Sunday, 19 March 2023

आनंदाचे डोही आनंद तरंग...

निमित्त जागतिक आनंदी दिवसाचे ! 



२० मार्च हा दिवस जागतिक आनंदी दिवस अर्थात International Day of Happiness म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब जळगावच्या साप्ताहिक सभेत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांनी "आनंदाचे डोही आनंद तरंग..." या विषयाची मांडणी केली. सारांश स्वरुपात भाषणाचा गोषवारा आपल्या सर्वांसाठी देत आहे.

आनंदाचे डोही आनंद तरंग । 

आनंदची अंग आनंदाचें ॥१॥

काय सांगो जाले काहीचियाबाही । 

पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । 

तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । 

अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥

संत तुकारामांचा हा अभंग अवीट अशा आनंदाचा अनुभूती सांगणारा आहे. हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही आणि केला तरी ज्याला अनुभवाची जाण नाही त्याला समजणारही नाही. आता आयुष्यात यापुढे मिळवायचे काहीही उरले नाही. तुकाराम महाराज यांनी अशी स्थिती गाठली आहे कि ज्या करिता योगी अनेक आयुष्ये तप करीत आले आहेत. अनेक ज्ञानी अथक प्रयत्न करून थकले आहेत.  त्यामुळे त्यांना झालेला आनंद हा परमानंद आहे. 

आनंद म्हणजे काय असा आपण विचार केला तर मानसशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट क्षणी चांगली गोष्ट घडल्यावर होतो तो किंवा अधिक व्यापकपणे विचार केल्यास एखाद्याच्या जीवनाचे किंवा कर्तृत्वाचे सकारात्मक मूल्यमापन करून जे मिळते ते म्हणजे आनंद. अर्थात हा आनंद व्यक्ती सापेक्ष असतो. तो कधी बक्षिसाने होतो तर कधी आवडीचा पदार्थ मिळाल्याने होतो तर कधी शारीरिक भूक भागविल्याने होतो. आनंदाचा मानवी मनाशी व मेंदूशी संबंध आहे. मुळात हि एक भावना आहे.  मास्लो या शास्त्रज्ञाने मांडलेल्या पिरॅमिडनुसार हि मानवी मनाची मूलभूत गरज आहे. भौतिक प्रगतीनुसार हा आनंद अधिक उच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न करीत असतो. 

माणूस जेव्हा आनंदी होतो तेव्हा त्याच्या मेंदूचा फ्रंटल लॉबीची डावी बाजू ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असे म्हणतात तो अधिक सक्रिय होतो. मानवी जीवनात घडणाऱ्या चांगल्या - वाईट घटनेमुळे वा परिस्थितीमुळे त्याचा मुड प्रभावित होत असतो. हा मुड मेंदूमध्ये घडणाऱ्या विविध रासायनिक क्रियांचे प्रतिबिंब असतो. मेंदूला आपण काय अनुभवत आहोत याची जाणीव करून देण्याचे व त्या प्रमाणे प्रतिसाद देण्याचे काम शरीरातील रसायने करीत असतात. (न्यूरोट्रान्समीटर आणि हार्मोन्स) या हार्मोन्सची काही विशिष्ट कार्ये असतात, ती विशिष्ट प्रकारे सक्रिय केली जातात, ते विशिष्ट भावनांचे संकेत देतात व मेंदूच्या काही भागांना उत्तेजीतही करतात. जेव्हा आपण आनंदाचा विचार करतो त्यावेळी प्रामुख्याने ज्या रसायनांचा समावेश असतो ती म्हणजे एंडोर्फिन, डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन. आनंदी मनुष्य निरोगी व दीर्घायुषी असतो. 

संत तुकाराम महाराजांनी अभंगातून मांडलेला आनंद कसा झाला असेल ? त्यांच्या आयुष्यात अनेक विपरीत व आव्हानात्मक घटना पाहावयास मिळतात. दुकानाचे दिवाळे निघालेले, बायकोचा स्वभाव, समाजाकडून त्रास इ. शहीद भगतसिंग आनंदाने व हसत हसत देशासाठी शहीद झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या कोठडीत सहन केलेले अत्याचार यासर्व गोष्टींमध्ये त्यांना आनंद कसा झाला असेल याचा आपण विचार केल्यास काही गोष्टी आपल्या लक्षात येतील. आपल्याला आवडणारी गोष्ट करणे, आपण करीत असलेल्या कामात आपल्याला रस असणे आणि त्यासाठी इतरांशी संपर्कात राहणे, आपण जे करतो त्याद्वारे आपल्याला ओळख मिळणे, आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होणे.  

माणसाला आनंद ३ प्रकारे होतो. १. मेंदूतील रसायनांमुळे २. मेंदूतील प्रीफ्रंटल कोर्टेक्समुळे - यात लहानपणापासूनच्या शिकवणीचा समावेश असतो. तसेच भावनिक जाण व अनुभवही महत्त्वाचा ठरतो. ३. सामाजिक वातावरण - आपण ज्यांच्या सोबत राहतो त्या माणसांची सकारात्मक व आनंदी वृत्ती मनाला आनंद राहण्यासाठी सहाय्य्यभुत ठरते. 

आज जगातील सर्वात आनंदी देश फिनलँड मानला जातो. सलग ५ वर्षे या देशाला आनंदी देश होण्याचा बहुमान मिळाला आहे. वर्षातील ४ महिने प्रचंड थंडी असूनही हा देश आनंदी असतो याची आकाराने आपण नक्कीच जाणून घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील निसर्ग समृद्ध आहे. त्यामुळे पर्यावरणाची गुणवत्ता अधिक आहे. कौटुंबिक व व्यावसायिक कामाचा योग्य समतोल सांभाळला गेला आहे, सामाजिक सौहार्द, निवडीचे व निर्णयाचे स्वातंत्र्य आहे, समाज कल्याणकारी पद्धती विकसित आहेत, स्वातंत्र्यासोबतच येथे समानता आहे, नागरी सेवा विनामूल्य उपलब्ध आहेत मात्र येथील करही सर्वात जास्त आहे. सामाजिक स्तरावर असलेले परस्पर सहकार्य व पाठबळ हि या देशाची जमेची बाजू म्हणता येईल. 

समारोपाकडे जात असतांना डॉ. प्रदीप जोशी यांनी २ धक्कादायक गोष्टी सांगितल्या. त्यातील एक म्हणजे आज जगातील ३० कोटी लोक नैराश्यग्रस्त वा वैफल्यग्रस्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशात हि संख्या सुमारे ९ कोटी आहे. या मागील कारणे अनेक आहेत. आपण या समस्यचे बाली ठरू नये व आनंदी राहावे यासाठी खालील गोष्टी कराव्यात.

- नातेसंबंध समृद्ध करा 

- काहीतरी स्वप्न ठेवा , उद्दिष्ट ठेवा

- इतरांना केलेले सहाय्य तुम्हाला सर्वात जास्त आनंद देतील. 

- शरीर प्रकृती उत्तम ठेवा.

- योग्य आर्थिक नियोजन करा.

- कुटुंबात आनंद ठेवा व मित्रांचा जास्तीत जास्त सहवास ठेवा.

- कामाचा आनंद घ्या

या गोष्टी करीत असतांना जीवनातील ताणतणावांचे नियंत्रण करा. त्याकडेही लक्ष असू द्या. त्यासाठी हसा, खेळ खेळ, योग्य व्यायाम व आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. व्यसनांपासून दूर राहा. निसर्गाचा आनंद घ्या. योगा, प्राणायाम करा. सुटीचा आनंद घ्या. त्यादिवशी आराम करा. प्राणी पाळा. ताण ओळख व त्यावर नियंत्रण मिळावा. रात्री  झोपायला जाण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या ३ चांगल्या गोष्टी आठवा. 

आईन्स्टाईन यांनी सांगितल्याप्रमाणे जीवन २ प्रकारे जगा

१. जणू काही चमत्कार नाही (as though nothing is miracle)

२. सर्व काही चमत्कार आहे (as though everything is miracle)


यावर्षीच्या जागतिक आनंदी दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे Be mindful (सजग राहा), Be grateful (कृतज्ञ राहा) Be kind (दया करा)

समारोप करतांना आनंदी राहण्यासाठी 

Sing like no one listening कोणी ऐकत नाही असे समजून गा 

Love like you've never been hurt आपल्याला कोणी दुखावले नाही असे समजून प्रेम करा 

Dance like nobody is watching आपल्याला कोणी पाहात नाही असे समजून नाचा 

Live like its heaven on earth पृथ्वीला स्वर्ग समजून जगा 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Wednesday, 15 March 2023

हृद्य संस्कार सोहोळा विवाहाचा... आप्तस्वकीयांच्या स्नेहबंधाचा !

