Thursday, 27 August 2020

कृतज्ञता जीवनादर्शांप्रतीची !

आदर्शांचा आदर्श राम !

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० " कृतज्ञता उत्सव " अंतर्गत सहाव्या दिवशी आपण आपल्या जीवनातील आदर्शांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आज व्यक्त झालेल्या मनोगतांमध्ये प्रत्येकाने अनेक आदर्शांचा उल्लेख केला आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्विता मिळवायची असेल तर त्या त्या क्षेत्रातील आदर्शांचा विचार करावा लागेल. आपण ज्याच्याकडून काही तरी शिकतो त्याला आदर्श म्हणू शकतो मात्र म्हटलेच पाहिजे असे बंधन नाही. त्यामुळे चांगलं कुणाकडूनही घ्यावे त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे मात्र तो आदर्श आहे असे नाही. कारण आजच्या युगात प्रभू रामचंद्रांप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम दिसत नाही. जीवन जगात असतांना समाजातील व्यक्तींना अपेक्षित असलेली उक्तीप्रमाणे कृती तसेच आचार, विचार आणि कृती यात योग्य मेळ दिसून येतं नाही. आई-वडील हेच सामान्यपणे प्रत्येकाचे आदर्श असल्याचे लक्षात येते. असो... माझ्या आदर्शांबद्दल यानिमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो. 

आपल्या विचारांबाबत ठाम मात्र इतरांच्या विचारांबाबत व भावनांचा आदर, काम करतांना अपेक्षित सर्वसमावेशकता, दूरदृष्टी, आधी केले मग सांगितले हि वृत्ती, द्रष्टेपणा, निःस्वार्थ भावनेने केलेली सेवा, वेळेचे भान, कामाचा दर्जा आदी गोष्टींबाबत आग्रही  हे आदर्शांचे परिमाण ठरु शकतात. अजूनही वाढविता येतील. या सर्व गुणांचा एकत्रित मिलाप जेथे सापडेल ती व्यक्ती आदर्श ठरु शकते. तरीही त्या व्यक्तीच्या स्वभावातील दोषांकडे आपल्याला दुर्लक्ष करावे लागेल. आपण प्रभू रामचंद्रांना आदर्शांचा आदर्श असे म्हणत असलो तरी त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो हे लक्षात घ्यावे लागेल. ज्या व्यक्तीच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल, कार्याबद्दल, जीवनातील समर्पित वृत्तीबद्दल अभिमान वाटतो अशा व्यक्ती आदर्श ठरतात. त्यांचे अनुसरण करणारे अनेक व्यक्ती असतात. अशा आदर्शांचा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वावर व जीवनावर प्रभाव दिसून येतो आणि त्याबाबत ते जाहीरपणे सांगतात. 

माझ्या जीवनावर अशा अनेक लोकांचा प्रभाव असल्याचे मला जाणवते. यात अग्रक्रमाने माझे वडीलच आहेत. पोस्टासारख्या विभागात व्यावसायिक जीवनाची वर्षे व्यतीत करतांना प्रामाणिकपणे कष्ट हि गोष्ट माझ्यावर प्रभाव करुन जाते व मी त्याचे अनुसरण करतो. जीवनाचे तत्व घेऊन जगणारे माझे वडील त्यादृष्टीने मला आदर्श वाटतात. आपल्या दाराशी कोणी माणूस त्याचे पैसे मागायला आला नाही पाहिजे. (याचाच अर्थ आपले अंथरुण पाहून पाय पसरवावे) दुसऱ्यामुळे आपल्याला त्रास झाला तरी चालेल मात्र आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको, कष्टाने माणूस मरत नाही, मर्यादित उत्पन्नातही चांगले, आनंदी व समाधानी आयुष्य जगता येते. आईनेही अशाच प्रकारे जीवनावश्यक काही मूलभूत तत्वज्ञान आपल्या जीवनातून सांगितले. घरात कायम चांगलेच बोलावे कारण वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो. स्वयंपाक करतांना प्रसन्न व आनंदी असावे कारण बनविणाऱ्याची वृत्ती त्या अन्नात येते आणि नंतर खाणाऱ्यातही ! साधे बाळबोध वाटत असले तरी तेच शाश्वत विचार आहे, असे मला वाटते. यासर्व गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. ज्या मला आदर्श वाटतात. या माझ्या आदर्शांबद्दल कृतज्ञता ! 


व्यावसायिक, शैक्षणिक व सामाजिक जीवनात अनेकांचा प्रभाव मला जाणवला. तो जीवनात आणण्याचा कायम प्रयत्न असतो. आमचे प्राचार्य प्रा. एन. के. पाटील, प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, डॉ. अविनाश आचार्य, पद्मश्री भवरलाल जैन, ऍड. अच्युतराव अत्रे, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुळकर्णी, संजीव दहिवदकर, श्री. लक्ष्मणराव जोशी हि त्यातील काही नावे. या सर्वांसोबत संपर्क संवाद होता, आहे. जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असतांना या सर्वांच्या जीवनाचा, त्यांच्या विचारांचा, साधनशुचितेचा प्रभाव कायम राहिला. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, चाणक्य, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम , महाराष्ट्रातील विविध संत, क्रांतिकारक, परमवीरचक्र विजेते जवान यांच्या जीवनातून कायम प्रेरणा मिळते. या सर्वांप्रती आज कृतज्ञता व्यक्त करतांना मला विशेष आनंद होत आहे. माणसाच्या जीवनात आचार, विचार व कृतीचे दिशा दर्शन व मार्गदर्शन करणाऱ्या प्रेरणादायी आदर्शांचे महत्व आहे. कृतिशील विचारांचा वसा आणि वारसा अनेक पिढ्या घडवितात. त्यासाठीच हि जीवनादर्शांची कृतज्ञता ! पुण्यभूमी भारतमातेला परमवैभवाला नेणाऱ्या आदर्शांची हि शृखंला अखंडपणे सुरु राहो... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! गणपती बाप्पा मोरया ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Wednesday, 26 August 2020

श्रीमंतीचा अनुभव देणाऱ्या मित्रांप्रतीची कृतज्ञता !

लंगोटी यार 

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० अंतर्गत "कृतज्ञता उत्सवात" सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत एकाच गोष्टीकडे आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने, अर्थाने  पाहू शकतो याची जाणीव करुन देणारी आहे. प्रत्येक बाबतीत भरभरुन लिहायचे असते असे लक्षात येते. आपल्याला त्या नात्यातलं वेगळपण टिपण्यासाठी ओळींची मर्यादा घातली आहे. हा कृतज्ञता उत्सव रुजतो आहे. मंडळी लिहिते होत आहे आणि वैविध्यता गावते आहे, तीच या उपक्रमाची उपलब्धता. मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना सर्वात जास्त विशेषणे व आदर्श उदाहरणाचे संदर्भ मिळाले. जीवनातील मित्रांचे महत्व अधोरेखित करणारे सर्वांचे अनुभव होते. या सर्वांमध्ये जीवन समृद्ध आणि आयुष्याची श्रीमंती मला दिसली. अगदी मोजकेच वा भरपूर मित्र असले तरी त्यामुळे मिळणारी श्रीमंती मात्र सारखीच ! मंडळींनी व्यक्त केलेल्या भावना माझ्या मित्रांच्या नात्यातून मांडणार आहे. 

