Thursday, 25 November 2021

गाणं मनातलं !

प्रार्थना आणि मानवी जीवनाचं अतूट नातं आहे. श्रद्धा आहे तिथे प्रार्थना अर्थ आहे.  प्रार्थनेतील आर्ततता आपल्या भावना पोहचतात. माणसाचे विचार हे त्याच्या कर्माचे मुळ आहे. प्रार्थना हा देखील एक विचार आहे तो कार्यप्रवण करणारा आहे. तो इप्सित साधणारा विचार आहे. माझ्या आवडीचं आणि मनातलं गाणं यावेळी एक प्रार्थना आहे. रामराज्याची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी येथील प्रत्येक मानवाने हि प्रार्थना केवळ म्हणुन उपयोग नाही तर ती आर्ततेने म्हटली पाहिजे. आपण तसे वागत असलो तर आर्तता आपोआप येते. 

मागील कोरोनाच्या संपुर्ण कालखंडात अनेकांना सेवेचं आणि जगण्याचं बळ या प्रार्थनेनं दिलं. समुपदेशनात / व्याख्यानात / प्रशिक्षणात या प्रार्थनेचा वारंवार वापर करतो. माणसाने प्रथम माणुस होणे अत्यावश्यक आहे तर जगणे सुलभ होते. भौतिक आकर्षणांना बळी न पडता नैसर्गिक जीवनशैलीचा स्वीकार करीत माणुसकीचे जगणे अर्थपूर्ण ठरते. एवढी प्रस्तावना पुरेशी आहे. 

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

सहज सोप्या भाषेत कवीने मागणी केली. सामाजिक परिस्थितीतून संवेदनशील मनाने उत्कटतेने प्रकट झालेली हि भावना आहे.

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

निराशा, नकारात्मकता, उदासीनता यासारख्या दुःखाचा अंधार सर्वत्र असला तरी उद्या सत्याचा सुर्य उगवणार आहे अशी आशा कवीने व्यक्त केली आहे. मात्र सत्याचा सुर्य उगविण्याची वाट पहात न बसता आपण काजव्यांप्रमाणे जगले पाहिजे. त्या मंद प्रकाशातुनच सुरु असलेली वाटचालीने उद्याचा सुर्य पहाता येणार आहे. काजव्यासारखे जागणे म्हणजेच माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे.
 
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

आज ज्या गोष्टींमुळे माणुस माणसाला पारखा होत आहे ते द्वेष संपु दे. मिळालेले जन्म कुठल्याही भेदात अडकू नये. परस्परांमधील साहचर्याच्या भावनेने सर्वांना एकरुप होऊ दे. निष्ठा व आशेतुनच नितळ, निरागस माणसेच शुद्ध व सात्विकता निर्माण करु शकणार आहे. यासाठीच माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. 

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

मिळालेले आयुष्य चांगले जगावे. एक एक पाऊल पुढे टाकत हा प्रवास सुरु ठेवला पाहिजे अन्यथा बाहेरील आव्हानांमुळे / मनातील हतबलतेने जेथे थांबाल तेथेच संपला. आता घेतलेला श्वास, मिळालेले क्षण, संधी अगदी आयुष्य पुन्हा लाभणार नाही त्यामुळे छान जगा अर्थात माणसाने माणसाशी माणसासारखेच वागा. हि मागणी आहे, प्रार्थना आहे. यात वैश्विक कल्याण आहे.  

कवी समीर सामंत यांनी लिहिलेली हि प्रार्थना रोज सकाळी एकदा तरी ऐका...

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४

Thursday, 18 November 2021

गाणं मनातलं !

आकाशी झेप घे रे पाखरा...



माझ्या आवडत्या गाण्यांमधील एक म्हणजे "आराम हराम आहे" चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले, मा. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी गायलेले व संगीतबद्ध केलेले आकाशी झेप घे रे पाखरा...! अतिशय अर्थपूर्ण व जीवनाला दिशा देणारे हे गीत आहे असे मला वाटते. प्रत्येकाला यशस्वी जीवनाच्यादृष्टीने मार्गदर्शन करणाऱ्या गीतातील प्रत्येक कडवे प्रेरणादायी आहे. जन्मदिनाच्या निमित्ताने त्या गाण्याबद्दल लिहिणे हा सुयोग...

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देत असतांना कृतार्थता अनुभवायची असते. सुख, समाधान, आनंद आणि यश यामागे तो धावत असतो. परक्षित गोष्ट साध्य झाली नाही तर अनेकदा निराश होतो. आपल्या प्रश्नांची, आव्हानांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो मात्र बहुतांश वेळेस पदरी निराशाच पडते. या गीतातील "तुज कळते परी ना वळते" हे वाख्या बरंच काही सांगते. कवी आपल्या प्रतिभेने एक वेगळाच विचार व दिशा या गीतातून देतो. थोडक्यात सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाने ज्याप्रमाणे आपल्या पंखांच्या जोरावर भरारी घेतली पाहिजे त्याप्रमाणे प्रत्येक मानवाने आपल्या क्षमता, कर्तृत्व व श्रमाने आपले घर प्रसन्न केले पाहिजे असा संदेश या गीतातून मिळतो.

आयुष्यच सर्व तत्वज्ञान अतिशय सोप्या पद्धतीने कवी सांगतो...

आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा

माणूस स्वप्ने मोठी पाहतो मात्र त्यासाठी आपला नित्यक्रम सोडण्याची, कष्ट करण्याची, वेगळी वाट निवडण्याची तयारी नसते. आपली इप्सित साध्य करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी हवी. सध्याची वरकरणी आरामदायी व सुखकारक जीवनशैली बदलण्यासाठी तो फारसा उत्सुक नसतो. मात्र याच सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची हाक कवी आपल्याला देतो. 

तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते  खाया

सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा

युवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. पालकांनी निर्माण केलेल्या वैभवावर किती दिवस अवलंबून राहणार? शरीराला कोणतीही झीज पोहोचू न देता असं किती दिवस चालणार ?

घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा

मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा जैसा उंबरा

घरात सहजतेने मिळणाऱ्या गोष्टींच्या मोहात अडकू नका. अशा घरात मिळणारे अन्न हे विषसमान आहेत आ ते घर हे खऱ्या अर्थाने तुरुंग आहे असे कवी मांडतो. अशा परिस्थितीतून  बाहेर पडण्याची कास धर.

