Saturday 4 July 2020

कृतज्ञता व्यक्त करणारी गुरुपौर्णिमा !



ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्। 
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा॥
गुरूरादिरनादिश्च गुरूः परम दैवतम्। 
गुरोः परतंर नास्ति तस्मै श्री गुरवे नमः॥

मानवी जीवनात गुरुंचे महत्व अनन्यसाधारण आहे. मानवाला माणूस बनविणारे, समाजाला अपेक्षित असलेला एक चांगला व्यक्ती घडविणारे, स्वतःसोबत इतरांचा विचार करणारे, संवेदनशीलतेतून माणुसकी जपणारे, भौतिक सुखाची अभिलाषा पूर्ण करण्यासाठी तयार करणारे आणि त्यालाच पारमार्थिक ज्ञानाद्वारे भोगवादापलीकडची आत्मिक समाधान, शांती व आनंद देणारे हे सर्वच गुरु होत. प्रत्येक वेळी हे सर्व अपेक्षित सध्या करण्यासाठी दृष्टी देणारे, करवून घेणाऱ्या व्यक्तीच असेल असे नाही तर प्रसंगी परिस्थिती, निसर्गातील प्राणी, पक्षी, वृक्षवल्ली काहीही असू शकते. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! खरं तर या सर्व गुरुंचे आपण कायम कृतज्ञ असले पाहिजे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण आपल्यासह आपल्या परिसराचा, समाजाचा उद्धार करीत असतो. अशा या गुरुंना वंदन करणे, त्यांच्याप्रती आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले प्रथम कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत. यासाठीच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. त्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा दिवस आहे. त्यांच्यासारखे श्रेष्ठ आचार्य वा गुरु आजपर्यंत झाले नाही असे आपण मानतो. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात म्हटले आहे. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. अशा महर्षी व्यासांना वंदन करतो.

प्रथम आपण ‘गुरु’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊ या. ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात. अशा सर्व गुरुंना साष्टांग नमस्कार ! आपल्या आयुष्यात प्रथम गुरु हे आईवडील असतात. ते आपल्यावर आपल्या आचरणातून संस्कार करतात. अगदी छोटया छोटया गोष्टीतून ते जीवन कसं जगायचं, जीवनात कसं वागायचं हे शिकवत असतात. आईवडील हेच तर आपले प्राथमिक अवस्थेतले प्रथम आणि महत्वाचे गुरु असतात. त्यांना वंदन करतो. त्यानंतर आपल्याला योग्य शिक्षण देऊन व्यावहारिक जीवनासाठी अत्यावश्यक तयारी करुन घेतात, अपेक्षित कौशल्ये विकसित करण्यासाठी साहाय्यभूत होतात ते म्हणजे आपले शिक्षक. मातापित्यांनी व शालेय शिक्षकांनी मुलांना दिलेली शिकवण ही दीर्घकाळ टिकणारी असते. स्वत:च्या आचरणाने त्यांच्यात चांगले गुण परोपकार, त्याग, शौर्य, इतरांशी वागण्याची पध्दत, मोठ्यांविषयी आदर, सर्वांसाठी प्रेमाची भावना इत्यादी ते रुजवत असतात. शिक्षक आपल्याला जीवनातील अनेक मूल्ये शिकवतात आणि ती कृतीत यावीत, यासाठी आवश्यक त्या वेळी शिक्षासुद्धा करतात. त्यामागे आपण आदर्श जीवन जगावे, असा त्यांचा शुद्ध हेतू असतो.अशा सर्व शिक्षकांना वंदन ! 

