Saturday 4 July 2020

विश्वाची चिंता करणारे समर्थ रामदास स्वामी !


जगी सर्व सूखी असा कोण आहे
विचारे मना तूचि शोधून पाहे
मना त्वाची रे पूर्वसंचीत केले
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ||


जय जय रघुवीर समर्थ ! 

श्री समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राला लाभलेले सद्गुरु होत. आजही त्यांचा उपदेश इतर सर्व संतांप्रमाणे महाराष्ट्राला जागृतीचे धडे देत आहे. जो गुरु आत्मज्ञानाचे दर्शन घडवून देतो तोच खरा गुरु  असे शास्त्र सांगते. सर्व काही नष्ट झाल्यावर जे उरते तोच आत्मा. त्या आत्म्यालाच ब्रह्म असे म्हणतात. त्याच परब्रह्माचे दर्शन श्री समर्थांनी महाराष्ट्राला करून दिले आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयात ते ठायीठायी दिसते. त्यांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टींची अनुभूती घेतली त्या सर्व गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. मानवी जीवन व मन अद्भुत आहे. या दोन्हीसाठी लागणाऱ्या गोष्टी त्यांनी आपल्या वाङ्मयातून लिहिले आहे. आपल्या स्वयं उद्धारासाठी या गोष्टी नक्कीच लाभदायक ठरतील असा विश्वास आहे. कारण त्यांनी मांडलेल्या गोष्टी स्वतःवर केलेल्या प्रयोगांवर आधारित आहे. त्यांची बुद्धी सूक्ष्म होती व प्रतिभा जागृत होती म्हणूनच त्यांचे अनुभवविश्व व्यापक, रसाळ, कालातीत आहे. त्यांचे जीवन दर्शन आपल्याला त्यांच्या श्रेष्ठतम असलेल्या दासबोध ग्रंथात दिसते. 

समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च . १६०८, जांब, महाराष्ट्र - १३ जानेवारी. १६८१ , सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते.  त्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी व राम जन्माच्याच वेळेस झाला आहे. समर्थ रामदास स्वामी रामाची आणि हनुमंताची उपासना करणारे होते. सूर्योपासक घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण देणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करीत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. रामदास स्वामी आणि संत तुकाराम हे समकालीन होते. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. समाजाला उपदेश करण्यासाठी समर्थांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. श्रवण, मनन व चिंतन केल्याने ज्ञानाची वृद्धी होते. अज्ञानाचा अंधार दूर होतो. त्यातूनच मनू ब्रह्मज्ञानी होतो. या ज्ञानदृष्टीचा लाभ होण्यासाठी दासबोध आणि त्याद्वारेच संसाराची फलश्रुती होऊ शकते. मात्र याचा अनुभव प्रत्येकाला स्वतःलाच घ्यावा लागेल असे समर्थ रामदास सांगतात.  'मानवी जीवनातील नैराश्य घालवून चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य दासबोधात आहे. सूर्यनमस्काराचे महत्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र त्यांनी दिला आहे. यातून रामदास स्वामींनी सर्व जाती-पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, संसारी साधकांना, सर्वसामान्यांना, प्रौढांना, बालकांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. दासबोध ग्रंथाची अनेक ठिकाणी आजही पारायणे केली जातात. दासबोधात सर्व अध्यात्मिक ग्रंथांचे सार आहे, असेही म्हटले जाते. यासाठीच त्याला ग्रंथराज म्हटले जाते. पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे.

लहानपणी खोडकर वृत्ती असलेल्या नारायणाला साहसी खेळांची विशेष आवड होती. झाडावरून उद्या मारणे, पूर्ण पोहणे, गोडे सवारी या गोष्टींमध्ये ते तरबेज होते. समर्थ निसर्गप्रेमी होते. नद्यांचा उगम अथवा संगम ही त्यांची आवडीची ठिकाणे होती. विविध प्रकारचे मित्र जोडण्याची कला होती. त्यांच्या सहवासात या मित्रांच्या कुटुंबांच्या व्यवसायाचे निरीक्षणे व अनुभवाने त्यांनी सर्व गोष्टीं लहानवयातच आत्मसात केल्या. आईने त्यांच्या या खोदकारपणामुळे रागविल्याने ते एकदा लपून बसले. काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडल्यावर आईने विचारले  "काय करीत होतास ?" त्यावर त्यांनी दिलेले उत्तर होते  "आई, चिंता करितो विश्वाची". आईला दिलेला शब्द पळत विवाहाच्या बोहल्यावरुन पळून गेलेल्या समर्थांनी त्यानंतर पायी चालत पंचवटीस येऊन रामाचे दर्शन घेतले. त्यानांतर टाकळी येथे १२ वर्षे तपश्चर्या केली. येथील शांत व प्रसन्न वातावरण यासाठी त्यांना योग्य वाटले असावे.  या काळात ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार त्यानंतर सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहू दोन तास गायत्री मंत्राचा जप तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर आपल्या कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले असे मानले जाते. दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत,  त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच 'करुणाष्टके' होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. स्वयंप्रेरणेने त्यांनी स्वतःचा विकास या कालखंडात करवून घेतला. तेथेच त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.

समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले व आत्मसाक्षात्कार झाला. ‘ भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले - " आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता ?" तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले - " एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी". समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले - "आणि हा सारा फौजफाटा ?" त्यावर हरगोविंद म्हणाले - " धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे , केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे.'समान-शीले-व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दोघांत सख्य झाले. समर्थ गुरु हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते दोन महिने राहिले.तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले.... त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी. जप करतांना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे.समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पहायला मिळते. भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत."समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्यापाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली.

समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली. गावोगाव मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे याच परिसरात आहेत. भारत प्रवास करतांना शेवटी समर्थ पैठणला आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले. त्यानंतर आपल्या जन्मगावीही ते गेले. तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. तेथे  समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे मानले जाते.

मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे. “शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्र्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।” हा श्लोक वामन पंडितांनी समर्थ रामदासांना उद्देशून लिहिला आहे.  समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र,अनेक आरत्या उदाहरणार्थ 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची', 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा', 'दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी' , 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी' ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो. या त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी घरांघरांत स्थान मिळवले आहे. 

एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ काही शव्दांत सांगता येते - कर्म ,उपासना, ज्ञान, विवेक. भक्ती, प्रयत्‍न व सावधानता. समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला; कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनांत ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले - जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।। प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल. 

समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा संप्रदाय आहे.[१०] समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवाजीच्या काळात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या कवींनी व कवयित्रींनी विपुल लेखन केले आहे. या संप्रदायाची बहुतेक हस्तलिखिते धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात ठेवली आहेत. त्यांचा शोध घेऊन संग्रह करण्यासाठी समर्थ भक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला.

समर्थांनी त्या काळी ११०० मठ स्थापन केले आणि सुमारे १४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते, तर काही शिष्य ब्रम्हचारी होते. कल्याणस्वामी रामदासांचे पट्टशिष्य होते. ज्या वेळी एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्या वेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जाई. समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा असे. दासबोधाचे नुसते पारायण करून भागत नव्हते, दासबोध समजावून घेण्यावर समर्थांचा भर होता. अनेक महंतांचा दासबोध कंठस्थ होता. शिष्याची परीक्षा घेण्याची समर्थांची पद्धत मोठी विलक्षण होती. त्यावेळी ग्रंथ छापले जात नसत. हाताने लिहून ग्रंथांचा नकला केल्या जात. छापील नसल्यामुळे ग्रंथ बांधलेले (बाइंडिंग केलेले) नसत. पानांवर पृष्ठांक देखील नसायचे. अशा वेळी समर्थ त्या शिष्याकडून त्याने लिहिलेली दासबोधाची पोथी मागवून घेत. पत्त्याप्रमाणे पिसून पोथीची सर्व पाने विस्कळीत करत आणि मग शिष्याला सगळा दासबोध पुन्हा व्यवस्थित लावून ठेवायला सांगत. ज्या शिष्यांचा दासबोध कंठस्थ नसे त्यांना पोथी जुळवायला फार वेळ लागे. अशा शिष्याला महंत म्हणून किंवा मठपती पदी नियुक्त केले जात नसे. ज्याला पोथी लावायला विलंब झाला त्यांची निर्भत्सना करताना समर्थ म्हणत," याने दासबोध वाचला नाही केवळ गंधफुले वाहून पूजला."त्या वेळी समर्थांचे शिष्यांना सांगणे होते की, जो कोणी दासबोध ग्रंथाचे वाचन करील, तो ग्रंथ नीट समजावून घेईल आणि त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष मिळेल. त्यासाठी वेगळा गुरू करण्याची गरज नाही. ग्रंथ हेच गुरू होत.

जय जय रघुवीर समर्थ ! 

5 comments:

  1. फारच छान आणि उदबोधनपर लेख आहे.

    ReplyDelete
  2. ऊत्तम माहितीपूर्ण लेख .

    ReplyDelete
  3. गिरीशराव

    समर्थांच्या कार्याचा सविस्तर परिचय आपण करुन दिला आहे.समर्थांचे कार्य अशा प्रकारे नव्या पिढीला समजावले पाहिजे. इतिहासातील विवादीत संपर्क आणि भेटीविषयी विनाकारण तर्क व कुतर्कांना उत्तरे देण्यापेक्षा समर्थांचे इतर समाज,धर्म व अध्यात्मावरील कार्य समोर आले पाहिजे. ३३ कोटी देवादिकांची संख्या असतानाही समर्थांनी मारुतीला पूजास्थानी आणले. यातून फार मोठा संदेश समर्थ देतात. मारुती कोणत्याही जातीचे प्रतिक नाही. तसे पाहिले तर मारुती वनातली वानर जमातीचा होता. मात्र तो अतुलनिय साहसी, आत्म ज्ञानी, स्वामी निष्ठ, महिलांचा आदर करणारा, अंगी बल असले तरी सत्तेची हाव नसलेला, संयमी आणि प्रसंगी स्वतःच्या शरीराला इजा करुन शत्रूला घाबरवणारा होता. मारुतीची इतरही स्वभाव वैशिष्ट्ये असू शकतात. पण समर्थांनी मारुतीचीच ११ मंदिरे पुढाकारातून उभारली.या विषयावरही लेखन व्हायला हवे. आपले सुदैव आहे की, धुळ्यात वाग्देवता मंदिर आहे. तेथे समर्थांचा अभ्यास करण्याची सर्व साधन सामुग्री उपलब्ध आहे. मनाला आवर घालायला लावणारे समर्थांचे कवन मला नेहमी वाचायला आवडते. मनःशांतीचा तो अनोखा प्रयोग आहे.

    ReplyDelete
  4. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

    ReplyDelete