या भागात या पद्धतींबद्दल संदेश पसरवण्यास सुरुवात केली. आज, अयप्पाने 11 राज्यांमध्ये हजारो संवर्धन प्रकल्प विकसित केले आहेत आणि देशात ६०० हून अधिक तलावांची निर्मिती केली आहे.
४) 'भारताचे जलपुरुष' म्हणून प्रसिद्ध असलेले राजेंद्रसिंह, ग्रामीण भारतातील पाणी पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांसाठी सर्वत्र ओळखले गेले आणि त्यांचे कौतुक केले गेले. जेव्हा १९७५ मध्ये राजस्थानमध्ये आरोग्य केंद्रे सुरू करण्यासाठी राजेंद्रसिंह पोहोचले तेव्हा त्यांना जाणवले की तेथील लोकांना आरोग्य सेवेपेक्षा पाण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांसोबत मातीचे बंधारे बांधण्याचे काम सुरू केले. जोहाड - पावसाचे पाणी गोळा करण्याचे एक पारंपरिक तंत्र. आजराज्यात सुमारे ८,६०० जोहाड आणि इतर तत्सम संरचना आहेत जे पाणी गोळा करतात आणि राजस्थानमधील १,००० हून अधिक गावांना पाणी पुरवतात.
५) मालगुजार हे सुमारे दोन शतकांपूर्वी पूर्व विदर्भातील स्थानिक जमीनदार होते आणि त्यांनी पाणी साठवण्यासाठी अनेक टाक्या बांधल्या होत्या आणि सिंचनासाठी पाणी पुरवले होते. 1950 पूर्वी त्यांनी या टाक्या बांधल्या, मालकी आणि देखभाल केली, परंतु जमीनदारी प्रथा रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने टाक्यांची मालकी घेतली आणि टाक्या वापरणाऱ्यांकडून पाणी कर वसूल करण्यास सुरुवात केली. मालगुजारांनी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला, त्यानंतर १००० हून अधिक टाक्या वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिल्या. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष आपटे यांनी २००८ मध्ये सुमारे दोन वर्षांच्या कालावधीत अशा पहिल्या टाक्यांची पुनर्स्थापना केली. यामुळे भूजल पातळीचे पुनर्भरण झाले आणि परिसरातील कृषी उत्पादन आणि मत्स्य उत्पादनात वाढ झाली आणि यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाला भंडारा येथील सुमारे २१ मालगुझारी टाक्या पूर्ववत करण्यास प्रवृत्त केले.
हि यादी तशी फार मोठी आहे. त्यातील काही निवडक "पाणीवाल्यांची" थोडक्यात माहिती खास आपल्या सर्वांसाठी दिली आहे. आपणही थोडे चाकोरीबाहेर जाऊन या समस्येचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा असे वाटते....
गिरीश कुळकर्णी
| तुम्ही आम्ही पालक - मार्च २०२२ |
| तुम्ही आम्ही पालक - मार्च २०२२ |
माझी मुलगी मृण्मयीचा अर्थात मनीचा काल जन्मदिवस होता. १९ वर्षांपूर्वी आमच्या घरात तिचा जन्म झाला. आमच्या संपूर्ण परिवारात तशी मुलींची संख्या कमीच आहे. आम्हा तिघा भावांमध्ये मला एकट्यालाच मुलगी आहे. मुलं लहान असतांना त्यांना लाडाने वा प्रेमाने काही नावाने बोलावतो. आम्ही मृण्मयीला 'मनी' म्हणतो. जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या पिल्लांचा प्रवास झर्रकन डोळ्यासमोरून जात असतो. कधी तरी आपल्या गत आयुष्याशीही त्याची स्वाभाविकपणे तुलना होते. मुलांना पालकांच्या गत आयुष्याची माहिती एव्हढ्या मर्यादित उद्देशाने हि तुलना योग्य आहे असे वाटते. मात्र मोठ्यांनी त्यातून अनेक बोध घेत आपली पुढची पिढी किती भाग्यवान आहे या दृष्टीने सकारात्मक शोध घेतला पाहिजे असे मला तिच्या प्रवासावरून वाटते. आमच्या मनीचा मृण्मयी प्रवास समजून घेतांना आलेले विचार मांडत आहे...