मागच्या आठवड्यात आमच्या धानोरकर परिवारातील एका बहिणीचा पुणे येथे विवाह झाला. खरं तर मोठ्या कुटुंबातील विवाह सोहोळा हि तशी फार मोठी गोष्ट नाही मात्र एका खडतर आव्हानानंतरचा हा विवाह संस्कार काका-काकूंसह आम्हा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एका मोठ्या कालावधीनंतर पुतण्याचा विवाह झाला. तोही असाच सर्वांच्या लक्षात राहील असाच झाला. त्यामुळे उत्सवप्रिय पिढीला एकत्र कुटुंबाचा 'नजारा' आणि 'मजा' अनुभवता आली. हा विवाह सोहोळा हि एक संधी होती. हा विवाह सोहोळा म्हणजे धानोरकर व देशपांडे या दोन परिवाराचे मिलन आणि त्यासोबतच दोन्ही परिवारांतर्गत स्नेहमंडळींचे आनंददायी पुनर्मिलन होते. अलीकडे निमित्ताने होणाऱ्या भेटीही कमी झाल्या तरी 'आपलेपण' असले कि सर्व कारणे बाजूला पडतात व  'आपली' माणसे आवर्जून उपस्थिती देतात व सहभागी होतात याचे उदाहरण म्हणजे हा विवाह संस्कार  सोहोळा होय.


विवाह पुण्यात म्हटल्यानंतर त्याचे योग्य नियोजन केले होते. अगदी आदल्या दिवशी सीमंती पासून ते झाली पर्यंतची सर्व व्यवस्था उत्तमप्रकारे लावली होती. तत्पूर्वीचे विधी व अन्य कार्यक्रम घरी पार पडले. त्यासाठी मुलीची आजी, मावशी आजी, काका-काकू आशीर्वादासाठी तर सख्खा, चुलत व मावस भाऊ-बहीण, वहिनी अगदी कंबर कसून सर्व गोष्टींसाठी तयार होते. ज्येष्ठांना आवश्यक असणारी एक आश्वासकता त्यातून निर्माण झाली होती त्यामुळेच सर्वांसाठी हा संस्कार सोहोळा संस्मरणीय ठरला असे नक्की म्हणता येईल. विवाहासाठी असलेले उपाध्ये खांडेकर व त्यांचे सहकारीही संस्कारांना महत्व देणारे त्यामुळे प्रत्येक गोष्टीमागचा अर्थ समजावून सांगणारे होते. वेळ मिळेल तेव्हा अलीकडच्या काळातील विवाहामधील आधुनिकता स्वीकारत असतांना संस्कारांचा वारसा जपण्याची आवश्यकता उभय पक्षांना सांगत होते. दोन्ही दिवसांचे भोजन व अल्पोपहार चविष्ट व रुचकर होते. प्रसंगी पैसे मोजूनही अपेक्षित सेवा मिळत नाही मात्र येथे आलेला अनुभव खूप चांगला व वेगळा होता. 

धानोरकर परिवारातील काकांच्या कुटुंबाचा आणि आमच्या कुटुंबाचा भावबंध अनेक वर्षांचा आणि तितकाच एकमेकांच्या हक्काचा व अधिकाराचा. कारण काका लहानपणापासूनच आमच्या आई-वडिलांसोबत राहत होते. ते अगदी लग्न झाल्यानंतरही अनेक वर्षे. दोघं भावांनी धुळ्यात प्लॉट घेऊन आपले स्वतःचे हक्काचे घर बांधले. अनेक सोहोळे, संस्कार, जीवनातील सुख-दुःखाच्या घडामोडी दोन्ही परिवारातील सदस्यांनी सोबत अनुभवलेल्या होत्या. स्वाभाविकपणे आम्हा भावा-बहिणींमध्ये सख्खा - चुलत असा भाव नव्हता आणि नाही. त्यामुळे लग्नाच्या ६-७ दिवस अगोदरच आमच्या कुटुंबातील सदस्य तयारीसाठी गेले होते अर्थात त्यांना हक्काने बोलवलेही होते.  एकत्र कुटुंबाच्या अनेक चांगल्या बाजूंचा अनुभव गेली सुमारे ६ दशकांहून अधिक काळ आम्ही सर्वच अनुभवत आहोत. काळ कितीही बदलला तरी नात्याच्या या स्नेहबंधात फारसा फरक पडला नाही. विवाह सोहोळ्याला कुळकर्णी-देशपांडे परिवारांनी संख्येचे बंधन घालून घेतल्याने स्वाभाविकपणे काही मर्यादा आल्यात मात्र त्या सोहोळ्यात अडचण ठरल्या नाहीत अर्थात तेव्हढी समज अलीकडे विकसित झाली आहे. 

या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास ६० वर्षांची मैत्री असलेली काकांची दोस्त मंडळी व आमच्या बहिणींच्या मैत्रिणींची आवर्जून विवाह सोहोळ्याला उपस्थिती ! त्यातील एका मित्रानेच मुलीच्या मामांची भूमिका पार पाडली. या मित्रांमध्ये आमच्या सर्वांचे काका-मामा होते. ऐनवेळी तब्येतीच्या कारणामुळे एका काकांना येता आले नाही मात्र ग्रहमुखाच्या दिवशीची भोजनाची व्यवस्था त्यांनी करुन दिली होती. आमच्या काकांना त्यांची अनुपस्थिती पचविणे अवघड गेले अर्थात ते कुणाच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते.

 त्यातील एका वरिष्ठ सहकाऱ्याची पत्नी म्हणजे आमच्या आईची जिवलग मैत्रीण ! आज ती मावशी नसली तरी काका, त्यांची कन्या आणि जावईबुवा यांची भेट डोळ्यांच्या कडा ओलावणारी होती. अनेक हृद्य भेटींचा आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. काकांचे मामेभाऊ आपल्या घरी पाहुणे मंडळी असतांनाही पत्नीसह आले होते आणि वेळ काढून प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी करीत होते. अनेक वर्षांनी भेटल्यामुळे नवीन पिढीतील अनेकांना ते प्रथमच पाहत होते मात्र त्यांचा व्यवहार अनेक वर्षांच्या सहवासाचा होता. बोलता बोलता सहज म्हणून गेले मला एकदा धानोरा येथे यावयाचे आहे. अलीकडे दुर्मिळ होत चाललेला गोतावळा त्यात अपेक्षित असलेला प्रेमभाव पुढच्या पिढीकडे नक्कीच यानिमित्ताने पोहोचला असे म्हणता येईल. 

आदल्या दिवशी अर्थात ८ मार्चला जागतिक महिला दिन होता. दोन्ही कुटुंबांनी आपापल्या घरी तो साजरा केलाच पण मंगल कार्यालयातही केक भरवून साजरा करण्याची व्यवस्था केली होती. विधी आणि भोजने आटोपली. त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या एका खास शैलीत परिवारातील माता-भगिनी-पत्नी यांना तो भरविला अर्थात त्याची आठवण कॅमेऱ्यात बंद केली हे सांगणे नको. कन्या सध्या पुण्यात असते आणि तिला गुरुंनी लग्नाच्या दिवशी सुट्टी दिली याचा आनंद तिने सर्वांसोबत नृत्याविष्काराने साजरा केला. शास्त्रीय नृत्य बाजूला ठेवून नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतला आणि इतरांनाही त्यात सामावून घेतले. झोपलेली मंडळी उठून त्यात सहभागी झाली. नवरीही त्यात मागे नव्हती. मात्र मग आग्रहाखातर दोन गाण्यांवर कथक नृत्यही सादर करीत वाहवा मिळविली. अचानकपणे karaoke वर गाणे गाण्याचा सिलसिला सुरु झाला आणि सर्व जुन्या-नव्या पिढीतील मंडळींना आपल्या काळात घेऊन गेला. दोन तासांचा वेळ कुठे निघून गेला लक्षातच आले नाही. त्यानंतर वेळेवर आलेल्या मंडळींचा मेहेंदी कार्यक्रम झाला. काही मंडळी झोपण्यासाठी इतरत्र निघून गेल्याने त्यांना याचा आनंद घेता आला नाही. 

