Monday, 6 December 2021

तेथे कर माझे जुळती !


वृत्तिशून्य योगेश्वर डॉ. किशन काबरा


महाराष्ट्राला थोर अशी संत परंपरा लाभली आहे. संतांनी समाजोद्धाराचे कार्य आपल्या साहित्यातून केले आहे. या सर्वांचा उद्देश मानवी जीवनाचे कल्याण हेच होय. मानवी जीवनाचे कल्याण हे त्याच्या आत्मोन्नतीतच आहे. हि आत्मोन्नती कशी करावी याचा मार्ग दाखविणारे हे संत साहित्य. अशा परंपरेतील एक संत म्हणजे समर्थ रामदास. त्यांनी आपल्या दासबोधातून व मनाच्या श्लोकातून समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. हे कार्य कालातीत असून ते आजही मानवी जीवांच्या कल्याणासाठी मार्गदर्शक आहेत असे वाटते. समर्थांनी दासबोधात "वृत्तिशून्य योगेश्वरा"ची संकल्पना मांडली आहे. जळगावातील ज्येष्ठ उद्योजक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजकांचे आदरस्तंभ असलेले डॉ. किशन काबरा अर्थात काकाजी यांचे नुकतेच निधन झाले. काकाजींचे जीवन मला वृत्तिशून्य योगेश्वराचे प्रतीक आहे असे  वाटते. त्यासाठीच हा श्रद्धांजलीपर लेख.

समर्थांनी दासबोधात प्रपंचाच्या मर्यादा न सोडता परमार्थ करावा याचे उत्तम असे मार्गदर्शन केले आहे. काकाजींनी आपल्या जीवनात असा परमार्थ केला म्हणूनच ते म्हणू शकतात "स्वर्ग हवाय कुणाला ?". कारण जीवनात जे जे पाहिजे ते सर्व येथे भूतलावरच मिळाले आहे. हा भूतलच माझ्यासाठी स्वर्ग आहे. त्यामुळे मृत्यूपश्चात स्वर्ग मिळावा यासाठीची सामान्य माणसाची अपेक्षा त्यांच्या जिवंतपणीच पूर्ण झालेली आहे. जीवनातील प्रलोभनांपासून दूर राहून आवश्यक त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करुन जे हवे ते प्राप्त करता येते हेच त्यांच्या जीवनातून कळते. अर्थात हे साध्य झाले ते समर्थांनी मांडलेल्या प्रयत्नवादाद्वारेच शक्य झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात एका लहानशा खेड्यात जन्म झालेल्या काकाजींचे मातृछत्र फारच लवकर हरविले.  पत्नीवियोगाचे दुःख असलेल्या वडिलांचे प्रेमही फारसे मिळाले नाही. नानींनी (आईच्या आई) आईवडिलांची माया दिली आणि त्याच जीवनाच्या आदर्श ठरल्या. विपरीत परिस्थितीवर मत करीत उच्च विद्याविभूषित झाल्यानंतर आपल्या मातृभूमीतच कार्य करायचे त्यांनी ठरविले. आपल्या परिश्रमाच्या व द्रष्टेपणाच्या जोरावर बिर्ला उद्योग समूहात नोकरी मिळाली.

नोकरी करीत असतानांच आपल्यातील उपजत अशा उद्यमशील वृत्तीची त्यांना जाणीव झाली. या उद्यमशील वृत्तीला आपल्या कर्तृत्वाद्वारे फुलवीत त्यांनी आपल्यातील उद्योजक विकसित केला. तांत्रिक कौशल्य, माणसे जोडण्याची कला, व्यवसायातील गुणवत्ता व ग्राहकाचे समाधान, उद्योगासाठी लागणारी व्यावहारिक दृष्टी यामुळेच ते यशस्वी उद्योजक होऊ शकले. या सर्व प्रवासात समर्थांनी मांडलेला विवेक काकाजींच्या ठायी ओतप्रोत दिसतो. माणसातील विवेक जीवनातील दुःख उगाळत न बसता मनातल्या जाणिवा विकसित करतो. विवेकाच्या ज्ञान असते. हेच ज्ञान सामान्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी उपयोगी पडले तर लोक सन्मान करतात व त्यांच्यातल्या संतत्वाला परिणामही ! येथेच विवेक बहरतो. अशा प्रकारची ज्ञानदृष्टी संपादन करण्यासाठी श्रवण व मनन हा विवेकाचा मार्ग आहे. श्रवण आणि मनन केल्याने मिळविलेल्या ज्ञानाचे उन्मन होऊन ज्ञानाचे विज्ञान बनते. काकाजी आपल्या निवृत्तीच्या वयात हेच विज्ञान आम्हासारख्या तरुणांना सांगत होते.

जीवनातील प्रलोभनांना व आकर्षणांना समर्थांनी मूळमाया म्हटले आहे. या मूळमायेला नदीचे रुपक दिले आहे. नदी हि वृत्तीने चंचल असते. तिला फक्त प्रवाहित राहणे माहिती असते. धावणे आणि पुढे जाणे एव्हढेच तिचे उद्दिष्ट. धावत असतांना कोणता मार्ग श्रेयस्कर आहे याचे भान तिला नसते. डोंगर, पठार, वाळवंट काहीही असो वाहने हेच तिचे कार्य. वाहत असतांना काय वाहून नेते हे पण तिला माहित नसते. नदीचे हे गुण मानवी वृत्तीत आढळतात. यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे षडरिपू असतात. यामुळे माणूस स्थूलरुपाकडे अनाहूतपणे जात राहतो. मात्र काकाजींसारखे काही व्यक्ती आपल्या वृत्ती बदलतात. सूक्ष्मात जातात. अभ्यासाने, चांगल्या व्यक्तींच्या सहवासाने त्यांना जीवनाचा अर्थ कळतो आणि त्यातील आनंद ते उपभोगतात आणि तो आनंद स्वर्गसुखाचा असतो. अशी वृत्ती म्हणजे माणसाला नदीच्या उगमापलीकडे घेऊन जाणारी असते आणि त्यांना त्यापलीकडे नदीही दिसत नाही. आजच्या भौतिक जगात माणूस या नदीरूपी मूळमायेच्या मागे धावत असल्याने त्यांना जीवनाचा आनंद सापडत नाही. कायम समाधानी, आनंदी, उत्साही व चिरतरुण असलेल्या काकाजींना आपल्या जीवनाचे इप्सित कळले होते आणि त्यासाठीच जगत होते. अशा व्यक्तींना समर्थ "वृत्तिशून्य योगेश्वर" म्हणतात.