मनीचा मृण्मयी प्रवास दोन अर्थाने मला समजावून घ्यावासा वाटतो. एक म्हणजे जबाबदार मुलगी आणि दुसरा अर्थ म्हणजे आनंदी (मृण्मयी) प्रवास. आमची मृण्मयी आता पुण्यात एकटी राहते (त्यात काय कौतुक असे वाटू शकते!) आणि एक जबाबदार मुलगी म्हणून राहते याचा विशेष आनंद आहे. प्रथमेश २२ वर्षांचा झाला त्यावेळेस "बाप २२ वर्षांचा होतांना..." असा एक लेख लिहिला होता कारण त्यावेळी तो घरापासून पहिल्यांदा नोकरीच्या निमित्ताने दूर गेला. मृण्मयीला शिक्षणाच्या निमित्ताने ३ वर्षे अगोदर दूर जावे लागले. हे पहिले वर्ष आहे कि तिने आईबाबांशिवाय आपला जन्मदिवस साजरा केला आणि म्हणूनच मला मनीच्या 'मृण्मयी' प्रवासाबद्दल थोडे लिहावे असे वाटले.
आपण पालक वा व्यावसायिक म्हणून सुद्धा आपली जबाबदारी पार पडतांना चुका करतो, कोणाच्या तरी मार्गदर्शनाने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तसेच मुलंही चुका करतील, त्यांना हवे असेल त्यावेळेस आपण मार्गदर्शन करावे. अर्थात जबाबदार होण्यासाठी व तसा विश्वास आपल्याला वाटावा यासाठी मुलांच्या लहानपणापासून आपण अनेक गोष्टी केल्या पाहिजेत. त्यातील मला काही सुचतात त्या अशा...
१. जसे कधी तरी काका, मामा, मावशी वा आजी-आजोबा यांच्याकडे एखादा दिवस राहायला पाठविणे.
२. घराजवळ असलेल्या दुकानातून वस्तू / भाजी आणण्यासाठी पाठविणे. यात व्यवहारासोबतच स्वतंत्रतेची सवय लागते.
३. शाळेत शिकत असतांना सहलीला पाठविणे. परिस्थितीशी, व्यक्तींशी जुळवून घेण्याची शिकवण मिळते. सामाजिक जाणीव निर्माण होते.
४. शाळेतील विविध स्पर्धा / उपक्रम यात सहभाग घेणे. यात क्षमता जाणून घेणे या शिवाय अन्य उद्देश नसावा. त्याचा उपयोग करिअर निश्चितीसाठी अधिक होतो
५. घरातील कामे करतांना त्यांचा सहभाग घेणे. स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावणे. आरोग्याच्यादृष्टीने व्यायाम, आहार याकडे लक्ष देणे.
६. योग्य वयात योग्य वस्तू देणे. आपली आर्थिक परिस्थिती असली तरी मोबाईल, वाहन यासारख्या वस्तू देतांना त्यांना त्या वापरण्यायोग्य तयारी करून देणे. येथे वयापेक्षा वस्तू हाताळण्याची क्षमता वाढविण्यावर भर असावा.
७. वाचन, समाजात मिसळणे, छंद जोपासणे, स्पर्धांमध्ये भाग घेणे यासारख्या गोष्टी आपल्या हट्टासाठी नव्हे तर त्यांच्यातील सामाजिक गुण विकसित होण्याचा व पाल्य अधिक वैचारिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ व्हावा हा उद्देश असावा.
८. आपल्याकडील वस्तू इतरांसोबत वाटून घ्यायला प्रोत्साहित करणे. समूहात राहत असतांना सोबतच्या व्यक्तींना माणुसकीच्या नात्याने वागविण्याची सवय लागते.९. परिवारातील निर्णय घेत असतांना त्यांची मते विचारात घेणे.त्यांचा योग्य तो सन्मान राखणे. त्यांना काय समजते असे न मानता खुलेपणाने काही गोष्टींमध्ये त्यांची समज आपल्यापेक्षा जास्त आहे हे स्वीकारणे.
१०. निर्णय घेण्यासाठी तयार करणे. चुकलेल्या निर्णयाची शिक्षा करण्याऐवजी काय चुकले याकडे विशेष लक्ष देणे. पुन्हा निर्णय घेऊन ती गोष्ट करण्यासाठी उद्यक्त करणे. एखादा गोष्ट जमलीच नाही तर पालकांनी अट्टाहास करू नये.