अलीकडच्या स्मार्टफोनच्या युगात फोटोचं वाढलेले महत्व असले तरी एक हृद्य व कायमस्वरूपी लागणारी आठवण म्हणजे वधू-वरांसोबतचा तो क्षण ! प्रयत्नपूर्वक प्रत्येकाचा फोटो यावा यासाठी जो-तो काळजी वाहत होता आणि छायाचित्रकारासह मोबाईलचे फ्लॅशही चमकत होते. लग्न समारंभासाठी पाहुणे मंडळींसह सर्वांची योग्य खातिरदारी व व्यवस्था व्हावी यासाठीची सर्व व्यवस्था वधू-वर पक्षाच्या ज्येष्ठांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांना परिवार सदस्यांची तेव्हढीच मोलाची साथ होती. ऋणानुबंध घट्ट करणारा हा सोहोळा सर्वार्थाने पुढच्या पिढीसाठी 'संस्कार' सोहोळा ठरला. वधू-वरांच्या आनंदी व समृद्ध सहजीवनाची कामना करीत असतांनाच त्यांच्या माता-पित्यांची एक जबाबदारी समर्थपणे पूर्ण केल्याबद्दल मनापासून अभिनंदन ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 


Monday, 27 February 2023

अनुभूतीची स्वरानुभूती अन दादाजींना श्रद्धावंदन !

अनुभूती इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रिय दादाजींच्या श्रद्धावंदन दिनी स्वरानुभूती अर्थात भक्ती संगीत संध्या कार्यक्रमाचे भाऊंच्या उद्यानात आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय अशोकभाऊ जैन, पद्मश्री ना. धो. महानोर दादा, अनुभूती इंटरनॅशनलचे चेअरमन श्री. अतुलभाऊ जैन, संचालक सौ. निशाभाभी जैन व प्राचार्य श्री. देबसिस दास यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली आणि लगेचच भक्ती संगीताचा कार्यक्रम सुरु झाला. 

श्रद्ध्येय मोठ्या भाऊंना गुरु आणि पालकांप्रती विशेष आदर होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतांना ते हि गोष्ट आवर्जून अधोरेखित करीत असत. जीवनात आपण प्राप्त केलेल्या प्रत्येक गोष्टींमागचे कारण असतात गुरु आणि पालक. आपल्या जीवनाचा मूलभूत पाया असलेल्या, परम आदरणीय गुरु आणि पालकांसाठी प्रार्थना सादर करण्यात आली... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील या सामुदायिक प्रार्थनेतील ३ कडवी विद्यार्थ्यांनी सादर केलीत. प्रार्थनेचा अर्थ आहे आमचे आचार-विचार अत्यंत शुद्ध असावे यासाठी सद्बुद्धी दे, सत्कर्म करायची प्रवृत्ती दे, सत्याचा अभ्यास दे, सत्यस्वरूपाचे ज्ञान दे...

है प्रार्थना गुरुदेव से ,यह स्वर्गसम संसार हो ।

 अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो ॥

ना हम रहे अपने लिये, हमको सभी से गर्ज है ।

 गुरुदेव ! यह आशीष दे ,जो सोचने का फर्ज है ॥ १॥


हम हो पुजरी तत्व के , गुरुदेव के आदेश के ।

 सच प्रेम के , नीत नेम के , सध्दर्म के ॥

हो चीड झुठी राह कि अन्याय कि अभीमान की।

 सेवा करनने को दास की ,पर्वा नही हो के जान की ॥२॥


छोटे न हो हम बुध्दी से , हो विश्वमयसे ईशमय।

 हो राममय अरु कृष्णमय , जगदेवमय जगदीशमय ॥

हर इंद्रियों ताब कर , हम वीर हो अति धीर हो ।

 उज्ज्वल रहे सरसे सदा , निहधर्मरत खंबीर हो ॥ ३॥


अति शुध्द हो आचारसे , तन मन हमारा सर्वदा ।

 अध्यात्म की शक्ती हमे , पलभी नहि कर दे जुदा॥

इस अमर आत्मा क हमें, हर श्वासभरमें गम रहे ।

 गर मौतभी हो आगयी, सुख दुःख हम से सम रहे ॥५॥


मनुष्य प्राण्याचा एकच धर्म आणि तो म्हणजे सर्वांप्रती प्रेमभावना, बंधुत्वाची भावना. आम्ही सर्व त्या प्रभूची लेकरे असल्याने आपला सर्वांशी असलेला व्यवहार प्रेमाचा व समानतेचा असला पाहिजे तर आपण या भूतलावरच स्वर्गाची अनुभूती घेऊ शकू असे दादाजी नेहमी सांगत. कधीही कुणाला तुच्छ मनू नये. प्रेम आणि माणुसकीची भावना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणारे साने गुरुजी यांचे गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. खरा तो एकचि धर्म...

खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे ।।


जगी जे हीन अति पतित

जगी जे दीन पद दलित

तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे ।।


सदा जे आर्त ‍अति विकल

जयांना गांजती सकल

तया जाऊन हसवावे। जगाला प्रेम अर्पावे ।।


कुणा ना व्यर्थ शिणवावे

कुणा ना व्यर्थ हिणवावे

समस्ता बंधु मानावे। जगाला प्रेम अर्पावे ।।


प्रभूची लेकरे सारी

तयाला सर्वही प्यारी

कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे ।।


असे हे सार धर्माचे

असे हे सार सत्याचे

परार्था प्राणही द्यावे। जगाला प्रेम अर्पावे ।।

श्रद्ध्येय मोठे भाऊ हे गांधी विचारांचे पाईक होते. गांधीजींचा साधेपणा, नम्रता, सत्यता, अहिंसा आणि इतर दैवी गुणांचा अंगीकार दादाजींनी आपल्या जीवनात केला होता. विपरीत परिस्थितीतही त्यांनी या मूल्यांशी तडजोड केली नाही. गांधीजींच्या तत्त्व आणि जीवनशैली सोबतच गांधीजींना प्रिय असलेली भजनेही दादाजींना विशेष आवडत असत. १५ व्या शतकात संत नरसी मेहता यांनी रचलेले भजन  वैष्णव जन तो तेणे कहीए... त्यांना विशेष आवडत असे. खरा वैष्णव तोच जो दुसऱ्यांच्या दुःखाला समजून घेतो, इतरांना केलेली सहाय्याबद्दल कधीही अहंकार बाळगत नाही, जो सर्वांचा सन्मान करतो अन कोणाचीही निंदा करीत नाही. हेच भजन मुलांनी सादर केले. 

वैष्णव जन तो तेने कहिये,

जे पीड परायी जाणे रे ।

पर दुःखे उपकार करे तो ये,

मन अभिमान न आणे रे ॥


सकल लोकमां सहुने वंदे,

निंदा न करे केनी रे ।

वाच काछ मन निश्चळ राखे,

धन धन जननी तेनी रे ॥


समदृष्टि ने तृष्णा त्यागी,

परस्त्री जेने मात रे ।

जिह्वा थकी असत्य न बोले,

परधन नव झाले हाथ रे ॥


मोह माया व्यापे नहि जेने,

दृढ़ वैराग्य जेना मनमां रे ।

रामनाम शुं ताली रे लागी,

सकल तीरथ तेना तनमां रे ॥


वणलोभी ने कपटरहित छे,

काम क्रोध निवार्या रे ।

भणे नरसैयॊ तेनुं दरसन करतां,

कुल एकोतेर तार्या रे ॥


वैष्णव जन तो तेने कहिये,

जे पीड परायी जाणे रे ।

पर दुःखे उपकार करे तो ये,

मन अभिमान न आणे रे ॥

यानंतर मनुष्याचे जीवन अनमोल असून यासाठी मनुष्य कर्माने, वचनाने, शरीराने पवित्र असला पाहिजे आणि असा माणूसच खऱ्या अर्थाने महान असतो. वाणीतील मधुरता, सरलता, डोळ्यातील विमलता हीच माणसाची शान आहे, या अर्थाचे भजन विद्यार्थ्याने सादर केले. पवित्र मन रखो...

पवित्र मन रखो पवित्र तन रखो,

पवित्रता मनुष्यता की शान है,

जो मन कर्म वचन से पवित्र  है,

वो चरित्र बाण नहीं यहाँ महान है,

बड़ा ही मुलये वाण है तुम्हरा ये जनम,

जगत की कर्म भूमि में करो भले कर्म.

