Friday, 19 May 2023

आपण सर्व 'जीवरक्षक' !

रोटरी क्लब जळगावच्या कालच्या साप्ताहिक सभेत एका आगळ्यावेगळ्या विषयावर मार्गदर्शन / प्रशिक्षण देण्यात आले. दैनंदिन जीवनात येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो यासाठी हे प्रशिक्षण होते. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुपरिचित व अलीकडच्या काळात सामान्य माणसासाठी परवलीचा शब्द म्हणजे CPR अर्थात Cardiopulmonary resuscitation कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन ! हा शब्द अर्थात हे तंत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि प्रत्येकाने आपल्या जीवनात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीत या तंत्राचा आत्मविश्वासाने वापर करावा यासाठी हा लेख... आपण वाचा व इतरांनाही वाचण्यासाठी पाठवा !

एखाद्या आपत्कालीन परिस्थितीचा शिकार झालेल्या व्यक्तीला पुनर्जीवन मिळवून देणारे हे तंत्र असल्याने त्याला बेसिक लाईफ सपोर्ट असेही म्हणतात. एखादा व्यक्तीची जर श्वसन क्रिया आणि हृदयक्रिया बंद पडून तो बेशुद्ध झाला असेल तर त्याला देण्यात येणारा अतिमहत्वाचा प्राथमिक उपचार म्हणजेच बेसिक लाईफ सपोर्ट... यालाच CPR किंवा जीवन संजीवनी क्रिया असे म्हणतात. रामायणात हनुमानाने संजीवनी वनस्पती आणून लक्ष्मणाला जीवनदान दिले होते. तशाच प्रकारची आपत्कालीन परिस्थितील व्यक्तीला जीवनदान देणारे हे तंत्र आहे. १० पैकी ३ व्यक्तींना त्याचा फायदा होतो अर्थात त्यांना जीवनदान मिळते. 

एखादी घटना अनपेक्षितपणे घडल्यास माणसाला बऱ्याचदा काही सुचत नाही. मन शांत ठवून आपण काही प्राथमिक गोष्टी करू शकल्यास आपण त्या माणसाचा जीव वाचवू शकतो. बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा दवाखान्यात पोहचेपर्यंत, आहे त्याच ठिकाणी सामान्य नागरिकांनी मदत करणे अति आवश्यक आहे. या उपचाराने आपण त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. हृदय बंद पडलेल्या व्यक्तीमध्ये, ह्रदयातून मेंदू व इतर अवयवांकडे होणारा रक्तपुरवठा जर का ४ मिनिटात प्रस्थापित झाला नाही तर मेंदू कायमचा निष्क्रीय होतो. या अवघ्या ४ मिनिटात  बंद पडलेले हृदय किंवां त्याची स्पंदने कृत्रिमरीत्या का होईना सुरु ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी CPR सुरु ठेवणे गरजेचे आहे. 

CPR कोणीही करू शकतो. त्याला फारशा कौशल्याची आवश्यकता नसते. कोणीही जाणकार अर्थात CPR कसे द्यायचे हे माहित असलेला व्यक्ती छातीवर दाब व कृत्रिम श्वास देऊ शकतो. पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्या व्यक्तीची भूमिका महत्वपूर्ण ठरते. CPR केव्हा करावे ? याचे सोपे उत्तर आहे एखादी व्यक्ती बेशुद्ध आहे, तिची हृदयक्रिया व श्वसन क्रिया बंद आहे. अशा व्यक्तीला CPR करावे. जेव्हा परिस्थिती फारशी सुरक्षित न वाटल्यास किंवा माणूस प्रतिसाद देत असल्यास व शरीर थंड व कडक झाले असल्यास CPR करू नये. आपण CPR आहे त्याच जागी सुरक्षितता लक्षात घेऊन देण्यास सुरुवात करावी. जीवन संजीवनी क्रिया अर्थात CPR हि माणसाला जिवंत ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रियांची शृंखला आहे. आठ वर्षावरील स्त्री-पुरुष यांच्यासाठी आपण हि क्रिया करू शकतो. 


CPR सुरु करण्यापूर्वी तो माणूस मूर्च्छित (बेशुद्ध) आहे का जागा (Cautious) आहे याची खात्री करा. सदर व्यक्ती श्वास घेते आहे किंवा नाही हे जाणून घ्या व तिसरी गोष्ट नाडीची ठोके किंवा हृदयाची धडधड सुरु आहे का याची खात्री करून घ्या. मगच CPR चा निर्णय घ्यावा. पिडीत व्यक्ती निश्चल आहे वा प्रतिक्रिया देऊ शकते का ते पहा. त्यासाठी त्याला खांदा हलवून आवाज द्या. “काका डोळे उघडा”.  प्रतिक्रिया नसल्यास, श्वास नसल्यास, हृदयाची स्पंदनं चालू नसल्यास सी पी आर सुरू करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या. नाडी बघण्यासाठी, मानेजवळ श्वासनलिकेच्या बाजूला कॅरोटीड (carotid) या धमनीला (रक्तवाहिनीला) हात लावून नाडी बघायला हवी... मदतीसाठी आवाज द्या. संबंधित व्यक्तीला जवळच्या हॉस्पिटलला किंवा १०८ ला फोन करण्यास सांगा. जवळपास कोणी डॉक्टर असल्यास त्यांना बोलवा.  

जीवन संजीवनी क्रियेत ३ महत्वाच्या पायऱ्या आहेत. त्याला CAB म्हणतात. म्हणजे Circulation  (रक्ताभिसरण), Airway (श्वसनमार्ग) आणि Breathing (श्वासोच्छवास). रक्ताभिसरणासाठी छातीवर दाब द्यावा. यासाठी व्यक्ती जमिनीवर असावी किंवा एखाद्या कडक – सपाट पृष्ठभागावर असावी. रक्ताभिसरण अखंडीत सुरु राहण्यासाठी छातीवर दाब देणे आवश्यक आहे. छातीच्या (बरगडीच्या) सर्वात खालच्या हाडाच्या दोन बोटे वरती हा दान देणे आवश्यक आहे. हाताची दोन्ही बोटे एकात एक गुंफून, कोपर सरळ ठेवून दोन्ही खांदे दाब द्यावयाच्या व्यक्तीच्या छातीवर असावेत. साधारणपणे एका मिनिटात १००-१२० वेळा दाब दिला पाहिजे. प्रत्येक ३० दाबानंतर छोटा पॉझ घेऊन CPR सुरु ठेवणे. साधारणपणे २  मिनिटात १५० वेळा दाब दिला गेला पाहिजे. छातीवरील दाबाचा भाग ५ सेंटीमीटर दाबला गेला पाहिजे. दाब सोडल्यानंतर छाती पूर्ववत झाली पाहिजे. दाब देण्याची क्रिया व्यक्ती शुद्धीवर येई पर्यंत वा तसा प्रतिसाद देईपर्यंत सुरु ठेवणे अपेक्षित आहे अन्यथा अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता कमी असते. दाब देत असतांना तो मोजला पाहिजे. आपण काही वेळात आपण थकणार असल्याने आजूबाजूच्या कोणा व्यक्तीला CPR देण्यासाठी तयार करणे. संबंधित व्यक्तीचा कोणताही प्रतिसाद मिळाल्यास त्याला एका कुशीवर करावे.

श्वसनमार्ग मोकळा करणे - श्वसनमार्ग किंवा श्वासनलिकेमध्ये अडथळा निर्माण झाला तर पुरेसा श्वास घेता येत नाही.  बरेचदा व्यक्ती बेशुद्ध पडल्याने जीभ सैल होऊन मागे पडते व श्वसन मार्गाला अडथळा निर्माण करते. यासाठी डोक्याला कपाळावर हलकासा जोर द्या. मान सरळ करा. हनुवटी वर करा.  कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी पिडीत व्यक्तीच्या तोंडावर रुमाल टाकणे. नाक चिमटीत घेऊन बंद करणे. स्वत: नेहमीप्रमाणे श्वास घेणे. ओठ पिडीत व्यक्तीच्या तोंडावर ठेवून आपला उच्छवास त्याच्या छातीत भरणे. हे करत असताना छाती फुगते त्याकडे लक्ष द्यावे. 

साधारणपणे CPR केव्हा दिला जातो त्याची उदाहरणे -

१. एखाद्या व्यक्तीला जर विजेचा शॉक लागत असेल तर त्याचा श्वास अडकतो. तेव्हा CPR देऊन आपण त्या व्यक्तीला कदाचित वाचवू शकतो.