लहानपणी अधिक वेळ सोबत असणारा एव्हढा एकमेव निकष असतो. पुढे जाऊन हि मैत्री विचारांनी होते, सामान धाग्यांनी होते. वयाचा, विचारांचा, सोबतीचा कोणताही असो,  तो मित्र अशी एक भावना तयार होते. माणूस प्रगल्भ होत जातो आणि या सर्व गोष्टी पलीकडे जाऊन मैत्री अनुभवता येते. मग कौटुंबिक नात्यांमध्येही आपल्याला मैत्री सापडते. समाज माध्यमाच्या युगात तर एकमेकांना न पाहिलेले मित्र अनुभवतात. त्याला जोड असते निर्व्याज व निरपेक्षपणाची... मला खूप मित्र आहे आणि त्यात वादच होत आहे. या सर्वांबद्दल लिहायला मला आवडते. सहजतेतून आणि स्वभावातून झालेली हि मैत्री कायम हृदयात घर करते याचा आपल्या सर्वांप्रमाणे माझाही अनुभव आहे. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

माझा लहानपणापासूनचा मित्र म्हणजे प्रशांत मोराणकर ! हि मैत्री अशी आहे कि, कट्टी ने अबोला असला तरी मैत्री कायम होती. म्हणजे एखाद्या गोष्टीवरुन बिनसले असले तरी आम्ही सायकलवरच सोबत जाणार मात्र एकमेकांशी न बोलता कारण कट्टी आहे नं ! मग परत बोलायला कसे लागायचो ते आठवत नाही. पावसाळ्याच्या दिवसात ढग भरुन आले वातावरण मस्त असले आणि दोघांनी ठरवले कि आम्ही सायकलवरुन रोकडोबा हनुमान, नकाणे तलाव, डेडरगाव अशा ठिकाणी जायचो. डेडरगावला त्यांची शेती आहे.  तेथेच मुक्काम आणि मग दुसऱ्या दिवशी घरी. अनेकदा धुळ्याच्या गणपती रोडवरील पुलावर उशिरापर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत गप्पा मारत असू. दिवसातला बहुतांश वेळ सोबतच. अनेकदा जेवण त्याच्याच घरी. खेळ, उत्सव, कार्यक्रम सर्व सोबतीने. हा आमचा मित्र लग्न झाल्यानंतर फिरायला गेला नाही. तीन वर्षानंतर आमचा एक मित्र चंद्रशेखर जोशी व माझे लग्न झाल्यानंतर आम्ही तिघे सोबत फिरायला गेलो अशी हि मैत्री जी आजही अबाधित आहे. आमच्या या मैत्रीत टेलीपथीचा (इंद्रियांच्या साहाय्यावाचून एकाच्या मनातील विचार त्याचवेळी दूरवर असलेल्या दुसर्‍या व्यक्तीच्याही मनात उमटणे) अनेकदा आम्ही अनुभव घेतो. 

धुळ्यात खूप सारे मित्र होते. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील, महाविद्यालयातील, गल्लीतील असे सर्व. आम्ही महाविद्यालयात असतांना आमच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित होती ३० ! त्यामुळे या सर्वांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे भावबंध होते यात मैत्रिणीसुद्धा होत्या. सविता बागल हि त्यातील एक. सोबत शिकलो आणि सोबत ४ वर्षे कामही केले. नाटकं, खेळ, गॅदरिंग, सहली, अभ्यास अतिशय समृद्ध करणारा हा मित्रांचा गोतावळा. यासर्वांशी आजही संपर्क आहे. काय योगायोग असतो पहा, आजच्या दिवशीच सकाळी एक दुःखद घटना कानी पडली. आमचा एक मित्र आम्हास सोडून गेला. नरेंद्र कुळकर्णी ! फार लवकर एक्झिट झाली. दिवसभर अस्वस्थ होतो. आठवणी होत्या. एका मित्राने फोन करुन तो अक्षरश: फोनवरती रडला कारण अनपेक्षित व अनाकलनीय जाणे. आमचा महाविद्यालयीन जीवनापासूनचा मित्र नरेंद्र ऊर्फ जया ऊर्फ गुंड्याभाऊ ऊर्फ एनव्हीके सर आज आम्हाला सोडून गेला आणि सर्व कसं कालच घडलं असं आठवलं. खरं तर मी आणि प्रशांत यांनी त्याला भेटीला जायचं ठरवलं होत. लॉक डाऊनमुळे राहून गेलं... भेट होणे नाही हे वास्तव स्वीकारणे तसे जडच... ११ वीपासून आम्ही धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयात शिक्षणामुळे संपर्कात आलो. पुढे कॉलेज, अभ्यास आणि काही काळ सोबत नोकरीच्या निमित्ताने मैत्रीचे नाते वृद्धिंगत होत गेले. याचे आईवडील दोन्हीही शिक्षक होते. आम्ही एकत्रित अभ्यास करत असू तो नरेंद्रकडे ! दररोज संध्याकाळी सर्वजण नरेंद्रकडे एकत्र जमणार गप्पाटप्पा तेथून पुढे काय करायचे ते... मग जेवण करायला म्हणा किंवा अन्य काहीही. आजही आम्ही कधीतरी एकटे तर कधी कुटुंबियांसह फिरायला जातो. नरेंद्रच्या घरी रंगपंचमी साजरी करीत असू.  आमच्या मित्राच्या कुटुंबाशीही अतिशय सर्वांचेच जिव्हाळ्याचे संबंध होते. मुल-मुली रात्री उशिरापर्यंत नाटकांची प्रॅक्टिस करत असू सोबत. अनेकदा व्हीसीआर भाड्याने आणून चित्रपट सोबत पाहिलेत. सुवर्णकाळच तो ! असो 

नोकरीच्या निमित्ताने जळगावात आलो आणि येथेही अनेक मित्र झालेत. त्यांचे नियमित एकत्रीकरण होतात. कधी भिशीचे निमित्त तर कधी अथर्वशीर्ष आवर्तनाचे. नितीन चौधरी हा कार्यालयातील सर्वात जवळचा मित्र. सामाजिक कामात असल्याने अनेक मित्र. धागा एक परस्पर प्रेमाचा. व्यावसायिक जीवनात वेगळी वाट निवडल्यावर मला अनेक मित्र जोडता आले. संस्थेची उभारणी करत असतांना अनेकदा आपल्याला विचारांचे आदानप्रदान करण्याची गरज असते प्रदीप रस्से, चंद्रशेखर संत, शेखर नांदेडकर, बाळासाहेब पाटील कितीतरी नावे सांगता येतील. क्रिएटिव्ह ग्रुप हि संस्थाच वेगवेगळ्या क्षेत्रात  काम करणारे मात्र समविचारी व समवयस्क मित्रांनी एकत्र येऊन सुरु केलेली संस्था. विद्यार्थी परिषदेचे काम करीत असल्याने तेथेही अनेक मित्र मिळाले. माध्यम जगतानेही अनेक मित्र दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातूनही अनेक मैत्र जोडले गेले. विचारांपलीकडची व वयापलीकडच्या मैत्रीचा समृद्ध काळ सध्या अनुभवत आहे. अंतिम टप्प्यात नियमित संपर्कात असलेल्या मित्रांविषयी...

मैत्र जीवांचे... एका कार्यक्रमानंतर...


अनिल जोशी, दिलीप तिवारी, सुशील नवाल, सुनील याज्ञीक या चार मित्रांशी व त्यांच्या परिवाराशी नियमित संपर्क, संवाद असतो. अनेक गोष्टींवर चर्चा होते. प्रत्येकाचे विचार स्पष्ट आणि ते बोलण्यात येणार विरोधी असले तरी मागे भावना योग्य सल्ला आणि मित्राचं भले अन्य काहीही नाही. अनेकदा पलीकडे जाऊन काळजी घेणारी हि मैत्री. अनेक मित्रांचा उल्लेख मी टाळला आहे. कारण इतरांची मला नाराजी ओढून घ्यावयाची नाही. ज्यांचा उल्लेख केला आहे त्यांची जिवलगता सर्व जगाला माहिती आहे. माणसाने जीवनात उभे राहावे यासाठीची एकमेव अपरिहार्यता म्हणजे मित्र ! मैत्रीचा हा वसा आणि वारसा पुढील पिढीत संक्रमित होत आहे याचा विशेष आनंद आहे. त्यासाठीच हि मित्रांप्रतीची कृतज्ञता ... वसुधैव कुटुंबकमची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या विस्तारित कुटुंबाचा मैत्रीचा हा धागा अधिकाधिक विस्तारित जावो... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! गणपती बाप्पा मोरया ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday, 25 August 2020

कृतज्ञता "आपलं"पण रुजविणाऱ्या घराप्रतीची !

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० अंतर्गत साजरा करण्यात येणाऱ्या "कृतज्ञता उत्सवात" आज सर्वांनी आपल्या घराप्रतीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रत्येकानेच आपापल्या घराबद्दल जे लिहिलं आहे ते माझ्या घराबद्दलच लिहिलं आहे असं वाटत राहील. कधी अभिमान वाटलं, कधी भावुक झालो अगदी डोळ्यात पाणी देखील आलं. मी या सर्वांचे मनापासून कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो. आणखी जास्तीत जास्त मंडळींनी लिहीत व्हावं आणि जीवनाचा खरा आनंद घ्यावा हि अपेक्षा ! 

माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात कायम माझ्यासोबत आहे ते म्हणजे माझे घर ! माझ्या सर्व भावना समजून घेत कायम माझ्यासोबत असलेली एकमेव गोष्ट म्हणजे ती "वास्तू"... जीवनातील स्थित्यंतरांमध्ये सोबत देणारी वास्तू... भारतीय संस्कृतीची ओळख आणि त्याची कायम प्रचिती देणारं मंदिर... हक्क, जाणीव व कर्तव्याची जागा ! " हे विश्वची माझे घर " या उक्तीप्रमाणे घर आणि विश्व यातील सर्व भेद सोडून एकत्वाची प्रचिती म्हणजे माझे घर, माझे विश्व. म्हणून मला जन्मापासून आज पर्यंत रोज रात्री मी जेथे विसावलो ती माझी जागा म्हणजे मला माझे घर वाटते. कधी चार भिंतीत तर कधी खुल्या आकाशातही... कधी एखाद्या हॉटेलमधील रुम तर कधी खळंसुद्धा... जेथे जेथे राहिलो तो माझे, आपले घर आणि म्हणूनच लेखाच्या शिर्षकात "आपलं" पण रुजविणार म्हणतोय. नजरेसमोरुन पटापट इतक्या वास्तू जात आहेत आणि खरोखर मी त्या सर्व वास्तूंबद्दल / घरांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. 

 जन्मगावाकडंच घर, नियमित राहतो ते घर, मित्राचं घर, शेजाऱ्यांचे घर हे सर्व मला माझी वाटतात मी त्याचा अनुभव घेतलाय कारण या सर्व घरांशी भावनेने जुळलो आहे. स्वरुप कसंही असलं तरी ते माझं आहे आणि तेथील माणसे, वस्तू आणि तेथील वास्तुपुरुषाच्या वास्तव्याने ते पवित्र झालं आहे. ती एक खोली असू दे, वाडा असू दे, फ्लॅट असू दे, बंगला असू दे, इमला असू दे... त्याला नाव असू दे वा नसू दे, रंग असू दे वा नसू दे, त्यात सुख सुविधा असू दे वा नसू दे... तेथे सुख आहे, आनंद आहे, आशा आहे, विश्वास आहे, सुरक्षा आहे, शांतता आहे, प्रेम आहे, नातं आहे, ऋणानुबंध आहे म्हणून त्याची ओढ आहे. माझ्या आयुष्यातील काही घरांचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. आमच्या धानोऱ्याचे घर, वाडा... पूर्वी या वाड्यातच सर्वांची निवासाची सोय होती म्हणजे माणसं, प्राणी, अन्नधान्य आणि चक्क देवांचीही ! विहीर, गोठा, दत्ताची माडी, बंगला, स्वयंपाक घर, मधलं घर, ओटा, मोरी, धुण्याची माडी... सर्वच मातीच त्यामुळे त्याला शेणाने सारवण आलंच... कायम माणसांचा राबता त्यामुळे जिवंतपणा ! उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीत सर्वात पहिले येथे जाण्याचा आनंद... एकत्र कुटुंबामुळे येथे किमान ८-१० माणसे आणि सुट्ट्यामध्ये, सणावाराला हि संख्या ३५-४० आजही असते. या घराने मला माझी हक्काची माणसं दिली त्यामुळे सर्वच दिल त्याचे आजन्म ऋण आहे. 

 धुळ्याला लहान असतांना राहिलेलो चाळीतली एक खोली. या चाळीतली सर्व खोल्या मालकीची नव्हे पण प्रेमाने माझे घर होते. झोपायला आमच्या खोली बाकी वेळ सर्व इतर खोल्यात माझं गावासारखं विस्तारित कुटुंबाबातील माणसं ! सध्या आम्ही धुळ्याला जेथे राहतो ते घर... वडील आणि काकांनी जीवापाड मेहनत करुन आपल्या आयुष्यातील उमेदीचा काळ याला उभारण्यासाठी दिला. मोराणकरांचे घर... माझा मित्र प्रशांत मोराणकर यांचे घर मला कायम माझे घर वाटते. या घराने मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकारले. आजही धुळ्यात गेलो कि त्यांच्याकडे गेलो आणि बिना जेवणाचे आलो असे कधी झाले नाही आपल्या घरात जे मिळतं ते सर्व या घराने मला दिले. व्यवसायाच्या निमित्ताने जळगावात आलो आणि सुरवातीचे सात वर्षे नांदेडकरांच्या वाड्यात राहिलो. नुकतंच लग्न झालेले आणि दोन खोल्या चिमणा - चिमणीने सुरु केलेला संसार आणि त्याला जोडलेली प्रत्येक कृती. येथील प्रत्येक कुटुंब विशेषतः घरमालक आणि त्यांचा परिवार सर्वच प्रकारची काळजी घ्यायचे कारण ती आपली माणसं आणि त्यामुळे ते घर आपलेच. 

 सध्या माझ्या कुटुंबासह राहतो ते घर... स्वकमाईतून घेतलेलं... सद्गुरुंच्या आशिर्वादाने आणि वास्तव्याने पुनीत झालेलं... सामूहिक श्री गणेश अथर्वशीर्षाच्या आवर्तनांच्या स्पंदनांनी भारलेलं... अनेकांनी मन आणि पोट यांना तृप्तीचे ढेकर दिलेलं... सर्वार्थाने चढती कमान दिलेलं... गृहलक्ष्मीच्या अस्तित्वाची कायम जाणीव करुन देणारं... जीवनातील या सर्व घरांबद्दल मी कृतज्ञ आहे त्याने मला माझं सर्वस्व दिले जाता जाता आणखी एका घराचं उल्लेख केला पाहिजे ते आमचे मोठं घर अर्थात मोठ्या काकांचे घर ! जळगावातील या घराचेही मी आभार मानेल कारण तेथे बनलेलं काहीही विशेष कायम माझ्यासाठी येतं आजही माझे काका-काकू या जगात नसतांनाही...माझे पालक डॉ. किशन काबरा यांनी म्हटलंय "स्वर्ग हवाय कुणाला ?" कारण तो येथेच अनुभवतोय... तीच माझी मनस्थिती या सर्व घरांबाबत आहे आणि म्हणूनच हि कृतज्ञता ! माणसातील माणूसपण, नाते, ऋणानुबंध याद्वारे कुटुंब व परिवार व्यवस्थेचा अबाधितपणा टिकविणारा "घर" नावाची व्यवस्था ! भारतीय संस्कृतीला जगात मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या "घर" नावाच्या संकल्पनेचा वसा आणि वारसा पुढे नेऊ या ! त्यासाठीच घराप्रतीची कृतज्ञता... प्रत्येकाच्या मनातील घराबद्दलची हि कृतज्ञता विश्वबंधुत्वाची कल्पना टिकवून ठेवो ज्यामुळे हि संस्कृती व राष्ट्र परमवैभवाला जावो... हिच बा गणराया चरणी मनापासून प्रार्थना ! 

 गिरीश कुळकर्णी 
 ९८२३३३४०८४

Monday, 24 August 2020

कृतज्ञता आयुष्यातील सुवर्णकाळ देणाऱ्या शाळेप्रतीची !


बालवाडी ते १० वी पर्यंतचे पारंपरिक शिक्षण देणारी शाळा ! खरं तर अतिशय व्यापक अर्थ असलेला शब्द म्हणजे शाळा. आयुष्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व देणारी शाळा. ती केवळ चार भिंतीत कशी ? ती सर्वत्रच.. सुरुवात घरापासून, मग शाळा, महाविद्यालय, समाज, कार्यालय, निसर्ग, संस्था / संघटना. आयुष्याला समृद्ध करणाऱ्या विविधांगी शाळा. येथे कायम सोबत असते ती दप्तराची... लहानपणापासून धरलेले हे दप्तर आयुष्याच्या संध्याकाळी हिशेब मांडतांनाही कामात येत अर्थात त्याचे स्वरुप बदललेले...मात्र निकाल सांगणारेच. त्यासाठीच शाळेप्रतीची कृतज्ञता व्यक्त करतांना श्री. प्रदीप रस्से यांनी त्याचे प्रतिक म्हणून अतिशय समर्पक असे दप्तराचे चित्र काढून दिले आहे. असो. आयुष्याचा भविष्यकाळ समर्थ व सफल करण्यासाठी अत्यावश्यक असलेले सर्व काही देते ती शाळा. म्हणूनच लेखाचे शिर्षकात त्याला सुवर्णकाळ म्हटलं आहे. त्या सुवर्णकाळासाठीच आपण सर्व आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अगदी प्रत्येकजण ! 

