Friday 24 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ९

भारतीयांच्या सकारात्मक मानसिक बदलाची नांदी


मित्रहो, आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद देत असतांनाच आपणास पुन्हा एकदा सांगायचे आहे, या लेखांमधून जे काही मांडत आहे, ते विचार आहेत. या सर्व विषयांचा मी तज्ज्ञ नाही. मात्र जे काही मांडत आहे त्यामागे काही विचार प्रक्रिया आहे. अनेक संदर्भ अभ्यासून माझ्या बौद्धिक  क्षमतेनुसार विषयाचे आकलन करुन ते आपल्या समोर मांडत आहे. आशा फौंडेशनच्या भविष्यकालीन वाटचालीचा विचार करीत असतांना मनात आलेले काही प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठीचा विचार लेखांमध्ये मांडत आहे. आपल्या प्रतिक्रियारुपी सूचना, मते यांचे स्वागत आहे.

सध्याच्या लॉक डाऊनच्या पश्चात मानवी वर्तनाचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडून येतील असे प्रामाणिकपणे वाटते व तशी अपेक्षा आहेच. परिस्थितीशी जुळवून घेत असतांना अनेकांना अडचणी येऊ शकतील त्यान्चेशी बोलून, मोकळा संवाद साधून त्या सोडविल्या गेल्या पाहिजेत. त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची व समुपदेशनाची गरज आहे. अन्यथा ही मंडळी नकारात्मकतेकडे किंवा वैफल्यग्रस्त अवस्थेकडे जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.


भारतीयांच्या मानसिकतेत घडून येणारा महत्वाचा मानसिक बदल म्हणजे आपण आपल्याच तत्वांना बाजूला सारुन पाश्चात्यांच्या ज्या गोष्टींचे अंधानुकरण करीत होतो ते थांबेल. आपल्या भारतीय संस्कृतीत व तत्वज्ञानात सांगितलेले शाश्वत विचारांना स्वीकृती मिळेल, त्याचे अनुकरण केले जाईल. साधारणपणे भारतीयांना अन्य देशांचे विशेष आकर्षण राहिले आहे. अलीकडे त्याचे प्रमाण खूपच वाढलेले होते. त्याबाबत सर्वचजण योग्य विचार करतील. ९० च्या दशकापासून भारतीयांच्या मानसिकतेत खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पना, स्वार्थी व भोगवादी  वृत्तीचा अतिरेकी वापर, माणसापेक्षा पैशाला दिलेले अवास्तव महत्व, स्पर्धेच्या नावाखाली केलेली तत्वांशी तडजोड, नैसर्गिक जीवनशैलीशी केलेली फारकत, आहार विहाराच्या बदललेल्या संकल्पना यातून आजचा समाज व त्यातील माणसाची मानसिकता तयार झाली आहे. लॉक डाऊनने या सर्व गोष्टींचा फोलपणा सिद्ध केला आहे. अर्थात त्यासाठी आवश्यक असलेली डोळस वृत्ती व विवेकी विचार मानवाच्या ठायी असावा लागेल. आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण यांचे हे दुष्परिणाम म्हणता येईल. या गोष्टींचा अंगीकार करीत असतांना "वसुधैव कुटुंबकम", "जोडोनिया धन उत्तम वेव्हारे...", "असाध्य ते साध्य करीत सायास...", "निर्माणों के पावन युग में..."   यासारख्या भारतीय तत्वज्ञानाला सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याचाही हा परिणाम म्हणता येईल. तत्व आणि व्यवहार यांच्यात योग्य सांगड न घातल्याने या गोष्टी घडल्या असे नक्की म्हणता येईल.

