Wednesday 29 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ११

आपला प्रतिसाद लाखमोलाचा...!



समर्थ भारताच्या उभारणीसाठी... लेखमालेतील ठरल्याप्रमाणे पुढचा भाग लिहिण्यापूर्वी सर्वसमावेशकता यावी यासाठी मागील दहा लेखांवर आलेल्या प्रतिक्रिया खास आपल्यासाठी देत आहे. एक विषय घेऊन त्यावर वाचन करुन, समस्येचे आपल्या परीने आकलन करुन हे लेख लिहिले आहे. विचार प्रक्रिया निरंतर चालत असते. त्यातून वैचारिक प्रगल्भता येत असते, यावर विश्वास असल्यामुळे सर्व विचार जाणून घेतो. आपली चूक असेल ती स्वीकारतो. लोकांना अपेक्षित लिहिले गेले तर समाधान वाटते इतकेच !  पुस्तक लिहिण्यापासून ते आमच्या मनातील लिहिले आहे इथवर प्रतिक्रिया आहेत. एक अगदी मानसिक फसवणूक अशीही प्रतिक्रिया आहे अर्थात कशी हे सहा दिवस झाले सांगितलेले नाही. सर्वच येथे देणे शक्य होणार नाही आणि ज्या दिल्या आहेत त्या त्यातील महत्वाचे मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचावे यासाठी...

- तुमची लेखमाला आवर्जून वाचतोय. फारच मुद्दे घेऊन लिहित आहात. १०० पानांचे पुस्तक होईल असे लिहा.

- नमस्कार, NGO Federation वर तुमचा सशक्त भारताच्या उभारणीविषयी कोरोनाच्या निमित्ताने लिहिलेले २ लेख वाचले. आम्ही मित्रमंडळी मिळून एक ऑनलाईन पोर्टल चालवतो. त्यात १ मे च्या कोरोना विशेषांकात ते लेख टाकायला आम्हांला आवडेल. तुमची ती सिरीज किती भागांची असेल? तो एक स्वतंत्र लेख होऊ शकतो का? तसे झाल्यास आम्ही तो आमच्या अंकात प्रकाशित करू शकतो का? कळवावे.

- Your blog is highly appreciated. I can imagine the  the effort in reading, understanding and analyzing the topic. Proud to have intelligent friend like you

- TIMELY. APT. DIRECTION GIVING.

- उद्बोधक, माहितीपूर्ण....

- समर्थ लेखणी. समर्थ इच्छा. देव करो आणि सार्वत्रिक सजगता येवो.

- शेती बद्दल जे लिहिलं आहेत, त्यावर स्वतंत्र लेख येऊ द्या ! सुरेख मुद्दा आहे तो.

- दुसरे म्हणजे लेखात जर 2/3 च गोष्टी highlight केल्यात तर उत्तम होईल. तुमच्याकडे सांगण्यासारखे पुष्कळ आहे, तुम्ही खूप छान बोलता.

- मुद्देसूद लेख. आपण अल्पभूधारक शेतकरी,शेतमजूर यांच्याही प्रश्न व इतर येणाऱ्या अडचणी चांगल्या प्रकारे मांडल्या.

 - सर्व काही बदलू शकतं, पण शेतकऱ्यांच्या मानसिकतेचे काय? ती कोरोना बदलवू शकेल ?

- समस्या काय आहेत व काय होण्याची शक्यता आहे हे बहुसंख्यांना माहित असतं. जनसामान्यांना रस असतो तो उपाययोजनांमध्ये.  पुढील लेखांमध्ये अशा योजना तपशिलवार मांडल्या जातील याबद्दल खात्री आहे.

- माणसाने आशावादी असावं, पण लेखातील आशावाद मला आदर्शवादाकडे झुकलेला दिसतो आहे. माणसाचा स्वभाव बदलत नसतो. बदलत असतो तो दृष्टिकोन. सतत मृत्यू होत असूनही लोक बिनदिक्कत नियम मोडत आहेत. कोरोना युगानंतर आश्चर्यकारक बदल होतील की नाही याचं उत्तर मानवीय प्रवृत्ती आणि काळच देईल.

- माणसाने नकारात्मक असू नये. पण त्याने वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून दिवास्वप्ने बघण्यास सुरवात केली की त्याचा चिन्यांना भाईभाई म्हणत  कवटाळून निरपराध भारतीयांना युद्धाच्या खाईत लोटणारा नेहरू होतो. राष्ट्रीय एकात्मतेचे गोडवे गाणाऱ्यांनी सोशल मीडियावर 'एकदा परप्रांतीय त्यांच्या गावी परतले की मराठी तरुणांनी त्यांची जागा घ्यावी' असे अत्यंत हास्यास्पद मॅसेजेस पसरवण्यास सुरवात केली आहे याला काय म्हणायचं?

