Wednesday 22 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ७

"कोरोना" पश्चात माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील संधी व आव्हाने


आपण कोरोना पश्चात सेवा क्षेत्रातील संधी व आव्हाने पाहात आहोत. वाचकांच्या प्रतिक्रिया व सूचना उत्साहवर्धक आहेत. काही सुहृदांनी मध्ये एक ब्रेक घ्यावा असे सुचविल्याने आणि अन्य महत्वाचे काम सुरु असल्याने मध्ये दोन दिवस लिहिले नाही. साधारणपणे विषयाची मांडणी करतांना विविध क्षेत्रातील सद्यस्थिती व लॉक डाऊन नंतर संभाव्य गोष्टींची, आव्हानांची चर्चा करीत आहोत. शक्य असल्यास सुचेल त्याप्रमाणे संधीही मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेकांनी उपाययोजनांवरही भर द्यावा असे आवाहन केले आहे. साधारणपणे शेवटच्या दोन लेखात ते करणारच आहोत आणि त्यावरच समारोपही ! 


आज आपण दृश्य स्वरुपात ज्या क्षेत्रावर मोठा परिणाम झालेला दिसत आहे ते म्हणजे माध्यम व मनोरंजन क्षेत्र. भारतीय अर्थव्यवस्थेत मीडिया व मनोरंजन क्षेत्र हे फार मोठे आशा स्थान होते. ग्राहकांची वाढती मागणी आणि जाहिरातीचे वाढते महसूल यामुळे हे क्षेत्र वाढीच्या उच्च टप्प्यावर होते. मागील दशकात या क्षेत्रातील डिजिटायझेशन व इंटरनेटच्या प्रभावी वापराने हा उद्योग वेगाने वाढत होता. बऱ्याच लोकांच्या मनोरंजनासाठी इंटरनेट हा मुख्य प्रवाहातील मीडिया बनला आहे. भारतीय जाहिरात बाजारपेठ ही चीननंतर आशिया खंडातील दुसरी वेगाने वाढणारी जाहिरात बाजारपेठ ठरत आहे.


माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व चित्रपट सृष्टीचा विचार करावा लागेल. सर्वात जास्त फायदा इलेक्ट्रॉनिक मीडियाला झाला आहे आणि तो स्वाभाविक आहे. कारण लॉक डाऊनच्या काळात घराबाहेर पडणे धोकादायक असल्याने वेळ घालविण्यासाठी साधन म्हणून त्याकडे पहिले जाते. यातही टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया यांचा समावेश आहे. सर्वात जास्त फटका फिल्म इंडस्ट्रीला व काही प्रमाणात मुद्रित माध्यमांनाही पडलेला दिसतो आहे. त्यातही व्यवसायाच्या उलाढालीवर त्यांचे अस्तित्व अवलंबून आहे. काही वर्तमानपत्रांची कार्यालये बंद करून वा कर्मचाऱ्यांचा पगार ५० टक्के देऊन खर्चाची जुळवणी करण्याचा प्रयत्न झाला आहे. या क्षेत्रातील सर्वांनाच तोशिष पोहोचली आहे  ती त्यांच्या जाहिरातीच्या उत्पन्नावर. वर्तमानपत्रांची विक्रीही होत नसल्याने त्याचाही परिणाम दिसतो आहे. लॉक डाऊन पश्चात स्थितीचा विचार करतांना तो किती काळ चालेल, पुन्हा येणार का ? या गोष्टींवर अवलंबून असेल. विविध राष्ट्रीय संस्थांच्या सर्वेक्षणातून फिल्म इंडस्ट्रीला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अपार कष्ट व नाविन्यता तसेच अधिक काळ लागेल असे लक्षात येते. त्या मानाने सोशल व इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरत आहे. मुद्रित माध्यमाला सामान्य होण्यासाठी काही काळ लागेल मात्र विश्वासार्हता व तटस्थता या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे स्थिरस्थावर होण्याची आशा अधिक आहे. या सर्वच क्षेत्रात डिजिटलायझेशन स्वीकारणाऱ्यांना अधिकाधिक फायदा होईल असे दिसते आहे. 

लॉक डाऊनच्या काळात सर्वच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा एकत्रित वापर सुमारे ५० पटीने वाढला आहे. तसेच लोकांचा स्क्रीन टाइमही वाढलेला आहे. न्यूज ऍपचा वापर ५७ टक्क्यांनी वाढलेला आहे. विद्यार्थ्यांचे टीव्ही पाहण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढलेले दिसते. गेमिंगसाठीचा वेळ ११ टक्क्यांनी वाढला असून चॅटिंगचा वापरही २५ टक्क्यांनी वाढलेला आहे. 

ही सर्व स्थिती पाहता प्रिंट माध्यमे व फिल्म इंडस्ट्रीला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामानाने इलेक्ट्रॉनिक मीडियाला फायदा होत असतांना तो टिकविण्यासाठीचे आव्हान आहेच. मीडिया व मनोरंजन क्षेत्राला डिजिटायजेशनचा स्वीकार करावा लागेल. त्याचप्रमाणे मजकूर देण्यासाठी हटके मार्ग निवडावे लागेल. ग्राहकांची बदलणारी अभिरुची लक्षात घेऊन त्याप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करावी लागेल. जाहिरातींसाठीही नवीन आयाम शोधावे लागतील. त्यासाठी आर्टिफिशल इंटीलिजन्स व मशीन लर्निंग सारख्या गोष्टींची मदत घ्यावी लागेल. त्यातून लोकांचा कल लक्षात येईल. माध्यमे व करमणूक हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याने नक्कीच आशा आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमात अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होतील. आधुनिक काळाची तंत्रे शिकून  घेणाऱ्यांसाठी आगामी काळ नक्कीच अनुकूल आहे. 

No comments:

Post a Comment