२. जेवताना कधी कधी अन्न अडकल्यानंतर CPR देता येतो.

३. गोळ्यांचा आकार मोठा असेल तर ते देखील अडकण्याची शक्यता असते. तेव्हा CPR देता येतो.

४. विषबाधा झाल्यानंतर ते विष बाहेर काढण्यासाठी CPR देतात.

५. पाण्यात जर कोणी बुडत असेल तर त्याला वर काढल्यानंतर छातीवर दाब देऊन पाणी बाहेर काढल्यानंतर तोंडातून श्वास देऊन CPR दिला जातो.

६. अपघातात जास्त रक्त वाहून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.

७. एखाद्याच्या डोक्याला मार लागून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.

८. चक्कर येऊन पडल्यास CPR देता येतो. 

यासह अनेक परिस्थतीत वरील तीनही लक्षणे आढळून आल्यास CPR देत येतो. 

रोटरी क्लब सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, के. डी. पाटील मल्टीस्पेशॅलिटीच्या डॉ. लीना पाटील, पार्ष क्लिनिकचे डॉ. कल्पेश गांधी व भूलतज्ज्ञ डॉ. धीरज चौधरी यांनी प्रत्यक्षिकाद्वारे संपूर्ण प्रक्रिया , तसेच वेगवेगळया परिस्थितीत घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच अनेकांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. एका खेळाडूला सलग ६ तास CPR देऊन त्याला जीवनदान देण्यात आले. तसेच काश्मीरमध्ये झालेल्या एका अपघातातील ४ व्यक्तींना CPR देऊन जीवदान देण्यात आळायचे अनुभव उपस्थित डॉक्टरांनी कथन केले. चला तर मग आपणही आपल्या परिसरातील डॉक्टरांकडून माहिती घेऊन जीवनरक्षक होऊ या व इतरांना त्यासाठी प्रेरित करू या ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Saturday, 13 May 2023

रत्नांच्या खाणीचा निर्माता : 'रत्नाकर' !

शालेय जीवनातील एका शिक्षकाचं जाणं परिवारातील एका सदस्याच्या जाण्यासारखं भावनिक असतं याचा अनुभव रात्रभर घेतोय. पुस्तकी ज्ञानापेक्षाही विद्यार्थ्याला संवेदनशील माणूस म्हणून घडविणाऱ्या, धुळे शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या आमच्या रत्नाकर गोविंद रानडे अर्थात र. गो. रानडे सरांचे दुःखद निधन झाल्याची बातमी रात्री उशिराने कळाली. अन एक चित्रपट डोळ्यासमोरून गेला अर्थात त्याला जोड समाज माध्यमाची होती. आपल्या जीवनात मिळालेल्या आठ दशके आयुष्य लाभलेल्या सरांनी धुळे शहरात एक आगळावेगळा ठसा उमटवीत आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन दिला आणि कसं जगावं याचा कृतीरुप वस्तुपाठ आपल्या जीवनातून दिला. बा. भ. बोरकरांच्या 'असे देखणे होऊ या !' या कवितेतील देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे या उक्ती सारखेच सरांचे जीवन उजळून निघाले होते. याच कवितेतील देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती | वाळवंटातूनी स्वस्तिपद्मे रेखिती || असे त्यांचे जीवन होते. आपल्या शिक्षकी पेशात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांनी आपल्या नावाप्रमाणेच रत्नांच्या खाणीचा समुद्र निर्माण केला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 

आमची शाळा - न्यू सिटी हायस्कुल, धुळे

जुन १९७९ मध्ये धुळ्याच्या न्यू सिटी हायस्कुलमध्ये इ. ५ वीला प्रवेश घेतला. धुळे एज्युकेशन सोसायटी या ध्येयवेड्या संस्थेच्या शाळेत शिकायला मिळणं हे मागच्या जन्मीचे पुण्य असे आज म्हणता येईल.   सहा वर्षाच्या कालखंडात या शाळेने एका समृद्ध करणाऱ्या जीवनाची बीजे रोवली गेली. ५ वीला बी. एन. जोशी, ६ वीला एस. एस. मुसळे, ७ वीला ह. म. भंडारी, ८ वीला नं. ना. शहा, ९ वीला आर. एस. जहागीरदार आणि १० वीला शा. रा. नाईक या वर्गशिक्षकांच्या तालमीत त्यांना सहकार्य करणाऱ्या रत्नाकर रानडे, व्ही. वाय. दाबके, आर. एस. पाटील, ग. स. पाठक, सु. र. राव, सौ. पाठक-शुक्ल बाई, यु. आर. कुळकर्णी, एस. आर. धामणे आदी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना माणूस  म्हणून घडविण्याचे प्रामाणिक काम केले. या सर्वांचे नेतृत्व करणारे शाळेचे मुख्याध्यापक होते मुकुंद कृष्णाजी पाध्ये सर...

आमच्या शाळेचे वैभव - गुरुजनवर्ग


श्री. रानडे सरांच्या निधनाची बातमी कळली आणि मन भर्र्कन त्या सुवर्ण काळात गेले. सर्व कसे कालच घडले इतके ते आजही ताजे वाटते. जीवन घडविण्यात आई-वडील व शिक्षकांची भूमिका नक्कीच महत्वपूर्ण असते. संस्कार देणारी आई आणि शिस्त लावणारे वडील याप्रमाणेच शिक्षकांचेही होते. काही शिक्षक मातृहृदयी तर काही पितृहृदयी होते. आदरणीय रानडे सर तसे कोमल हृदयाचे... कलेचा उपासक असलेला माणूस संवेदनशील असतोच मात्र साधनेच्या बाबतीत तडजोड कुठेही चालत नाही. समूहगान स्पर्धेत शाळेचा सहभाग आणि त्यातील 'मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा...' हे महाराष्ट्र गीताची तयारी करुन घेणारे रानडे सर डोळ्यासमोरुन हालत नाही. गाण्यातील लय, सूर आणि ताल सांभाळत असतांना एका विद्यार्थ्यांची चूक त्यांच्या सहज लक्षात येत असे. शिस्त हा शाळेचाच स्वभाव असल्याने खेळ, अभ्यास, गाणं, नाटक सर्व ठिकाणी त्याला विशेष महत्व होते. 

विक्षिप्तपूरची चित्तरसेना नाटकातील कलाकार 


विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अशा शिक्षकांचे असणे किती महत्वाचे असते हे आजच्या शैक्षणिक जीवनाकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते. अशा या महत्वाच्या वर्षांतील सुवर्ण काळाची नेहमीच अलीकडच्या काळाशी स्वाभाविकपणे तुलना होते. मी ती करणार नाही पण रानडे सरांसारख्या गुरुजनांनी अनेक पिढ्या आपल्या कर्तव्य कठोरतेने घडविल्या असे नक्की म्हणता येईल. कधी शिक्षाही केली असेल मात्र तक्रार नाही कारण त्या काळातील शाळेचा विद्यार्थी आज जो काही आहे त्यामागे या सर्व गुरुजनांचा वाटा महत्वाचा आहे. शाळेच्या प्रत्येक घटकावर त्यांचे  नेहमीच नियंत्रण होते. शाळेतील विद्यार्थ्याला आपल्या पोटाच्या मुलांप्रमाणे वाढविणारी हि पिढी होती आणि म्हणूनच त्यांनी शिक्षा केली तरी पालकांची कधीही तक्रार नव्हती. आम्ही सर्व भाग्यवान आहोत, आम्ही न्यू सिटीचे विद्यार्थी आहोत, अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभिमान असणे हीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची पावती म्हटली पाहिजे.

आमची १९८५ ची बॅच

सेवानिवृत्ती नंतरही सर कार्यरत होते. संस्थेचे काही काळ सचिव म्हणून त्यांनी दायित्व सांभाळले. संस्कार भारतीसारख्या कलासाधकांच्या संस्थेचे ते प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते. नाट्य लेखन, दिग्दर्शन हे त्यांचे विशेष आवडीचे विषय होते. इ. ८ वी मध्ये असतांना श्री. रानडे सर, नित्सुरे सर व यु. आर. कुलकर्णी सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे नाटक बसविले. कोकणासारख्या दूरवर प्रदेशात बाल नाट्य स्पर्धेत शाळेचा सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक पटकविण्याची कामगिरी सरांनी केलेली आजही आठवते. गीता पठाण स्पर्धा, मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा यासारख्या उपक्रमातही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी ते प्रोत्साहन देत असत. वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन स्वतःचा वैयक्तिक वेळ देऊन सर्व शिक्षक मंडळी करीत असत त्यात श्री. रानडे सरांचा वाटा मोलाचा होता. विद्यार्थ्यांकडून मेहनत करुन घेत असतांना वेळ आणि पदरचे पैसे खर्च करतांना हे शिक्षक कधीही मागेपुढे पाहत नसत.

