सर्वार्थाने "बदल" हाच यशाचा मंत्र ठरेल
समर्थ भारताच्या उभारणीसाठी... लेखमालेच्या मागील भागाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक नामवंत तज्ज्ञ, जाणकार व हितैषी मान्यवरांनी लेखमालेचे कौतुक करतांना हे सर्व एका चांगल्या पुस्तकाच्या स्वरुपात समाजासमोर यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आज तसा विचार नसला तरी लेखमाला संपतांना त्यासंदर्भात विचार करता येईल. कारण त्यासाठीचे अर्थकारण महत्वाचे ! मात्र मान्यवरांच्या या प्रतिसादामुळे उत्साह वाढला असून अचूक, उपयुक्त व व्यवसायांच्या वृद्धीसाठी अत्यावश्यक गोष्टी लिहिल्या जातील. त्यामुळेच आपण येथील पुढील भाग अवश्य वाचावेच व आपल्या संपर्कातील सर्वांना सुचवावे. यापुढे चाकोरीबाहेरच्या उपाययोजना व मूलभूत विचार देण्याचा प्रयत्न असणार आहे. ,समर्थ भारताच्या उभारणीचा विचार करताना वेगवेगळ्या क्षेत्रातील काही आव्हानांचा व काही संधींचा आपण विचार केला. महामारीची समस्या आपत्ती आहेच पण त्याने गर्भगळीत होण्याची आवश्यकता नाही. लॉक डाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करुन घेत एका नवीन विश्वात आपल्या कर्माने पदार्पणासाठी सिद्ध व्हावे लागेल. मला सुचलेल्या, वाटणाऱ्या, वाचलेल्या काही गोष्टी येथून पुढच्या लेखांमधून मांडणार आहे.
उपाय योजनेच्या अनुषंगाने लिहिण्यात येत असलेल्या या भागात मला सर्वप्रथम आपणास सांगायचे आहे कि, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ज्यांची मेहनत करण्याची तयारी आहे, ज्यांना कोणत्याही प्रकारचे काम करण्यास कमीपणा वाटणार नाही व ज्यांच्याकडे नाविन्यपूर्ण , सृजनशील पर्याय आहे अशांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी फारशी अडचण येणार नाही, तसेच ज्यांची तंत्रज्ञान आत्मसात करण्याची, व्यवसायासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करण्याची तयारी आहे त्यांना परिस्थितीशी जुळवून घेणे लाभदायक ठरु शकेल. जीवनात आवश्यक असलेली जोखीम घेण्याची तयारी असणाऱ्यांना अनेक पर्याय खुले असतील आणि त्यातूनच त्यांना आपल्या अस्तित्वाच्या लढाईचा मार्ग सापडणार आहे. जी गोष्ट यापूर्वी केली नाही किंवा जी गोष्ट करणे आवडत नाही अशा गोष्टी आवडीने करणाऱ्यांना नक्की यश मिळेल अशी मला खात्री आहे. त्यासाठी सुयोग्य नियोजन करता आलेच पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व करीत असतांना आपल्याला अपेक्षित परिणाम मिळाले वा नाही मिळाले तरी त्याचा दोष इतरांना न देता आपण कुठे चुकलो, कमी पडलो याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.माणसाचे सामान्य जीवन आणि लॉक डाऊन नंतरचे जीवन पूर्णतः वेगळे असणार आहे. जनसामान्यांच्या सध्याच्या वागणुकीवरून त्यांना या गोष्टीची कितपत कल्पना आहे याची मला चिंता वाटते. "काही फरक पडत नाही", "जे व्हायचे ते होईल", "आम्हाला काही प्रॉब्लेम नाही", "इतक्या वर्षांची यशस्वी परंपरा आहे", अशा कोणत्याही भ्रमात वा गृहीतकात कोणीही अडकू नये अन्यथा तो आत्मघात ठरण्याचा धोका ठरू शकेल. लॉक डाऊन पश्चातचे जीवन यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाला "बदल" स्वीकारावा लागेल आणि तोही आपल्या विचारांपलीकडचा ! कसं शक्य आहे ? असे न विचारता... मागील चार महिन्यांपासून आम्ही संस्थेच्या एकूणच ध्येयधोरणांचा फेरविचार करण्यास सुरुवात केली होती. ग्राहकाला काय अपेक्षित आहे आणि मला त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळणार आहे का ? हाच प्रश्न सतावतोय. तसा तो पहिल्या दिवसापासूनच होता. आता त्याची तीव्रता अधिक जाणवतेय कारण प्रश्न निर्माण झालाय तो अस्तित्वाचा ! म्हणूनच विश्वासाने सांगू इच्छितो आपल्याला जीवनात सर्वार्थाने बदल स्वीकारावा लागणार आहे आणि "तोच" आगामी काळाचा यशाचा मंत्र ठरणार आहे.