काकाजींच्या पवित्र आत्म्यास सद्गती प्राप्त होवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ परमेश्वर देवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४

Saturday, 4 December 2021

अभिव्यक्ती

ब्रीदवाक्य जीवनाचे ! 

सध्या व्यावसायिक जीवनात ब्रिदवाक्याला विशेष महत्व आहे. काही कंपन्या वा संस्था त्यांच्या ब्रिदवाक्याने ओळखल्या जातात. या ब्रिदवाक्याद्वारे संस्था / कंपनी आपले धोरण जाहीर करीत असते. कंपनीची वा संस्थेची दिशा, उद्देश या ब्रिदवाक्यातून सांगितली जाते. ती संस्थेच्या सर्व घटकांसाठी प्रेरणा देखील असते. व्यक्तिगत जीवनासाठी पण असे ब्रीदवाक्य घेऊन जगणारे काही असतील असा विचार करून समाज माध्यमाद्वारे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवनाबाबत विचार करून जगणाऱ्या व ते व्यक्त करणाऱ्यांची संख्या मर्यादित असली तरी प्रत्येक जण आपले जीवन एका उद्दिष्टांनी जगत असतो कारण जीवन जगण्याचा एक हेतू असतो असा मला विश्वास आहे. या लेखातून सर्वांच्या ब्रिदवाक्यांना ढोबळमानाने  जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मागील उद्देश आपणा सर्वांना त्यातून प्रेरणा मिळावी व आपणही आपले एक ब्रीदवाक्य घेऊन जीवनाचरण करीत आहोत ते व्यक्त करावे आहे. 

सर्वसाधारणपणे या ब्रिदवाक्यांची तीन प्रकारे विभागणी करता येईल. ती अध्यात्मिक, व्यक्तिगत विकास व नरसेवा अशी आहे. आपल्याला जीवनात काय करायचे आहे, कसे कार्याचे आहे, जीवन कसे जगायचे आहे याची स्पष्ट कल्पना येते. येथे व्यक्तींच्या भावना शब्दबद्ध करण्याचा किंवा त्यांच्याच शब्दात देत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपला देश, राष्ट्राप्रतीची आपल्या राष्ट्राच्या वारसांबद्दल आपली समर्पित भूमिका असलेली ब्रिदवाक्ये तीन व्यक्तींनी मांडली आहे. ती अशी समर्थ भारत , सुरक्षित भारत ।, ऐतिहासिक वास्तू / वस्तूना भेटी देणे, समजावून घेणे आणि लोकांपर्यंत पोहोचवणे , माझ्यामुळे राष्ट्र व धर्म मजबूत व्हायला मदत व्हावी 

व्यक्तिगत जीवनात प्रत्यक्ष कृतीला प्राधान्ये देणारी ब्रिदवाक्ये सर्वात जास्त आली आहेत. प्रामुख्याने हि वाक्ये शालेय जीवनात पालकांनी वा शिक्षकांनी आपल्या कृतिशील आचरणातून व शिकवणीतून दिलेली दिसतात. अनेकांनी व्यक्त होत असतांना त्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. यात जीवन, यश, सुख-दुःख, समाधान, समस्या, स्वप्न, मेहनत, शिक्षण, हुशारी, श्रम, कर्तव्य, प्रामाणिकपणा, विचार, प्रयत्न, सत्य, खरे-खोटे,  अपेक्षा, संकल्प, संयम, सार्थकता, सर्वोत्कृष्टता, चुका, कृती, पैसे या शब्दांचा अंतर्भाव आलेला आहे. अनुभवातून आलेली हि वाक्ये माणसाची प्रगल्भता दाखवितात. Nothing is impossible | आणि केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे... हि वाक्ये प्रत्येकी दोघांनी सांगितली आहेत. इतर काही वाक्ये अशी To admit you were wrong is to declare you are wiser now than before, नेहमीच करू या सत्य तीच बात... खोट्याच्या पाठी घालू या लात..., Focus on Solutions, सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना... जीवन हे खूप सुंदर व अनंत सुख व दुःखाच्या विचारांचा महासागर आहे, Train your mind to see good in every situation. Whatever happens is always for good. Honest efforts are always rewarded. Education and hard work never go waste. We must continue to do our deeds and duties honestly. (आपण आपले कर्म व कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावे.), Thus far and no further । , The best is yet to come... , दाम करी काम ।, श्रम संकल्प संयम... , कुठल्याही क्षेत्रात जा पण त्या क्षेत्रातील उत्तुंग यश मिळवा... जीवन सौहार्दपुर्ण जगा, त्यातच जीवनाचा खरा सार आहे , १) जीवनाची मर्यादा नक्की ठरवा , २) आहे त्यात समाधान मानावे , ३)  नाही त्याचे दुःख मानू नये

बहुतांश मित्रांनी नरसेवा हीच नारायण सेवा अर्थात सेवा, इतरांसाठी काही तरी करण्याची भूमिका आपल्या ब्रिदवाक्यातून मांडली आहे. आपल्याला जे मिळालं आहे, ज्यांच्यामुळे मिळालं आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून समाज ऋण फेडण्याची वृत्ती दिसते. आपल्याकडे जे अतिरिक्त आहे ते देण्याची वृत्ती या ब्रिदवाक्यातून दिसून येते. यात समाज, सामाजिक कार्य, मदत, आनंद, हित, सेवा, सहकार्य या शब्दांचा अधिक वापर दिसून येतो. काही ब्रिदवाक्ये अशी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे | घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ||, मी सगळ्यांना मदत करेन पण मी शक्यतो कुणाची मदत घेणार नाही , सामाजिक कार्य व मदतीसाठी कायम पुढे , प्रत्येकाला सहकार्य करणे प्रसंगी स्वतःची गैरसोय कितीही गैरसोय होवो , Live life and make others Happy |, यश हे कष्टात आहे, सेवेत आहे, पैशात नव्हे |

