Sunday, 25 October 2020

आपल्या सवयींचे सीमोल्लंघन...हिच जगण्याची खात्री



सध्याच्या कोविड महामारीच्या काळात माणसाला जगण्याची खात्री हवी आहे. जोपर्यंत त्यावरील उपाय बाजारात येत नाही तो पर्यंत आपल्या सवयींचे सीमोल्लंघन करण्याचा हा काळ आहे. हे सीमोल्लंघनच आपल्या जगण्याची खात्री व यशस्वी वाटचालीची नांदी ठरणार आहे. सवयींचे गुलाम असलेल्या आपल्या सर्वांना गेले सहा-सात महिन्यांच्या काळात आपण स्वतःला बदलण्याची पूर्ण संधी उपलब्ध होती. काही गोष्टींच्या बाबतीत व काही प्रमाणात आपण त्या अंगिकारला मात्र मूलभूत सवयीकडे आपण सपशेल दुर्लक्ष केलेले दिसते. त्यासाठीच हे लेखप्रपंच ! 

अनलॉकच्या या काळात बाहेर जे दिसले आणि रोज जे ऐकतोय त्यामुळे सवयीच्या सीमोल्लंघनाची आवश्यकता लक्षात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी समाज प्रबोधनातून या गोष्टीकडे लक्ष वेधले. "न्यू नॉर्म" अर्थात नवीन जीवनशैली असा उल्लेख मला विशेष भावला. कालपर्यंतच्या आपल्या सवयींना बदलले तर आपण "न्यू नॉर्म" सेट करु शकू व जीवनाचा आनंद घेऊ शकू. गेल्या काही दिवसात गावाकडे गेलो असता कोणाही व्यक्तीच्या तोंडावर मास्क नसल्याचे पाहून आश्चर्य वाटले. समाज माध्यमातून येणाऱ्या सामाजिक कार्यक्रमातील व्यक्तींचे वर्तन, कालही संध्याकाळी जळगावच्या काव्य रत्नावली चौकामधील अनुभवलेले चित्र अतिशय भयावह, बेपर्वाई व बेजबाबदारीचेच होते. थोडे वाचायला कटू वाटले तरी वास्तव मांडलेच पाहिजे. गेल्या काही दिवसात अनेकांशी झालेला संवाद, नातेसंबंधातील साठीच्या उंबरठ्यावरील व्यक्तीच्या दुर्दैवी निधनाची बातमी, उच्च रक्तदाबाचा शिकार झालेला पन्नाशीतील मित्र आणि "काय बोलावं तेच सुचत नाही" म्हणणारी चाळीशीतील गृहिणी हे या लेखामागची प्रेरणा आहे. 

तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे अबोल होत जाणारी तरुणाई, भान हरपलेला समाज, मनातील सर्व प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या जिवाभावाच्या आश्वासक मित्राचा अभाव, आर्थिक असुरक्षिततेमुळे निर्माण झालेली अनिश्चितता, अनाकलनीय परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीची निर्णयक्षमता, आत्ममग्नतेमुळे जीवनातील हरविलेला आनंद, समाजातील नकारात्मक घटनांचा होत असलेला विपरीत परिणाम,  यासह अनेक गोष्टी या लेखाचे व समस्यांचे मूळ आहे. काळ, वेळ व परिस्थितीनुरुप बदल अंगिकारण्याची मानसिकताच आपल्याला उपयोगी ठरणार आहे.  एका बाजूला शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची तयारी व दुसऱ्या बाजूला "स्वओळख" बदलण्याची भीती अशा विमनस्क स्थितीत समाज आहे. आपल्या पश्चात काय ? हा प्रश्न वारंवार अनेक मानसिक गोंधळ निर्माण करीत आहे. आपल्या गरज व आवश्यकता मर्यादित करण्याचे मोठे आवाहन समाजासमोर आहे. यासाठीच वर्तन परिवर्तनाची आत्यंतिक आवश्यकता आहे म्हणूनच लेखाचे शीर्षक आहे सवयींचे सीमोल्लंघन ! 

हे सर्व वाचल्यानंतर स्वाभाविक प्रश्न येतो सवयींचे सीमोल्लंघन कसे करायचे ? 

१. समाजाभिमुख व्हा... व्यक्त व्हा... बोला... काय म्हणायचे ते म्हणा...

२. वास्तव स्वीकारा. जे बदलता येणार नाही व जे बदलणे आपल्या हातात नाही ते सोडून द्या...

३. जीवनात सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत याचा वस्तुपाठ मनाला घालून द्या. 

४. कोण्तायही कामाची लाज न बाळगता आपली नवीन ओळख निर्माण करा. 

५. आनंदी राहा... सकारात्मक राहा.... 

६. आपला स्क्रीन समोरील वेळ कमी करण्याचा निश्चयी प्रयत्न करा. 

७. इतरांना द्यायला शिका. (वेळ, पैसे, मदत जे पण शक्य असेल ते)

८. मानवी जीवनाची इतिकर्तव्यता कशात आहे ते जाणून घ्या. 

९. जगण्यासाठी पैशांपेक्षाही मानसिक बळ अधिक महत्वाचे ठरते हे समजून घ्या. 

१०. ज्या गोष्टी आयुष्यात कधी केल्या नाहीत त्या करण्याची तयारी ठेवा. 

११. गर्दीपासून लांब राहा. योग्य ती काळजी घ्या. 

१२. दूरदर्शनवरील प्रेरणा, उभारी, मानसिक बळ उंचावणाऱ्या व निखळ मनोरंजनाच्या गोष्टीचं पहा. 

१३. कोरोना पासून बचाव करण्यासाठीच्या सर्व सूचना अमलात आणा. 

१४. "काही फरक पडत नाही" व "जे सर्वांचे होईल ते आपले होईल" ही वृत्ती सोडा. 

१५. "हिच आमुची प्रार्थना...", " तू बुद्धी देवा... तू तेज दे" यासारख्या प्रार्थना वारंवर ऐका. 


ही यादी तशी व्यक्ती सापेक्ष असल्याने बरीच मोठी होऊ शकेल मात्र त्यातील सर्वांसाठीच्या काही साधारण गोष्टी येथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पैकी ज्यांना कोणाला या संदर्भात काही बोलायचे असेल, संवाद साधायचा असेल, चर्चा करायची असेल त्यांनी नक्की फोन करा. माझ्यापरीने समाधान करण्याचा निश्चित प्रयत्न करीन. आपल्या सवयींचे सीमोल्लंनघन हेच जगण्याची खात्री देण्याची शक्यता आहे. 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४


Wednesday, 2 September 2020

"कृतज्ञता उत्सवा"ची उपलब्धी !


यावर्षीच्या गणेशोत्सवात गणपती बाप्पाकडे काहीही न मागता त्याने आपल्याला जीवनात भरभरुन दिलेल्या गोष्टींबद्दल धन्यवाद देण्यासाठी आशा फाऊंडेशनच्या माध्यमातून  'कृतज्ञता उत्सव' साजरा करावा अशी कल्पना दि. २१ ऑगस्टच्या मध्यरात्री डोक्यात आली व आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सक्रिय सहभागाने यशस्वी झाली. मागे वळून पाहतांना व या उपक्रमाचे सिंहावलोकन करतांना व्यक्तिगत लक्षात आलेल्या काही उपलब्धी व ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन प्रपंच...  आपणही या 'कृतज्ञता उत्सवात' सक्रिय सहभागी होतात. काहींनी लेखन केले, काहींनी वाचन केले. आपण या उपक्रमाकडे कसे पाहता ? आपल्याला काय मिळाले ? आपल्याला या उपक्रमाबद्दल काय वाटते ? आपण या उपक्रमाची यशस्विता कशात पाहता ? मोकळेपणाने जरुर लिहा...