आशा फौंडेशन सार्वजनिक गणेशोत्सव २०२० अंतर्गत "कृतज्ञता उत्सव" आपल्या सर्वांच्या सहभागाने साजरा करतोय. त्या बाप्पाला जे जे काही त्याने भरभरुन दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय. मी सर्वांच्या भावनांना एकत्रितपणे सूत्रबद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. आज मात्र मी माझ्या शाळेच्या माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक माणूस हा एका "वल्ली" आहेच पण हे अधोरेखित करण्याचे काम करते ती शाळा ! सर्वांनी मांडलेला सुवर्णकाळ खराच आहे मात्र काही तरी सुटलंय किंवा सोडलंय. लेख थोडा मोठा झाला तरी काही सुटू नये असे पाहू. 

३४ वर्षानंतर महाव्याख्यान कार्यक्रमाचे उदघाटनप्रसंगी श्रीमती हिरा खंदलकर 

माझी प्राथमिक शाळा धुळ्याची लायन्स नूतन विद्या मंदिर (समाधीची शाळा) १ ली ते ४ थी बाई एकच श्रीमती विजया कुळकर्णी आमच्या विजूबाई ! आणि दुसरी महत्वाच्या बाई म्हणजे मोठ्या बाई अर्थात श्रीमती हिरा खंदलकर. विजूबाई साध्या आणि मोठ्या बाई केवळ खतरनाक म्हणजे हातात कायम पट्टी आणि कडक शिस्त. पहिले अर्धे वर्ष तसे बऱ्यापैकी खिडकीत बसून आईची वाट पाहण्यात आणि रडण्यात गेले. पण येथील सर्व जादुई शिक्षकांनी शाळा आणि अभ्यास यांचे गोडी लावायचे काम केले. या शाळेच्या स्नेहसंमेलनात म्हटलेले गाणे आजही आठवते. "शाळेतही मी जाणार, पाटी घेऊनी, घेऊनी पुस्तक, अभ्यास मी करणार " खूप मस्ती केली, मार खाल्ला. मनाचे श्लोक ४० पर्यंत पाठ, पाढे तीस पर्यंत पाठ... आजही झोपेतून उठविले तर सांगेन ! हिच तर खरी गंमत आहे शाळेची. अभ्यास महत्त्वाचाच मात्र इतरही गोष्टी तेव्हढ्याच प्राधान्यक्रमाच्या. जीवनाचे खरे टप्पे टोणपे तेथे मिळाले. तसा घरच्यांना खूप त्रास दिला शाळेत जातांना... पालक शिक्षक युतीचा नेहमीप्रमाणे विजय झाला आणि आम्ही एकदाचे शाळकरी झालो. 

माध्यमिक शाळा त्याहून भारी धुळे एज्युकेशन सोसायटीची न्यू सिटी हायस्कुल ! ५ वीत प्रवेश झाला. वर्गशिक्षक श्री. बी. एन. जोशी सर, विषय इंग्रजी. शाळेची वेळ दररोज दुपारची मात्र शनिवारी सकाळची. त्या दिवशी आमचे सर धोतर आणि पांढरा सदरा आणि कापली मस्त गंध. शाळा केवळ मुलांची त्यामुळे दंगामस्तीला कोणतेही बंधन नाही. (असं विधान धारिष्ट्याने करतोय कारण शाळा शिस्तीचीच होती पण आम्ही ? ) जगण्याला लायक बनविणे, माणूस म्हणून घडविणे म्हणूनच तर म्हणतात ना ! शाळा सुरु व्हायची ती "जयोस्तुते जयोस्तुते..." या गीताने अर्थात त्यापूर्वी अन्यही गाणे लागायची. त्यात ऋणानुबंधाच्या आवर्जून आठवते. राष्ट्रगीत झाले कि दिनक्रम सुरु... साधारण ७ वी नंतर हे जरी सुरुच असले तरी आमची कबड्डी जोरात चालायची. पांढर शर्ट आणि खाकी अर्धी चड्डी हा गणवेश. सकाळी आईने मोठ्या कष्टाने धुतलेला पांढरा शर्ट संध्याकाळी पार वाट लागलेली. बटण तुटलेले, कुठेतरी फाटलेले, हातापायाला कायम मलमपट्टी सौभाग्याचं लेणंच ते ! ९ वी पर्यंत पीटीच्या तासाला शिवाजी व्यायामशाळेच्या मैदानावर सर्वांच्या पुढे... मात्र दहावीत काही तरी कारण सांगून वर्गातच. शनिवारी संपूर्ण शाळेची मास ड्रिल अर्थात एकत्रित पिटी ! हात करतांना काय धाक असायचा शिक्षकांचा... एव्हढ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सरांचे लक्ष कुळकर्णी हात सरळ हात सरळ. 

आदरणीय मु. कृ. पाध्ये सर 
आमच्या शाळेचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे मुख्याध्यापक मुकुंद कृष्णाजी पाध्ये ! (नुकतेच त्यांचे निधन झाले) शनिवारी सकाळची शाळा उशिरा येणाऱ्या मुलांना चढ्या क्रमाने शिक्षक... पहिल्यांदा २५ , ५० उठबशा, त्यानंतर आलेल्यांना हातावर वेताच्या छडीचे फटके ३, ५, १० त्यानंतर आल्यावर दोन्ही आणि वरुन कोंबडा करुन उभे राहा ! तास सुरु असतांना मुख्याध्यापकांचा राउंड असायचा खिडकीतून लक्ष आणि पुन्हा लक्ष नाही किंवा काही रिकामे काम करतांना दिसला कि आहेच... १०० मीटर रनिंग, लांब उडी, उंच उडी, खो खो, क्रिकेट... याच्या जोडीला नाटके, गीत गायन, वेगवेगळ्या स्पर्धा ! अभ्यास तो पण होताच कि.... या सगळ्या गोष्टींची तयारी भूतो न भविष्यती ! तुम्हाला कितीही चांगले झाले वाटले तरी गुरुजींचे समाधान कुठे ? परत सुरु... मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा... जीवनात जिद्द, मेहनत, सातत्य, वचनबद्धता, समर्पण, संयम, सातत्य हे सर्व आले येथून अर्थात तेव्हा हे शब्द गावी पण नव्हते. म्हणून तर हा सुवर्णकाळ ! एव्हढे सर्व असल्यावर कोणाला हवी सुट्टी ? जीवावर यायचे सुट्टी असली कि... हेच शाळेचं यश आणि उद्देशही आणि म्हणूनच हि दीर्घ कृतज्ञता ! 

या जोडीला अजून इतर परीक्षा असायच्या त्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी आणि गणिताच्या ४ परीक्षा दरवर्षी एक एक करीत ९ वी पर्यंत बहुतांश मुले द्यायचीच... तरखडकर इंग्रजी ग्रामर तेथे कळालं. ज्यांना चित्रकलेची आवड त्यांच्यासाठी एलिमेंटरी, इंटरमिजीएट. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गीता पठण, कणकवलीची राज्य बाल्य नाट्य स्पर्धा, मनाचे श्लोक, जोडीला लक्ष लक्ष सूर्य नमस्कारासारखे उपक्रम, एनसीसी कॅम्प... स्पोर्ट मीट / वीक वगैरे भाग नव्हता कारण तो रोजचा भाग होता. सर्वच मुले हुशार आणि प्रत्येकामुळे शाळेला एक वेगळी ओळख. अर्थात हुशार म्हणजे ज्याच्या त्याच्या विषयात म्हणजे अभ्यास, खेळ, वक्तृत्व, वादविवाद, नाटक, गाणे... काही ना काही तर प्रत्येकात आहेच नं ! तेच शोधून त्यावर काम करणे हेच शाळेचे ध्येय. 

