Monday, 1 November 2021

महासुखाची दिवाळी



"अहो, ऐकलंत का ?" 

"हं "

"मी काय म्हणते ? दिवाळी ८ दिवसांवर आलीय. बऱ्याच दिवसांनी पोरगं येणार आहे. यावर्षी लेक आणि जावईबापू पण येणार आहेत. साफ-सफाई तर केली आहे मी, पण खरेदी बाकी आहे आणि ती तुमच्याशिवाय पूर्ण होणार नाही. परमेश्वरी कृपेने यावर्षी सर्व व्यवस्थित आहे. बऱ्याच दिवसांनी सर्व गोतावळा एकत्र येणार आहे. यावर्षी मला सुखाची दिवाळी अनुभवायची आहे." 

"सुखाची दिवाळी ? कशी असते ती ?"

"अहो, म्हणजे सर्व एकत्र येणार. त्यामुळे मी दिवाळीचा सर्व फराळ घरीच करणार आहे. छान तीन दिवसांचे मेनूही ठरवले आहेत. सर्व घरीच करणार आहे मी. मात्र ज्याला जे पाहिजे ते तुम्ही नक्की द्या म्हणजे झाली माझी दिवाळी सुखाची..."

"अच्छा, म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग !"

"बरोबर"

"हि तुझी सुखाच्या दिवाळीची कल्पना तर"

"म्हणजे ?"

"अगं, तुझी जशी सुखाच्या दिवाळीची कल्पना तशी मुलांची पण काही तरी असेलंच कि ! मग त्यांनाही विचारायला नको का ?"

"तेही खरंच ! आणि तुमची पण असेल..."

"हे काय विचारणं झालं ?"

"त्यांचं पाहू नंतर पहिल्यांदा तुमची सुखाच्या दिवाळीची कल्पना सांगा बरं"


"तुला माहिती आहे मी वर्तमानात जगणारा माणूस ! माझ्यासाठी कालची, आजची आणि उद्याची दिवाळी सुखाचीच... मात्र त्यात एकच गोष्ट सारखी आणि ती म्हणजे आनंद ! हा आनंद फराळ, कपडे यात फार नाही. आमच्या काळी वगैरे भानगड नाही. कालाय तस्मै नमः अशी नकारात्मक भावनाही नाही. सर्वांचा आनंद हा माझा आनंद..."

"तुमची कल्पना चांगलीच आहे पण... कपडे घ्यायला नको का ? पोरगं नवीन मोबाईल मागतोय आणि कमावतोही पण तुमचा होकार मिळाल्याशिवाय घेणार नाही. मुलगी आणि जावई २ वर्षांनी येणार त्यांना काही द्यायला नको का ?"

"यामुळे त्यांना आनंद मिळणार असेल तर नक्कीच देऊ या !"

"हे कसं ठरवणार ?"

"मी करतो बरोबर... दोघांना लगेच व्हाट्सअपवर मेसेज टाकतो. आपण सर्वांनी दिवाळीचा आनंद घ्यावा यासाठी तुमची सुखाच्या दिवाळीची कल्पना सांगा ?"

"चालेल... पण मग फराळ, कपडे, मोबाईल आणि जावईबापूंच्या भेटवस्तुंचे काय ?"

"ते आपण घेऊच कारण ते तुझ्या सुखाच्या दिवाळीसाठी !"

"मग ठीक आहे, बाकी तुम्हाला काय करायचे ते करा. खरेदीसाठी मात्र आपण आजच जाऊ या ! म्हणजे मला नंतर फराळाकडे लक्ष देता येईल."

"चालेल"

उत्साह, चैतन्य आणि सुखाच्या सोहोळ्याचा सण असलेल्या दिवाळीच्या सणाची तयारी घराघरात सुरु असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा करीत असतांना आपल्या पुढच्या पिढीला भारतीय संस्कृतीचा हा वारसा सहजपणे दिला जातो. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हा प्रातिनिधिक संवाद... प्रेम, माया व आपुलकीने नात्यातील ऋणानुबंध घट्ट करण्यासाठीची, कुटुंब संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठीची हि धडपड... 

"अहो, तुम्हाला 'थँक्यू' म्हणायचे आहे."

"का ?"

"अहो अगदी मनासारखी खरेदी झाली आज. पोरगं आल्यावर त्याला त्याच्या आवडीचा मोबाईल तेव्हढा घेऊन द्या म्हणजे झाली बाई माझी सुखाची दिवाळी... अगं बाई, मी बोलत काय बसली. तुम्हाला पहिल्यांदा चहा देते..."

"नको, तू बैस. सकाळी चादरी-उशा धुणं, डब्बे घासून वाळवणं याची गडबड आणि नंतर हि खरेदी... यात दमली असशील... मी करतो चहा..." 

"अहो तुमचंही काही ना काही काम सुरु होतंच. तुमच्या मदतीशिवाय वरची कामं आणि खरेदी झालीच नसती." 

"हा मोबाईल घे आणि पोरांच्या सुखाच्या दिवाळीच्या कल्पना काय ते वाच... तोपर्यंत मी आपल्यासाठी चहा घेऊन आलोच."

"अरे हो... मी विसरलेच."

"पहा तर काय म्हणताय पोरं..."

"अहो, चहा छानच झालाय..."

"ते जाऊ दे ! पोरांची सुखाची दिवाळी काय म्हणते ?'

"अहो, मुलं मोठी झाली आणि समजदारही !"

"याच श्रेय तुझंच बरं ! त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांची काळजी घेणं, हवं-नको ते पाहणं हि काम तुझीच. मी दिवसभर नोकरीच्या निमित्ताने गावोगाव भटकलो. अगदी ठरवून कधीतरी पालक सभेला आलो. पैसे देणं तेही ओढाताण करीतच... एव्हढंच माझं काम !"

"अहो, असं काय म्हणता ? पोरांना योग्य वयात द्यावयाचे स्वातंत्र्य, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची बांधिलकी, त्यांच्यावर टाकलेला विश्वास, करियर आणि जीवनविषयक सांगितलेली स्पष्ट मते, स्नेहसंमेलनाला हजर राहणे, दोन-चार वर्षातून एकदा ट्रीपला नेणे, त्यांना कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे यामुळेच हे शक्य आहे."

"हे खरं असलं तरी तुझा वाटा माझ्यापेक्षा नक्कीच जास्त. बरं ते जाऊ दे... काय म्हणताय मुलं ?"

"तुम्हीच वाचा ! मला खूप भरुन येतंय वाचतांना... किती छान कल्पना मांडल्या आहेत दोघांनी !"