लॉक डाऊनच्या या काळात खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावणाऱ्या लोकांना अंतर्मुख होण्याची संधी मिळाली आहे. जीवनाचा उद्देश काय ? सुख म्हणजे काय ? यश म्हणजे काय ? पैसा किती ? कसा ? कशासाठी ? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या काळाचा नक्कीच उपयोग झाला असेल. त्याची योग्य उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांना ती सापडली असतील आणि म्हणूनच सकारात्मक बदल घडेल असे म्हणण्याचे धारिष्ट्य दाखविले आहे. जीवनात किती गोष्टी निरर्थक करीत होतो आणि ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्याकडे कसे दुर्लक्ष होत होते ते पण नक्कीच लक्षात आले असेल. आपणच आपल्या गरजा किती अमर्यादपणे वाढवून ठेवल्या होत्या आणि त्या मिळविण्यासाठी आपले जीवनच पणाला लावले होते. कोणे एकेकाळी आहे त्यात समाधान मानणारे व त्यातूनही इतरांचा विचार करणारी भारतीयांची वृत्ती कुठेतरी हरविली होती याची नक्कीच जाणीव झाली असेल. जीवनात काही गोष्टी बदल म्हणून अपवादात्मक स्थितीत कराव्या लागतात मात्र अपवाद हाच जेव्हा नियम होतो त्यावेळेस आजची परिस्थिती निर्माण होते. खरेदी आणि शॉपिंग यामधील मानसिकतेचा बदल कळून आला असेल. काटकसर आणि कंजूषपणा यातील फरकही समाजाला असेल.


यासर्व गोष्टींचा विचार करता मानवाच्या वर्तनात सकारात्मक बदल घडेल असे मला ठामपणे वाटते. "कोरोना" पश्चात माणसाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झालेला दिसेल असे वाटते. आरोग्याला विशेष महत्व येईल त्यामुळे आहार, विहार आणि व्यायाम यावर माणूस स्वतःच बंधने घालून घेईल अशी अपेक्षा आहे. मर्यादित साधनांमध्ये आनंदी जीवन जगता येते ही सांगणारी भारतीय संस्कृतीचा अंगीकार केला जाईल अशी अपेक्षा आहे. निसर्गानुकूल जीवनशैलीचा स्वीकार केला जाईल. चाळीशीच्या पुढच्या मंडळींना तसे हे सोपे जाईल कारण त्यांनी जीवनातील असा कल अनुभवाला आहे,  त्यातही प्रवाहपतीत झालेल्यांना थोडे कठीण जाईल. अर्थात ही एकच बाजू आहे. तिशीच्या आत असलेल्यांना याची जाणीव करुन द्यावी लागेल. त्यांच्या हे सर्व पचनी पडणे कठीण आहे मात्र अशक्य नाही. भारतीय अध्यात्मात याची ताकद आहे, ती सांगणारी अनेक कृतिशील मंडळी समाजात आहेत आणि अलीकडच्या पिढीचे ते आदर्श आहेत.

लेखाची मर्यादा लक्षात घेऊन केवळ विचार आपल्यासमोर ठेवला आहे. हा विचार आला त्याची अनेक उदाहरणे देता येतील तो मोह टाळला आहे. थोडक्यात भगवान श्रीकृष्णांनी म्हटल्याप्रमाणे

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।
सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥

याचा अर्थ माणूस वस्तूंच्या बाबतीत विचार करीत राहिला कि त्याबद्दल प्रेम निर्माण होते. त्यामुळे त्या वस्तूबद्दल त्यांच्या मनात इच्छा निर्माण होते आणि वासनेतून राग उत्पन्न होतो. त्याच्या पुढच्या श्लोकात भगवान म्हणतात

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥

याचा अर्थ रागामुळे माणसाची मेंदू भ्रष्ट होतो आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. स्मृतिभ्रंश झाला कि माणसाची बुद्धी नष्ट होतो आणि बुद्धी नष्ट झाली तर माणूस स्वतःचाच नाश करतो.

भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेले आज आपण अनुभवत आहोत. आपण सर्व सुज्ञ वाचक आहात. आपण माझ्याशी सहमत व्हाल याची खात्री आहे. "कोरोना" पश्चात माणसाच्या वर्तनात वाटणारा बदल लेखाच्या पुढच्या भागात वाचण्यास विसरु नका.

1 comment:

  1. १ )सकारात्मक विचार !
    २ (समाजात नैतीक मूल्यांबद्दल एके काळी असलेली आदराची भावना पुनःस्थापित झाली पाहिजे .
    ३ )सर्वसामान्य माणसाला दैनंंदिन जीवनात आचरता येईल असा क्रुतीशील कार्यक्रम पाहिजे .
    ४ ) अलिकडील उदाहरण म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी यशस्वी करून दाखविलेला भूदान यद्न्य सांगता येईल .

    ReplyDelete