उपक्रमाची उपलब्धी सांगण्यापूर्वी उपक्रम काळातील तीन प्रमुख 'योगायोग' सांगितले पाहिजे. 

१. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सुदैवाने त्या दिवशी ऋषी पंचमी होती. आपल्या तपोबलाने मानवावर अनंत उपकार करणाऱ्या व दिशा दर्शन करणाऱ्या सप्तर्षींबाबत कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा दिवस. 

२. उत्सवाच्या पाचव्या दिवशी आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. दुर्दैवाने त्याच दिवशी सकाळी आमचा जवळचा मित्र (लंगोटी यार) नरेंद्र कुळकर्णी याच्या दुःखद निधनाची बातमी कळली.

३. उत्सवाच्या नवव्या दिवशी निसर्गाप्रतीची कृतज्ञता करण्यात आली. त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून प्रकृती वंदन दिवस साजरा करण्यात आला. ज्यात वृक्षांची पूजा करण्यात येऊन निसर्गाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली व पर्यावरण रक्षणाबाबतचा संदेश देण्यात आला. 

कृतज्ञता उत्सवाची उपलब्धी...

१. कृतज्ञता या सर्वश्रेष्ठ जीवनमूल्याची जाण निर्माण झाली. आपल्यासाठी अनेकांनी अनेक गोष्टी केलेल्या असतात याची जाणीव झाली व त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची भावना निर्माण करता आली. यामुळे परस्पर सदभाव व सकारात्मकता वाढीस लागेल.  

२. सहभागींचा (लेखन, वाचन व प्रसार) दिवसभरातील बहुतेक वेळ भूतकाळातील चांगल्या आठवणींमध्ये गेला. त्यातून लेखन झाले, वाचन झाले, चिंतन झाले, काही जणांशी बोलणे झाले. महत्वाचे 'कोरोना'च्या नकारात्मकतेतून मंडळी काही काळ बाहेर पडली. 

३. समाज माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता त्यात सकारात्मक लिखाण करणाऱ्यांची आवश्यकता आहे. अशी क्षमता असलेल्यांना आत्मविश्वास देता आला. आपल्याला चांगले लिहिता येते, लोक वाचतात हा विश्वास निर्माण झाला. तरुणांचा सहभाग विशेष...

४. एकाच विषयावर किती वैविध्यतेने लिहिता येते. प्रत्येक माणूस किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात, व्यक्त होतात याची जाणीव झाली. लेखन शैली, अनुभव संपन्नता, भाषा समृद्धी झाली. थोडक्यात वैचारिक प्रगल्भता वाढली. 

५. सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने अनेक गावांची व तेथील विशेष गोष्टींची माहिती झाली. शैक्षणिक संस्थांची व तेथील शिक्षकांनी केलेल्या कार्याची माहिती झाली. देशाच्या विविध छटा लक्षात आल्या. काही विशेष व्यक्तींचा परिचय झाला. या सर्वांबद्दलचा अभिमान बळावला. 

६. माणसांचे स्वभाव, त्यांनी इतरांसाठी केलेल्या गोष्टींची व त्याचा किती दूरगामी परिणाम होतो याची जाणीव निर्माण झाली. मानवाचा परस्परातील व्यवहार कळला. अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देतो ते कळले.

७. गणेशोत्सव अशा पद्धतीने साजरा करता येतो व त्यातून अपेक्षित समाज प्रबोधन साध्य करता येते हे शिकलो.

८. संस्थेशी नवीन मंडळी जोडली गेली. त्यांची परस्परात मैत्री झाली. 

जाहीर कृतज्ञता व दिलगिरी 

'कृतज्ञता उत्सव' या सार्वजनिक उपक्रमात समाजाचा सहभाग महत्वाचा. सर्वप्रथम या उपक्रमात सहभागी सर्व समाज बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांनी व्यक्त केलेल्या भावना दुसऱ्या दिवशी इ-स्वरूपात संकलित करुन प्रकाशित केल्या जात होत्या. यासाठी पूजा ग्राफिक्सचे श्री. निलेश कोळी यांचे अनमोल असे सहकार्य लाभले. कोणत्या प्रकारच्या आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता हे काम त्यांनी पूर्ण केले  शेवटच्या दिवशीच्या प्रतिक्रिया रात्री उशिरापर्यंत काम करुन आकर्षक पद्धतीने त्याची मांडणी. एका पानापासून सुरु झालेला हा प्रवास शेवटच्या दिवशी १२ पानांपर्यंत पोहोचला. दररोज ठरलेल्या वेळी त्याचे काम पूर्ण करुन दिले याबद्दल निलेशचे मनापासून धन्यवाद व जाहीर आभार. दररोज आपल्या भावना लिहून पाठविणारे मित्रवर्य व ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, धरणगाव येथील प्रा. बी. एन. चौधरी, सौ. विंदाताई नाईक, जळगावची विद्यार्थिनी कु. मानसी कुळकर्णी, चोपड्याची कु. अर्चना अग्निहोत्री, चाळीसगावचा अक्षय पाटे, श्रीमती सुनंदा कुळकर्णी, माझ्या सहकारी सुजाता बोरकर यांचेही कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो. तसेच श्रीमती शशिकला खाडिलकर, वास्तवातील संध्याकिशोर, रेवती ठिपसे, डॉ. उषा शर्मा, सोलापूर येथील हरिप्रसाद बंडी, पुणे येथील नागेश पाटील, सौ. अपर्णा पाटील-महाशब्दे, सौ. मेधा इनामदार,  चिंचवड (पुणे) येथील सौ. प्रणाली महाशब्दे, मुंबई येथील डॉ. मधुबाला जोशी, सौ. नीलिमा देशपांडे, सौ. वासंती काळे, सौ. गायत्री कुळकर्णी, भुसावळ येथील वैशाली पाटील, सौ, रेवती शेंदुर्णीकर, वैदेही नाखरे, वृषाली कुळकर्णी, सौ. शैला नेवे, जितेंद्र ढाके, अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात याबाबद्दल त्यांचेही मनापासून आभार. समारोपाच्या दिवशी देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या जळगाव नगरीच्या प्रथम नागरिक सौ. भारतीताई सोनवणे , जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. अशोकभाऊ जैन, विश्वस्त व माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील, माजी कुलगुरु डॉ. आर. एस. माळी, ग्रामदैवत श्रीराम महाराज संस्थांचे विद्यमान गादीपती  हभप मंगेश महाराज जोशी, प्र-कुलगुरु डॉ. पी. पी. माहुलीकर, प्राचार्य अनिल राव, दिलीपदादा पाटील, सौ. स्नेहल लोंढे, प्रभात चौधरी, अनिल अभ्यंकर, कप्तान मोहन कुळकर्णी, नाशिक येथील दीपक करंजीकर, मुंबई येथील विसुभाऊ बापट, अनंत भोळे, प्रा. डॉ. राजेंद्र खडायते, प्रा. नितीन बारी, पुणे येथील. ऍड. हेमंत मेंडकी, गिरीप्रेमी उमेश झिरपे,  बंगलोर येथील विजय कुळकर्णी, यजुर्वेंद्र महाजन, डॉ. अपर्णा भट-कासार, अपूर्वा वाणी, धुळे येथील मेधा उज्जैनकर, मनीष कासोदेकर, अकोल्याच्या सौ. मोहिनी मोडक, मंजुषा भिडे, अपूर्वा चौधरी, किरण बोरसे, जालना येथील लताताई देशपांडे युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे चिन्मय संत, वैभवी कुळकर्णी, कीर्ती शर्मा, कल्याणी कुळकर्णी, ऐश्वर्या परशुरामे  यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या सहकारी सुजाता बोरकर यांनी प्रकृती अस्वास्थ्य असतांनाही दररोज या नाकाचे मुद्रितशोधनाचे काम केले, त्यांचेही विशेष धन्यवाद ! ज्यांनी मातीतून, रांगोळीतून, चित्रकलेतून, पानाफुलातून विविध रूपातील श्रगणेश साकारले त्यांचेही मनापासून धन्यवाद ! ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी हा उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. 