अलीकडे धुळ्याचा संपर्क कमी झाला असला तरी अधूनमधून सरांची भेट होत असे. एकदा तर सरांच्या घराजवळच भेट झालेली आठवते. शिष्य फाउंडेशनच्या माध्यमातून २०११ मध्ये झालेल्या स्नेहमेळाव्याप्रसंगी सर्व शिक्षकांची झालेली भेट आजही स्मरणात आहे. श्री. दाबके सरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमातही रानडे सरांची भेट झाली होती. अजिबात थकलेले वाटले नाही. तीच शरीर यष्टी, चेहऱ्यावरील तेज, जिवंतपणा बोलण्यातील सहज मिश्कीलता. सरांकडे पाहिल्यावर ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजींची आठवण येत असे. शिक्षकांमधील परस्पर संवाद - संबंध व विद्यार्थ्यांची त्याच्या प्रति असलेली निष्ठा कृतार्थतेचा आनंद देणारे होते. अशा संस्थेच्या व तेथील शिक्षक वृंदांच्या ऋणातून उतराई होणे केवळ अशक्य मात्र त्यांना जीवन जगण्याचे धडे आत्मसात करुन त्याप्रमाणे जगणे हीच त्या महानुभावांनी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे मला वाटते.

र. गो. रानडे सरांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभेलच व त्यांच्या परिवाराला त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो. ॐ शांती शांती शांती !!


Thursday, 11 May 2023

"ती" आणि एका लग्नाची पुढची गोष्ट !

पुणे येथील सोहन वाचन कट्टाने मध्यंतरी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका वाचन कट्ट्याचे आयोजन केले होते. अर्थात महिलांच्या जीवनात आलेल्या "ती" चे महत्व वाचन कट्ट्यात अपेक्षित होते. आपल्या जीवनातील तिचे स्थान, तिचे महत्व सांगावयाचे वा त्याबद्दल वाचवायचे होते. जीवनावर प्रभाव पडणारी "ती" कोण हे ज्याने त्याने ठरवायचे होते. माझी पत्नी सौ. आदितीने या वाचन कट्ट्यात तिच्या आयुष्यातील "ती"चे वाचन केले. तिच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या "ती" बद्दल तिनेच लिहिले होते. अर्थात "ती" कोणी व्यक्ती नसून ती होती स्त्री जीवनातील "मासिक पाळी" ! वयाच्या चाळिशीनंतर "ती" हळूहळू त्यांच्या जीवनातून संपते, बाहेर पडते, जाते. मला हे समाजापर्यंत पोहोचवायचे होते मात्र त्यासाठी वेळ शोधात होतो. आज ते लिहिण्यामागचे कारण म्हणजे प्रशांत दामले यांचे एका लग्नाची पुढची गोष्ट ! हे नाटक. हे नाटकही "ती" वरच आधारित आहे त्याबद्दल पुढे लिहिले आहे. मात्र प्रथम सौ. आदितीने जे लिहिले/वाचले ते देत आहे. आपण ते वाचा, समजून घ्या... आपला अभिप्राय आपण सौ. आदितीस तिच्या ७५८८४०६१९५ या मोबाईलवर देऊ शकता.... 

सोहन वाचन कट्टा ( मंगळवार १४ - ३ -२०२३) विषय - माझ्या आयुष्यातील "ती"


माझी "ती" मैत्रिण माझ्या आयुष्यात अगदी अचानक आली आणि सायकल रेग्युलर सुरू झाली. तो काळ बदलाचा होता. आधीच्या पिढीतील सगळ्या बाजुला बसत असत, आम्हाला मात्र अपवादात्मक परिस्थितीत तो अनुभव आला. पण मोठ्या सगळ्याच बाजुला बसत असल्याने फार ऑकवर्ड झाले नाही. दर महिन्याला मग तारीख बघायची, तेव्हा काही सणवार असले की फार वैताग यायचा. आतासारखे या विषयावर कोणीच मोकळेपणाने बोलत नसत. घरातील भावाशी सुध्दा नाही. पण सासरी  मोकळे वातावरण होते. दोन्ही मुलांच्या वेळेस ९ - ९ महिने तिने ब्रेकअप केलं. पण आता आतापर्यंत "ती"ने खुप छान साथ दिली. सुरूवातीला "ती"च्याशी जुळवून घेण्याचा त्रास सोडला तर नंतरचे "ती"च्याबरोबरचे संबंध खुपच सलोख्याचे होते. दर महिन्याला रेग्युलर असल्याने कोणताही कार्यक्रम, समारंभ, ट्रीप सगळे "ती"ला विचारात घेऊनच करावे/आखावे लागत, इतकं "ती"च महत्त्व अनन्यसाधारण झालं. पण एकदाही "ती"ला मागेपुढे करण्यासाठी औषधं घेतली नाही, इतकी रेग्युलर होती "ती". त्यामुळे "ती"च्या विचाराने सगळे करता आले. "ती"नेपण इमानेइतबारे माझे हार्मोन्स, कॅल्शियम, आयर्न, त्वचा काय न काय व्यवस्थित ठेवले. पण संसारीक गडबडीत माझेच "ती"च्याकडे जरा दुर्लक्ष झाले. मग मला "ती"चा थोडा त्रास होऊ लागला. "ती" तिचं काम व्यवस्थित करत होती, पण माझ्याकडूनच "ती" आली असता आराम झाला नाही. मग "ती" आली की कंपलसरी आराम करावाच लागायचा. काय चुकलं याचा विचार करता त्या चार दिवसांत आराम न केल्याचा परिणाम असाच निष्कर्ष येतो. आता आयुष्यातील असा टप्प्या होता की "ती" आली तशी अचानक निघून गेली आणी मला एकदम रिकामं रिकामं वाटायला लागलं.

वय वर्ष १५ ते ४५ या माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या काळात "ती" माझ्या आयुष्यात होती. याच काळात तारुण्य, करिअर, लग्न, मुलं, संसार असतो. आयुष्यातील अजुन अनेक महत्त्वाच्या सुखदुःखाच्या गोष्टी याच काळात घडतात. खुपच धावपळ व धकाधकीचा हा काळ असतो. पण माझ्या अनुभवावरून मला असे वाटते की प्रत्येकीने त्या चार दिवसात जसा जमेल तसा आराम नक्कीच केला पाहिजे. कारण आधीच्या पिढीतील स्रियांना सक्तीची विश्रांती मिळत होती. आपले पुर्वज खरोखरच खुप हुशार होते. त्यांना शास्र, आरोग्य या सगळ्यांचा सखोल अभ्यास होता असे मला वाटते. आधीच्या पिढीच्या तुलनेत आम्ही या मैत्रिणीचे महत्त्व कमी केले असे वाटतेय. त्यामुळे आम्हाला व आमच्या पुढील पिढीला "ती"चा थोडा त्रास होतोय. पण खरे तर "ती"च्याभोवतीच स्रिचे आरोग्य बांधले गेलंय. तब्येत चांगली असेल तर "ती"चे येणे नियमीत होते. आपले मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम असेल तर "ती"चे येणे कधीच वेदनादायी होत नाही. आयुर्वेदात खुप बारकाईने हिचा विचार व अभ्यास केलाय, तो पण आपण विचारात घेतला पाहिजे. पुर्वीच्या काळात आरोग्यासह इतर सर्वच गोष्टींसाठी देवधर्माच्या भीतीचा आधार घेतला जायचा पण आताच्या काळात आपल्या मुलांना सर्व सायंटिफिक गोष्टींचा पुरावा द्यावा लागतो. आपण पण सगळ्या गोष्टींमागचे शास्र स्वतः समजुन घेऊन त्यांना सांगितले पाहिजे असे मला वाटते. तरच सगळ्याचा प्रवास सुखकर व आनंददायी होईल. "ती" सगळ्याच सखींची सखी आहे फक्त तिला थोडं अटेन्शन देण्याची गरज आहे. आपण सर्वजणी ते करूया. खरंच "ती" माझ्या आयुष्यात नसती तर खुप गोष्टी मला मिळाल्या नसत्या असे मला वाटते. त्यामुळे "ती" च्या बद्दल खुप खुप कृतज्ञता व्यक्त करते.

