Monday 27 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग १०

उठा, जागे व्हा... कारक बना !


अनपेक्षितपणे आलेल्या महामारीच्या संकटाला सामोरे जात असतांना जीवनाच्या विविध क्षेत्रांवर पडणारा प्रभाव माणसाला विचार करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. माझ्या सारख्या अनेक संवेदशील माणसांना पुढे काय ? हि चिंता सतावतेय. आपण सर्वच या परिस्थितीकडे सकारात्मकतेने पाहण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या लेखमालेवर प्रतिक्रिया देतांना बहुतेकांचे म्हणणे आहे तुम्ही सांगता आहेत त्या समस्या व आव्हाने आम्हास माहिती आहेत. याला पर्याय काय ?  उपाय काय ? मागील ९ लेख लिहित असतांना समस्येची गंभीरता लक्षात येते आहे. मात्र त्या समस्येवरील उपायांचा विचार करतांना मती कुंठित होते. विचारांमधील मर्यादा लक्षात येते. आपण हरलो, कसं होणार असे नकारात्मक असले तरी प्रश्न पडतात आणि त्यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही. समर्थ भारताच्या उभारणीचा विचार करतांना महासत्ता अशा अर्थाने म्हणायचे नाही तर आपल्यासह प्रत्येक भारतीयांच्या समस्यांना योग्य पर्याय निर्माण करणे असा आहे. अर्थात ते झाले म्हणजे आपण महासत्ता होऊच ना !



मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत व्यक्तींबद्दल फारशी काळजी नाही मात्र खेड्यात राहणारा भारत अर्थात अल्पभूधारक, शेतमजूर, उद्योग क्षेत्रातील असंघटित कामगार, हातावर पोट असणाऱ्यांचे काय ? कोटीत असणारी हि संख्या ! आर्थिक परिणामांचा सर्वात जास्त फटका आर्थिकदृष्ट्या वंचित घटकाला सर्वाधिक सहन करावा लागतो. सरकारच्यासुद्धा क्षमतांच्या पलीकडची हि समस्या आहे. जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा कशा भागणार ? एके ठिकाणी तर 'जेवण' मिळण्यासाठी काही काळानंतर मारामाऱ्या, दंगली होतील अशी रास्त भीती व्यक्त केली आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतील. आर्थिक व जीवनविषयक असुरक्षिततेमुळे मानसिक ताणांचे प्रमाण वाढेल. गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनात वाढ होईल नव्हे लॉक डाऊनच्या या काळात चाइल्डलाइन व राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवारीवरून ते लक्षात येईल. या सर्वांचा परिणाम म्हणून कुटुंबातील कर्त्या पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा सर्वात मोठा धोका आहे. सामान्य स्थितीतील २० ते ४५ वयोगटातील पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण, अस्थिर व असुरक्षित वातावरणात वाढतील हे सांगण्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता नाही. मानसिक ताण-तणावांमुळे कार्यालयातील अनुपस्थितीचे प्रमाण वाढण्याचा व भावनिकदृष्ट्या बर्नआउट होण्याचे प्रमाण वाढेल असे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे.


"कोरोना" महामारीच्या संकटानंतर मानसिक आरोग्याचे संकट महाभयानक असेल. माणूस समाजप्रिय प्राणी असून त्याला जगण्यासाठी संवादाची आवश्यकता असते. कुटुंब, मित्र व सहकारी यांच्यापासून अलिप्त राहणे बहुतेक लोकांसाठी त्रासदायक असू शकते. यामुळे अल्प किंवा दीर्घकालीन मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. समाजापासून विभक्त ठेवल्यामुळे चिंता, आक्रमकता, नैराश्य, विस्मृती आणि भ्रमांच्या पातळीत वाढ झाल्याचे परिणाम दिसून येतात. अतिसंवेदशील माणसाला या परिस्थितीचा त्रास होतो. वैयक्तिक संबंध माणसाला तणावाचा सामना करण्यास मदत करतात. काही दिवस अलिप्तपणामुळे चिंता आणि नैराश्याच्या पातळीत वाढ होऊ शकते. त्यामध्ये माध्यमांद्वारे वारंवार या भयानक आजाराची चर्चा पाहून भावनिक व मानसिक बदल दिसतो. लॉक डाऊनमध्ये माणसे आळशी  होण्याचा तसेच वजन वाढणे सारख्या समस्या वाढतील, असा अंदाज आहे.