Always be helpful to others ।, आपल्या आजूबाजूला आनंद पसरविण्याचा प्रयत्न ।, सर्वांसाठी वेळ पण वेळेत सर्व..।, जे जे आपणासी ठावें , ते इतरासी सांगावे ।, हे जीवन एकदाच मिळते, स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगा, गंजून जाण्यापेक्षा झिजुन गेलेले कधीही चांगले..., सब समाज को लिए साथ आगे जाना है । एका मित्राने आपण जे पण कार्य करू त्यापूर्वी स्वतःला चार प्रश्न विचार ते काम करायचे कि नाही हे ठरवतो आणि तीच ब्रिदवाक्ये असल्याचे सांगितले आहे. खरं तर रोटरी या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सदस्य असल्याने त्या संस्थेची कार्य करण्यासाठीची ती प्रमुख चाचणी आहे. ते चार प्रश्न Is it the TRUTH ? Is it FAIR for the all concerned ? Will it build GOODWILL and BETTER FRIENDSHIP ? Will it be Beneficial for all concerned ?

भारतीय तत्वज्ञान ज्यावर आधारित आहेत त्या अध्यात्मिक चिंतनातून मांडलेली काही वाक्ये आली आहेत. अंतिम सत्य, शाश्वत शांती, सफलता, कर्म, परमात्मा, गुरु, नामस्मरण, देव, परमेश्वर, भगवंत यांचा वापर यात दिसून येतो. काही ब्रिदवाक्ये असे. Persistence for eternal Peace , कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |, परमात्मा जे काही आहे ते मीच आहे, परमेश्वर माझ्यातून माझ्यामार्फत प्रकट होत आहे आणि सर्व काही परमेश्वराकडून येऊन परमेश्वराकडे समर्पित होत आहे. हा लेख वाचल्यानंतर आपल्यालाही आपली ब्रिदवाक्ये सुचतील. त्यावर जरुर विचार करा आणि मला कळवायला विसरू नका. 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Thursday, 2 December 2021

गाणं मनातलं !

मन वढाय वढाय...

मानवी जीवनात गीत - संगीताचं स्थान अतूट आहे. खरं ते औषध आहे. गाणं मनातलं लिहायला सुरुवात केल्यापासून इतकी गाणी आठवतात आणि त्यावर लिहावेसे वाटते. असंच काहीसे आज झाले. पण खान्देश कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शालेय जीवनापासून मनात रुंजी घालणारं एक आशय संपन्न गीतावर लिहावे असं ठरवलं. 

मानवी जीवनात मनाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. यापूर्वीच्या दोन्ही गीतांमधून आपले मानसिक स्वास्थ्य सुदृढ होण्याचे  दृष्टीने आपण दोन गीते पाहिलीत. यावेळेचं कवयित्री बहिणाबाईंची कविता मुळात या मनाचं वर्णन करणारी घेतली आहे. अलीकडच्या कालखंडात मानवी मनाचे अनेक प्रकार आपण अनुभवले. मात्र "माझी माय सरसोती" म्हणणाऱ्या या प्रत्यक्ष शारदेने त्याचे वर्णन अतिशय चपखल पद्धतीने आपल्या प्रगल्भ जाणिवेतून फार पूर्वीच करून ठेवले आहे. मनाच्या अस्वस्थतेमुळे व परिस्थितीशी समायोजन करण्यास असमर्थ ठरणाऱ्या व्यक्तींच्या आत्महत्यांमुळे मन अनेकदा व्यथित होते व त्यासाठी काहीतरी करावे असे नेहमीच वाटते. त्यासाठी या कवितेचा अभ्यास नक्कीच लाभदायक ठरतो. पाहू या तर मग कसं आहे हे मन... मन वढाय वढाय या कवितेतून...

मन वढाय वढाय

उभ्या पीकांतलं ढोर,

किती हांकला हांकला

फिरी येतं पिकांवर.

मनाची विशेषता व लक्षणे बहिणाबाईंनी या कवितेतून मांडली आहेत. डवरलेले पीक ज्याप्रमाणे जनावराला आकर्षित करतं त्याला कितीही वेळा हाकललं तरी ते पुन्हा पुन्हा फिरून तिथेच येणार तसंच मनाचं पण आहे. एखादा विषय आपण मनातून काढून टाकायचा प्रयत्न केला तरी ते पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीकडे जातं. 

मन मोकाट मोकाट

त्याले ठायीं ठायीं वाटा,

जशा वार्‍यानं चालल्या

पान्यावर्‍हल्यारे लाटा.

मन मुक्त आहे, स्वच्छंदी आहे. त्यामुळे त्याला वाटाच वाटा आहेत. वाऱ्यामुळे ज्याप्रमाणे पाण्यावरती लाटा निर्माण होतात तसेच अनेकविध विचारांचे तरंग मनात निर्माण होतात. 

मन लहरी लहरी

त्याले हातीं धरे कोन?

उंडारल उंडारलं

जसं वारा वाहादन.

मन लहरी आहे. ते वाऱ्या वादळासारखं कुठेही फिरतं. त्याला हातात कोण धरू शकेल ? असा प्रश्न बहिणाबाई विचारतात.

मन जह्यरी जह्यरी

याचं न्यारं रे तंतर,

आरे इचू, साप बरा

त्याले उतारे मंतर !

मन जहरी(विषारी) पण असतं. त्याच तंत्र कोणालाही समजू शकलेलं नाही. विंचू किंवा सापाने चावलं तर  किमान मंत्राने विष उतरवता येत मात्र मनाचे तसे नाही. 

मन पांखरू पांखरूं

त्याची काय सांगूं मात ?

आतां व्हतं भुईवर

गेलं गेलं आभायांत.

मन अतिशय चंचल आहे. ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. एखाद्या पाखरासारखं ते एका क्षणात जमिनीवर तर दुसऱ्या क्षणाला आभाळात असतं. 