मनीच्या मृण्मयी प्रवासात पालक व परिवारजनासह, शाळा, आचार्य व दीदी यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. शाळेच्या बाबतीतही आजकालची मुले त्रुटींबद्दल स्पष्टपणे बोलतात त्यावेळी आपण चांगल्या गोष्टीकडे मुलांचे लक्ष वेधले पाहिजे. सार्वजनिकरित्या टिपण्णी करतांना प्रथम पालकांनी काही भान ठेवले पाहिजे. काही गोष्टी वास्तव असल्या तरी पाल्याच्या वयाच्यादृष्टीने बोलणे योग्य नसते. त्याबद्दल जाणीव करून देऊन बदल घडवून आणण्यात पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्रुटींबद्दल पालक सभांमधून वा वैयक्तिक भेटीद्वारे उपाय करण्याचा प्रयत्न करावा. वर्गातील मुलांमधील गोष्टींकडे पूर्वग्रहाने न पाहता समस्या समजण्याकडे कल असावा. भांडण वा वादविवादाकडे अजिबात नसावा. ज्याची चूक असेल त्याला (आपला पाल्य असला तरी) योग्य अशी समज द्यावी व यापुढे असे घडणार नाही वा करणार नाही असे आश्वासन घ्यावे. विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा (मार्क) त्याच्या क्षमता विकासाकडे अधिक लक्ष द्यावे. त्याच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्यावे. चाकोरीबाहेरची करिअर निवडतांना पालकांनी पाल्याच्या पाठीशी उभे राहावे. अनेकदा पालकांनाच बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि त्यांच्या काळातील परिस्थितीनुसार निर्णय घेतला जातो वा त्याचा आग्रह असतो. (मृण्मयी पुण्यात कथ्थक विषयाचे पदव्युत्तर पदवी संपादनासाठी गेली आहे)
मनीच्या मृण्मयी प्रवासातील पालक, शाळा, गुरुजन यांच्या इतकाच वाटा तिच्या जळगावातील गुरु प्रभाकर कला संगीत अकादमीच्या डॉ. अपर्णा भट-कासार यांचा आहे किंवा थोडा अधिक म्हटले तरी हरकत नाही. अभ्यास, सराव, शिस्त, संधी, कौतुक प्रसंगी वास्तवाची कठोरपणे जाणीव करून देण्याचे काम त्यांनी केले. त्याबद्दल आम्ही कधीही तक्रार केली नाही आणि त्याचा नक्की फायदा झाल्याचा आमचा अनुभव आहे. पालकांच्या परिघातील व्यक्ती, संस्था यांचाही मुलांच्या घडणीत खूप फायदा होतो. मुळात पाल्य जबाबदार होण्यासाठी पालकांनी जबाबदार झाले पाहिजे. त्यासाठी पालकांच्या बालपणीच्या वा त्यांच्या संगोपनाच्या गोष्टी आजच्या काळात तशाच लागू पडत नाही. त्यासाठी पालकांनी पालकत्वाचे धडे / प्रशिक्षण / कार्यशाळा यांचा जरूर लाभ घेतला पाहिजे.
सर्वात महत्वाचे पालक म्हणून आई-बाबांमधील सुसंवाद अपेक्षित गोष्टी घडण्यासाठी उपयुक्त ठरतो. मुले जसजशी मोठी होतात तसतसा निर्णय प्रक्रियेत सगळ्यांचाच सहभाग असावा मात्र निर्णयाची जबाबदारी निश्चित करून घेतली पाहिजे. मुलांशी पालकांनी बोलतांना आपल्या जोडीदाराबद्दल मुलांच्या मनात अढी निर्माण होणार नाही याचीही काळजी दोघांनी घेतली पाहिजे. सर्वांनी एकत्र बसून विस्तृत चर्चा करून त्याद्वारे विसंवादाचे विषय हाताळले पाहिजे. विशेषतः पालकांनी वा मुलांनी केलेल्या चुका, वयात येत असतांनाचे विषय यावेळी हमखास खुली चर्चा फलद्रुप ठरते, वास्तव आणि आभासी जग, मूल्ये-तत्व आणि व्यावहारिक जगातील गोष्टी ज्यात तफावत दिसते त्यावेळी त्यातील फरक, मते व विचार सांगितले पाहिजे. त्यावर आधारित निर्णय सर्वथा पाल्यावर सोपविल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. अर्थात पाल्याचा प्रवास जबाबदार व्यक्तीकडे होत राहतो. हि अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि कोणीही परिपूर्ण नाही याची जाणीव पालकांसह मुलांना व्हावी याउद्देशानेच मृण्मयीच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा लेख लिहिला आहे. आपल्या प्रतिक्रिया लाखमोलाच्याच...(जाता जाता : निसर्गातील प्राणी, पक्षी आपल्या पिल्लांना कसे वाढवितात, त्यांना कसे सक्षम बनवितात याकडे डोळसपणे पाहिल्यास खूप गोष्टी शिकायला मिळतात हा माझा स्वानुभव आहे व त्यामुळे पालकांनाही निर्णय घेणे त्याबरहुकूम कृती करणे सोपे जाते.)
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४