‘तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने

दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा’

माणूस अनेकदा स्वतःला कमी लेखतो. आपल्याला जमणार नाही अशीच त्याची मनस्थिती असते. निसर्गात मानवामध्ये प्रचंड सामर्थ्य असते. त्याची जाणीव झाली कि त्याला कोणीही रोखू शकत नाही. जीवनातील वास्तव व आभासी कल्पनांवर मात कर आणि त्यासाठी तुझ्याकडे सर्व काही आहे. तू केलेल्या अपेक्षांपेक्षाही अधिक करता येऊ शकेल.

कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते

हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गेले... या उक्तीप्रमाणे श्रमाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. सर्व कळूनही अपेक्षित बदल स्वतःमध्ये घडवून आणू न शकल्याने तू अस्वस्थ आहेस का ? असे कवी विचारतो. 

घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले

घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा

आपल्या क्षमतांना श्रमाची व सकारात्मक कृतीची जोड दिल्याने मिळालेले साध्य अधिक आनंददायी ठरते. जीवनाला श्रम मूल्याची जोड दिल्यास घरातील वातावरण प्रसन्न होते. अशा प्रकारची प्रसन्नता दैवी व सात्विक असते. जीवनाचं क्लिष्ट असलेलं तंत्रज्ञात सर्वांना सहज समजेल अशा सोप्या शब्दात सांगणे हि अवघड कला आहे. बाबूजींच्या स्वरांनी त्या संपूर्ण गाण्याला दिलेली चाल सोपी आहे आणि म्हणूनच आजही सामान्यजनांच्या हृदयावर हि अशी गाणे राज्य करतात. 

आपणही डोळसपणे या गीताचा अभ्यास करावा म्हणजे आपणास सर्व काही प्राप्त होईल. मंडळी आपल्याला या गीताबद्दल काय वाटते ते प्रतिसादाच्यारुपात जरूर मांडा...

गिरीश कुळकर्णी

९८२३३ ३४०८४ 


Tuesday, 9 November 2021

गरज मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची !



मनुष्य हा समूह प्रिय प्राणी आहे. त्याला लोकांसमवेत मग ते नातेवाईक असो वा सहकारी असो वा शेजारी वा समाज घटक त्याच्याशी संवाद साधायला आवडते. कुटुंब संस्था हे त्याचे प्रतीक असून भारतीय संस्कृतीचे बलस्थान आहे. यात परस्पर सहकार्य, संवाद याला विशेष महत्व आहे. यातूनच नात्यांची घट्ट वीण बांधली जाते. जेथे मानवाचा संबंध येतो तेथे मन येतेच. जेथे मन आहे तेथे विचार आहे. माणूस या एकमेव प्राण्याकडे विचार करण्याची, विचारांचे आदानप्रदान करण्याची नैसर्गिक व उपजत शक्ती आहे. विचारांचा प्रभाव माणसाच्या जीवनावर पडतो. सुदृढ शरीरासारखे मनही सुदृढ असले पाहिजे म्हणजे मानवी जीवन आनंदी व सुखकर होत असते. दिवसभरात माणसाच्या मनात हजारो विचार येतात. हे विचार संस्कारातून, जाणिवेतून, अनुभवातुन, आपल्या विचारसरणीतून येत असतात. काही विचार हे शिक्षण व सहवासातूनही येत असतात. माणूस रिकामा बसला असला तरी मनात विचार सुरुच असतात. सकाळी उठल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत विचार सुरु असतात. काम सुरु असतांनाही अंतर्मनात (बॅक ऑफ द माईंड) विचार सुरु असतात आणि या विचारातूनच जीवन घडत असते.

'कोरोना' या जागतिक महामारीने माणसाच्या मनात विचारांचे प्रचंड काहूर माजले होते. आता आपण पूर्वपदावर येत असून भीती कमी होत आहे. 'कोरोना'सारख्या घटनांना "ब्लॅक स्वान इव्हेन्ट" म्हणतात. हि अशी घटना असते कि ज्यामुळे सर्व जग प्रभावित होते. अनपेक्षित, अकल्पित व अनाकलनीय अशा या घटनेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातील एक समस्या म्हणजे मानसिक स्वास्थ्य राखण्याची !  कोरोनापूर्वीही हि समस्या होतीच मात्र कोरोनामुळे त्यात अधिकच भर पडली, असे म्हणता येईल आणि म्हणूनच आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मानसिक स्वास्थ्य म्हणजे जीवनात / आयुष्यात येणाऱ्या, होणाऱ्या, घडणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट घटना / अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे. कुटुंबातील व समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे. यात माणसाच्या भावना, विचार, परस्परसंबंध व दैनंदिन जीवनातील गोष्टी यांचा समावेश होतो. आपले मानसिक स्वास्थ्य तपासून पाहण्याकरता खालील गोष्टींचा विचार केला पाहिजे.

- इतरांशी विशेषतः निकटवर्तीयांशी आधारदायी व स्थिर नाते जुळविण्याची क्षमता

- आप्तेष्टांच्या व समाजाच्या कल्याणाशी बांधिलकी

- समस्या, दडपणे व संकटे यांना तोंड देण्याची तयारी

- आपल्यासह इतरांच्या व्यक्तिमत्वाचा योग्य आदर राखून महत्व देण्याची तयारी

- जीवनात वाटचाल करण्यासाठी लागणारी समर्पक वृत्ती व जोपासलेली मूल्ये

- आत्मप्रतिमा उंचावलेली नसली तरी डागाळलेली नसणे. स्वतःच्या उणिवा मान्य करुन त्या दुरुस्त करण्याची स्वतःची क्षमता वाढवून पूर्णत्वाला न्यायची तयारी.

मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी

- मोकळा संवाद

- सकारात्मक विचार (नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणे)

- कुटुंबात निरोगी व पोषक वातावरण असावे.

- परस्परांविषयी प्रेम, आदर असावा

- आपले छंद जोपासले पाहिजेत जसे वाचन, लेखन, पोहणे, फिरणे, खेळणे इ.

- तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर

- वास्तवात जगायला शिकले पाहिजे

- जीवनात सर्वच गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत याची खूणगाठ बांधली पाहिजे.

- पुरेशी झोप / झोपे पूर्वी व उठल्यावर सकारात्मक विचार यासाठी आपण सकाळी उठल्यावर माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची ५ वाक्ये स्वत:शी बोलली पाहिजेत - १. मी चांगला व्यक्ती आहे. २. मी हे करु शकतो. ३. मी जिंकणारा आहे. ४. परमेश्वर माझ्यासोबत आहे. ५. आजचा दिवस माझा दिवस आहे.

- नैसर्गिक जीवनशैली - आहार, विहार व आचार

- नियोजनपूर्वक जीवन

- चांगल्या सवयी

- कामातला आनंद (आस्था / श्रद्धा / निष्ठा )

- स्वतःची वैचारिक बैठक

- गांधीजींनी सांगितलेली एकादश व्रत पालन सत्य, अहिंसा, अस्तेय, असंग्रह, स्वदेशी, सर्वधर्मसमभाव, स्पर्श भावना, अभय, ब्रह्मचर्य, शरीरश्रम, आस्वाद

- योग, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार

- शरीर - मन - मेंदू यात योग्य संतुलन

मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची कारणे

- अनुवंशिकता 

- आजची गतिमान व स्पर्धात्मक जीवनशैली

- हवी असलेली गोष्ट लगेच हवी हि वृत्ती

- विभक्त कुटुंबपद्धती

- सामाजिक व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष

- संवादाचा अभाव / ताणतणाव

उपाय व उपचार

- मानसिक स्वास्थ्यात Prevention is Better than Cure अर्थात उपचारांपेक्षा प्रतिबंध जास्त प्रभावी हा नियम मानसिक आरोग्य संवर्धनासाठी जास्त लागू पडतो.

- तातडीचे उपचार

- मानसोपचार

- औषधे

- पुनर्वसन इ.

संवादातून संबंध दृढ होतात. या संवादातून होणारे समाज-गैरसमज मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. कसे तो थोडक्यात समजून घेऊ या !

- कोणी व्यक्ती मनाला लागेल असे बोलल्याने त्या माणसाबद्दलची अढी निर्माण होते. त्याचे बोलणे प्रत्येक वेळी मनावर घेतले जाते. त्यातून नकारात्मक विचार येतात. माणूस कोषात जाणे पसंत करतो. शेवटी संबंध तुटतात.

- घनिष्ट नात्यात क्षुल्लक गोष्टही मनाला लागते. अशा गोष्टी विसरता येत नाही. खुलेपणाने संवाद झाल्यास गैरसमज दूर होऊ शकतो अन्यथा संबंध खुंटण्याचा संभव असतो.

- नात्यात ओलावा नसल्यास गैरसमज लवकर होतात. नात्यात घर्षण निर्माण होते व कटुता निर्माण होऊन संबंध ताणले जातात.

- स्वाभिमानी माणसाच्या संवादात गरज नसतांना स्वाभिमान संवादात आल्यास गैरसमज वाढतात.

व्यक्ती संबंधातील स्वास्थ्य दृढ करुन मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी खालील गोष्टी अवश्य कराव्यात...

- गप्पा / खेळ / आनंद

- मोबाईल / टीव्ही व त्यावरील नकारात्मक गोष्टी व चर्चांपासून लांब राहावे.

- वास्तव व आभासी जगावर लहान-मोठ्यांची चर्चा

- ज्यांच्याशी बऱ्याच दिवसात संवाद झाला नाही त्यांच्याशी संवाद साधावा.

- वादविवाद व टीकाटिप्पणी असावी मात्र त्यामागील कार्यकारणभाव स्पष्ट करावा.

- कौतुक व कृतज्ञता याचा नियमित वापर

- संपर्कातील व्यक्तीच्या गुणांकडे विशेष लक्ष

- इतरांना द्या (वेळ, पैसे, मदत इ.)

- हीच आमुची प्रार्थना / तू बुद्धी दे यासारख्या प्रार्थना एकत्रित म्हणा

- आनंद / सुख / प्रेम / यश / जीवन / सकारात्मकता / पैसा / तंत्रज्ञान / जगायचं का ? यासारख्या विषयांवर गप्पा

मानसिक स्वास्थ्यासाठी आपल्या विचारांकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे व ते नेहमी सकारात्मकच असतील याची काळजी घ्यावी.


Monday, 1 November 2021

महासुखाची दिवाळी



"अहो, ऐकलंत का ?" 

"हं "

"मी काय म्हणते ? दिवाळी ८ दिवसांवर आलीय. बऱ्याच दिवसांनी पोरगं येणार आहे. यावर्षी लेक आणि जावईबापू पण येणार आहेत. साफ-सफाई तर केली आहे मी, पण खरेदी बाकी आहे आणि ती तुमच्याशिवाय पूर्ण होणार नाही. परमेश्वरी कृपेने यावर्षी सर्व व्यवस्थित आहे. बऱ्याच दिवसांनी सर्व गोतावळा एकत्र येणार आहे. यावर्षी मला सुखाची दिवाळी अनुभवायची आहे." 

"सुखाची दिवाळी ? कशी असते ती ?"

"अहो, म्हणजे सर्व एकत्र येणार. त्यामुळे मी दिवाळीचा सर्व फराळ घरीच करणार आहे. छान तीन दिवसांचे मेनूही ठरवले आहेत. सर्व घरीच करणार आहे मी. मात्र ज्याला जे पाहिजे ते तुम्ही नक्की द्या म्हणजे झाली माझी दिवाळी सुखाची..."

"अच्छा, म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग !"

"बरोबर"

"हि तुझी सुखाच्या दिवाळीची कल्पना तर"

"म्हणजे ?"

"अगं, तुझी जशी सुखाच्या दिवाळीची कल्पना तशी मुलांची पण काही तरी असेलंच कि ! मग त्यांनाही विचारायला नको का ?"

"तेही खरंच ! आणि तुमची पण असेल..."

"हे काय विचारणं झालं ?"