मन चप्पय चप्पय

त्याले नहीं जरा धीर,

तठे व्हयीसनी ईज

आलं आलं धर्तीवर.

मन चपळही आहे. त्याला धीर नाही नाही संयम नाही. आकाशात चमकणाऱ्या एखाद्या विजेसारखं वेगाने ते जमिनीवर येतं.

मन एवढं एवढं

जसा खाकसचा दाना,

मन केवढं केवढं ?

त्यांत आभाय मायेना.

मनाचा आकार सांगतांना त्याला बहिणाबाईंनी खसखस आणि आभाळाची उपमा दिली आहे. मन खसखशीच्या दाण्या एव्हढं छोटं असतं तर कधी आभाळापेक्षाही मोठं असतं.. क्षुद्र आणि उदार असे दोन्हीही रूप सांगितली आहेत.

देवा, कसं देलं मन

आसं नहीं दुनियांत !

आसा कसा रे यवगी

काय तुझी करामत !

या कडव्यात बहिणाबाई देवालाच म्हणतात देवा असं कसं मन दिल आहेस. सगळ्या दुनियेत असं काही नाही. तू असा कसा योगी आहेस आणि काय तुझी करामत आहे. 

देवा, आसं कसं मन ?

आसं कसं रे घडलं

कुठे जागेपनीं तुले

आसं सपन पडलं !

शेवटच्या कडव्यात त्या देवाला प्रश्न विचारतात देवा जागेपणी स्वप्नातच हे मन घडवलं का ? असं कसं घडवलं ? कसं बनवलस ? 

निसर्गकन्या म्हणून सर्वश्रुत असलेल्या बहिणाबाईंनी खान्देशी बोलीतून माणसाला सहज समजेल अशा पद्धतीने हि कविता साकारली आहे. सामाजिक परिस्थितीतील माणसाच्या वर्तनावरून हि कविता स्फुरली असावी असे वाटते. शालेय अभ्यासक्रमात शिकलेली हि कविता आजही मनात घर करून आहे. त्यावर नियंत्रण मिळविणे, त्याला कह्यात घेणं, यासाठी तर लिहिली नसेल ना असेही वाटून जाते. या थोर कवयित्रीला विनम्र अभिवादन ! 

Thursday, 25 November 2021

गाणं मनातलं !

प्रार्थना आणि मानवी जीवनाचं अतूट नातं आहे. श्रद्धा आहे तिथे प्रार्थना अर्थ आहे.  प्रार्थनेतील आर्ततता आपल्या भावना पोहचतात. माणसाचे विचार हे त्याच्या कर्माचे मुळ आहे. प्रार्थना हा देखील एक विचार आहे तो कार्यप्रवण करणारा आहे. तो इप्सित साधणारा विचार आहे. माझ्या आवडीचं आणि मनातलं गाणं यावेळी एक प्रार्थना आहे. रामराज्याची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी येथील प्रत्येक मानवाने हि प्रार्थना केवळ म्हणुन उपयोग नाही तर ती आर्ततेने म्हटली पाहिजे. आपण तसे वागत असलो तर आर्तता आपोआप येते. 

मागील कोरोनाच्या संपुर्ण कालखंडात अनेकांना सेवेचं आणि जगण्याचं बळ या प्रार्थनेनं दिलं. समुपदेशनात / व्याख्यानात / प्रशिक्षणात या प्रार्थनेचा वारंवार वापर करतो. माणसाने प्रथम माणुस होणे अत्यावश्यक आहे तर जगणे सुलभ होते. भौतिक आकर्षणांना बळी न पडता नैसर्गिक जीवनशैलीचा स्वीकार करीत माणुसकीचे जगणे अर्थपूर्ण ठरते. एवढी प्रस्तावना पुरेशी आहे. 

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

सहज सोप्या भाषेत कवीने मागणी केली. सामाजिक परिस्थितीतून संवेदनशील मनाने उत्कटतेने प्रकट झालेली हि भावना आहे.

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

निराशा, नकारात्मकता, उदासीनता यासारख्या दुःखाचा अंधार सर्वत्र असला तरी उद्या सत्याचा सुर्य उगवणार आहे अशी आशा कवीने व्यक्त केली आहे. मात्र सत्याचा सुर्य उगविण्याची वाट पहात न बसता आपण काजव्यांप्रमाणे जगले पाहिजे. त्या मंद प्रकाशातुनच सुरु असलेली वाटचालीने उद्याचा सुर्य पहाता येणार आहे. काजव्यासारखे जागणे म्हणजेच माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे.
 
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

आज ज्या गोष्टींमुळे माणुस माणसाला पारखा होत आहे ते द्वेष संपु दे. मिळालेले जन्म कुठल्याही भेदात अडकू नये. परस्परांमधील साहचर्याच्या भावनेने सर्वांना एकरुप होऊ दे. निष्ठा व आशेतुनच नितळ, निरागस माणसेच शुद्ध व सात्विकता निर्माण करु शकणार आहे. यासाठीच माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. 

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

मिळालेले आयुष्य चांगले जगावे. एक एक पाऊल पुढे टाकत हा प्रवास सुरु ठेवला पाहिजे अन्यथा बाहेरील आव्हानांमुळे / मनातील हतबलतेने जेथे थांबाल तेथेच संपला. आता घेतलेला श्वास, मिळालेले क्षण, संधी अगदी आयुष्य पुन्हा लाभणार नाही त्यामुळे छान जगा अर्थात माणसाने माणसाशी माणसासारखेच वागा. हि मागणी आहे, प्रार्थना आहे. यात वैश्विक कल्याण आहे.  

कवी समीर सामंत यांनी लिहिलेली हि प्रार्थना रोज सकाळी एकदा तरी ऐका...

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४

Thursday, 18 November 2021

गाणं मनातलं !

आकाशी झेप घे रे पाखरा...