- काही गोष्टी माझ्या दृष्टितून

१) करोना पश्चात म्हणजे नेमके कधी - केवळ निर्बंध हटले म्हणजे करोना संपला असं होणार नाही. सर्व व्यवहार हे पुढील १-२ वर्ष सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच होतील व कदाचित तसेच अंगवळणीही पडतील.

२) हीच १-२ वर्षे ही  इतर देशांमधील काही कंपन्या त्यांची चीन मधील गुंतवणुक काढून नवीन पर्यायाच्या शोधात घालवतील

३) भारत देश हा एक सक्षम पर्याय म्हणून नक्कीच कसोटीला उतरेल कारण, उत्पादनासाठी आवश्यक वातावरणाची उपलब्धता म्हणजेच उत्पादनाला जसे हवे तसे थंड, उष्ण, समशीतोष्ण वातावरण. इन्फ्रास्ट्रक्चर ची म्हणजेच वीज, पाणी, वाहतुकीची उपलब्धता, तरुण, सुशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सहिष्णुता.

४) या परिस्थितील संधी व आव्हाने -
नवनवीन रोजगाराच्या / व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध होतील परंतु त्यासाठी आवश्यक कौशल्ये आपल्या जवळ असतीलच असे नाही. यासाठी मंत्र Learn, Unlearn and Relearn. म्हणजेच शिका व काम करा त्या कौशल्याची गरज संपली की विसरून जा, म्हणजेच मला हे येतं मी हेच / एवढंच करीन असा विचार करू नका, समोर आलेल्या नवीन संधीचे स्वागत करा, परत शिका. एकाच कौशल्यावर नोकरी / व्यवसाय करायचे दिवस नाहीत. व्यवसायात दीर्घकालीन गुंतवणुकी टाळा प्रोजेक्ट पुरतीच गुंतवणुक करा.

५) तसेच उद्योजकांच्या गरजेनुसार छोटे छोटे ट्रेनिंग कोर्सेस  (Theory, Practical and online) घेऊन मनुष्यबळ पुरवण्याच्या संधी उपलब्ध होतील.

- गिरिषभाऊ, लेख वाचला, विषयाची मांडणी चांगली आणि भविष्यकालीन उपयोगी.

- गिरीश जी, यापुढील ब्लॉगमध्ये अध्यात्मिक सूत्रांची आणखी विस्तृत मांडणी करणे अपेक्षित आहे.

तसे जर आपण सुक्ष्म निरीक्षण केले तर लक्षात येते की अलीकडे बरेच लाईफ कोच आता पाश्चात्यांच्या थेअरी सोबत अध्यात्मिक सूत्रात दिलेले सिध्दांत शिकवत आहेत. हा एक मोठा आणि चांगला बदल अलीकडे झाला आहे. लाईफ कोचिंग मधे हा एक चांगला बदल होत आहे. वानगी दाखल सांगायचे तर स्नेह देसाई, सोनू शर्मा, डॉ.विवेक बिंद्रा असे अनेक कोच आज सेमिनार मधून अध्यात्मिक सूत्रे सांगत आहेत.भगवद्गीतेवर बोलत आहेत. हे खूप चांगले घडत आहे. कालाय तस्मै नमः | पुनश्च आपले अभिनंदन !

-  आरोग्य सेवेकडून लोकांचे लचके आजही तोडले जात आहेत. भविष्यात हे प्रमाण खुप वाढेल आणि या अमर्याद गळचेपीला संरक्षणाचे कवच पाहिजे. बुद्धी प्रामाण्यवादी माणसं स्मितहास्य करुन लोकांना वेठीला धरणार, यावर विचार गांभिर्याने होणे गरजेचे. जेनेरिक मेडिसिन्स डॉक्टर घेऊ नका म्हणतात. सध्या घसा खवखवणाऱ्या ३ गोळ्यांची किंमत २५०रु. आहे. भिती पोटी लोक खरेदी करतात. सर्वात मोठे क्राईम औषधी क्षेत्र आहे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग फक्त शोषणासाठीच होणार हे जनतेने गृहित धरावे का ? हे अनुत्तरित कोडे आहे. भ्रष्टाचाराचा महामेरु म्हणजे हे औषधी क्षेत्र आहे.

- सकारात्मक विचार , समाजात नैतिक मूल्यांबद्दल एकेकाळी असलेली आदराची भावना पुनर्स्थापित स्थापित झाली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला दैनंंदिन जीवनात आचरता येईल असा कृतिशील कार्यक्रम पाहिजे. अलिकडील उदाहरण म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी यशस्वी करून दाखविलेला भूदान यज्ञ  सांगता येईल .