"त्यांचं पाहू नंतर पहिल्यांदा तुमची सुखाच्या दिवाळीची कल्पना सांगा बरं"


"तुला माहिती आहे मी वर्तमानात जगणारा माणूस ! माझ्यासाठी कालची, आजची आणि उद्याची दिवाळी सुखाचीच... मात्र त्यात एकच गोष्ट सारखी आणि ती म्हणजे आनंद ! हा आनंद फराळ, कपडे यात फार नाही. आमच्या काळी वगैरे भानगड नाही. कालाय तस्मै नमः अशी नकारात्मक भावनाही नाही. सर्वांचा आनंद हा माझा आनंद..."

"तुमची कल्पना चांगलीच आहे पण... कपडे घ्यायला नको का ? पोरगं नवीन मोबाईल मागतोय आणि कमावतोही पण तुमचा होकार मिळाल्याशिवाय घेणार नाही. मुलगी आणि जावई २ वर्षांनी येणार त्यांना काही द्यायला नको का ?"

"यामुळे त्यांना आनंद मिळणार असेल तर नक्कीच देऊ या !"

"हे कसं ठरवणार ?"

"मी करतो बरोबर... दोघांना लगेच व्हाट्सअपवर मेसेज टाकतो. आपण सर्वांनी दिवाळीचा आनंद घ्यावा यासाठी तुमची सुखाच्या दिवाळीची कल्पना सांगा ?"

"चालेल... पण मग फराळ, कपडे, मोबाईल आणि जावईबापूंच्या भेटवस्तुंचे काय ?"

"ते आपण घेऊच कारण ते तुझ्या सुखाच्या दिवाळीसाठी !"

"मग ठीक आहे, बाकी तुम्हाला काय करायचे ते करा. खरेदीसाठी मात्र आपण आजच जाऊ या ! म्हणजे मला नंतर फराळाकडे लक्ष देता येईल."

"चालेल"

उत्साह, चैतन्य आणि सुखाच्या सोहोळ्याचा सण असलेल्या दिवाळीच्या सणाची तयारी घराघरात सुरु असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा करीत असतांना आपल्या पुढच्या पिढीला भारतीय संस्कृतीचा हा वारसा सहजपणे दिला जातो. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हा प्रातिनिधिक संवाद... प्रेम, माया व आपुलकीने नात्यातील ऋणानुबंध घट्ट करण्यासाठीची, कुटुंब संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठीची हि धडपड... 

"अहो, तुम्हाला 'थँक्यू' म्हणायचे आहे."

"का ?"

"अहो अगदी मनासारखी खरेदी झाली आज. पोरगं आल्यावर त्याला त्याच्या आवडीचा मोबाईल तेव्हढा घेऊन द्या म्हणजे झाली बाई माझी सुखाची दिवाळी... अगं बाई, मी बोलत काय बसली. तुम्हाला पहिल्यांदा चहा देते..."

"नको, तू बैस. सकाळी चादरी-उशा धुणं, डब्बे घासून वाळवणं याची गडबड आणि नंतर हि खरेदी... यात दमली असशील... मी करतो चहा..." 

"अहो तुमचंही काही ना काही काम सुरु होतंच. तुमच्या मदतीशिवाय वरची कामं आणि खरेदी झालीच नसती." 

"हा मोबाईल घे आणि पोरांच्या सुखाच्या दिवाळीच्या कल्पना काय ते वाच... तोपर्यंत मी आपल्यासाठी चहा घेऊन आलोच."

"अरे हो... मी विसरलेच."

"पहा तर काय म्हणताय पोरं..."

"अहो, चहा छानच झालाय..."

"ते जाऊ दे ! पोरांची सुखाची दिवाळी काय म्हणते ?'

"अहो, मुलं मोठी झाली आणि समजदारही !"

"याच श्रेय तुझंच बरं ! त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांची काळजी घेणं, हवं-नको ते पाहणं हि काम तुझीच. मी दिवसभर नोकरीच्या निमित्ताने गावोगाव भटकलो. अगदी ठरवून कधीतरी पालक सभेला आलो. पैसे देणं तेही ओढाताण करीतच... एव्हढंच माझं काम !"

"अहो, असं काय म्हणता ? पोरांना योग्य वयात द्यावयाचे स्वातंत्र्य, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची बांधिलकी, त्यांच्यावर टाकलेला विश्वास, करियर आणि जीवनविषयक सांगितलेली स्पष्ट मते, स्नेहसंमेलनाला हजर राहणे, दोन-चार वर्षातून एकदा ट्रीपला नेणे, त्यांना कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे यामुळेच हे शक्य आहे."

"हे खरं असलं तरी तुझा वाटा माझ्यापेक्षा नक्कीच जास्त. बरं ते जाऊ दे... काय म्हणताय मुलं ?"

"तुम्हीच वाचा ! मला खूप भरुन येतंय वाचतांना... किती छान कल्पना मांडल्या आहेत दोघांनी !"

"असं ! पहिल्यांदा पोरीचे वाचतो. तुमच्यासह आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणं हीच


माझ्यासाठी सुखाची दिवाळी. आम्ही यावर्षी कोणत्याही भौतिक गोष्टींवर खर्च करायचा नाही असे ठरविले आहे. कारण आईला कितीही नाही म्हटले तरी ती माझं माहेरपण करणार ! आम्ही तीन दिवस येणार आहोत. तेथे तुम्ही ठरवाल त्यात आम्ही आनंदाने सहभागी होणार आहोत. तीन दिवस घरातील टीव्ही १०० टक्के बंद ठेवावा असे मला वाटते. मी स्वयंपाकात मदत करणार आहे. संध्याकाळची रांगोळी मीच काढणार. खूप गप्पा आणि खेळ खेळणार आहे. आमच्यासोबत कोरोना काळात आई-वडील गमावलेली एक मुलगी असणार आहे. तिचे पालकत्व आम्ही स्वीकारले आहे. आमच्याकडे धुणे-भांडी करण्यासाठी येणाऱ्या मावशी, आमची भाजीवाली आजी, सफाई कामगार, बिल्डिंगचा पहारेकरी, शाळेचे रिक्षावाले काका यांना घरी केलेला दिवाळीचा फराळ आणि कपडे देणार आहोत. माझ्यासाठी हीच सुखाची दिवाळी"

"काहो, एव्हढं शहाणपण कुठून आलं असेल ताईला ?"