भौतिक जगासंदर्भात मार्गदर्शन करणारे गुरु पाहिले. त्यानंतर अध्यात्मिक गुरु. आध्यात्मिक गुरु आपल्याला आपली खरी ओळख करून देतात. मुळात आपण एक व्यक्ती नसून आत्मा आहोत. अहंकाररूपी अज्ञानामुळे आपल्याला असे वाटते कि आपण जें करतो ते मीच करतो. मुळात आपल्यात स्थित असलेला तो परमेश्वर सर्व करीत असतो. त्याची तीव्र जाणीव गुरु आपल्याला करून देतात. यासाठी अध्यात्मिक गुरु जीवनात यायला हवेत. आपल्या जीवनाला प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप यांची जोड द्यायला हवी. आपल्यातील दोष निवारण करुन आनंद निर्माण होण्यासाठी अध्यात्मिक गुरु आवश्यक ठरतात. अशा सद्गुरुंना साष्टांग दंडवत ! जीवनातील या सर्व गुरुंना विनम्र भावाने वंदन करतो. त्यांनी दिलेली जीवनसूत्रे कृतीत आणण्याची प्रार्थना करतो. 

आपल्या आसपासच्या पर्यावरणातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यातील कुणापासून काय घ्यायचे, काय घ्यायचे नाही याचे विवेचन अवधूतोपाख्यानात आढळते. श्री गुरु दत्तात्रेयांच्या २४ गुरुंची माहिती आपल्याला यात मिळते. हे आपण वाचले आहे, माहिती आहे. पुनरावृत्तीचा दोष पत्करून मी येथे त्याची विशेष नोंद घेणार आहे कारण आजच्या पिढीला ते माहिती व्हावे, तशी दृष्टी विकसित व्हावी. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोल, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मधुहा (भ्रमर), हरिण, मासा, पिंगळा (वेश्या), टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, सर्प, कोळी, कुंभारमाशी ह्या साऱ्यांच्या आचरणावरून विविध प्रकारची शिकवण आत्मसात केलेली आहे. जीवनात काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे हे शिकविणारे व त्याद्वारे ज्ञानप्राप्ती करुन देणारे हे सर्व गुरु आहेत. 

पृथ्वी - पृथ्वीपासून क्षमाशीलतेचे ज्ञान प्राप्त केले कारण तुम्ही पृथ्वीवर काहीही केले तरी ती ते सहन करते. वायू - वायूचा सर्वत्र संचार असूनही सुगंध वा दुर्गंध यामुळे लिप्त होत नाही. त्याच्यापासून अलिप्त व समदर्शन हे ज्ञान प्राप्त झाले. आकाश - आकाशापासून अमर्याद मृदुत्व व सर्वसमावेशत्वाचे ज्ञान प्राप्त झाले. पाणी - पाण्यापासून शुद्धता, पावित्र्य व अभेदवृत्तीचे ज्ञान प्राप्त झाले. अग्नी - अग्नीपासून तेजस्विता, अपरिग्रह, रसनेन्द्रियावरही विजय ज्ञान प्राप्त झाले. चंद्र - चंद्र कलेकलेने वाढतो व कमीही होतो असे आपल्याला दिसते. प्रत्यक्षात चंद्राला काहीच फरक होत नसतो. तारुण्य व वार्धक्य ज्ञान शरीराच्या अवस्था आहेत आत्म्याच्या नाहीत. हे ज्ञान चंद्राकडून प्राप्त झाले. सूर्य - सूर्याकडून अनासक्त परोपकार व उपाधीमुळे होणारी भेदप्रतीती हे ज्ञान प्राप्त झाले. उपाधीमुळे भेदप्रतीती म्हणजे सूर्याची विविध ठिकाणी विविध प्रतिबिंब त्या उपाधीमुळे वेगवेगळी दिसतात. तव्दतच आत्मतत्त्व एकच असून गुणसंगाने म्हणजेच उपाधीमुळे भेदमय दिसते. कपोल (कबूतर) - कपोलाचे घरटे ज्या झाडावर होते त्याच झाडाखाली पारध्यांनी जाळे त्याच्या पिल्लांना पकडले. त्यांची आई व कालांतराने कपोल त्यांना सोडविण्याच्या आसक्तीने त्या जाळ्यात अडकतात. आसक्तीमुळे आपला घात होऊ नये म्हणून मी अनासक्तीचे ज्ञान कपोलापासून घेतले व अनासक्त झालो. अजगर - कोणत्याही चवीच्या आहारी न जाता विविध शात्मिकेत त्यात समाधान मानण्याचे ज्ञान मला अजगराकडून प्राप्त झाले. समुद्र - बाहेर अथांग व आत गंभीर, बाह्य संगाने क्षोभणारा. आपणही बाह्य विषयांती क्षोभ न होता परमात्माच्या चिंतनात गंभीर रहावे, हे समुद्राकडून शिकता आले. पतंग - दीपाच्या सौंदर्यावर मोहित होऊन दीपावर झेप घेऊन आपला प्राण गमावतो. तसे फसव्यामध्ये मायेच्या सौंदर्यावर आसक्त न होण्याचे ज्ञान मला पतंगाकडून मिळाले. मधुहा (मधुकुंद) - फुलांना जराही न दुखावता मध गोळा करतो. तद्वत् एकावरच भार न टाकता कल्पा माधुकरी मागून उपजिविका करण्याचे ज्ञान मला भ्रमराकडून प्राप्त झाले.