- सुंदर लिखाण. सध्याच्या कोरोनामय वातावरणाचा ज्यांच्यावर निगेटिव्ह परिणाम झालेला आहे.  अशांसाठी तुझे लिखाण संजीवनी ठरेल यात शंका नाही.

लॉक डाऊन सुरू झाल्यापासून बँकेच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकार्‍यांचा एक ग्रुप तयार करण्यात आला असून सदर ग्रुप वर प्रत्येक जण आपापली मते व्यक्त करीत असतो. COVID - 19 चा बँकिंग व्यवस्थेवर होणारा अल्प, मध्यम व दीर्घ कालीन परिणाम असा विषय चर्चेला होता. चांगले विचार मंथन या विषयाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी केले व विस्तृत विश्लेषण तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यात आले. तुझा आजचा लेख त्या सर्व अंगांना स्पर्श करणारा असा आहे.

इतर देशांच्या तुलनेत भारताने योग्य वेळी उचललेली प्रतिबंधात्मक पाऊले व उपाय योजना बघता कोविडवर नियंत्रण मिळवण्यात चांगले यश आले आहे. १३० करोड लोकसंख्येचा आपला देश आपल्या कडील रूग्णांची संख्या अजूनही काही हजारांवर आहे हे आपले यशच आहे. कोविडचा बॅंकेवर परीणाम सहा महिन्यापर्यंत जाणवु शकतो त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा भरारी घेईल यात शंका नाही.
छोटे व्यावसायिकांच्या माध्यमातून कर्जवाढीसाठी संधी आहेत परंतु त्यात जोखीम घ्यावी लागेल. तसेच नविन कर्ज वाढीसाठी कर्जाची परतफेडी करिता अवकाश कालावधी कमीत कमी ३ महिने दिल्याने व्यवसायांना सुधारणे साठी पुरेसा कालावधी मिळाला आहे. आपल्यासाठी चिंतनाचा विषय थकबाकी व एनपीए असुन त्यामधे वाढ होऊ शकते किंबहुना विलफुल डिफॉल्टर सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात त्यासाठी उपाययोजना करावी लागेल. हायपो व कॅश क्रेडिट कर्जांना अधिक क्लोज मॉनिटर करावे लागेल.

मुदत ठेवीच्या बाबतीत आपल्या शाखेचा कस्टमर बेस कसा आहे यावर वाढ किंवा घट अवलंबून आहे . मुळात सध्याच्या परिस्थितीचा धडा घेऊन आणीबाणीच्याप्रसंगी सहज उपलब्ध होऊ शकेल अशा बचतीकडे लोकांचा कल राहील त्यासाठी मुदत ठेवीच्या चांगल्या नवीन योजना आणल्यास ठेवींमध्ये वाढ होऊ शकते. बॅंकेचे सध्याचे असलेल्या कर्जदार व ठेवीदार यांच्याशी सतत संपर्कात राहून व्यवसाय टिकवण्यासाठी त्यांना आवश्यक ती आर्थिक मदत केल्यास व्यवसायात निश्चितच वाढ करता येईल. कोविडचा आपल्यावर काय परिणाम होईल याची प्रचिती लॉकडाउन उठवल्यानंतर काही दिवसांनंतर दिसून येईल. आपण येणाऱ्या परिस्थितीस कसे सामोरे जातो यावर ते अवलंबून असणार आहे. भारत जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असुन संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत आहे.  या आर्थिक वर्षात आपल्या व्यवसाय वाढीची गती कमी होईल असे वाटत असले तरी येणाऱ्या परिस्थितीस  सकारात्मक दृष्टीने सामोरे गेल्यास चांगले परिणाम दिसून येऊ शकतात.

- खूपच प्रेरणादायी... अर्थात लिहीलेल्या सर्व गोष्टी यशस्वी होण्यासाठी कुठल्याही काळात महत्वाच्याच आहेत. पण कोरोना पश्चात त्या अधिक पणाला लागतील हे मात्र खरं. परिस्थितीचे एक उत्तम विश्लेषण.

- विचार चांगले आहेत. खालील मुद्दे अंतर्भूत करून त्यावर साधक बाधक चर्चा / विचार मंथन करावे
१ ) प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते, तसेच प्रत्येकाची शक्तीस्थळे व मर्यादा वेगवेगळ्या असतात. त्यांचा समन्वय साधला पाहिजे .
२ ) वरील मुद्दे संस्थानाही लागू आहेत .
३ ) पैशांचे सोंग आणता येत नाही, म्हणून एका कमीत कमी उत्पनाची व्यवहार्य योजना हवी .
४ ) योजना लवचिक हवी .
५ ) नेतृत्वगुण अंगी असणाऱ्या लोकांना संधी द्यावी .
६ ) कुठल्याही परिस्थितीत संधी असते, ती शोधावी व संधीचा उपयोग करावा .