"असं ! पहिल्यांदा पोरीचे वाचतो. तुमच्यासह आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणं हीच


माझ्यासाठी सुखाची दिवाळी. आम्ही यावर्षी कोणत्याही भौतिक गोष्टींवर खर्च करायचा नाही असे ठरविले आहे. कारण आईला कितीही नाही म्हटले तरी ती माझं माहेरपण करणार ! आम्ही तीन दिवस येणार आहोत. तेथे तुम्ही ठरवाल त्यात आम्ही आनंदाने सहभागी होणार आहोत. तीन दिवस घरातील टीव्ही १०० टक्के बंद ठेवावा असे मला वाटते. मी स्वयंपाकात मदत करणार आहे. संध्याकाळची रांगोळी मीच काढणार. खूप गप्पा आणि खेळ खेळणार आहे. आमच्यासोबत कोरोना काळात आई-वडील गमावलेली एक मुलगी असणार आहे. तिचे पालकत्व आम्ही स्वीकारले आहे. आमच्याकडे धुणे-भांडी करण्यासाठी येणाऱ्या मावशी, आमची भाजीवाली आजी, सफाई कामगार, बिल्डिंगचा पहारेकरी, शाळेचे रिक्षावाले काका यांना घरी केलेला दिवाळीचा फराळ आणि कपडे देणार आहोत. माझ्यासाठी हीच सुखाची दिवाळी"

"काहो, एव्हढं शहाणपण कुठून आलं असेल ताईला ?"

"अगं, एका वाक्यात सांगतो. घरात पालकांच्या उक्तीला कृतीची जोड असली कि सहज संस्कार होतात आणि परिस्थिती माणसाला खूप काही शिकविते. मागील वर्षभरात तिने मुंबईत जे अनुभवले त्यातून तिची सामाजिक जाणीव प्रगल्भ झाली असे मला वाटते."

"खरंय... आता माझ्या लेकराचं पण वाचा..."


"हो, हो तू मध्येच प्रश्न विचारला म्हणून बोललो. काय म्हणतो दादा ? हं... माझ्या मते सुखाची दिवाळी आपल्या मानण्यावर असते. आजपर्यंत दरवर्षीची माझी दिवाळी तुमच्यामुळे सुखाचीच झाली आहे. मी ८ दिवस सुट्टी घेऊन येणार आहे. फराळ मी आल्यावरच करायचा. फक्त अनारसे करून ठेवले तर चालतील. यावर्षी आईला अपेक्षित असलेली खरेदी मीच करणार आणि ती स्वदेशीच असणार. मला दिवाळी निमित्ताने कंपनीनेच नवीन मोबाईल दिला आहे. माझे दोन ड्रेस नवीन कोरे आहेत तेच वापरणार आहे. ताईशी माझे बोलणे झाले आहे. ती तीन दिवस येणार आहे. दिवाळीतील एक दिवस सकाळी आपण सर्व वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत आणि भाऊबीजेला संध्याकाळी अनाथालयात जाणार आहोत. एक दिवस माझ्या शाळेतील मुलांसाठी किल्ला बनविण्याची कार्यशाळा घेणार आहे. बाबांना माहिती असलेल्या वस्तीतील मुलांना फराळ वाटप करावा असे मला वाटते. आपल्यासोबत गरजवंतांना दिवाळीचा आनंद देणे हीच माझी सुखाची दिवाळी !"

"मला तर बाई हे पोरगं म्हणजे तुमची कॉपीच वाटते"

"हं, असेल... पण खरंच या दोन्ही मुलांच्या कल्पनांनी माझी दिवाळी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तशी महासुखाची होणार तर !"

"हे काय नवीन ?"

"अगं माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे...


तैसी होय तिये मेळी ।

मग सामरस्याचिया राऊळी ।।

महासुखाचि दिवाळी ।

जगेसि दिसे ।।


आपल्या मुलांनी सामाजिक समरसतेतून समाजाचा जो विचार केला आहे तोच सर्वत्र दिसावा अशी अपेक्षा माऊलींनी व्यक्त केली आहे."


मी अविवेकाची काजळी ।

फेडुनि विवेकदीप उजळी ।

तैं योगिया पाहे दिवाळी । निरंतर ।।


या ओवीतून संत ज्ञानेश्‍वरांनी दिवाळीचा खराखुरा आनंद मांडला आहे. सामाजिक जीवनात साजरी होणारी दिवाळी ही आनंदाचेच प्रतीक आहे मात्र ज्ञानरुपी जाणिवेतून दिवाळीचा आनंद घेतला जातो तेव्हा ती महासुखाची दिवाळी ठरते. आपणही समाजातील अज्ञानरुपी अंधःकार आपल्या सामाजिक जाणिवेरुपी ज्ञानदीपाने दूर सारु या ! शुभ दिपावली ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४

Saturday, 14 August 2021

स्वातंत्र्यातील बंधनं (!) कुठे हरवलीत ?

स्वातंत्र्यातील बंधनं (!) कुठे हरवलीत ?

संपूर्ण देश आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. आपल्या सर्वांना या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा ! "स्वातंत्र्य माझ्या मनातील" या विषयावर एका माध्यमाने मला माझे विचार ध्वनिमुद्रित करून पाठविण्यास सांगितले आणि त्या विषयावर काही लिहावे असा विचारही तेथूनच आला. लेखाच्या शीर्षकातील परस्परविरोधी दोन शब्द वाचून आश्चर्य वाटेल मात्र संपूर्ण लेख वाचल्यावर माझे म्हणणे आपणास नक्कीच पटेल व त्याअनुषंगाने किमान वैयक्तिक जीवनात बदल घडवून आणल्यास स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने आनंद आपण उपभोगू शकू असा मला विश्वास आहे. 

देश स्वतंत्र झाला याचा अर्थ गुलामगिरी संपली, दुसऱ्याने घातलेली जाचक बंधने संपलीत, आम्ही  परकीयांच्या व आक्रमकांच्या अमलातून मुक्त झालो. त्यासाठी या देशातील क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने स्वातंत्र्याचा लढा लढला गेला. मार्ग, पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचे अंतिम ध्येय देशाला स्वातंत्र्य मिळविणे हाच होता. तत्पश्चात देशाने संसदीय लोकशाही स्वीकारीत आपली स्वतंत्र अशी राज्यघटना स्वीकारली. या संविधानाने  नागरिकांना आपल्या हक्क व कर्तव्यांसोबतच एक जागरुक नागरिक म्हणून त्यांच्या जबाबदारीची जाणीव दिली. "संविधान" म्हणजेच स्वतःच स्वतःवर घालून घेतलेली घटनात्मक बंधनांची चौकट स्वीकारली. स्वातंत्र्याला बंधनांची लाभलेली चौकट नागरिकाला स्वैराचारापासून वा अतिरेकी वागण्यापासून परावृत्त करते. 

मानवी जीवनात बंधनांना विशिष्ट स्थान असून त्यामुळेच त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. भारतीय तत्वज्ञानात "बंधनाला" विशेष महत्व दिलेले आहे. निसर्गतःच प्रत्येक जीवमात्राला काही बंधने घालून दिली आहेत. त्याचा योग्य आदर करीतच जीवन जगणे सर्व प्राणिमात्रांच्या हिताचे आहे. अलीकडच्या तंत्रज्ञानाच्या युगात व भौतिक सुखसोयींच्या मागे लागलेल्या मनुष्य प्राण्याने निसर्गाची हि बंधने झुगारलेली आपण पाहतो आहोत आणि त्याचे परिणामही भोगत आहोत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा स्वातंत्र्याचा संकोच करणारा ठरतो. परकीयांनी व आक्रमकांनी अशाच पद्धतीने केलेल्या अतिरेकाचा परिपाक स्वातंत्र्य लढ्यात पाहायला मिळतो. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी आपण आपल्या बंधनांना झुगारत स्वातंत्र्याचा अतिरेक करीत आहोत का ? असा विचार करण्याची गरज आहे. एका लेखात "स्वातंत्र्य" म्हणजे काय ? हे सांगत असतांना लेखकाने मुक्ती, हक्क व जबाबदारी या जाणिवांचा संगम असल्याचे म्हटले आहे. राजकीय दृष्ट्या आपण १९४७ साली स्वतंत्र झालो मात्र आपण आपली स्वतःवर स्वतःचं नियंत्रण असणारी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, कौटुंबिक व्यवस्था गत ७५ वर्षात निर्माण करू शकलो का ? हा खरा प्रश्न आहे. 