अच्छे रखो विजार उत्तम करो वेहवार

आदर्श व्यक्ति की ये पहचान है,

जो मन कर्म वचन से पवित्र  है,

वो चरित्र बाण नहीं यहाँ महान है,

तुम अपनी आंख में अमृत रखो विमल विमल सदा विमल विमल,

तुम्हरो वाणी में माधुर हो सदा सरल सरल,

तुम को के नीर विकार सबका करो सत्कार,

ये जन्म तुम्हारा इम्तेहान है,

जो मन कर्म वचन से पवित्र  है,

वो चरित्र बाण नहीं यहाँ महान है,

'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते...' या भारतीय परंपरेचे कट्टर समर्थक असलेल्या दादाजींना स्त्रीच्या दैवी शक्तीबद्दल कायम आदर वाटत असे. त्यांच्या उक्ती, कृती आणि विचारात स्त्रीबद्दल आदर व उच्च सन्मान होता. स्त्रीच्या दैवी शक्तीची संस्कृतमधील देवी स्तुती दादाजींना प्रिय होती. तीच स्तुती विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सादर केली. 

कमलां कमलासनमुख 

कमलां कमलासनमुख - दिविज - सुनतपद - युगलाम 

विमलां मतिमनिशं यदि वाच्छसी जगदीसे संस्मर ||

इन्दूगणसु - समवदनाम - इंन्दीवरनिभ - नायनाम 

मन्दस्मित - रुचिराधर - पल्लव - द्वंद्वविनुत - सुंदरहरि - लीलाम ||

क्षीरशरधिरवर तनयां नीरज गण कृतं निलयाम |

चारु नयनकृत - नीराजनद्युति - पुरित श्रीहरिप्रिय - जायाम    

श्रीलक्ष्मीस्तुती  



दादाजी स्वतःला शेतकरी समजत असत व तीच ओळख प्रथम देत असत. एक उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करीत असतांना ते सदैव आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडित राहिले. भारतीय कला, संस्कृती व साहित्याबद्दलच्या प्रेमाबद्दल आपण त्यांना ओळखतोच. ते केवळ व्यावसायिक नव्हते तर त्यांना कलेबद्दल विशेष जाण होती. त्यांना वेगवेगळ्या राज्यातील गाण्यांचीही विशेष गोडी होती. त्यातीलच उत्तर प्रदेशातील एक आवडते गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. बरसन लागी बदरिया...  

बरसन लागी बदरिया झूम झूम के...

बोलन लागी कोयलिया झूम झूम के

आयो सावन अति भावन

रूम झूम रूम झूम के

सखिया गावें कजरिया झूम झूम के...।  


लाग रही तेरी सावन की झड़ी ए री 

ए मैं भीजत तुम बिन कबसे खड़ी..

सपने में आए पिया मोरा मन ले गयो... 

दे गए असुअन की झड़ी...। 


गरजत बरसत भीजत आई हो तुम्हरे मिलन को 

अपने प्रेमी पियरवा लो गरवा लगाय...।

आपल्या देशात भक्त कवींमध्ये संत कबीर दास का यांचे स्थान खूप वरचे आहे. जीवनातील अतिशय कठीण प्रसंगांचे वर्णन त्यांनी सध्या, सोप्या, सरळ शब्दात केले आहे. असेच एक संत कबीर यांचे भजन सादर करण्यात आले. या भजनात धनाचा तू अहंकार करू नकोस, आपल्या शरीराचा गर्व करू नकोस,  पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे ते नाजूक असते. हवेच्या एका झोक्याने तो मातीत मिसळून जातो. 'मत कर माया का अहंकार,,,'

मत कर माया को अहंकार

मत कर काया को अभिमान

काया गार से काची

मत कर माया को अहंकार

मत कर काया को अभिमान


काया गार से काची

हो काया गार से काची

जैसे ओस रा मोती

झोंका पवन का लग जाए

झपका पवन का लग जाए

काया धूल हो जासी

काया तेरी धूल हो जासी

ऐसा सख्त था महाराज

जिनका मुल्कों में राज

जिन घर झूलता हाथ

जिन घर झूलता हाथी

हो जिन घर झूलता हाथी

उन घर दिया ना बाती

झोंका पवन का लग जाए

झपका पवन का लग जाए

काया धूल हो जासी

काया तेरी धूल हो जासी

खूट गया सिन्दड़ा रो तेल

बिखर गया सब निज खेल

बुझ गयी दिया की बाती

हो बुझ गयी दिया की बाती

रे जैसे ओस रा मोती

झोंका पवन का लग जाए

झपका पवन का लग जाए

काया धूल हो जासी

काया तेरी धूल हो जासी

झूठा माई थारो बाप

झूठो सकल परिवार

झूठी कूटता छाती

झूठी कूटता छाती

हो झूठी कूटता छाती

जैसे ओस रा मोती

बोल्या भवानी हो नाथ

गुरुजी ने सर पे धरया हाथ

दादाजींचा मूळ गाव राजस्थानातील ! काही दशकांपूर्वी त्यांचे पूर्वज जळगावात आले आणि येथेच स्थायिक झाले. त्यांच्या मातृभूमीच्या प्रेमाचे प्रतीक असलेले उदाहरण म्हणजे संत मीराबाईंचे भजन. परमेश्वराला संपूर्ण शरण व समर्पणाने भरलेले हे भजन. थोडा खोलवर विचार केला तर आपल्या भ्रम आणि इगो पासून बाहेर यावे असा संदेश देणारे हे भजन होय.असीम भक्ती आणि समर्पणाचा भाव असलेलले भजन विद्यार्थ्यांनी सादर केले. मने चाकर राखो जी...

 

श्याम मने चाकर राखो जी

श्याम मने चाकर राखो जी

चाकर रहसूं बाग लगासूं,

नित उठ दरसण पासूं।

वृन्दावन की कुंजगलिन में

तेरी लीला गासूं॥


श्याम मने चाकर राखो जी


चाकरी में दरसण पाऊं,

सुमिरण पाऊं खरची।

भाव भगति जागीरी पाऊं,

तीनूं बाता सरसी॥


श्याम मने चाकर राखो जी


मोर मुकुट पीतांबर सोहै,

गल बैजंती माला।

वृन्दावन में धेनु चरावे

मोहन मुरलीवाला॥

मीरा के प्रभु गहिर गंभीरा,

सदा रहो जी धीरा।

आधी रात प्रभु दरसन दीन्हें,

आधी रात प्रभु दरसन दीन्हें,

प्रेमनदी के तीरा॥


श्याम मने चाकर राखो जी


चाकर रहसूं बाग लगासूं,

नित उठ दरसण पासूं।

वृन्दावन की कुंजगलिन में

तेरी लीला गासूं॥


श्याम मने चाकर राखो जी

श्याम मने चाकर राखो जी

श्याम मने चाकर राखो

श्याम मने चाकर राखो

श्याम मने, श्याम मने,

श्याम मने चाकर राखो जी 

भारतात विविधतेत एकता आढळते. दादाजी याचे उत्साही समर्थक होते. अशा विविधतेतून लोकांना एकत्र एका व्यासपीठावर आणून त्यांना एका विशिष्ट ध्येयासाठी प्रवृत्त करणे हे त्यांचे वैशिष्ट्यच होय. असेच एकतेचा सार सांगणारे गीत "आकाशगंगा" जे दादाजींच्या कायम ओठावर असे ते सादर करण्यात आले. गुजराती भाषेतील हे देशभक्तीपर गीत ज्यात पृथ्वी, तारे, आकाश, नदी, सूर्य, चंद्र आणि हे विश्व ज्यात आपण राहतो ते कोणाचे ? अर्थात ते आपले सर्वांचेच. शब्द, भाषा वेगवेगळी असेल, जागा वेगवेगळी असेल मात्र सर्वांच्या भावना एकच ! गडद अशा ढगांमध्ये ज्या प्रमाणे इंद्रधनुष्य आपण पाहतो  तसेच आपण सर्व आपले रंग, पंथ सोडून एकजुटीने राहू या ! 


आकाश गंगा सूर्य चन्द्र तारा , 

संध्या उषा कोई ना नथि । 

कोनि भूमि , कोनि नदी ,

कोनि सागर धारा , 

भेद केवल शब्द आमारा ने तमारा । 


एज हास्य एज रुदन , आश ए निराशा , 

एज मानव उर्मि , पण भिन्न भाषा । 

मेघधनु अन्दर ना होय कदी जंगो , 

सुन्दरता काज वन्या विविध रंगो ॥

भक्ती संगीत संध्या कार्यक्रमाची सांगता दादाजींच्या आवडत्या प्रार्थनेने झाली. भूतलावरील सर्वांच्या कल्याणाची हि प्रार्थना. तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे...


तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे सबका मंगल,

सबका मंगल, सबका मंगल होय रे

जिस गुरुदेव ने धरम दिया है, उनका मंगल होय रे,

जिस जननी ने जनम दिया है, उसका मंगल होय रे

पाला-पोसा और बढ़ाया, उस पिता का मंगल होय रे

इस जगत के सब दुखियारे प्राणी का मंगल होय रे

जल में, थल में और गगन में सबका मंगल होय रे

अन्तरमन के गाँठें टूटे, अन्तर निर्मल होय रे

राग, द्वेष और मोह मिट जाये, शील समाधि होय रे

शुद्ध धर्म धरती पर जागे, पाप पराजित होय रे

इस धरती के तर तिन में, कण-कण में धर्म समोय रे

शुद्ध धर्म जन-जन में जागे, घर-घर शांति समोय रे

तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे 

अनुभूतीच्या क्वायर (Choir) समूहाने कार्यक्रमाची प्रस्तुती केली. भजने व गीत सादर करणारे विद्यार्थी होते. वीरा महाकाल , स्तुती गर्ग , ऋत्वा शाह , प्राप्ती गुगळे , शर्वरी मोरे , सात्विका सुरतवाला , गीतिका  पुतचकायला , श्लोक कवळी 

कि बोर्डवर साथ दिली ती आत्मन छाजेड , ढोलकीवर तनिश सिंघवी , ड्रम राधे पटेल , तबला - आदर्श  पाटील , मेहेर लाडके , घुंगरू - वेदांत माहेश्वरी कार्यक्रमाचे संचालन केले विरती बाँठिया व वेदिका  कलंत्री 

संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले होते शिक्षिका कविता उपासनी यांनी तसेच तबल्यावर साथ दिली ती भूषण गुरव तर हार्मोनियमवर साथ देण्यासाठी होते अंकित कुमार सर सर्वांचे मनापासून अभिनंदन ! 


Sunday, 19 February 2023

जन्मभूमी, शिवजयंती, रोटरी, सेवा आणि मावळे !


शीर्षक जरा गमतीशीर वाटेल पण आहे वास्तव ! अर्थात यात गटात न बसणारा शब्द कोणाही सामान्य माणसाला विचारला तर स्वाभाविक उत्तर असणार 'रोटरी' ! पण मित्रहो मला अभिमान वाटतो कि आज हा योग जुळून आलाय तो केवळ आणि केवळ 'रोटरी' मुळे... कसे ? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी पूर्ण वाचा...

लहानपणापासून वारंवार ऐकलेले, म्हटलेले वा त्यानेच वाढलेली काही गीते... जननी-जन्मभूमि स्वर्ग से महान है । इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है ॥, देश हमें देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे।, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, ये देश है पुकारता, पुकारती माँ भारती आणि अलीकडे ज्यामुळे प्रभावित झालो ते गीत म्हणजे हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे... आयुष्यात अनेकदा ऐकलेला सुविचार अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी... या सर्वांचा आयुष्यावर इतका प्रभाव आहे कि  माझे जन्मगाव अर्थात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा याबद्दल मला विशेष अभिमान आहे. खेड्याकडून गावाकडे आणि गावाकडून शहराकडे वाटचाल करणारे हे गाव. या गावासाठी काही तरी करावं, माझ्या बांधवांसाठी काही करावं. लहान-सहान प्रमाणात ते करतही असतो. आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी मोठं काम करावं असे नेहमीच वाटत असते आणि ते आज करु शकलो याचा आनंद आणि समाधानही आहे. त्यासाठी कारणीभूत ठरली ती 'रोटरी' !  

शिवजयंती - हृदयस्थ असलेल्या आमच्या राजांचा जन्मोत्सव ! आजच्या परिस्थितीत जात-पात, धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन देशातील प्रत्येक राष्ट्रीय नेत्याचा अभिमान बाळगून त्यांनी आपल्या आचरणातून दिलेली शिकवण अंगिकारणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे असे मी मानतो. समाजात काम करीत असतांना उपदेश  करणारे, सल्ले देणारे, काय झालं पाहिजे आणि काय नाही झाले पाहिजे, हि संस्था अशी आणि ती संस्था तशी याबाबत बोलणारे अनेक भेटतात मात्र त्यासाठी प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची (महाराजांच्या मावळ्यांची) सर्वत्र चणचण दिसते. आपल्या हातून नेहमीच असे काम व्हावे ज्यातून कोणालातरी हात दिल्याचे, आनंद मिळाल्याचे समाधान आपल्याला मिळत राहो. कुठेही, कधीही अहंकाराचा / "मी"पणाचा लवलेश लागणार नाही यासाठी सद्बुद्धी महाराजांकडे मागणारा, आज ते करु शकलो केवळ 'रोटरी'मुळेच ! 


रोटरी - संपूर्ण जगभरात पसरलेली. जगातून पोलिओ घालविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणारी, सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेली सदस्य संस्था (Membership Organisation), दरवर्षी पदरचे करोडो रुपये खर्च करुन समाज आणि सदस्यांचे हित जोपासणारी, मैत्री, साहचर्य व एकोप्याद्वारे समाजबंध घट्ट करणारी संस्था, आपल्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये जोपासणारी संस्था म्हणजे रोटरी ! मागील १५ वर्षांपासून या संस्थेचा मी एक सक्रिय सदस्य आहे. ज्येष्ठ सदस्यांच्या प्रोत्साहनाने यावर्षी रोटरी क्लब जळगावच्या मानद सचिवाची जबाबदारी घेऊन तिला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. दरवर्षी क्लबतर्फे समाजातील उपेक्षित, वंचित व आदिवासी घटकांसाठी विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबीर त्यांच्या गावी आयोजित केले जाते. तसेच तेथील बांधवांना नवीन व जुने कपडे देत असते. यापूर्वी जामन्या-गाडऱ्या व पद्मालय येथे अशा शिबिराचे आयोजन होत असे. कोरोना पश्चात पुन्हा यावर्षी हा समाजोपयोगी उपक्रम घ्यावा असा विषय निघाला आणि आपल्या जन्मभूमीत तो व्हावा अशी इच्छा बोलून दाखविली आणि सर्वांनी एकमताने त्यास मान्यता दिली, आज ती प्रत्यक्षात साकारली, यशस्वी झाली याचा मनस्वी आनंद आहे. त्याच्या मुळाशी आहे 'रोटरी' ! 

सेवा - आयुष्यात रा. स्व. संघ, विद्यार्थी परिषद, जयहिंद परिवार, जनता बँक परिवार, आशा फाऊंडेशन, रोटरी परिवार, जैन उद्योग समूह परिवार, गांधी रिसर्च फाऊंडेशन यासह अनेकांनी सेवेचे संस्कार दिले व संधीही ! या सर्व संस्थांच्या मुळाशी आहे तो भारतीय संस्कृतीचा संस्कार 'सेवा परमो धर्म:'... अशी सेवा आपण कुठेही करु शकतो आणि त्याला आवश्यकता असते केवळ संवेदनशील मनाची... ते असेल तर अशा सेवेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपोआप घडून येतात. रोटरीचे ध्येय वाक्य आहे Service  Above Self अर्थात सेवा सर्वोपरी !  वैद्यकीय तपासणी शिबिरात सर्वांसाठी जनरल, डोळे, दात, हाडे यांची तपासणी होती. महिला व बालकांच्या तपासणीसाठी विशेष व्यवस्था होती. ९०० पुरुष, महिला व बालकांची नोंदणी तर जवळपास १२०० रुग्णांची तपासणी या शिबिरात झाली. अनेक वयस्कर मंडळींनी सर्वच तपासणींचा लाभ घेतला. १४० व्यक्तींना विनामूल्य चष्मे देण्यात आले तर आगामी काळात ५३ नेत्ररुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जवळपास ६५० रुग्णांना औषधींचे वाटप करण्यात आले. (तेव्हढेच रुग्ण येतील अशी अपेक्षा होती) शिबिराला प्रतिसाद इतका चांगला होता कि डॉक्टर शिबिरस्थळी आल्यापासून रुग्णच तपासत राहिले. ना त्यांचा , आयोजन करण्यात सहभाग देणाऱ्या झि. तो. महाजन माध्यमिक विद्यालय व ना. भा. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांचा , शिक्षकांचा वा रोटरी सदस्यांचा सन्मान झाला अर्थात उदघाटनाच्या वा कोणत्याही औपचारिक समारंभाशिवाय हे शिबीर झाले. असेही 'रोटरी'त घडू शकते याचेच हे उदाहरण !