माझ्या आवडत्या गाण्यांमधील एक म्हणजे "आराम हराम आहे" चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले, मा. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी गायलेले व संगीतबद्ध केलेले आकाशी झेप घे रे पाखरा...! अतिशय अर्थपूर्ण व जीवनाला दिशा देणारे हे गीत आहे असे मला वाटते. प्रत्येकाला यशस्वी जीवनाच्यादृष्टीने मार्गदर्शन करणाऱ्या गीतातील प्रत्येक कडवे प्रेरणादायी आहे. जन्मदिनाच्या निमित्ताने त्या गाण्याबद्दल लिहिणे हा सुयोग...

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देत असतांना कृतार्थता अनुभवायची असते. सुख, समाधान, आनंद आणि यश यामागे तो धावत असतो. परक्षित गोष्ट साध्य झाली नाही तर अनेकदा निराश होतो. आपल्या प्रश्नांची, आव्हानांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो मात्र बहुतांश वेळेस पदरी निराशाच पडते. या गीतातील "तुज कळते परी ना वळते" हे वाख्या बरंच काही सांगते. कवी आपल्या प्रतिभेने एक वेगळाच विचार व दिशा या गीतातून देतो. थोडक्यात सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाने ज्याप्रमाणे आपल्या पंखांच्या जोरावर भरारी घेतली पाहिजे त्याप्रमाणे प्रत्येक मानवाने आपल्या क्षमता, कर्तृत्व व श्रमाने आपले घर प्रसन्न केले पाहिजे असा संदेश या गीतातून मिळतो.

आयुष्यच सर्व तत्वज्ञान अतिशय सोप्या पद्धतीने कवी सांगतो...

आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा

माणूस स्वप्ने मोठी पाहतो मात्र त्यासाठी आपला नित्यक्रम सोडण्याची, कष्ट करण्याची, वेगळी वाट निवडण्याची तयारी नसते. आपली इप्सित साध्य करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी हवी. सध्याची वरकरणी आरामदायी व सुखकारक जीवनशैली बदलण्यासाठी तो फारसा उत्सुक नसतो. मात्र याच सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची हाक कवी आपल्याला देतो. 

तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते  खाया

सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा

युवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. पालकांनी निर्माण केलेल्या वैभवावर किती दिवस अवलंबून राहणार? शरीराला कोणतीही झीज पोहोचू न देता असं किती दिवस चालणार ?

घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा

मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा जैसा उंबरा

घरात सहजतेने मिळणाऱ्या गोष्टींच्या मोहात अडकू नका. अशा घरात मिळणारे अन्न हे विषसमान आहेत आ ते घर हे खऱ्या अर्थाने तुरुंग आहे असे कवी मांडतो. अशा परिस्थितीतून  बाहेर पडण्याची कास धर.

‘तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने

दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा’

माणूस अनेकदा स्वतःला कमी लेखतो. आपल्याला जमणार नाही अशीच त्याची मनस्थिती असते. निसर्गात मानवामध्ये प्रचंड सामर्थ्य असते. त्याची जाणीव झाली कि त्याला कोणीही रोखू शकत नाही. जीवनातील वास्तव व आभासी कल्पनांवर मात कर आणि त्यासाठी तुझ्याकडे सर्व काही आहे. तू केलेल्या अपेक्षांपेक्षाही अधिक करता येऊ शकेल.

कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते

हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गेले... या उक्तीप्रमाणे श्रमाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. सर्व कळूनही अपेक्षित बदल स्वतःमध्ये घडवून आणू न शकल्याने तू अस्वस्थ आहेस का ? असे कवी विचारतो. 

घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले

घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा

आपल्या क्षमतांना श्रमाची व सकारात्मक कृतीची जोड दिल्याने मिळालेले साध्य अधिक आनंददायी ठरते. जीवनाला श्रम मूल्याची जोड दिल्यास घरातील वातावरण प्रसन्न होते. अशा प्रकारची प्रसन्नता दैवी व सात्विक असते. जीवनाचं क्लिष्ट असलेलं तंत्रज्ञात सर्वांना सहज समजेल अशा सोप्या शब्दात सांगणे हि अवघड कला आहे. बाबूजींच्या स्वरांनी त्या संपूर्ण गाण्याला दिलेली चाल सोपी आहे आणि म्हणूनच आजही सामान्यजनांच्या हृदयावर हि अशी गाणे राज्य करतात. 

आपणही डोळसपणे या गीताचा अभ्यास करावा म्हणजे आपणास सर्व काही प्राप्त होईल. मंडळी आपल्याला या गीताबद्दल काय वाटते ते प्रतिसादाच्यारुपात जरूर मांडा...

गिरीश कुळकर्णी

९८२३३ ३४०८४ 


Tuesday, 9 November 2021

गरज मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची !



मनुष्य हा समूह प्रिय प्राणी आहे. त्याला लोकांसमवेत मग ते नातेवाईक असो वा सहकारी असो वा शेजारी वा समाज घटक त्याच्याशी संवाद साधायला आवडते. कुटुंब संस्था हे त्याचे प्रतीक असून भारतीय संस्कृतीचे बलस्थान आहे. यात परस्पर सहकार्य, संवाद याला विशेष महत्व आहे. यातूनच नात्यांची घट्ट वीण बांधली जाते. जेथे मानवाचा संबंध येतो तेथे मन येतेच. जेथे मन आहे तेथे विचार आहे. माणूस या एकमेव प्राण्याकडे विचार करण्याची, विचारांचे आदानप्रदान करण्याची नैसर्गिक व उपजत शक्ती आहे. विचारांचा प्रभाव माणसाच्या जीवनावर पडतो. सुदृढ शरीरासारखे मनही सुदृढ असले पाहिजे म्हणजे मानवी जीवन आनंदी व सुखकर होत असते. दिवसभरात माणसाच्या मनात हजारो विचार येतात. हे विचार संस्कारातून, जाणिवेतून, अनुभवातुन, आपल्या विचारसरणीतून येत असतात. काही विचार हे शिक्षण व सहवासातूनही येत असतात. माणूस रिकामा बसला असला तरी मनात विचार सुरुच असतात. सकाळी उठल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत विचार सुरु असतात. काम सुरु असतांनाही अंतर्मनात (बॅक ऑफ द माईंड) विचार सुरु असतात आणि या विचारातूनच जीवन घडत असते.