आम्हीच निर्माण केलेले व स्वीकारलेले कायदे आम्ही पाळतो का ? सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना अपेक्षित असलेली साधनशुचिता अंगिकारली का ? भ्रष्टाचाराच्या, लाचखोरीच्या, हुंडाबळीच्या, फसवणुकीच्या, आपल्या कर्तव्यात कसूर करण्याच्या, चोरीच्या, दरोडेखोरीच्या घटना काय सांगतात ? मुलांनी आपल्या आईवडिलांना वागवावे यासाठी कायदा करावा लागतो याचा अर्थ काय ? आंदोलनाप्रसंगी केलेली सार्वजनिक मालमत्तेची नासधूस वा जाळपोळ काय सांगते ? विरोधी विचारांच्या व्यक्तींना ज्या पद्धतीने "टार्गेट" केले जाते, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर शिंतोडे उडविले जातात याला काय म्हणायचे ? वाहन चालवीत असतानाच्या नियमांचे आपण किती सहज उल्लंघन करतो. यासर्व गोष्टी आपल्या स्वातंत्र्याचा अतिरेक नाही का ? 

लेखाच्या शीर्षकात म्हटलेले "स्वातंत्र्यातील बंधनं (!) कुठे हरवलीत ?" याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल. "बंधनं" हा मानवी जीवनाचा अलंकार आहे. आपल्या घरातील व समाजातील ज्येष्ठ मंडळी बंधनांचा हा संस्कार आपल्या आचरणातून देण्याचा प्रयत्न करीत असतात. बंधन हे स्नेहबंधाचं प्रतीक आहे. बंधनांतच मानवाच्या हितांचे संरक्षण आहे. बंधनातच परस्पर कल्याण आहे, सामर्थ्य आहे, समृद्धी आहे, यश आहे. अभ्यासाचे बंधन पाळले तरच ज्ञान व कौशल्य मिळते, टीव्ही पाहण्याचे बंधन पाळले तरच मनोरंजन व विरंगुळा होईल, व्यायामाचे बंधन पाळले तरच शरीर निरोगी राहील, खाण्यापिण्याचे बंधन पाळले तरच आरोग्य टिकविता येईल. आधुनिकतेचा स्वीकार करीत असतांना आपल्या परंपरांचा विसर पडता कामा नये. तंत्रज्ञानाच्या मर्यादित वापरानेच त्याचा लाभ आपल्याला मिळेल. अशा प्रकारच्या बंधनातच आपले स्वसंरक्षण आहे. जेथे बंधन आहे तेथेच स्वातंत्र्य आहे आणि जेथे स्वातंत्र्य आहे तेथेच बंधन आहे. हे बंधनच आपल्याला एकत्रित करतात, बांधतात. बंधनांमुळेच परस्परातील विश्वास दृढ होतो. या विश्वासावरच बंध घट्ट होतात. असे घट्ट बंधच कालांतराने मानवी जीवनाला अर्थ प्राप्त करुन देतात आणि संरक्षणही करतात. बंधनातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे. त्यातच समाधान आणि आनंद आहे. 

चला तर मग अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी हक्क व कर्तव्यांची कास धरत स्वतःवर स्वतःच निर्माण केलेल्या बंधनांचा अंगीकार करत स्वातंत्र्याचा आनंद लुटू या ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 


 

Monday, 26 April 2021

प्रथमेशचे अभिष्टचिंतन !



खरं तर चि. प्रथेमशचा वाढदिवस ११ एप्रिलचा ! मात्र आम्हाला तो लक्षात राहतो हनुमान जयंतीमुळेच... आपल्या मुलाचा २३ वर्षांचा प्रवास पाहून अभिमान वाटणं आणि त्यामुळे सुखावणं यासारखा दुसरा आनंद एका बापाचा असूच शकत नाही. २३ वर्षांचा हा लघुपट सहज डोळ्यासमोरून सर्र्कन पुढे सरकतो. आपल्या मुलासोबत होत असलेली आपली घडण नक्कीच त्यादृष्टीने महत्वाची ठरते. पालक-पाळ्या नात्याचं वय जसं वाढत जातं तसं मुलाच्या घडणीत पालक म्हणून आपली भूमिका क्षुल्लक वाटायला लागते आणि दुसऱ्या बाजूला मुलगा म्हणून आपल्या पालकांची भूमिका सर्वोच्च वाटते. पालक-पाल्य दोघांनी परस्परांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारले, परस्परपूरक भूमिका घेतल्या आणि वाढीच्या या कालखंडात दोघांनी एकमेकांकडून शिकायचे ठरविले तर कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्याच्यादृष्टीने त्याची अपरिहार्यता लक्षात येते. 

प्रथमेशच्या या प्रवासातील हे मर्म आपल्यासमोर मांडण्याचे औचित्य म्हणजे पुढच्या पिढीचे देणं मानतो. विद्यार्थ्यांमध्ये काम करीत असल्याने  पालक-पाल्य नात्याची वीण अधिक दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याने यात कुठेही प्रौढी मिळविण्याचा उद्देश नाही. वर म्हटल्याप्रमाणे पालक म्हणूनची भूमिका तात्कालिकच होती. नैसर्गिक वाढ हा सृष्टीच्या नियमाचा भाग अंतर्मनात ठेवला तर अनेक गोष्टी सुलभ होतात. संवादातील मोकळेपणा येथे विशेषत्वाने उपयुक्त ठरतो. आपले मत मांडून निर्णयाचे स्वातंत्र्य पाल्याला दिले तर होणारे परिणाम अधिक मॅच्युअर्ड (प्रगल्भ) ठरतात असा माझा अनुभव आहे. खलील जिब्रान यांच्या पालकत्वासंदर्भातील भावानुवादाचा खूप उपयोग झाला. लेखाच्या शेवटी आपणास तो वाचण्यास मिळेल. गीता परिवाराचे काम करणारे संजय मालपाणी यांच्या "दोन शब्द बाबांसाठी आणि दोन शब्द आईसाठी" या व्याख्यानातील "Don't  Worry that children never listen to you, worry that they are always watching you" या मौलिक मंत्राचाही तेव्हढाच उपयोग झाला. 