दिलगिरी 

श्री. प्रदीप रस्से यांनी खास लेखाचे सादरीकरण उत्कृष्ट होण्यासाठी दिलेले छायाचित्र तसेच अक्षय पाटे, वास्तवातील संध्याकिशोर व माझी आई श्रीमती सुनंदा कुळकर्णी यांच्या एका दिवसाच्या कृतज्ञता भावना   माझ्या चुकीमुळे प्रकाशित करण्याचे राहिले मी त्यांची जाहीर माफी मागतो. वरील श्रेयनामावलीत कोणाचा चुकून उल्लेख राहिला असेल त्यांचीही दिलगिरी व्यक्त करतो. 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Tuesday, 1 September 2020

मी कृतज्ञ पुण्यभू भारत मातेचा !


आशा फौंडेशनच्या गणेशोत्सवांतर्गत "कृतज्ञता उत्सवा"चा आजचा शेवटचा दिवस ! आम्हास सांगतांना विशेष आनंद होतो कि आपल्या परम पवित्र भारत मातेबद्दल सुमारे ६० जणांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. जळगावच्या प्रथम नागरिकापासून ७ हजार कोटींचा उद्योग समूहाच्या प्रमुखापर्यंत, कुलगुरुंपासून शिक्षण तज्ज्ञांपर्यंत, बंगलोरपासून चोपड्यापर्यंत, ज्येष्ठांपासून ते अलीकडच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांपर्यंत, संस्कृतपासून इंग्रजीपर्यंत म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या या पुण्यभू भारतमातेच्या विविधतेचा परिचय देणाऱ्या सुपुत्रांचा यात सहभाग आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, विचारांनी व आचरणाने या पवित्र देशाचे मांगल्य सांगितले आहे. सोबत तीचे उतराई होण्यासाठी काय करत आहे आणि काय केला पाहिजे याचा सुंदर उहापोह केला आहे. धर्म, जाती, पंथ, संप्रदाय, भाषा, प्रांत या विविधतेची आपणास अनुभूती होईल. देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराबद्दल येथील इतिहासाबद्दल, क्रांतिकारकांबद्दल, लोकशाहीबद्दल, स्वातंत्र्याबद्दल, ऋषी मुनी, योगा, आयुर्वेद, थोर विचारवंत, उद्योजक, समाज सुधारक आदींबद्दल आपल्या मर्यादेत सर्वांनी व्यक्त होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या देशबांधवांच्या मनोभूमिका साकारणाऱ्या या परमपवित्र भारत मातेला कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. 

मला आपल्या देशाचा अभिमान आहे. कारण हा माझा देश आहे. हि माझी जन्मभूमी आहे. मी तिला माता मानतो. तीचे पावित्र्य आणि महत्व जाणतो. मला ती सजीव वाटते व वंदनीय वाटते. मोठ्या अभिमानाने मला माझ्या या मातेला वंदन करतांना वंदे मातरम ! म्हणायला आवडते. आपल्या देशाचा जो इतिहास आहे. तो वाचतांना, ऐकतांना व जाणून घेतांना माझ्या अंगावर रोमांच उठतात. हा इतिहास मला आपला वाटतो. येथील संस्कृती मला माझी संस्कृती वाटते. येथील थोर माहात्म्यांना मी माझे आदर्श मानतो. येथील चांगल्या गोष्टींचा मला अभिमान वाटतो. यासाठीच हि कृतज्ञता ! 

शालेय जीवनात दररोज भारत मातेचे महन्मंगल स्तोत्र ऐकले. कालांतराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषद यांच्या तत्त्वज्ञानाने राष्ट्राबद्दलचे प्रेम, भक्ती शिकलो. सामाजिक जीवनातील आपले आचरण त्याअनुरुप करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून या साऱ्या गोष्टी करता येतात याचा अनुभव घेतो. प्रामाणिकपणाला कष्टाची जोड देत आपल्यामुळे कोणालाही आपली मान खाली घालावी लागणार नाही याची काळजी घेतो. आज पर्यंत या उत्सवात त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली त्या सर्वांच्या संस्कारातून देशाचा एक चांगला नागरिक म्हणून आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडीत आहे. याची रुजुवात मात्र "जयोस्तुते.." या स्तोत्रातूनच झाली. "तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण" हे कायमस्वरुपी हृदयात कोरलं गेलं. ९० च्या दशकाच्या सुरवातीला संगणकशास्त्र विषयाची पदवी घेऊन सुद्धा आपल्या देशाबाहेर जायचे नाही हे ठरविले. ऐन उमेदीच्या काळात कायमस्वरुपाची बँकेतील नोकरी सोडून सामाजिक कामाची एक वेगळी वाट चोखाळू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याद्वारे या देशाची, देशातील जनतेची सेवा करु शकतोय याचा मला विशेष आनंद आहे. अनैतिक गोष्टी कधीही करायच्या नाही असे ठरविले आणि त्यासाठी कटिबद्ध आहे. 

हुंडा व भ्रष्टाचारासारख्या अनिष्ट रुढी थांबविण्यासाठी स्वतःपासून सुरवात केली. आपण सारे या भारत मातेची लेकरे असल्याने प्रत्येकाला कायम मदतीचा हात देतो. माझ्या सर्व बांधवांमध्ये असलेल्या सद्गुणांकडे पाहतो. त्याच्या प्रगतीत आपला सहभाग असावा यासाठी प्रयत्न करतो. प्रकृती, विकृती व संस्कृतीचा अर्थ समजून घेत त्या प्रमाणे आचरण ठेवतो. "Life is for one generation but Good Name is forever " या उक्तीनुसार आपल्या देशासाठी जे जे काही चांगलं करता येईल याचाच कायम विचार करतो. मला या देशाने जे भारतीय तत्वज्ञान दिलं आहे त्याचा अभ्यास करतो. जीवनात भारतीय जीवनशैली अंगिकारण्याचा प्रयत्न करतो. 