"अगं, एका वाक्यात सांगतो. घरात पालकांच्या उक्तीला कृतीची जोड असली कि सहज संस्कार होतात आणि परिस्थिती माणसाला खूप काही शिकविते. मागील वर्षभरात तिने मुंबईत जे अनुभवले त्यातून तिची सामाजिक जाणीव प्रगल्भ झाली असे मला वाटते."

"खरंय... आता माझ्या लेकराचं पण वाचा..."


"हो, हो तू मध्येच प्रश्न विचारला म्हणून बोललो. काय म्हणतो दादा ? हं... माझ्या मते सुखाची दिवाळी आपल्या मानण्यावर असते. आजपर्यंत दरवर्षीची माझी दिवाळी तुमच्यामुळे सुखाचीच झाली आहे. मी ८ दिवस सुट्टी घेऊन येणार आहे. फराळ मी आल्यावरच करायचा. फक्त अनारसे करून ठेवले तर चालतील. यावर्षी आईला अपेक्षित असलेली खरेदी मीच करणार आणि ती स्वदेशीच असणार. मला दिवाळी निमित्ताने कंपनीनेच नवीन मोबाईल दिला आहे. माझे दोन ड्रेस नवीन कोरे आहेत तेच वापरणार आहे. ताईशी माझे बोलणे झाले आहे. ती तीन दिवस येणार आहे. दिवाळीतील एक दिवस सकाळी आपण सर्व वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत आणि भाऊबीजेला संध्याकाळी अनाथालयात जाणार आहोत. एक दिवस माझ्या शाळेतील मुलांसाठी किल्ला बनविण्याची कार्यशाळा घेणार आहे. बाबांना माहिती असलेल्या वस्तीतील मुलांना फराळ वाटप करावा असे मला वाटते. आपल्यासोबत गरजवंतांना दिवाळीचा आनंद देणे हीच माझी सुखाची दिवाळी !"

"मला तर बाई हे पोरगं म्हणजे तुमची कॉपीच वाटते"

"हं, असेल... पण खरंच या दोन्ही मुलांच्या कल्पनांनी माझी दिवाळी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तशी महासुखाची होणार तर !"

"हे काय नवीन ?"

"अगं माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे...


तैसी होय तिये मेळी ।

मग सामरस्याचिया राऊळी ।।

महासुखाचि दिवाळी ।

जगेसि दिसे ।।


आपल्या मुलांनी सामाजिक समरसतेतून समाजाचा जो विचार केला आहे तोच सर्वत्र दिसावा अशी अपेक्षा माऊलींनी व्यक्त केली आहे."


मी अविवेकाची काजळी ।

फेडुनि विवेकदीप उजळी ।

तैं योगिया पाहे दिवाळी । निरंतर ।।


या ओवीतून संत ज्ञानेश्‍वरांनी दिवाळीचा खराखुरा आनंद मांडला आहे. सामाजिक जीवनात साजरी होणारी दिवाळी ही आनंदाचेच प्रतीक आहे मात्र ज्ञानरुपी जाणिवेतून दिवाळीचा आनंद घेतला जातो तेव्हा ती महासुखाची दिवाळी ठरते. आपणही समाजातील अज्ञानरुपी अंधःकार आपल्या सामाजिक जाणिवेरुपी ज्ञानदीपाने दूर सारु या ! शुभ दिपावली ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४

Saturday, 14 August 2021

स्वातंत्र्यातील बंधनं (!) कुठे हरवलीत ?

स्वातंत्र्यातील बंधनं (!) कुठे हरवलीत ?

संपूर्ण देश आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. आपल्या सर्वांना या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा ! "स्वातंत्र्य माझ्या मनातील" या विषयावर एका माध्यमाने मला माझे विचार ध्वनिमुद्रित करून पाठविण्यास सांगितले आणि त्या विषयावर काही लिहावे असा विचारही तेथूनच आला. लेखाच्या शीर्षकातील परस्परविरोधी दोन शब्द वाचून आश्चर्य वाटेल मात्र संपूर्ण लेख वाचल्यावर माझे म्हणणे आपणास नक्कीच पटेल व त्याअनुषंगाने किमान वैयक्तिक जीवनात बदल घडवून आणल्यास स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने आनंद आपण उपभोगू शकू असा मला विश्वास आहे. 

देश स्वतंत्र झाला याचा अर्थ गुलामगिरी संपली, दुसऱ्याने घातलेली जाचक बंधने संपलीत, आम्ही  परकीयांच्या व आक्रमकांच्या अमलातून मुक्त झालो. त्यासाठी या देशातील क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने स्वातंत्र्याचा लढा लढला गेला. मार्ग, पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचे अंतिम ध्येय देशाला स्वातंत्र्य मिळविणे हाच होता. तत्पश्चात देशाने संसदीय लोकशाही स्वीकारीत आपली स्वतंत्र अशी राज्यघटना स्वीकारली. या संविधानाने  नागरिकांना आपल्या हक्क व कर्तव्यांसोबतच एक जागरुक नागरिक म्हणून त्यांच्या जबाबदारीची जाणीव दिली. "संविधान" म्हणजेच स्वतःच स्वतःवर घालून घेतलेली घटनात्मक बंधनांची चौकट स्वीकारली. स्वातंत्र्याला बंधनांची लाभलेली चौकट नागरिकाला स्वैराचारापासून वा अतिरेकी वागण्यापासून परावृत्त करते. 