जीवन अनुभवातून मिळालेली शिकवण, त्याची कालसुसंगत परिस्थितीशी जुळवणी, त्यात अपेक्षित लवचिकता, थोरामोठ्यांचा विचार, त्यांच्यासोबतची चर्चा, विषयावरील प्रबोधन, वाचन यातून आपली स्वतःची पालकत्वाची भूमिका व तत्वे अधिक सुस्पष्ट होत जातात. पाल्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा कायम  विचार डोक्यात ठेवून पालकत्व निभावल्यास अपराधीपणाची भावना येण्याचा धोका टळतो. पाल्याचा आनंद त्याच्या प्रतिभेतून त्याला मिळणार असून आपण त्यातच आनंद मानणे आपल्या मानसिक समाधानाचे बीज आहे. पालकत्व निभावताना अपेक्षाभंगाचे दुःख येऊ नये यासाठीची आपापली वैचारिक बैठक विकसित करीत राहणे आवश्यक वाटते. त्याच्या यशस्वी वाटचालीसाठी आपण कायम त्याच्यासोबत आहोत हा विश्वास आपल्या कृतीतून दिसल्यास मुले अधिक फुलतात नव्हे त्यांना त्यांच्या वाढीचे सूत्र लवकर सापडतात. एक सुजाण, सजग व संवेदनशील माणूस बनणे एव्हढाच पालकत्वाचा उद्देश असावा असे मला वाटते. शेवटी त्याच्या आयुष्याचे सोने कसे करावे यासाठीची वैचारिक बैठक तयार करण्यास मदत करणे एव्हढीच आपली भूमिका असते. 

प्रथमेशचे महाविद्यालयीन शिक्षण जळगावातच पूर्ण झाले असून सध्या एका चांगल्या कंपनीत प्रशिक्षणार्थी इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. नोव्हेंबर महिन्यात घरातून बाहेर पडल्यापासून त्याचे निर्णय तो स्वतः घेतो आणि तशी त्याला पूर्ण मुभा आहे. आवश्यकता वाटल्यास अपेक्षित मदत कायम उपलब्ध आहे. मागील पाच महिन्यात तीन राज्यातील तीन शहरांमध्ये त्याचे वास्तव्य राहिले. त्या त्या ठिकाणाचा प्रवास, निवास, भोजन आदी सर्व व्यवस्था त्याने त्याच्या निर्माण केल्या. अर्थात त्यासाठी त्या त्या ठिकाणच्या कंपनीतील सहकाऱ्यांनी त्याला सहकार्य केले. आज त्याच्या जन्मदिनी अभिष्टचिंतन करतांना नक्कीच अभिमान वाटतो. त्याची मेहनत, सद्गुरुंचे आशिर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा त्याची मनोकामना पूर्ण करतील अर्थात पालक म्हणून त्याचा सर्वाधिक आनंद आम्हास असेल. बाळा, खुप मोठा हो.... सुखी राहा... आनंदी राहा..!

खलील जिब्रान यांच्या मुलांवरील कवितेचा इंग्रजी भावानुवाद आपल्यासाठी ! 

तुमची लेकरं ही "तुमची" नसतात.

जीवनाच्या अतितीव्र आकांक्षेची मुलं आणि मुली असतात ती

ती तुमच्याद्वारे जन्मतात तुमच्यापासून नाही,

आणि ती तुमच्याजवळ असली तरी तुम्ही मालक नसता त्यांचे.


कदाचित तुम्ही त्यांना तुमचं प्रेम देऊ शकाल पण तुमचे विचार नाही देऊ शकत,

कारण त्यांच्याजवळ त्यांचे स्वत:चे विचार आहेत.

त्यांच्या शरीरांना तुम्ही घरकुल देऊही शकाल कदाचित पण त्यांच्या आत्म्यांना कदापी नाही,

कारण त्यांच्या अत्म्यांचा वास उद्याच्या गर्भात आहे.

त्यांच्या "उद्या"ला तुम्ही भेट देऊ शकतच नाही, अगदी स्वप्नातही नाही!

तुम्ही त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करु शकाल कदाचित

पण त्यांना तुमच्यासारखं बनवण्याचा विचारही करु नका.

आयुष्य कधीही भूतकाळात जात नाही आणि थांबूनही रहात नाही बदलाच्या प्रतीक्षेत.


तुम्ही एका धनुष्यासारखे असता ज्यावर स्वार झालेली तुमची मुलं

जणू एखाद्या जिवंत बाणासारखी भविष्याचा वेध घेणार असतात.

"तो" जगन्नियंता धनुर्धारी अनादि अनंत काळाच्या पटावर वेध घेतो एका दूरच्या लक्ष्याचा

आणि सर्वशक्तीने "तो" आकर्ण ताणतो प्रत्यंचा, तुम्ही, त्याचं धनुष्य, वाकेपर्यंत

कारण त्याचे ते बाण अतिजलद गतीने जावेत अतिशय दूरवर म्हणून.

तेव्हा आपलं ते धनुर्धार्‍याच्या हातातलं वाकणं आनंदाने स्वीकारा,

कारण "त्यालाही" जसे हे दूरवर जाणारे बाण आपलेसे वाटतात,

तशीच प्यारी असतात त्याला स्थिर असलेली धनुष्यही!


गिरीश कुळकर्णी

मित्र, समुपदेशक व संवादक

Tuesday, 13 April 2021

वर्षारंभ आणि नवीन कार्याची दिशा !

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा ! वर्षारंभाचा दिवस हा नवीन कार्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा दिवस... आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सहभागाने सामाजिक जीवनात एका नवीन कार्याचा आरंभ करीत आहे. आपणा सर्वांना नवीन कार्याची दिशा स्पष्ट करणारा...त्याअनुषंगाने विचारप्रवृत्त करणारा आहे. प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त ठरणारा हा लेख आपल्या विशेष पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे... प्रत्येक वाचकाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा राहील... 

माणूस जन्माला आल्यानंतर तो ज्या कुटुंबात, समाजात, परिस्थितीत आणि वातावरणात वाढतो त्या प्रमाणे त्याची जीवनविषयक धारणा तयार होत असते आणि कालांतराने जगण्याचा मार्गही...! यालाच आपण विश्वास (बिलीफ) म्हणतो दुर्दैवाने स्थळ, काळ, वेळ आणि परिस्थिती बदलते मात्र वरील मर्यादांवर आधारित धारणा बदलल्या नाहीत तर मोठा गोंधळ होण्याची शक्यता असते. प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने असे मर्यादांवर आधारित धारणा बदलण्याची मानसिकता तयार झाली आणि प्रवास सुखकर झाला. या प्रवासाने एक सूत्र नक्की गवसले आणि ते म्हणजे "Developing belief..." हेच आगामी काळातील मिशन असणार आहे. 

२०१५ मध्ये एनएलपी विषयावरील चार दिवसांच्या कार्यशाळेत सहभागी झालो होतो आणि अलीकडे डॉ. विवेक काटदरे सरांच्या "सिक्रेट ऑफ सक्सेस" या विषयावरील कार्यशाळांनी मानवाच्या जीवनविषयक धारणांचे महत्व जाणवले. आपले संपूर्ण जीवन आपण काही मर्यादित धारणांवर (Limiting belief) जगत असतो, त्यामुळेच जीवनातील अनेक चांगल्या सुखद अनुभवांना मुकत असतो आणि "हे शक्य नाही..." किंवा " मला जमणार नाही..." या नकारात्मक भावनांमध्ये अडकून पडतो. व्यावसायिक जीवनाचा सुमारे तीन दशकांचा कालखंड अशा अनेक मर्यादित धारणांना मोडून काढण्यात आणि नवीन धारणा विकसित करण्यात गेला. व्यावसायिक जीवनासोबतच जीवनातील विविध क्षेत्रातील धारणा बदलण्याची वा चिरंतन व शाश्वत धारणा विकसित करण्याची आवश्यकता वाटते. आगामी काळात त्यादृष्टीने कार्य करण्याचे निश्चित करीत आहे. 