प्रशांत दामले, कविता लाड आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट सादरीकरणाद्वारे साकारलेले नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट पाहण्याचा योग आला. वैवाहिक जीवनातील पत्नीच्या चाळीशीचा (मेनोपॉज) काळ, शरीरात होणारे हार्मोन बदल, त्यामुळे होणारी चिडचिड, संबंधात येणारी नीरसता या विषयाला अतिशय समर्थपणे या नाटकाने हाताळले आहे. सर्वांनी नाटक प्रवाही ठेवले आहे. संपूर्ण नाटक हलके - फुलके असले तरी त्यात हाताळलेला विषय अतिशय गंभीर आहे आणि त्याची गंभीरता पोहोचविण्यात नाटक यशस्वी झाले आहे.

अलीकडच्या काळात या विषयावर मोकळेपणाने बोललं जातंय हि अतिशय सुखावह गोष्ट आहे. त्यामुळे या विषयाबाबतची जागरुकता वाढत आहे. पती-पत्नी नात्यात निर्माण होणारे ताण-तणाव यामुळे सुटण्यास नक्कीच मदत होते. नाटकाच्या सुरुवातीला आयुष्यातील सर्वच प्रश्नांना गुगल उत्तर देऊ शकत नाही आणि त्यांच्या आयुष्यात शोधलेले उत्तर प्रत्येकाच्याच आयुष्यात कामी येईल असे नाही. त्यासंबंधातील धोका मोकळेपणाने सांगितला आहे. वैवाहिक जीवनातील आनंद हिरावलेल्या नवऱ्याला त्या आनंदाकडे नेण्यासाठी बायको मुलाच्या सांगण्यावरुन मानसशास्त्रावरील गिल्ट थिअरीवर आधारित नाटक घडवून आणते आणि तिला त्यात अपेक्षित परिणाम मिळतो. या रचित नाटकात कार्यालयातील एका मुलीला आपल्या बॉसची गर्लफ्रेंड बनविले जाते. त्यातील वेगवेगळे टप्पे गाठत गोष्ट 'डेट' पर्यंत जाते. मात्र सामान्य कुटुंबातील नवऱ्याला आपण काहीतरी चूक करीत आहोत असे नेहमी वाटत राहते. त्या मुलीशी केलेल्या नकली प्रेमातून त्याला आपल्या असली प्रेमाची आठवण होते. मेमरी फुल झाली आणि त्यात आणखी काही नवीन भर घालायची असल्यास जुन्या आठवणी डिलीट मारणारा (विसरणारा) हा नवरा मात्र आपल्या आयुष्यातील त्या नाजूक क्षणांना विसरू शकत नाही आणि त्याला आपली चूक उमगते आणि आनंद पुन्हा मिळतो अशी साधारण कथा आहे. 

नाही म्हणायला नवऱ्यावर बायकोने दाखविलेल्या अविश्वासाने त्याचा अहंकार दुखावतो मात्र त्यामागची भूमिका समजून घेतल्यावर ते नाते अधिक दृढ झालेले पाहावयास मिळते. नाटक प्रवाही असल्याने पुढे काय घडते हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते. अंतिम चरणात मात्र धक्क्यावर धक्के बसत राहतात जरी बायको आपल्याला पडद्यामागचे भूमिका सांगत असली तरीही... नेहमीच आपल्या नाटकातून मानवी आयुष्यातील विषय हाताळत त्यावर काही तरी संदेश देण्याचा प्रयत्न प्रशांत दामलेंच्या नाटकातून अनुभवास येतो. एक संवेदनशील माणसाचे ते प्रतीक आहे. मराठी नाट्य सृष्टीत १२६१६ वा नाट्यप्रयोग व एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा ५९४ वा प्रयोग प्रशांत दामले यांनी जळगावच्या संभाजीराजे नाट्यगृहात साकारला. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे सादरीकरण तेव्हढेच सहज आणि त्यामुळे परिणामकारक वाटते. जळगावात नव्याने सुरु करण्यात आलेला एसडी - इव्हेन्ट चा प्रयोग यशस्वी होतोय कारण नाटक हाऊसफुल झाले. मित्रवर्य दिनेश थोरात व टीमचे मनापासून अभिनंदन ! जळगावला सांस्कृतिक वातावरणाचे पुनर्वैभव देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा !  

गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४ 

Sunday, 30 April 2023

सामाजिक व धार्मिक एकतेचे प्रतीक असलेला अमळनेरचा रथोत्सव

प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेली अमळनेर नगरी श्री संत सखाराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन  झाली आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुद्ध एकादशीला अर्थात मोहिनी एकादशीला श्री संत सखाराम महाराजांच्या उत्सवात अमळनेरचा रथोत्सव साजरा केला जातो. श्री संत सखाराम महाराज यांच्या परंपरेतील ११ वे विद्यमान सत्पुरुष संत श्री प्रसाद महाराज यांच्या नेतृत्वाखाली संस्थानची हि परंपरा सुरु आहे. दोनशेहून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा असलेला हा रथोत्सव सामाजिक समरसतेचा व धार्मिक एकतेचा संदेश देतो. सामाजिक सद्भाव व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेला हा रथोत्सव म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. उत्सवाच्या काळात अमळनेरात यात्रोत्सव होत असतो. खान्देशातील हि शेवटची यात्रा असते त्यामुळे तिला विशेष असे महत्व आहे. संपूर्ण उत्सवाच्या कालावधीत सुमारे ३ लाख भाविक सहभागी होतात.  

संत श्री सखाराम महाराज संस्थानचे विद्यमान गादीपती सद्गुरु ह.भ.प.संत श्री प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३६ वर्षे हा उत्सव साजरा केला जातो. यात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा व त्यासाठी घालून देण्यात आलेले नित्यनेम पाळले जातात. वैशाख उत्सवात येणाऱ्या प्रतिष्ठित मंडळींची श्री गुरु महाराज अगत्याने व आस्थेने विचारपूस करतात. संस्थानच्या उत्सवात येथील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. श्री गुरु महाराजांच्या शिष्यगणांसह खान्देशातील अनेक जातिधर्मचे लोक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होऊन श्री गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊन पारमार्थिक आनंद घेतात. 

वैशाख शु. तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला या उत्सवाला सुरुवात होते. या दिवशी बोरी नदीच्या वाळवंटात श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर स्तंभारोहण केले जाते व यात्रेला सुरुवात होते. वैशाख शु ११ या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. सायंकाळी ७ वाजता वाडी मंदिरापासून रथोत्सवास सुरुवात होते. दोन लाकडी घोडे व सारथ्य करणारा अर्जुन यांची लाकडी प्रतिमा असेलेले रथ उत्तम प्रकारे सजविला जातो. भरजरी पोशाखात व सुवर्ण अलंकार घातलेली, हाती चांदीचा धनुष्य धारण केलेली श्री. लालजींची मूर्ती रथात ठेवतात. पुजारी दाम्पत्याकडून रथाची विधिवत पूजा होते. रथाच्या पुढे मान्यवर मंडळी, बेलापूरकर महाराजांची दिंडी तसेच श्री गुरु महाराज व त्यांची दिंडी आल्याशिवाय रथ हालत नाही. रथास ओटी लावण्याचा मान आहे. सर्व धर्मांना व जातींना एकत्र करुन हा श्री पांडुरंगाचा रथोत्सव टाळ मृदंगाच्या गजरात, सनई चौघडे यांच्या वाद्यात मार्गक्रमण करतो. प्रदक्षिणा रस्त्यावर भाविक भक्त आरत्या घेऊन बाहेर थांबतात. रथाच्या पाठीमागे मेणा असतो. त्यामध्ये श्री संत सखाराम महाराज यांच्या पादुका असतात व त्यामागे संत श्री प्रसाद महाराज पायी असतात. हि मिरवणूक मारुती मंदिराच्यापुढे  पुलावर थांबते. त्या ठिकाणी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. नंतर रथ पैलाड मार्गे वाळवंटातून सकाळच्या वेळी पुन्हा वाडी चौकात पोहोचतो. तेथे पांडुरंची आरती होऊन रथोत्सवाची सांगता होते. 