हत्ती - लाकडाच्या तीणीवर भुलून खडय़ात पडून पराधीन होतो तव्दत् स्त्री मोहाने येणारी पराधीनता टाळावी हे ज्ञान मला हत्तीकडून मिळाले. मधमाशी - संग्रह न करण्याचे ज्ञान मला प्राप्त झाले. कारण मधमाश्या मधाचा संग्रह करतात. मधमाश्यांना मारून शेवटी तो मध भिल्लच लुटून नेतात. हरिण - पारध्याच्या नादलुब्ध तालाला भुलून हरिण पकडले जाते. म्हणून विकारो जनक गोष्टीपासून दूर रहाण्याचे ज्ञान मला प्राप्त झाले. मासा - आमिषाच्या लोभाने गळाला अडकून प्राण गमावतो. म्हणून रसना जिंकून आत्मोन्नती साधण्याचे ज्ञान मला प्राप्त झाले. पिंगळा - वेश्या देहविक्रीस तयार झाली पण गिऱ्हाईक न मिळाल्याने वैफल्य ग्रस्तेत तिला निवैद्य बुद्धी प्राप्त झाली. त्यात तिला जे गीत सुचले त्याचा अर्थ असा की अमंगल देहाचे विकार जरी क्षणोक्षणी बदलत असले तरी आत्मा मात्र सदास्थिर मंगलमय असतो आणि तोच खरा नियंता पती आहे. त्यामुळे परपुरुषापासून मी सौख्याची अभिलाषा करणे किती मूर्खपणाचे आहे. त्यामुळे आता मला विधीवशात जे प्राप्त होईल त्यात मी समाधानी राहील. अशा दृढ निश्चयाने शांत झोपी गेली. त्यामुळे तिच्यापासून मी आत्मतत्त्वात स्थिर राहण्याचा बोध घेतला. कुरार पक्षी - आवडत्या वस्तूच्या साठ्यांमुळे मनुष्याला दु:ख प्राप्त होते हे मी कुरार पक्षाकडून शिकलो. कुरार पक्षाच्या चोचीत मासाचा तुकडा होता. तोवर इतर पक्षी त्याच्यावर तुटून पडत होते. पण तो तुकडा टाकून देताच तोच सुखी झाला. बालक - बालकाला कसलीच काळजी नसलेल्या व आपल्यातच रममाण झालेल्या त्याच्याकडून मी आत्म्यानंदात राहण्यास शिकलो. एक कुमारी - तिच्यापासून एकांत सेवनाचा बोध मी घेतला. मागणी घालायला आलेल्या पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था करतांना कंकणाचा आवाज होऊ नये यासाठी एकच कंकण हातात ठेवले त्यापासून मी बोध घेतला की अनेकजण असले तर गडबड गोंधळ होतो व दोघे असले तर गप्पा-गोष्टी होतातच. म्हणूनच साधकाने एकांत सेवन करावा. शरकृत (बाण तयार करणारा कारागीर) - बाण तयार करीत असताना त्यात तो इतका तल्लीन झाला होता की, त्याच्या समोरून वाजतगाजत राजाची मिरवणूक गेली तरी जराही विचलित न होता आपल्या कार्यात व्यस्त राहिला. त्याच्याकडून मी आत्मनंदात तल्लीन राहण्याचा बोध घेतला. सर्प - स्वत:चे घर नसलेला अनिकेत पण सदैव सावध राहून गुप्तपणे वावर करणारा प्राणी. त्याच्यापासून देहाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव ठेवून गृहादी संग्रहाच्या फंदात न पडता सदैवनाम स्मरणात सावध राहून साधना करावी हा बोध मी घेतला. कोळी (उर्णनाभी) - स्वत:च्या बेंबीतून तंतू काढून स्वत:चे विश्व निर्माण करतो. त्यात इतरांना अडकवतो पण स्वत: मात्र अडकत नाही. परमेश्वरही याच मायेपासून विश्व निर्माण करतो. अज्ञानी जिवांना अडकवतो. पण स्वत: कधीच अडकत नाही हे ज्ञान मी त्यांच्याकडून घेतले. कुंभारमाशी - आपल्या घरात कीटक आणून बंदिस्त करून ठेवते. कीटक भयाने कुंभारणीच्या चिंतनात मग्न होतो. त्यामुळे तो स्वत:च कुंभारमाशी बनतो. त्याच्यापासून हे ज्ञान प्राप्त झाले की सतत ईश चिंतनात केल्यास आपणही ईश्वराला मिळणार. 