'कोरोना' या जागतिक महामारीने माणसाच्या मनात विचारांचे प्रचंड काहूर माजले होते. आता आपण पूर्वपदावर येत असून भीती कमी होत आहे. 'कोरोना'सारख्या घटनांना "ब्लॅक स्वान इव्हेन्ट" म्हणतात. हि अशी घटना असते कि ज्यामुळे सर्व जग प्रभावित होते. अनपेक्षित, अकल्पित व अनाकलनीय अशा या घटनेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातील एक समस्या म्हणजे मानसिक स्वास्थ्य राखण्याची !  कोरोनापूर्वीही हि समस्या होतीच मात्र कोरोनामुळे त्यात अधिकच भर पडली, असे म्हणता येईल आणि म्हणूनच आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मानसिक स्वास्थ्य म्हणजे जीवनात / आयुष्यात येणाऱ्या, होणाऱ्या, घडणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट घटना / अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे. कुटुंबातील व समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे. यात माणसाच्या भावना, विचार, परस्परसंबंध व दैनंदिन जीवनातील गोष्टी यांचा समावेश होतो. आपले मानसिक स्वास्थ्य तपासून पाहण्याकरता खालील गोष्टींचा विचार केला पाहिजे.

- इतरांशी विशेषतः निकटवर्तीयांशी आधारदायी व स्थिर नाते जुळविण्याची क्षमता

- आप्तेष्टांच्या व समाजाच्या कल्याणाशी बांधिलकी

- समस्या, दडपणे व संकटे यांना तोंड देण्याची तयारी

- आपल्यासह इतरांच्या व्यक्तिमत्वाचा योग्य आदर राखून महत्व देण्याची तयारी

- जीवनात वाटचाल करण्यासाठी लागणारी समर्पक वृत्ती व जोपासलेली मूल्ये

- आत्मप्रतिमा उंचावलेली नसली तरी डागाळलेली नसणे. स्वतःच्या उणिवा मान्य करुन त्या दुरुस्त करण्याची स्वतःची क्षमता वाढवून पूर्णत्वाला न्यायची तयारी.

मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी

- मोकळा संवाद

- सकारात्मक विचार (नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणे)

- कुटुंबात निरोगी व पोषक वातावरण असावे.

- परस्परांविषयी प्रेम, आदर असावा

- आपले छंद जोपासले पाहिजेत जसे वाचन, लेखन, पोहणे, फिरणे, खेळणे इ.

- तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर

- वास्तवात जगायला शिकले पाहिजे

- जीवनात सर्वच गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत याची खूणगाठ बांधली पाहिजे.

- पुरेशी झोप / झोपे पूर्वी व उठल्यावर सकारात्मक विचार यासाठी आपण सकाळी उठल्यावर माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची ५ वाक्ये स्वत:शी बोलली पाहिजेत - १. मी चांगला व्यक्ती आहे. २. मी हे करु शकतो. ३. मी जिंकणारा आहे. ४. परमेश्वर माझ्यासोबत आहे. ५. आजचा दिवस माझा दिवस आहे.

- नैसर्गिक जीवनशैली - आहार, विहार व आचार

- नियोजनपूर्वक जीवन

- चांगल्या सवयी

- कामातला आनंद (आस्था / श्रद्धा / निष्ठा )

- स्वतःची वैचारिक बैठक

- गांधीजींनी सांगितलेली एकादश व्रत पालन सत्य, अहिंसा, अस्तेय, असंग्रह, स्वदेशी, सर्वधर्मसमभाव, स्पर्श भावना, अभय, ब्रह्मचर्य, शरीरश्रम, आस्वाद

- योग, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार

- शरीर - मन - मेंदू यात योग्य संतुलन

मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची कारणे

- अनुवंशिकता 

- आजची गतिमान व स्पर्धात्मक जीवनशैली

- हवी असलेली गोष्ट लगेच हवी हि वृत्ती

- विभक्त कुटुंबपद्धती

- सामाजिक व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष

- संवादाचा अभाव / ताणतणाव

उपाय व उपचार

- मानसिक स्वास्थ्यात Prevention is Better than Cure अर्थात उपचारांपेक्षा प्रतिबंध जास्त प्रभावी हा नियम मानसिक आरोग्य संवर्धनासाठी जास्त लागू पडतो.

- तातडीचे उपचार

- मानसोपचार

- औषधे

- पुनर्वसन इ.

संवादातून संबंध दृढ होतात. या संवादातून होणारे समाज-गैरसमज मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. कसे तो थोडक्यात समजून घेऊ या !

- कोणी व्यक्ती मनाला लागेल असे बोलल्याने त्या माणसाबद्दलची अढी निर्माण होते. त्याचे बोलणे प्रत्येक वेळी मनावर घेतले जाते. त्यातून नकारात्मक विचार येतात. माणूस कोषात जाणे पसंत करतो. शेवटी संबंध तुटतात.

- घनिष्ट नात्यात क्षुल्लक गोष्टही मनाला लागते. अशा गोष्टी विसरता येत नाही. खुलेपणाने संवाद झाल्यास गैरसमज दूर होऊ शकतो अन्यथा संबंध खुंटण्याचा संभव असतो.

- नात्यात ओलावा नसल्यास गैरसमज लवकर होतात. नात्यात घर्षण निर्माण होते व कटुता निर्माण होऊन संबंध ताणले जातात.

- स्वाभिमानी माणसाच्या संवादात गरज नसतांना स्वाभिमान संवादात आल्यास गैरसमज वाढतात.

व्यक्ती संबंधातील स्वास्थ्य दृढ करुन मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी खालील गोष्टी अवश्य कराव्यात...

- गप्पा / खेळ / आनंद

- मोबाईल / टीव्ही व त्यावरील नकारात्मक गोष्टी व चर्चांपासून लांब राहावे.

- वास्तव व आभासी जगावर लहान-मोठ्यांची चर्चा

- ज्यांच्याशी बऱ्याच दिवसात संवाद झाला नाही त्यांच्याशी संवाद साधावा.

