Saturday 25 April 2020

अभिनीत संपादक म्हणून जबाबदारी

संपादकीय जबाबदारीची तिसरी इनिंग 


अभिनय मासिकाचे
मागील वर्षातील अंक 
मित्रहो, आपणास सांगतांना विशेष आनंद होतं आहे कि, नवीन आर्थिक वर्षांपासून आशा फौंडेशनच्यावतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या अभिनीत मासिकाचा संपादक म्हणून पुन्हा एकदा संपादक म्हणून जबाबदारी  १ एप्रिलपासून स्वीकारली असून एप्रिल - मे महिन्याचा जोड अंक वितरणासाठी तयार झाला आहे. आशा फौंडेशन या संस्थेच्या अस्तित्वाची लढाई सुरु असतांना संपूर्ण कुटुंबासाठी संग्राह्य मूल्य असलेले हे मासिक तयार करणे आनंददायी ठरले. जळगाव जनता बँकेच्या सेवेत असतांना "सेवा वार्ता" या अंतर्गत गृहपत्रिकेचा कार्यकारी संपादक, त्यानंतर अभिनीतच्या निर्मितीपासून पुढे १० वर्षे संपादक म्हणून जबाबदारी पूर्ण केली आहे. आता पुन्हा एकदा नव्याने आपल्या सर्वांच्या सहकार्याची व पाठबळाची आशा ठेवून हि जबाबदारी स्वीकारली आहे.



अभिनीत मासिकाचा पहिला अंक 
आईकडून लिखाणाचा व वडिलांकडून प्रामाणिकपणे कष्ट करण्याचा वसा मिळालेला आहे. त्यामुळेच संपादकीय जबाबदारीच्या या तिसऱ्या इनिंगमध्ये "अभिनीत" मासिक केवळ स्वबळावर चालेल असे नाही तर संस्थेच्या सामाजिक कामासाठी काही प्रमाणात निधी देईल असे काम करावयाचे आहे. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत असतांना या क्षेत्राची विशेष आवड निर्माण झाली. जयहिंद महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाच्या विविध कार्यक्रमाचे वृत्त तयार करतांना त्याचा लाभ झाला. जळगाव जनता सहकारी बँकेत ९ वर्षे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करीत असतांना विविध प्रकारच्या माध्यमांशी नियमित संपर्क होता. स्व. डॉ. अविनाश आचार्य अर्थात दादांच्या नेतृत्वाखाली केशव स्मृती प्रतिष्ठानने जळगाव तरुण भारतची दूर सांभाळली आणि तेथेही मोठा काळ अनुभवसंपन्न ठरला. ज्येष्ठ संपादक स्व. मिलिंद गाडगीळ, मा. श्री. लक्ष्मणराव जोशी यांच्या कार्यकाळात विश्वस्ताच्या भूमिकेतून "संपादक" या पदाची जबाबदारी व कर्तव्ये समजली. जळगावच्या वर्तमानपत्र सृष्टीतील भीष्म पितामह स्व. विद्याधर पानट सरांचे पहिल्या अंकापासून मार्गदर्शन लाभले. आपला विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी आर्थिक नुकसानीचे गणित असले तरी आपण तरुण भारत चालविला पाहिजे असे स्व. दादांचे स्पष्ट मत होते. त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील विशेषांकाचे अतिथी संपादकत्व देऊन आदरणीय लक्ष्मणराव जोशींनी माझ्यावर अनंत उपकार केले आहे.

"संपादक" हि माझी नोकरी नसून नोकरीच्या कामाचा एक भाग आहे. या संपूर्ण काळात वाचकांना वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आणि त्याचे विशेष कौतुकही झाले आहे. मजकुरातील वैविध्य साध्य करण्यासाठी अधिकाधिक लोकांना लिहितं करण्याचा प्रयत्न केला. प्रेरणादायी जीवन जगणाऱ्या व्यक्तींना या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. अंक प्रकाशित करतांना "कल्पकता" व "नियमितता" याला प्राधान्य दिले आणि त्यामुळेच आपल्या या जबाबदारीचे ओझे न वाटता त्याचा नेहमी आनंद घेऊ शकलो. समाज मनाचा कानोसा घेत त्यांनी वाचले पाहिजे असेच विषय, ते मांडणारे समर्थ लेखक यांचा हि कलाकृती निर्मिती करतांना सहभाग घेतला. त्या त्या वेळेची निर्मिती उच्च दर्जाची निघण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले त्यांच्याप्रती या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करणे माझे कर्तव्य समजतो.