मानवी जीवनात बंधनांना विशिष्ट स्थान असून त्यामुळेच त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. भारतीय तत्वज्ञानात "बंधनाला" विशेष महत्व दिलेले आहे. निसर्गतःच प्रत्येक जीवमात्राला काही बंधने घालून दिली आहेत. त्याचा योग्य आदर करीतच जीवन जगणे सर्व प्राणिमात्रांच्या हिताचे आहे. अलीकडच्या तंत्रज्ञानाच्या युगात व भौतिक सुखसोयींच्या मागे लागलेल्या मनुष्य प्राण्याने निसर्गाची हि बंधने झुगारलेली आपण पाहतो आहोत आणि त्याचे परिणामही भोगत आहोत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा स्वातंत्र्याचा संकोच करणारा ठरतो. परकीयांनी व आक्रमकांनी अशाच पद्धतीने केलेल्या अतिरेकाचा परिपाक स्वातंत्र्य लढ्यात पाहायला मिळतो. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी आपण आपल्या बंधनांना झुगारत स्वातंत्र्याचा अतिरेक करीत आहोत का ? असा विचार करण्याची गरज आहे. एका लेखात "स्वातंत्र्य" म्हणजे काय ? हे सांगत असतांना लेखकाने मुक्ती, हक्क व जबाबदारी या जाणिवांचा संगम असल्याचे म्हटले आहे. राजकीय दृष्ट्या आपण १९४७ साली स्वतंत्र झालो मात्र आपण आपली स्वतःवर स्वतःचं नियंत्रण असणारी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, कौटुंबिक व्यवस्था गत ७५ वर्षात निर्माण करू शकलो का ? हा खरा प्रश्न आहे. 

आम्हीच निर्माण केलेले व स्वीकारलेले कायदे आम्ही पाळतो का ? सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना अपेक्षित असलेली साधनशुचिता अंगिकारली का ? भ्रष्टाचाराच्या, लाचखोरीच्या, हुंडाबळीच्या, फसवणुकीच्या, आपल्या कर्तव्यात कसूर करण्याच्या, चोरीच्या, दरोडेखोरीच्या घटना काय सांगतात ? मुलांनी आपल्या आईवडिलांना वागवावे यासाठी कायदा करावा लागतो याचा अर्थ काय ? आंदोलनाप्रसंगी केलेली सार्वजनिक मालमत्तेची नासधूस वा जाळपोळ काय सांगते ? विरोधी विचारांच्या व्यक्तींना ज्या पद्धतीने "टार्गेट" केले जाते, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर शिंतोडे उडविले जातात याला काय म्हणायचे ? वाहन चालवीत असतानाच्या नियमांचे आपण किती सहज उल्लंघन करतो. यासर्व गोष्टी आपल्या स्वातंत्र्याचा अतिरेक नाही का ? 

लेखाच्या शीर्षकात म्हटलेले "स्वातंत्र्यातील बंधनं (!) कुठे हरवलीत ?" याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल. "बंधनं" हा मानवी जीवनाचा अलंकार आहे. आपल्या घरातील व समाजातील ज्येष्ठ मंडळी बंधनांचा हा संस्कार आपल्या आचरणातून देण्याचा प्रयत्न करीत असतात. बंधन हे स्नेहबंधाचं प्रतीक आहे. बंधनांतच मानवाच्या हितांचे संरक्षण आहे. बंधनातच परस्पर कल्याण आहे, सामर्थ्य आहे, समृद्धी आहे, यश आहे. अभ्यासाचे बंधन पाळले तरच ज्ञान व कौशल्य मिळते, टीव्ही पाहण्याचे बंधन पाळले तरच मनोरंजन व विरंगुळा होईल, व्यायामाचे बंधन पाळले तरच शरीर निरोगी राहील, खाण्यापिण्याचे बंधन पाळले तरच आरोग्य टिकविता येईल. आधुनिकतेचा स्वीकार करीत असतांना आपल्या परंपरांचा विसर पडता कामा नये. तंत्रज्ञानाच्या मर्यादित वापरानेच त्याचा लाभ आपल्याला मिळेल. अशा प्रकारच्या बंधनातच आपले स्वसंरक्षण आहे. जेथे बंधन आहे तेथेच स्वातंत्र्य आहे आणि जेथे स्वातंत्र्य आहे तेथेच बंधन आहे. हे बंधनच आपल्याला एकत्रित करतात, बांधतात. बंधनांमुळेच परस्परातील विश्वास दृढ होतो. या विश्वासावरच बंध घट्ट होतात. असे घट्ट बंधच कालांतराने मानवी जीवनाला अर्थ प्राप्त करुन देतात आणि संरक्षणही करतात. बंधनातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे. त्यातच समाधान आणि आनंद आहे. 

चला तर मग अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी हक्क व कर्तव्यांची कास धरत स्वतःवर स्वतःच निर्माण केलेल्या बंधनांचा अंगीकार करत स्वातंत्र्याचा आनंद लुटू या ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 


 

Monday, 26 April 2021

प्रथमेशचे अभिष्टचिंतन !



खरं तर चि. प्रथेमशचा वाढदिवस ११ एप्रिलचा ! मात्र आम्हाला तो लक्षात राहतो हनुमान जयंतीमुळेच... आपल्या मुलाचा २३ वर्षांचा प्रवास पाहून अभिमान वाटणं आणि त्यामुळे सुखावणं यासारखा दुसरा आनंद एका बापाचा असूच शकत नाही. २३ वर्षांचा हा लघुपट सहज डोळ्यासमोरून सर्र्कन पुढे सरकतो. आपल्या मुलासोबत होत असलेली आपली घडण नक्कीच त्यादृष्टीने महत्वाची ठरते. पालक-पाळ्या नात्याचं वय जसं वाढत जातं तसं मुलाच्या घडणीत पालक म्हणून आपली भूमिका क्षुल्लक वाटायला लागते आणि दुसऱ्या बाजूला मुलगा म्हणून आपल्या पालकांची भूमिका सर्वोच्च वाटते. पालक-पाल्य दोघांनी परस्परांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारले, परस्परपूरक भूमिका घेतल्या आणि वाढीच्या या कालखंडात दोघांनी एकमेकांकडून शिकायचे ठरविले तर कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्याच्यादृष्टीने त्याची अपरिहार्यता लक्षात येते. 

