रामकृष्ण हरि !
विठु माझा लेकुरवाळा
संगे गोपाळांचा मेळा
निवृत्ती हा खांद्यावरी
सोपानाचा हात धरी
पुढे चाले ज्ञानेश्वर
मागे मुक्ताबाई सुंदर
गोराकुंभार मांडीवरी
चोखा जीवा बरोबरी
बंका कडेवरी
नामा करांगुली धरी
जनी ह्मणे गोपाळा
करी भक्तांचा सोहळा
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या निस्सीम भक्तांच्या पंक्तीत अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल अशा संत म्हणजे संत जनाबाई ! सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व आयुष्यभर मोलकरणीचे काम करणाऱ्या मराठवाड्यातील गंगाखेडच्या जनीने आपली ओळख संत जनाबाई केली. संत ज्ञानदेव - विसोबा खेचर - संत नामदेव यांच्या गुरु परंपरेतील संत जनाबाई ! पारमार्थिक गुरु संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सायंकाळी सर्व संतांनी त्यांनी प्रत्यक्ष पहिले. ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा त्यांचा सुप्रसिद्ध अभंग. संत नामदेवांमुळे त्या कायम संतांच्याच सहवासात होत्या. संत जनाबाईंच्या नावावर सुमारे ३५० अभंग सकल संत गाथेत समाविष्ट आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यान रचना पण त्यांच्या नावावर आहे. घरातील कामे करतांना त्या कायम पांडुरंचेच नामस्मरण करीत असत.
त्यांचे अभंग हें भगवंतांच्या प्रेमाने ओतप्रोत भारलेले आहेत. लौकिक आणि ऐहिक सुखाच्या पलीकडे जाऊन त्या पांडुरंगाला शरण गेल्या आहेत. त्यांच्या जीवनातील प्रत्यक्ष आलेले अनुभव व त्याचे भव त्यांच्या विविध रचनांमधून पाहावयास मिळतात. संत नामदेवांवरील प्रेम व भक्तिभाव यासह तात्कालिक विविध संतांच्या भावविश्वासह विठ्ठलाचं भक्तिभाव त्यांच्या अभंग वा ओव्यात दिसून येतो. अन्य संतांप्रमाणे अतिशय अधिकारवाणीने त्या आपल्या पांडुरंगशी भांडतात. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत व सत्पुरुषांच्या जीवनावर व गुणांवर आधारावर रचना त्यांनी साकारल्या व त्या आजच्या पिढीला मार्गदर्शक आहेत. त्यांची साधी, सोपी व सरळ भाषा सामान्यजनांच्या हृदयाला भिडते व आपलीच वाटते. त्याचे अनेक अभंग नामदेवांच्या गाथेत आहेत.
विठ्ठल भक्त व दरवर्षी पंढरीची वारी न चुकता करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. समाजाच्या खालच्या वर्गातून आलेल्या व भागवद्भक्तीने आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत जनाबाई संत नामदेवांच्या कुटुंबातील एक घटक होत्या. संत जनाबाईंच्या आयुष्यात पंढरपूर, पांडुरंग व संत नामदेव यांचे विशेष महत्व आहे. पंढरपुरात वास्तव्य असल्याने त्यांना विठुरायाचे रोज दर्शन घडायचे. नामदेवांच्या घरी पांडुरंगाचा सातत्याने गजर होत असे. नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला त्यांनाच आपले पारमार्थिक गुरु बनले. गुरुंवरील श्रेष्ठ भव हि त्यांची शक्ती होती. संत नामदेवांच्या भक्तीच्या मार्गावर आयुष्यभर मार्गक्रमण करणाऱ्या व श्रेष्ठ गुरुभाव जपणाऱ्या संत जनाबाईंना नामयाची दासी म्हणूनही ओळखलं जातं. अखेरच्या क्षणापर्यंत त्या आपल्या गुरूंची सावली बनून राहिल्या. नामयाच्या पायरीवर विसावून त्या पांडुरंगात विलीन झाल्या. अभंग, गवळणी, ओव्यांच्या रुपात अजूनही संत जनाबाई खेडोपाड्यांतील घराघरांत जागती आहे. लाडक्या जनाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवल्या आहेत.