सुरवातीच्या काळातील विशेषांक 
आशा फौंडेशनच्या कामाला सुरुवात केल्यानंतर वर्षभरात म्हणजे २००९च्या गुढीपाडव्याला "अभिनीत" मासिक सुरु केले. सामाजिक संस्थांना व्यावसायिक दराने वर्तमानपत्रातून जाहिरातीच्या माध्यमातून  प्रसिद्धी न परवडणारे आणि संस्थेचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत  पोहोचावे त्यातून संस्था आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे मासिक सुरु करण्यात आले. अर्थात स्थानिक सर्वच वर्तमानपत्रांनी आशा फौंडेशनच्या सर्वच कार्यक्रम व उपक्रमांना भरभरून प्रसिद्धी दिली आहे हे याठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. माणूस घडविण्याचे व माणूस उभे करण्याचे काम करणाऱ्या संस्थेच्या मासिकाचे नावही त्याला न्याय देणारे असावे म्हणून "परिपूर्ण" असा अर्थ असलेले "अभिनीत" हे नाव ठरविले. तीन वर्षे केवळ खाजगी वितरणासाठी म्हणून चालविण्यात येणाऱ्या मासिकाला नंतर सरकार दरबारी नोंदणी करुन राजमान्यताही मिळविली. आशा फौंडेशन परिवारातील ५ हजार वाचकसंख्या असलेल्या या मासिकाचा खप एक लाखापर्यंत नेण्याची मनापासून इच्छा आहे. आपण सर्वांनी त्यासाठी साहाय्यभूत व्हावे अशी अपेक्षा आहे. लोक डाऊनच्या या काळात अंकाची छपाई करणार नसून तो इ-स्वरुपात वर्गणीदारांसह जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे. ज्यांना हा अंक हवा असेल त्यांनी वैयक्तिक माझ्या ९८२३३३४०८४ या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा girish1811@gmail.com या आपल्या नावासह इमेलवर कळवावे. सोमवारपासून २४ तासाच्या आत अंक आपल्याला मिळालेला असेल.



चार रंगातील विशेषांक 
वर्षभरात या मासिकाचे १० अंक प्रकाशित केले जातात. वर्धापन व दिवाळी हे दोन अंक जोड अंक स्वरुपाचे असतात. विविध विचारसरणींवर चालणाऱ्या संघटनांचे समाजातील महत्व अधोरेखित करणाऱ्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी त्या त्या विचारसणीच्या प्रमुखांना एकाच व्यासपीठावर आणले. तसेच जळगाव शहरातील सर्व वर्तमानपत्रांच्या संपादकांवर "संपादक : एक माणूस" असा विषय घेऊन काढलेला दिवाळी अंक व त्यांना एकाच व्यासपीठावर या माध्यमातून आणू शकलो. विद्यार्थ्यांच्या साहित्यावर आधारित दिवाळी अंक, शैक्षणिक परिषदांच्या निमित्ताने अध्ययन अक्षमता समजून घेतांना, आनंददायी शिक्षण, इमॅजिन इंडिया  यासारख्या अनेक चांगल्या अंकांची निर्मिती करु शकलो. आशाच्या कार्याचा वाढता व्याप लक्षात घेऊन व अंकाची मांडणी अधिकाधिक कुटुंबाभिमुख व व्यावसायिक पद्धतीने करावी या उद्देशाने मागील वर्षभर मुंबई येथील डॉ. सरिता भावे यांनी या मासिकाच्या संपादिका म्हणून जबाबदारी  सेवाभावाने स्वीकारली. दर महिन्याच्या २५ तारखेला ठरल्याप्रमाणे अंक प्रकाशित केला. (मला ते कधीही जमले नाही)  त्यासाठी योग्य नियोजन, पाठपुरावा कसा करावा याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आणि त्याचा मला अभिमान वाटला. मासिकाची योग्य घडी बसवून त्यांनी वैयक्तिक कारणासाठी ३१ मार्चपासून हे काम थांबवले आहे. आशा फौंडेशनचा कार्यकारी संचालक नात्याने व व्यक्तिश: त्यांचे सहकार्याबद्दल ऋण व्यक्त करतो.

"संपादक" या भूमिकेने अनेक चांगल्या, मोठ्या व प्रतिष्ठित माणसांशी संपर्क आला. स्थानिक विविध वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे संपादक, संपादकीय व इतर सहकारी मित्र म्हणून लाभले. त्यांच्या सहवासातून खूप काही शिकता आले आणि संपादक पदाची जबाबदारी पार पडत आली. आगामी काळात हे कार्य अधिक गांभीर्याने, जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. आपण सर्व सोबत राहाल या अपेक्षेसह थांबतो.... धन्यवाद !

No comments:

Post a Comment