महाराष्ट्रात थोर संत परंपरेचा पाया रचणाऱ्या संत सखाराम महाराजांचा रथोत्सव म्हणजे सामाजिक समरसता व सद्भावाचे प्रतीक आहे. रथोत्सवात सर्व जाती बांधवांचा समावेश असतो. गेल्या २००  वर्षांपासून अखंडपणे साजऱ्या होणाऱ्या या रथोत्सवात एकतेचे दर्शन घडत असते. गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश रथोत्सवातून दिला जातो.  या रथोत्सवाच्या निमित्ताने सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात. वर्षानुवर्षे परंपरेप्रमाणे प्रत्येक समाजातील व्यक्ती आपापली जबाबदारी पार पाडतो.  त्यामुळेचं हा सोहोळा सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवतो. हा सोहळा पार पाडण्यासाठी शहरातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अक्षय्यतृतीयेला स्तंभ व ध्वजारोहण आणि सभामंडप उभारण्यासाठी लाकडी खांबाची आवश्यकता असते. ते वाडीतून बोरी नदीच्या वाळवंटातील श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर आणून टाकण्याची जबाबदारी महाजन-माळी समाजावर आहे. 

हे साहित्य आणल्यावर मांडव उभारण्याचे काम पाटील समाजाकडे आहे. मांडव उभारल्यावर त्यावर गोणपाट टाकण्याचे काम वाणी समाजाकडे, तर कनात लावण्याचे काम शिंपी समाजाकडे आहे.  रथ सजावटीचे काम धनगर बांधव, तसेच भालदार-चोपदार करीत असतात. रथावर देव ठेवण्याची व देव पूजेची जबाबदारी देव घराण्याकडे आहे. रथावर दक्षिणा घेण्याची जबाबदारी ब्राह्मण बंगाली समाजाकडे आहे, रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लीम समाजाला दिला जातो. त्यानंतर शहरातून मार्गस्थ होत असलेल्या रथाला ठिकठिकाणी दिशा देण्याचे काम धनगर समाज बांधव करीत असतात. वाटेतच रथाला आक लागला, रस्त्यात रथाचे चाक अडकले तर ते घणाद्वारे यशस्वीपणे काढण्याची जबाबदारी बेलदार समाज पार पाडतो. रथोत्सवाचा मार्ग मशालीद्वारे प्रकाशमान करण्याची जबाबदारी न्हावी बांधवांची असते. लहान रथाची सेवा भोई समाजाकडे आहे. अशा रीतीने सर्व जातीधर्माचा सहभाग असलेला हा सोहळा मोठय़ा हर्षोल्हासात पार पाडला जातो. बारा बलुतेदारांच्या सहभागामुळे सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकोपा वृद्धिंगत होत असतो. हा उत्सव सर्वसमावेशक असल्याने दरवर्षी मोठय़ा उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 

रथोत्सवातील रथ अतिशय उंच असून, तो मलबार सागाच्या लाकडापासून बनविलेला आहे. संस्थानचे दुसरे गादी पुरुष संत श्री गोविंद महाराज यांनी १८१९ मध्ये रथोत्सवाची परंपरा सुरू केली. त्यावेळी पहिला रथ तयार करण्यात आला होता. त्यानंतर वाडी संस्थानचे गादी पुरुष संत श्री बाळकृष्ण महाराज यांनी नवीन रथ तयार केला. हा रथ मलबार सागाच्या लाकडापासून तयार केलेला आहे. दोन चाकांच्या मधील आख अंजनाच्या लाकडापासून बनविलेले आहे. रथावर श्री गणेश, मारुती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. रथ निघण्याच्या काही दिवस अगोदरच रथाची दुरुस्ती केली जाते. हे काम दरवर्षी होत असते.  या रथाला पूर्वीपासूनच नाड्याने ओढण्याची परंपरा आहे.  गेल्या दोनशे वर्षात रथाच्या  मार्गात एकदाही बदल झालेला नाही. रस्त्यावर दुतर्फा भाविकांना श्रीफळ, केळी, खडीसाखरेचा प्रसाद देण्यात येतो. रस्त्यावर ठिकठिकाणी गुरु श्री प्रसाद महाराजांवर व रथावर पुष्पवृष्टी करण्यात येते. ठिकठिकाणी आरत्याही होतात. वाडी संस्थानातून निघणारा रथ सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशीपूल पैलाडमार्गे वाडीत येतो. पूर्वी पहाटे अडीच-तीन वाजताच रथ वाडीत यायचा. मात्र आता आरत्या वाढल्याने, रथ संस्थानात पोहचण्यास सकाळ उजाडत असते.

जय हरी ! रामकृष्ण हरि !!

Sunday, 16 April 2023

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा : आत्मिक समाधान देणारा अनुभव !

नर्मदे हर हर |

त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे,,,

शनिवार, दि. ८ एप्रिल २०२३ ! या दिवशी नर्मदा मैय्याने उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करवून घेतली. जानेवारी महिन्यात सौ. आदितीने १५ दिवसांची बसने नर्मदा परिक्रमा केली. तेव्हापासून मनात इच्छा होती आपणही नर्मदा परिक्रमा करावी. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ऐकून होतो. त्याबद्दलची माहिती गोळा केली आणि सहकारी डॉ. अश्विन झाला, डॉ. निर्मला झाला व नीर झाला या झाला परिवारासह दि. ८ एप्रिल रोजी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्याचे निश्चित झाले. हभप दादा महाराज जोशी व हभप मंगेश महाराज जोशी यांच्या आशीर्वादाने योजल्याप्रमाणे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली आणि पुढील वर्षीही करण्याचे मनात ठरविले. 

शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता तयारी करून प्रथम चोपडा तालुक्यातील खाऱ्यापाडाव या आदिवासी पाड्यावर गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित मुलींसाठीच्या व्यक्तिमत्व शिबिराचे उदघाटन केले, मूल्यशिक्षण विषयावरील एक सत्र घेतले. त्यानंतर भोजन आटोपून दुपारी ३ वाजेच्या सुमारास उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी गुजराथेतील तिलकवाडाकडे मार्गस्थ झालो. मध्यप्रदेशातील बडवानी मार्गे रात्री १० वाजता तिलकवाडा येथील वासुदेव कुटीर आश्रमात पोहोचलो. महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही अनेक भाविक आलेले असल्याने निवासासाठी सोय होणे शक्य होणार नाही याची जाणीव असल्याने सोबत आणलेला तंबू नर्मदा मैय्याच्या किनारी ठोकला आणि त्यात राहिलो. साधारण तासाभरानंतर आकाशात ढग गोळा झाले. त्यांचा गडगडाट सुरु झाला आणि मागोमाग पाऊसही...
एका बाजूला मनात भीती आणि दुसऱ्या बाजूला नर्मदा मैय्या सर्व व्यवस्थित करेल हि आशा ! पाऊस केव्हा थांबला आणि झोप केव्हा लागली काही कळले नाही. सकाळी उठून परत वासुदेव कुटीर आश्रमात आलो. सकाळचे विधी व आंघोळ वगैरे आटोपले. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीचे दर्शन घेतले. वासुदेवानंद टेंबे स्वामींनी ज्या ठिकाणी परिक्रमेदरम्यान दोन वेळेस ज्या ठिकाणी चातुर्मास पाळला त्या आश्रमाला भेट दिली. तेथे जळगावातील सेवाव्रती श्री. योगेश्वर जोशी यांची भेट झाली. त्यांनी परिक्रमेचा संकल्प सांगितला तसेच माहिती दिली. सकाळी ७.३० वाजता सुरु केलेली परिक्रमा दुपारी ३.३० वाजता संपन्न झाली.मार्गावरील प्रत्येक महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मारुती व श्री गणेशाच्या मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. त्यानंतर आम्ही गरुडेश्वर येथे पोहोचलो. तेथे पुन्हा एकदा नर्मदा स्नान केले. त्यानंतर दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. वासुदेवानंद टेंबे स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. तेथे आलेल्या भाविकांसोबत दत्ताची भजने व आरती म्हटली. त्यानंतर प्रसाद घेतला. पुन्हा एकदा मंदिर परिसरात नर्मदेच्या बाजूच्या भागात तंबू टाकला आणि झोपी गेलो. सकाळी लवकर उठून सर्व आवरुन अल्पोपहार वगैरे करून ९ च्या सुमारास राजपिपला येथून परतीचा प्रवास सुरु झाला. डेडियापाडा, अक्कलकुवा, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा व अमळनेर मार्गे सायंकाळी ५.४० वाजता सुखरूप घरी पोहोचलो. 