- वादविवाद व टीकाटिप्पणी असावी मात्र त्यामागील कार्यकारणभाव स्पष्ट करावा.

- कौतुक व कृतज्ञता याचा नियमित वापर

- संपर्कातील व्यक्तीच्या गुणांकडे विशेष लक्ष

- इतरांना द्या (वेळ, पैसे, मदत इ.)

- हीच आमुची प्रार्थना / तू बुद्धी दे यासारख्या प्रार्थना एकत्रित म्हणा

- आनंद / सुख / प्रेम / यश / जीवन / सकारात्मकता / पैसा / तंत्रज्ञान / जगायचं का ? यासारख्या विषयांवर गप्पा

मानसिक स्वास्थ्यासाठी आपल्या विचारांकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे व ते नेहमी सकारात्मकच असतील याची काळजी घ्यावी.


Monday, 1 November 2021

महासुखाची दिवाळी



"अहो, ऐकलंत का ?" 

"हं "

"मी काय म्हणते ? दिवाळी ८ दिवसांवर आलीय. बऱ्याच दिवसांनी पोरगं येणार आहे. यावर्षी लेक आणि जावईबापू पण येणार आहेत. साफ-सफाई तर केली आहे मी, पण खरेदी बाकी आहे आणि ती तुमच्याशिवाय पूर्ण होणार नाही. परमेश्वरी कृपेने यावर्षी सर्व व्यवस्थित आहे. बऱ्याच दिवसांनी सर्व गोतावळा एकत्र येणार आहे. यावर्षी मला सुखाची दिवाळी अनुभवायची आहे." 

"सुखाची दिवाळी ? कशी असते ती ?"

"अहो, म्हणजे सर्व एकत्र येणार. त्यामुळे मी दिवाळीचा सर्व फराळ घरीच करणार आहे. छान तीन दिवसांचे मेनूही ठरवले आहेत. सर्व घरीच करणार आहे मी. मात्र ज्याला जे पाहिजे ते तुम्ही नक्की द्या म्हणजे झाली माझी दिवाळी सुखाची..."

"अच्छा, म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग !"

"बरोबर"

"हि तुझी सुखाच्या दिवाळीची कल्पना तर"

"म्हणजे ?"

"अगं, तुझी जशी सुखाच्या दिवाळीची कल्पना तशी मुलांची पण काही तरी असेलंच कि ! मग त्यांनाही विचारायला नको का ?"

"तेही खरंच ! आणि तुमची पण असेल..."

"हे काय विचारणं झालं ?"

"त्यांचं पाहू नंतर पहिल्यांदा तुमची सुखाच्या दिवाळीची कल्पना सांगा बरं"


"तुला माहिती आहे मी वर्तमानात जगणारा माणूस ! माझ्यासाठी कालची, आजची आणि उद्याची दिवाळी सुखाचीच... मात्र त्यात एकच गोष्ट सारखी आणि ती म्हणजे आनंद ! हा आनंद फराळ, कपडे यात फार नाही. आमच्या काळी वगैरे भानगड नाही. कालाय तस्मै नमः अशी नकारात्मक भावनाही नाही. सर्वांचा आनंद हा माझा आनंद..."

"तुमची कल्पना चांगलीच आहे पण... कपडे घ्यायला नको का ? पोरगं नवीन मोबाईल मागतोय आणि कमावतोही पण तुमचा होकार मिळाल्याशिवाय घेणार नाही. मुलगी आणि जावई २ वर्षांनी येणार त्यांना काही द्यायला नको का ?"

"यामुळे त्यांना आनंद मिळणार असेल तर नक्कीच देऊ या !"

"हे कसं ठरवणार ?"

"मी करतो बरोबर... दोघांना लगेच व्हाट्सअपवर मेसेज टाकतो. आपण सर्वांनी दिवाळीचा आनंद घ्यावा यासाठी तुमची सुखाच्या दिवाळीची कल्पना सांगा ?"

"चालेल... पण मग फराळ, कपडे, मोबाईल आणि जावईबापूंच्या भेटवस्तुंचे काय ?"

"ते आपण घेऊच कारण ते तुझ्या सुखाच्या दिवाळीसाठी !"

"मग ठीक आहे, बाकी तुम्हाला काय करायचे ते करा. खरेदीसाठी मात्र आपण आजच जाऊ या ! म्हणजे मला नंतर फराळाकडे लक्ष देता येईल."

"चालेल"

उत्साह, चैतन्य आणि सुखाच्या सोहोळ्याचा सण असलेल्या दिवाळीच्या सणाची तयारी घराघरात सुरु असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा करीत असतांना आपल्या पुढच्या पिढीला भारतीय संस्कृतीचा हा वारसा सहजपणे दिला जातो. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हा प्रातिनिधिक संवाद... प्रेम, माया व आपुलकीने नात्यातील ऋणानुबंध घट्ट करण्यासाठीची, कुटुंब संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठीची हि धडपड... 

"अहो, तुम्हाला 'थँक्यू' म्हणायचे आहे."

"का ?"

"अहो अगदी मनासारखी खरेदी झाली आज. पोरगं आल्यावर त्याला त्याच्या आवडीचा मोबाईल तेव्हढा घेऊन द्या म्हणजे झाली बाई माझी सुखाची दिवाळी... अगं बाई, मी बोलत काय बसली. तुम्हाला पहिल्यांदा चहा देते..."

"नको, तू बैस. सकाळी चादरी-उशा धुणं, डब्बे घासून वाळवणं याची गडबड आणि नंतर हि खरेदी... यात दमली असशील... मी करतो चहा..." 

"अहो तुमचंही काही ना काही काम सुरु होतंच. तुमच्या मदतीशिवाय वरची कामं आणि खरेदी झालीच नसती." 

"हा मोबाईल घे आणि पोरांच्या सुखाच्या दिवाळीच्या कल्पना काय ते वाच... तोपर्यंत मी आपल्यासाठी चहा घेऊन आलोच."

"अरे हो... मी विसरलेच."

"पहा तर काय म्हणताय पोरं..."

"अहो, चहा छानच झालाय..."