मावळे - आजच्या शिवजयंती दिनी जन्मभूमी धानोरा व परिसरातील ग्रामस्थांसाठी रोटरीने आपल्या मावळ्यांद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराच्या सेवेचा कुंभ भरविला होता. त्याला जोड होती बडवानी या आदिवासी पाड्यावर बांधवांसाठी नवीन-चांगल्या जुन्या कपड्यांचे वाटपाची ! ज्याप्रमाणे "हिंदवी स्वराज्याची स्थापना" करण्यात महाराजांच्या सोबत मावळे होते त्याचप्रमाणे आजच्या या आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वितेमागे अनेक मावळे होते. या मावळ्यांमध्ये स्थानिकांसह रोटरी सदस्यांचा मोठा सहभाग होता. काही दृश्य-अदृश्य हात होते तर काही ज्ञात-अज्ञात व्यक्ती व संस्थाही ! या सर्वांप्रती  रोटरी क्लब जळगाव तसेच जन्मभूमी धानोरा व परिसरातील ग्रामस्थ व रुग्णांच्यावतीने प्रथम कृतज्ञतापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष राजेश वेद, सर्व संचालक मंडळ सदस्य, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ. काजल फिरके, नॉन-मेडिकल कमिटी चेअरमन कॅप्टन मोहन कुलकर्णी, वैद्य जयंत जहागिरदार, योगेश गांधी, मनोज जोशी, डॉ. तुषार फिरके, संदीप शर्मा, सुबोध सराफ कार्यक्रम निश्चितीसाठी व पूर्व तयारीसाठी प्रत्यक्ष भेट दिली. ज्येष्ठ मार्गदर्शक छबिलकाका, सौ. पूनम मानुधने यांनी शर्ट व सोलापुरी चादरींचे प्रायोजकत्व स्वीकारले. शिबीर नक्की झाल्यानंतर झि. तो. महाजन माध्यमिक विद्यालय व ना. भा. पाटील ज्युनिअर कॉलेजचे पदाधिकारी प्रदीप महाजन, आदरणीय बी. एस. महाजन, वामन महाजन, योगेश पाटील,बाजीराव सर, जगदीश पाटील, सागर चौधरी, प्राचार्य जमादार, देविदास महाजन सर, वासुदेव महाजन सर सर्व शिक्षक वृंद, देवाभाऊ, नारायणभाऊ व सर्व शिक्षकेतर कर्मचारी बांधव कामाला लागले व ५०० च्यावर तपासणी होईल असा विश्वासही दिला. त्यांच्या प्रयत्नांनी व सहकार्यानेच धानोरा सह परिसरातील ग्रामस्थ आले व  शिबिराचा लाभ घेऊ शकले. अशोक महाजन, संदीप गुजर, नवल महाजन यासह अनेकांचे सहकार्य लाभले. 

शिबिरासाठी जळगावहून खास डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी आले होते. यात रोटरीचे माजी प्रांतपाल बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर सिकची, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. दीपक पाटील, डॉ.तुषार फिरके, डॉ. हेमंत बाविस्कर, डॉ. पराग जहागिरदार, डॉ. पवन बजाज, डॉ. आदित्य जहागिरदार, डॉ. रोहन बोरोले, डॉ. सौ. माधुरी कासट, डॉ. सौ. साधना पाटील यांचेसह डॉ. सुमन लोढा, डॉ. तेजस पाटील, वैद्य जयंत जहागिरदार, डॉ. काजल फिरके, डॉ. महेश पाटील, चि. सूर्यवंशी यांचा समावेश होता. नोंदणी, नियोजन औषधी वाटप तसेच शिबिराच्या यशस्वीतेसाठीच्या सर्व व्यवस्था पाहण्यासाठी म्हणून अध्यक्ष राजेश वेद यांचेसह ज्येष्ठ रोटरी सदस्य जगदीशजी जाखेटे, प्रेम कोगटा, कॅप्टन मोहन कुलकर्णी, योगेश गांधी, मनोज जोशी, विजय जोशी, उदय पोतदार, मुकेश महाजन, सुबोध सराफ, सुभाष अमळनेरकर, किशोर तलरेजा, ऍड. हेमंत भंगाळे, पराग अग्रवाल, चंदन महाजन, रितेश जैन, पंकज व्यवहारे, योगेश चौधरी, मकरंद डबीर, हेमिन काळे, विश्वजित बऱ्हाटे तसेच सौ. माधुरी जहागिरदार, सौ. विनया जोशी, उल्हास सुतार, उमाकांत पाटील, विजय जोशी यांचे चिरंजीव व सहकारी यासह अनेकांचे सहकार्य लाभले. 

अशी शिवजयंती... अशी जन्मभूमी... अशी रोटरी... अशी सेवा आणि असे मावळे !  


गिरीश कुळकर्णी

मानद सचिव 

रोटरी क्लब जळगाव 

Thursday, 16 February 2023

वारी जागरणाची... भाग ३



ग्राम संवाद सायकल यात्रा ! 

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ग्राम संवाद सायकल यात्रेतील काही घटनांचा आपण सविस्तरपणे आढावा घेत आहोत. आपण सर्व वाचक ते वाचत आहात याचा खरोखर आनंद आहे. माझे सर्व सहकारी सायकल यात्रींच्या आठवणी ताज्या होत आहेत, आठवणींबाबत बोलत आहेत, त्याला उजाळा देत आहे. मित्रांनो आजच्या तिसरा भाग हा कृतज्ञतेबाबत आहे. संस्थेची ग्राम संवाद सायकल यात्रा माझ्यासाठी प्रथम अनुभव होता. यापूर्वीच्या सायकल यात्रा वा पदयात्रा याबाबत जे ऐकले ते ऐकून एक दडपण मनावर नक्की होते मात्र मला पूर्ण विश्वास होता कि हि यात्राही तेव्हढीच चांगली होईल किंबहुना त्यापेक्षाही अधिक ! यात्रेत आणि यात्रेच्या समापनानंतर सर्व सहकाऱ्यांचे जे प्रतिसाद आहे ते सुखावह व आनंददायी आहेत अर्थात त्यासाठी पूर्व नियोजन कामी आले असे नक्की म्हणता येईल. त्याला जोड होती  आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी... 

यात्रा यशस्वी होण्यातील सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे मार्गावरील विविध संस्था व व्यक्ती ! भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व महात्मा गांधींचे विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी साहाय्यभूत ठरलेल्या सर्व शैक्षणिक संस्थाप्रती सर्वप्रथम मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे अगत्याचे ठरते. या सर्व संस्थांनी आपला वेळ, विद्यार्थी, शिक्षक, शाळा / महाविद्यालय, तेथील संसाधने उपलब्ध करून दिल्यामुळे हि यात्रा पूर्णत्वास येऊ शकली. या सर्व संस्था, व्यक्ती, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधव व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो. प्रत्येकाचेच सहकार्य मनापासून मिळाले त्यामुळे वैयक्तिक नाव घेणार नाही मात्र त्या सर्व दृश्य - अदृश्य , ज्ञात - अज्ञात हातांना विनम्र अभिवादन करतो आणि अपेक्षा करतो यासारख्या समाजोपयोगी उपक्रमांना आपण भविष्यातही असेच पाठबळ द्याल. या सर्व संस्थांची किमान नावे नमूद करणे माझे कर्तव्य आहे. 

एल. एच. पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, वावडदा, स्वा. सै. पी. डी. थेपडे माध्यमिक विद्यालय, म्हसावद, उमरदे ग्रामपंचायत, शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल, महेंद्रसिंह पाटील माध्यमिक विद्यालय, खडकेसीम, भारती विद्या मंदिर कासोदा, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, मंगरूळ, किसान आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारोळा, स्व. जिभाऊ सो वसंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवगाव, माध्यमिक विद्यालय, तामसवाडी, माध्यमिक विद्यालय, शिंदी, स्व. सौ. बहिणाबाई धनाजी महाजन अनुदानित आश्रम शाळा, गुढे, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, मेहुणबारे, लोकनेते काकासाहेब जि. जि. चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा, इच्छापूर (करगाव), आनंदीबाई बंकट मुलांचे विद्यालय, चाळीसगाव, शेठ कुंदनमल इंदरचंद राका विद्यालय, वाघळी, सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा, माध्यमिक विद्यालय, बाळद, गो. से. हायस्कुल, पाचोरा, कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय, पाचोरा, शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल, श्रीमती पी. डी. बडोले माध्यमिक विद्यालय, वरखेडी, अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, शेंदुर्णी, आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय, शेंदुर्णी, डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा व डॉ. निलेश सुभाषचंद (जय) ब्रह्मेचा माध्यमिक विद्यालय, विटनेर इ. संस्थांचा समावेश होता.  