मित्रहो, मला स्वतःला सद्यस्थितीचा असा अंदाज नव्हता. सामान्यपणे आपण जिथे राहतो तेथील आर्थिक, सामाजिक, मानसिक व भावनिक स्थितीवरुन आपण विचार करतो. मात्र आपण एक देश म्हणून जरा व्यापक दृष्टीने या समस्येकडे पाहिले तर आपल्याला तिच्या तीव्रतेची कल्पना येईल. यासाठीच आपण सर्वांनी जागे होण्याची गरज आहे. केवळ आपलेच जीवन महत्वाचे नसून आपल्या सोबतच्या प्रत्येकाचा विचार करावा लागेल. या नकारात्मक परिणामांसोबत काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत आणि त्या वाढविणे जेणेकरुन उपाययोजना शोधणे शक्य होईल. सर्वात महत्वाचे माणसाला स्वच्छतेचे महत्व समजले. त्यामुळे प्रत्येक माणूस हा आरोग्याच्या बाबतीत जागा झाला आहे. राष्ट्र प्रमुखाच्या आव्हानाला प्रतिसाद देणे म्हणजे संकटाला अमोरी जातांना सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे, जे आपण अनुभवत आहोत. परोपकारी वृत्ती वाढीला लागतांना दिसत आहे. संवेदना वाढीस लागताना आपण भाग्यवान आहोत, अशा परिस्थितीत आपल्याकडे जगण्यासाठी किमान काही गोष्टी आहेत याचे समाधान वाटते आहे.

समुपदेशन व्यवस्था व सर्व सोबत असल्याची भावना आवश्यक

एका बाजूला महामारीला सामोरे जाण्यासाठी सर्व ती उपाययोजना करीत असतांना समाजाचे मानसिक स्वास्थ्य टिकविण्याचे सामूहिक प्रयत्न झाले पाहिजे. सर्वांसाठी समुपदेशनाचे व्यवस्था निर्माण केली पाहिजे. आत्ताच योग्य ती खबरदारी घेतल्यास लॉक डाऊनच्या नकारात्मक परिणामांची तीव्रता कमी करता येईल अन्यथा याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. मला माहिती आहे हे एकट्या सरकारचे वा संस्थेचे वा उद्योग-व्यापाऱ्याचे काम नाही हि आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठीच सर्वांना आवाहन करायचे आहे,

"साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा. मिकर बोझ उठाना"

त्यासाठी उठा, जागे व्हा.... आणि कारक बना ! आपल्याला ज्या काही समस्या दिसतील, समजतील, ज्यावर तुम्ही काही करु शकाल, त्यावर काम करा. हा हेतू ठेवून केलेली प्रत्येक कृती "कारक" ठरणार आहे. शेवटी पद्याच्या दोन ओळी...

भारताचिया महारथा या सारे मिळूनि ओढू या
हाती शक्ती, पायी गती आणि हृदयी प्रीती जोडू या ||

समर्थ भारताची कास धरणाऱ्या प्रत्येक भारतीयाला "हे" अशक्य नाही. मग लक्षात ठेवा... उठा, जागे व्हा... आणि कारक बना ! लेखमालेच्या या पुढील भागात आपण उपाययोजना आणि त्या अनुषंगाने काही उदाहरणे पाहणार आहोत. आपल्या आजूबाजूला समस्येवर मात करणाऱ्या काही गोष्टी घडल्या असतील किंवा आपल्याला काही उपाय सुचवायचे असतील, तर जरुर कळवा त्यांचा अंतर्भाव करता येईल.

(या लेखासाठी बिझिनेस स्टॅंडर्ड, द ट्रिब्यून, लाईव्ह मिंट, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आदी संस्थांच्या वेबसाइट्सचा संदर्भ म्हणून वापर केला आहे.)

1 comment:

  1. आरोग्य सेवे कडुन लोकांचे लचके आज ही तोडले जात आहेत. भविष्यात हे प्रमाण खुप वाढेल. आणि या आमर्याद गळेचेपीला संरक्षणाचे कवच पाहिजे.बुद्धी प्रामाण्यवादी माणस स्मितहास्य करुन लोकांना वेठीला धरणार यावर विचार गांभिर्याने होणे गरजेचे जनरिक मेडिसिनन्स डॉडॉक्ट घेऊ नका म्हणतात. सध्या घसा खावखवणार्या ३ गोळ्यांची कींमत २५० आहे. भिती पोटी लोक खरेदि करतात. सर्वात मोठे क्राईम औषधी क्षेञ आहे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग फक्त शोषणासाठीच होणार हे जनतेने गृहित धरावे का? हे अनुत्तरित कोडे आहे. भ्रष्टाचाराचा महामेरु म्हणजे हे औषधी क्षेञ आहे.

    ReplyDelete