आपल्या जीवनाबद्दल सतर्क असणं आणि त्यासंदर्भांतील जाणिवा प्रगल्भ करणे म्हणजेच स्वतःबद्दल जागरुक होणे होय. आपल्या आंतरीक उर्मीने, नाविन्याचा ध्यास घेऊन स्वतःच्या कौशल्याने बदल स्वीकारणे, बदल घडविणे म्हणजे खऱ्या अर्थाने सजग होणे होय. जीवनातील अनेक गोष्टी करीत असतांना जाणीवपूर्वक बुद्धी, मन व चित्त स्थिर ठेवून सावधपणाने कृती करणं माणसाला शहाणपण बहाल करतं. वास्तविकतेची कास धरत, उपलब्ध साधनांची जाणीव ठेवत आपल्या कामाचे सुयोग्य नियोजन करणे यासाठी अत्यावश्यक आहे. आपल्या आचार, विचार व कृतीला, संयम आणि सातत्याने तटस्थपणे जोखत (तपासात) राहणे साक्षात्कारी ठरते आणि त्यातूनच आत्मज्ञान होत नवीन धारणा विकसित होतात असे मला वाटते. 

 यशस्वी जीवनासाठी आपल्या मर्यादित धारणांविषयीचा अनाठायी आग्रह सोडण्याची गरज आहे. "लोक काय म्हणतील ?" या समस्येवर मात केली पाहिजे. त्यासाठी मी जे पण करेल ते योग्यच अशा विश्वासाने व उत्साहाने कार्यरत राहणे म्हणजेच धारणा विकसित करणे होय. कामाच्या सुरवातीचा आपला उत्साह कायम टिकवून ठेवणे हि यशस्वीतेसाठीची पूर्वअट आहे. यासाठी आपण करीत असलेल्या प्रत्येक कार्यात आपली भावनिक गुंतवणूक असली पाहिजे. केवळ भावनिक गुंतवणूक पुरेशी नसून त्यासाठी कार्याप्रतीची आपली बांधिलकी तेव्हढीच महत्वाची आहे. उत्साह टिकून राहण्यासाठी केवळ बांधिलकी पुरेशी नसून आपण करीत असलेल्या कार्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. कार्यावरची निष्ठा, अनुभवातून आलेले शहाणपण व स्वीकारलेली जीवनावश्यक मूल्ये यावरच श्रद्धा जोपासली जाते. काम कोणतेही असो छोटे वा मोठे, कंटाळवाणे वा आनंददायी, अंतिम लक्ष्य ठरलेले असलं तर आपण करीत असलेली कार्ये अर्थपूर्ण वाटतात. त्यातूनच मोठे उद्दिष्ट साकारले जाते. उद्दिष्ट साकारणाऱ्या व्यक्तीच लौकिक अर्थाने यशस्वी ठरतात. 

 जीवनाला अर्थ प्राप्त करुन देण्याच्या क्षेत्रात यापुढे कार्य करायचे आहे. अर्थात आम्ही फक्त साधन राहणार आहोत. ज्याला त्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागते, आणि ती तो लढत असतोच. हि लढाई लढत असतांना अनेक अडचणी येतात. या अडचणीच आपल्या वाटचालीतील अडथळे असतात ते दूर करण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची आवश्यकता असते, त्यासाठीच हि धडपड नव्याने सुरु करावयाची आहे. आपण सोबत आहेत या खात्रीसह थांबतो... 

आपणा सर्वांना प्लव नाम संवत्सराचा मनापासून शुभेच्छा व निरामय दीर्घायुष्यासाठी कामना ! 

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४

Saturday, 13 March 2021

महिला दिन का ? कशासाठी ?




नेहमीच चाकोरी बाहेरील उपक्रम राबविणाऱ्या आशा फाऊंडेशनने यावर्षी महिला दिनानिमित्त महिला दिन साजरा करण्याबद्दल समाजमनाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. समाज प्रबोधन व जनजागृतीसाठी अशा प्रकारचे दिन साजरे करण्याची परंपरा सर्वत्र आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी, त्यांचे हक्क, अधिकार याबद्दल जागरुकता करण्यासाठी, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत असतांना योग्य सन्मान केला पाहिजे यासाठी समाजमन तयार करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. महिला दिनाचा हा उद्देश सफल होत नसला तरी तो साजरा केला पाहिजे अशी भावना संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून लक्षात येते. महिलांना केवळ महिला दिनी सन्मान न देता त्यांच्याप्रती वर्षभर कृतज्ञता व्यक्त करण्याची व योग्य सन्मान देण्याची अपेक्षा सर्वांनीच व्यक्त केलेली आहे. 

आशा फाऊंडेशनच्या या सर्वेक्षणात जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, मुंबई, लातूर, सोलापूर, अकोला. अमरावती येथील स्त्री-पुरुषांनी सहभाग नोंदवला. सर्वेक्षणात महिलांपेक्षा पुरुषांचा सहभाग अधिक होता तर ऑनलाईन कार्यक्रमात ९० टक्के महिलांचा सहभाग होता. ८४ टक्के मंडळींना महिला दिन साजरा करावा असे वाटते तर ४२ टक्के लोकांनी महिला दिनाचा मुख्य उद्देश सफल होत नसल्याचे म्हटले आहे. यातही महिला पुरुष असा विचार केला तर ३३ टक्के पुरुषांनी व ६७ टक्के महिलांनी महिला दिनाचा उद्देश साध्य होत नसून तो साजरा केला पाहिजे असे म्हटले आहे. 

महिला दिनाचा उद्देश साध्य करण्यासाठी तुम्हाला भावलेला उपक्रम सांगा या प्रश्नाला उत्तर देतांना अनेकांनी समाजातील कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा समाजासमोर आणून त्यांचा गौरव, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त नीलिमा मिश्रांसारख्यांनी उभारलेल्या कार्याला प्रत्यक्ष भेट, कुटुंबासाठी व समाजासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांना समाजासमोर आणणे, दुर्गम भागातील महिलांचे प्रबोधन, आरोग्याच्यादृष्टीने त्यांच्यासाठी सामूहिक योगा, त्यांची आरोग्य तपासणी, रक्तदान, महिलांसाठीच्या कायद्यांबाबत प्रबोधन, बचतगटाद्वारे महिला सबलीकरण आदी उपक्रमांचा उल्लेख अनेकांनी केला आहे. 