मला समज आल्यापासून कधीही १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे झेंडावंदन चुकविलेले नाही. सकाळ थोडी गडबडीची, कुठे भारत माता पूजन, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम कधीतरी मित्र परिवारासह सहल असा काहीसा दिवस जात असे, वर्तमानपत्रात जाहिरातदारांनी या दिवसाला कसे महत्व दिले वा वृत्तपत्रांनी काय वेगळे वाचकांना दिले हे पाहणे हि एक आवडीची गोष्ट असे. सायंकाळी देशाच्या पंतप्रधानांनी देशाला कोणत्या मार्गावर नेण्याचे ठरविले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे. कधी तरी आपल्या तिरंग्याचा सन्मान वाढावा यासाठी प्लास्टिक वा अन्य स्वरुपातील प्रतीकात्मक झेंड्याच्या विक्रीवर बंदीची मागणी, कधी तरी लोकांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या बाजूला, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अगदी गटारीत पडलेले झेंडे गोळा करुन ते प्रशासनाला नेऊन देणे यासारखे उपद्व्यापही केले. विद्यार्थी दशेत न चुकता स्वातंत्र्य दिवस १४ ऑगस्टच्या रात्री मशाल यात्रा काढून १२ वाजता राष्ट्रगीत म्हणून साजरा केला आहे. 

भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित ठेवणारा, आपणास स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनामवीरांना , क्रांतीकारकांना आणि ते अबाधित ठेवणाऱ्या भारतीय सशस्त्रदलांच्या जवानांना, आपल्या देशाच्या तिरंग्याला अभिमानाने अभिवादन करतांना मला प्रचंड अभिमान आणि आनंद होतो. आपल्या देशाची महान संस्कृती व येथील अस्मितांबद्दल स्वाभिमान बाळगण्याचा प्रयत्न करतो. देशातील बलाढ्य लोकशाही असलेल्या या देशाचा कारभार पाहून सर्व जग अनेकदा स्तंभित व अचंबित होते हेच माझ्या भारत मातेचे वैशिष्ट्य आहे. "हे विश्वची माझे घर !" आणि "जो जे वांछील तो ते लाहो !" अशी संकसृती असलेल्या देशाला परमवैभवाला नेण्यासाठी कटिबद्ध होऊ या ! भारतीय चिंतनातून विश्वकल्याण होऊ हिच त्या बा गणरायाचरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Monday, 31 August 2020

कृतज्ञता निसर्गाची !


आशा फौंडेशनच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित "कृतज्ञता उत्सवा"ने आपल्या सर्वांना भावना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या जीवनात अनेक गोष्टी सहज मिळालेल्या असतात जसे पहा न , निसर्ग किती भरभरुन देतो निरपेक्षपणे आणि निरागसतेने ! आज सर्वांनी आपल्या भावना व्यक्त करीत असतांना आपण कसा नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिरेकी वापर करुन त्याचा ऱ्हास करुन घेत आहोत याविषयीची खंत व्यक्त केली आह. सोबत त्याची किती मोठी किमंत अनेकदा मोजावी लागली आहे त्याचेही उदाहरण दिले आहे. आसूच जास्त आणि हसू कमी यामागची कारणमीमांसा अतिशय छान पद्धतीने केली आहे. "कोरोना" आणि " त्सुनामी" यासारख्या नैसर्गिक आघातांचा उल्लेख अनेकांच्या भावनांमध्ये आला आहे. निसर्गाचा सकारात्मक व नकारात्मक आविष्काराची अनेक उदाहरणेही दिली आहेत. अनेकांनी आपल्या भावनांना व्यक्त करतांना काव्यपंक्तींचा चपखलपणाने केलेला वापर त्यांचा व्यक्त होण्याचा परीघ रुंदावतात. सर्वांनीच निसर्गाची महती सांगितली आहे व ती जाणीव जागृतीची पावती आहे. मला व्यक्तिगत निसर्ग फार भावतो आणि त्याचा मनमुराद आनंद घ्यायला आवडते अर्थात त्याला कुठल्याही प्रकारची इजा न करता. आपल्या सर्वांच्या विचारांचा मागोवा घेत माझी निसर्गाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करीत आहे. 

लहानपणापासून "साधी राहणी व उच्च विचारसरणी" ही उक्ती ऐकत आलो आहे आणि त्याचा सर्वात निकटचा संबंध नैसर्गिक जीवनशैलीशीच आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा जन्मच मुळी देण्यासाठी झालेला आपण पाहतो. सावली देणारे झाड त्याचा उपभोग घेणारा तोडतो. त्याच्या विविध घटकांचा फायदा त्यालाच होत असते. पाणी प्रदूषण करणाऱ्यालाच नदी स्वच्छ, चांगले व मुबलक पाणी देते. निसर्गातून ऑक्सिजन घेणाराच त्याचे प्रदूषण करतो. या सर्व गोष्टींमुळेच मानवी जीवनासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे याचे कारणच दातृत्वाचा वसा घेतलेल्या या निसर्गाप्रती आपण कायम कृतज्ञ असले पाहिजे. निसर्गातील जैव विविधता हे त्या निसर्ग  साखळीचे घटक आहेत. जंगल, जमीन आणि पाणी हे मूलभूत घटकावरच निसर्गातील जीवसृष्टी अवलंबून आहे. यात झालेले कोणतेही असंतुलन जीवसृष्टीच्या मुळावर उठणारे व आपल्या अस्तित्वाचा प्रसन्न निर्माण करणारे आहे एव्हढेच लक्षात घेतले तर आपली वृत्ती व कृतीत बदल होऊन ती निसर्गानुकूल होण्याची शक्यता वाढणार आहे. गरज, हव्यास आणि लोभ यांचे अर्थ समजून घेतले तर अपेक्षित कृती अधिक जाणीवपूर्वक होईल. बालकाच्या जीवनातील निरागसता समजून घेतली तर आपण आपल्या या निसर्गाला निश्चितच जपू शकू त्यासाठीच वैयक्तिक जीवनात प्रयत्न करीत असतो. 

मुळात भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टींचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून न घेतल्याने आपण तिला नावे ठेवू लागलो किंवा दुर्दैवाने ते प्रतिष्ठेचे ठरताना दिसते आहे. ग्रामीण भागात शेती आधारित कुटुंबात जन्म झालेला असल्याने निसर्गाची कायम ओढ असते. निसर्ग आपल्याला अनेक गोष्टींची पूर्वसूचना देत असतो. निसर्गाची ही भाषा आपण ऐकायला व समजून घ्यायला शिकले पाहिजे. निसर्गाशी संवाद साधायला शिकले पाहिजे. कोणत्या ऋतू व हवामानात कोणती पिके येतात, कोणते पक्षी स्थलांतरित होतात, कोणते खाद्य पदार्थ खाल्ले पाहिजे यासह अनेक गोष्टी आपल्याला निसर्गतः माहिती असतात नव्हे त्या आपल्याला त्या ज्ञात करुन दिल्या जातात. चातुर्मासात वातड पदार्थ वर्ज्य असतात, अपचन झालं तर लंघन करावे यासारख्या अनेक गोष्टी घरातील ज्येष्ठ आपल्याला सांगत असतात. आपण डोळसपणाने त्याचा अंमल आपल्या जीवनात केला पाहिजे.  

