Saturday 18 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ५

"कोरोना" पश्चात परिस्थिती आणि व्यवसायातील संधी 



या विषयावर माझ्या परिघातील मित्रमंडळींना आता विषयात रस येऊ लागला आहे असे लक्षात येते. अनेक जण आवर्जून त्यावर लिहीत आहे, काही जण बोलत आहेत तर काही त्यांच्या सूचना, मत व मुद्देही सांगत आहे. खरं ती सामान्य माणसाची चर्चा आहे ही, त्यांची मते तशी ती माझीही... सर्वचजण त्यातील तज्ज्ञ नाही मात्र अनुभवी नक्की आहेत, त्यावरुन त्यांना वाटणारी ही मते आहेत. दोन महत्वाच्या सूचना आल्यात त्यातील एक म्हणजे मनात सर्वच क्षेत्रांचा विचार असल्याने स्वाभाविकपणे एकाच लेखात अनेक गोष्टी सामावण्याचा प्रयत्न असतो, तो टाळला पाहिजे. कारण यामुळे लेख थोडा मोठा होतो. दोन मुद्दे घेऊन ते जरा विस्ताराने मांडले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काही मुद्द्यांची पुनरावृत्ती होतेय. दोनही सूचनांचे स्वागत आहे. त्याप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न करेन. कालच्या भागात भारतीय व्यवस्थापनाचा विचार पाहू असे म्हटले होते ते जरा नंतर घेऊ. कारण संधी आणि आव्हाने मोठी आहेत क्षेत्र अनेक आहेत.

कोणीही व्यक्ती शेती, सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्र व असंघटित क्षेत्र  यामध्ये कार्यरत असतो. यात व्यवसायाच्या तीन वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात. या प्रमुख तीन गोष्टी म्हणजे सार्वजनिक व्यवस्था, एसएमईज (लहान व मध्यम उद्योग) आणि खासगी क्षेत्र. या सर्वच क्षेत्रांची काही बलस्थाने आहेत व काही मर्यादाही. मात्र या सर्वांची एकूण अर्थकारणातील भूमिका अनन्यसाधारण आहे. कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र हे सेवा व उत्पादन क्षेत्र असणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे योगदान ५४ टक्के असून २०१८च्या आकडेवारीनुसार ३१.४५ टक्के नोकरदारवर्ग सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. सेवा क्षेत्रात अनेक गोष्टी येत असल्याने एखाद्या गोष्टीवर त्याचा मोठा परिणाम झाला तरी अन्य क्षेत्रात त्याला विशेष मागणी वाढेल असेही म्हणता येईल. आज यातील सर्वात मोठे सेवा क्षेत्र असलेल्या कृषी व कृषी पूरक व्यवसायाकडे पाहू या.



भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५८ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. या क्षेत्रात सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत असून या क्षेत्राला विशेष मागणी होती आणि कोरोना पश्चात ती अधिक वाढेल असे वाटते. त्यामुळे या क्षेत्रात अनेक चांगले प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. खेडी व विशेषतः स्थानिक अर्थ व्यवस्था मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न झाल्यास कोरोनाचा अर्थ व्यवस्थेवरील प्रभाव कमी होण्यास मदत होईल असे वाटते. ग्राम विकास, कंत्राटी पद्धतीने शेती, ऑरगॅनिक शेती, फळबाग विकास, शेती पूरक व अन्न प्रक्रिया उद्योगावर युवकांनी आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोनामुळे भारतीय नागरिक आरोग्य बाबत जागरूक होतील व आपली प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आरोग्यदायी अन्नाकडे त्यांचा कल वाढेल असा अंदाज आहे. तसेच कोरोनाचा हॉटेल / पर्यटन व्यवसायावरही मोठा परिणाम होईल असा अंदाज आहे. हे क्षेत्र त्याच्या मूळ पदावर येण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागेल असाअंदाज आहे. यासर्वांचा एकत्रित परिणाम हा शेतीसाठी अधिक लाभदायक राहील असे वाटते.

कालच्या लेखातही शेती, शेती पूरक व अन्न प्रक्रिया उद्योगाला चांगले दिवस येतील असा अंदाज मांडला होता. मात्र या क्षेत्रातील अनिश्चिततेची विशेष काळजी घेतली पाहिजे व त्या अनुषंगाने पुढील काळाचे नियोजन केले पाहिजे. भारताचा अन्नधान्याच्या जागतिक व्यापारात सहावा क्रमांक लागतो. फलोत्पादनातही भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येत्या काही वर्षात डाळींच्या उत्पादनात भारत स्वयंपूर्ण होईल असा प्रयत्न आहे, त्यासाठी संशोधन सुरु आहे. शेतीच्या अनुषंगाने काही गोष्टी विशेषत्वाने नमूद कराव्याश्या वाटतात.

