Tuesday 14 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग १

"कोरोना" पश्चात व्यवसायातील आव्हाने 

देशासमोर "कोरोना" सारखे महाभयानक संकट उभे असतांना समर्थ भारताची उभारणी जरा हास्यास्पद वाटतेय ना ? स्वाभाविक आहे कारण आपण सर्वजण पुढील काळाचे नकारात्मक चित्रच आपल्या मन:चक्षुसमोर पाहतोय. कारण आपण चर्चा तशीच करतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी तशा आहेतही हे मी नाकारत नाही. म्हणजे वास्तव तसे असले तरी गर्भगळीत होण्याची वेळ नाही. भारतीयांची  मेहनती, पडेल ते काम करण्याची, काटकसरी, मर्यादित साधनामध्ये काम करण्याची तसेच आहे त्यात समाधान व आनंदी राहण्याची वृत्तीच ही नकारात्मकता खोटी ठरवतील असा मला विश्वास आहे.  "कोरोना" सारख्या अकल्पित संकटाला आपण ज्या समर्थपणे तोंड देत आहोत ते याचेच द्योतक आहे.

मा. पंतप्रधानांनी अपेक्षेप्रमाणे लॉकडाऊन ३ मी पर्यंत वाढविला आहे. या काळात दि. २० एप्रिल पर्यंत विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यानंतर परिस्थितीनुसार काही गोष्टींमध्ये सूट मिळू शकते. अर्थात हि सूट आहे लॉक डाऊन असणारच आहे. सोबतीला या काळात सप्तपदीचे आवाहन करीत परिस्थिती अधिकाधिक नियंत्रणात आणण्यासाठीचे उपायही सांगितला आहे. मला या काळाचा सदुपयोग लॉक डाऊन नंतरच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी करावा असे आवाहन करायचे आहे. कारण या लॉक डाऊनने अनेक प्रश्न निर्माण केले आहे. दि. ४ एप्रिल रोजी सोशल माध्यमांमध्ये याबद्दल लिहिले होते.

समर्थ भारताचा विचार करतांना सर्वच क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक व नोकरदार मंडळींनी खालील गोष्टींचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. यावरच वैयक्तिक, व्यावसायिक, उद्योजकीय व संस्थात्मक यशस्विता अवलंबून आहे.

१) आपल्या व्यवसायाचे स्वरुपात काय बदल होईल ?
२) व्यवसायाचे आर्थिक नियोजन कसे करणार ?
३) व्यवसायाची कार्यपद्धती कशी असेल ?
४) आपली उत्पादनांची मागणी राहील का ?
५) व्यवसायाचे अस्तित्व टिकविण्यासाठी काही नवीन उत्पादनांचा विचार केला आहे का ?
६) आपल्या व्यवसायातील मनुष्यबळाचे मनोधैर्य वाढीसाठी काय करावे लागेल ?
७) व्यवसायाचे मार्केटिंग (विपणन) कसे करणार ?
८) आपल्या ग्राहकाच्या क्रय शक्तीचा (purchasing power) व्यवसायावर काय परिणाम होईल ?
९) व्यवसायाच्या खर्चावर नियंत्रण कसे मिळविणार ?
१०) मनुष्यबळाला घरुनच काम करुन घेता येईल का ?
११) व्यवसायात तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवून अपेक्षित उद्दिष्ट्ये साधता येतील का ?
१२) व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी सृजनशीलता व नाविन्यता वापरावी लागेल.
१३) काळानुरुप व्यवस्थापकीय व तांत्रिक कौशल्ये असे विकसित करणार आहोत ?

मित्रहो, ही यादी खूप मोठी करता येईल.  कारण व्यवसायाच्या विविध क्षेत्रात वेगवेगळया विषयांचा विचार करावा लागणार आहे. आपण सर्व भारतीय आपत्तीतही संधी शोधणारी मंडळी आहोत त्यातूनच आपली अस्तित्वाची लढाई जिंकणार आहोत. यात केवळ आपण आणि आपले सहकारी इतकाच मर्यादित विचार न करता आपल्या समव्यावसायिकांचाही विचार करावा. आपण एकत्रितपणे येणाऱ्या आव्हानांवर सहज मात करु शकू. चला, मग भविष्याची सकारात्मक कल्पना करा आणि सिद्ध व्हा,,, यातूनच नवीन समर्थ भारताची उभारणी होणार आहे.

                                                                                                                                                (क्रमश:)

2 comments:

  1. सर खुप छान मुद्दे आपण उपस्थित केले आहेत. यावर विचार आताच करणे भाग आहे.

    ReplyDelete
  2. धन्यवाद अमित ! प्रयत्न करतोय. जागं करणे वा जाणीव करुन देणे वा विचार करण्यास प्रवृत्त करणे एव्हढाच उद्देश आहे.

    ReplyDelete