प्रथमेशच्या या प्रवासातील हे मर्म आपल्यासमोर मांडण्याचे औचित्य म्हणजे पुढच्या पिढीचे देणं मानतो. विद्यार्थ्यांमध्ये काम करीत असल्याने  पालक-पाल्य नात्याची वीण अधिक दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याने यात कुठेही प्रौढी मिळविण्याचा उद्देश नाही. वर म्हटल्याप्रमाणे पालक म्हणूनची भूमिका तात्कालिकच होती. नैसर्गिक वाढ हा सृष्टीच्या नियमाचा भाग अंतर्मनात ठेवला तर अनेक गोष्टी सुलभ होतात. संवादातील मोकळेपणा येथे विशेषत्वाने उपयुक्त ठरतो. आपले मत मांडून निर्णयाचे स्वातंत्र्य पाल्याला दिले तर होणारे परिणाम अधिक मॅच्युअर्ड (प्रगल्भ) ठरतात असा माझा अनुभव आहे. खलील जिब्रान यांच्या पालकत्वासंदर्भातील भावानुवादाचा खूप उपयोग झाला. लेखाच्या शेवटी आपणास तो वाचण्यास मिळेल. गीता परिवाराचे काम करणारे संजय मालपाणी यांच्या "दोन शब्द बाबांसाठी आणि दोन शब्द आईसाठी" या व्याख्यानातील "Don't  Worry that children never listen to you, worry that they are always watching you" या मौलिक मंत्राचाही तेव्हढाच उपयोग झाला. 

जीवन अनुभवातून मिळालेली शिकवण, त्याची कालसुसंगत परिस्थितीशी जुळवणी, त्यात अपेक्षित लवचिकता, थोरामोठ्यांचा विचार, त्यांच्यासोबतची चर्चा, विषयावरील प्रबोधन, वाचन यातून आपली स्वतःची पालकत्वाची भूमिका व तत्वे अधिक सुस्पष्ट होत जातात. पाल्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा कायम  विचार डोक्यात ठेवून पालकत्व निभावल्यास अपराधीपणाची भावना येण्याचा धोका टळतो. पाल्याचा आनंद त्याच्या प्रतिभेतून त्याला मिळणार असून आपण त्यातच आनंद मानणे आपल्या मानसिक समाधानाचे बीज आहे. पालकत्व निभावताना अपेक्षाभंगाचे दुःख येऊ नये यासाठीची आपापली वैचारिक बैठक विकसित करीत राहणे आवश्यक वाटते. त्याच्या यशस्वी वाटचालीसाठी आपण कायम त्याच्यासोबत आहोत हा विश्वास आपल्या कृतीतून दिसल्यास मुले अधिक फुलतात नव्हे त्यांना त्यांच्या वाढीचे सूत्र लवकर सापडतात. एक सुजाण, सजग व संवेदनशील माणूस बनणे एव्हढाच पालकत्वाचा उद्देश असावा असे मला वाटते. शेवटी त्याच्या आयुष्याचे सोने कसे करावे यासाठीची वैचारिक बैठक तयार करण्यास मदत करणे एव्हढीच आपली भूमिका असते. 

प्रथमेशचे महाविद्यालयीन शिक्षण जळगावातच पूर्ण झाले असून सध्या एका चांगल्या कंपनीत प्रशिक्षणार्थी इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. नोव्हेंबर महिन्यात घरातून बाहेर पडल्यापासून त्याचे निर्णय तो स्वतः घेतो आणि तशी त्याला पूर्ण मुभा आहे. आवश्यकता वाटल्यास अपेक्षित मदत कायम उपलब्ध आहे. मागील पाच महिन्यात तीन राज्यातील तीन शहरांमध्ये त्याचे वास्तव्य राहिले. त्या त्या ठिकाणाचा प्रवास, निवास, भोजन आदी सर्व व्यवस्था त्याने त्याच्या निर्माण केल्या. अर्थात त्यासाठी त्या त्या ठिकाणच्या कंपनीतील सहकाऱ्यांनी त्याला सहकार्य केले. आज त्याच्या जन्मदिनी अभिष्टचिंतन करतांना नक्कीच अभिमान वाटतो. त्याची मेहनत, सद्गुरुंचे आशिर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा त्याची मनोकामना पूर्ण करतील अर्थात पालक म्हणून त्याचा सर्वाधिक आनंद आम्हास असेल. बाळा, खुप मोठा हो.... सुखी राहा... आनंदी राहा..!

खलील जिब्रान यांच्या मुलांवरील कवितेचा इंग्रजी भावानुवाद आपल्यासाठी ! 

तुमची लेकरं ही "तुमची" नसतात.

जीवनाच्या अतितीव्र आकांक्षेची मुलं आणि मुली असतात ती

ती तुमच्याद्वारे जन्मतात तुमच्यापासून नाही,

आणि ती तुमच्याजवळ असली तरी तुम्ही मालक नसता त्यांचे.


कदाचित तुम्ही त्यांना तुमचं प्रेम देऊ शकाल पण तुमचे विचार नाही देऊ शकत,

कारण त्यांच्याजवळ त्यांचे स्वत:चे विचार आहेत.

त्यांच्या शरीरांना तुम्ही घरकुल देऊही शकाल कदाचित पण त्यांच्या आत्म्यांना कदापी नाही,

कारण त्यांच्या अत्म्यांचा वास उद्याच्या गर्भात आहे.

त्यांच्या "उद्या"ला तुम्ही भेट देऊ शकतच नाही, अगदी स्वप्नातही नाही!

तुम्ही त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करु शकाल कदाचित

पण त्यांना तुमच्यासारखं बनवण्याचा विचारही करु नका.

आयुष्य कधीही भूतकाळात जात नाही आणि थांबूनही रहात नाही बदलाच्या प्रतीक्षेत.


तुम्ही एका धनुष्यासारखे असता ज्यावर स्वार झालेली तुमची मुलं

जणू एखाद्या जिवंत बाणासारखी भविष्याचा वेध घेणार असतात.

"तो" जगन्नियंता धनुर्धारी अनादि अनंत काळाच्या पटावर वेध घेतो एका दूरच्या लक्ष्याचा

आणि सर्वशक्तीने "तो" आकर्ण ताणतो प्रत्यंचा, तुम्ही, त्याचं धनुष्य, वाकेपर्यंत

कारण त्याचे ते बाण अतिजलद गतीने जावेत अतिशय दूरवर म्हणून.

तेव्हा आपलं ते धनुर्धार्‍याच्या हातातलं वाकणं आनंदाने स्वीकारा,

कारण "त्यालाही" जसे हे दूरवर जाणारे बाण आपलेसे वाटतात,

तशीच प्यारी असतात त्याला स्थिर असलेली धनुष्यही!


गिरीश कुळकर्णी

मित्र, समुपदेशक व संवादक

Tuesday, 13 April 2021

वर्षारंभ आणि नवीन कार्याची दिशा !