ग्राम संवाद सायकल यात्रा काढायची जेव्हा निश्चित झाले तेव्हापासून ज्येष्ठ सहकारी उदय महाजन, प्रत्यक्ष सहभागी झालेले अब्दुलभाई, डॉ. अश्विन झाला, सहप्रमुख सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात यात्रेचे नियोजन केले. संस्थेच्या कार्यपद्धतीचा परिचय या निमित्ताने झाले. पूर्वीच्या यात्रांचा अनुभव यासाठी खूप कामी आला. अनेक बारकाव्यांवर काम केळ त्यामुळे वेळेवर फारशा अडचणी आल्या नाहीत. कपडे वाळत घालण्याच्या दोरीपासून, सायकलमध्ये हवा भरण्यासाठीचा पंप, जेवण तयार करण्यासाठी लागणारे भांडे, मीठ मिरची इ.चा बारकाईने विचार, संपूर्ण यात्रेत काहीही अडचण आली तर कोणावरही अवलंबून न राहता यात्रा यशस्वी होईल अशी हि तयारी होती. या सर्व महानुभावांचे मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. 

सायकल यात्रेतील सहभागी सर्व यात्री, वाहन चालक धनराज पाटील, ढोलकी व संबळ वादक भिकाभाऊ पाटील, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सर्व सहकारी, उदघाटन सत्राचे प्रमुख पाहुणे  पोलीस अधीक्षक मा. एम. राजकुमार, समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय अण्णासाहेब डॉ. के. बी. पाटील, वैयक्ति पातळीवर तामसवाडी येथे भोजन व्यवस्था करणारे संजय खैरनार सर, बापू महाले, चाळीसगाव येथील रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी व डॉ. राहुल कुळकर्णी, वाघळी येथील भोजन व्यवस्था करणारे जि. प. माजी शिक्षण सभापती मा. पोपट तात्या भोळे, खासदार पत्नी संपदाताई पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब सतीश पाटील, आ. मंगेश चव्हाण, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रदीपजी अहिरे, नगरदेवळा येथील शिवनारायण जाधव, दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे सचिव सतीश काशीद या सर्वांचे कृज्ञतापूर्वक मनापासून धन्यवाद !

या यात्रेमागील प्रेरणास्थान व प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अशोकभाऊ जैन यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. यात्रेची सुरुवात करतांना तयारी बद्दल आस्थेने केलेली चौकशी, यशस्वीतेसाठी दिलेले आशीर्वाद हि सर्वात जमेची बाजू होती. श्रद्ध्येय मोठ्या भाऊंनी समाजमनाचा संपादित केलेला विश्वास व दिलेला उत्तमतेचा वसा सर्व समस्यांचा रामबाण उपाय म्हणता येईल व तिचे यात्रेच्या यशस्वितेची गुरुकिल्लीही ! (क्रमशः) 

गिरीश कुळकर्णी

यात्रा समन्वयक 

ग्राम संवाद सायकल यात्रा 

Wednesday, 15 February 2023

वारी जागरणाची...

ग्राम संवाद सायकल यात्रा ! भाग - २ 


मंडळी,

आपण कालच्या भागात सर्वसाधारणपणे ग्राम संवाद सायकल यात्रेबद्दल जाणून घेतले. आजच्या भागात आपण यात्रेतील काही तांत्रिक गोष्टी जाणून घेणार आहोत. एकूण २३ यात्री पूर्णवेळ या यात्रेत सहभागी झाले होते. यातील १९ यात्रींनीं पूर्णवेळ सायकल चालवून यात्रा पूर्ण केली. जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागातील सात तालुक्यांमधून हि सायकल यात्रा गेली. यात जळगाव, एरंडोल, पाचोरा, भडगाव, पारोळा, चाळीसगाव व जामनेर या तालुक्यांचा समावेश होता. १३ दिवसांच्या या यात्रेत एकूण १२ ठिकाणी यात्रेचा मुक्काम झाला. यात म्हसावद, एरंडोल, कासोदा, पारोळा, तामसवाडी, गुढे, मेहुणबारे, चाळीसगाव, नगरदेवळा, पाचोरा, शेंदुर्णी, विटनेर या गावांचा समावेश होता. मुक्कामाच्या ठिकाणी यात्रींची राहण्याची व रात्रीच्या भोजनाची व्यवस्था स्थानिक शैक्षणिक संस्थांनी केली होती. म्हसावद, पारोळा, चाळीसगाव, पाचोरा व शेंदुर्णी येथे झोपण्यासाठी गाद्यांची व्यवस्था होती.

दुपारचा मुक्काम वावडदा, उमरदे, खडकेसीम, मंगरूळ, देवगाव, शिंदी, ऋषिपंथा, करगाव, वाघळी, बहाळ, वरखेडी, लोहारा याठिकाणी करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी स्थानिक शाळा / महाविद्यालयांनी यात्रींची भोजनाची व्यवस्था केली होती. सकाळच्या अल्पोपहाराची व चहाची व्यवस्था बहुतांश ठिकाणी यात्रेकरुंनी केली होती. पारोळा, तामसवाडी, चाळीसगाव, व जळके येथे स्थानिकांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. या सायकल यात्रेची दिनचर्या आपण समजून घेऊ ! यात्रा प्रस्थान करण्यापूर्वी प्रथम ४ दिवसांचे कामाचे नियोजन करण्यात आले होते. पुढे त्यात काही बदल होऊन ज्या यात्रेकरुंनी स्वतः जबाबदारी घेतली होती त्यांनी ती शेवटपर्यंत सांभाळली. 

सकाळी साधारण ४ वाजता कधी ५ वाजता जागरण होत असे. सर्वांसाठी गरम पाण्याची व्यवस्था व त्यासाठी लागणारे सर्व साहित्य सोबत होते. ज्या शाळेत सकाळची शाळा भरायची तेथून आम्हाला ७ वाजता निघायचे असायचे. त्यामुळे त्यापूर्वी सर्वांचे स्नान व प्रातर्विधी आटोपले जायचे. (काही मंडळी अंघोळीच्या गोळ्याही घेत असत.) तसेच सर्वांसाठी नाश्ता व चहाही झालेला असायचा. सकाळची प्रार्थना म्हणून आम्ही पुढच्या प्रवासाला निघायचो. साधारणपणे दीड ते दोन तासात आम्ही दुपारच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेलो असायचो. बऱ्याच वेळेस शाळा उघडायची असायची. तोपर्यंत भजने / अन्य तयारी वा गप्पा व्हायच्या. शाळा उघडली कि प्रदर्शनी लावणारी टीम प्रदर्शनी लावायची. 'पपेट शो'ची टीम प्राथमिक शाळेत भेटायची व आपल्या कार्यक्रमाची लाईन लावायचे. प्रश्नमंजुषा टीम त्यांची तयारी करायचे. कार्यक्रम टीम कार्यक्रमाची तयारी करायचे. चरखा चालविणारे स्वयंसेवक आपले चरखे घेऊन सूतकताई करीत असत. 

सर्व विद्यार्थ्यांना बसविले कि सुरवातीला ईशस्तवन / स्वागत गीत होत असे. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात तीन सायकल यात्रींचे स्वागत व्हायचे आणि पुढचे दोन तास सायकल यात्रा टीम कार्यक्रम चालवायचे. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व एका महिला शिक्षिकेचा सुती हार देऊन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने सत्कार केला जात असे. शाळेला संस्थेच्यावतीने महात्मा गांधीजींच्या जीवनावरील व श्रद्ध्येय मोठे भाऊ यांचे विचारधन असलेली पुस्तके भेट दिली जात असत. त्यानंतर प्रश्नमंजुषा कार्यक्रम होत असे. विजेत्यांना सायकल यात्रींच्या हस्ते बक्षीस म्हणून गांधीजींची पुस्तके दिली जात असत. त्यानंतर सर्वांना एक प्रतिज्ञा दिली जात असे. सर्व विद्यार्थी एका तालासुरात हि प्रतिज्ञा घेत असत. त्यानंतर विद्यर्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही निवडक प्रसंगांची प्रदर्शनी दाखविली जात असे. काही सायकल यात्री विद्यार्थ्यांना समजावून सांगत असत. जेवण झाले कि सायकल यात्रा तेथून निघत असे. 