१. लॉक डाऊनच्या काळात स्थानिक पातळीवर टरबूज, खरबूज, द्राक्षे, मोसंबी व भाजीपाला मुबलक प्रमाणात ग्राहकाला परवडेल अशा भावात उपलब्ध आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार वाढल्यास दोघांचाही फायदा होईल असे लक्षात येते.

२. जळगाव जिल्ह्यात अलीकडच्या काळात जिल्ह्यांतर्गत वाहतुकीच्या रस्त्यांच्या बाजूला केळी वेफर्स तयार करुन विकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. येथेही वेफर्स उत्पादक व ग्राहक यांच्यातील व्यवहार दोघांच्या फायद्याचा ठरताना दिसतो.

३. अन्नधान्याच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असलेले दिसून येते.

४. औषधी वनस्पतींची शेती या क्षेत्रातही चांगल्या संधी निर्माण होतील. रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी आयुर्वेदाला लागणाऱ्या विविध औषधी वनस्पतींची लागवड करणाऱ्यांना यातून चांगले दिवस येतील असे म्हणता येईल.

५. शेती व शेती पूरक व्यवसायांना योग्य ते पाठबळ मिळाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, शेतीत यशस्वी प्रयोग करणाऱ्या स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांच्या शेतावर शिवार फेरी, त्यांना प्रोत्साहन आदी गोष्टी या क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. जलस्वराज्य, नदी खोलीकरण व रुंदीकरण, शेततळे तसेच जलयुक्त शिवार यासारख्या योजनांनी शेतकऱ्याला नवसंजीवनी दिलेली लक्षात येते.




६. फळ, फुल शेती याचे अनेक यशस्वी प्रयोग राज्यात व देशभरात अनेक ठिकाणी होत असतांना. या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू इच्छिणाऱ्यांनी यशस्वी शेतकऱ्यांना भेटून त्यांचे मॉडेल (आदर्श उदाहरण) समजून घेतले पाहिजे. केवळ शेती परवडत नाही अशी नकारात्मक चर्चा न करता या क्षेत्रात प्रयोग करणाऱ्या तरुणांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. गट शेती सारखे प्रयोगही यशस्वी झालेले आपण पाहतो.



७. बारीपाडा, हिवरे बाजार व राळेगण सिद्धी सारखी ग्राम विकासाची उदाहरणे यशस्वी होऊ शकली त्यामागे स्थानिकांची एकी महत्वाची ठरली. शेती विषयक गावाचे धोरण ठरवून त्याप्रमाणे अंमलबजावणी केल्यास किती मोठा बदल घडू शकते याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतील.


८. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करुन शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ निर्माण करता येते याचे उदाहरण लॉक डाऊनच्या काळात अनुभवले. उच्च दर्जाची ढोबळी मिरची लॉक दौंमुळे बाहेरच्या मार्केटमध्ये पाठविता येत नव्हती. मित्राने आपलॆ वास्तव स्थिती फेसबुकच्या माध्यमातून मांडली. सोशल मीडियावर मित्रांनीच विशेष प्रयत्न करुन त्याला चांगले मार्केट उपलब्ध करुन दिले.

९. शेती पूरक उद्योगात पशुपालनातूनही चांगल्या व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. तसेच शेती उत्पादित माळावर प्रक्रिया करणारे उद्योगही विकसित करता येतील.

१०. एरंड, जट्रोफा यासारख्या वनस्पतींची लागवड करुन अपारंपरिक ऊर्जास्रोतांची निर्मिती करणारे उद्योगही विकसित करता येतील असे वाटते.

शेती या अतिशय मोठ्या क्षेत्रातील मला उमजलेले काही प्रातिनिधिक उदाहरणे संधीच्या रूपाने आपल्या समोर ठेवली आहे. आपणही आपल्या भागातील अशा यशस्वी शेतकऱ्यांची उदाहरणे सांगितल्यास त्यावरही काम करता येईल. या क्षेत्रात मेहनत लागते, हवामानातील अनियमिततेने मोठा धोका असतो. मात्र यावर मत करीत यशस्वी झालेल्यांची यशोगाथा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नक्कीच मदत करतील. अन्य काही क्षेत्रातील संधींबाबत पुढील लेखात नक्की वाचू...

No comments:

Post a Comment