कर्तृत्ववान व प्रभावी महिलांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सुधा मूर्ती, प्रतिभाताई पाटील, पी. व्ही. संधू, इंदिरा गांधी, इंद्रा नुयी, कल्पना चावला,अरुणिमा सिन्हा, अनिमा पाटील-साबळे, किरण बेदी, कविता राऊत, गुंजन सक्सेना, स्वाती मोहन, अनुराधा टोके यासह विविध क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या महिलांची नावे समोर आली. अनेकांनी नाव न सांगता सर्वच क्षेत्रात महिलांची कामगिरी अलौकिक आहे. त्यातही मोनोरेल, बस, रिक्षा चालविणाऱ्या महिला, संरक्षण दलातील सहभाग, पायलट, मेकॅनिक आदी चाकोरीबाहेरच्या क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा आवर्जून उल्लेख केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाची महिला दिनासासाठीची यावर्षीची संकल्पना #choosetochallenge केवळ २० टक्के लोकांनाच सांगता आली. 

असाही महिला दिन... पेट्रोल पंपावरील भगिनींना भेटवस्तू ! 

यानिमित्ताने ऑनलाईन कार्यक्रमातही महिलांनी या अनुषंगाने आपली मते मांडली. मुळात महिला सक्षमीकरण वा सबलीकरण हि संकल्पनाच चुकीची आहे. कारण महिला जन्मतः सबळ आहे. स्त्री-पुरुष हि निसर्गाचीच रूपे असून त्यात कुठलाही भेद निसर्गाने केलेला नसतांना आपण का करतो. हा भेद संपुष्टात यावा यासाठीच महिला दिन साजरा करण्याची परंपरा सुरु झाली आणि ती अव्याहतपणे सुरु आहे. "डे" साजरा करणे हि पाश्चात्य संस्कृती असून भारतीय संस्कृतीत "कृतज्ञता" व्यक्त करण्याची व तीही एक दिवस नाही तर दैनंदिन जीवनात आचरण्याची गोष्ट आहे. एक महिलाच दुसऱ्या महिलेला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकते, त्यामुळे परस्पर सहकार्यातून अनेक गोष्टी साधता येऊ शकतील. महिलांनी एक व्यक्ती म्हणून घर सांभाळावं, सामाजिक भान जपावं, आपले विचार चांगले  ठेवावे, आपलं काम करीत राहावे समाज त्याची योग्य दखल घेतो. यासह अनेक विचार सहभागी महिलांनी व्यक्त केले. 

महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, महिलांचे शोषण, महिला सुरक्षा या सारखे विषय आजही समाज जीवनात आढळतात यावर काम करण्याची आवश्यकता अनेकांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली. या समस्या संपुष्टात येण्यासाठी केवळ कायदे करुन चालणार नाही तर त्यासाठी घरातूनच योग्य संस्कार होण्याची व  समाजमन तयार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. समारोपात पुणे येथील स्मिता वळसंगकर यांनी महिला दिनाला "इव्हेन्ट"चे स्वरुप दिले गेले आहे. महिलांचे समाजातील स्थान व मान देण्यासाठी कोणत्याही निकषांची गरज नाही. तो तिला सहजभावाने व नैसर्गिकरित्या दिला  पाहिजे असे म्हटले. "कन्यादान ", "मुलगी दिली" वा "मुलगी बघायला येणार आहेत" यासारखे शब्दप्रयोग करतांना विचार केला पाहिजे कारण मुलगी हि वस्तू नाही. महिलांचे वस्तूकरण थांबले पाहिजे. "पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून" वा "पुरुषांच्या बरोबरीने" तसेच "बांगड्यांचा आहेर" वा "बायल्यासारखा काय करतो" यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजे कारण यातून महिलांना कनिष्ठ दर्जाची भावना निर्माण होते, असे आवाहनही त्यांनी केले. . 

ऑनलाईन कार्यक्रमात शशिकला खाडीलकर, डॉ. मधुबाला जोशी-चिंचाळकर, डॉ. नयना कासखेडीकर, सुलभा कुळकर्णी, अपर्णा महाशब्दे-पाटील, सविता भोळे, विंदा नाईक, प्रणाली महाशब्दे, वैदेही नाखरे, स्वाती ढाके, संगिता पाटील, सुवर्णा चव्हाण, रुपाली पाटील, पयोष्णी कुळकर्णी, यामिनी सुतार, गायत्री सोनार यांचेसह पंकज कुंटे व पत्रकार दिलीप तिवारी यांनी सहभाग घेतला व आपली मते मांडली. 


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 




Thursday, 4 March 2021

समाजपुरुषा होई जागृत !


 

देश, राज्य व जळगावातील सद्यस्थितीवर भाष्य करतांना मला या काव्यपंक्तींची विशेष आठवण होते. कोणाला व्यक्तिगत दोष देण्यापूर्वी समस्त जनतेला जागे होण्याची हि वेळ आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कोरोना महामारीने प्रत्येकासमोर एक आव्हान उभे केलेले असतांना समाज घटकांची कृती विपरीत ठरताना दिसत आहे. परिस्थितीचे योग्य आकलन करुन विवेकी वृत्तीने प्रतिसाद देण्याची हि वेळ आहे. देश, राज्य व स्थानिक पातळीवर अपेक्षित असलेला परस्परांवरील विश्वास हरविलेला दिसतो आहे. त्याची परिणीती आजच्या परिस्थितीत भरलेली व भारलेली दिसत आहे. सर्वच पातळीवरील नेतृत्वाला हा विश्वास सार्थ ठरविण्यात अपयश येतांना दिसत आहे. आपण सर्वच एका संक्रमण अवस्थेतून जात असतांना तटस्थ व त्रयस्थपणे गांभीर्याने वर्तन घडणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्यानंतरचा ७ दशकांहून अधिक काळ लोटला असतांना स्थित्यंतराच्या एका मोठ्या लाटेवर आपण सर्व स्वार आहोत. त्यामुळे अपेक्षित असलेला आंतर्बाह्य वैचारिक संघर्ष होणे स्वाभाविक आहे. मात्र तो स्वीकारण्यासाठीची वैचारिक प्रगल्भता नेतृत्वासह जनतेने दाखविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच लेखाचे शीर्षक दिले आहे समाज पुरुषा होई जागृत !

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशातील चार प्रमुख स्तंभांच्या भूमिका, जबाबदारी, त्यामधील एकतानता, परस्पर विश्वासार्हता हरवलेली दिसत आहे. त्याला मुख्य कारण आहे ते म्हणजे आपल्या हातात असलेले तंत्रज्ञान ! तंत्रज्ञानाचे फायदे नक्कीच आहे मात्र ते वापरण्यासाठीची सिद्धता नसली तर निर्माण होणार गोंधळ आपण अनुभवत आहोत. १९४८ मध्ये आईन्स्टाईन या जगद्विख्यात शास्त्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे जीवनातील तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे व नैराश्यामुळे मानवी जीवनमूल्यांची घसरण होईल असा मला विश्वास आहे. त्याचा विपर्यास असाही करण्यात आला कि मला भीती वाटते कि ज्या दिवशी तंत्रज्ञान मानवी सुसंवादाला ओलांडेल त्या दिवशी या जगात मूर्खांची पिढी असेल. जरी हा आईन्स्टाईन यांच्या वाक्याचा विपर्यास असला तरी आज ते वाक्य परिस्थितीची वास्तविकता मांडणारे आहे असे म्हणता येईल. मोबाईलच्या माध्यमातून लोकांच्या हातातले बाहुले झालेला मीडिया मानवतेवर कसा उलटत आहे त्याचे उदाहरण आपण रोज अनुभवत आहोत. याची काही उदाहरणे पाहू या ! 