शाळेचा शिक्षकवृंद !
मधल्या सुट्टीतही कबड्डी, क्रिकेटच्या मॅचेस चालू असतील स्कोर पाहायला बाहेर जाणार खास स्कोर लिहिले जायचे परतीला वेळ झाला कि आहेच पुन्हा... बाहेर गाडीवर मिळणाऱ्या गोळ्या, अमुन्या, वाळलेली बोर असो. शाळे शेजारीच स्वस्तिक चित्र मंदिर (थिएटर) काही वेळेस टॉकीजमधील पिक्चरचे डायलॉग गाणे स्पष्ट ऐकू यायचे. मस्ती केली तरी पाय वाकडे पडणार नाही याची काळजी... विचारांची पक्की बैठक अर्थात त्यामागे होती शाळेतील शिक्षकांची मेहनत. शाळा म्हणजे खरे तर शिक्षक ६ वीला श्री. एस. एस. मुसळे सर, ७ वीला श्री. ह. म. भंडारी, ८ वी श्री. आर. एस. जहागीरदार, ९ वीला एन. एन. शाह आणि दहावीला श्री. शा. रा. नाईक प्रत्येकाचे एक वेगळेपण , वैशिष्ट्य... असेच गणिताचे श्री. व्ही. वाय. दाबके, इतिहासाचे श्री. मदनलाल मिश्रा, संगीत कलाचे श्री. रत्नाकर रानडे आणि एनसीसीचे श्री. आर. एस. पाटील. सर्व नररत्नांची खाणच... नाही याच्यापुढे लिहिता येणार. माणूस घडणं, माणूस उभा राहणं इतकी सोपी गोष्ट नाही मात्र ते करु शकते ती समाजजीवनातील शाळा नावाची व्यवस्था ! अशा शाळा आणि अशी व्यवस्था भारतीय संस्कृतीची धरोहर आहे. त्यातूनच निर्माण होणारा वसा आणि वारसाही ! त्यासाठीच शाळेप्रतीची कृतज्ञता... विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची हि कृतज्ञता अशीच कायम संक्रमित होत राहो ज्यामुळे संस्कृती व राष्ट्र चिरकाल टिकेल... हिच बा गणराया चरणी मनापासून प्रार्थना  ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Sunday, 23 August 2020

कृतज्ञता शिक्षकांप्रतीची...!


माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो मग शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण ठरतेच आणि ती देखील आयुष्यभरासाठी... म्हणूनच आपण त्यांच्याप्रती कायम कृतज्ञ असणे हेच खऱ्या अर्थाने माणूसपणाचे लक्षण आहे. पहिले गुरु माता-पिता, तदनंतर शालेय शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षण, व्यावसायिक शिक्षण देणारे वरिष्ठ सहकारी, आध्यात्मिक जीवनाची दिशा दर्शन करणारे अशा एका व्यक्ती सोबतच आपला जीवनप्रवास सुरु असतो. हा प्रवास जेव्हढा समृद्ध तेव्हढा माणूस अधिक प्रगल्भ ! हि प्रगल्भताच माणसाला एक संवेदनशील व जागरुक नागरिक बनवितो. माणसाची हि जडणघडण करणाऱ्या शिक्षकांप्रती आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० च्या कृतज्ञता उत्सवात आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. 

विषय शिक्षणाबरोबरच जीवन विषयक दृष्टिकोन देणारे, व्यावहारिक जगाची ओळख करुन देणारे, आपल्यातील कला कौशल्याला विकसित करीत सर्वांगीण विकास साधणाऱ्या शिक्षकांनी आयुष्यभराची जी शिदोरी दिली आहे त्याबद्दल हि कृतज्ञता ! केवळ व्यक्तीच नव्हे तर अनुभव हाही शिक्षकच. व्यावहारिक शिक्षणाबरोबरच समाज जीवन समृद्ध करणारे समाजशिक्षकही या कृतज्ञतेचे हक्कदार ठरतात. अर्थात हि कोणत्याही शिक्षकाची मागणी नव्हे तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या हृदयात आपल्या कृतीने निर्माण केलेली ती जागा आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे मिळविलेला तो सन्मान आहे. 

मुळात शाळा या विषयाची भीती घालविणारे प्राथमिक शाळेतील शिक्षक, विषयांची व खेळाची गोडी लावणारे शिक्षक, आपल्यातील उपजत गुणांना ओळखून त्याद्वारे व्यावसायिक जगतात आपली जागा निर्माण करणारे महाविद्यालयीन शिक्षक या सर्वांचेच जीवनात एक वेगळे स्थान आहे. चांगले वळण लावण्यासोबतच प्रेरणा, जिद्द, नवीन काहीतरी करण्याचे बळ, कर्तव्याची जाणीव, दातृत्व व नैतिकता देणारे हे सारे शिक्षक. कधिक कौतुक करुन तर कधी रागावून सारासार विवेकाने जीवन जगण्याची गुरुकिल्ली देणारे शिक्षक. आपुलकी व आत्मीयतेने शिस्त, क्षमा व करुणा उत्पन्न करणारे शिक्षक. कर्तव्य पलीकडे व चाकोरीबाहेर जाऊन एक माणूस घडविण्यासाठी, राष्ट्रप्रेमी नागरिक घडविण्यासाठी  चाललेली हि धडपड अविरत, अविश्रांत आणि निश्चयाने ! 

कुणाला मातीच्या गोळ्याला दिलेला आकार तर कोणाला सुरवंटाचे फुलपाखरातील परिवर्तन वाटते. एका बाजूला नव्या जगाची ओळख करुन देणारे तर दुसऱ्या बाजूला त्याला सामोरे जाण्यासाठीची सिद्धता करणारे हे शिक्षक. वयाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर तटस्थपणाने सिंहावलोकन केले तर त्यांच्यातील या सर्वांमध्ये एक सामान धागा दिसतो तो म्हणजे आपला विद्यार्थी घडविण्यासाठी त्याच्यातील गुणग्राहकता शोधण्याचे सर्वात अवघड काम... विद्यार्थ्याने आपल्या यशाचे दिलेले संपूर्ण श्रेय हिच त्याची कर्तव्य परायणता ! शिक्षकाला विद्यार्थ्यांची आई तर आईला बाळाची शिक्षिका होता आले पाहिजे असे म्हणत असतांनाच शिक्षकाला विद्यार्थ्यांतील शिक्षक जागा करता आला पाहिले तर वसा आणि वारसाची हि संस्कृती चिरकाल टिकून राहील आणि त्याप्रतीची कृतज्ञताही ! शिक्षक हेच राष्ट्रजीवनाचे बलस्थान असून विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता अशीच संक्रमित होत राहो हिच त्या बा गणराया चरणी विनम्र प्रार्थना  ! गणपती बाप्पा मोरया ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 


Saturday, 22 August 2020

कृतज्ञता पालकांप्रतीची...!

कृतज्ञता पालकांप्रतीची...! 


बा गणराया ! आजच्या पहिल्या दिवशी आम्ही तुझे आभार मानत आहोत तू आम्हास हे सुंदर जग दाखविणारे, आम्हास घडविणारे, आमचे पालनपोषण करणारे. आम्हाला माणूस बनविणारे पालक दिलेत. ते आज आमच्यात आहेत किंवा नाहीत... पण ते आमच्या हृदयात आहेत. आम्ही त्यांच्यारुपाने आहोत. आमच्यात त्यांना शोधतो आहोत. त्यांचा आनंद आणि समाधान हिच आमची श्रीमंती अन त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यताही ! आम्ही कृतज्ञ आहोत त्या सर्व पालकांचे कारण आम्हीच त्यांचे आधुनिक काळातील रुपे आहोत...

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० च्या कृतज्ञता उत्सवाच्या निमित्ताने आज पालकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करतांना आनंद होत आहे. जन्मदात्या आई-वडिलांसह आपल्याला घडविणाऱ्या इतरही पालकांसाठी हि कृतज्ञता आहे. आजच्या या पहिल्या भागात ऐंशीच्या घरात असलेल्या श्रीमती शशिकला खाडिलकर यांचेसह सौ. वैदेही नाखरे, ऍड. प्रदीप कुळकर्णी, श्री. अतुल तांदळीकर, श्री. दिलीप तिवारी, रेवती ठिपसे,, सुजाता बोरकर, संध्या किशोर व प्रा. बी. एन. चौधरी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्री. प्रदीप रस्से यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी यासाठी दररोज सुंदर असे समर्पक चित्र काढून द्यायचे मान्य केले आहे. आपल्या सर्वांच्याच भावना या मंडळींनी व्यक्त केल्या आहेत. आशा फौंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल या सर्वांचा शतश:ऋणी  आहे. 