एक दिवस लॉक डाऊनची स्थिती संपणार आहे. त्यानंतर काही व्यवसाय आहे त्या परिस्थितीच स्वतःच्या अस्तित्वाचा लढा लढतील मात्र काही जण लॉक डाऊनच्या काळात तयार केलेल्या योजनांप्रमाणे त्वरित हालचाल करतील आणि अपेक्षित गती साधतील. या आपत्तीच्या येण्यापूर्वी कोणीही अंदाज वा अपेक्षा केली नव्हती मात्र आपत्ती पश्चातचा प्रत्येकाचा जीवनाचा व व्यवसायाचा नकाशा वा संकल्पचित्र तयार असले पाहिजे. तेव्हा आम्हाला माहिती नव्हते असे म्हणून चालणार नाही. हा नकाशा तयार करतांना भविष्यातही अशा प्रकारची समस्या आली तर त्यातही आपले काम सुरु राहिलं याची खबरदारी घ्यावी लागेल. अर्थात दीर्घकालीन व कायम स्वरूपी योजनेचा विचार करावा लागेल.
साथीच्या या आजारामुळे होणारी आर्थिक घसरण ग्राहकांची वागणूक आणि अपेक्षा नाट्यमयरित्या बदललेल्या असतील. "कोरोना"च्या सततच्या अस्तित्वामुळे (किंवा भीतीमुळे) वागणुकीत हे बदल घडून येतील हे वेगळे सांगायला नको. यापूर्वी अनेक छोट्या छोट्या व्यवसायांनी वादळे झेलली आहेत. जाणकार व्यावसायिक मालकही यातून स्वतःला बाहेर निघण्यासाठी विचार करीत असतील. व्यावसायिक वा उद्योजकांना सरकार या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कसे पाठबळ देतील याची वाट पाहणे परवडणारे नाही. सरकार प्राप्त परिस्थितीची जाणीव ठेऊन नक्कीच चांगली पावले उचलतील अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. आव्हानाची तीव्रता लक्षात घेता सरकार कितपत वा कसे सहकार्य करेल हे काळच सांगेल. मात्र उद्योजकांनी त्यांच्या परीने उत्तरे शोधण्यास सुरवात केली असेल नव्हे त्यांना ती शोधावी लागतीलच.
मित्रवर्य दिलीप तिवारी यांनी यापूर्वीच्या पोस्टला प्रतिसाद म्हणून हाती घेत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. हा उपक्रम सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वांना कोरोना पश्चात काळात आपली विश्वासार्हता वाढीसोबतच स्थिरतेचे दालन खुले करेल अशी अपेक्षा आहे.
भविष्यातील पत्रकारिता कशी असावी ? यावर प्रशिक्षणाविषयी प्राथमिक काम करण्याविषयी माहिती संचालक (माजी) श्रद्धा बेलसरे, अभय कुळकर्णी या तज्ञांना प्रशिक्षण विषयक तयारीची विनंती केली आहे. कोरोनाने आळशी पत्रकारितेच्या मर्यादा उघड्या पाडल्या आहेत. अर्धवट बातम्या / चोरलेल्या बातम्या / संदर्भहीन बातम्या / ठोकून दिलेल्या बातम्या / सरकारी बातम्या
ही वैगुण्ये समोर आली. शिवाय मोबाइल ॲप तंत्राविषयी पत्रकारांना फार काही माहिती नाही हे लक्षात आले आहे. प्रिंट, टीव्ही व ऑनलाईन मीडियापेक्षा सोशल जर्नालिझम वा सिटीजन जर्नालिझम अधिक जबाबदार होत आहे, हे ठळक झाले. भाषेची अशुद्धता प्रकर्षाने समोर आली. विषयांचे वैविध्य आणि त्याविषयी जुजबी माहिती नसणे असे अनुभव समोर आले. याचा विचार करुन पत्रकारितेच्या प्रशिक्षणात अनेक नवे विषय घेऊन आम्ही समोर येणार आहोत.
काळाची गरज ओळखून सर्वच क्षेत्रात अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज नक्कीच भासणार आहे. एका बाजूला अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींना व दुसऱ्या बाजूला उदरनिर्वाहासाठी कार्यरत असलेल्यांना हि संधी असणार आहे.



































