चमकलात ना ! कोरोनाच्या महामारीत हे असे काय बोलतोय मी ? पण हा ब्लॉग शेवटपर्यंत जरुर वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल मी असं का म्हणतो ते. मित्रहो, बिमारी हा शब्द कायम माणसाच्या मनात धस्स करणारा आहे. सध्याच्या स्थितीत सर्वच माध्यमांवर आपण जे काय पाहतोय, ऐकतोय आणि वाचतोय सुद्धा त्यामुळे अशी भावना निर्माण होणं नैसर्गिक व स्वाभाविकच आहे. या काळात कोणीही आजारी पडू नये हीच त्या जगनियंत्याकडे प्रार्थना आहे... पण प्राप्त परिस्थितीत काही " बिमारी " जडवून घेतलेलीच बरी कारण बिमारी अच्छी भी होती है !
बिमारी भी अच्छी होती है ! हे समजून घेण्यापूर्वी आपण नक्की बिमारी म्हणजे काय ते समजून घेऊ. माणसाच्या नैसर्गिक जीवनक्रमावर बाधा आणणारी गोष्ट म्हणजे बिमारी. याची काही लक्षणे असतात जी सजीवाच्या नैमित्तिक कार्यपद्धतीतील फरक स्पष्ट करतात. यामुळे माणसाला वा सजीवाला अस्वस्थ वाटते. त्याची कारणे प्रथम माणूस स्वतःच शोधून काढण्याचा प्रयत्न करतो व उपायही ! मात्र काही वेळेस त्याला तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. हे सामान्य बिमारीच्या बाबतीत झाले. अच्छी बिमारी यापेक्षा थोडी वेगळी असते आणि म्हणून तर बिमारी अच्छी भी होती है !
वर सांगितलेली बिमारी आणि अच्छी बिमारी यात सर्वात महत्वाचा फरक आहे आणि तो म्हणजे अच्छी बिमारीत संबंधित व्यक्तीला त्याचा फायदा होतो. ती त्याची ओळख असते. अच्छी बिमारी माणसाचं व्यक्तिमत्व खुलवते, त्याची प्रगती करते, त्याला जगण्याचा आनंद तर देतेच पण जीवनाला अर्थ प्राप्त करुन देते. समाजातील इतर घटकांना असे वाटते कि त्याला बिमारी आहे कारण त्यांना या बिमारीचा त्रास होतो. अच्छी बिमारीला उपाय नाही आणि त्याची गरजही नाही. याकरिताच बिमारी अच्छी भी होती है !
वैतागलात ? रागावलात ? काय लावलं हे असे वाटतेय ? जाऊ द्या ! मला सांगा तुम्हाला अशी काही बिमारी आहे का ज्यामुळे इतरांना अडचण होते किंवा त्रास होतो ? नक्कीच असणार नसेल तर लावून घ्या. माझी अपेक्षा आहे आपल्याला मला काय म्हणायचे हे लक्षात आले कि आपण यावरील कमेंटमध्ये आपली एखादी "बिमारी" जरुर सांगा अच्छी बरं का ? हे सर्व कुठून सुचलं ते सांगतो. आमचे एक सहकारी आहे त्यांचे नाव मधुकर पाटील अर्थात मामा ! गेली १२ वर्षे आम्ही आशा फौंडेशन या संस्थेत सोबत काम करतो. अतिशय वक्तशीर, स्वच्छता, टापटीप, व्यवस्थितपणा त्यांच्या अंगात रोमारोमात भरलेला. कामाशी प्रामाणिक, संपूर्ण समर्पण आणि वचनबद्धता हि त्यांची विशेषता. अलीकडच्या काळात दुर्मिळ असणारी हि गोष्ट नक्कीच अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे आणि हीच त्यांची "बिमारी" आहे. म्हणूनच म्हटले बिमारी अच्छी भी होती है !
हि बिमारी कशी असे ना ? तर कोणी एखादी गोष्ट झाडली, स्वच्छ केली तरी आमच्या मामांना त्यांच्या पद्धतीनेच आणि त्यांच्या हाताने केल्यावर त्याचे समाधान होते. परवा असेच झाले कार्यालयात नव्याने सुरु केलेल्या घरपोच भाजीपाला सुविधा झाल्यावर सर्व स्वच्छता झाली. मामा आल्यावर त्यांनी पुन्हा ती केली. आपण केव्हाही कार्यालयात या तुम्हाला हि गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. मग आम्हाला हि बिमारी का वाटते ? तिचा काय त्रास होतो ? तर आम्हाला ते कारणे बाध्य होते आम्ही सर्वच जण त्यांच्या या "अछ्या बिमारीला" घाबरतो आणि सर्व व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतो. अनेकांच्या स्वभावाचा भाग बनलेल्या या "अछ्या बिमारीला" समाज वेडेपणा म्हणतो आणि त्या व्यक्तीला पागल ! पण हेच लोक इतिहास घडवतात. दिशा देतात. समाजाला समृद्ध करतात. आपल्या आजूबाजूला अशा "वेड्यांची" नक्कीच कमी नाही आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आम्हा सारख्या कार्यकर्त्यांचे तेच तर प्रेरणास्थान असतात. म्हणून म्हटले बिमारी अच्छी भी होती है !
मित्रहो, पटतंय का मी काय म्हणतो आहे ते ? तर मग आपण जरुर सांगा आपली अशी अच्छी बिमारी आणि हो त्यासोबत आपल्या या बिमारी मागची प्रेरणा असलेली व्यक्तीही... सांगताय ना ? मी उत्सुक आहे जाणून घ्यायला अशा बिमारी व्यक्तीला आणि त्यांच्या बिमारीलाही ! कारण बिमारी अच्छी भी होती है !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
धन्यवाद सर .
ReplyDeleteसकारात्मक दृष्टीकोन!👌👌👍
ReplyDelete