Tuesday 5 May 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग १३

तंत्रज्ञान हा परवलीचा शब्द !



समर्थ भारताच्या उभारणीसाठी... लेखमालेत आतापर्यंत साधलेले सातत्य, विषयांची विविधता, त्यासंबंधातील विचार व अनुषंगिक मजकूर हे सहज व ओघाने येत होते आणि आपल्यासमोर मांडत होतो. लिखाणाच्या बाबतीत असे होणे हे माझ्यासाठी अत्यावश्यक व महत्वाची बाब आहे. थोड्या ब्रेक नंतर पुन्हा ५ - ८ भागांमध्ये मांडणी पूर्ण होईल. अर्थात सर्वच गोष्टी पूर्ण होतील असे नाही कारण जीवन प्रवास हि सुरु राहणारी गोष्ट आहे. प्राप्त परिस्थितीनुसार चित्र जसे जसे स्पष्ट होईल तसे तसे त्यातील सखोलतेकडे पाहणे गरजेचे ठरेल. लेखमालेचा उद्देश हा आशा फौंडेशनच्या अस्तित्वाच्या लढाईचा मार्ग शोधणे असल्याने आता त्या टप्प्याच्या जवळ पोहोचल्याचे जाणवते आहे. मागच्या व या लेखाच्या शीर्षकावरून आपल्याला लक्षात आलॆ असेल. सर्वार्थाने बदल आणि तो स्वीकारत असतांना तंत्रज्ञानाचा अंगीकार या गोष्टी इप्सित स्थळी पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्याला चाकोरीबाहेर विचार करण्याची, सृजनशीलता, सहकार, स्थानिक गरज, जीवनशैलीतील बदल, सर्व स्तरावरचे नियोजन व अध्यात्म  यांची सुयोग्य जोड दिली पाहिजे. खरोखर हे सर्व माझ्यासह अस्तित्वाचा प्रश्न असलेल्या सर्वांना मार्ग शोधण्यासाठी उपयुक्त ठरले तर "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।" याची प्रचिती येईल व तीच माझ्यासाठी कृतार्थता असेल. 



कोरोना पश्चात जीवनात तंत्रज्ञानाचा अंगीकार अधिकाधिक झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्याला मुख्य कारण असणार आहे ते म्हणजे साथीच्या व महामारीच्या या आजाराने आगामी काळात किमान वर्षभर तरी दोन गोष्टींची सर्वांनाच विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, अनिवार्यता असणार आहे. १) म्हणजे मास्कचा वापर आणि दुसरे म्हणजे सोशल डिस्टनसिंग. म्हणजेच लोकांच्या संपर्काशिवाय आपल्याला आपल्या गोष्टी साध्या करता आल्या पाहिजेत, याला समर्थ पर्याय म्हणजे तंत्रज्ञानाचा अंगीकार ! लॉक डाऊनच्या या संपूर्ण कालखंडात त्याची जाणीव झाली नव्हे त्यावरच सर्व सुरु होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ९० च्या दशकानंतर आपण तंत्रज्ञानाचा जो अंगीकार केला आहे त्याला तोड नाही. सर्वच तंत्र आत्मसात केले आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही किंवा उपलध तंत्रज्ञानाचा ज्या पद्धतीने वापर केला पाहिजे तोही आपण फारसा केला नाही. स्वतः संगणकशास्त्र विषयाचा पदवीधर असूनही माझी तंत्रज्ञान स्वीकारण्याची गती कमी आहे असे मला जाणवते आणि लॉक डाऊनच्या काळात ती वाढविण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला असेल. त्याची काही उदाहरणे ही आपल्याला देऊ इच्छितो. 

कोणे एकेकाळी तंत्रज्ञनाला विरोध करणारी बहुतांश मंडळी आज त्याच तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे त्याचे लाभ घेत आहे. ९० च्या दशकात संगणकीकरणामुळे बेरोजगारी वाढेल या गृहीतकावरच अनेक संस्थांमध्ये व्यवस्थापन विरोधात मोर्चे, आंदोलने झाली होती. कोणत्याही शाखेच्या ज्या मंडळींनी तंत्रज्ञानाला आत्मसात केले ते आज नक्कीच आपल्या नोकरी व्यवसायात एक उंची गाठून आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वा वाजवीपेक्षा अधिक वापर हा माणसाच्या मानवतेला आव्हान ठरतो हे आपण अनुभवत आहोत. पुढील काळात "अतिरेकी वापर वा वाजवीपेक्षा अधिक" वापर हे गृहितकही बदलणार आहे. कारण केवळ आणि केवळ तंत्रज्ञानचं माणसाला त्याच्या गरजांचे उत्तर देण्यातही उपयोगी ठरणार आहे. तंत्रज्ञान स्वीकारणे आणि ते आत्मसात करणे हे जसे आवाहन आहे तसेच ती एक संधीही आहे. लॉक डाऊन मध्ये घरात बसूनही सर्वकाही करता येऊ शकते हा विश्वासही मिळला. एखाद्या गोष्टीची अपरिहार्यता / अनिवार्यता हीच त्याची स्वीकारार्हता वाढविण्यास उपयुक्त ठरते. ही स्वीकारार्हताच कालांतराने क्रांती ठरते. अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रातील डिजिटायझेशन हे त्याचे उदाहरण होय. 