सामान भरणे, प्रदर्शनी काढणे आदी कामे झाली कि यात्रा मार्गस्थ होई. पुन्हा दीड ते २ तासाचा प्रवास झाला कि मुक्कामाच्या ठिकाणच्या शाळेत कार्यक्रम होत असे. साधारण ५ वाजता शाळा सुटली कि आम्ही मोकळे होत असू. मग खोल्या ताब्यात घेणे, तेथे सामान उतरवणे, कपडे वाळत घालण्यासाठी दोरी बांधणे, ज्यांनी सकाळी आंघोळी केल्या नसतील त्यांनी आंघोळी, कपडे धुवायचे असतील त्यांनी कपडे धुणे अशी कामे सुरु असत. मुक्कामाच्या ठिकाणी रात्री ७.३० ते ८.३० वेळात सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. त्यासाठीची टीम जाहिरात करण्यासाठी, नाटाकाची टीम जागा निश्चितीसाठी, वीज मिळविण्यासाठी गेलेली असे. कार्यक्रमस्थळी पुस्तक विक्रीचा स्टॉल लावला जात असे. रात्रीचा कार्यक्रम आटोपून मंडळी पुन्हा निवासाच्या ठिकाणी येत असत. 

जेवण झाले कि, सर्वजण आढावा बैठकीसाठी एकत्र बसत. रात्रीचे ९.४५ ते १० वाजे दरम्यानचा हा काळ असे. सर्वजण थकलेले असल्याने फारशी उत्सुकता नसायची. कोणाला घरी बोलायचे असायचे, कोणाला झोपायचे असायचे  यावेळी एखाद्या गीताने सुरवात करीत असू. त्यानंतर सर्व यात्रेकरूंची हजेरी घेतली जात असे. कामाचा आढावा घेतला जात असे. दुसऱ्या दिवशीचे नियोजन कुठे जायचे, किती किलोमीटर चालायचे, रस्त्यात कोणती गावे आहेत, या गावात प्रभात फेरी वा संपर्क आहे का आदी गोष्टी सांगितल्या जात असत. यात्रेकरुंचे अनुभव जाणून घेत असू. त्यांच्या अडचणी समजून घेत असू. प्रत्येक यात्रीला आपले वैयक्तिक काम सांभाळून घेतलेली सार्वजनिक कामेही करावी लागत असे. रात्री साधारण ११ वाजता सर्व झोपी जात. काही मंडळी त्यानंतरही मजा मस्ती करीत असत. (क्रमशः)


गिरीश कुळकर्णी 

समन्वयक, 

ग्राम संवाद सायकल यात्रा 

Sunday, 4 December 2022

आत्मविश्वास, खिलाडूवृत्ती व फिटनेस देणारी खानदेश रन २०२२

मागील वर्षी खानदेश रनमध्ये उशीर झाल्याने व शेवटच्या मिनिटापर्यंत ओळख व आदी गोष्टींचा वापर करूनही सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे यावर्षी मॅरेथॉनच्या एक महिना अगोदर (दि. २० ऑक्टोबर) नोंदणी करून सहभाग निश्चित केला. धावण्यापेक्षा चालण्याचा नियमित सराव सुरु होता. शेवटच्या आठवड्यात धावण्याचा सराव केला. बंधू राजेशभाई व तरुण मित्र संदीप यांची उत्तम साथ मिळाली. धावण्यासाठी सर्वात महत्वाचा स्ट्रेचिंगचा धडा त्यांनी दिला. जळगाव रनर ग्रुपने नोंदणी केलेल्या सर्व धावपटूंसाठी आयोजित केलेल्या एकही ट्रेनिंग सत्राचा लाभ घेऊ शकलो नाही. मागच्या दोन मॅरेथॉनचा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी १० किमी धावण्यासाठी ७५ मिनिटे उद्दिष्ट ठेवले होते. 

सामूहिकतेचा आनंद देणाऱ्या व आपल्या स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणाऱ्या या मॅरेथॉनबद्दल प्रचंड आकर्षण, कुतूहल व आतुरता असते. एक दिवस अगोदर जाऊन BIB अन्य साहित्य घेतले. मानसिक तयारी उत्तम होती. आदल्या दिवशी राजेशभाईंशी बोलून सकाळी ५.३० ला निघायचे ठरल्याप्रमाणे सकाळी घराजवळ भेटलो आणि परिसरातील एक जोडपे तयारीनिशी निघाले येथून सुरु झालेला खानदेश रनचा उत्साह आयोजकांच्या शेवटच्या आनंदोत्सवापर्यंत कायम होता. सागर पार्कवर जातांना वातावरण विश्वास वाढविणारे होते. स्ट्रेचिंग झाले आणि तो थरार अनुभवण्यासाठी आम्ही सिद्ध झालो होतो. थरार हो थरारच कारण विश्वासासोबत १० किमी पूर्ण करू शकू का हि मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी भीती होती. तिला जोड जळगावातील रस्त्यांची स्थिती पाहता पाय लचकणे, मुरगळणे वा अडखळून पडणे अशी धास्ती होती. धावण्यास सुरुवात झाली, मनात काही गणिते आखली जात होती, सुरुवातील वेग थोडा कमी ठेवायचा मात्र जरा जास्त यानंतर धावायचे, रस्त्याचा चढ आला कि चालायचे. एका तरुणी माझी मोटिव्हेशन ठरली. आम्ही पुढे मायेचं होतो. साधारण ५ किमी नतर ती मागे पडली आणि मग मी एक चाळिशीतील तरुण निवडला. आम्ही पुढे मागेच धावत होतो. सरासरी ३०० पावले धावणे मग १०० पावले भरभर चालणे असे सुरु होते. 

संगीत, बँड, पुष्पवृष्टी या गोष्टी उत्साह वाढविणाऱ्या होत्या त्याहीपेक्षा महत्वाचे दोन पायांची जिवंत माणसे प्रोत्साहन देत होती. कम ऑन, बढिया, चलो मत दौडो मध्येच कोणी तरी ओळखीचा सर १० किमी असे आश्चर्याने विचारत होते. कुठे पाणी प्यायचे, किती प्यायचे याचेही मनातल्या मनात गणित मांडत होतो. पहिला टप्पा संपण्यापूर्वी एकाने थोडंच राहिलं असं म्हणून आशा जागवली, तेथून परततांना परीक्षा पाहणारे रस्ते व चढ अधिक होते. मात्र रस्त्यातील १०८ कुंडी यज्ञासाठीची मंडळी व लगबग उभारी देणारी ठरली. मध्येच २१ किमी धावणारे धावपटू पाहून प्रेरणा मिळत होती. कुठे तरी झिफ्फर क्लबचे बायपास झालेले आजोबा पाहून तर आणखीनच आत्मविश्वास वाढत होता. ओळखीची मंडळी भेटून नावानिशी बोलले कि वेग वाढायचा. दुसरा टप्पा पूर्ण करतांना ओळखीच्या राजू उपासनीने व्हिडीओ नंतर पाठवतो असे म्हटले. भारत भ्रमण करणारे DJ Shiva व चैतन्यदायी मित्र ऍड. सागर चित्रे यांना पाहिले आणि ड्रेन होणारी बॅटरी पुन्हा चार्ज झाली, ती संपलीच नाही. 

अंतिम टप्प्याचा माहोल हा जबरदस्त असतो आणि होता, आपणही मानसिकदृष्ट्या विजयी झालेले असतो त्याचाही परिणाम होतो. तेथेही दोन-चार जण वेग वाढविण्यासाठी असतात. कधी कधी तेच अंतिम रेषेजवळ नेऊन सोडतात. ... आणि ८२ मिनिटे व २६ सेकंदात, ३१३ धावपटूत २०९ वा, त्यातील २५४ पुरुषात १८१ वा व वय वर्ष ४१-९९ गटातील ११४ पुरुषात ७७ वा क्रमांक मिळवत १० किमीची मॅरेथॉन पूर्ण केली. प्रेरणास्थान असलेले आदरणीय अशोकभाऊ जैन,  JRG चे किरणदादा बच्छाव, विक्रांत सराफ, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. रवी हिराणी, अन्य परिचित व प्रत्येक धावपटूंमुळे हे अंतर पार झाले. मग इतरांचे अंतर पूर्ण करण्यासाठी त्यांचा मोटिव्हेटर झालो. बंधुवर्य राजेशभाई मागे राहिले होते आणि त्यांची आतुरतेने वाट पाहत होतो. १७ मिनिटांनी ते आले आणि खऱ्या अर्थाने माझ्यासाठी खानदेश रन पूर्ण झाली. 

शारीरिक तंदुरुस्तीबाबत आत्मविश्वास देणारी, इतरांना विजयी करण्यासाठी आवश्यक असणारी खिलाडूवृत्ती देणारी, आदरणीय मोठ्या भाऊंची Leave this world better than you found it ची शिकवण देणारी खानदेश रन २०२२ पूर्ण झाली ती खानदेश रन २०२३ च्या आशेने व ७५ मिनिटांच्या उद्देशाने... जय हिंद ! भारत माता कि जय ! 

गिरीश कुळकर्णी