संत बनलेल्या जनाबाईची गंगाखेडमधील गावकऱ्यांनी समाधी बांधलीय. जनाबाईला जातं ओढू लागणार्या देवाची मूर्ती इथं दिसते त्याचप्रमाणे तिच्या सर्व घरकामांत मदत करणारा विठूराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये दिसतो. दासी जनीचं संत कबिरांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंगही इथं चितारण्यात आलाय. दासी म्हणून राहिलेल्या जनाबाईंच्या वाट्याला खूप काबाडकष्ट आले. पण तिला या कामांमध्ये मदत केली प्रत्यक्ष विठूरायानं. जातं, मडकी, गोवर्या असा सगळा जनीचा संसारच पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवलाय. तिचा हा संसार पाहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परतत नाहीत. तिच्या लोकप्रिय अभंगामुळे त्या ख्याती प्राप्त झाल्यात आणि संत कबीरांना तिला भेटायची इच्छा झाली व ते पंढरपुरात आले. गोवऱ्यांवरून भांडतांना त्यांनी पाहिले व गोवऱ्या नक्की कोणाच्या याचा न्यायनिवाडा करायची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यावेळेस जनाबाईंनी माझ्या गोवऱ्यांमध्ये आपणास विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल सांगितले व त्याची प्रत्यक्ष अनुभूती संत कबीरांना आली व संत जाणाईची माहिती कळाली. पांडुरंगाच्या मंदिरातील दागिने चोरल्याचा आळ घेण्यात आला त्यावेळेस तिला शिक्षा देण्यात आली त्यावेळेस प्रत्यक्ष पांडुरंग तेथे प्रकट झाले. या दोन्ही गोष्टींतील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन आहे. नामस्मरणाने आपल्याला सर्वत्र परमेश्वराची अनुभूती येते हेच यावरून लक्षात येईल.
ज्ञानबोधकार संत मुक्ताबाई !
संत मुक्ताबाई म्हटले कि आठवतात ते ताटीचे अभंग. संत ज्ञानेश्वरांना कुणी मनाला लागेल असे बोल बोलल्याने त्यांनी स्वतःला खोलीचे दार बंद करुन कोंडून घेतले. रुसून बसलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताईने "ताटी उघड ज्ञानेश्वरा" म्हणून आळविले. त्यांच्या या अभंगांचा आशय असामान्यच ! ताटी म्हणतांना झोपडीचे दार नव्हे तर मनाचे , बुद्धीचे दार म्हणते. ज्ञानदेवांची समजून काढण्याचे काम त्या अतिशय तळमळीने करतात. "योगी पाव मनाचा | साही अपराध जनांचा || विश्वारंगे झाले वन्ही | संत सुखे व्हावे पाणी || अशी त्या सुरवात करतात आणि शेवटी म्हणतात लडिवाळ मुक्ताबाई | जीव मुद्दल ठायीचे ठायी | तुम्ही वारुणी विश्वातर | ताटी उघडा उघडा ज्ञानेश्वरा ||. त्यांचे कूट अभंगही प्रसिद्ध आहेत. वारकरी पंथातील संत मुक्ताबाई योगमार्गावरील आपला अधिकार सिद्ध करतात. मुक्ताईच्या काव्यात तिच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू उठून दिसतात. अंधपणामुळे वाया जात असलेल्या या मुक्ताईला निवृत्तिराजाने सावध केले व त्यामुळे 'मुक्तपणे मुक्त । मुक्ताई पैं रत । हरिनाम स्मरत । सर्वकाळ ।' अशी आपली अवस्था होऊन गेल्याचे ती सांगते. तिच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहे, साक्षात्काराचे पडसाद आहेत, हे सर्व खरे; पण त्याबरोबरच त्यांत हृदयाचे मार्दव आणि भावनेची हळुवारताही आहे. तसे पाहिल्यास तिचा स्वभाव सोपानदेवाप्रमाणे थोडा परखड दिसतो. मुंगी उडाली आकाशी । तिने गिळिले सूर्यासी । असे तिचे एक वचन आहे. हे तिला स्वतःलाही लागू पडते. खानदेशात तापीच्या काठचे मेहुण येथे त्यांची समाधी आहे. नामदेवांच्या म्हटल्या जाणाऱ्या काही आत्मचरित्रपर अभंगांवरून असे मानले जाते.
(संकलनावर आधारित)
रामकृष्ण हरि !
छान लेख .
ReplyDeleteमाहितीपूर्ण लेख असल्यामुळे नवीन माहिती मिळाली .
👌👌👍👍
खूप खूप आभारी आहे..
ReplyDeleteफारच छान व अभ्यासपूर्ण........
ReplyDelete