या सर्व गोष्टींचा आधार मला भगवद्गीतेत सापडतो. भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे, गीतेच्या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष आचार सृष्टीत दिसतो तो मानवाने शिकून घेतला पाहिजे. "मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः" याचा अर्थ सर्व मानवांनी ईश्वराच्या मार्गाचे अनुसरण करावे. या मार्गाचे दर्शन आपणास प्रत्यक्ष सृष्टीत दिसते. सूर्य उगवतो, त्यामुळे कमळे उमलतात, लोक आपापल्या कार्याला लागत. सृष्टी जागी होऊन कार्यरत होते, या सर्व सृष्टिकार्याची ऊर्जा सूर्यापासून मिळते. सूर्य उगवला नाही तर ही कार्ये थंडावलेले असतील. एवढी कार्ये करतो मात्र त्याचा अहंकार नाही. सूर्यापासून मिळालेल्या ऊर्जेचे कोणी काय करावे हे तो ठरवीत नाही. तो ऊर्जा देण्याचे त्याचे काम करतो, त्या बदल्यात काही प्राप्त व्हावे अशी अपेक्षा नाही. 

वृक्ष वाढतात, त्याला फळे, फुले येतात. पक्षी त्यावर घरटी बांधतात. सावलीत जीव विश्रांती घेतात. काही मुले दगड मारतात तर काही त्याला झोपला बांधतात. याचा वृक्षाला अहंकार नाही. यासाठीच भगवान कृष्ण सृष्टीकडून जीवनाचे धडे घ्या असे म्हणतात. सृष्टीमध्ये एक सहज जीवन व्यवहार दिसतो. मानवाखेरीज सारी सृष्टी एकात्मतेवर उभी आहे. सृष्टीतील प्रत्येक व्यवहार एक दुसर्याशी जोडलेला व पूरक आहे. घरामधील सर्वांचा व्यवहार यावर आधारित असल्याने कुटुंबातच त्याचे बाळकडू मिळाले आणि ते दीर्घकाळ आचरणात राहील असेच आहे. आपण सर्वांनीही हेच तत्व आपल्या कृतज्ञतेच्या भावनेतून व्यक्त केलेले दिसते. जीवनात निसर्गानुकूल जीवनशैलीचा पुरस्कर्ता राहिलो आणि त्यासाठी आमच्या कार्यातून कायम त्यासाठी प्रयत्नशील आहे. यावर्षीची आशा फौंडेशनची मध्यवर्ती संकल्पना ही "रुप पालटू वसुंधरेचे... नैसर्गिक जीवनशैलीने" त्यासाठीच आहे. 

निसर्गातील पंच तत्वांनी निर्माण झालेल्या व त्याच पंच तत्वात विलीन होणाऱ्या मानवाचे निसर्गाशी अतूट असे नाते आहे. जगण्यासाठीचा सर्व गोष्टी देणाऱ्या या निसर्गाप्रती आपण कृतज्ञ आहोत. निसर्ग जतन व संवर्धन करण्याचा वसा आणि वारसा अधिक जोमाने पुढे नेऊ या ! गुरु, सखा व सोबती असलेल्या निसर्गाचे वैभव टिकविण्यासाठीचे सामर्थ्य आम्हास दे... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Sunday, 30 August 2020

कृतज्ञता गावाविषयीची !

माझे जळगाव १७ मजलीवरुन...

आशा फौंडेशनच्या "कृतज्ञता उत्सवा"च्या निमित्ताने दररोज दोन-तीन जण नवीन सहभागी होतात एखादा थांबतो. यानिमित्ताने एक गोष्ट नक्की जाणवते आहे आपण त्या जगनियंत्याजवळ काही तरी मागत असतांना आपल्याला त्याने किती भरभरुन दिलं आहे आणि त्याचा आपण फारसा विचार करीत नाही आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा विषय दूरच... खरोखर या उत्सवाच्या अंतिम टप्प्यात आलो असतांना असे जाणवते आहे कि आपण अजून खूप साऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आठव्या दिवशी आपण आपल्या जीवनातील हृदयस्थ असलेली गोष्ट म्हणजे आपले गाव... त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. वेळ आणि लेखनाचे बंधन असतांनाही प्रत्येकाने व्यक्त केलेल्या भावना खूप काही सांगणाऱ्या आहेत. शब्द अपुरे पडले असे वाटत असतांनाही वाचणाऱ्याला आपण म्हणतात ते सर्व पोहोचतोय असे मला व्यक्त करणाऱ्या सर्वांना सांगावेसे वाटते. प्रत्येकालाच आपल्या गावाने सर्व काही दिले आहे विशेषतः आपली ओळख ! आपल्या गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतांना मला तीन गावांबद्दल प्रामुख्याने कर्तृज्ञता व्यक्त करावयाची आहे अर्थात या सर्व मंडळींनी जे सांगितले तेच  एकत्रितरित्या मांडणार आहे.

गाव म्हटलं कि येते ती तेथील वस्ती, माणसे, संस्कृती, तेथील अभिमानास्पद वारसा व निर्मित स्थळे... माणूस घराबाहेर असतो तेव्हा त्याला सर्वात जवळची वाटणारी जागा म्हणजे आपले गाव. कारण माणूस हा समूहप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याला कायम माणसे हवी असतात. ती आपल्या परिवारातील असली तर अधिक दिलासा देणारे वाटते. मात्र त्यापासून दूर गेल्यावर असतात ती आपली गावातील माणसे, नंतर राज्य आणि देशातील... कारण ही सर्व आपली माणसे असतात. पाडा, तांडा, वस्ती, गाव, शहर, महानगर ही सारी त्या गावाची रुपे ! हे लिहीत असतांनाच मला जाणवले कि पाड्यापासून महानगरापर्यंत जात असतांना आपलेपणा तीव्रतेपासून सौम्यपणाकडे जात आहे. असे असले तरी व्यक्तिगत कृतज्ञता कुठेही कमी होत नाही कारण त्यात असलेले "आपले"पण मग ते तीव्र असो वा सौम्य. महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतील विविध गावांना भेटी देत असतांना मला हे नेहमीच जाणवत आले आहे. ही त्या त्या गावाची आणि भारतीय संस्कृतीची विशेषताच ! 

गावाची महत्ता सांगणाऱ्या आमच्या गावातील वाडा आणि कुटुंबीय...