संपूर्ण प्रवासात अनेक गोष्टींचा अनुभव आला. आत्मिकदृष्ट्या समाधान देणारी हि परिक्रमा अनेक गोष्टी शिकवून गेली. रात्री वासुदेव कुटीर आश्रमात मराठी बोलणारी एक व्यक्ती भेटली. चौकशी केली असता जळगावातील भुसावळ जवळील खंडाळा-मोंढाळा येथील असल्याचे कळले. आमच्या धानोरा या गावाजवळील सुमारे ३५ माताभगिनींना उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी ते घेऊन आले होते. महाराष्ट्रातील भाविकांची संख्या लक्षणीय होती. संपूर्ण रात्रभर दक्षिण तटावरून उत्तर तटावर येण्यासाठीची बोट सुरु होती. परिक्रमावासी अखंडपणे चालत होते. ज्यांच्या परिक्रमा पूर्ण झाली त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आमचा उत्साह वाढविणारे होते. मार्गात प्रत्येक ठिकाणी चहा, अल्पोपहार, प्रसाद, ताक, फळे यांची व्यवस्था होती. हि सेवा स्थानिकांकडून निःशुल्क व आग्रहाने पुरविली जात होती. नर्मदे हर हरचा जयघोष अखंडपणे सुरु होता. परिक्रमावासीयांचे वयाचे बंधन नव्हते. अगदी ३-४ वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या आजी-आजोबांचा यात सहभाग होता. कोणी विना चपलेने परिक्रमा करीत होते तर कोणाचे सलग १५ वे वर्ष होते. कोणी सलग ३ दिवस परिक्रमा करण्याचा संकल्प केला होता. मानवी जीवनात श्रद्धेला किती महत्त्व आहे याचा अनुभव पदोपदी येत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे समाधान दिसत होते. संपूर्ण नर्मदा परिक्रमेत खटकणारी एकमेव गोष्ट म्हणजे वाढता प्लास्टिकचा वापर आणि त्यामुळे सर्वत्र असलेला कचरा अगदी नर्मदा मैय्याच्या किनारीही ! अनेकदा सांगूनही मंडळी त्याला टाळू शकत नव्हते हि दुर्दैवाने शोकांतिका म्हणावी लागेल. 

सकाळी साडेसात वाजता वासुदेव कुटीर आश्रम येथून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेस सुरुवात केली.  तेथून पुढे गेल्यावर नर्मदा माता मंदिरात जाऊन नर्मदा मातेचे दर्शन घेतले. नर्मदे हरचा गजर करीत मार्गक्रमण सुरू केले जवळच रामेश्वर महादेव मंदिर, गौतमेश्वर महादेव मंदिर, तिळकेश्वर महादेव मंदिरांमध्ये दर्शन करून पुढील प्रवास सुरु झाला. काही अंतरावर आल्यावर मणीनागेश्वर मंदिर लागले येथे सर्व परिक्रमावासी साठी श्रमपरिहारार्थ थंड पाणी, चहा या अल्पोपहार यांची सेवा चालू होती. काही भक्त मंडळी गीतांवर ठेका धरून नाचत होती. नागेश्वर मंदिर खूपच सुंदर पुरातन आहे येथे दर्शन घेऊन पुन्हा मार्गक्रमण सुरू झाले. सकाळचे रम्य वातावरण परिक्रमेची ओढ या सर्वांमध्ये उत्साहाने मार्गक्रमण सुरू होते. वाटेत कपिलेश्वर मंदिरात दर्शन घेऊन नर्मदा मैयाच्या अगदी जवळ पात्रात उतरून रामपुरा येथे जाण्यासाठी वाटचाल सुरू केली. एका बाजूने वाहणारी नर्मदा मैया , दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी केळी व कापसाचे शेती काही ठिकाणी पुढे गेल्यावर घनदाट झाडी आणि त्याच्या मधून जाणारा अरुंद खडकाळ रस्ता अशी आमची मार्गक्रमणा चालू होती. मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे लागली जागोजागी नर्मदे हर नर्मदे हर असे म्हणून परिक्रमावासींचे स्वागत होत होते त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत बघून आनंदाने प्रसन्न वाटत होते तसेच त्यांची परिक्रमावासींसाठीची सेवा बघून मन भारावून जात होते. नर्मदा मैंयेच्या पात्रातून जात असताना अनेक छोटी छोटी मुले , मुली नर्मदे हर म्हणून आपल्याला प्रोत्साहन देतच असतात त्या छोट्या मुलांना खाऊ किंवा पैसे दिल्यास ते आणखी उत्साहाने नर्मदे हर चा गजर करतात. तेथे बसलेल्या मुलींना दान देण्याची प्रथा आहे. छोट्या मुली या नर्मदेचे स्वरूप मानल्या जातात.

या सर्वांचा आनंद घेत आम्ही पुढे पुढे जात होतो .वाटेत नंदीची दगडी भव्य मूर्ती पहावयास मिळाली. या प्रतिकृती चे पितळी नंदी मध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्यासाठी 51 हजार किलो पितळेचा वापर करण्यात येणार आहे. पुढे रामपुरा येथे जाण्यासाठी होडीतून नर्मदा ओलांडून रामपुरा घाटावर गेलो. रामपुरा घाट स्वच्छ असून तेथे स्नानासाठी नदीमध्ये दोरी बांधून व्यवस्था केली आहे. येथे आम्ही सर्वांनी नर्मदा मैयाला नमस्कार करून तिच्या स्वच्छ पाण्यात स्नान करण्याचा आनंद घेतला , सर्वजण आनंदाने  डुंबत होते . काही वेळानंतर स्नान आटोपून आम्ही पुढे निघालो. रामपुरा घाटावर तीर्थेश्वर महादेव मंदिर तसेच श्रीकृष्ण मंदिर व हरसिद्धी माता मंदिर येथे दर्शन घेतले. दुपारचा महाप्रसाद येथेच घेतला, थोडी विश्रांती घेतली. नंतर दक्षिण  तटाचा प्रवास सुरू झाला. दक्षिण तट मार्ग बहुतांश डांबरी सडक आहे. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागले. गावातील लोकानी मिळून  मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी खुर्च्या व गाद्यांची व्यवस्था केली होती.  येथे देखील महादेवाचे सुंदर मंदिर आहे. तिथून पुढे आम्ही नर्मदे हर चा गजर वाटचाल करत होतो. येथे तपोवन आश्रम लागला या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी अत्यंत मधुर थंडगार ताक सेवा देतात. येथे पोहोचेपर्यंत ऊन्हाची सुरुवात झाली असल्यामुळे ही सेवा घेताना खूप चांगले वाटत होते. तपोवन आश्रमाचा परिसर अत्यंत सुंदर रमणीय असा आहे येथून नर्मदा मैयाचे खूप छान दर्शन झाले. येथून पुढे वाटचाल करत असताना सर्वात शेवटी लागल तो श्रीसिताराम बाबांचा आश्रम. या आश्रमाचा परिसर देखील फार सुंदर व रमणीय आहे. येथे देखील प्रसाद घेण्याचा खूप आग्रह चालू होता. प्रसाद म्हणून तेथे देण्यात आलेले ताक घेऊन नदीच्या पात्रात उतरून पुढील वाटचाल सुरू केली. परिक्रमेस सुरुवात केल्यापासून रामपूरा पर्यंत सहज वाटणारी परिक्रमा आता खडतर वाटेवरून सुरू होते. नदीच्या पात्रातील गोटे , मैयाचा कमी झालेला प्रवाह आणि वरून तापणारे ऊन यासह आम्ही पुढील वाटचाल सुरू केली. दुपारचे अडीच वाजले असून देखील रणरणतं उन जाणवत होते.  

सीताराम बाबांच्या आश्रमापासून मैयेच्या पात्रात उतरून वासुदेव कुटीर पर्यंत जाणारा हा छोटा प्रवास मोठी परिक्रमा करतात ती किती खडतर असेल याचा अनुभव देऊन गेला. नर्मदे हर म्हणत, मैयाचे नाव घेत घेत हा खडतर प्रवास करत आम्ही नदीचे पात्र ओलांडून पुढे एका छोट्या डोंगराजवळ पोहोचलो. डोंगराचा मार्ग हा उंच खड्या पायऱ्या असलेला होता हा डोंगर चढणे ही एक परीक्षा होती. ही परीक्षा पास झाल्यावर मात्र आम्ही आनंदाच्या परमोच्च शिखरावर पोहोचलो. आम्ही वासुदेव कुटीर येथे पोहोचलो होतो याचाच अर्थ नर्मदा मैय्येने आमची परिक्रमा पूर्ण करून घेतली होती. अशी ही साधारण २१ किलोमीटरची परिक्रमा आहे.  काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता आम्ही परिक्रमा पूर्ण
केली. परिक्रमा मार्गात प्रत्येक ठिकाणी सेवाधारी "नर्मदे हर बाबाजी चाय पिओ, माताजी भोजनप्रसादी पाओ' असे आग्रहपूर्वक विनंती करतात. परिक्रमावासीबद्दलचा आदर पाहून आपण आश्‍चर्यचकित होतो. किनाऱ्यावरून सकाळी परिक्रमेला जाताना मंदिरात होणारा घंटानाद, जागोजागी आश्रमात होणारे स्वागत, छोट्या गावांतून जाताना तटावरची संस्कृती पाहता नर्मदामैयाच्या सान्निध्यात आपली परिक्रमा कधी पूर्ण झाली समजलेच नाही. या परिक्रमेत पवित्र नर्मदामैयाचे स्नान घडले. 

चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केल्यास आपल्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्य लाभते असे म्हणतात. हे खरे असेलही परंत मला या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेमुळे एकदा आपण संपूर्ण नर्मदा परिक्रमा पायी करावी अशी इच्छा झाली. आता हि इच्छाही नर्मदा मैय्या पूर्ण करेल अशी खात्री वाटते. नर्मदा काठावरील परिसर अतिशय समृद्ध असून येथील लोकांना त्याची कृतज्ञतापूर्वक जाणीव असल्याचे लक्षात येते. अनेक गोष्टी सहजपणाने येथे शिकावयास मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे. 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday, 11 April 2023

प्रभू रे खेळ तुझा न्यारा !


मागील शुक्रवारी ( दि. ७ एप्रिल ) सकाळी ५.१५ ला बाबांचा (सुनील) फोन आला होता. मी उठल्यावर पाहिला आणि त्यांना फोन लावला. "काय म्हणता बाबा ?" 

"... गिरीशभाऊ भेट राहून गेली !" 

"कोणाची ?"

"भाऊ... दादा गेले !"

मी मोठ्याने ओरडलोच "काय ?"

"रात्री दादांना अडीच वाजता सीव्हीयर हार्ट अटॅक आला... आणि संपलं."

पुढे काहीही न बोलता फोन कट केला. घरात आई व सौ. आदितीला सांगितले. त्यांनाही धक्काच बसला. आदल्या दिवशी पौर्णिमेच्या कुळधर्माच्या निमित्ताने सौ. ना याज्ञीकांकडे सवाष्ण म्हणून बोलावले होते. छान बोलणे झालेलं. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीच चि. प्रथमेशचा वाढदिवस असल्याने त्याची आठवणही याज्ञीक दादांनी काढली. फोन लावला मात्र बोलणे झाले नाही. जे नंतर रात्री झाले होते. दादांनी सौंना निरोप दिला होता संक्रांतीपासून गिरीशभाऊंची भेट नाही. बोलवले आहे सांगशील. त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत बाबांच्या घरी आम्ही बसलो होतो. तेथेही सर्व गप्पा झाल्या. आणि सकाळी असा निरोप... बलीयसी केवलमीश्वरेच्छा॥ अर्थात प्रभू रे खेळ तुझा न्यारा...

... ती भेट राहिली !

तशी माझी आणि दादांची वरचेवर भेट होत असे. फोनवर बोलणेही होत असे. दसरा आणि संक्रांतीचा नमस्कार चुकला नाही. दादांचा रात्री उशिरा आशीर्वाद घेणारा मी आणि माझी वाट पाहणारे दादा !  कधी वाट पाहून दादा त्यांच्या खोलीत गेलेले असायचे. यावेळी संक्रांतीनंतर दादांचे दोन वेळा फोन आलेला... २२ मार्चचा शेवटचा फोन... विषय तसे सामान्यच पण आपलेपणाचे... परिवार, करिअर, व्यवसाय चौकशी... केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक... कधी वारीचे प्रकाशित केलेले पुस्तक तर कधी रोटरीचे इतिहास सांगणारे पुस्तक... आई, घर, गाव, शेती, मुले, बंधू, धुळे येथील हालहवाल इ. यांची चौकशी... कधी ऋषीच्या करिअरबद्दल तर कधी त्याच्या अल्लडपणाबद्दल... मनमोकळ्या गप्पा... त्यातून काही मार्गदर्शन तर काही जाणून घेण्याची इच्छा ! 

मोकळं होण्याची हमखास जागा म्हणजे दादा... वैयक्तिक, सार्वजनिक सर्वच विषय सहज बोलले जात. एका बाजूला काळजी तर दुसऱ्या बाजूला अभिमान ! तास - दीड तास कुठे निघून जायचा कळायचे नाही. आता केवळ आठवणी आणि राहिलेल्या त्या भेटीबद्दलची मनातील खंत. मला, माझ्या कामाच्या स्वरुपाला समजून घेणारे दादा... यावेळी समजून घेतील का ? मनातील घालमेल आणि तळमळ कशी शांत करावी हा माझा मलाच पडलेला प्रश्न... उत्तर नसलेला ! 

नातेसंबंधापलीकडील नाते जपणारे दादा ! 

अलीकडे कुटुंबाशिवाय अन्य ठिकाणी फारसे बाहेर न जाणाऱ्या दादांनी आपला गोतावळा आणि त्यांचे संबंध इतक्या अफलातून आणि पवित्र अश्या नात्याने बांधून ठेवले होते कि त्याला कोणतीही उपमा वा अलंकार देता येणार नाही. कुटुंब, परिवार आणि समाजामधील स्नेहीजनांसाठीचा एक सेतुबंध त्यांनी निर्माण केला होता. त्याला त्यांनी कधी तडा जाऊ दिला नाही वा ओरखडाही पडू दिला नाही. शुभेच्छारुपी आशीर्वादाच्या धाग्याने त्यांनी ऋणानुबंधाचे वस्त्र घट्ट विणले होते. ते कधी जीर्ण होऊ दिले नाही वा फाटूही दिले नाही. त्यामुळे दादांच्या संपर्कात आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्नेहबंधनात अडकल्याशिवाय राहिला नाही. 

आधारवड दादा ! 

याच शीर्षकाचा एक लेख ११ सप्टेम्बर २०२२ रोजी लिहिला होता. त्याची लिंक येथे देत आहे. https://rb.gy/u7jmc विषयाची पुनरावृत्ती टाळून ते कसे आधारवड ठरले हे समजून घेऊ. दादांचा अमृत महोत्सव, सहस्रचंद्र दर्शन व अंतिम यात्रा मानवी श्रीमंतीचा आदर्श नमुनाच ! माणसे त्यांच्या भेटीसाठी आतुर असायचे. ७५ वर्षांचे मैत्रीसंबंध त्यांनी जपले. यासर्वांच्या मुळाशी असलेली संवेदना समजून घेतली पाहिजे. निर्हेतुक, निर्व्याज, निरपेक्ष, निरलस प्रेम कसं करावं याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या कृतिशील जीवनातून घालून दिला. हि सर्व आपली माणसे आहेत, आपण त्यांचे पालकत्व स्वीकारले पाहिजे, आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना समजावलं पाहिजे, आपण त्यांना मार्ग दाखवला पाहिजे हि नैतिक जबाबदारी त्यांनी स्वतःहून स्वीकारली होती आणि ती आयुष्यभर जपली. कधी कोणावर रागावले नाही, चिडले नाही, ओरडले नाही, अबोला नाही... जीवनाचा एकच उद्देश बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरु या, धागा धागा अखंड विणूया... या उक्ती सार्थ करणारा स्वभाव त्यांनी शेवटपर्यंत जोपासला. स्वाभाविकपणे त्यांनी जोडलेल्या या माणसांसाठी ते आधारवड ठरले. 

कर्तव्याने घडतो माणूस...

प्रत्येक माणसामध्ये उपजत अशी सेवावृत्ती असते. इतरांच्या विकासात आपलाही हातभार लागावा, त्यासाठी आवश्यक असलेली मदत मग ती आर्थिक असो अथवा नसो, समस्याग्रस्त व्यक्तीला दिलेला मानसिक, बौद्धिक व भावनिक आधार हि देखील सेवाच होय. याज्ञीक दादांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजातील विविध घटकांची सेवा केली असे आपल्याला नक्की म्हणता येईल. नोकरी मध्ये नोकरदारांची संघटना असो वा ब्राह्मण सभा, दादांनी समर्थ असे नेतृत्व दिले. इतरांना आपलेसे करून त्याला सेवेसाठी प्रवृत्त करण्यात त्यांचा हातखंडा होता. अगदी समाजातील बांधवांना त्यांच्या कुटुंबातील विवाह जुळवत असतांना अनेकदा धोका पत्करत त्यांनी आश्वासक शब्द दिला आणि अनेकांच्या घरात मंगल कार्ये घडवून आणली. आमच्या परिवारातही (आमच्या चुलत बहिणीच्या विवाहासाठी) असेच मंगल कार्यात त्यांनी घेतलेला पुढाकार कधीही विसरता येणार नाही. नेतृत्वाची / मानाची पदे भूषवित असतांना त्याचा लोभ न करता कुठे थांबायचे याची त्यांना जाणीव होती. ब्राह्मण सभेतील पदाधिकाऱ्यांच्या व सहकाऱ्यांच्या आग्रहाला बळी न पडत त्यांनी दुसरी टर्म न घेता इतरांनाही संधी दिली पाहिजे असा आग्रह धरला. त्यामुळेच दादांना अनेक सन्मित्र लाभलेले व त्यांच्या सोबत अनेक कार्ये पूर्णत्वास नेलीत. कर्तृत्वाला कृतज्ञतेची जोड देत केलेले कार्य माणसाला कृतार्थतेचा अनुभव देतात आणि त्यातूनच माणूस समाधानी व आनंदी होत असतो. याज्ञीक दादांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात असे समाधान लाभल्याचे आपण अनुभवले असेल.  