तंत्रज्ञानाची स्वीकारार्हताच माणसाचे वैयक्तिक जीवनमान व व्यवसायाच्या बदलाचे कारण ठरते. "कोरोना" पश्चातच्या युगात परस्परांमधील अंतर राखण्याचे काम तंत्रज्ञान करेल आणि त्यावर आधारित व्यावसायिक मॉडेल (प्रतिकृती) निर्माण करेल. अशा व्यवसायांची निर्मिती झाल्यानंतर मंडळी पारंपरिक गोष्टींपासून दूर जातील हा इतिहास आहे, त्याची पुनरावृत्ती होईल आणि आपण त्यासाठी अग्रणी ठरले पाहिजे.  आज लॉक डाऊनच्या या स्थितीतही जागतिक पातळीवरचे व्यवहार तंत्रज्ञानाने सुकर झालेले आपण पाहतोय. पाककलेत निपुणता नसलेल्यांसाठी "फूड टेक" म्हणजे " भोजन पाकिटे " सहाय्य्यभुत ठरत आहे तर घरी करु इच्छिणाऱ्यांसाठी "रेडी टू इट" सारख्या वस्तू साधन ठरत आहे. डॉक्टर मंडळी टेलिमेडिसिनद्वारे आपल्या रुग्णांवर उपचार करीत आहेत तर शिक्षक आपले शिकविण्याचे कामही ऑनलाईन करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या मिटिंगसाठी, प्रशिक्षणासाठी " झूम " ऍपचा वाढलेला वापर हे त्याचेच प्रतीक नाही तर काय ? सध्या स्वयंचलित कार्यपद्धतीची नेतृत्वाकडे मक्तेदारीला आगामी काळात व्यापक स्वीकृती मिळेल व त्यातील गुंतवणूकही वाढेल. म्हणूनच स्वयंचलित स्वायत्त गोदामे, रोबोटिक्स, थ्री - डी, मॅन्युफॅक्चरिंग यासारख्या गोष्टींची चालती असेल आगामी काळात त्यांनाच व्यापक स्वीकृती लाभेल. 



लॉक डाऊनमुळे व्यावसायिक कार्यात आलेल्या शिथिलतेला संजीवनी देण्याचे काम तंत्रज्ञानाने केली असे म्हणता येईल. फेसबुक लाईव्ह, यु-ट्यूब चॅनल, झूम, एचडी कॉल्स, वेबिनार यांचा लॉक डाऊनमध्ये प्रचंड प्रमाणात सुळसुळाट होता. रोज किमान १० वेगवेगळ्या विनामूल्य कार्यक्रमांचे  व ४ सशुल्क कार्यक्रमांचे निमंत्रण येत आहेत. किराणा मुलासह आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तुचे ऑनलाईन बुकिंग करुन ती घरपोच मिळण्याचे अनुभवही आहेत. तंत्रज्ञानाची कास धरणारी इ-स्वरूपातील वर्तमानपत्रे आज जिवंत असल्याची खात्री देत आहेत. कुटुंबियांसमवेत सलग ६५ दिवस संपूर्ण देशाची भ्रमंती केलेल्या व व्यवसायाने डीजे चालविणाऱ्या किशोर पाटील या उमद्या व्यक्तीने "लॉक डाऊन रेडिओ" सारखी संकल्पना तंत्रज्ञानाच्या सहकार्याने राबवित समाजाच्या करमणुकीची नामी शक्कल शोधून काढली आहे. ऑनलाईन सर्वेक्षणासारखे काम तंत्रज्ञानाने शक्य होत आहे. आजची परिस्थिती  "जेथे जातो तेथे तु माझा सांगाती" अर्थात जेथे माणूस तेथे तंत्रज्ञान अशी झालेली दिसत आहे. तंत्रज्ञानाचे इतका चांगला सकारात्मक वापर करता येऊ शकतो हे नक्कीच शिकायला मिळाले आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते आगामी काळात यशाचा पासवर्ड म्हणजेच परवलीचा शब्द असेल "तंत्रज्ञान'... 

तंत्रज्ञानाचा अशा पद्धतीने केलेला स्वीकार भविष्यात कोणत्याही प्रकारचा साथीचा रोग आला तरी तो व्यवसायावर फारसा परिणाम करणार नाही. याचाच अर्थ असाही आहे कि सायबर सुरक्षा, गोपनीयता, देता सुरक्षितता यासारख्या गोष्टींमध्ये व्यापक संधी उपलब्ध होतील. चला, तर मग समर्थ भारत उभारणीचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अंगीकार करु या ! 

2 comments:

  1. होय आपण जेन्व्हा तंत्रज्ञाना विषयी बोलतो तेंव्हा IT व्हाट्सअप कॉम्पुटर या विषयी बोलतो
    करून नंतर असे बरेचसे उद्योग आहेत ते आज जसे आहे तसेच चालतील जसे सुतार काम ,बांधकाम,वैयक्तीक विक्री,शेती,औषध निर्माण ,दुग्ध व्यवसाय,प्रशिक्षण ,स्टील आणि पोलाद ,
    उलटपक्षी झालेल्या नुकसानातून बाहेर कस पडायचं ह्या विवंचनेत बाकी काही मनात येऊन सुद्धा ते करू शकतील किंवा नाही हीच खरी काळजी

    ReplyDelete
  2. खरंय आपण म्हणता आहेत ते... यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खुला संवाद व्हायला पाहिजे. मला अडचण आहे असे सांगितले तर त्यावर उत्तर मिळण्याची शक्यता वाढते. दुर्दैवाने माणसे घाबरतात, व्यक्त होत नाही त्यामुळेच अडचणीचे रूपांतर गंभीर समस्येत होते.

    ReplyDelete