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा ! वर्षारंभाचा दिवस हा नवीन कार्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा दिवस... आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सहभागाने सामाजिक जीवनात एका नवीन कार्याचा आरंभ करीत आहे. आपणा सर्वांना नवीन कार्याची दिशा स्पष्ट करणारा...त्याअनुषंगाने विचारप्रवृत्त करणारा आहे. प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त ठरणारा हा लेख आपल्या विशेष पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे... प्रत्येक वाचकाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा राहील... 

माणूस जन्माला आल्यानंतर तो ज्या कुटुंबात, समाजात, परिस्थितीत आणि वातावरणात वाढतो त्या प्रमाणे त्याची जीवनविषयक धारणा तयार होत असते आणि कालांतराने जगण्याचा मार्गही...! यालाच आपण विश्वास (बिलीफ) म्हणतो दुर्दैवाने स्थळ, काळ, वेळ आणि परिस्थिती बदलते मात्र वरील मर्यादांवर आधारित धारणा बदलल्या नाहीत तर मोठा गोंधळ होण्याची शक्यता असते. प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने असे मर्यादांवर आधारित धारणा बदलण्याची मानसिकता तयार झाली आणि प्रवास सुखकर झाला. या प्रवासाने एक सूत्र नक्की गवसले आणि ते म्हणजे "Developing belief..." हेच आगामी काळातील मिशन असणार आहे. 

२०१५ मध्ये एनएलपी विषयावरील चार दिवसांच्या कार्यशाळेत सहभागी झालो होतो आणि अलीकडे डॉ. विवेक काटदरे सरांच्या "सिक्रेट ऑफ सक्सेस" या विषयावरील कार्यशाळांनी मानवाच्या जीवनविषयक धारणांचे महत्व जाणवले. आपले संपूर्ण जीवन आपण काही मर्यादित धारणांवर (Limiting belief) जगत असतो, त्यामुळेच जीवनातील अनेक चांगल्या सुखद अनुभवांना मुकत असतो आणि "हे शक्य नाही..." किंवा " मला जमणार नाही..." या नकारात्मक भावनांमध्ये अडकून पडतो. व्यावसायिक जीवनाचा सुमारे तीन दशकांचा कालखंड अशा अनेक मर्यादित धारणांना मोडून काढण्यात आणि नवीन धारणा विकसित करण्यात गेला. व्यावसायिक जीवनासोबतच जीवनातील विविध क्षेत्रातील धारणा बदलण्याची वा चिरंतन व शाश्वत धारणा विकसित करण्याची आवश्यकता वाटते. आगामी काळात त्यादृष्टीने कार्य करण्याचे निश्चित करीत आहे. 

आपल्या जीवनाबद्दल सतर्क असणं आणि त्यासंदर्भांतील जाणिवा प्रगल्भ करणे म्हणजेच स्वतःबद्दल जागरुक होणे होय. आपल्या आंतरीक उर्मीने, नाविन्याचा ध्यास घेऊन स्वतःच्या कौशल्याने बदल स्वीकारणे, बदल घडविणे म्हणजे खऱ्या अर्थाने सजग होणे होय. जीवनातील अनेक गोष्टी करीत असतांना जाणीवपूर्वक बुद्धी, मन व चित्त स्थिर ठेवून सावधपणाने कृती करणं माणसाला शहाणपण बहाल करतं. वास्तविकतेची कास धरत, उपलब्ध साधनांची जाणीव ठेवत आपल्या कामाचे सुयोग्य नियोजन करणे यासाठी अत्यावश्यक आहे. आपल्या आचार, विचार व कृतीला, संयम आणि सातत्याने तटस्थपणे जोखत (तपासात) राहणे साक्षात्कारी ठरते आणि त्यातूनच आत्मज्ञान होत नवीन धारणा विकसित होतात असे मला वाटते. 

 यशस्वी जीवनासाठी आपल्या मर्यादित धारणांविषयीचा अनाठायी आग्रह सोडण्याची गरज आहे. "लोक काय म्हणतील ?" या समस्येवर मात केली पाहिजे. त्यासाठी मी जे पण करेल ते योग्यच अशा विश्वासाने व उत्साहाने कार्यरत राहणे म्हणजेच धारणा विकसित करणे होय. कामाच्या सुरवातीचा आपला उत्साह कायम टिकवून ठेवणे हि यशस्वीतेसाठीची पूर्वअट आहे. यासाठी आपण करीत असलेल्या प्रत्येक कार्यात आपली भावनिक गुंतवणूक असली पाहिजे. केवळ भावनिक गुंतवणूक पुरेशी नसून त्यासाठी कार्याप्रतीची आपली बांधिलकी तेव्हढीच महत्वाची आहे. उत्साह टिकून राहण्यासाठी केवळ बांधिलकी पुरेशी नसून आपण करीत असलेल्या कार्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. कार्यावरची निष्ठा, अनुभवातून आलेले शहाणपण व स्वीकारलेली जीवनावश्यक मूल्ये यावरच श्रद्धा जोपासली जाते. काम कोणतेही असो छोटे वा मोठे, कंटाळवाणे वा आनंददायी, अंतिम लक्ष्य ठरलेले असलं तर आपण करीत असलेली कार्ये अर्थपूर्ण वाटतात. त्यातूनच मोठे उद्दिष्ट साकारले जाते. उद्दिष्ट साकारणाऱ्या व्यक्तीच लौकिक अर्थाने यशस्वी ठरतात. 

 जीवनाला अर्थ प्राप्त करुन देण्याच्या क्षेत्रात यापुढे कार्य करायचे आहे. अर्थात आम्ही फक्त साधन राहणार आहोत. ज्याला त्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागते, आणि ती तो लढत असतोच. हि लढाई लढत असतांना अनेक अडचणी येतात. या अडचणीच आपल्या वाटचालीतील अडथळे असतात ते दूर करण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची आवश्यकता असते, त्यासाठीच हि धडपड नव्याने सुरु करावयाची आहे. आपण सोबत आहेत या खात्रीसह थांबतो... 

आपणा सर्वांना प्लव नाम संवत्सराचा मनापासून शुभेच्छा व निरामय दीर्घायुष्यासाठी कामना ! 

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४