पालक शिक्षित असो वा अशिक्षित आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे हिच त्यांची इच्छा आणि त्यासाठीच त्यांची धडपड व कष्ट ! जन्मदात्या पित्याला जन्मदात्या मातेचीही तेव्हढीच सक्षम साथ... संस्कार देण्याचे काम आईचे तर मूल्ये रुजविण्याचे काम पित्याचे ! सर्वतोपरी सहकार्य करणे हे काम नैतिक जबाबदारी स्वीकारलेल्या पालकांचे... पाढे, श्लोक, स्तोत्र पाठांतरापासून, अभ्यास, गोष्टी सांगणे, चांगल्या गोष्टींची सवय लावण्यापर्यंत पालकत्वाचे बाह्य रुप. मात्र घरादारापासून व्यवसायापर्यंतच्या त्यांच्या कृतीतून आदर्शांचा वस्तुपाठ मुलांना होणे हा त्यांच्या अंतरिक स्वभावाचा बाह्य परिणाम ! चांगल्या - वाईटाची प्रचिती येतांना ठामपणे योग्य निर्णय घेण्याची ताकद पालकांच्या शिकवणीतूनच  मिळते. उच्च ध्येय, त्याला कर्तव्य कठोरपणाची जोड, परिस्थितीशी दोन हात करण्याची सिद्धता यांचे बाळकडू घरातूनच आणि पालकांकडूनच मिळते. कष्ट, प्रामाणिकपणा, स्वाभिमान हि पित्याची देन तर सोशिकता, काटकसर, समाधानी व आनंदी वृत्ती हि आईची... सहजीवन, परस्परपूरकता, प्रथम जे काही ते मुलांसाठी व नंतर स्वतःसाठी हि दोघांची ! 

संवेदनशीलता, माणुसकी, परोपकारी वृत्ती, भावना आणि व्यवहार यातील समतोल, सामाजिक जाण व कर्तव्याची नीव रचणारे पालक आपल्या पाल्याच्या कृतीतून एक वेगळा अविष्कार ज्यावेळेस अनुभवतात त्यावेळेस त्यांना "पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा !" या युक्तीची सार्थकता वाटते. शिक्षित, समंजस व प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या आपल्या पाल्यांकडे पाहिल्यावर त्यांना होणारे आत्मिक समाधान लाख मोलाचे ठरते. पिढीमधील अंतर कितीही मोठे असले तरी वैचारिक समानता पालक-पाल्य नात्याला मैत्रीचे कोंदण देते. भारतीय संस्कृतीत वसा आणि वारसा यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. पालकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करतांना त्यांनी दिलेला वसा आणि वारसा आपले जीवन समृद्ध करणारा ठरतो. पालक हे कुटुंबव्यवस्थेची बलस्थाने असून वसुधैव कुटुंबकम समाजात हि भूमिका निभावणारे अनेक आहेत. आधुनिक पालकांनी आपल्या पालकांप्रतीची व्यक्त केलेली कृतज्ञता पुढे संक्रमित होत राहो हिच बा गणराया चरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

9823334084 

Tuesday, 18 August 2020

पोळा : मना मनातला...!


कर्माने नसलो तरी जन्माने शेतकरी आहे... हाडाचा असलो तरी सध्या बांधावरचा शेतकरी आहे... त्यामुळे शेती, शेतकरी, सालदार, शेतमजूर, गाई-म्हशी, गुरे-ढोरे, बैलजोडी, बैलगाडी, नांगर, वखर, पास, पांभर, दुस्सर, मुक्षे , रुम्हणे, उडीद, मूग, कपाशी, ज्वारी, मका, केळी, गहू, पयखाटी, तुरखाटी, टोचणी, निंदणी, सरा, कापणी, काढणी, मळणी, सरकी, ढेप, दान या सर्व गोष्टी विशेष आवडीच्या ! लहानपणी दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे राहिलेलो असल्याने आणि सर्व कामे मनापासून व आनंदाने केल्याने या सर्वांबद्दल विशेष प्रेम वाटते. निसर्ग आणि परमेश्वराचे नाते तेथेच उमगले. गाव, गावातील माणसे, त्यांचे ऋणानुबंध, चालीरीती, अहिराणीतील खास संवाद, नातेसंबंध, माणुसकी यामुळं गावाचे आजही आकर्षण वाटते. गोठा, जनावरे, चारा, शेण, सडा सारवण या गोष्टींची कधी किळस वाटली नाही. व्यायलेल्या म्हशीला पाणी पाजायला नेणे, तिला धुणे, चारा घालणे या गोष्टी आपलेपणाने करीत असे. चोपडा तालुक्यातील धानोरा हे आमचे गाव ! आज पुन्हा एकदा हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आजचा खास दिवस बैलपोळ्याचा ! यावर्षी गावाकडे जाता आले नाही याची खंत आहे मात्र मनातला पोळा आजही जिवंत आहे.   


दिनेश चव्हाण यांनी जलरंगात साकारलेली दोनही चित्रे
गेल्या पाच महिन्याचा कालखंड आठवला कि वरील सर्व गोष्टींबद्दल आपण किती कृतज्ञ असावे हे लक्षात येते. तंत्रज्ञानाने कितीही विकास केला तरी माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्नधान्य पिकविणारा तो शेतकरी आणि त्याचे सर्व सोबती यांचे महत्व अधोरेखित होते. कृषिप्रधान असलेल्या भारत देशात सर्वात जास्त वाताहत झालेला, दुर्लक्षित असलेला व उपेक्षित घटक म्हणजे शेती, शेतकरी, शेतीमाल  आणि जनावरे ! माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी जागतिक महासत्ता होण्यासाठी शेती या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन करुनही आज त्याची अवस्था फारशी चांगली नाही. तरीही परिस्थितीशी दोन हात करीत त्याचे लढणे अव्याहतपणे सुरु आहे. त्याच्या करिता ना वेतन आयोग ना त्याच्या मालाला हमी भाव ! कॉर्पोरेट जगतात प्रोजेक्ट कॉस्ट ठरविताना त्यावर खर्च केलेला मिनिटांचा हिशेब मांडणारा माणूस मात्र प्रामाणिकपणे अंगमेहनतीचे, कष्टाची परिसीमा गाठणाऱ्या शेतकऱ्याच्या कामाचे दाम देत नाही हे वास्तव नाकारता येत नाही. त्यांची ना युनियन, ना असोसिएशन... जमले तर त्याला नाडणारे आणि नागवणारेच अधिक ! कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, कधी लाल्या तर कधी करपा, कधी लोड शेडींग तर कधी मालाला मातीमोल भाव... तरी तो लढतोय, जगतोय आणि जगवतोयही... स्वतःला, कुटुंबाला, त्याच्या जनावरांना आणि समस्त प्राणिमात्राला ! त्याच्यासोबत त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच राबणारा त्याचा सखा म्हणजे सर्जा - राजाची जोडी... त्यांच्या सणाच्या निमित्ताने हा लेख...

आज सकाळपासूनच समाज माध्यमांमध्ये याबद्दलच्या अतिशय संवेदनशील अनेक पोस्ट वाचण्यात आल्या. त्यांचा सारांश थोडक्यात वरच्या परिच्छेदात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी ते मांडणारे व लिहिणारे मूळ या काळ्या आईची लेकरचं ! जरी गावाकडे जाता आले नाही तरी त्यांच्या सर्वांच्या सोबतीने हा मना मनातला पोळा अनुभवला... त्याचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा हाच यामागील खरा उद्देश...खान्देशातील पोळा म्हटला कि कवयित्री बहिणाबाई चौधरींची कविता आलीच पाहिजे... 