ज्या गुरूंकडून मी जे शिकलो ते मी तुला सांगितले, पण स्वदेहाकडूनही खूप काही शिकलो. अनेक स्त्रिया असलेल्या पुरुषांची जशी ओढाताण होते तशीच ओढाताण माझा देह म्हणणाऱ्यांची इंद्रियांच्या विविध प्रकारच्या विषयांच्या ओढीमुळे होते. ते ध्यानात घेऊन मी विवेकवैराग्य धारण करण्याचे स्वदेहाकडून शिकलो. स्वत:ला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असे श्री दत्तात्रय म्हणतात. 

सर्व संतांनी व महानुभावांनी गुरुंची माहिती सांगितली आहे. आपल्या जीवनातील अशा सर्व गुरुंना खालील श्लोकाने वंदन करु या !   

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । 
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥ 

सियावर रामचंद्र कि जय ! गोपालकृष्ण भगवान कि जय ! 
सद्गुरु सखाराम महाराज कि जय ! 

7 comments:

  1. सुंदर विवेचन !

    ReplyDelete
  2. गुरुं विषयाची सांगोपांग चर्चेतून एकच गोष्ट सिद्ध होते की निसर्गातील प्रत्येक गोष्ट काहीतरी धडा शिकवतात. त्या अर्थी ते आपले गुरुच. मात्र, आपण डोळसपणे त्यांच्याकडे बघत नाही हे आपले दुर्दैवी. जे आपल्याला सन्मार्ग दाखवतात, बोध देतात ते लहान असो की मोठे गुरु तत्वालाच प्राप्त होतात. अश्या सर्व गुरुंना वंदन.
    गिरीषजी खूप छान प्रबोधन केलय.
    अभिनंदन !

    ReplyDelete
  3. Guru Tatwe....Superb composed

    ReplyDelete
  4. म्हणोनी जाणेतेनी गुरु भजिजे
    तेणे कृत कार्य होईजे
    जैसे मुळ सिंचने सहजे
    शाखा पल्लव संतोषति

    ReplyDelete
  5. खूप छान आणि उपयुक्त व संग्राह्य माहिती

    ReplyDelete