याज्ञीक दादा असो वा आमचे पिताश्री दादा असो... ते पुण्यात्माच होते असे मला वाटते. त्यांना आलेलं मरण हे शोक करण्यासाठी नाही तर त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन कार्य करण्याचा संदेश देणारे आहे. असं चटकन आलेलं मरण धक्का देणारं असतं मात्र त्याला स्वीकारणं हे आपलं काम आहे. कारण प्रत्येकाला एक दिवस जायचे आहे हे नक्की... वेळ हि नक्की... माहिती नसलेली ! दवाखाना नाही, अंथरुणात खिळून पडणं नाही, इतरांना आपल्यामुळे त्रास नाही, इतरांवर अवलंबून राहणं नाही यासारखं दुसरं चांगलं मरण असू शकत नाही. याज्ञीक दादांच्या निधनातून आपण एक संदेश नक्की घेतला पाहिजे. आजचा दिवस आनंदाने जगा. त्यासाठी भौतिक साधनांपेक्षाही माणूस अधिक महत्वाचा ठरतो. माणसे जोडली पाहिजेत, सांभाळली पाहिजेत, उभी केली पाहिजेत आणि असं करुनही आपल्या बोलण्यात "मी केलं" येऊ देऊ नये. ज्यांना जोडलं, सांभाळलं वा उभं केलं त्यांनी ते म्हटलं तर म्हणू दे... नाही तर नाही ! कारण हि सर्व त्या जगनियंत्याची रचना आहे. मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था... कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था !

ति. याज्ञीक दादांच्या पवित्र आत्म्यास परमेश्वर सद्गती देईलच, त्यानेच हे दुःख सहन करण्याचे बळ याज्ञीक परिवारासह दादांच्या गोतावळ्यातील स्नेहीजनांना देवो हीच प्रार्थना ! ति. याज्ञीक दादांचा समृद्ध असा वारसा आपण पुढे नेऊ या हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.  ॐ शांती, शांती, शांती !


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday, 21 March 2023

हे जीवन सुंदर आहे ! जीवनाचा आनंद घेऊ या...



मित्रांनो, आपणा सर्वांना नूतन संवत्सराच्या मनापासून शुभेच्छा ! हे नवीन वर्ष आपणा सर्वांना व आपल्या परिवारजनांना सुखसमृद्धीचे, भरभराटीचे, आरोग्यसंपन्न जावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना...

हे जीवन खूप सुंदर आहे. आपण सर्वजण त्याचा आनंद घेऊ या. नवीन वर्षाची सुरुवात आपण मनोमन एखादा संकल्प घेऊन करीत असतो. आज आपण जीवनाचा आनंद घेण्याचा संकल्प करु या. त्यासाठी काही गोष्टी नक्की करता येतील. जीवनात चढ-उतार, सुख-दुःख असतात हे वास्तव स्वीकारु या. प्रत्येक गोष्ट नेहमी आपल्या मनासारखी घडतेच असे नाही. आपल्या गत आयुष्याच्या अनुभवातून आपण या दोनही गोष्टींचा अनुभव घेतला असणार. आपली कर्मे आपल्याला फळ देत असतात. चांगली कर्मे चांगली फळे देतात. त्यामुळे सत्कर्माचा मार्ग स्वीकारु या. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याकडेही लक्ष देऊ या.

भारतीय संस्कृती व परंपरा आपल्याला मनःशांतीचे महत्व सांगते. ती मिळविण्यासाठी निसर्गपूरक जीवनशैलीचा स्वीकार केला पाहिजे. जीवन जगतांना मिळलेले ज्ञान व अनुभवातून आलेले शहाणपण या दोघांचा सुयोग्य पद्धतीने वापर करु या. कोणतीही गोष्ट करीत असतांना आपल्या अंतर्मनाचा कौल घेऊ या म्हणजे त्यात नक्कीच सात्विकता येईल जी समाधान देऊन जाईल. तंत्रज्ञानाचा वापर करीत असतांना त्याच्या मर्यादा आखून घेऊ या. तंत्रज्ञान व त्यावर आधारित माध्यमे माणसासाठीच आहेत त्यामुळे त्यांचा किती, कसा व केव्हा वापर करायचा हे संपूर्णतः आपल्या हातात आहे. मानवी जीवनातील शांती हरविण्याचे मुख्य कारण संपलेला संवाद, आत्मकेंद्रित वृत्ती, भौतिकतेचा 'अतिरेक' आहे असे मला वाटते. 

समाधानी राहणं, सकारात्मक बोलणं, दुसऱ्याच्या उपयोगी पडणं, आपल्याजवळील गोष्टी इतरांसोबत वाटून घेणं, इतरांची काळजी घेणं, आपली जबाबदारी पूर्ण करणं, आपल्या प्रगतीचा आलेख तपासणं, स्वतः केलेल्या चांगल्या गोष्टींचं स्वतःच कौतुक करणं या गोष्टी आपल्याला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे जे आहे ते आपले नसून 'नियतीने' ते आपल्याला सांभाळण्यासाठी व त्याचा योग्य वापर करण्यासाठी दिलं आहे. आपण कुणाच्या उपयोगी पडलं तर ते 'मी' केलं असं नव्हे तर 'जगन्नियंत्याने' ते करण्यासाठी आपली निवड केली वा आपल्याकडून करवून घेतलं असे म्हटले तर अहंकाराचा भाव कमी होईल. त्यातून आत्मिक समाधान मिळेल. 

ज्या गोष्टी केल्याने आपल्याला आनंद मिळतो त्याची यादी करा व या वर्षभरात त्या गोष्टी अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी वेळ काढा. दिवसातून किमान अर्धा तास स्वतःशी बोला. चांगलं वाचन करा. असामान्य कर्तृत्वाचे धनी असलेल्या सामान्यांच्या गोष्टी वाचा. त्यातून आपणास प्रेरणा मिळेल. आवडीची गाणी वेळ काढून ऐका. तल्लीन-एकरुप होणं, तादात्म्य पावणं, देहभान विसरणं, याची अनुभूती घ्या, शांती मिळेल. हलका व्यायाम करा. संवाद साधा. सहकारी, मित्र, कुटुंबीय, समाजातील घटक यांच्याशी बोला. संवाद साधतांना परस्परांना आनंद होईल असे विषय निवडा. महिना दोन महिन्यातून एकदा एकत्र या. घरातील कामे सर्वांनी मिळून करा. एकत्रित भोजनाचा व भजनाचा आनंद घ्या. विश्व कल्याणाची प्रार्थना करा.

आव्हाने व संकटे हा जीवनाचा भाग आहे. त्यामुळे त्याला आपल्या क्षमतेनुसार सामोरे जाणे एव्हढंच आपल्या हातात आहे. काळ हेच त्याला योग्य उत्तर आहे. श्रद्धा ठेवा, परमेश्वराची व सद्गुरुंची कृपा, कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद, आपली पुण्यकर्मे या सर्वातून मार्ग दाखवतील. कोणत्याही गोष्टींची चिंता न करता आपले कार्य करीत राहा. आव्हानांचा सर्व बाजूने विचार करा. मदत घ्या. पर्यायांचा विचार करा व आपल्याला वाटणाऱ्या योग्य पर्यायावर कार्यरत राहा. गुणवत्ता पूर्ण काम करा, यश, आनंद व समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. या विषयावर आपण बोलत राहू. आपणही मला सांगत राहा. आनंद घेऊ या, आनंद वाटू या ! पटतंय ना ?

पुन्हा एकदा सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४