पोया (पोळा)

आला आला शेतकर्‍या, पोयाचा रे सन मोठा

हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा

आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार

करा आंघोयी बैलाच्या, लावा शिंगाले शेंदुर

लावा शेंदूर शिंगाले, शेंव्या घुंगराच्या लावा

गयामधीं बांधा जीला, घंट्या घुंगरू मिरवा

बांधा कवड्याचा गेठा, आंगावर्‍हे झूल छान

माथां रेसमाचे गोंडे, चारी पायांत पैंजन

उठा उठा बह्यनाई,, चुल्हे पेटवा पेटवा

आज बैलाले नीवद, पुरनाच्या पोया ठेवा

वढे नागर वखर, नहीं कष्टाले गनती

पीक शेतकर्‍या हातीं, याच्या जीवावर शेतीं

उभे कामाचे ढिगारे, बैल कामदार बंदा

याले कहीनाथे झूल, दानचार्‍याचाज मिंधा

चुल्हा पेटवा पेटवा, उठा उठा आयाबाया

आज बैलाले खुराक, रांधा पुरनाच्या पोया

खाऊं द्या रे पोटभरी, होऊं द्यारे मगदूल

बशीसनी यायभरी, आज करूं या बागूल

आतां ऐक मनांतलं, माझं येळीचं सांगन

आज पोयाच्या सनाले, माझं येवढं मांगन

कसे बैल कुदाळता, आदाबादीची आवड

वझं शिंगाले बांधतां, बाशिंगाचं डोईजड

नका हेंडालूं बैलाले, माझं ऐका रे जरासं

व्हते आपली हाऊस, आन बैलाले तरास

आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं

बैला, खरा तुझा सन, शेतकर्‍या तुझं रीन !

कवयित्री बहिणाबाई चौधरी

बळीराजाच्या या साथीदाराच्या सणाची तयारी कशी करावी हे सांगतांना, हौशी उत्साही मंडळींना आपल्या हौसेसाठी बैलांना त्रास देऊ नका असंही अक्षिशित कवयित्री बहिणाबाई सांगतात... दिवसाची सुरुवात श्री. मनोहर पाटील यांच्या शब्द प्रवासाने झाला. कष्टाशिवाय मातीला आणि बैला शिवाय शेतीला पर्याय नाही... प्रा. डॉ. किसन पाटील यांनी त्यांची २०१७ मध्ये लिहिलेली व आकर्षक पद्धतीने सजविलेली कविता पाठविली. सौ. विशाखा देशमुख यांनी मातृदिनासोबतच बैलपोळ्याच्या आठवणी सांगितल्या. मो. का. भामरे यांनी बळीचे राज्य कुठे आहे ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला आहे. चाळीसगाव येथील कवी मनोहर आंधळे आपल्या कवितेत ढवळ्या-पवळ्याच्या जोडीला जिवलग सखे म्हणतात...


जिवलग सखे||

अन्न-धान्याच्या या राशी

ढवळ्या-पवळ्या वाहती

उन्हा पावसात नित्य

शेती मातीत राबती

                                 शिंग बाकदार उंच

                                 रंग पांढरा दुधाळ

                                 हंबरता कानी येई

                                 नाद मधाळ,मधाळ

घरादाराला सदैव

त्यांच्या घुंगरांचा लळा

माझ्या उंबऱ्याला कधी

नाही आली अवकळा

                                 करती वैरण चर्वण

                                 औत पांभर ओढती...

                                 माझ्या शेता-मळ्यामध्ये

                                 कित्ती केल्या मशागती!

शेता शिवाराला माझ्या

त्यांचा सार्थ अभिमान

हाक देता साथ देती

जगा शिकवी इमान

                                  त्यांच्या श्रमानं घामानं

                                  मी होतो  कृतकृत्त्य....

                                  ढवळ्या-पवळ्यामुळे

                                  सुखी-समाधानी चित्त..!

येवो यंत्र तंत्र युग

सारे वाटे मला फिके

ढवळ्या-पवळ्याच माझे

खरे जिवलग सखे!

                                  सण वर्षातून एक....   

                                  लोकं म्हणती बैलपोळा

                                  शेतकरी मैतराचा...

                                  हाच सन्मान सोहळा!

              मनोहर ना.आंधळे,  चाळीसगाव-९४२१५१२५७०.


बैल पोळा

बैलजोडी एक मनातील स्वप्न असते

मनात बसते तीच शेतकरी विकत घेतो

घरी आणली की लक्ष्मी पुजा करते

घरात आई बाबा सर्व जण तीच चर्चा

दुसऱ्या दिवशी चांगली केवढी महाग

कामात पाहिजे अशी चर्चा सुरू होते

शेतकामात मालक जुंपतो कामे करतो

बैलांचे चारापाणी ढेप,दाळ खाऊ घालतो

मुलांना सारखं सर्जा राजावर लक्ष ठेवतो

मुलीकडे गावाला जावून मुक्काम नाही

बैलजोडीला चारापाणी नाही केले तर 

मुलां मुलींना बोलतो,कधी मारतो पण...

बैलजोडीचा पोळा सण हौसीने करतो

तो आपला अन्न दाता म्हणजे शेतकरी असतो..

@. गोविंद पाटील सर, पाथरी जळगाव.


नंदी पुजावा पोळ्याला....... 

लागे सोन्याचं कणीस 

काळ्या मातीच्या गोळ्याला  ! 

खरा रानाचा मैतर , 

नंदी पूजावा पोळ्याला ....!! 

त्याच्या घामानेच येते

दाण्या, दाण्याला चकाकी  ! 

त्याच्या पुरणपोळीची, 

आज चूकवारे बाकी ...!! 

नांगरतो,,वखरतो,,

देतो वावर पेरून   ! 

नाही फिटणार कधी ,

त्याच्या राबण्याचं रूण  !! 

बैला शिवाय शेताचं 

रूप म्हसनासमान, ! 

सजवून मिरवावा

बैल पोळ्याला डौलानं  !! 

नंदी राजाला सजवा 

हिंगोळीने शिंग चोळा, ! 

अरे वर्षाकाठी येतो

एकदाच बैलपोळा    !! 

करा करा त्याची सेवा

त्याला चढवा रे साज  ! 

गोडधोड खाऊ घाला 

पण जूंपु  नका आज   !! 

-- गो.शि.म्हसकर, नगरदेवळा जिल्हा जळगाव


ढवळ्या-पवळ्या

हिरवी श्यामल 

माय धरित्री 

उचंबळोनी आली..

मातीमधले 

तृप्त शहारे 

मिरवत आहे गाली..

कलून गेली 

मावळतीला 

एकल तेजल ज्योती..

क्षितिजावरती 

साय पसरली 

सावल्यांतुनी वरती..

सांजकोवळ्या 

मधु किरणांचा 

सडा शिंपला भवती..

आणिक आहे 

ओसरलेली 

पाण्यामधली भरती..

ढवळ्या पवळ्या 

चला घराला 

उद्या नांगरू शेती..

सांज वितळली 

पाण्यामध्ये 

लहरी झोका देती

अशोक बागवे 


गेल्या परक्या गावाला...

कोण आपलं परकं

नाती उरली नावाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला

दुःख उतू आल्यावर

कसं झेलावं मनाला

सावलीनं द्यावा आता

थोडा विसावा उन्हाला

जत्रा स्वप्नांची भरे

गर्दी उसनी शिवाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला...

गोठा सोडून निघाल्या

गाई चुकल्या रानात

खोटया मातीच्या बैलाला

माय पूजते सणात

माझं माझं म्हणताना

द्यावा रक्ताचा हवाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला...

कळा सोसल्या मातीनं

झळा उन्हाच्या सोसून

किती गिरवावे तरी

पाढे जातात पुसून

कवितेच्या ओळीतला

थोडा गारवा जीवाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला...

-विष्णू थोरे,चांदवड.


