Thursday 23 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ८

मला बाहेर पडायची भीती वाटते !


आपल्या लेखमालेचाच भाग असलेल्या मात्र अंतिम टप्प्यात ज्या विषयावर लिहिणार होतो तो अगोदर लिहावा लागतोय. त्याला कारणही तसेच झाले. सध्या रोज ५-६ परिचितांना आवर्जून फोन लावून बोलत असतो. त्यातील बहुतांश लोकांच्या मनात एक अनामिक भीती आहे आणि ते ती बोलून दाखवतात ती म्हणजे "मला बाहेर पडायची भीती वाटते !" लॉक डाऊनमुळे माणसाला अनेक गोष्टी अशा कराव्या लागत आहे ज्याची त्याला कधी सवय नव्हती किंवा ज्याची कल्पनाही केली नव्हती. या सर्व गोष्टींचा प्रत्येक माणसावर शारीरिक, मानसिक व भावनिक परिणाम होत आहे. याच क्षेत्रात काम करीत असल्याने त्याची गरज लक्षात घेऊन पहिल्याच टप्प्यात त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी "आशा मदत गटाची" रचना समाजासाठी निर्माण केली. अशा मदत गटांची मदत घेण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक तयारी करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या शहरांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेतला जातो.

सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉक डाऊनच्या या काळात प्रत्येक घरात काय चालू असेल याची कल्पना येऊ शकेल. पहिल्या लॉक डाऊन नंतर अनेकांनी अनेक प्रकारे समाजाला जागृत करीत अनेक गोष्टी सुचविल्या, अनेक गोष्टी करून घेतल्या. आता या गोष्टीची सवय झाल्याने जो तो आपापल्या पद्धतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. माणसाच्या मानसिक स्थितीचा विचार केल्यास त्याला बाहेर पडण्याची जी भीती वाटते आहे त्याची काही कारणे असावीत असे वाटते. (त्याने बाहेर पडणे अपेक्षित नाहीच आहे. मात्र अशा प्रकारची भीती निर्माण होणे मानसिक स्वास्थ्याच्यादृष्टीने घटक आहे.)  माणसे घरातच असल्याने बहुतांश वेळ टीव्ही पाहण्यात (विशेषतः बातम्या) वा मोबाईल वापरण्यात घालवला जात आहे. सर्वत्र केवळ आणि केवळ "कोरोना" या व्हायरसचीच चर्चा होते आहे. रुग्णांची वाढती संख्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकविणारी आहे. लॉक डाऊन अजून किती दिवस चालेल ? मला जर या व्हायरसची लागण झाली तर ? माझ्या नोकरी व्यवसायाचे काय होईल ? अन्य गावात काम करणाऱ्यांना तिथे जाता येईल का ? आर्थिक नियोजन कसे करावे ? मुलांच्या परीक्षांचे काय ? या सारखे अनेक प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्याने संभ्रम निर्माण होतो आणि भीती उत्पन्न होते.

ही जशी घरातल्या मंडळींची स्थिती आहे तशीच ती नोकरी - व्यवसायात असलेल्यांचीही आहे. विशेषतः डॉक्टर, परिचारिका, त्यांना साहाय्य करणारा कर्मचारी वर्ग, पोलीस अधिकारी कर्मचारी, बँकेत काम करणारे अधिकारी कर्मचारी, औषधी दुकानदार, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, स्वच्छता राखणारे सफाई सैनिक अर्थात अत्यावश्यक सेवा म्हणून घराबाहेर पडणाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची विवंचना वेगळी आहे. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर व पोलिसांवर होणारे हल्ले, त्यांना संसर्ग होण्याचा असलेला सर्वात मोठा धोका याचाही परिणाम होतो. सर्वांच्याच दिनचर्येवर लोक डाऊनचा परिणाम झालेला आपण पाहू शकतो. त्यामुळे प्रत्येलकाला आपल्या जीवनावरील आपले नियंत्रण नाही असे वाटत राहते आणि त्यातूनच भीती निर्माण होते.


अशा प्रकारची भीती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचा वारंवार विचार केल्याने वाटणारी काळजीचे रूपांतर चिंतेत होते. आजूबाजूला घडणाऱ्या नकारात्मकतेतून अस्वस्थता वाढते. आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून माणूस उदासीनतेकडे (डिप्रेशन) वळण्याचा धोका असतो. यासर्व गोष्टींना सामोरे जाणयासाठी मनाची एक तयारी केली पाहिजे. विशेषतः वास्तव स्वीकारले पाहिजे आणि आपल्या जीवनात सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीला आपण जबाबदार नाही मात्र जी परिस्थिती आहे ती वास्तव आहे तिला आपल्याला जुळवून घेता आले पाहिजे. आपले मान प्रसन्न राहील, सकारात्मक राहील व यावर लवकरच मार्ग निघेल असा विश्वास ठेवला पाहिजे. संसर्ग झालेले अनेक रुग्ण बरे होऊन घराकडे परत जात आहेत आपण त्याच्या कडे लक्ष दिले पाहिजे. स्वतःला व्यस्त ठेवले पाहिजे. मनाला लागणारी शांती मिळण्यासाठी आपलाआपल्या सोईनुसार, श्रद्धेनुसार मार्ग अवलंबले पाहिजे. कुटुंबातील, परिसरातील, संपर्कातील सर्वांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे.


अनेक मंडळींनी आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केलेला आपल्या लक्षात येईल.काहीजण आपले छंद जोपासत आहेत तर काही जण आपले अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले घरातील, कार्यालयातील कामे आटोपत आहेत. चांगले वाचन, गाणे ऐकणे यासारख्या गोष्टींवरही भर दिला जात आहे. काही धार्मिक ग्रंथांचे वाचन व पारायणेही  होते आहेत. भविष्याचा अन्दाज घेत आपल्यलाला आवश्यक असलेली कौशल्ये विकास करण्याकडेही भर आहे. शरीर सुदृढ राहावे यासाठीही घरातली घरात प्रयत्न करणारे अनेकजण आहेत. ऑनलाईन प्रशिक्षण, व्याख्याने, वेबिनार्स यांचा लाभ घेणाऱ्याची संख्या लक्षणीय आहे. घराच्या कामात मदत करणे, घरगुती खेळ खेळणे, पाल्यांशी गप्पा मारणे यासारख्या गोष्टीही केल्या जात आहेत. गरीब, गरजू व निराधार मंडळींना मदत करण्याकडेही अनेकांचा कल आहे. आत्मविश्वासू माणूस इतरांनाही आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.

कोरोना पश्चात समर्थ भारताचा विचार करीत असतांना माणसाच्या वृत्तीवर व वर्तणुकीवर होणारा परिणाम समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक असलेली पूर्वपीठिका या लेखात मांडणायचा प्रयत्न केला आहे. पुढच्या भागात माणसाच्या वागणुकीत होणारा बदल आणि त्यामुळे निर्माण होणारी संधी व आव्हाने यांचा आपण विचार करणार आहोत. आपल्यापैकी कोणालाही या संबंधाने काही मार्दर्शन हवे असल्यास आपण माझ्या वैयक्तिक मोबाईलवर संपर्क करावा ही विनंती..,,

3 comments:

  1. योग्य दिशेने वाटचाल !

    ReplyDelete
  2. Va pristhiti chhan varnan aahe sakaratmak disene vatchali sati yogya disha

    ReplyDelete