माझं जन्म धानोरा, ता. चोपडा, जि. जळगाव येथील... आयुष्याची सुरवात जेथे झाली तेथेच आयुष्याचा अंतिम कालखंड व्यतीत करावा असे मनोमन ठरविले आहे. कारण या गावाने जे दिलं ते जगात कुठेही मिळणार नाही याची खात्री आहे. स्वा. सावरकरांच्या "ने ने मजसी ने परत मातृभूमीला..." या गीताप्रमाणेच. त्यांनी आपल्या मातृभूमीप्रती कवितेतून व्यक्त केलेली आर्तता आपल्या गावाच्या बाबतीत  प्रत्येकाला अनुभवता येईल. "बालपणीचा काळ सुखाचा" असे म्हणून तर म्हटले जात असेल ना ! कायम स्मरणात राहणाऱ्या व गावाबद्दलची ओढ निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी येथे केल्या आहेत आणि या गोष्टींनी आयुष्यभरासाठीचा आनंद आणि समाधान दिले आहे. गावांमधील नकारात्मकतेची चर्चा करीत असतांना सुद्धा ते आपले गाव आहे म्हणूनच ! त्यातूनच सापडणारे उत्तर आणि पुन्हा वृद्धिंगत होणारी आपल्या गावाबद्दलची आपुलकी अशी ही साखळी... उन्हाळ्याच्या दिवसात गावातील शेकोटी, देवबाबांची यात्रा, लग्नाच्या वेळेस रात्री निघणारी मिरवणूक अर्थात फुनकं, रामलीला, थंडीत रात्री शेतात गव्हाला दिलेले पाणी, तेथेच प्यायलेला गुळाचा चहा, शेतात काम करतांना सोबतच्या मंडळींच्या भाकरीचा तुकडा, गुळाची जिलबी, बाजाराच्या दिवशी आजोबांनी आणलेला शेव चिवडा, उन्हाळ्यात आंब्याच्या रसाची रेलचेल, उन्हाळ्यात खळ्यात धान्याची केलेली राखोळी, तीन बैलजोडीच्या साहाय्याने लोखंडी नांगराने केलेली नांगरटी,  रात्री अपरात्री ट्रॅक्टर बसून शेतात केलेली नांगरटी, म्हशीला पाणी पाजायला नेताना तिच्यावर बसणे,  तिच्या शिंगांना अडकवलेल्या टमरेलने ती उधळणे अशा किती तरी गोष्टी या गावाने दिल्यात. वाड्याच्या दारात उभे असतांना रस्त्याने जाणारा येणारा प्रेमाने करणारा "राम राम..." इथलाच. असा माझा गाव जवळच असलेले उनपदेव, मनुदेवी आणि शिरागड ही बैलगाडीवरील सहलीची ठिकाणे. चिंचोलीच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा उत्सव. गावातील व्याख्यानमाला, कीर्तन यासह अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. जीवनाचा अस्सल तत्वज्ञान या गावातच  मिळते. 

वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने व आमचे शिक्षण झाले धुळ्यात ! हे माझे दुसरे गाव.. जीवन घडविणारे हे गाव येथील शाळा, महाविद्यालय, शिक्षक, सामाजिक संस्था यांनीच खरे तर विचारांची दिशा दिली. राजवाडे संशोधन मंडळ, समर्थ वाग्देवता मंदिर, शिवाजी व्यायाम शाळा, नकाणे  तलाव, एकविरा देवी मंदिर, पांझरा नदी, ५वी गल्ली, मनोहर, स्वस्तिक, ज्योती, प्रभाकर, राजकमल टॉकीज, लहान पूल, मोठा पूल, जुने धुळे, देवपूर, भांग्या मारोती, मिरच्या मारोती, पाच कंदील, जवाहर सूत गिरणी, लळींगचा किल्ला, सोनगीर काय नाही या माझ्या गावात... आदिवासी भागात मोडत असले तरी हे शिक्षण आणि खाद्य पदार्थांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर ठरले आहे. ढाबा संस्कृती येथीलच. येथील गल्ली बोळ आजही मला तेथे जाण्यासाठी बाध्य करतो. येथील माणसांचा बोलतांना टोन जरी रफ वाटला तरी ती प्रेमळ आहेत. रा. स्व. संघ, अभाविप, विद्यार्थी प्रबोधिनी या सारख्या संस्थांनी सामाजिक  जडणघडण  केली. अनेक चांगली व मोठी माणसे या शहराने  दिली आणि तिचं आमच्या गावाची  श्रीमंती ! आयुष्यातील तारुण्याच्या काळात विचारांची बैठक तयार करणाऱ्या, आव्हानांना न डगमगता सामोरे जाण्याचा संस्कार देणाऱ्या ,तडजोड कुठे, कशी आणि कोणत्या मर्यादेपर्यंत करावी याची शिकवण देणाऱ्या, अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देणाऱ्या, वैयक्तिक जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा आणि श्रम मूल्य देणाऱ्या या गावाबद्दल आयुष्यात कृतज्ञच राहील. 

अंतिम टप्प्यात सध्या वास्तव्यास असणाऱ्या माझ्या जळगावबद्दल... मला नेहमी आकर्षण वाटणारे येथील ग्रामदैवत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर ! येथील विविध उत्सव कायम आकर्षित करतात. अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या या मंदिराचं सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने असलेले महत्व मोठे आहे. या गावाने वैचारिक प्रगल्भता व अध्यात्मिकतेची ओढ निर्माण केली यासाठी विशेष कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हभप दादा महाराज जोशी व हभप मंगेश महाराज जोशी हे मानसिक स्वास्थ्यासाठीची शक्ती स्थाने वाटतात. डॉ. अविनाश आचार्यांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा सुमारे दोन दशकांचा दीर्घ असा सहवास मिळाला, पद्मश्री भवरलाल जैनांच्या उद्योग समूहाच्या सामाजिक कृतज्ञतेची अनुभूती, ऍड. अच्युतराव अत्रे अर्थात बाबांची कौतुकाची थाप या गोष्टींनी माझ्या मनात गावाबद्दलची नाळ दृढ केली. व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने या गावात आलेल्या गावाने मला येथील आदर्शांनी व व्यवस्थेने सामाजिक कामाची दिशा व प्रेरणा दिली. अनेक सामान्य माणसे सामाजिक कार्यांत कृतज्ञतेनं सहभाग देतात ही आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे. कर्तृत्वाने ओळख निर्माण होते हे जरी खरे असले तरी येथील समाजाने तुम्हाला स्वीकारणे, कार्यात सहभाग देणे, पाठीशी राहणे या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात. प्रसंगी अपेक्षित सहकार्य मिळाले नाही तरी आपल्यातील क्षमतांची जाणीव करुन देण्यासाठी ते आवश्यक ठरते. लौकिक अर्थाने मोठं करणाऱ्या या गावाप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. 

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जळगावातील सर्व गावांमध्ये माझा प्रवास झाला. कालांतराने प्रशिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये गेलो, तेथे राहिलो, त्यांनी मला जे आयुष्यभरासाठीचे अनुभव दिले त्या सर्व गावांप्रती कृतज्ञ आहे. आमची कुलस्वामिनी माहूरगडावरची श्री रेणुका माता ! अध्यात्मिक दृष्टिकोनातून सद्गुरु संत श्री सखाराम महाराजांची भूमी असलेले अमळनेर, पंढरपूर, संत गजानन महाराजांची भूमी असलेले शेगाव या गावांनी जीवनातील आवश्यक असलेली शांती दिली. अहमदनगरने मला आयुष्याची साथ देणारी जोडीदार व डॉ. गिरीश कुलकर्णींसारखे मित्र दिले. या गावांचाही मी ऋणी आहे. अन्य काही गावांचा मला विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. यात सामाजिक जाणीव प्रगल्भ करणारे बारीपाडा, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, कोल्हापूर, हेमलकसा, अकोला, सर्वात जास्त शहीद झालेल्या जवानांचे गाव असलेलं गडहिंग्लज, प्रशिक्षणाच्या दृष्टीने समृद्ध करणारे धडगाव, , अचलपूर,  चिखलदरा, मेळघाट, तोरणमाळ, गारगोटी, माथेरान, पाट पारोळे, अक्कलकुवा, मोलगी, तळोदा, पाटण, मेढा, सातारा, चांदुर बाजार आपल्या गावाचे महत्व अधोरेखित करणारी व अनेक विचार प्रवृत्त करणारी मंडळी देणारे पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर ही महानगरे... यासर्वांप्रती विनम्रतापूर्वक कृतज्ञता ! 