माटीचे बैल

 मीनं पुसलं बोयले

   पोया तं बैलांचा सन

 मंग माटीच्या बैलांले

   काब्र पुजतो आपन ?ll

  धुरकरीबी माटीचा

    नही रंग दोन्हींलेबी 

  बैलांपह्यले निवद

     मान मिये दोन्हींलेबी ll

  बोय सांगे मंग माले

     बैलाकन व्हये शेती

  शेतमजूर रंघत

     गाये ,पीक येये हाती ll

  शेतमजूर नं बैल

     दोन्ही माटीत राबता

  आटीयीसन रंघत

      माटीमधी माटी व्हता ll

   सालदार नं मजूर

      घाम शेतात गायती

   त्याच घामाच्या थेंबांनं

      वलावते शेतमाटी ll

   माटीमधी माटी व्हयी

      माटीमधी जो मियला

   त्याच माटीतून बैल

      आनं धुरकरी बनवला ll

   अंग त्यांचे त्या माटीचे

       रंग माटीचाच त्यांचा

    मिये माटीत म्हनून

        मान माटीच्या बैलांचा ll

    बैलांसंग बैल झाले

        बैलासंग माटी झाले

    माटीच्या मजुरालेबी

        मान पोयाच्या सनाले ll

     पुरनपोयी बैलांले

         ढोरक्यांलेबी जेवन

     झूल बैलांले ,मजूर

         नया सद्र्यात मिरनं ll

 प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे,जळगाव,  ९७३०२२११५५


पोया

सन वर्साचा आला आला रे आज पोया

पोरंसोरं पहा सर्वी झाली रे आज गोया

धव्व्यापव्वया जोडीले तू खावाडं रे पुरनपोया

जोडी राबते रे तुही सालभर वावरात

हिरवं सोनं पिकोयते तुह्यासंग शिवारात

एक दिस पोयाले रे त्याची दृष्ट काढ तू दारात

न्हाऊमाखू त्याह्यले घालं टाक पाठीवर झुलां

शिंग रंगवून गयातं बांध घुंगरायच्या माला

काढ ढोल वाजवत मिरनूक घालूनिया पुष्पमाला

सखा सोबती जीवाचा तुह्या जल्माचा मैतर

फोड नारय पायाशी अन् वाट तू साखर

वर मांगा आबादानीचा मंग सारं घरदारं

झाला शांत नंदी आता गो-हा होता जो अवखड

नको जुपू आज गाडी नको घालू रे जोखड

एक दिस हा मानाचा त्याले फिरवं निखड

खिर,वडा,पुरनपोयीच त्याले वाहाड रे पान

घरोघरी निवदाचा त्याले घिऊ दे रे मान

मंग सालभरी कष्टुनिया तो तुही वाढविन शान

आला आला बैल पोया जमल्या सर्व्या बाया

पुजा नंदीची करून त्या सांगती माऊल्या

नंदीदेवा आम्हावरी ठेवा कृपेच्या सावल्या

प्रा.संध्या महाजन


कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा .!

आमच्यासाठी ज्यानं बनवलाय हा पोळा 

त्याच्याच आयुष्याचा झालाय चोळामोळा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा 


शिंगांना रंग आहे पाठीवरती झुल आहे 

साजरा करतोय सण कसाबसा 

सगळं सगळं कबूल आहे 

तरी वाटत नाही पाहिजे तसा पुर्वीसारखा सोहळा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा 


महागाईनं आभाळ पेटलं, अवघं जग जागेवरच गोठलं 

काम नाही धंदा नाही खिशात रुपया बंधा नाही 

घालून ठेवलाय सर्वत्र कोरोनानं वेढा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा 


वैर्याची ही वेळ आहे नियतीचा हा खेळ आहे 

कुणीच कुणाचं राहिलं नाही 

लेकरानंही मरताना मायचं तोंड पाहिलं नाही 

परस्पर दफन केला जातोय एकुलता एक पोटचा गोळा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा..?

रत्नाकर खंडू कोळी मु पो खामखेडा ता शिरपूर, जि धुळे ह मु जळगाव मो ८३२९६४६५०५


बैल....आणि बाजार

बाजार भरला आहे

खचाखच....

व्यापाऱ्याची गर्दीच गर्दी

विकणारे उभे आहेत

जशी भर बाजारात 

काढलेली हक्काची वर्दी 

विक्रीच्या बैलांच्या डोळ्यात

मात्र,काळाच्या लाटाच लाटा

जंगली, पाळीव,घरसदस्य,अन

मालकाचा दोस्त होत

गेलेल्या वाटा...

मालक.. हतबल उभा..

दुबार,तिबार पेरणी करून

अकाली करपलेल्या धांड्यासारखा..

बैल.. डोळ्यात कणव घेऊन

ऐन युद्धसमई गोळ्या लागून

धारातीर्थी पडणाऱ्या जवानासारखा....

गिऱ्हाईक मात्र उभे आहेत

व्यापाऱ्याच्या वेशात...

लचके तोडायला...

मालकाच्या अन बैलांच्या जीवाचे

हिशोब काढायला...

मालक आणि बैल

मूकपणे बोलताहेत

राज्या.. धन्या....!

कधीतरी पुन्हा एकत्र येऊ

अन ही धरणी पुन्हा

सुपीक उत्कर्षाला नेऊ...

बाजार संपला...

दोघेही रिकामे रिकामे....

डॉ विशाल इंगोले, लोणार(*सरोवर), ९९२२२८४०५५ 


बैल

बैल श्रमाचे गा देव

बैल सुगीची आरती

बैल शेतीचा जिव्हाळा 

बैल गुंतलेली नाती !

बैल मृगाचा संदेश

बैल पावशाचे बोल

बैल आषाढ लाडका

बैल ढगांचेही ढोल !

बैल पीक मोतीयांचे

बैल पिकांचा सोहळा 

बैल तरारले रान

बैल शिवाराचा डोळा.

बैल धन्याची पुण्याई

बैल मातीचेच पुण्य

बैल उभा वनवास

बैल दुःखाचे अरण्य !

बैल शोषीत-पीडीत 

बैल मौनातला शब्द

बैल जन्माचा उन्हाळा

बैल फाटके प्रारब्ध !

बैल शिवाराची वाट

बैल परतीचा रस्ता

बैल कनवाळू मित्र

बैल श्रमाचा शिरस्ता.

बैल पायासाठी जोडा

बैल वाघाची हिंमत 

बैल जगणेच न्यारे

बैल मृत्यूची किंमत.

बैल रुसले आयुष्य

बैल चूकलेला ताळा

बैल एक प्रथापूजा

बैल कधीमधी पोळा !

रवींद्र जवादे


मागील वर्षी सातारा- सांगली -कोल्हापूर येथे पुराच्या पाण्याने मृत झालेल्या बैलांचा आक्रोश.. पोळ्याच्या पूर्वसंध्येला ..

काळजाचा पोळा.. 

मालक ..

तुम्हीं काळजाचा कासरा

करा जरा सैल..

पोरांप्रमाणे जीव लावला

जरी होतो आम्ही बैल..

आपल्या घरादाराच्या

सुखासाठी दिवसरात्र चालत

होतो मैलोनमैल..

पुराच्या पाण्यात आमचा

जीव गेला पण.. 

तोडून गेलो नाही दावण

अन सोडूनही गेलो नाही अंगण..

फक्त मालक तुमच्यासाठी.

तुम्ही आम्हांला कधीच समजले

नाही जनावर..

आज पोळा आहे म्हणून 

आमची खूप आठवण येईल

तेव्हा अश्रू होईल अनावर..

मालक स्वतःला अन घरातल्या

सर्वांना सावरा..

पडलेलं घर, गोठा हळूहळू आवरा..

मालक ,आज फक्त एकच मागणं आहे..

जेव्हा तुम्ही सर्व मातीच्या घरातून

सिमेंटच्या घरात जाल ना

तेव्हा फक्त आमची आठवण 

म्हणून जमलंच तर आपल्या तिघांचा मागच्या पोळ्याला काढलेला फोटो

फ्रेम करून भिंतीवर टांगा..

अन पुराच्या पाण्यात माझ्या सर्जा- राजाचा जीव गेला असं येणाऱ्या जाणाऱ्याला सांगा..

आता आम्ही खूप दूर निघून आलोय..

देवाला सोडून ..देवाच्या घरी..

तेवढी फक्त आमची आठवण ठेवा..

तुमच्या सिमेंटच्या किंवा काळजाच्या भिंतीवर सदैव टांगून..

बस्स एवढंच ...जमलं तर करा मालक...

 ©संदीप विकास गुजराथी, चांदवड जि. नासिक,  ९६० ४५० २७१५

वरील सर्वच कवितांमध्ये मांडलेले वास्तव, त्यातून कवीच्या मनातील आर्तता त्यांच्या मना मनातील पोळा आपल्याला सांगतोय. शेवटच्या कवितेत पुरात वाहून गेलेल्या व दोन जिवलगांमधील ताटातूट झालेल्या एकाने आपले मनोगत दुसऱ्याला अतिशय चपखल पद्धतीने सांगितले आहे. ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात या लाखच्या पोशिंद्याबद्दल आणि त्याला तेव्हढीच तोलामोलाची साथ देणाऱ्या त्याच्या सर्वांबद्दल कृतज्ञतेचा भाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. साहित्यातून साजरा करण्यात आलेला हा पोळा या साहित्यिकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या कलाकृतीला मनापासून अभिवादन करतो व आजचा पोळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे भाग्य मला दिले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. 

गिरीश कुळकर्णी