देशातील जळगावसारख्या एका छोट्या शहरात अलीकडे घडलेल्या केवळ दोन-तीन घटनांचा उल्लेख येथे करणार आहे. शितावरून भाताची परीक्षा या उक्तीनुसार जगात आणि देशात अशा घटनांच्या सुळसुळाटामुळे किती गोंधळ मजला आहे याची कल्पना येईल. 

पहिली घटना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत जळगावात चालविण्यात येणाऱ्या शासकीय आशादीप महिला वसतिगृहात न घडलेल्या कथित घटनेने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. असे होण्याचे कारण काय तर आपण काय करीत आहोत हे करणाऱ्याला समजत नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. सामान्य माणसाच्या हातातील "सोशल मीडिया" या खेळण्याने ईर्षा, स्पर्धा, मत्सर किती टोकाला नेली आहे याचाच तर हा परिणाम म्हणता येईल अशी स्थिती आहे. कोणीतरी आपला स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या कृतीचा अर्थ समजून न घेता केवळ "कॉपी पेस्ट" या वृत्तीने हे झाले असे ठामपणे म्हणता येईल. त्यात भर म्हणून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया, समाज धुरीण, राजकारणी यातील कोणीही विषयाचे गांभीर्य समजून न घेता केवळ आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी केलेली हि अविचारी कृती म्हणता येईल. 

दुसरी घटना एका सुपरशॉपमध्ये मानसिक संतुलन गमावलेल्या महिलेच्या कथित चोरीबद्दलच्या समाज माध्यमातील व्हिडीओचे आहे. घडलेल्या घटनेला हाताळायचे कसे याचे शिक्षण नसलेल्या उथळ व उतावीळ लोकांनी आपण काय करीत आहोत याचे भानच ठेवले नाही. अशा प्रकारचा व्हिडीओ समाज माध्यमात पसरवून आपण नक्की काय साध्य केले याचा विचार कोणीही केला नाही. एका समूहात हे व्हिडीओ आल्यावर हा फेक आहे असे सांगितल्यावरही पुन्हा दोनदा पाठविण्यात आला याला काय म्हणायचे ?  

तिसरी घटना हि आत्महत्येसंदर्भातील आहे. घटना एक नसून दररोज घडणाऱ्या किमान दोन घटना आहे. सध्याच्या सर्वच प्रकारचे (आर्थिक, सामाजिक, मानसिक इ.) संतुलन बिघडलेल्या स्थितीत वय वर्षे १३ पासून ते पन्नाशीच्या पुढील व्यक्ती अप्रिय गोष्टी करतांना दिसतात. सर्वच प्रकारच्या माध्यमांमध्ये या घटनांचे उद्दात्तीकरण होतांना दिसते आहे. घटना घडली हे वास्तव मी नाकारत नाही मात्र त्याला महत्व किती द्यावे ? याचा विचार करणार कि नाही ? पुन्हा यातून साध्य होणार तरी काय ? आणखी आत्महत्या दुसरे काय ? आपल्याला हे अपेक्षित आहे काय ?   

देवा, त्यांना माफ कर, ते काय करताहेत हे त्यांना समजत नाही असे म्हणायचे दिवस संपलेत. वरील सर्व घटनांच्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार ? त्याने समाज मनात कलुषितता निर्माण झालेल्या संस्थेचे काय ? शहराची अब्रू वेशीला टांगली जातेय याची जबाबदारी कोणाची ? समाज मनात परस्परांबद्दल संशयीवृत्ती बळावण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांना शिक्षा कोण, केव्हा व काय करणार ? असे पुन्हा घडू नये यासाठीची आचारसंहिता निर्माण होणार कि नाही ? केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार होत असतांना समाज हतबलतेने पाहत राहणार ? काहीही दोष नसतांना त्याची फळे भोगत राहणार ? वसतिगृहातील अधिकाऱ्यांसह तेथील महिला ज्या ताणतणावात आहेत त्यांच्या मानसिकतेचे काय ? समाजातील  संवेदनशील नागरिकांचे काय ? वाढत्या आत्महत्या थांबवायच्या कशा ? असे एक ना अनेक प्रश्न अस्वस्थ करीत आहेत. याचे प्रामाणिकपणे उत्तर शोधण्याचा प्रयत्न एक संवेदनशील माणूस म्हणून करीत आहे. मिळालेले उत्तर आहे समाज पुरुषा होई जागृत ! 

प्रजासत्ताक देशात आपण स्वीकारलेली घटना त्याद्वारे आपल्याला मिळालेले अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदारी याचे भान कायम ठेवणे आवश्यक आहे असे वाटते. संसद, कार्यपालिका, न्यायपालिका व सर्व प्रकारची माध्यमे यांचेसाठी आदर्श आचारसंहिता कायद्याच्या स्वरुपात स्थित आहे. मात्र सामान्यजनांच्या हातातील खेळण्याचे(!) गांभीर्य, त्याला हाताळण्याचे कौशल्य व जबाबदारी याबाबत सजग होण्याची नक्कीच आवश्यकता आहे. "कॉपी - पेस्ट" वा "फॉरवर्ड" या आजारापासून स्वतःला रोखले पाहिजे. समाज मनातील सकारात्मकता वाढीस लागावी यासाठी त्याचा योग्य वापर करण्याचे धोरण प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे. कविवर्य ग. दि. माडगूळकरांच्या यंत्र युगातील ऋचा समाजाला त्याची शक्ती जाणवून देणाऱ्या व जागृत करणाऱ्या आहेत...


तुझ्या कृपेचे जे भस्मासूर

सिद्ध जाहले तुज जाळाया

तूच निर्मुनी नव मोहिनी 

जाळ तयांच्या कृतांत काया ||


सहस्त्रशीर्षा, सहस्रपादा

तूच वार या तुझ्या आपदा 

उपभोगाया आण पदाशी 

तूच निर्मिली तुझी संपदा ||


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 


Friday, 5 February 2021

परेड कमांडरचा प्रवास "वर्दी"वर प्रेम निर्माण करणारा : समृद्धी संत

एनसीसीची कॅडेट ते प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून मिळालेली संधी हा प्रवास "वर्दी"बद्दल विशेष प्रेम व आयुष्यात सैन्यदलात वेगळं काही तरी करुन दाखविण्याची जिद्द निर्माण करणारा ठरला, असे समृद्धी अतिशय अभिमानाने सांगत होती. २६ जानेवारी २०२१च्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात एनसीसीच्या मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून महाराष्ट्राला प्रथमच संधी मिळवून देणारी जळगावची सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी संत हिचेशी संवाद साधला असता ती बोलत होती. आरडी परेडमध्ये सहभागी होण्याचे माझे स्वप्न जरी पूर्ण झाले असले तरी आता मला आर्मीत कमिशन होण्याची इच्छा आहे. त्यासाठी मला एनसीसीमधील हा प्रवास खूप उपयुक्त ठरणार आहे. 

महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर एनसीसी घेऊन सलग दोन वर्षे प्रचंड मेहनत घेऊन समृद्धीने आपले स्वप्न साकारले आहे. मागील वर्षीही तिला हि संधी होती मात्र तिची निवड झाली नाही. त्यामुळे थोडीशी नाराज झाली तरी आणखी एक वर्ष आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपल्यातील कमींवर विशेषतः "ड्रिल"वर फोकस केला. त्यासाठी सकाळी लवकर व रात्री उशिरापर्यंत सराव केला. प्रत्येक वर्षी "बेस्ट कॅडेट"ला आरडी परेडसाठी संधी मिळते. तशी ती समृद्धीलाही मिळाली. प्रथम अमरावती, नंतर पुणे येथे निवड चाचणी होऊन त्यानंतर पुन्हा दिल्ली येथे निवड केली जाते. दिल्लीसाठी निवड झालेल्या सर्वांनाच आरडी परेडची संधी मिळत नाही. काहींना दि. २८ जानेवारी रोजी होणाऱ्या पीएम रॅलीत संधी मिळते. यावर्षी महाराष्ट्रातून एकूण २६ कॅडेटची (१६ मुले व १० मुली) निवड झाली होती. संपूर्ण भारतातून आलेल्या सर्व कॅडेटचा कसून सराव करुन घेतला जातो. 'ड्रिल' व 'कमांड' पाहून परेड कमांडर म्हणून निवड करण्यात आलेल्या तीन कॅडेटमध्ये समृद्धीचा समावेश होता. आपले स्वप्न साकार होत असतांना मुलींच्या पथकाचे नेतृत्वाची संधी तिला ऊर्जा देणारी ठरली. त्यातही तिने बेस्ट देऊन आपला निवडीचा मार्ग मोकळा केला. दि. २३ जानेवारीला तिला सांगण्यात आले तसे सांगण्यात आले. दि. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाच्या राष्ट्रपती व पंतप्रधानांना दिल्लीच्या राजपथावर मानवंदना देतांना आपला हा प्रवास सर्र्कन डोळ्यासमोर आला हे सांगतांना समृद्धी रोमांचित होते आणि तोच या सर्व प्रवासातला आनंदाचा क्षण सांगण्यास ती विसरत नाही.  

मित्रांनो आपल्याला वाटते तेव्हढी हि गोष्ट सोपी व छोटी नाही.यापूर्वी अनेक कॅडेट महाराष्ट्रातून आरडी परेडला जाऊन आले आहेत. मात्र समृद्धीचे विशेष कौतुक व अभिनंदन एव्हढ्यासाठीच कि तिने "परेड कमांडर' म्हणून प्रथमच महाराष्ट्राला हा बहुमान मिळवून दिला आहे. त्यातही फर्स्ट इयरला असतांना डोक्यात असा कोणताही विचार नसतांना केवळ एनसीसीतील प्रवेश तिला येथपर्यंत घेऊन जातो. यावर्षी तर  'कोरोना' महामारीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या पथसंचलनात निवड होणे विशेष म्हटले पाहिजे. पालकांनी दिलेली संमती व समृद्धीने पालकांचा विश्वास संपादन करुन आपले स्वप्न साकार करण्यासाठी एकनिष्ठेने केलेले समर्पण आजच्या तरुणांसाठी आदर्श आहे. दिल्लीच्या थंडीत मध्यरात्री १ वाजता सुरु होणार सराव सकाळी आठ वाजेपर्यंत चालायचा. त्यानंतर थोडी विश्रांती आणि पुन्हा ड्रिल व कमांडचे सराव एव्हढाच नेम... दिवसभरात केवळ ३-४ तासांची झोप, वातावरणातील बदल. खाण्यापिण्यावर मर्यादा, गरम पाण्याच्या गुळण्या, कितीही थकवा आला, पाय दुखले तरी सरावासाठी तयार, कधी तरी वैताग यायचा, स्वतःवरच चिडचिड व्हायची याचा त्रास वाटायचा... मात्र राजपथावरील पथसंचालनाने यासाठीच तर हे सर्व होते हे कळले.  

समृद्धीचे पालक हर्षल व सौ. अर्चना २६ जानेवारीच्या त्या क्षणाचे साक्षीदार आहेत. आपल्या लेकीच्या कौतुकाने त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबायला तयार नव्हते. समृद्धीला "परेड कमांडर" म्हणून पाहतांना खूप अभिमान वाटला. तिने तिची जिद्द पूर्ण केली असे म्हणताना वडील हर्षल संत यांनी काही वेळेला विरोध केल्याचे प्रांजळपणे कबुल करतात. मात्र सकाळी लवकर व रात्री उशिरापर्यंत करावा लागणारा सराव या काळजीपोटी हा विरोध असायचा. आम्ही तिला कायम पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं, एक मुलगी म्हणून कधी भेदभाव केला नाही. अडचणी आल्या तर मदत केली, कधी नाउमेद झाली तर उभारी दिली. आई सौ. अर्चना म्हणतात तिचे थोडे शैक्षणिक नुकसान होईल हे आम्ही स्वीकारले आणि कायम सपोर्ट केला. प्रत्येक वेळी तिच्यावर विश्वास ठेवून तिला सर्व गोष्टींना परवानगी दिली. " तू तुझे १०० टक्के दे, शेवटी परमेश्वरी इच्छा ! आणि निवड झाली नाही तरी कधी नाउमेद होऊ नको " असा सल्ला त्या देत असत. दोघांनाही समृद्धीचे कौतुक करण्यासाठी शब्द सुचत नव्हते.

समृद्धी आणि तिचे पालक तिच्या बटालियनचे CO. कर्नल प्रवीण धीमन,सुभेदार मेजर कोमलसिंह, महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर लेफ्ट. वाय. एस बोरसे, CTO ज्योती मोरे व PI staff, पुणे येथील ब्रिगेडियर सुनील लिमये , कर्नल अनुराग सुद, काँटिंजन्ट कमांडर कर्नल प्रशांत नायर, नायक सुभेदार किरण माने, मेजर अरुषा शेटे, लेफ्ट. विवेक बाले  यांच्याप्रती वारंवार कृतज्ञता व्यक्त करतात. समृद्धीचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी असून देशाच्या सैन्यदलात प्रवेश करुन देशाची सेवा करण्याची इच्छा पूर्ण होवो यासाठी मनापासून शुभेच्छा ! आशा फाऊंडेशनच्या ६ ते १२ मे २०१३च्या क्षमता शोधन व कौशल्य विकसन या उद्देशाने आयोजित आशा बाल विकास उन्हाळी शिबिराची शिबिरार्थी असलेल्या समृद्धीने मिळविलेले यश आम्हा सर्वांसाठी आनंददायी आहे. गत १३ वर्षात संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमातील विद्यार्थी आज आपल्या व्यक्तिगत जीवनात काहीतरी वेगळं करुन दाखविण्याची जिद्द बाळगून आहेत यातच आमचे समाधान आहे. समृद्धी, तिचे पालक व तिच्या या प्रवासाचे सर्व शिल्पकार यांचे मनापासून अभिनंदन ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४