जीवनाच्या समृद्ध वाटचालीत कुटुंब या एककाचा देशाशी ऋणानुबंध जोडणाऱ्या गावाचे महत्व नदीवर बांधलेल्या पुलासारखेच आहे. भूमीबद्दलच्या अभिमानाची बीजे रोवणाऱ्या गाव संस्कृतीला मनाचा मुजरा !  या गावाचे ग्रामस्थ म्हणून गावाच्या संस्कृती व परंपरांचा समृद्ध वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी सामाजिक कृतज्ञतेने आपण कार्यरत राहू या ! जागतिकीकरणाच्या युगातही "आपुलकी" आणि "माणुसकी" ही बलस्थाने असलेली गावसंस्कृती अबाधित राहो... हिच त्या बा गणरायाचरणी मनापासून प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Saturday, 29 August 2020

कृतज्ञता शेजाऱ्यांविषयीची !

कन्येच्या वाढदिवसाला शेजारची मंडळी...


आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० " कृतज्ञता उत्सव " अंतर्गत सातव्या दिवशी आपण आपल्या जीवनात सर्वात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या आपल्या शेजाऱ्यांविषयी व्यक्त करीत आहोत. आज व्यक्त झालेल्या मनोगतांमध्ये प्रत्येकाने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या शेजारांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केले तेथील शेजाऱ्यांची आठवण सांगितली आहे. अनेकांनी आपल्या सर्वात जवळचे नातेवाईक असा उल्लेख केला आहे. परस्परांवरील विश्वास, एकमेकांना केलेली मदत, कार्यक्रमांमधला सहभाग या सर्वांबद्दलची कृतज्ञता ! चाळ वा वाडा संस्कृतीपासून अलीकडच्या फ्लॅट संस्कृतीतील शेजारी या सर्वांचा उल्लेख यात आलेला आहे. हा उल्लेख करीत असतांना काळानुरुप अनुभवलेला बदल प्रत्येकाने अधोरेखित केला आहे. अपवादात्मक स्थितीत नकारात्मकतेची झालरही दिसून येते. निमित्ताने आमच्या शेजाऱ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. 

रुढ अर्थाने "शेजारी" म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला राहणारी मंडळी असली तरी आपले जेथे जेथ अस्तित्व असते आणि तेथे आपल्या आजूबाजूला जो असतो तो शेजारी ! म्हणजे शाळेत आपला बेंच पार्टनर, कार्यालयात आपल्या सोबत व शेजारी बसणारा सहकारी, कुठेतरी प्रवासाला निघाल्या नंतर आपला सहप्रवासी, एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या बाजूला बसलेला शेजारी, अगदी पंगतीत जेवायला बसल्या नंतर आपल्या बाजूला बसलेला शेजारी, चित्रपटगृहात आपल्या बाजूला बसलेला शेजारी हि यादी आपल्याला आणखी मोठी करता येईल. माझा उद्देश या सर्व शेजाऱ्यांची भूमिका बहुतांश वेळेस लाभदायक ठरलेली असते आणि ती लक्षातही राहते त्यामुळेच आजपर्यंत जीवनात ज्यांनी शेजाऱ्याची भूमिका पार पाडली त्या सर्व शेजाऱ्यांविषयीची हि कृतज्ञता ! काही आठवतील काही नाही पण... काही अनुभव चांगले असतील वा काही अनपेक्षितपण... अशा सर्व ! 

लहान असतांना आम्ही धुळ्याच्या पंचवटी भागात चाळीसारख्या ठिकाणी राहायचो अर्थात इतरांप्रमाणे माझेही ते एक विस्तारित कुटुंबच होते. येथे कुणीही कोणाच्या घरात सहज जाऊ शकायचे, ज्येष्ठ मंडळी कोणाला रागावू शकत होते प्रसंगी एखादा धपाटाही देऊ शकत होते. एकमेकांकडे जेवण तर सामान्य गोष्ट होती. या सर्वांमुळे आजच्यासारखी कोणाचीही प्रायव्हसी डिस्टर्ब् होत नसे. आमचे शुक्ल/कुळकर्णी म्हणून शेजारी होते. तसे चार घर सोडून राहणारे चंद्रात्रे व पाठकही शेजारीच होते. यातूनच मानलेले भाऊ, बहीण, मामा, काका, मावशी असे नाते दृढ होत गेले जे आजही तसेच आहे.  मी जवळपास ७ वर्षांचा होईपर्यंत शेजारच्या कुळकर्ण्यांकडे जेवणखाण करीत असे. आईला कुठेही बाहेर जायचे असल्यास ती आम्हा मुलांना शेजारच्यांवर सोपवून जात असे. घर उघडेच असे. एकमेकांच्या मदतीला, कार्याला सर्वजण आपल्या घरचा कार्यक्रम समजून काम करीत असत. 

नंतर आम्ही काही काल नेहरुनगरमध्ये व त्यानंतर आमच्या स्वतःच्या वास्तूत राहायला गेलो. येथेही आम्हाला खूप शेजारी मिळाले. त्यातील अमृत देशपांडे हे आमच्या वडिलांचे जिगरी दोस्त होते. नवरात्रात सोबत एकविरा देवीला जायचे. रोज संध्याकाळी आमच्या घरी यायचे आणि दोन दोन तास अंगणात आराम खुर्ची टाकून बसत असत. वडील गेल्यानंतरही त्यांनी त्याचा हा शिरस्ता कधीही सोडला नाही. त्यांची पत्नी म्हणजे आमच्या देशपांडे काकू ह्या आईच्या मोठ्या जाऊबाईच होत्या. त्या काही वेळेस  आईला अगदी हक्काने रागवायच्याही आणि त्यात कोणी बोलण्याचे कारण नसे. आजही या परिवाराशी आमचे ऋणानुबंध आहे. इतरही अनेक शेजारी होते. हरतालिका, गणेशोत्सव, संक्रांत, होळी, रंगपंचमी  आदी कार्यक्रम सर्वजण एकत्रित साजरे करीत असू. मला आठवते कोजागिरी पौर्णिमेला आम्ही सर्व मुले एकमेकांच्या घरी जात असू आणि तेथे ज्येष्ठ अपत्य पूजन अर्थात औक्षणाचा कार्यक्रम होत असे. सुट्टयांमध्ये तर धमाल असायची. खेळ, गमतीजमती, भांडणे हे होत असे तेव्हढ्यापुरतेच.