- सर खुप छान मुद्दे आपण उपस्थित केले आहेत. यावर विचार आताच करणे भाग आहे.

- थोडी आवडणार नाही अशी माझी पहिली प्रतिक्रिया आहे. मला तिच्यासाठी माफ कराल. सर, आपण १०० जणांना टॅग केले आहे. ते वाचतील हे खरे पण त्याचा कोणता productive उपयोग होणार ? मी साशंक आहे. केवळ दहा टक्के लोकांची तुम्ही टीम केलीत आणि काही tasks दिलेत तर ते लेखमालेस सार्थकी करणे.

- तुमचे विचार चांगले आहेत, जे विचारवंत आहेत त्यांनी मते दिलीच आहेत फक्त त्याचा वापर चांगल्या रीतीने झाला पाहिजे. एकच एकत्र व्हा. संघटित व्हा.

- माझे विचार

१) खेडयाकडे चला हे इतके दिवस कोणाला  सांगूनही पटले नव्हते पण आता मात्र लोकांनी याचा विचार करायला नक्कीच सुरवात केली असेल. अजून विचारात तेवढे गांभीर्य नसेल पण एक पर्याय म्हणून नक्कीच याचा विचार होईल

२) शहरात रहाणे म्हणजे प्रगती आणि गावात रहाणे हा मागासलेपणा हा विचार नक्कीच मागे पडायला सुरुवात होईल.

३) सरकारही लोकसंख्या विकेंद्रीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात उद्योगांना मोठया सवलती जाहीर करेल  त्यामुळे सध्याच्या उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये फक्त काही मोठे उद्योग ग्रामीण भागाकडे वळतील.

४) ग्रामीण भाग बेसिक सोयी सुविधा जसे पाणी, गटार सांडपाणी व वीज यांनी युक्त झाल्याने ग्रामीण भागात रहाणाऱ्या व ग्रामीण भागाकडे वळलेल्या लोकांमधे शहरात जाऊन २-३ दिवस मजा करून परत येण्याचा कल दिसून येईल

५) या सगळ्या गोष्टींचे प्रमाण हे कमी असेल तरीही ग्रामीण भागाच्या समावून घेण्याच्या क्षमतेच्या तुलनेत पुरेसे असेल

६) या सर्वाचा एकत्रित परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यात होईल व ही आर्थिक चालना नवीन लोकांना ग्रामीण भागाकडे खेचून आणण्याची सायकल सुरू करेल

- थोडी आवडणार नाही अशी माझी प्रतिक्रिया आहे.

मला तिच्यासाठी माफ कराल.
सर, आपण १०० जणांना टॅग केले आहे.
ते वाचतील हे खरे पण त्याचा कोणता productive उपयोग होणार ? मी साशंक आहे.
केवळ दहा टक्के लोकांची तुम्ही टीम केलीत आणि काही tasks दिलेत तर ते लेखमालेस सार्थकी करणे.

यासर्व प्रतिक्रियांशिवाय एक प्रतिक्रिया वेगळीच आहे. अर्थात संबंधितांनी गेले सहा दिवस त्याचे उत्तर मागून दिले नाही. लेख लिहिण्यापूर्वी त्यांना फोन केला तेव्हा मला पुन्हा लेख पाठवा मी उत्तर देईन असे म्हणालेत...

- कृपया काहीतरी अधांतरी बोलू नये व इतरांची मानसिक फसवणूक करु नये. मी गेल्या ६/७ पिढ्यांपासून शेतकरी कुटुंबातील आणि बीझनेस कुटुंबातील आहे.  मला जास्त भाष्य करावयाचे नाही म्हणून येथेच थांबत आहे, अंन्यथा प्रत्यक्ष भेटून बरेच मुद्दे‌ मांडता व खोडता येतील.


हि लेखमाला समृद्ध करणाऱ्या सर्व महानुभावांचे मनापासून धन्यवाद ! आपल्या प्रतिसादाने मला वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले.  लेखनाला एक दिशाही मिळायची. हा विषय अधिक समृद्ध व्हावा यातून किमान आशा फौंडेशनच्या पुढील कार्याची दिशा ठरविण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. आशा सारख्या अनेक संस्था आपल्या अस्तित्वाची लढण्यासाठी सिद्ध आहे.  आपल्या सर्वांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आपणही व्यक्त व्हावे हि अपेक्षा व्यक्त करतो.

2 comments:

  1. सर्व लेख उत्कृष्ट. आपणापाशी लेखनशैली आहेच. उपक्रमास शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. हेमंतराव, धन्यवाद ! यात माझं काहीही नाही. पांडुरंगाची व सदगुरु सखाराम महाराजांची कृपा व आपल्यासारख्या वाचकांचे पाठबळ !

      Delete