"ते जाऊ दे ! पोरांची सुखाची दिवाळी काय म्हणते ?'

"अहो, मुलं मोठी झाली आणि समजदारही !"

"याच श्रेय तुझंच बरं ! त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांची काळजी घेणं, हवं-नको ते पाहणं हि काम तुझीच. मी दिवसभर नोकरीच्या निमित्ताने गावोगाव भटकलो. अगदी ठरवून कधीतरी पालक सभेला आलो. पैसे देणं तेही ओढाताण करीतच... एव्हढंच माझं काम !"

"अहो, असं काय म्हणता ? पोरांना योग्य वयात द्यावयाचे स्वातंत्र्य, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची बांधिलकी, त्यांच्यावर टाकलेला विश्वास, करियर आणि जीवनविषयक सांगितलेली स्पष्ट मते, स्नेहसंमेलनाला हजर राहणे, दोन-चार वर्षातून एकदा ट्रीपला नेणे, त्यांना कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे यामुळेच हे शक्य आहे."

"हे खरं असलं तरी तुझा वाटा माझ्यापेक्षा नक्कीच जास्त. बरं ते जाऊ दे... काय म्हणताय मुलं ?"

"तुम्हीच वाचा ! मला खूप भरुन येतंय वाचतांना... किती छान कल्पना मांडल्या आहेत दोघांनी !"

"असं ! पहिल्यांदा पोरीचे वाचतो. तुमच्यासह आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणं हीच


माझ्यासाठी सुखाची दिवाळी. आम्ही यावर्षी कोणत्याही भौतिक गोष्टींवर खर्च करायचा नाही असे ठरविले आहे. कारण आईला कितीही नाही म्हटले तरी ती माझं माहेरपण करणार ! आम्ही तीन दिवस येणार आहोत. तेथे तुम्ही ठरवाल त्यात आम्ही आनंदाने सहभागी होणार आहोत. तीन दिवस घरातील टीव्ही १०० टक्के बंद ठेवावा असे मला वाटते. मी स्वयंपाकात मदत करणार आहे. संध्याकाळची रांगोळी मीच काढणार. खूप गप्पा आणि खेळ खेळणार आहे. आमच्यासोबत कोरोना काळात आई-वडील गमावलेली एक मुलगी असणार आहे. तिचे पालकत्व आम्ही स्वीकारले आहे. आमच्याकडे धुणे-भांडी करण्यासाठी येणाऱ्या मावशी, आमची भाजीवाली आजी, सफाई कामगार, बिल्डिंगचा पहारेकरी, शाळेचे रिक्षावाले काका यांना घरी केलेला दिवाळीचा फराळ आणि कपडे देणार आहोत. माझ्यासाठी हीच सुखाची दिवाळी"

"काहो, एव्हढं शहाणपण कुठून आलं असेल ताईला ?"

"अगं, एका वाक्यात सांगतो. घरात पालकांच्या उक्तीला कृतीची जोड असली कि सहज संस्कार होतात आणि परिस्थिती माणसाला खूप काही शिकविते. मागील वर्षभरात तिने मुंबईत जे अनुभवले त्यातून तिची सामाजिक जाणीव प्रगल्भ झाली असे मला वाटते."

"खरंय... आता माझ्या लेकराचं पण वाचा..."


"हो, हो तू मध्येच प्रश्न विचारला म्हणून बोललो. काय म्हणतो दादा ? हं... माझ्या मते सुखाची दिवाळी आपल्या मानण्यावर असते. आजपर्यंत दरवर्षीची माझी दिवाळी तुमच्यामुळे सुखाचीच झाली आहे. मी ८ दिवस सुट्टी घेऊन येणार आहे. फराळ मी आल्यावरच करायचा. फक्त अनारसे करून ठेवले तर चालतील. यावर्षी आईला अपेक्षित असलेली खरेदी मीच करणार आणि ती स्वदेशीच असणार. मला दिवाळी निमित्ताने कंपनीनेच नवीन मोबाईल दिला आहे. माझे दोन ड्रेस नवीन कोरे आहेत तेच वापरणार आहे. ताईशी माझे बोलणे झाले आहे. ती तीन दिवस येणार आहे. दिवाळीतील एक दिवस सकाळी आपण सर्व वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत आणि भाऊबीजेला संध्याकाळी अनाथालयात जाणार आहोत. एक दिवस माझ्या शाळेतील मुलांसाठी किल्ला बनविण्याची कार्यशाळा घेणार आहे. बाबांना माहिती असलेल्या वस्तीतील मुलांना फराळ वाटप करावा असे मला वाटते. आपल्यासोबत गरजवंतांना दिवाळीचा आनंद देणे हीच माझी सुखाची दिवाळी !"

"मला तर बाई हे पोरगं म्हणजे तुमची कॉपीच वाटते"

"हं, असेल... पण खरंच या दोन्ही मुलांच्या कल्पनांनी माझी दिवाळी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तशी महासुखाची होणार तर !"

"हे काय नवीन ?"

"अगं माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे...


तैसी होय तिये मेळी ।

मग सामरस्याचिया राऊळी ।।

महासुखाचि दिवाळी ।

जगेसि दिसे ।।


आपल्या मुलांनी सामाजिक समरसतेतून समाजाचा जो विचार केला आहे तोच सर्वत्र दिसावा अशी अपेक्षा माऊलींनी व्यक्त केली आहे."


मी अविवेकाची काजळी ।

फेडुनि विवेकदीप उजळी ।

तैं योगिया पाहे दिवाळी । निरंतर ।।


या ओवीतून संत ज्ञानेश्‍वरांनी दिवाळीचा खराखुरा आनंद मांडला आहे. सामाजिक जीवनात साजरी होणारी दिवाळी ही आनंदाचेच प्रतीक आहे मात्र ज्ञानरुपी जाणिवेतून दिवाळीचा आनंद घेतला जातो तेव्हा ती महासुखाची दिवाळी ठरते. आपणही समाजातील अज्ञानरुपी अंधःकार आपल्या सामाजिक जाणिवेरुपी ज्ञानदीपाने दूर सारु या ! शुभ दिपावली ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४