नोकरीच्या निमित्ताने जळगावला आलो. प्रथम नांदेडकर वाड्यात राहत असू.येथे शिवाजी पाटील, विजय लोढा, नंदलाल काबरा, हेमंत अलोने, किरण काळे, येवले, कुळकर्णी परिवार असे अनेकजण लाभले. येथेही आम्ही अनेक गोष्टी एकत्र करीत असू. स्वतः नांदेडकर परिवार सर्वांना घेऊन चालणार होता. या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील भाडेकरु स्वतःच्या घरातच राहायला गेले. सध्या आदर्श नगरमध्ये राहत असतांना अजय गुरव, सुहास कोल्हे, ऍड. हेमंत मेंडकी, अनिल चौधरी, लखोटिया ऑंटी, हेमंत पाटील.  प्रा. मोहरीर, जहागीरदार, विजयकुमार कोसोदे आदी राहतात. या सर्वांशी अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. मी अनेक वेळा बाहेरगावी असल्याने या सर्व शेजाऱ्यांचा नक्कीच आम्हाला आधार वाटतो. असे हे सर्व शेजारी म्हणजे आमचे विस्तारित कुटुंबच ! परिवाराच्या सुखदुःखात समरस होणारा शेजार मिळणे हि महत्वाची गोष्ट आहे आणि त्याबाबतीत आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. जीवनाच्या वाटचालीत शेजाऱ्यांचे स्थान महत्वपूर्ण आहे. परस्पर सहकार्य व सौहार्दाचा हा वसा आणि वारसा पुढील पिढीकडे संक्रमित करणे हि आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. या सर्व कायम व तात्कालिक शेजाऱ्यांच्या प्रेमाबद्दल, सहकार्याबद्दल जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करतांना आनंद व समाधान होत आहे. परस्पर सहकार्याची हि शृंखला अखंडपणे विस्तारित होत राहो व भारतीय संस्कृतीचा मूलाधार असलेली कुटूंब व्यवस्था अधिकाधिक बळकट होत राहो... हिच त्या बा  गणरायाचरणी मनापासून प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Thursday, 27 August 2020

कृतज्ञता जीवनादर्शांप्रतीची !

आदर्शांचा आदर्श राम !

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० " कृतज्ञता उत्सव " अंतर्गत सहाव्या दिवशी आपण आपल्या जीवनातील आदर्शांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आज व्यक्त झालेल्या मनोगतांमध्ये प्रत्येकाने अनेक आदर्शांचा उल्लेख केला आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्विता मिळवायची असेल तर त्या त्या क्षेत्रातील आदर्शांचा विचार करावा लागेल. आपण ज्याच्याकडून काही तरी शिकतो त्याला आदर्श म्हणू शकतो मात्र म्हटलेच पाहिजे असे बंधन नाही. त्यामुळे चांगलं कुणाकडूनही घ्यावे त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे मात्र तो आदर्श आहे असे नाही. कारण आजच्या युगात प्रभू रामचंद्रांप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम दिसत नाही. जीवन जगात असतांना समाजातील व्यक्तींना अपेक्षित असलेली उक्तीप्रमाणे कृती तसेच आचार, विचार आणि कृती यात योग्य मेळ दिसून येतं नाही. आई-वडील हेच सामान्यपणे प्रत्येकाचे आदर्श असल्याचे लक्षात येते. असो... माझ्या आदर्शांबद्दल यानिमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो. 

आपल्या विचारांबाबत ठाम मात्र इतरांच्या विचारांबाबत व भावनांचा आदर, काम करतांना अपेक्षित सर्वसमावेशकता, दूरदृष्टी, आधी केले मग सांगितले हि वृत्ती, द्रष्टेपणा, निःस्वार्थ भावनेने केलेली सेवा, वेळेचे भान, कामाचा दर्जा आदी गोष्टींबाबत आग्रही  हे आदर्शांचे परिमाण ठरु शकतात. अजूनही वाढविता येतील. या सर्व गुणांचा एकत्रित मिलाप जेथे सापडेल ती व्यक्ती आदर्श ठरु शकते. तरीही त्या व्यक्तीच्या स्वभावातील दोषांकडे आपल्याला दुर्लक्ष करावे लागेल. आपण प्रभू रामचंद्रांना आदर्शांचा आदर्श असे म्हणत असलो तरी त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो हे लक्षात घ्यावे लागेल. ज्या व्यक्तीच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल, कार्याबद्दल, जीवनातील समर्पित वृत्तीबद्दल अभिमान वाटतो अशा व्यक्ती आदर्श ठरतात. त्यांचे अनुसरण करणारे अनेक व्यक्ती असतात. अशा आदर्शांचा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वावर व जीवनावर प्रभाव दिसून येतो आणि त्याबाबत ते जाहीरपणे सांगतात. 

माझ्या जीवनावर अशा अनेक लोकांचा प्रभाव असल्याचे मला जाणवते. यात अग्रक्रमाने माझे वडीलच आहेत. पोस्टासारख्या विभागात व्यावसायिक जीवनाची वर्षे व्यतीत करतांना प्रामाणिकपणे कष्ट हि गोष्ट माझ्यावर प्रभाव करुन जाते व मी त्याचे अनुसरण करतो. जीवनाचे तत्व घेऊन जगणारे माझे वडील त्यादृष्टीने मला आदर्श वाटतात. आपल्या दाराशी कोणी माणूस त्याचे पैसे मागायला आला नाही पाहिजे. (याचाच अर्थ आपले अंथरुण पाहून पाय पसरवावे) दुसऱ्यामुळे आपल्याला त्रास झाला तरी चालेल मात्र आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको, कष्टाने माणूस मरत नाही, मर्यादित उत्पन्नातही चांगले, आनंदी व समाधानी आयुष्य जगता येते. आईनेही अशाच प्रकारे जीवनावश्यक काही मूलभूत तत्वज्ञान आपल्या जीवनातून सांगितले. घरात कायम चांगलेच बोलावे कारण वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो. स्वयंपाक करतांना प्रसन्न व आनंदी असावे कारण बनविणाऱ्याची वृत्ती त्या अन्नात येते आणि नंतर खाणाऱ्यातही ! साधे बाळबोध वाटत असले तरी तेच शाश्वत विचार आहे, असे मला वाटते. यासर्व गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. ज्या मला आदर्श वाटतात. या माझ्या आदर्शांबद्दल कृतज्ञता ! 


व्यावसायिक, शैक्षणिक व सामाजिक जीवनात अनेकांचा प्रभाव मला जाणवला. तो जीवनात आणण्याचा कायम प्रयत्न असतो. आमचे प्राचार्य प्रा. एन. के. पाटील, प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, डॉ. अविनाश आचार्य, पद्मश्री भवरलाल जैन, ऍड. अच्युतराव अत्रे, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुळकर्णी, संजीव दहिवदकर, श्री. लक्ष्मणराव जोशी हि त्यातील काही नावे. या सर्वांसोबत संपर्क संवाद होता, आहे. जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असतांना या सर्वांच्या जीवनाचा, त्यांच्या विचारांचा, साधनशुचितेचा प्रभाव कायम राहिला. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, चाणक्य, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम , महाराष्ट्रातील विविध संत, क्रांतिकारक, परमवीरचक्र विजेते जवान यांच्या जीवनातून कायम प्रेरणा मिळते. या सर्वांप्रती आज कृतज्ञता व्यक्त करतांना मला विशेष आनंद होत आहे. माणसाच्या जीवनात आचार, विचार व कृतीचे दिशा दर्शन व मार्गदर्शन करणाऱ्या प्रेरणादायी आदर्शांचे महत्व आहे. कृतिशील विचारांचा वसा आणि वारसा अनेक पिढ्या घडवितात. त्यासाठीच हि जीवनादर्शांची कृतज्ञता ! पुण्यभूमी भारतमातेला परमवैभवाला नेणाऱ्या आदर्शांची हि शृखंला अखंडपणे सुरु राहो... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! गणपती बाप्पा मोरया ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४